मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एबर्टीन ज्योतिष आणि स्वाईन फ्लु

युयुत्सु · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
एका याहूग्रुपवर एका ज्योतिषनिंद्काने प्रश्न विचारला की ज्योतिषांनी स्वाईन फ्लुचे भविष्य का वर्तवले नाही. हा प्रश्न मला उद्देशून असावा कारण मी त्या ग्रुपवरील ज्योतिषाचा खंदा समर्थक आहे. वास्तविक ऑक्टोबर २००८ मध्ये लिहिलेल्या एका टिपणात मी जे ग्रहयोगांचे वर्णन केले आहे, ते जिज्ञासूनी येथे http://rajeev-upadhye.blogspot.com/2008/10/blog-post.html अवश्य वाचावे. आधुनिक ज्योतिष (विशेषत: एबर्टीनचे तंत्र) एखाद्या घटनेतील core issues (स्थायीभाव) चे भाकीत वर्तवण्यास कसे उपयोगी पडते हे यावरून समजून घेता येईल. 'अस्थैर्य' हे हर्षल आणि शनीच्या योगात दिसून येते. 'अनपेक्षित' हा एकच शब्द हर्षलचे वर्णन करण्यास पाश्चात्य ज्योतिषी पुरेसा मानतात. शनी-हर्षलच्या प्रतियोगात आपण वेगवेगळ्या प्रकारचे 'अनपेक्षित अस्थैर्य' अनुभवत आहोत. प्रथम आर्थिक मंदी, मग २६ नोव्हेंबरचे अरिष्ट आणि आता स्वाईन फ्लु मला वाटतं ज्योतिषाची उपयुक्ततता पटण्यास हा अनुभव पुरेसा आहे. 'स्वाईन फ्लूची साथ" येईल असे शब्द माझ्या भाकीतात नाहीत असा आक्षेप काही नतद्र्ष्ट ज्योतिषाचे निंदक घेतील. त्याचे स्पष्टीकरण असे - - माझ्या ज्योतिषाच्या अभ्यासाच्या वैयक्तिक मर्यादा मी साथीच्या रोगांचा आणि ज्योतिषाचा संबंध अभ्यासलेला नाही. ज्योतिषाचा सर्वसमावेशक अभ्यास एका व्यक्तीस तिच्या एका आयुष्यात शक्य नाही. - मी जे तंत्र (एबर्टीन) वापरतो त्याची मर्यादा वर अगोदरच म्हटल्या प्रमाणे एबर्टीनचे तंत्र एखाद्या घटनेतील फक्त core issues (स्थायीभाव) चे भाकीत वर्तवण्यास उपयोगी पडते. ग्रहयोगांच्या सक्रियतेच्या कालावधीत ज्या मोठ्या घटना घडल्या त्यांचा स्थायीभाव तो माझ्या भाकितात अचूकपणे आला आहे. एबर्टीन तंत्राच्या मूळ दाव्याशी हे सुसंगत आहे असे मला वाटते. जाता जाता स्वाईन फ्लूच्या साथी मध्ये कुणी विशेष काळजी घ्यायची त्यासंबंधी सूचना - ज्यांच्या पत्रिकेत शनी आणि नेपच्युन angular आहेत म्हणजे लग्न आणि दशमभाव आरंभ बिंदूशी युती करत आहेत किंवा जन्मरवीशी युती, प्रतियुती, केंद्र अर्धकेंद्र इ योग करत आहेत त्यांची प्रतिकारशक्ती जन्मत: कमी असते. याशिवाय ज्यांच्या पत्रिकेत गोचर शनी किंवा गोचर नेपच्यून जर जन्मरवीशीवरील (म्हणजे युती, प्रतियुती, केंद्र अर्धकेंद्र इ) प्रमाणे योग करत असेल तर अशी मंडळी साथीच्या रोगांनी पट्कन आजारी पडतात. स्वाईन फ्लूच्या साथीमूळे स्वर्गात गणपतीने मात्र नक्कीच सूटकेचा नि:श्वास टाकला असेल, हे मात्र खरे...

वाचने 7460 वाचनखूण प्रतिक्रिया 42

ऋषिकेश Fri, 08/14/2009 - 13:32
ज्यांच्या पत्रिकेत शनी आणि नेपच्युन angular आहेत म्हणजे लग्न आणि दशमभाव आरंभ बिंदूशी युती करत आहेत किंवा जन्मरवीशी युती, प्रतियुती, केंद्र अर्धकेंद्र इ योग करत आहेत त्यांची प्रतिकारशक्ती जन्मत: कमी असते. याशिवाय ज्यांच्या पत्रिकेत गोचर शनी किंवा गोचर नेपच्यून जर जन्मरवीशीवरील (म्हणजे युती, प्रतियुती, केंद्र अर्धकेंद्र इ) प्रमाणे योग करत असेल तर अशी मंडळी साथीच्या रोगांनी पट्कन आजारी पडतात.
ही विधाने रोचक वाटली. या विधानांची खातरजमा तुम्ही स्वतः करून घेतली आहे का? असल्यास कोणता प्रयोग केला व त्याचे निअकल काय आहे हे वाचावयास निश्चितच आवडेल (विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांच्या प्रतिक्षेत) ऋषिकेश ------------------ दुपारचे १ वाजून ३१ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक कविता "आम्ही कोण म्हणौनी काय पुससी?...."

In reply to by ऋषिकेश

आणखी काही प्रश्न आहेत: १. ही एबर्टीन पद्धत साधारण कोणत्या काळात विकसित झाली? २. हे जे रोगप्रतिकारशक्ती कमी असणारे लोकं आहेत, ज्यांच्या अमुक स्थानी शनि, हर्षल वगैरे आहेत, त्यांना चांगलंचुंगलं खाऊन, व्यवस्थित व्यायाम करून आणि योग्य आरोग्यविषयक सवयी बाळगून काही फरक पडतो का ते असेच रहातात आयुष्यभर? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अनामिक Fri, 08/14/2009 - 17:24
एबर्टीन पद्धत कोणत्याही काळी विकसित झालेली का असेना... ग्रह आपला मार्ग बदलून थोडीच फिरतात... कै च्या कै प्रश्न विचारता बॉ तुम्ही. आणि चांगलं चुंगलं खाऊन कुणावर काही फरक पडत नै... पत्रीकेत ग्रह योग्य स्थानी असायला पाहीजे. त्यासाठीच आजकालच्या बाया म्हणे दिवस, मुहूर्त बघून लेबर इंड्यूस करतात. -अनामिक

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

युयुत्सु Sat, 08/15/2009 - 11:08
ज्योतिषांचे भाकीत ही काळ्या दगडावरची रेघ नव्हे. भाकीताचा अटळपणा हा व्यक्तीची मूळ प्रवृत्ती आणि परिस्थितीची पोषकता यावर ठरतो. त्यामुळे स्वभावात हट्टीपणा, दूराग्रह नसेल आणि लवचिकपणा असेल तर अनेक संभाव्य धोके टाळता येतात.

In reply to by युयुत्सु

सहज Sat, 08/15/2009 - 11:16
अवांतराबद्दल क्षमस्व - स्वभावात हट्टीपणा, दूराग्रह नसेल आणि लवचिकपणा असेल तर अनेक संभाव्य धोके टाळता येतात. हे वाक्य तर कलंदरतैंच्या आगामी मॅरेज लाईफ भाग ४ मधुन उचल्यासारखे वाटते ;-) ----------

In reply to by ऋषिकेश

विंजिनेर Sat, 08/15/2009 - 18:55
नेहेमीप्रमाणेच सुमार दर्जाचे पण स्वतःच्या (अर्धवट) ज्ञानाचा टेंभा मिरवणारे लेखन. @ऋषिकेशः जाऊ द्या ना भाऊ, उगीच काहीतरी मिसळपावच्या बाहेरचे संदर्भ (कधी ब्लॉग तर कधी इतर न ऐकलेला याहू फोरम) द्यायचे, अर्धवट ज्ञानावर विधाने करायची आणि प्रामाणिकपणे विचारलेल्या वाचकांच्या प्रश्नांना सोयिस्कर बगल द्यायची हे युयुत्सुसाहेबांचा शिरस्ता झाल्यासारखा वाटतो. त्यात आपण त्रागा न करून घेणे हे उत्तम @संपादकः माझे हे प्रामाणिक मत आहे. अवांतर्/अति प्रक्षोभक वाटले तर खुशाल कात्री चालवावी.

अरुण वडुलेकर Fri, 08/14/2009 - 14:24
पारंपारिक ज्योतिष संहितेतही नेपच्यूनकडे विषबाधेने होणारे मृत्यू, विषाणूसंसर्गाने होणारे आजार इ. कारकत्व दिलेले आहे. विशेषतः रवि-शनि यांचे कुयोग व त्यात नेपच्यूनचा त्रिक स्थानांशी संबंध यातून अनेकदा विषाणूसंर्गाने आरोग्य क्षति झालेल्या कांही कुंडल्या माझ्याही पाहण्यात आहेत. जिज्ञासूंना मी त्या देऊ शकेन.

विजुभाऊ Fri, 08/14/2009 - 15:47
काही शंका: ऊर्टच्या ढगाचा पत्रीकेत काय विचार केला जातो हो? गोचरी उर्टचा ढग असल्यास लग्नस्थानाचा विचार कशा पद्धतीने केला जातो पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

In reply to by युयुत्सु

ऊर्टचा ढग लोकलाईज्ड (मराठी शब्द) नसून सूर्यापासून काही ठराविक अंतरावर जसा लघुग्रहाचा पट्टा आहे तसं हे वस्तूमान आहे. तेव्हा ऊर्टचा ढग सगळ्यांचाच सगळ्या स्थानांमधे सगळ्या वेळेला असतो. आता त्यानुसार विजुभाऊंनी प्रश्न विचारावेत आणि युयुत्सुमहाराजांनी उत्तरं द्यावीत अशी मी सूचना करते. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लिखाळ Fri, 08/14/2009 - 17:05
तेव्हा ऊर्टचा ढग सगळ्यांचाच सगळ्या स्थानांमधे सगळ्या वेळेला असतो.
हे शक्य वाटत नाही. अश्या वेळेला तो ढग सूर्य ज्या स्थानात असेल तेथेच असेल असे फार तर म्हणू शकाल असा माझा कयास. तुम्ही स्वतः ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आहे का? उगीच एक शंका. माझी रास शंकेखोर माणसाची आहे. किंवा मी शंका घेतो म्हणून ती रास शंकेखोरपणा दाखवते. -- लिखाळ दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

In reply to by लिखाळ

हे शक्य वाटत नाही. अश्या वेळेला तो ढग सूर्य ज्या स्थानात असेल तेथेच असेल असे फार तर म्हणू शकाल असा माझा कयास.
ओर्टचा मेघ सूर्यापासून ५०००० ख.ए. (~ १ प्रकाशवर्ष) अंतरावर आहे असं मानलं जातं. म्हणजे सूर्यापासून ५०००० ख.ए. एवढ्या अंतरावर इतर माध्यमाच्या घनतेपेक्षा वस्तूमान जास्त आहे. ओर्टचा मेघ ही गुरू, शनी, हॅलेचा धूमकेतू अशी एक वस्तू नाही. जसा लघुग्रहांचा पट्टा सूर्यापासून ठराविक अंतरावर वर्तुळामधे आहे तसाच ओर्टचा मेघ आहे. त्यामुळे पृथ्वीवरून सूर्याच्या दिशेला, विरुद्ध दिशेला किंवा लंब दिशेत, थोडक्यात कोणत्याही दिशेत, पण सूर्यमालेच्या प्रतलात पाहिलं तर ओर्टचा आतील मेघ आहेच. शिवाय त्याच्यापासून थोडा बाहेर, गोलाकार, सर्व दिशांमधे, प्रतलांमधे बाह्य ओर्टचा मेघ दिसेल. अशा प्रकारे ओर्टचा मेघ सर्व राशी-नक्षत्रांमधे, सर्व वेळेला असतो. त्यामुळे कोणाच्याही पत्रिकेत, कोणत्याही स्थानात, कोणत्याही वेळेला ओर्टचा मेघ असणारच. (१ ख.ए. = १ खगोलीय एकक = सूर्यापासून पृथ्वीचं सरासरी अंतर) अदिती (दहावी 'अ') ता.क. आत्ताच वाचलेल्या माहितीच्या आधारे Oort या डच (आड)नावाचा उच्चार ओर्ट असा करावा. मी स्वतः ग्रहगणितांचा अभ्यास केलेला नाही, आकाशातल्या काही ज्योतींचा मात्र मी अभ्यास करत आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लिखाळ Fri, 08/14/2009 - 17:40
वा.. माहितीबद्दल आभार. नवी माहिती मिळाली. जसे पृथ्वी पत्रिकेत गणत नाहीत तसेच ओर्ट गणला नाही तरी चालेल असे दिसते कारण तो सर्वच ठिकाणी आहे. असो.. मी ज्योतिषाभ्यासक नसल्याने मी तोडलेल्या तार्‍यांकडे लक्ष नाही दिले तरी चालेल :)
आकाशातल्या काही ज्योतींचा मात्र मी अभ्यास करत आहे.
आता यातील ज्योती शब्दावर काही कोट्या होणार असे भाकित वर्तवतो. (असे लिहिल्याने कोट्या होणार नाहित असा तर्क मांडतो.) ;) -- लिखाळ. दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

In reply to by लिखाळ

आता यातील ज्योती शब्दावर काही कोट्या होणार असे भाकित वर्तवतो.
वा वा लिखाळ साहेब आपन बी भाकित वर्तु लाग्ले ब्वॉ! ज्योतिष या शब्दात ज्योती आहे. शब्दाच्या अर्थाची खोटी होउ नये म्हणून ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.. प्रश्न क्रं १ पहावा. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ऋषिकेश Fri, 08/14/2009 - 17:53
पत्रिकांच्या घरांचं माहित नाहि मात्र
शिवाय त्याच्यापासून थोडा बाहेर, गोलाकार, सर्व दिशांमधे, प्रतलांमधे बाह्य ओर्टचा मेघ दिसेल.
ओर्टचा ढग बांगडीसारखा आहे का घनगोलासारखा?.. जर बांगडीसारखा असेल तर प्रत्येक घरात असेल का हा प्रश्न आहे. म्हणजे पत्रिका अवकाश ३६० अंशाचे म्यापिंग असते का पृथ्वीच्या विषुववृत्तीय प्रतलाचे? (अ‍ॅक्सेस नसल्याने दुवे बघितलेले नाहित त्यात हि माहिती असल्यास इथे कृपया थोडक्यात टंकावी) ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ५ वाजून ५३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "घन न घन न घन...."

In reply to by ऋषिकेश

ओर्टचा ढग बांगडीसारखा आहे का घनगोलासारखा?.. जर बांगडीसारखा असेल तर प्रत्येक घरात असेल का हा प्रश्न आहे. म्हणजे पत्रिका अवकाश ३६० अंशाचे म्यापिंग असते का पृथ्वीच्या विषुववृत्तीय प्रतलाचे?
ओर्टच्या मेघाचे दोन भाग मानतात. आतील आणि बाह्य, यातला आतला भाग बांगडीसारखा आहे, २π किंवा ३६० अंशाचे म्यापिंग होईल. आणि बाह्य मेघ हा पोकळ गोल आहे, म्हणजे त्याचे ४π म्यापिंग होईल. ('चारपाई'ला ७२० अंश म्हणत नसावेत बहुदा!) बांगडीसारखा असला तरीही तो प्रत्येक घरात असायला पाहिजे, कारण संपूर्ण सूर्यमाला एकाच प्रतलात आहे. पण तसं होत नाही (हे पण विकीपिडीयाच्या चित्रावरूनच) कारण ही बांगडी सूर्यमालेला लंब स्थितीमधे आहे. त्यामुळे समोरासमोरच्या दोन घरांमधे (१८० अंशाचा फरक) ही बांगडी येणार. (चतुर 'चांदणी') अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ऋषिकेश Fri, 08/14/2009 - 18:12
धन्यवाद तै! विनाअ‍ॅक्सेस मंडळ आभारी आहे
कारण संपूर्ण सूर्यमाला एकाच प्रतलात आहे.
असो बापडे. पण मी विपरीत समजत होतो .. (निदान नेपच्युन प्लूटो एका प्रतलात नाहित असे वाचल्याचे आठवते)
ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ६ वाजून १० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "ती बघा कशी तोर्‍यात उभी ;)..."

In reply to by ऋषिकेश

पण मी विपरीत समजत होतो .. (निदान नेपच्युन प्लूटो एका प्रतलात नाहित असे वाचल्याचे आठवते)
बुध आणि प्लुटो थोडे वाकड्या चालीचे आहेत. बुधाचा कोन आहे ७ अंश आणि प्लुटोचा १७ अंश. हा कोन मोजला आहे तो पृथ्वीच्या कषेच्या प्रतलाशी. बाकी सगळ्या ग्रहांचे कोन २-३-४ अंशच आहेत (असतील!) त्यामुळे सर्व सूर्यमाला एकाच प्रतलात आहे, +/- १७अंश! ;-) अदिती

विजुभाऊ Fri, 08/14/2009 - 18:01
तेव्हा ऊर्टचा ढग सगळ्यांचाच सगळ्या स्थानांमधे सगळ्या वेळेला असतो. तो लघुग्रहांचा/ सूर्यमालेतील ग्रहांच्या पलीकडे असणार्‍या द्रव्यांचा एक पट्टा आहे. हा पट्टा संपुर्ण सूर्यमालेला वेढून असतो. ग्रहमाला तयार होताना सूर्याजवळचे काही द्रव्य बाहेर फेकले गेले त्यातून मोठे ग्रह तयार होउ शकले नाहीत. मिथेन्/पाणी हायड्रोजन अशा द्र्व्यांचा मिळून हा गोलाकार पट्टा तयार झालेला आहे . अधूनमधून येणारे धूमकेतु हे उर्टच्या ढगातून सूर्याच्या अथवा इतर ग्रहांच्या गुरुत्वाकरर्षणामुळे बाहेर पडलेले काही द्रव्य असते. अशी एक समजूत आहे. उर्टचा ढग हा सूर्यापासून साधारणतः एक प्रकाशवर्ष अंतरावर आहे तो सूर्यमालेला वेढा घालून आहे त्या अर्थी ऊर्टचा ढग सगळ्यांचाच सगळ्या स्थानांमधे सगळ्या वेळेला असतो. उर्टच्या ढगाचे एकूण वस्तुमान प्ल्यूटोसारख्या ग्रहा पेक्षा बरेच मोठे आहे. प्ल्युटो सारख्या छोट्या ग्रहांचा जर पत्रिकेत परिणाम होत असेल तर उर्टच्या ढगाचा निश्चितच होत असेल. असा अंदाज आहे. अर्थात ऊर्टचा ढग सगळ्यांचाच सगळ्या स्थानांमधे सगळ्या वेळेला असतो. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

In reply to by विजुभाऊ

ग्रहमाला तयार होताना सूर्याजवळचे काही द्रव्य बाहेर फेकले गेले त्यातून मोठे ग्रह तयार होउ शकले नाहीत. मिथेन्/पाणी हायड्रोजन अशा द्र्व्यांचा मिळून हा गोलाकार पट्टा तयार झालेला आहे .
असं मानतात की सूर्याच्या जवळच हे वस्तूमान होतं. पण गुरूसारखे राक्षसी ग्रह तयार होताना ग्रहांच्या (वारा सरल्यामुळे? ; -)) आणि सूर्याच्या गुरूत्वाकर्षाणात रस्सीखेच होऊन काही वस्तूमान बाहेर आले आणि त्यातून हा ओर्टचा मेघ तयार झाला. संदर्भ: विकीपिडीआ. अदिती

चतुरंग Fri, 08/14/2009 - 19:47
अशाप्रकारची संकटांची भाकिते वर्तवली होती असे ज्योतिषी म्हणत असलेले मी नेहेमीच वाचत आलेलो आहे. ह्याला साधारणपणे ३० वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. आता प्रश्न असे उभे रहातात - १ - इतक्या वर्षात तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आधुनिक संगणक, नवनवीन सॉफ्टवेअर्स, विदा संकलन/विश्लेषण करण्याच्या आधुनिक पद्धती अशी भर ज्ञानात पडत गेली आहे. असे असताना 'संकटे येतील, बराच मोठा मानव समूह त्या तडाख्यात सापडेल, अनेक लोक रोगांनी बाधित होतील' अशा जनरल विधानांच्या पलीकडे जाऊन अधिक अचूक, अधिक नेमके अंदाज वर्तवणे शक्य का नसावे? २ - अधिक अचूक आणी नेमके अंदाज जर बांधता आले तर संकटे रोखण्यासाठी, निदान झटपट उपाययोजना करुन त्याची तीव्रता कमी करण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतील का ह्या दिशेने काही विचार झाला आहे का? ३ - असे जर घडत नसेल तर ह्या भाकितांचा फारसा उपयोग नाही कारण त्याचा समाजाला काही फायदा होत नाही असे म्हणावे लागेल. ह्याबद्दल लेखकाच्चे काय म्हणणे आहे ते जानून घ्यायला आवडेल. चतुरंग

In reply to by चतुरंग

रामपुरी Fri, 08/14/2009 - 22:40
"२००० साली जगबुडी होणार" असे भविष्य वाचल्याचे आठवते (सकाळ मध्ये). गेली ९ वर्षे वाट बघतोय. अजून तरी झालेली नाही . कदाचित कुठल्यातरी ज्योतिष अभ्यासकाने ग्रहांची शांती करून ती टाळली असेल. अजून कोणाला असे ज्योतिष शास्त्राचे मानवजातीवरचे उपकार ठाऊक आहेत काय?

In reply to by चतुरंग

युयुत्सु Sat, 08/15/2009 - 08:48
प्र-१ आत्ता आत्ता म्हणजे गेल्या १५-२० वर्षांत पाश्चात्य ज्योतिषी सांख्यिकी वर आधारीत भाकिते करु लागले आहेत. फार काय ते artificial neural networks चा वापर पण करत आहेत. मात्र हे प्रयत्न संख्येने कमी आहेत. भारतात मात्र असे प्रयत्न शून्यच म्हणावे लागतील. त्यामुळे आपल्याला अभिप्रेत असलेली अचूकता यायला मोठ्या प्रमाणावर आणि राजरोस संशोधन ज्योतिषात होणे आवश्यक आहे. प्र-२ नेमका अंदाज वर्तवण्याचा मी प्रयत्न करतो तेव्हा, 'घबराट पसरवण्याचा प्रयत्न' असा आरोप होतो. याशिवाय हे काय नेहमीचेच आहे अशी संभावना करून असे भाकीत बाजूला सारले जाते असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे.

विजुभाऊ Sat, 08/15/2009 - 06:05
अजून एक जोरदार भाकीत आहे ग्र्गोरीयन कॅलेन्डर्नुसार २१/१२/२०१२ नन्तर जग शिल्लक असणार नाही. जगबुडी येणार किंवा काय ते नक्की माहीत नाही पण नासाच्या काही भाकीतांनुसार जानेवारी ३१,२०१२ मध्ये पृथ्वीच्या अगदी जवळून साधारण 0.1790 अंतराळ एकक(astronomical units) 26,778,019 km इतक्या अंतरावरून 13×13×33 km) आकारमानाची एक ग्रह /लघुवस्तु /अशनी जाणार आहे असे म्हणतात अर्थात त्याचा परीणाम होउन समुद्र उसळून येतील वगैरे असे नाही. या वस्तुची कक्षा बदलून तो पृथ्वीवर आदळण्याचे शक्यता असू शकते. तरिही त्यामुळेच किंवा कसे ते ठाऊक नाही. पण कलीयुगाचा अंत होऊन नवे यूग येणार आहे. तो जगाचा अंत असेल असेही असू शकते. अर्थात चिंता करण्याचे कारण नाही. कारण जगाचा अंत झाला तर आपल्या सगळ्यांचाही अंत होइल आणि नाही झाला तर काहीच होणार नाही. चिंता कशाला (पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु Sat, 08/15/2009 - 09:01
जगबुडीची भाकिते सध्याच्या काळातील कोणताही शहाणा ज्योतिषी करत नाही. पुरातन ग्रंथावर ज्यांची अनाठायी श्रद्धा असते अशा भाबड्या व्यक्ती अशी भाकीते पसरवतात.

In reply to by युयुत्सु

जगबुडीची भाकिते सध्याच्या काळातील कोणताही शहाणा ज्योतिषी करत नाही. पुरातन ग्रंथावर ज्यांची अनाठायी श्रद्धा असते अशा भाबड्या व्यक्ती अशी भाकीते पसरवतात.
सहमत आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by युयुत्सु

विजुभाऊ Sat, 08/15/2009 - 22:47
पुरातन ग्रंथावर ज्यांची अनाठायी श्रद्धा असते अशा भाबड्या व्यक्ती अशी भाकीते पसरवतात. यात पुरातन ग्रंथ म्हणजे नक्की कोणता ग्रंथ अपेक्षीत आहे. हादीस् /बायबल/ की भृगुसंहीता? ही तारीख कोणत्याही ग्रंथात लिहिलेली नाही. जेंव्हा एखाद्या भृगुसंहितेवर/किंवा तैत्तीरीय संहीतेवर टीका होते तेंव्हा ती आक्रमक आणि असहिष्णु जोत्यीषनिन्दक यानी केली असे म्हणायचे आणि अंगाशी आले की हात झटकून मोकळे व्हायचे...असो ही तर नेहमीच रीत आहे. अधीक माहिती इथे http://en.wikipedia.org/wiki/2012 उपलब्ध नॉस्ट्रेडेमसने १९९९ नन्तर जगाचा शेवट येईल असे म्हंटले आहे. त्याच्या प्रॉफेसीज हा एक मनोरंजक विषय आहे. त्याच्याच भाषेत लिहायचे तर मिसळपावचे ही भाकीत त्याने अगोदरच लिहुन ठेवले आहे एक उभी रेघ आणि एक आडवी रेघ मदत करेल त्याला एक तिरपी रेघ. येईल नवी दुनीया तेथे असतील अनेक विहरतील हवे तेंव्हा हवेत अशरीरी ( उभी रेघ आणि एक आडवी रेघ = तात्या T मदत करेल त्याला एक तिरपी रेघ = निलकांत N येईल नवी दुनीया तेथे असतील अनेक = मिपा संस्थळ विहरतील हवे तेंव्हा हवेत अशरीरी = सदस्य ) अशरीरी = व्हर्च्युअल पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

सहज Sat, 08/15/2009 - 09:02
>प्रथम आर्थिक मंदी, मग २६ नोव्हेंबरचे अरिष्ट आणि आता स्वाईन फ्लु मला वाटतं ज्योतिषाची उपयुक्ततता पटण्यास हा अनुभव पुरेसा आहे. हॅ हॅ हॅ... बाकी चालू द्या. काय राव आर्थिक मंदी, २६ नोव्हें हे मानवनिर्मीत व स्वाईन फ्लु नैसर्गीक असताना हे तर ज्योतिष असे म्हणणे म्हणजे "तोडलेले" तारेच की! :-(

In reply to by सहज

अवलिया Sat, 08/15/2009 - 09:10
>>>>काय राव आर्थिक मंदी, २६ नोव्हें हे मानवनिर्मीत व स्वाईन फ्लु नैसर्गीक असताना हे तर ज्योतिष असे म्हणणे म्हणजे "तोडलेले" तारेच की! सहजराव, एक प्रश्न... स्वाईन फ्लु नैसर्गीक आहे हे आपण कसे ठरवले? बर्ड फ्ल्यु आणि एका अतिशय महान देशाचा संरक्षणमंत्री यांचे नाते आपणास माहित असावे असे गृहित धरतो. --अवलिया

वेताळ Sat, 08/15/2009 - 12:23
असे म्हणणे किती सयुक्तिक ठरते?कारण आर्थिक मंदी, २६ नोव्हेंबर व स्वाईन फ्लु हे भविष्य कोणत्या ज्योतिषीशास्त्राने पुर्वी वर्तवले होते? वेताळ

In reply to by वेताळ

युयुत्सु Sat, 08/15/2009 - 13:16
आपण मा़झ्या चिंतनिकेला भेट दिली नसावी असे वाटते. एखाद्या घटनेचे स्वरुप आणि कालावधी एवढे ज्योतिषाने अचूकपणे सांगितले तरी तो मोठा टप्पा आहे असे मला वाटते.

सुधीर काळे Sat, 08/15/2009 - 12:24
युयुस्तूसाहेबांनी भविष्यशास्त्र सांख्यिकी शास्त्रावर आधरित आहे हे इथे मान्ये केले पण ज्या याहू फोरमबद्दल ते लिहितात व ज्याचा मीही सभासद आहे तिथे अद्याप त्यांनी असे मान्य केलेले विधान वाचल्याचे आठवत नाहीं. मी ज्या क्षेत्रात काम करतो (metallurgy) तेही असेच young science होते. किती तरी गोष्टी कल्पनेवर व त्याकाळच्या सूक्ष्मदर्शक यंत्रांच्या अपुर्‍या क्षमतेवर आधारलेल्या होत्या. आता "इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप" व "इलेक्ट्रॉन प्रोब मायक्रो-अ‍ॅनलायजर"मुळे ते शास्त्र आता खूप प्रगत झाले आहे. भविष्यशास्त्राबद्दलही माझे मत असेच आहे. ते अद्याप बाल्यावस्थेत आहे (young science). अजून सगळे ग्रह सापडले आहेत का हे माहीत नाहीं, कांहीं ग्रहमानले जाणारे आता ग्रह नाहीं असे मानतात. थोडक्यात काय कीं अजून सगळी variables माहीत नाहींत, त्यांचा परिणाम व त्यांची स्थिती व संपूर्ण करोडो लोकांच्या आयुष्यावर त्या configurationचा काय परिणाम झाला हे माहीत नाहीं. ही सर्व माहिती Data bank मध्ये टाकणे व त्याचा परस्पर संबंध शोधण्यासाठी आवश्यक असा सुपर-कॉम्पुटर बनविणे व त्याच्या योग्य असे सुपर-सॉफ्टवेअर लिहिणे या गोष्टी व्हायच्या आहेत. त्या झाल्यावरच हे भविष्यशास्त्र "वयात येईल". म्हणून माझ्या मते भविष्यशास्त्र हे उद्याचे शास्त्र आहे, आजचे नव्हे. कदाचित १००-२०० वर्षांनंतर ते जास्त चांगले अनुमान करू शकेल व व्यक्तीचा स्वभाव वगैरे गोष्टी कुणीही बोलणार नाहीं कारण गरजच भासणार नाहीं. सुधीर काळे ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

दादा कोंडके Sat, 08/15/2009 - 13:20
एखादी थिअरी मांडताना, ती एक्सपरिमेंटली सिद्ध करण्याआधी ती मॅथॅमॅटिकली-लॉजिकली प्रूव्ह करता येते. नंतर ती कॄत्रिम किंवा नैसर्गिक प्रयोगाने सिद्ध करता येते. अशा कितीतरी थिअरीज मांडल्या होत्या पण त्यावेळच्या तंत्रज्ञानाने सिद्ध करणे शक्य नव्हते. पण नंतर त्या सिद्ध झाल्या. जसं की सूपर कंडक्टिविटी, प्रकाश किरण गुरुत्वाकर्षणा मुळं मार्ग बदलतो वगैरे. माझ्यामते, ज्योतिष शास्त्राला कोणतीच गणिती बैठक नाही आहे. त्यामुळे नंतर स्टॅटिस्टिकली सिद्ध करून, परत, फार फार तर योगायोग म्हणता येईल. मला ज्योतिष शास्त्राची बैठक नक्की काय आहे हे माहिती नाही. पण आकाशातील ग्रह-गोलांच्या फिल्डमुळे मानवी जिवनावर परिणाम असल्यास, शास्त्र असं सांगतं की कुठल्या तरी, प्लुटो ग्रहापेक्षा डोक्यावरून जाणार्‍या एच टी लाईन्सचा विद्युत चुंबकीय प्रभाव जास्त असतो. "I always win, except when I loose. But then I just don't count" :D

विसोबा खेचर Sun, 08/16/2009 - 08:23
प्रथम आर्थिक मंदी, मग २६ नोव्हेंबरचे अरिष्ट आणि आता स्वाईन फ्लु मला वाटतं ज्योतिषाची उपयुक्ततता पटण्यास हा अनुभव पुरेसा आहे.
युयुत्सुरावांचे प्रकटन मजेशीर असून करमणूक करणारे आहे! :)
'स्वाईन फ्लूची साथ" येईल असे शब्द माझ्या भाकीतात नाहीत असा आक्षेप काही नतद्र्ष्ट ज्योतिषाचे निंदक घेतील.
नतद्र्ष्ट ज्योतिषाचे निंदक की ज्योतिषाचे नतद्र्ष्ट निंदक? :) आपला, (नतद्रष्ट) तात्या.

JAGOMOHANPYARE Sun, 08/16/2009 - 08:55
अनपेक्षित अस्थैर्य>>>>>>>>>>>>>>>>>> माणूस ज्योतिषाकडे ते जातो ते काहीही अनपेक्षित अस्थैर्य घडल्यावरच.... अनपेक्षित अस्थैर्य या शब्दात नवरा मरण्यापासून आर्थिक मन्दी पर्यन्त , भूकम्पापास्ञ्न स्वाईन फ्लु पर्यन्त सगळेच येते.... मग एखादी गोष्ट घडून गेल्यानन्तर , काहीतरी अनपेक्षित घडल्यावर मग हे मी आधी सान्गितले होते असा टेम्भा कशाला मिरवायचा.... ? :) ज्योतिषी म्हणजे ' उर्टावरचे शहाणे' !

नितिन थत्ते Sun, 08/16/2009 - 09:31
युयुत्सुसाहेबांच्या लेखात वैयक्तिकरीत्या अडचणी येतील आणि मोठा वर्ग प्रभावित असेल असे लिहिले आहे. आर्थिक मंदी, २६ नोव्हेंबरची घटना किंवा आताचा स्वाईनफ्लू या वैयक्तिक घटना नाहीत. संपूर्ण समाजासाठी असे कुठलेच भाकीत आपण केलेले नाही. (त्यामुळे ते बरोबर निघाले की चूक निघाले हा प्रश्नच गैरलागू आहे). नितिन थत्ते