अधुनिक तीर्थक्षेत्रे....
राजगुरुनगर ते हुसैनीवाला......
"मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम कि, मैं ‘इश्क’ भी लिखना चाहूं तो ‘इंकलाब’ लिखा जाता है..."
- हुतात्मा भगतसिंग
२३ मार्च १९३१ ला भगतसिंग, राजगुरू आणी सुखदेव यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी दिली.ही बातमी रत्नागिरी येथे स्थानबद्ध आसलेल्या स्वातंत्र्यवीरांना दुसरे दिवशी कळाली.निर्माण झालेल्या मनःक्षोभातून खालील कविता त्यांनी लिहीली आणी देशप्रेमी तरूणांनी गुपचूप कठंस्थ करून रत्नागिरीत प्रभातफेरी काढली आणी सारे नगर देशभक्तीच्या घोषणांनी दणाणून सोडले होते.
"हा भगतसिंग, हाय हा
जाशि आजि, फांशी आम्हांस्तवचि वीरा, हाय हा!
राजगुरू तूं, हाय हा!
राष्ट्र समरी,वीर कुमरा पडसि झुंजत, हाय हा!
हाय हा, जयजय अहा!
हाय हायचि आजची, उदयीकच्या जिंकी जया II
राजमुकुटा तो धरी
मृत्युच्या मुकुटासि आधी बांधी जो जन निजशिरीं !
शस्त्र धरुचि अम्हि स्वतः
धरुनि जें तूं समरिं शत्रुशि मरसि मारीत मारतां ! अधम तरि तो कोणता ?
हेतुच्या तव वीरतेची जो न वंदिल शुद्धता II
जा हुतात्म्यांनो, अहा ! साक्ष ठेवुनि शपथ घेतों आम्हि उरलों तें पहा !
शस्त्रसंगर चंड हा झुंजावुनि कीं, जिंकुची स्वातंत्र्य विजयासी पहा !
हा भगतसिंग, हाय हा "
- स्वातंत्र्यवीर सावरकर..
राजगुरुनगर माझे गाव,माझे प्रेरणा स्थान हु.शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थान.मी इथेच वाढलो,घडलो. पुणे-नाशिकफाटा-भोसरी-चाकण या मार्गावर चाकण पासून दहा बारा किलोमीटर वर वसलेल्या खेड गावाचे नामांतरण'राजगुरुनगर'आसे १९६० मधे झाले.गावाला शिवपुर्वकालीन इतिहास आहे.पुज्य शंकराचार्य यांच्या पदस्पर्शाने व चंडिराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेलं,भीमा नदीच्या काठावरचे हे गाव. हु.शिवराम हरी राजगुरू यांच्या हौतात्म्याने भारत भर प्रसिद्ध आहे.
चाकण
चाकण हे उद्योग धंद्यातील एक मोठे गाव म्हणून सध्या ओळखतात. येथील भुईकोट किल्ला,किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी शाहिस्ते खानाशी स्वराज्य रक्षणार्थ दिलेली झुंज इतिहासात वाचलीच आसेल. याच गावात राजगुरु घराण्यातील मुळपुरूष कचेश्वर स्वामी रहात होते. हे छ.शाहू महाराज यांचे गुरू. यांचे मुळ आडनाव ब्रम्हे पण राजाचे गुरू म्हणून आडनाव राजगुरू पडले. (संदर्भ गावातील वयोवृद्ध आणी लेखक सच्चिदानंद शेवडे).
राजगुरुनगर
छ.शाहू महाराजांनी गुरूंना विनंती केली व त्यांच्यासाठी राजगुरुनगर(खेड) येथे भीमेच्या काठावर त्यांना वाडा बांधून दिला. वाडा कसला जणू मजबूत भुईकोट किल्ला, चहूबाजूंनी तटबंदी,मोठाले बुरूज,नदीकाठा वरचा छोटा चोर दरवाजा.आजही नदीच्या पुलावरून या वाड्याची तटबंदी दिसते.ह्याच वाड्यात शिवराम हरी राजगुरु यांचा जन्म २४-८-१९०८,श्रावण वद्य १३ शके १८३० या दिवशी झाला.त्यांचे बापू हे टोपणनाव होते.
राजगुरूंचे प्रारंभिक जीवन, देशकार्य या बद्दल आंतरजालावर, पुस्तकातून माहीती उपलब्ध आहे. राजगुरूनगर येथील त्यांच्या जन्मस्थानी त्यांचे सुदंर, प्रेक्षणीय स्मारक बनवले आहे व छान ठेवले सुद्धा आहे. राजगुरुनगर, शिवनेरी, लेण्याद्री व ओझर एक दिवसाची मस्त सहल होऊ शकते.
लहानपणी या वाड्यात नेहमी खेळायला जायचो.राजगुरूंचा निग्रही स्वभाव, इंग्रजी भाषा आणी परकीय सत्ते बद्दल चीड आणी त्यांची अचुक निशाणेबाजी व जीवन कार्य वाचुन नेहमीच अभिमान वाटत आसे.
भगतसिंग,राजगुरु आणी सुखदेव यानां २३-३-१९३१ ला लाहोर जेल मधे फाशी दिली.त्यांचे अंतीम संस्कार करतांना जनउद्रेक निश्चितच होणार म्हणुन इंग्रजांनी त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना न देता मध्यरात्रीनंतर गुपचूप लाहोर जेलच्या मागच्या दरवाजाने २५ किलोमीटर दुर हुसैनीवाला,सतलज नदीच्या काठावर नेऊन दाहसंस्कार केला व खुणा मीटवल्या. ही बातमी कळल्यावर जनसागर उमडला, अंत्यसंस्काराच्या जागी जमा झाला. बंदोबस्ताला आसलेले पोलीस पळून गेले. खुणा जरी मीटवल्या आसल्या तरी भुमीचा दाह थांबलेला नव्हता.लोकांनी त्या गरम जागेवरची माती आपल्या कपाळावर लावली.तीथले दगड आपल्या पुजागृहात ठेवण्यासाठी नेले.हे सर्व वाचल्यानंतर नेहमी वाटत असे आपल्याला कधी या पवित्र जागेचे दर्शन होईल काय?
पुढे पंजाबात बदली झाली. ऑपरेशन ब्लू स्टारच्या काळात या भागात बराच फिरलो पण परीस्थीती मुळे इच्छा असुनही भेट देता आली नाही. सेवानिवृत्ती आगोदर पंजाब राजस्थान सीमेवर,श्रीगंगानगर येथे कार्यरत असताना योग आला.
श्रीगंगानगर,फाजील्का,हुसैनीवाला, अमृतसर,आटारी (बाघा बाॅर्डर) आसा सहकुटुंब दौरा बाय रोड केला.हुतात्मा स्मारक बघण्याची इच्छा शेवटी पुर्ण झाली."बाघा" सीमेवर दोन्ही देशांतील सुरक्षा कर्मीद्वारा संयुक्त दैनिक बीटिंग रिट्रीट समारोह आयोजित केला जातो तसाच हुसैनीवाला इथे पण करतात.ही जागा छोटी व कमी प्रसिद्ध त्यामुळे गर्दी कमी व हा समारोह खुपच जवळून बघता येतो.पहिल्या रांगेत बसुन रोमांचकारी परेडचा आनंद घेण्याचा योग आला.
हुसैनीवाला
भारत पाकिस्तान सीमेवरचे एक छोटेसेच सतलज नदी काठचे खेडेगाव.फिरोजपुर पासून वीसेक किलोमीटरवर तर लाहोर ४५ किलोमीटरवर आहे. स्वातंत्र्य पुर्व काळात लाहोरला जोडणारे उत्तर पुर्व रेल्वेच्या अंतर्गत महत्वाचे स्थानक.
हुसैनीवाला गावाचे नाव सुफी संत ग़ुलाम हुसैनीवाला यांच्या नावावर पडलेआहे.
'सतलज दरीया' (स्थानीक भाषा) दोन्ही देशांतील नैसर्गिक सीमारेषा, एका बाजुला भारतातील हुसैनीवाला तर दुसऱ्या काठावर पाकिस्तानचे 'गंडा सिंह वाला' नावाचे गाव आहे. सरदार बहादुर रिसालदार मेजर गंडा सिंह दत्त,आई ओ एम (इंडियन ऑर्डर ऑफ मेरीट),1830 -1903, 19 बंगाल लांसर्स, रेजिमेंट, ब्रिटिश भारतीय सेनेमधे कार्यरत होते.
इंग्रजानी दळणवळणा करता डबल डेकर पुल बांधला होता. रेल्वे आणी इतर वाहातुक एकाच वेळेस सुरळीत चालू आसे.आता हा पुल सुरक्षा कारणास्तव खंडितआहे.उत्तर रेल्वेचे हे शेवटचे स्थानक.
क्रांतिकारकांचे साथीदार बटुकेशवर दत्त यांना याच केस मधे दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यांचे निधन दिल्ली मधे १९-७-१९६५ ला झाले त्यांच्या इच्छेनुसार अंतिम संस्कार याच जागी केला. त्यांचे स्मारक सुद्धा इथेच आहे. पंजाब सरकारने हुतात्मा भगतसिंग यांची माता विद्यावती यांना "पंजाब माता" म्हणून पुरस्कृत केले आहे.त्यांचा अंतिम संस्कार सुद्धा इथेच केला व साजेसे स्मारक बनवले आहे.
४२ फुट लांब,९१ फुट रुंद आणी ५६ फुट उंच "शान-ऐ-हिंद",भव्य दरवाजा (गेट) पाकीस्तानच्या ३०फुटी "फख्रै -ऐ-पाक", दरवाजा समोर छाती फुलवून उभा आहे.
हुतात्मा स्मारकाची गरीमा व पवित्र्य मंदिरा सारखेच जोपासले आहे. स्मारकांच्या आवारात चप्पल,बूट घालून जाण्यास सक्त मनाई आहे. दररोज फुल,हार उदबत्ती,धूप स्मारकावर वाहून पुजा केली जाते. अखंड ज्योत तेवत ठेवली आहे.सफाई कर्मचारी सतत कार्यरत आसतात. येथील परीसर स्वच्छ ठेवतात. त्यांची सेवा वाखाणण्या जोगी आहे. येथील वातावरणात देशप्रेमाने उर भरून येतोच पण हुतात्म्यांबद्दल डोळ्यात पाणी सुद्धा तरळल्या शिवाय रहात नाही.
२ मराठी लाईट इन्फैंट्री (काळी पाचवी) च्या जवानांनी,मर्द मराठ्यांनी १९६५ च्या लढाईत मोठ्ठा पराक्रम गाजवला,शत्रूला धुळीत मिळवले.पलटन करता "हुसैनीवाला" युद्ध सन्मान मीळवला होता म्हणूनही ही जागा मराठी माणसा साठी विषेश आहे.
ही अधुनिक तीर्थक्षेत्रे, स्फूर्तीस्थळे येणाऱ्या पिढ्यांसाठी जोपासली पाहिजेत.
ज्यांच्यामुळे आज आपण स्वतंत्र भारतात मान उंचावून राहातो त्या सर्व प्रसिद्ध, अप्रसिद्ध महान विभूतींना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमीत्त मानाचा मुजरा.
वाचने
5665
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
जय हिंद! लेख आवडला.
छायाचित्र
भगतसिंग आणि सावरकर
In reply to भगतसिंग आणि सावरकर by प्रसाद गोडबोले
मला दया येते.....
In reply to मला दया येते..... by कर्नलतपस्वी
गडाबड
In reply to गडाबड by प्रसाद गोडबोले
रिअॅलिझम आणि रोमॅन्टिसिझम
In reply to रिअॅलिझम आणि रोमॅन्टिसिझम by कर्नलतपस्वी
?
In reply to गडाबड by प्रसाद गोडबोले
ठोकताळे
In reply to ठोकताळे by क्लिंटन
भगतसिंगांचे
In reply to भगतसिंगांचे by प्रसाद गोडबोले
असभ्य भाषाप्रयोग
In reply to भगतसिंग आणि सावरकर by प्रसाद गोडबोले
राजगुरुनगर, तालुका खेड पुणे....
In reply to भगतसिंग आणि सावरकर by प्रसाद गोडबोले
नशीब की हे घर पश्चिम
एक आठवण
In reply to एक आठवण by प्रकाश घाटपांडे
धन्यवाद
लेख आवडला
स्मारक
मस्त
कर्नल तपस्वींनी
धन्यवाद