Skip to main content

चुका

चुका

Published on 20/08/2020 - 12:24 प्रकाशित मुखपृष्ठ
मी नववीत होतो,तेरा वर्षांचा.बाल्यावस्था संपून मी नुकताच किशोरावस्थेत प्रवेश केला होता.मनात विचारांच काहूर माजलं होत.चेहर्‍यावरती दाढी-मिश्यांच्या कोवळ्या खूणा उमटल्या होत्या.मला त्याचे त्यावेळी खूप नवल वाटायचे.दिवसातून कित्येक वेळा मी आरश्यासमोर उभा राहायचो.नकळतच हात गालांवरुन फिरायचा,आणि मी स्वत:शीच हसायचो. सारं काही बदलत होत,शारीरिकच नव्हे तर मानसिक बदलही होत होते.एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणार्‍या भावना अचानकच बदलू लागल्या.सुरुवातीला अस का होतय?काहीच कळत नव्हत.एखाद्या मुलीकडे,माझ्या जुन्या मैत्रिणींकडे नकळतच खेचल्या जाऊ लागलो.त्यांच्याबद्दल मनात फक्त आता मैत्रीची भावना उरली नव्हती,ती भावना आता हळूहळू बदलत होती.वाढलेली सामाजिक बंधनं आणि बदललेली मानसिकता यात मी हरवलो होतो. खर सांगायच तर मी प्रेम आणि आकर्षण या वादात अडकलो होतो.काल ज्या मुलीसोबत मी सहज खेळायचो,बोलायचो आज तस काहीच नव्हत.त्यात चित्रपटांमधील प्रेमप्रसंग बघून तर मन अगदीच पेटून उठे.मी माझ्याच मनात प्रेमाच्या कित्येक व्याख्या निर्माण केल्या होत्या.पण प्रत्येक वेळी त्या व्याख्या बदलत होत्या.याचा परिणाम मी नैराश्यात गेलो,मी कोणाशीच बोलत नव्हतो. याचा परिणाम व्हायचा तो झालाच,नववीच्या प्रथम सत्र परिक्षेचा निकाल लागला,वर्गात मागून दुसर्‍या बेंचवर बसलो होतो,सगळ्यात आधी तर इंग्रजीचा पेपर हाती आला,मला ८० पैकी केवळ २१ गुण होते.तो पेपर हाती अन भरथंडीत घामाच्या धारांनी मी न्हाऊन गेलो,दुसरा पेपर आला तो मराठीचा,वाटल यात तरी जास्त असतील पण बघितल तर फक्त ३३.आता मात्र ह्रदयाचे ठोके दुप्पटगतीने पडू लागले,मी घाबरलो,तोच भूमितीचा पेपर हाती आणि आता डोळे पाणावले होते,कारण ४० पैकी फक्त ४ गुण,काय करावे काहीच सुधरत नव्हते.माझा आवडता विषय इतिहास.आठवीपर्यंत इतिहासाचा प्रश्न येताच माझं उत्तर तयार असायच,पण नववीत मला त्याच इतिहासातील धड्यांची नावं पण आठवत नव्हती,यातही मी काठावरच पास होतो. आता गुणपत्रकावर पालकांची स्वाक्षरी आणायची होती,पण हे गुणपत्रक घरी दाखवायची हिम्मत माझ्यात नव्हती,अन म्हणून मी स्वत:च त्यावर सही केली.पण शेवटी दादाला ते कळालाच,बरच समजून सांगितल त्याने मला.त्याचवेळी शाळेत एक वक्तृत्वस्पर्धा होती,त्यातला एक विषय होता,किशोरावस्था.अन त्यात माझा दुसरा क्रमांक आला होता,पण त्या भाषणाचा माझ्यावर परिणाम होणार एवढ्यात द्वितीय सत्राच्या परिक्षा तोंडावर आल्या,सगळ्यांनी गृहपाठाच्या वह्या गोळा करायला सांगितल्या पण माझी हिंदीची वही अपूर्णच होती.इतक्या लवकर ती पूर्ण होणार पण नव्हती,अन म्हणून मी त्यात थोडफार लिहून मी स्वत:च त्यावर सह्या केल्या. १० वीच्या वर्गात प्रवेश केला,मनस्थिती सुधारत होती,अन त्याचवेळी माझ नववीतील प्रकरण उघडकीस आलं.पुन्हा तेच नैराश्य,तोच एकटेपणा.आजवर चाललाय.सुधारण्याचा प्रयत्न सुरु असताना पुन्हा भुतकाळातल्या चुका तोंड वर काढतात.अन पुन्हा तेच पहिले पाढे पंचावन्न.तेच नैराश्य.तोच एकटेपणा.
लेखनप्रकार

याद्या 6289
प्रतिक्रिया 17

In reply to by rushikapse165

लेखनावरुन तुमचे विचार सुसंगत वाटतात. नैराश्य वगैरे कल्पना डोक्यातून पूर्णपणे काढून टाका. माझं हे वाक्य कायम दिसत राहिल असं लिहून ठेवा : भूतकाळातल्या आठवणी काढणं म्हणजे गेलेल्या माणसाला उठवण्याचा प्रयत्न आहे; त्याचा काहीही उपयोग नाही ! या वाक्याच्या मनना बरोबर तीन गोष्टी सुरु करा : १. सकाळी ६ च्या आत उठणे २. किमान एक तास तुमच्या आवडीचा व्यायाम किंवा खेळ, आणि ३. आयुष्यभर उपयोगी होईल असा एक उत्तम छंद जोपासा. तुम्ही आनंदी व्हाल !

"ती तुझ्याकडे बघत होती रे" मित्राने सांगितलेल्या या एका वाक्यामुळे कित्येक विश्वामित्रांच्य तपस्या परत परत भंग होताना बघितल्यात =))

In reply to by टवाळ कार्टा

पण या एका वाक्याने आनंद मिळतो.तपस्या भंग होते अस नाही,पण शेवटी प्रेम आणि आकर्षण या वेगळ्या गोष्टी आहेत.ती बोलली नाही म्हणून तिच्या मनातलं कळत नाही अस नसत,त्यासाठीचा संवाद हा डोळ्यातून होतो.आणि मित्र म्हटलं तर आपल्या प्रेयसीला वहिनी म्हणण्याचा हक्क त्यांना असतोच.

पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहात असे म्हणता म्हणजे पौगुंडावस्थेचा टप्पा पार पडलेला दिसतोय. ज्या वयातल्या भावना तुम्ही लिहिलेलय आहेत त्यावयात असे दिसतेय कि तुम्हाला कोणी जवळचे असे मित्र नसावेत किंवा तुम्ही अगदीच अंतर्मुखी तरी असावात. कारण प्रत्येक जण ह्या अवस्थेतुन जातोच.

In reply to by कानडाऊ योगेशु

हो,मला अगदी तसे मोजकेच मित्र आहेत.अॅक्च्युअल जगण्यापेक्षा वर्च्युअल जगायला आवडत.शेवटी प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात.दिवसातला कित्येक वेळ मी स्वत:शीच बोलतो.आणि मला एकटं राहायला आवडत.अगदी कोणासाठीच मी माझे काम थांबवत नाही.

शेकडा ८० टक्के लोकांचं असच काहितरी होतं. आणि त्या वयात हे असलं नाहि झालं तर काय मजा ? आता तुम्ही सावरला आहात कि नाहि ? किंबहुना पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहात म्हणजे आता चोक्कस करीअरची स्वप्न पडायला हवीत आणि त्या करता जीव ओतुन प्रयत्न करण्याची झींग अनुभवायला हवी. तशी झींग नाहिए का? नसल्यास तो खरा प्रॉब्लेम आहे.

In reply to by अर्धवटराव

मी त्यातून सावरलोय.पण आता मी कोणासमोर तितकासा व्यक्त होत नाही,तशी लिहिण्याची आवड मला पाचवीसूनच आहे.पण आता तर ती व्यक्त होण्याची पद्धत आहे.करियरची स्वप्नही आहेत आणि मेहनतही आहे.

सध्यातरी पदवी नंतर काय याच्यावर लक्ष केंद्रित करा ,, जमतील असे एखादे ध्येय पुढे ठेवा आणि त्यासाठी नियोजन करा

त्रासदायक आठवण म्हणून शिल्लक राहिल. हळू हळू तीव्रता कमी होईल. यात अनैसर्गिक असे काहीही नाही मग अपराधगंड कशाला? हा विचार पण सोबत राहू द्यात