मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सत्यकथा

डॉ.प्रसाद दाढे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तो बंगला गूढच दिसतो. खूप वर्षांपासून कुतुहल होतं की तिथं राहणारे लोक नेमके कोण असतील. साधारणपणे चौदा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा पुण्यात आजच्यासारखा पैशाचा पूर वाहात नव्हता, आयटी हब इ काहीच नव्हते, गुंठामंत्री नव्हते. टिप्पिकल पेन्शनर आणि विद्यार्थ्यांचे गाव होते ते. त्यामुळे दर सहा महिन्यांनी नवीन कार घेऊन उंडारणारा 'त्या' बंगल्यातला फक्त पंधरा वर्षांचा मुलगा पाहून आम्ही सायकलवर दातार क्लासला जाणारे तोंडात बोट घालत असू. ज्याम हेवा वाटायचा. सालं काय नशीब आहे असं वाटायचं. त्या बंगल्यात क्वचितच वर्दळ दिसायची. त्यांची म्हणे पुण्याच्या आसपास काही शे एकर जमीन होती, अनेक बंगले- फार्म हाऊसेस होती इ इ दंतकथा आम्ही ऐकायचो. माझा एक मित्र त्या बंगल्याच्या जवळच राहायचा, त्याच्याकडे अभ्यासाला जायचो तेव्हा गॅलरीतून त्या बंगल्यातल्या एकसे एक गाड्या पाहात बसणं आणि स्वप्नरंजन करणं हा एक आमचा छंदच होता. पण एक दिवशी एक भयंकर प्रसंग घडला. माझ्या मित्राची एक आजी कर्नाटकातल्या त्यांच्या मूळ गावाहून काही दिवसांसाठी इथं राह्यला आली. तिला म्हणे काही सिद्धी वगैरे प्राप्त होत्या, पुढचं दिसत असे. सिक्स्थ सेन्स' का कायससं म्हणतात ना तसलं काहीतरी. तर ती मित्राच्या ह्या नवीन घरात पहिल्यांदाच आली होती त्यामुळे तिला सगळं घर सगळ्या सोयीसुविधांसकट दाखविण्याचा कार्यक्रम सुरू होता. सगळ्यात शेवटी गच्चीत जेव्हा आजीला आणलं तेव्हा ती एकदम चमकली. तिचा चेहराच बदलला. तिनं एक क्षण 'त्या' बंगल्याकडे पाहिलं आणि झर्रकन वळून ती पायर्‍या उतरू लागली. खाली येता क्षणी तिनं मित्राच्या बाबांना विचारलं, ' समोरच्या बंगल्यात कुणा स्त्रीचा भाजून मृत्यू झाला होता का?' बाबांचा चेहरा एकदम बदलला.. 'तुला कसं कळलं?' थोडसं चाचरतच त्यांनी विचारलं. आजीने एक दीर्घ निश्वास टाकला व म्हणाली, 'मला 'ती' भाजलेली बाई दिसली..' ऐकणार्‍या सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला.. मग बाबांनी खरी पार्श्वभूमी सांगितली. काही वर्षांपूर्वी 'त्या' बंगल्याच्या मालकिणीने जाळून घेतलं होतं. पोलिसांनी जरी आत्महत्त्या नोंदविली असली तरी शेजार्‍यांची खात्री होती की तिच्या अतिश्रीमंत नवर्‍याचंच ते कृत्य होतं. कारण त्याचे म्हणे एका मोलकरणीशी अनैतिक संबध होते व त्यावरून रोज नवरा- बायकोची भांडणे होत असत.. एके रात्री अश्याच खूप भांडणांनंतर त्याने बायकोच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळलं होतं.. अन तो एव्हढा श्रीमंत होता की एक खून पचविणे त्याच्या डाव्या हातचा मळ होता. पण तेव्हापासून त्या बाईचं पिशाच्च त्याला छळत असे.. तो त्या बंगल्यात परत कधीच सुखाने राहू शकला नाही.. दुसरीकडे कुठतरी शिफ्ट झाला.. आणि ते पिशाच्च त्या बंगल्यात खूप जणांनी पाहिलं होतं असंही बाबा म्हणाले.. मी परत कधीही त्या मित्राकडे अभ्यासाला गेलो नाही..

वाचन 10551 प्रतिक्रिया 0