मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घर

टुकुल · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
टप, टप, टप करत बाजुच्या खिडकिवरचे पावसाचे थेंब जुन्या आठवणींत ओढताहेत. परवा माझ्या नवीन फ्लॅट चा ताबा मिळनार, नवीन फ्लॅट बराच मोठा आणी मस्त सोसायटीत आहे म्हणुन घरचे सर्व जण खुष, आनंद आहे, पण काय माहीत माझ्या सध्याच्या घराला काय वाटत असावे! -------------- खर्रर खर्रर खच्च, घरासमोर ४०७ टेंपो येवुन थांबला, बोलल्याप्रमाणे आज घराचा ताबा घेण्यासाठी दशरथ आला होता. मोठ्या भावाने पडदा थोडासा बाजुला सरकवुन बघितले. गेले काही दिवस त्याच्यासाठी खुपच तणावात गेल्याने तो निघुन गेला, छोटा भाउ पण वडीलांना फोन करायला बाहेर. पडदा बाजुला सारत दशरथ आत आला, आ़ज मामाची (त्याच्या) आणी सामान उचलायला ५ मजुरांची साथ होती मामा -- थोडा मळकट सदरा आणी ढगाळ लेंगा नेसलेली व्यक्ती, जिला बघुनच मला धसकी भरायची. मुलीला पाहण्याच्या कार्यक्रमात जशी वरपक्षाला वागणुक देतात, त्याप्रमाणे वागवत मी त्यांना चटई अंथरुण बसा म्हट्ले, आतमधे जावुन आईला पाहिले, ति पण बरीच भेदरलेली होती, तिच्या चेहर्यावरचे भाव पाहीले आणी काही न बोलता परत बाहेर आलो. तंबाखु चा बार लावत मामा "काय रे, तुझा बाप आला का गावावरुन?" "नाही आले, फोन पण लागत नाही आहे" "ते आपल्याला काही माहीत नाही, चला घर खाली करा आणी तुम्ही पण जा गावाला. कुठल सामान पहिल उचलायच?" "मामा, अस काही करु नका, थोडा वेळ द्या, बाबा तुमचे पैसे परत देतील" आईने बाहेर येवुन त्यांना स्पष्ट सांगीतले कि कुठ्ल्याही कागद पत्रांवर तिची सही नाही आहे आणी घर सोडुन आम्हाला जायला दुसरे कुठले ठिकाण नाही. बर्‍याच वादावादीनंतर अजुन आठवड्याभराची मुदत मिळाली. बाहेर गेलो, आणी दोन्ही भावाना शोधुन आणले. वर्षाभरापुर्वी बाबांचा धंदा येवढा जोरात चालु होता कि घरी नवीन कार घ्यायचा विचार सुरु झाला, पण दिवस एवढे पटकन बदलले कि बाबा कर्जात बुडाले आणी पैश्यांची व्यवस्था करायला गावी गेले होते. दिवस मावळला, दुकानदाराच्या शिव्या खावुन थोडे तांदुळ आणी डाळ आणली. रात्र झाली पण मला काही झोप येत नव्हती, अजुन एकच आठवडा आणी त्यानंतर घर सोडावे लागणार म्हणुन विचारात होतो. बाहेर पाउस सुरु झाला, सिमेंटच्या पत्र्यावर (छत) टप, टप, टप आवाज येवु लागले आणी थोडा शांत झालो. पडल्यापडल्या जेव्हढी नजर फेरता येइल तेव्हढ घर पाहील. १०-१२ वर्षे काढलेल्या घराला आठवड्यानी सोडावे लागणार माझ्या एवढेच ते पण सुन्न वाटत होते, काहीतरी अतुट नाते जाणवले. बाहेरुन पावसाचा मार आणी आतुन माझ्या विचारांचा भार सोसावत ते गळु लागले. आई उठली आणी जिथे जिथे गळत होते तिथे स्टिल ची भांडी लावली. "झोपला नाहीस का रे अजुन?" आवाजाला स्तब्ध राखत तिने विचारले. मि गप्प. थोड्या वेळाने परत आई जवळ गेलो तर ति अजुन रडतच होती. जस जमेल त्या प्रमाणे तिला समजावत होतो. छतातुन आणी डोळ्यातुन एकत्र पाणी , पण एक आवाज करत होत तर दुसर मुकं. स्टिल च्या भांड्यात पडणार्‍या थेंबांना एकत पहाटे पहाटे झोपलो. आठवडा भुर्रकन गेला, मामा परत हाजीर, परत अजुन एक मुदत..... पण घर काही जावु दिले नाही ---------------------------------------------- वर्ष गेली, खुप शिकलो आणी घराबाहेर (देशाबाहेर) एकटा पडलो. अजुनही पाउस तसाच आवाज करत आहे, ना तो बदलला ना मी, मग घर बदलन जरुरी आहे का? -- मिपाच्या मातब्बर मंडळी समोर अस्मादीक कुठेच नाहीत, त्यामुळे काही चुका आढळल्यास सांभाळुन घ्या --

वाचने 5616 वाचनखूण प्रतिक्रिया 25

llपुण्याचे पेशवेll 09/10/2009 - 14:22
मिल्या, छानच लिहीले आहेस रे. _/\_ घर बदललेस ते चांगले केलेस. सगळ्याच गोष्टी काही तशाच ठेवायच्या नसतात. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

छोटा डॉन 09/10/2009 - 14:32
टुकुलशेठ, मस्त लिहले आहेस रे. चुका वगैरेंची काळजी करत जाऊ नकोस, मनोसोक्त आणि मनाला वाटेल तेच लिहीत रहा. एकदा भावना लेखात उतरल्या की मग भाषा आणि भाषेचे अलंकार ह्याला दुय्यम स्थान रहाते, तेव्हा त्याची काळजी नको. मस्त जमला आहे लेख, शेवटचे वाक्य आवडले ... "अजुनही पाउस तसाच आवाज करत आहे, ना तो बदलला ना मी, मग घर बदलन जरुरी आहे का?" , झक्कास !!! ------ छोटा डॉन बहिणाबाई म्हणतात "अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर". आता कसले भाषासौंदर्य, व्याकरण, शुद्धलेखन पाहता आणि कशासाठी ?

In reply to by छोटा डॉन

अनिल हटेला 09/10/2009 - 14:39
"अजुनही पाउस तसाच आवाज करत आहे, ना तो बदलला ना मी, मग घर बदलन जरुरी आहे का?" काही गोष्टी कळतात ,पण वळत नाहीत.... असो........... लिहीत रहा!! :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

यशोधरा 09/10/2009 - 14:41
खूप सुरेख लिहिलंय! अगदी मनापासून. खूपच आवडलं...

सहज 09/10/2009 - 15:23
नविन घराच्या शुभेच्छा!! >मग घर बदलन जरुरी आहे का? घर म्हणजे चार भिंती नाहीत, घर घरातील लोकांमुळे बनते. मस्त रे!! लवकर मोठा बंगला मिळू दे. अभिनंदन! अजुन येउ दे.

In reply to by सहज

३_१४ विक्षिप्त अदिती 09/10/2009 - 15:36
सुरेख लिहिलं आहेत.
घर म्हणजे चार भिंती नाहीत, घर घरातील लोकांमुळे बनते.
अगदी सहमत. मोठा बंगला मिळू देत, पण त्याबरोबर घरात आपली माणसं कायम तुमच्याबरोबर असोत या शुभेच्छा! अदिती

स्वाती२ 09/10/2009 - 18:02
खूप आवडले. >>घर म्हणजे चार भिंती नाहीत, घर घरातील लोकांमुळे बनते. अगदी अगदी. मात्र घरातली माणसं बदलली की तेच घर परके होते. नविन घरातील पुढील आयुष्य आपल्या माणसांबरोबर आनंदात जावो.

भाग्यश्री कुलकर्णी 09/10/2009 - 18:29
चांगलं लिहलंस. गळणार्‍या घरात एकटीने रात्र काढायचा अनुभव घेतलाय मी.अजुनही ते दिवस आठवले की डोळे भरुन येतात. ह्यासारखे प्रसंगच पाय जमिनीवर घट्ट ठेवायला मदत करतात्.सह्ही लिहलंस. "छतातुन आणी डोळ्यातुन एकत्र पाणी , पण एक आवाज करत होत तर दुसर मुकं."काळजाला हात घातलास.

उर्मिला०० 09/10/2009 - 18:34
खूप भावपूर्ण लेख लिहिला आहे.अभिनंदन!!!!!!!

नंदू 09/10/2009 - 18:52
सोपी भाषा, ओघवती शैली. टकुलं शेठ, फारच छान लिहीलय तुम्ही. खरोखर फार आवडलं नंदू

रामदास 09/10/2009 - 19:18
आपलं अभिनंदन. सुंदर लेख.थोडा विस्तारानी लिहीला असता तर ... व्यंकटेश माडगूळकरांच्या एका कथेची आणि महादेव शास्त्री जोशींच्या एका कथेची एकाच वेळी आठवण झाली. पुलेशु.

रामदास 09/10/2009 - 19:18
आपलं अभिनंदन. सुंदर लेख.थोडा विस्तारानी लिहीला असता तर ... व्यंकटेश माडगूळकरांच्या एका कथेची आणि महादेव शास्त्री जोशींच्या एका कथेची एकाच वेळी आठवण झाली. पुलेशु.

अवलिया 09/10/2009 - 19:32
मस्त सुरेख लेखन --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्राजु 09/10/2009 - 21:42
अतिशय सुरेख लिहिले आहेस... खूपच छान. - प्राजक्ता पटवर्धन http://praaju.blogspot.com/

चित्रा 10/10/2009 - 00:19
आवडला लेख. हळवे करून गेला.

चतुरंग 10/10/2009 - 01:09
फार आतनं आलंय रे! छतातुन आणी डोळ्यातुन एकत्र पाणी , पण एक आवाज करत होत तर दुसर मुकं. काय बोलू? तुझ्या नवीन घराला शुभेच्छा आणि जुन्यालाही! :) आमचा वाडा पाडून अपार्टमेंट काँप्लेक्स केलं तेव्हाची आठवण आली. सगळं घर खाली करताना ते जोरजोरात आक्रंदून "नका रे जाऊ सोडून!" असं जिवाच्या आकांतानं म्हणतंय असं वाटत होतं. परिस्थितीपुढे इलाज नव्हता. जवळच्याच अपार्टमेंटमध्ये सामान हलवलं. भिंतीवर पहिली कुदळ बसली, खरंतर छातीवर बसली! रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता. चार दिवस त्या रस्त्यानं जायचं धाडस माझ्यात नव्हतं. पाचव्या दिवशी भर दुपारचा तिथे जाऊन त्या खंडहरात ढसाढसा रडत बसलो होतो. वडील बर्‍याचवेळानं मला शोधत आले. समजूत घालून घेऊन गेले...जाऊदे....आठवणी एकदा झिरपायला लागल्या की खळत नाहीत.... चतुरंग

sneharani 10/10/2009 - 13:08
खूपच छान.... घर म्हणजे घर असावं नकोत नुसत्या भिंती त्यात असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती

सुमीत भातखंडे 15/10/2009 - 20:17
वाचनखूण साठवल्ये. बाकी बोलण्या - लिहिण्या सारखं कहिही नाही.