मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक समृद्ध राग ... राग कंबलबहार.. त्यातलं एक परिपूर्ण गीत

भडकमकर मास्तर · · जनातलं, मनातलं
जेव्हा आशा भोसले,एस पी बालसुब्रमण्यम आणि बप्पी लाहिरी एकत्र येतात तेव्हा एक अफ़लातून गीत जन्माला येतं. फ़र्स्ट लव लेटर या सिनेमातलं हे गाणं. http://www.youtube.com/watch?v=1LkIt6ySFnk आमचा तरणाबांड विवेक मुश्रन आणि संगमर्मरी बदनवाली मनिषा यांच्यावर चित्रित झालेलं. ( या मनिषावर बाकी आमचा फ़ार जीव.. ते असो..) तर गाणं असं करायचं होतं की नायिका आणि नायक एकाच कांबळ्याखाली झोपले आहेत, नाईलाजानं कारण त्या कांबळ्याच्या बाहेर मधमाश्या बसल्या आहेत. डायरेक्टर शिवा आणि लेखक राम केळ्कर यांनी ही सिचुएशन बप्पिदाला ऐकवली तेव्हा बप्पिदाने अक्षरश: पाचव्या मिनिटाला चाल तयार केली होती. ( ही गोष्ट मी स्वत: साउंड डिपार्टमेंटच्या मंडळींकडून ऐकली आहे....साउंड असिस्टंट घनशाम भेटतो कधीकधी).. गाण्याचे बोल आहेत.. बचेंगे कबतक हम दोनो इस कंबल के अंदर कंबल ना हटाओ मुझे लगता है डर. बप्पिदांनी या गाण्यासाठी राग कंबल बहार हा एक अनवट राग वापरला आहे.( तानसेनाचा पणतू जियालाल याने हा राग तयार केला असे म्हणतात. त्या रागातली फ़ार गाणी उपलब्ध नाहीत ...या रागाच्या कर्त्याबाबत तज्ञ मंडळींमध्ये मतभेद आहेत.... कोणी सांगतं की कर्नाटक संगीतातल्या कमलवर या रागाचेच हे एक रूप आहे. ) पहाटेच्या थंडीमध्ये अंगावर जाडजूड गोधडी घेऊन रोम्यांटिक स्वप्नं पाहणार्‍या माणसाच्या भावना व्यक्त कराव्यात त्या या रागानेच....जियालालने या रागाला नाव तरी काय छान दिलंय.. राग कंबलबहार....सुंदर. ... रागाचा हा विशिष्ट फ़ील कांबळ्याच्या संदर्भातल्या गाण्याला जोडण्याचं कौशल्य बप्पिदाचं... "सारे सारे मरे धरे " हे रागाचं विशिष्ट सांगीतिक रूप बप्पिदांनी फ़ार उत्तम खुलवलेलं आहे. गाण्यातले बासरीचे तुकडे, व्हायोलिनचे तुकडे अप्रतिम.... कडवं संपून पुन्हा कंबल ना हटाओकडे येताना एक प्रसन्न वाद्यसम्गीताचा तुकडा आहे, तो ऐकताना बप्पिचे संगीतकार म्हणून कौशल्य स्पष्ट होते. शिवाय आशाताईंनी "कुछ ना आज हो जाये " या ओळींवर जी जागा घेतली आहे तिला तोड नाही. अशी आर्तता आजच्या गायिकांना कशी आणता येणार? आपला एस्पीही उत्तम गाऊन गेलेला आहे. या गाण्यात काय नाही? प्रेमी जीवांची हुरहूर आहे, मीलनाची आसुसलेली मनं आहेत.. यौवनसुलभ लज्जा आहे, वियोगाची तगमग आहे.. मीलनाचं सुख आहे.. अहाहा... शिवाय स्वप्नदृश्य आहे,,नायिका होडक्याशेजारी ठुमकत नाचते, नायक नदीकाठी आगीतून उडी घेतो हा थरकाप उडवणारा सीन आहे... गाण्याच्या शेवटी नायक नायिका खाटल्यावरून उड्या मारत मारत सर्व गावकर्‍यांसमोर रस्त्याने धावत धावत जातात , हे दृश्य डोळ्यांचे पारणे फ़ेडणारे.... एकूणच कंबलबहार रागाचं उत्तम लक्षणगीत म्हणून या गाण्याचा उल्लेख इतिहासात राहील यात काहीच शंका नाही.

वाचने 16051 वाचनखूण प्रतिक्रिया 27

लिखाळ 05/08/2009 - 02:00
वा.. मास्तर काय सुंदर लिहिले आहे. खरंच हे गाणे ऐकून अगदी ब्रह्मानंदी टाळी लागली. आशाताईंचा आवाज म्हणजे काय! आमची बोलतीच बंद. या गाण्याचे बोल आणि सुरावट तयार करण्यासाठी दोन जन्म घ्यावे लागतील खास ! साउंड असिस्टंट घनश्याम बद्दल स्वतंत्र लेखच लिहा ना. कंबलबहार (खरेतर कंबल के अंदर) हा अनवट राग उलगडून दाखवल्याबद्दल आभार. आज या रागातली सगळी गाणी ऐकणार आता. कमलवर हेच नाव मी या आधी ऐकले होते. अगदी भुंग्याचा भास करुन देणारे गाणे आणि सूर अशी चपखल योजना आहे. मती सुद्धा कशी गुंग होऊन जाते हा राग ऐकताना. वा.. मास्तर.. आज अगदी मजा आणलीत. आता दोन पेग ऑन रॉक्स, मंद आवाजात हा राग आणि सोबत चखण्यासाठी रेशमी कबाब. आनंद आनंद म्हणजे तरी दुसरे काय हो !! जाताजाता : चित्रीकरणाच्या वेळच्या मधमाश्या मनिषाबाईंच्या साडीवर अजूनही आहेत वाटते :) -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

In reply to by लिखाळ

तरीही मास्तर तुम्ही या गाण्याची सगळी वैशिष्ट्ये उलगडली नाहीत असं वाटत आहे. उदा हे पहा, लव लेटर या इंग्लिश शब्दांचा गाण्यात चपखल केलेला प्रयोग. (लोकं उगाच गुलजारना रोजच्या व्यवहारातले अंग्रजी शब्द गाण्यात वापरल्याचं श्रेय देतात.) शिवाय मनिषाच्या अ‍ॅक्टींगकडे आपण थोडं दुर्लक्षच केल्याचं जाणवतं. शिवाय आशाताईंनी "कुछ ना आज हो जाये " या ओळींवर जी जागा घेतली आहे तिला तोड नाही. अशी आर्तता आजच्या गायिकांना कशी आणता येणार? याच ओळीवर मनिषाने जो सात्विक अभिनय केला आहे, तिच्या चेहेर्‍यावरचे भाव जे उत्तम आले आहेत ते आजच्या या नट्यांना कुठून जमणार? (दुर्दैवाने विवेक मुश्रनसारखे ठोकळे हिरो अजूनही आहेत.) "मुझे है लगता डर" या ओळीमधे आशाताईंची आणि मनिषाची एक्स्प्रेशन्स अगदी पर्फेक्टच! फळ्यावर नखांनी खरवडल्यावर कसा आपोआप शहारा येतो, तसंच काहीसं या ओळींची अनुभूती घेताना होतं; अगदी लगेचच "वाह वा" असंच तोंडात येतं. पण या निमित्ताने भारतीय गैरफिल्मी संगीताचा आणखी एक आधारस्तंभ विवेक मुश्रन याची समयोचित(?) आठवण करून दिल्याबद्दल आभार. अदिती

मास्तर, मास्तर, काय उत्कृष्ट लेख हो... अहाहा!!! काय छान ओळख करून दिली आहे. अतिशय गुणी पण लपून राहिलेल्या अति थोर थोर विभूतिंना आणि त्यांच्या कलाकृतींना असे उजेडात आणण्याचे महान कार्य असेच चालू ठेवा. =)) =)) =))) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

दशानन 05/08/2009 - 08:49
>>मास्तर, मास्तर, काय उत्कृष्ट लेख हो... अहाहा!!! काय छान ओळख करून दिली आहे. अतिशय गुणी पण लपून राहिलेल्या अति थोर थोर विभूतिंना आणि त्यांच्या कलाकृतींना असे उजेडात आणण्याचे महान कार्य असेच चालू ठेवा. +१ हेच म्हणतो. कितीदा तरी झी सिनेमा वर हा चित्रपट / गाणे चालू असते ह्याची गनणाच नाही.. ! +++++++++++++++++++++++++++++

In reply to by दशानन

मास्तर, मास्तर, काय उत्कृष्ट लेख हो... अहाहा!!! काय छान ओळख करून दिली आहे. अतिशय गुणी पण लपून राहिलेल्या अति थोर थोर विभूतिंना आणि त्यांच्या कलाकृतींना असे उजेडात आणण्याचे महान कार्य असेच चालू ठेवा. हेच म्हणतो... बाकी त्या घनश्याम चा अजुन कथा येवु द्यात.. निखिल ================================

सहज 05/08/2009 - 07:29
एका अप्रतिम गाण्याचे तितकेच तोलामोलाचे रसग्रहण झाले आहे. कंबलबहार रागाची ह्याहुन उत्तम ओळख कोणती? बाकी आमचा फ़ार जीव असलेली, संगमर्मरी बदनवाली.. ओहोहो मास्तर क्या कहने!! साक्षात भारतभूषण स्कूल पूढे चालवणारा विवेक. मनिषा व विवेक यांच्या शब्दांना पुरक अशा नृत्याभिनयाने ह्या अजरामरगीताला एका नव्या उंचीवर नेउन ठेवले आहे. साउंड असिस्टंट घनश्याम बद्दल स्वतंत्र लेखच लिहा ना. - लिखाळांच्या मागणीला पूर्ण अनुमोदन. हा लेख तुमच्या अव्वल लेखमालेतील अजुन एक उत्तम शब्दशिल्प!

विसोबा खेचर 05/08/2009 - 07:57
मास्तर... भन्नाटच!
"सारे सारे मरे धरे " हे रागाचं विशिष्ट सांगीतिक रूप बप्पिदांनी फ़ार उत्तम खुलवलेलं आहे. गाण्यातले बासरीचे तुकडे, व्हायोलिनचे तुकडे अप्रतिम....
पार आडवा.... :) बाकी, एकेकाळी मनिषाने आम्हालाही काही घटका खुळावलं होतं बर्र का! साला, नेपाळी सौंदर्यच वेगळं ;) जियो... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पाषाणभेद 05/08/2009 - 09:13
मग तात्या नेपाळच प्रवासवर्णन पण येवू द्या. फोटो पण टाका. नेपाळमध्ये भारतीय चलनाला चांगली किंमत येते असे ऐकून आहे. तुम्ही काय काय वस्तू आणल्यात तेथून? आणि भडकमकर मास्तरांनी जो अज्ञात ज्ञानाचा खजीना धुंडाळण्याचा जो वसा घेतलेला आहे त्यास मराठी साहित्यशारदा निश्चितच फळ देवो अशी शुभेच्छा त्यांना देतो. आणि हो, वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

झकासराव 05/08/2009 - 09:10
मास्तर जबरा लिहिलय. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

जीयो मास्तर जीयो ! आमच्या बप्पीदा विषयी काय सांगु ? त्याच्यासारखा तोच..! जिथे सारे सुर संपतात, जिथे सार्‍या ताना संपतात, जिथे सारे राग संपतात, तिथे तो सुरू होतो..! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

योगी९०० 05/08/2009 - 13:05
याच रागावर गुरूवर्य जालिंदर जलालाबादी याच्यावर एक आरती आहे. त्याची कॅसेट माझ्याजवळ मिळेल. खादाडमाऊ

In reply to by नंदन

ऋषिकेश 05/08/2009 - 19:36
असेच म्हणतो +१ _/\_ ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ७ वाजून ३५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया कंबलबहार रागातील एक सुमधूर गीत "बचेंगे कबतक हम दोनो इस कंबल के अंदर...."

In reply to by ऋषिकेश

लिखाळ आणि माझ्यापेक्षा 'धनंजय' आणि 'मी' यांचे प्रतिसाद जास्त अभ्यासू आहेत. जिज्ञासूंनी खालचे प्रतिसाद पुन्हा एकदा वाचावेत. अदिती अधिक माहितीसाठी भडकमकर मास्तरांना भेटा.

धमाल बाळ 05/08/2009 - 22:28
त्या थोर बप्पीदांचे अजून एक थोर गाणे सॉरी सॉरी सॉरी सॉरी सर आज मुझे जल्दी जाना घर पहले टाईप करदो लेटर लव लव लेटर सी यू लॅटर.... कुठलाशा अल्बम मध्ये हे गाणे बप्पीदा आणि मराठमोळी पद्मिनी कोल्हापुरेने हे गाणे गायले आहे.

धनंजय 05/08/2009 - 22:47
हा कंबल+बहार असा राग नसून कंब+लब+हार अशा तीन स्रोतांतून बनवलेला मिश्र राग आहे. तरुणाच्या हातातील कंब (कांब), लबांचे (ओठांचे) केलेले चाळे, आणि त्याने प्रेमात मानलेली हार. अशा प्रकारे हे उत्तम लक्षणगीत आहे. मलु+हाके+दारा या सुंदर मिश्र रागाचे मलुहा+केदारा असे हिणकस विश्लेषण करणारे ते तुम्हीच का?

इनोबा म्हणे 05/08/2009 - 22:56
काय सुंदर ओळख करुन दिली आहे राग कंबलबहाराची. बाकी हा राग कंबलबहार आणि ती कंबलातली नेपाळी सुंदरी दोन्हीवर आम्ही जाम खुश आहोत. ('इंटरनॅशनल बियर डे'च्या निमीत्ताने आवडत्या स्त्री सोबत बीयर ढोसणारा)- इनोबा चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?

महेश हतोळकर 06/08/2009 - 08:50
"सारे सारे मरे धरे " हे रागाचं विशिष्ट सांगीतिक रूप बप्पिदांनी फ़ार उत्तम खुलवलेलं आहे. गाण्यातले बासरीचे तुकडे, व्हायोलिनचे तुकडे अप्रतिम.... सौ वरदाबाई हट्टंगडींच्या (एच. मंगेशरावांच्या सुदृढ व सुविद्य पत्नी आणि शिष्या) विवेचनानुसार ही सुरावट "साप मरे साप मरे धनी मग मरे" अशी आहे. बाकी सामान्यजनांना अज्ञात असणार्‍या विवीध रागांची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. पुलेशु. ----------------------------------------------------------------- तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे. -----------------------------------------------------------------

हरकाम्या 06/08/2009 - 13:21
तुमची "अभिरुची "खालावत चालली हो.तुम्हाला आता थोर अशा "बप्पीदाची "गाणी आवडायला लागलीत.

धमाल बाळ 06/07/2010 - 11:39
सारे सारे मग मरे या बरोबरच रेप रेप धरे धरे धरे धरे मग मरे मनी धरे मनी मरे मग मग धनी मरे हे देखील या रागाचे आगळे रूप

चौकटराजा 08/09/2012 - 07:28
२००९ साली मिपावर मार्मिक प्रतिसाद येत असत असे या धाग्यावरील शिलालेख सांगतात. तीन वर्षात अशी मिपावर काय क्रांति झाली की त्याचे रूपांतर जबर्‍या, जबरदस्त आवडेश,,खपल्या गेलो आहे यात झाले ?

In reply to by चौकटराजा

पुर्वी मिपा उत्क्रांती अवस्थेत होते. त्यामुळे त्यातील मानवप्राण्यांचे वागणे पुर्णत: नैसर्गीक होते. नंतर नंतर उगाचच साधनसुचीतेच्या गोष्टी तेथील मानव शिकला. मग हे नको ते नको हे असेच हवे ते तसेच हवे आदी गोष्टी येत गेल्या. तेथेच त्या मानवांचा प्रामाणीकपणा, आपलेपणा, भांडण करण्याची वृत्ती आदी गुण लोप पावले. आताच्या पिढीतील मानव प्राणी त्या नैसर्गीक गुंणांपासून वंचीत आहे. त्याचप्रमाणे त्याचे येथील वागणेही अनैसर्गीक, कृत्रीम झाले असल्याने मिपाचे रुपांतर पुढील काळात चेपूसारखे झाले तर मागल्या पिढीतील अनेक सदस्यांच्या काळजाचे तुकडे पडतील हे सत्य आहे. कालाय तस्मै नम: बाकी आता मुळ लेखाबद्दल: मास्तर आता पुन्हा जोमात आलेले दिसत आहेत. मध्यंतरी त्यांनी देखील वर उल्लेखलेल्या मुद्यांना धरून मुखवटा धारण केला असण्याची शक्यता होती. आता त्यांनी तो मुखवटा फाडून टाकला व त्यांच्या नैसर्गीकतेकडे ते झुकले आहे.