Skip to main content

सत्यकथा

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी गुरुवार, 24/09/2009 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
तो बंगला गूढच दिसतो. खूप वर्षांपासून कुतुहल होतं की तिथं राहणारे लोक नेमके कोण असतील. साधारणपणे चौदा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा पुण्यात आजच्यासारखा पैशाचा पूर वाहात नव्हता, आयटी हब इ काहीच नव्हते, गुंठामंत्री नव्हते. टिप्पिकल पेन्शनर आणि विद्यार्थ्यांचे गाव होते ते. त्यामुळे दर सहा महिन्यांनी नवीन कार घेऊन उंडारणारा 'त्या' बंगल्यातला फक्त पंधरा वर्षांचा मुलगा पाहून आम्ही सायकलवर दातार क्लासला जाणारे तोंडात बोट घालत असू. ज्याम हेवा वाटायचा. सालं काय नशीब आहे असं वाटायचं. त्या बंगल्यात क्वचितच वर्दळ दिसायची. त्यांची म्हणे पुण्याच्या आसपास काही शे एकर जमीन होती, अनेक बंगले- फार्म हाऊसेस होती इ इ दंतकथा आम्ही ऐकायचो. माझा एक मित्र त्या बंगल्याच्या जवळच राहायचा, त्याच्याकडे अभ्यासाला जायचो तेव्हा गॅलरीतून त्या बंगल्यातल्या एकसे एक गाड्या पाहात बसणं आणि स्वप्नरंजन करणं हा एक आमचा छंदच होता. पण एक दिवशी एक भयंकर प्रसंग घडला. माझ्या मित्राची एक आजी कर्नाटकातल्या त्यांच्या मूळ गावाहून काही दिवसांसाठी इथं राह्यला आली. तिला म्हणे काही सिद्धी वगैरे प्राप्त होत्या, पुढचं दिसत असे. सिक्स्थ सेन्स' का कायससं म्हणतात ना तसलं काहीतरी. तर ती मित्राच्या ह्या नवीन घरात पहिल्यांदाच आली होती त्यामुळे तिला सगळं घर सगळ्या सोयीसुविधांसकट दाखविण्याचा कार्यक्रम सुरू होता. सगळ्यात शेवटी गच्चीत जेव्हा आजीला आणलं तेव्हा ती एकदम चमकली. तिचा चेहराच बदलला. तिनं एक क्षण 'त्या' बंगल्याकडे पाहिलं आणि झर्रकन वळून ती पायर्‍या उतरू लागली. खाली येता क्षणी तिनं मित्राच्या बाबांना विचारलं, ' समोरच्या बंगल्यात कुणा स्त्रीचा भाजून मृत्यू झाला होता का?' बाबांचा चेहरा एकदम बदलला.. 'तुला कसं कळलं?' थोडसं चाचरतच त्यांनी विचारलं. आजीने एक दीर्घ निश्वास टाकला व म्हणाली, 'मला 'ती' भाजलेली बाई दिसली..' ऐकणार्‍या सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला.. मग बाबांनी खरी पार्श्वभूमी सांगितली. काही वर्षांपूर्वी 'त्या' बंगल्याच्या मालकिणीने जाळून घेतलं होतं. पोलिसांनी जरी आत्महत्त्या नोंदविली असली तरी शेजार्‍यांची खात्री होती की तिच्या अतिश्रीमंत नवर्‍याचंच ते कृत्य होतं. कारण त्याचे म्हणे एका मोलकरणीशी अनैतिक संबध होते व त्यावरून रोज नवरा- बायकोची भांडणे होत असत.. एके रात्री अश्याच खूप भांडणांनंतर त्याने बायकोच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळलं होतं.. अन तो एव्हढा श्रीमंत होता की एक खून पचविणे त्याच्या डाव्या हातचा मळ होता. पण तेव्हापासून त्या बाईचं पिशाच्च त्याला छळत असे.. तो त्या बंगल्यात परत कधीच सुखाने राहू शकला नाही.. दुसरीकडे कुठतरी शिफ्ट झाला.. आणि ते पिशाच्च त्या बंगल्यात खूप जणांनी पाहिलं होतं असंही बाबा म्हणाले.. मी परत कधीही त्या मित्राकडे अभ्यासाला गेलो नाही..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10561
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

:W डॉक्टर साहेब... पेशंटाना भीती काहून घालत आहात... :''( मी नाय येणार जा तुमच्याकडे :D *** राज दरबार.....

:O डॉक्टर साहेब........ खरंच ही सत्यकथा आहे का...?

भीती वाटण्यापेक्षा वाईट वाटलं जळून मरणार्‍या त्या बाईसाठी! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी असेच वाटले. -गणपा

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भीती आणि वाईट दोन्ही वाटले.

@) :O अशा दंतकथा वगैरे मस्त वाटतं वाचताना! छान :) सत्यकथा ????? फोटो काढला का बंगल्याचा आणि त्या जळालेल्या बाईचा ? मिपावर डकवा की ! :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

डॉक्टर तुम्हीसुद्धा! (या भयकथा लेखकांच्या मालिकेत)

डॉक्टर तुम्हीसुद्धा असेच म्हणतो! पण सत्यभयकथा आवडली. मी एका बंगल्याबाबत अशीच कथा ऐकलीये पण तुम्ही लिहीली आहे तोच तो बंगला का माहिती नाही. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

=)) डॉक्टर .. मांत्रिक लोकांशी युती का ?

तुम्हीसुध्दा???? (शुभारंभाचा प्रयोग दिसतोय ;) ) तरीच गेल्यावेळी क्लिनिकमध्ये तुमच्याकडं ते गंडेदोरे दिसत होते तर! :? ह्म्म.....

गोष्ट म्हणून ठिक आहे. पण सत्यकथा असेल तर एक सांगावे वाटते.. सगळ्यात शेवटी गच्चीत जेव्हा आजीला आणलं तेव्हा ती एकदम चमकली. तिचा चेहराच बदलला. तिनं एक क्षण 'त्या' बंगल्याकडे पाहिलं आणि झर्रकन वळून ती पायर्‍या उतरू लागली. कदाचित त्या कर्नाटकी (कर नाटकी) आज्जीला आधीच माहित असावे की त्या बंगल्यात एक भाजून मृत्यू झाला आहे. लोकांचा आपल्यावर विश्वास बसावा म्हणून कदाचित तिने हे नाटक केले असेल.. ही एक शक्यता आहे हो... खादाडमाऊ

वरील कथा ही खरोखरंच सत्यकथा आहे. त्या कर्नाटकी आजी पहिल्यांदाच तिथे आल्या होत्या व एकूणच गोष्टीला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने फारशी कुणाला ठाऊक नव्हती. आजही ह्या गोष्टीची चर्चा केलेली माझ्या मित्राच्या घरी चालत नाही; सगळेच मूग गिळून राहणे प्रिफर करतात. आता माझा तो मित्र अमेरिकेत असल्याने मीही फारसा तिकडे जात नाही त्यामुळे अजून 'ती' बाई दिसते का वगैरे ठाऊक नाही.

वरील कथा ही खरोखरंच सत्यकथा आहे. त्या कर्नाटकी आजी पहिल्यांदाच तिथे आल्या होत्या व एकूणच गोष्टीला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने फारशी कुणाला ठाऊक नव्हती. आजही ह्या गोष्टीची चर्चा केलेली माझ्या मित्राच्या घरी चालत नाही; सगळेच मूग गिळून राहणे प्रिफर करतात. आता माझा तो मित्र अमेरिकेत असल्याने मीही फारसा तिकडे जात नाही त्यामुळे अजून 'ती' बाई दिसते का वगैरे ठाऊक नाही.

बसली की हो डॉक्टर

बापरे! आजीबाई फारच धीराच्या.

वाचतानाच तळपाय थंड पडले. डॉक्टर, मी ही अशा एका माणसाला प्रत्यक्ष भेटलो आहे ज्याला भूत-भविष्याचे 'दर्शन' व्हायचे. माझ्या स्वतःबद्दल तसेच, माझ्या सख्या भावाबद्दल (त्याला प्रत्यक्ष न भेटता/पाहता) त्यांनी केलेले कथन तंतोतंत खरे निघाले. त्यामुळे अशा व्यक्ती असतात ह्यावर माझा अनुभवसिद्ध विश्वास आहे. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.