मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

असंच, सहजंच....

प्रभाकर पेठकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
स्वाईन फ्ल्यू मुळे 'यज्ञकर्म' बंद ठेवावं लागलं आणि हाती आलेला मोकळा वेळ सत्कारणी कसा लाववा ह्यावर मित्रांसमवेत खलबत सुरू झालं. एक मतानं ठरलं की कोल्हापूरला जाऊया. झालं ठरलं. दुसर्‍याच दिवशी सकाळी साडेसातला कोल्हापुरास प्रयाण केले आणि ठिक साडे-अकराच्या सुमारास कोल्हापुरात पोहोचलो.
आता कोल्हापुरची सुरुवात कुठून करणार? अर्थात 'फडतरे मिसळ'. मिसळ चापून तडक निघालो.....
'पावन खिंड'. पावन खिंड पाहणे एक थरारक अनुभव आहे. खिंडीत पाऊस आणि ढग उतरल्यामुळे काही दिसत नव्हते तसेच छायाचित्रणही शक्य झाले नाही. इथे 'पावन खिंड' नांव दिले आहे. पण हिच खरी 'पावन खिंड' आहे की पुढे एक 'घोड खिंड' आहे ती खरी 'पावन खिंड' ह्यावर माफक चर्चा करीत पुढील प्रवासास सुरुवात केली.
किल्ले पन्हाळ गड. 'पनांग' म्हणजे नाग आणि 'हाळ' म्हणजे घर. 'नागाचे घर' म्हणजेच 'पनाग-हाळ' त्याचाच अपभ्रंश 'पन्हाळा'. आम्ही न घेतलेला स्थानिक गाईड दुसर्‍या कुणाला तरी सांगत होता. 'पन्हाळगड' परीसर बराच विस्तृत आणि आजच्या काळातही 'वसलेला' आहे.
गडावरील बांबूचे वन आणि इतर निसर्गही पाहण्यासारखा आहे.
अशी खुप ठिकाणे छायाचित्रणासाठी आपल्याला अगदी मोहात पाडतात.
पन्हाळगडावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर....
.....आणि गडावरील रोमँटीक ठिकाणे..
गडाच्या तटावरील रम्य वनराई...
...आणि वंदनिय बाजी प्रभू देशपांडे ह्यांचा भव्य आणि दिव्य पुतळा. दणकट देहयष्टी, भेदक नजर आणि आक्रमक आवेश. दिलेरखानाच्या सैन्याला ह्या सैतानाला ओलांडून पुढे जाणे शक्यच नव्हते.
कोल्हापुरास भेट द्यायची आणि महालक्ष्मीला जायचे नाही असे होणे नाही. दक्षिणेतल्या बालाजीची ही पत्नी काही कारणाने रुसली आणि कोल्हापुरात येऊन बसली. म्हणजेच देवादिकांपासून दक्षिणेतून निघाले की थेट महाराष्ट्र गाठायचा हिच परंपरा आहे. बालाजी दरवर्षी आपल्या ह्या प्रिय पत्नीस खुष करण्यासाठी उंची लुगडे पाठवतो. बिच्चारा, देव झाला म्हणून काय झाले. त्यालाही हे भोग सुटले नाहीतच नं! त्याला कल्पना नसावी. आम्हा सर्व विवाहित पुरूषांचा दर आठवड्याला ह्या न त्या कारणाने 'बालाजी ' होतच असतो. असो.
राधानगरीच्या वाटेवरील हिरवाकंच निसर्ग...
राधानगरी धबधबा....
अजून जरा जवळून... इथून निघताना मनाने उचल खाल्ली. चला, गोव्याला जाऊया. गोव्याचे नांव निघताच मित्रांचे डोळे चमकलेच. चला. गाडी वळविली ......टू गोवा.
पावसाळी वातावरण. इथे-तिथे निसर्ग. आणि डोळ्यात गोव्याच्या संध्याकाळची सुरईची...आपलं...सुरम्य स्वप्न.
कलंगुट बीच. मस्त... धुंद वातावरण. समुद्राचे सौदर्य आणि धीरगंभीर गाज. चित्तवृत्ती फुलून येतात.
गोव्यातील मनुष्यनिर्मित सौंदर्य.....
अंजुना बीच...
परतीच्या प्रवासात अंबोली घाटात धबधब्याजवळ थांबलो. धुके आणि पावसाने धबधब्याचे छायाचित्रण शक्य झाले नाही. पण २००४ साली जिथे चहाची एकमेव टपरी होती तिथे आता वडापाव, चहा, साबूदाणावडा, वेफर्स इत्यादी विविध खाद्यपदार्थ पुरवणार्‍या १२-१३ टपर्‍या झाल्या आहेत. धबधब्याच्या अबाधित सौंदर्याला व्यावसायिकतेची बाधा झाली आहे.
परतीच्या प्रवासात निपाणी-कोल्हापूर रस्त्यावर 'ढगफुटी'. डोक्यावरून समोर कित्येक मैल पसरलेला काळाकुट्ट, घट्ट आणि वजनदार ढग दूरवर फुटून कोसळत होता. लवकरच आम्ही त्या प्रपातात पोहोचलो.
पुण्याला घरी पोहोचलो. थकलो होतो. येताना वाटेत पाऊसच पाऊस. सगळी हौस भागली होती. पुण्यातही पाऊस होता. झोपलो. दुसर्‍या दिवशी सकाळी पाहिला आमच्या गॅलरीतला 'निसर्ग'.

वाचने 15005 वाचनखूण प्रतिक्रिया 45

दशानन 23/08/2009 - 20:12
वाह ! सुंदर फोटो.... ! सरळ कोल्हापुरात पोहचवलंत तुम्ही :)

In reply to by दशानन

टारझन 23/08/2009 - 22:17
वा @@ छाणच फोटो की @@ डोळे दिपले .. शेवटून दुसरा फोटू तर केवळ अप्रतिम !! व्रूऊऊऊऊम्म्म्म ! असो , दादाभेट झाली का ?

मन 23/08/2009 - 20:22
कोल्हापूर्-गोवा फिरवुन आणलत की मस्त! पण कोल्हापूरलाच "रक्काळा तलाव" आहे म्हणे. त्याचा फटु टाकायचा राहिला, की तिकडं जाणच झालं नाही ह्यावेळेस? बाकी ...आणि वंदनिय बाजी प्रभू देशपांडे ह्यांचा भव्य आणि दिव्य पुतळा. दणकट देहयष्टी, भेदक नजर आणि आक्रमक आवेश. दिलेरखानाच्या सैन्याला ह्या सैतानाला ओलांडून पुढे जाणे शक्यच नव्हते. ह्या वाक्यात ठळक केलेला शब्द(त्यातील खलनायकी अर्थच्च्छटेमुळे) खटकला. त्याऐवजी "रुद्राला"किंवा "भीमाला" हे शब्द शोभले असते. असो, पण वर्णन आवडलं. आपलाच, मनोबा

In reply to by मन

चतुरंग 23/08/2009 - 20:25
मलाही तोच शब्द खटकल्याने मी आलरेडी संपादनाचे स्वातंत्र्य घेऊन बदल केला होता पण लेखकाचे विचार लक्षात घेऊन परत मूळ शब्द टाकलाय. (लेखकाचा हक्क मूळ लेखावर जास्त असतो तो मान्य.) चतुरंग

In reply to by मन

प्रभाकर पेठकर 23/08/2009 - 20:27
'सैतानाला' हा शब्द विचार करूनच योजला आहे. पावनखिंडीतून वर येणार्‍या दिलेरखानी सैन्याला हा धिप्पाड, शिवप्रेमाने भारून चवताळलेला महाकाय पर्वत म्हणजे सैतानच वाटला असणार.

In reply to by प्रभाकर पेठकर

शैलेन्द्र 23/08/2009 - 21:03
दिलेरखान? नाही हो काका.. पावनखिंडीत आला तो सिद्दी मसुद.. त्याचा सासरा सिद्दी जौहर पन्हाळ्याला वेढा घालुन बसला होता... आणि धिप्पाड हबशांपुढे अगदी बाजीप्रभुही सैतान नव्हते हो...

In reply to by प्रभाकर पेठकर

शैलेन्द्र 23/08/2009 - 22:24
हबशी म्हणजे अफ्रिकेच्या हबसाण प्रांताचे रहिवासी, ते बर्‍याच ठिकाणी गुलाम म्हणुन विकले गेले आणि अंगभुत गुणांवर मोठे झाले. हबशी हे व्यावसायीक लढवय्ये होते(जसे पठाण). काळ्याकभिन्न, धिप्पाड, उघड्या हबशांची फौज नंग्या तलवारी खांद्यावर टाकुन चालु लागली की भल्याभल्यांची पाचावर धारण बसायची. जंजीर्‍याचा सिद्दी हाही हबशीच. हबश्यांची शरिरयष्टी नक्किच धीप्पाड होती.

In reply to by शैलेन्द्र

सिद्दी म्हणजे हबशी हे आफ्रिकेतल्या सोमालीलँडमधून आले असावते असे विकी म्हणतो. ते आशियात वेगवेगळ्या ठिकाणी पसरले. भारतातही बर्‍याच ठिकाणी त्यांचे वास्तव्य दिसते. त्यांची गणना अनुसूचित जमातींमध्ये होते. विकीच्या दुव्यावर असलेल्या गुजरातेतल्या हबशांचा फोटो हा आफ्रिकन वंशाशी साधर्म्य दाखवणारा असला तरी हे हबशी धिप्पाड नक्कीच वाटत नाहीत. सर्वसाधारण आशियायी चणीच्चेच वाटतात. चतुरंग

In reply to by चतुरंग

शैलेन्द्र 24/08/2009 - 12:55
हबशांचे मुळ हबसान किंवा अ‍ॅबेसॅनीया..तिथुन त्यांना अक्षरक्षा चोरुन पकदुन युरोपियन व्यापार्‍यांनी जगभर विकले. त्यांचा ऊपयोग मुख्यता युध्धातिल आघाडीचे योद्धधे म्हणुन व्हायचा. मालिक अंबर, ज्याला बरेच इतिहासकार मराठयांच्या सैनीकी परंपरेचा जनक मानतात, तोही एक हबशी होता. हबशी धिप्पाड होते कि नाही हे आज सिद्ध करणे कठीन आहे कारण धिप्पाडपणाची काही मोजपट्टी नाही. परंतु हबशांची सैनीक म्हणुन असलेलि लोकप्रियता पाहता ते शारीरिक दृष्त्या दणकट असावेत असे मानायला बरीच जागा आहे. बाबासाहेब पुरंदरेही असेच समजतात. विकीच्या दुव्यावर असलेल्या गुजरातेतल्या हबशांचा फोटो हा आजचा आहे. आज पठाण आडनावाचे अनेक पाप्याचे पितर पहायला मिळतात. हवामान व आहाराच अनुवांशीक शरीरावरही फरक पडतो.

In reply to by शैलेन्द्र

प्रभाकर पेठकर 24/08/2009 - 09:26
पावनखिंडीत आला तो सिद्दी मसुद.. त्याचा सासरा सिद्दी जौहर पन्हाळ्याला वेढा घालुन बसला होता. १००% बरोबर. टीव्हीवरील राजा शिवछत्रपती मालिकेतील पुरंदरच्या वेढ्याच्या एपिसोडमुळे 'दिलेरखान' डोक्यात घुमत होता. असो. चुकीबद्दल दिलगीर आहे. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

घाटावरचे भट 23/08/2009 - 22:36
असेच म्हणतो. क आणि ड आणि क!!

प्राजु 23/08/2009 - 20:25
क्या बात है!!! काका, खूप दिवसांनी (जवळ जवळ वर्षाने) पन्हाळा, महालक्ष्मी मंदीर चित्रात का होईना...पहायला मिळाले . खूप बरं वाटलं. फोटो क्लास आहेत. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

गणपा 23/08/2009 - 20:34
धन्यु काका, मस्त पैकी घर बसल्या बसल्या कोल्हापुरच सचित्र दर्शन घडवुन दिलत.

मदनबाण 23/08/2009 - 20:43
व्वा. सुरुवातच चटकदार झाली तर प्रवास झकास होणारच !!! महालक्ष्मी मंदीर चित्रात का होईना...पहायला मिळाले . खूप बरं वाटलं. प्राजु ताईशी १००% सहमत... :) मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

यशोधरा 23/08/2009 - 22:34
बरेच दिवसांनी लिहिलंत पेठकरकाका, पण सहीये! फोटो मस्त आहेत! पन्हाळयाचा, गोव्याच्या वाटेवरचा पहिला (सुरम्यवाला) आणि सदाफुलीचा ब्येष्टेष्ट! :)

In reply to by यशोधरा

नंदन 24/08/2009 - 00:25
सहमत आहे. फोटो आणि वर्णन क्लासच!
म्हणजेच देवादिकांपासून दक्षिणेतून निघाले की थेट महाराष्ट्र गाठायचा हिच परंपरा आहे.
-- अचूक निरीक्षण :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

टुकुल 23/08/2009 - 22:08
काका.. मस्त लिहिल आहे..आणी फोटो पण सह्ही आहेत. --टुकुल

विसोबा खेचर 23/08/2009 - 23:17
हेवा वाटला..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रभाकर पेठकर 24/08/2009 - 10:00
मला वाटलं होतं तुम्ही म्हणाल...... 'गळा दाटला.' मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

मुक्तसुनीत 24/08/2009 - 00:07
- शब्द संपले. फोटो बेहद्द सुंदर आहेत. आणि सगळ्यात हेवा वाटावा अशी गोष्ट म्हणजे : जसे तब्बेतीला मानवेल तशी केलेली भ्रमंती ! या असल्या बेबंदपणावर बाकी सारे कुर्बान आहे.

रेवती 24/08/2009 - 00:50
फोटो सही आलेत! स्वाईनफ्लूचा फायदासुद्धा होतो असे म्हणायला हवे.;) आम्हा सर्व विवाहित पुरूषांचा दर आठवड्याला ह्या न त्या कारणाने 'बालाजी ' होतच असतो. एखाद्याचा 'बालाजी होणे' असा शब्दप्रयोग रूढ व्हायला हरकत नसावी.;) रेवती

प्रभाकर पेठकर 24/08/2009 - 10:39
सर्व वाचकांचे मनःपूर्वक धन्यवाद. दुसरे असे की फोटो चांगले आलेत ही कॅमेराची करामत, फोटोग्राफरची नाही. बहुतेक सगळे प्रोग्रॅम्ड मोड मध्ये काढले आहेत. मनः कोल्हापूरलाच "रक्काळा तलाव" आहे म्हणे. त्याचा फटु टाकायचा राहिला, की तिकडं जाणच झालं नाही ह्यावेळेस? अचानक ठरलेल्या कार्यक्रमात वेळ थोडाच होता. त्यातुन आम्ही जेंव्हा रंकाळ्यास पोहोचलो ती वेळ दुपारची म्हणजे तलावाकाठी हुंदडण्याची नव्हती. त्यामुळे न थांबता पुढे राधानगरी कडे प्रयाण केले. पुढच्या निवांत सहलीत रंकाळा नक्की. प्राजु: माझी कोल्हापुरची पहिलीच भेट. पहिल्या भेटीत कोल्हापुर आवडले. फडतरे मिसळीने जरा अपेक्षा भंग केला. म्हणजे मिसळ आवडली नाही असे नाही. पण फडतरे मिसळी बद्दल आधी खूप ऐकले होते त्यामुळे अपेक्षा उंचावल्या होत्या. असो. वेळे अभावी चोरघे मिसळीचा आस्वाद घेता आला नाही. मंदिरात आत मध्ये फोटू काढू देत नाहीत. चतुरंगः ह्या खेपेस जास्त छायाचित्रे आणि कमी प्रवास वर्णन असा आराखडा डोक्यात होता. पुढच्या खेपेस प्रवास वर्णनावर भर देऊ. गणपा: कोल्हापुर आवडलं मला. जे पाहिलं, चित्रीत केलं ते १/१० असावे असे वाटते. पुढच्या खेपेस जरा तपशीलवार लिहूया. मदनबाणः सुरुवातच चटकदार झाली तर प्रवास झकास होणारच !!! अगदी खरं आहे. वेळ कमी पडल्याचा सल काही केल्या जाईना. यशोधरा: मित्र-मित्रच गेलो होतो.गुराख्यांना घरी ठेवून गुरे उधळली होती. स्वातंत्र्याच्या कैफाला खरा बहर आला तो गोव्याची बॉर्डर ओलांडल्यावर. नंदनः तसेच बायको रुसली की एखादे भारीतले लुगडे तिला भेट देऊन खुश करायचे ही प्रथाही जुनीच म्हणायची. मुक्तसुनितः जसे तब्बेतीला मानवेल तशी केलेली भ्रमंती ! या असल्या बेबंदपणावर बाकी सारे कुर्बान आहे. मीही तोच आनंद अनुभवला. असंच ऐन पावसाळ्यात आख्खा कोकण हुंदडायचं मनात आहे. बहुतेक पुढच्या वर्षी. (७-८ दिवस). रेवती: एखाद्याचा 'बालाजी होणे' असा शब्दप्रयोग रूढ व्हायला हरकत नसावी. हा:.. हा:... खरच काहीच हरकत नाही. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

झकासराव 24/08/2009 - 11:27
वाह!!!!' काकाश्री दिल खुष हो गया. मस्त आहेत सगळीच प्रकाशचित्रे. ढगफुटीच चित्र केवळ उच्च. :) सदाफुली देखील मस्तच. पण अशा चित्रांमध्ये बराच वेळ असतो आपल्याकडे. ढगफुटीसारल्ख चित्र मिळण फार कठीण :) आमच्या पन्हाळ्यावर भेळ नाय का खाल्ली?? तीन दरवाजा जवळ? आणि एक मध्येच तलाव आहे तिथे नाही का गेलात? पावसाळ्यात तिथे असल गुढ वातावरण असत ना. पुसाटी बुरुजावर नाही गेलात??

स्वाती दिनेश 24/08/2009 - 12:46
मस्त फोटो, तुमची सहल क्लासच झालेली दिसते, स्वाती

भाग्यश्री कुलकर्णी 24/08/2009 - 12:46
मिरज सोडुन तप उलटुन गेलय्.कोल्हापुर्,पन्हाळा, आंबोली,राधानगरीशी जुन्या लहानपणीच्या आठ्वणी जोड्ल्यात्.तो काळ परत डोळ्यासमोर उभा केलात्.

sneharani 24/08/2009 - 13:24
actually me navin aahe tari dekhil (tumhi mala navin nahi karan me tumche mipavaril lekh vachate)mala mahit asate tar tumhala ghari bolawal asat. radhanagari roadlach aamacha gav aahe. punha aalat ki mala contact kara.

शाल्मली 24/08/2009 - 14:38
वाहवा! मस्त फोटू. सहल छानच झालेली दिसत आहे :) --शाल्मली.

सूहास (verified= न पडताळणी केलेला) 24/08/2009 - 15:28
सू हा स...

समंजस 24/08/2009 - 15:42
वा काका!! सर्व छायाचित्रे सुंदर आली आहेत! फक्त वर्णन थोडं आणखी जास्त हव होतं!!

In reply to by समंजस

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 24/08/2009 - 15:43
वा काका!! सर्व छायाचित्रे सुंदर आली आहेत! फक्त वर्णन थोडं आणखी जास्त हव होतं!!

डॉ.प्रसाद दाढे 24/08/2009 - 17:43
वा काका!! सर्व छायाचित्रे सुंदर आली आहेत! फक्त वर्णन थोडं आणखी जास्त हव होतं!! असेच म्हणतो! पण फोटू क्लासच आहेत.. जळवलंत!

क्रान्ति 24/08/2009 - 17:58
मस्त आलेत सगळे फोटो! ढगफुटी, गोवा आणि सदाफुली अगदीच खास! वर्णनही मस्त. क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

ऋषिकेश 24/08/2009 - 19:09
सगळेच फोटो आवडले. मस्त! माझा नेमका रोमॅंटिक स्थळांचा फोटो डाऊनलोड होत नाहि आहे :( ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ७ वाजून ५७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "ऋत आ गयी रेऽऽ ऋत छां गयी रे!.."

चित्रा 24/08/2009 - 21:21
आणि भटकंती. सर्वच फोटो छान आलेत. गोव्यातले विशेष आवडले.

सुबक ठेंगणी 25/08/2009 - 09:53
आजकाल गोवा, कोल्हापूर वगैरे फोटोतूनच भेटतं आम्हाला...मनापासून धन्यवाद... कोल्हापूरपासून तुमच्या घराच्या बाल्कनीपर्यंतचा चित्रप्रवास खूप आवडला...

इनिगोय 18/04/2012 - 08:14
समुद्र, आणि निसर्ग, गोवा, आणि 'क्वीन आंबोली' .. सगळंच एव्हरग्रीन.. एप्रिल मधल्या उन्हाळ्याचा विसर पाडलात क्षणभर..! 'विवाहित पुरुषांचा बालाजी' हे जाम आवडलं.