ढग
कुणाच्या आयुष्याचा दोर कधी तुटेल आणि कुणावर नशीब कधी मेहरबान होईल या गोष्टी सदैव अंधाराच्या मुक्कामाप्रमाणे मानवाला अज्ञातच राहतील. परंतु असे आहे म्हणून जेवढे हाती उरते त्या आयुष्यालाच बेभरवशाचे करण्यात काय अर्थ आहे? सध्या अविश्वास आणि अस्वस्थतेने आपल्याला अशी घट्ट मिठी मारलीये की प्रत्येक श्वासावर आणि कृतीवर त्यांचा प्रभाव जाणवतो आहे. आनंद, समाधान, हास्य या नैसर्गिक भावनांचा प्रसवदर कमालीचा खालावला आहे. आपल्या मनातली स्वतंत्र विचारांची अमानुष भ्रूणहत्या कळसाला पोहोचली आहे. आपल्याला सगळं काही स्वतःचं आणि स्वतःकरिता हवं आहे केवळ विचार सोडून.