मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फत्तेशिकस्त (चित्रपट कथा आणि परीक्षण)

निमिष सोनार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
फत्तेशिकस्त मराठी चित्रपट: (कथा आणि परीक्षण) - निमिष सोनार, पुणे दिगपाल लांजेकरचा "फर्जंद" मी बघितला होता आणि आवडला होता. फत्तेशीकस्त येईल असे कळल्यावर तो बघायचे ठरवले होते आणि बघितला! मी चित्रपटाची कथा सांगत जातो आणि परीक्षण "चौकोनी कंसातील" वाक्यात अधून मधून येईलच!! कथा किचकट असल्याने थोडी विस्ताराने सांगतो म्हणजे हे संपूर्ण परीक्षण वाचल्यावर तुम्हाला चित्रपट समजायला सोपा जाईल. राजगडवर जिजामाता तर पन्हाळगडावर शिवाजीराजे आहेत. राजगडावर ताबा मिळवण्याचा शाहिस्तेखानचा प्रयत्न जिजाऊ राजगडावरून युद्ध करून अयशस्वी करतात. लाल किल्ला आणि पुणे सध्या शाहिस्तेखानच्या (अनुप सोनी, सावधान इंडिया वाला) ताब्यात आहे. नामदार खान (समीर धर्माधिकारी) हा शाहिस्तेखानचा मुख्य सरदार, पुण्यातील गावांत अनेक लोकांना जाळतो जे शिवाजी महाराजांची मदत करतात. संभाजीराजे अजून लहान आहेत. शिवाजीराजे कालांतराने पन्हाळाहून परत येतात. मग ते खलील साथीदारांची आठवण काढतात आणि बोलावून घेतात: जेधे आणि बांदल (अंगद हनुमंत) येसाजीराव कंक (अंकित मोहन फर्जंद चित्रपटातील कोंडाजी फर्जंद) आणि तानाजी मालुसरे (जे वाघांचे रक्षण सुद्धा करतात) नंतर शाहिस्तेखान या दोघांना कोंकण काबीज करायला पाठवतो: रायबागान (तृप्ती तोरडमल) आणि आस्ताद काळे (कर्टलाब खान उझबेग) ही खबर लाल महालातील महाराजांचे जासूस (गुप्तचर अथवा खबरी) आणि बहुरूपी बहिर्जी नाईक यांच्या साथीदार स्त्री पुरुषामुळे बहिर्जीला आणि नंतर शिवाजी महाराजांना कळते किसना (मुस्लिम वेशात) आणि फुलवंती (मृण्मयी देशपांडे) [जोगवा हे गाणं जे बहुरूपीच्या वेषात बहिर्जी म्हणतो ते खूप छान आहे. चित्रपटाचे एकूणच गीत संगीत आणि पार्श्वसंगीत छान आहे. डायलॉग्ज छान आहेत. अनेक डायलॉग्जला प्रेक्षक टाळ्या वाजवतात.] लोहगड आणि किल्ले विसापूरला रायबागान आणि कार्टलाब खान या दोघांना किल्ल्यावरील मावळे बघतात. जंगलात गेल्यावर इतरांना चकवा द्यायला बोरघाट ऐवजी कुरवांडा मार्गाने ते दोघे जातात. पण ही चाल शिवाजी महाराज आणि बहिर्जी ओळखतात. मग महाराजांसोबत तानाजी, येसाजी हे त्या दोघांना कुरवांडा आणि ताम्हिणी घाटातून वेढतात. [बहिर्जी नाईक चे काम हरीश दुधाडेने (मराठी सिरीयल मधील कलाकार) केले आहे, त्याने छान अभिनय केलाय आणि चिन्मय मांडलेकरने शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चांगल्या अभिनयासोबत साहस दृश्ये देखील छान केली आहेत. मृणाल कुलकर्णी शिवाय जिजामाता भूमिकेचा विचार होऊच शकत नाही आणि इतर सगळ्यांनीही छान कामे केलीत. फर्जंद मध्ये चिन्मयला कमी वाव होता पण हा चित्रपट बहुतेक स्किन टाईम शिवाजी महाराजांवर केंद्रित आहे] तिघेजण सैनिकांसह जंगलात दोघांवर (रायबगान, कर्तलाब खान) आणि त्यांच्या सैनिकांवर हल्ला करून दोघांना शरण यायला लावतात. त्यांना जिवंत सोडण्याच्या बदल्यात त्यांचेकडून खंडणी वसूल करून ते पैसे नामदार खानाने केलेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी महाराज वापरतात. रायबागान ही नंतर शाहिस्तेखानला दोन शब्द सुनावून माहूरला परत निघून जाते. शाहिस्तेखानचा मुलगा फतेह खानला काबूलला लढाईवर पाठवलेले असते आणि फतेहची पत्नी लाल महालात असते. तिची दासी फुलवंती असते. फुलवंती स्वयंपाक, शाहिस्तेच्या सुनेला मेहेंदी लावून देणे, दासी यासारखे कामं करते. [विशिष्ट प्रसंगानंतर एकदम सिन न बदलता कॅमेरा दूर दूर घेऊन जाणे ही स्टाईल दिगपालने दोन तीन वेळा वापरली आहे, तिचा प्रेक्षकांवर चांगला प्रभाव पडतो. नामदार खानला फुलवंतीचा अधून मधून संशय येतो. हे बघतांना चाणाक्ष प्रेक्षकांना आलिया भटचा राझी आठवल्याशिवाय राहत नाही] एका मराठ्याला/मावळ्याला मारून त्याची मुंडकी शिवाजींराजेंसाठी राजगडाच्या पाली दरवाज्याजवळ टाकून शाहिस्तेखानाची माणसे निघून जातात. नेहमी शिवाजी महाराज शत्रूला त्यांच्या विभागात बोलावून मारतात तर यावेळेस असे आव्हान दिल्याने शिवाजी महाराज लाल महालात शाहिस्तेच्या इलक्यात येतील तेव्हा त्यांना मारू असा त्याचा अंदाज असतो, तो बरोबर असतो पण शिवाजी महाराज सरळ युद्ध न पुकारता रात्री लपून हल्ला म्हणजे गनिमी कावा म्हणजे सर्जिकल स्ट्राईक करतात त्यावर आधारित हा चित्रपट आहे. [गनिमी कावा का? सरळ युद्ध का नाही? याचे उत्तर चित्रपटात मिळेल. यानंतरचा पुढचा भाग म्हणजे ही सर्जिकल स्ट्राईक कशी फत्ते केली जाते ते पडद्यावर बघण्यासारखे आहे] चिमणाजी देशपांडे हे लाल महाल नकाशा बनवणारे असतात पण त्या पूर्वीच्या नकाशानुसार तिथे आता लाल महालची रचना राहिलेली नसते असे फुलवंती सांगते. फतेह खान वापस येतो त्यावेळेस नाच गाणे होणार असते तेव्हा त्यात फुलवंती बहिर्जीला तिचा उस्ताद म्हणून वेष बदलवून कव्वाली गायला बोलावते मग लाल महालाची पाहणी करून पुढचा प्लॅन आखला जातो. [येथून मग विविध थरारक घटना, रात्रीचे महालातील युद्ध, आणि शाहिस्तेखानाची पाठलाग करून तीन बोटे कापली जाणे हा थरार पडद्यावर अनुभव घेण्यासारखा आहे! शाहिस्तेखानाची बोटे तोडल्यानंतर काय होते, शिवाजी महाराजांना लाल महाल आणि पार्यायाने पुण्याची सत्ता पुन्हा मिळते का? त्यासाठी चित्रपट बघायला हवा] मी या चित्रपटाला पाच पैकी चार स्टार देतो. हा चित्रपट जरूर बघा. फर्जंद प्रमाणे हा सुद्धा सुपरहिट होईल. - निमिष सोनार, पुणे

वाचने 18319 वाचनखूण प्रतिक्रिया 37

ट्रम्प 16/11/2019 - 09:31
आठा चा उठा ला मुख्यमंत्री करण्याच्या हट्टा मुळे सेना डूबायला आली तसेच चिन्मय मांडलेकरच्या महाराजांचा रोल करण्याच्या हट्टा मुळेच फ़र्ज़न्द प्रेक्षकांची पकड़ घेवू शकला नाही . फ़र्ज़न्द पाहताना चिन्मय ला महाराजांची भूमिका करताना काही तरि चुकल्याची खंत वाटत होती आता पुन्हा तोच प्रकार आता फत्तेशिकस्त मध्ये , आरे बाप रे कधी सुधरायची हि लोक !!

महेश हतोळकर 16/11/2019 - 15:08
अतीबकवास पिक्चर. फालतू मेलोड्रामा करण्यात इतिहास, भूगोल, समाज जीवन सर्वांची यथेच्छ मोडतोड केली आहे. पन्हाळगडाच्या उगवतीला सिंहगड!!! आधुनिक वाहतुकीची कोणतीही साधनं नसताना माणसं पन्हाळगडापासून राजधानीपर्यंत (रायगड की राजगड???) २४ तासात जाऊन येतात??? स्वतःला तान्हाजीरावांचे शिष्य म्हणवणारे कोंडाजीराव महाराजांच्या बरोबर स्वराज्याची शपथ घेणाऱ्या सहकाऱ्यांंना (वडीलधाऱ्या???) आरेतुरेच्या शब्दात जातीभेद न पाळण्याची जाणीव करून देतात!? एक शोधा दहा सापडतील.

महेश हतोळकर 16/11/2019 - 15:10
अतीबकवास पिक्चर. फालतू मेलोड्रामा करण्यात इतिहास, भूगोल, समाज जीवन सर्वांची यथेच्छ मोडतोड केली आहे. पन्हाळगडाच्या उगवतीला सिंहगड!!! आधुनिक वाहतुकीची कोणतीही साधनं नसताना माणसं पन्हाळगडापासून राजधानीपर्यंत (रायगड की राजगड???) २४ तासात जाऊन येतात??? स्वतःला तान्हाजीरावांचे शिष्य म्हणवणारे कोंडाजीराव महाराजांच्या बरोबर स्वराज्याची शपथ घेणाऱ्या सहकाऱ्यांंना (वडीलधाऱ्या???) आरेतुरेच्या शब्दात जातीभेद न पाळण्याची जाणीव करून देतात!? एक शोधा दहा सापडतील.

In reply to by महेश हतोळकर

मराठी कथालेखक 18/11/2019 - 16:25
निमिष सोनार यांचे समीक्षण वाचून तसेच व्यावसायिक यशाचे आकडे बघून फर्जंदबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. पण पार डोक्यात गेला तो चित्रपट. फारच उथळ होता. खास करुन ते बहिर्जी नाईकांचे प्रसंग.. इतर मावळे /सरदारांनी त्यांना न ओळखणे आणि शिवाजी महाराजांनी मात्र त्यांना ओळखणे याचे एकसारखेच प्रसंग (फक्त बहिर्जिंची वेशभूषा प्रत्येकवेळी निराळी) तीन-चार वेळेस टाकलेत.. एकदा टाकला असता प्रसंग तरी पोहोचणारच होता ना तो प्रेक्षकांपर्यंत.

चौथा कोनाडा 16/11/2019 - 17:37
भारी लिहिलंय, उत्सुकता वाढलीय ! बघायलाच लागेल आता. हिरकणी चांगला चालतोय थेटरात. हा पण भारी चालेल ! आता बरेच बॉलीवुडी सिनेमे पोषाखी अन व्हीएक्सएफ वाले होत चालालेत. मराठी सिनेमातले हे वळण छान वाटतेय.

दुर्गविहारी 16/11/2019 - 18:31
चित्रपट बघायची उत्सुकता आहे, त्यामुळे आपण लिहीलेल्या परिक्षणाबद्दल धन्यवाद. हल्ली एतिहासिक विषयावर चित्रपट निघत आहेत हि स्वागतार्ह बाब. पण कोणताही एतिहासिक चित्रपट म्हणजे शिवधनुष्य उचलणे असते. एकतर वाचलेल्या इतिहासामुळे लोकांच्या मनात या महापुरुषांच्या प्रतिमा तयार झालेल्या असतात, त्याला धक्का लागता कामा नये. शिवाय एखादा प्रसंग अधिकउणा झाल्यास, भावनेला धक्का लागून लोकक्षोभ होण्याचा धोका. अर्थात "मी शिवाजी राजे भोसले बोलतोय" या सुपरहिट चित्रपटानंतर असे एतिहासिक चित्रपट बनवण्याचा ट्रेण्ड आलेला दिसतोय. मात्र हिंदी असो वा मराठी, आपल्याला एतिहासीक चित्रपट बनवणे झेपणारे नाही, हे खंतपुर्वक म्हणावेसे वाटते. हिंदीमधे निघालेल्या बाजीराव मस्तानी किंवा पद्मावत दोन्ही चित्रपट सत्याशी विसंगत होते. सध्या पानिपतचे टिझर येत आहेत. त्यावरुन तरी निराशा होते आहे. मंद चेहर्‍याचा अर्जुन कपुर, ताडमाड आणि मॉडर्न गर्ल दिसणारी किर्ती सनोन आणि झोपळू डोळ्याचा संजय दत्त. कठीण आहे. अर्थात चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघणे ईतकेच सध्या करु शकतो. अजय देवगणच्या तानाजीकडून अपेक्षा आहेत, पण सैफ अली खानचा लुक कोठेच राजपुत उदयभान सारखा वाट्त नाही. असो. मराठीमधे हिरकणी पाहिला नाही, त्यामुळे बोलु शकत नाही, पण "फर्जंद" पाहिल्यानंतर कपाळाला हात लावला. सत्याचा किती विपर्यास. उगाच प्रेक्षकाना हवे म्हणुन कोंडाजी दगडावरुन उड्या मारत पन्हाळ्याला जातो. वास्तविक पुर्ण सपाटीवर असलेल्या पन्हाळ्यावर जाण्यासाठी कशासाठी कडे चढावे लागतात. शिवाय शेवटच्या लढाईला तर काही अर्थच नव्हता. हल्ली बटबटीत दक्षिण भारतीय चित्रपटावरुन मारामारी उचलण्याची फॅशन आहे. निदान एतिहासिक चित्रपटात तरी हे करु नये. हे सगळे कमी म्हणून कि काय, सगळ्यात शेवटी शिवाजी महाराज येउन लढताना दाखवलेत. मुळ ईतिहासात असे काही नाही, मग शिवाजी महाराज आहेत, तर लढले का नाहीत ? हे प्रेक्षकानी विचारू नये , म्हणून हा उपद्वाप. यात मुळ ईतिहासाच मोडतोड होते, व नवीन ईतिहास लोकाना खरा वाटू लागतो. आधीच मोबाइलच्या आहारी गेलेली नवीन पिढी वाचत नाही असे आपण म्हणायचे आणि चित्रपटासारख्या महत्वाच्या माध्यमातून चुकीचा ईतिहास पसरवायचा ? बाजीराव बघीतल्यानंतर "तो बाजीराव औरत के पिछे भागता था" हि अमराठी प्रेक्षकांची प्रतिक्रिया यायला जबाबदार कोण ? रणबीर कपुरची भुमिका मोठी करुन पद्मावतची वाट कोणी लावली? खलनायक कसा काय मोठा झाला ? असो. रहवल नाही म्हणून इतके सविस्तर लिहीले. आता आपल्या परिक्षणाविषयी. सोनारसाहेब, आपण जुनेजाणते मिपाकर आहात. आपण धागा लिहीताना थोडी काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे. रायबागान - रायबाघन कार्टलाब खान- कारतलबखान कुरवांडा -कुरवंडे घाट हे बदल अपेक्षित आहेत. शिवाय मुळ धाग्यात वापरलेले खलील, इलक्यात, वापस ( ?), पार्यायाने हे शब्द वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे. चित्रपट मी पाहिलेला नाही , पण तुम्ही लिहीलेले आहे, त्यावरुन चित्रपटात नक्कीच काही चुका दिसत आहेत.
दोघांना कुरवांडा आणि ताम्हिणी घाटातून वेढतात.
उंबरखिंडीच्या युध्दात ताम्हीणी घाटाचा काय संबंध ?
एका मराठ्याला/मावळ्याला मारून त्याची मुंडकी शिवाजींराजेंसाठी राजगडाच्या पाली दरवाज्याजवळ टाकून शाहिस्तेखानाची माणसे निघून जातात.
हा ईतिहास यांना कोठे सापडला ? असो. बाकी चिन्मय मांडलेकर कोणत्याच अँगलने शिवाजी महाराज दिसत नाहीत. सध्या तरी अमोल कोल्हेना पर्याय नाही. अर्थात हे वैयक्तिक मत.

In reply to by दुर्गविहारी

ट्रम्प 16/11/2019 - 20:50
तुम्ही अगदी योग्य प्रतिसाद दिला आहे !!! फ़र्ज़न्द पाहिल्या नंतर डायरेक्टर लांजेकरानां फेसबुक वर चिन्मय बद्दल याच भावना पोहचवल्या होत्या , पण लांजेकरानी मला ब्लॉक केले . शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय ला प्रेक्षकांवर थोपायचेच असा पण केलेला दिसतोय . पण बाजीराव मस्तानी आणि पद्मावत मध्ये रणबीर अक्षरशः जगला होता , आता थोडासा फेरफार होणार याला काही पर्याय नाही कारण इतिहास अभ्यासका मध्ये सुद्धा मतभिन्नता आढळते . ऐतिहासिक सिनेमा बद्दल अपेक्षा इतकीच असते की ऐतिहासिक व्यक्तीच्या पराक्रमला तडा जावू नये असे कलाकार निवडावेत . चिन्मय मंडलेकरांची ना संवादफेक योग्य , ना भारदास्त शरीरयष्टि . कुठल्या बेसवर निवडतात कोणास ठावुक !!!

In reply to by दुर्गविहारी

एका मराठ्याला/मावळ्याला मारून त्याची मुंडकी शिवाजींराजेंसाठी राजगडाच्या पाली दरवाज्याजवळ टाकून शाहिस्तेखानाची माणसे निघून जातात. हा ईतिहास यांना कोठे सापडला ?
दुर्गविहारी जी, प्रॉपोगेंडा हाच मुळ उद्देशाने, जर चित्रपट निर्मिती झाली असेल तर, गेल्या ४-५ वर्ष्या पूर्वीची घटना (आठवा भारतीय सैनिकांचे शीर पाकिस्तानी सैन्या तील लोकांनी कापले होते , हेमराज असें काही नाव होते बहुदा ) ही ३००-४०० वर्ष्या पूर्वीची म्हणून सहजच घुसडून देता येते हो. कोणाला आहे इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेशी बांधिलकी ? मोटाभाईंच्या नजरेत भरावं म्हणून हा खटाटोप....

In reply to by दुर्गविहारी

किल्लेदार 18/11/2019 - 18:51
चित्रपट मीही बघितला नाही पण माझ्या काही मित्रांनी दिलेल्या अभिप्रायानंतर बघण्याची तीव्र इच्छा होतेय. उदा. १. शोले स्टाईलमध्ये पायांवरून फोकस करून (गब्बरसिंग- कितने आदमी थे) मग पात्राची ओळख करून देणे. २. लोहगड विसापूरहून उंबरखिंड दिसणे. ३. तानाजीने बाकी काही काम नसल्यामुळे उपटसुम्भासारखे उडी मारून प्रकटणे आणि जंगलातील बिबट्यांना मुघलांपासून वाचवणे. ४. येसाजी कंकाने शक्तिप्रदर्शनासाठी तोफ उचलणे ..... वगैरे..... वगैरे.... वगैरे.... बाकी चिन्मयने शिवाजीमहाराजांची भूमिका का करू नये यावर एक स्वतंत्र लेख निपटून काढता येईल.निदान चेहऱ्यावर चंद्रकांत मांढरेंचा मुखवटा रबरबँड ने लावला असता आणि व्हॉइस आर्टिस्ट ची मदत घेऊन महाराजांचा आवाज प्लेबॅकला घेतला असता तर कदाचित तो थोडा सुसह्य झाला असता. चित्रपटात शेवटी ....... शाहिस्तेखानाची बोटे तोडल्यानंतर काय होते, शिवाजी महाराजांना लाल महाल आणि पार्यायाने पुण्याची सत्ता पुन्हा मिळते का? असे प्रश्न ज्या मराठी माणसाला पडत असतील त्याची दहाही बोटे लगेच तोडली पाहिजेत (माझे वैयक्तिक मत ..हा.....). त्यामुळे शेवटी काय होते यापेक्षा कसे मांडल्या गेले आहे याचीच उत्सुकता होती पण मिळालेल्या अभिप्रायांवरून फार अपेक्षा नाही.

In reply to by किल्लेदार

हस्तर 21/11/2019 - 17:29
३. तानाजीने बाकी काही काम नसल्यामुळे उपटसुम्भासारखे उडी मारून प्रकटणे आणि जंगलातील बिबट्यांना मुघलांपासून वाचवणे. लगान

In reply to by दुर्गविहारी

"मी शिवाजी राजे भोसले बोलतोय" या सुपरहिट चित्रपटानंतर असे एतिहासिक चित्रपट बनवण्याचा ट्रेण्ड आलेला दिसतोय. चुक

श्रिपाद पणशिकर 16/11/2019 - 21:26
""""शाहिस्तेखानाची बोटे तोडल्यानंतर काय होते, शिवाजी महाराजांना लाल महाल आणि पार्यायाने पुण्याची सत्ता पुन्हा मिळते का? त्यासाठी चित्रपट बघायला हवा""""" अल्ले व्वा अल्ले व्वा ... णिसो ;)

In reply to by निमिष सोनार

श्रिपाद पणशिकर 16/11/2019 - 23:44
मी फक्त चित्रपटाबद्दल लिहिले आहे, इतिहासाबद्दल नाही निसो सर म्हंजि इतिहासात जे घडलय त्यापरीस येगळ काहि दाखिवलय व्हय.... न्हाई तुमि ते उत्कंठा वाढिवण्या साठि ""त्यासाठी चित्रपट बघायला हवा"" आग्रह केला म्हनुनशान इचारतुया. टुकार मराठी शिनुमे अन तिन पैशाच्या मराठी मालिका आपुन बघत नाय... फकस्त वेबसिरीज बघतो आनी णिसो कथा वाचतो. निसो साहेब एक मस्त भयकथा होउन जाउ द्या आता.

In reply to by निमिष सोनार

दुर्गविहारी 18/11/2019 - 11:34
आपल्या परिक्षणाविषयीच मी लिहीले आहे. परिक्षण लिहीताना किमान व्याकरणाच्या चुका नाहीत, पात्रांची नावे अचुक असावीत अशी माफक अपेक्षा आहे. बाकी त्या व्यक्तिरेखा किंवा ईतिहास हि वैयक्तिक मते आहेत.
उत्तम परीक्षण.. मुळात असा चित्रपट हा माहितीपट नसतो, त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटात रंजकता वाढवण्यासाठी काही बाबतीत थोडे कथा स्वातंत्र्य घेतले तर त्यात गैर वाटण्याचे कारण नाही. आजच्या पिढीला आपल्या इतिहासाचा अभिमान वाटेल आणि त्याविषयी खोलात जाऊन अजून जाणून घेण्याची उत्सुकता वाटेल एवढे जरी साध्य झाले तरी चित्रपट यशस्वी झाला असे मी म्हणेन. मी स्वतः हा चित्रपट पाहिला आहे आणि मला तरी तो खूप आवडला आहे. चित्रपट हा रंजक होण्यासाठी , व्यावसायिक रित्या यशस्वी होण्यासाठी काही बाबींशी तडजोड करावी लागते. कोणता कलाकार घ्यायचा, कोणता भाग कशा पद्धतीने मांडायचा ही सर्वस्वी दिग्दर्शकाची अभिव्यक्ती आहे.त्या संबंधात असहमत होण्याचा पर्याय आपल्याकडे आहेच, परंतु चित्रपट न पाहताच त्याविषयी समीक्षात्मक टिप्पणी करणे हे योग्य नाही. सरतेशेवटी चित्रपट काय संदेश पोहोचवतो आणि किती प्रभावीपणे पोहोचवतो हे महत्त्वाचे...कोणी काय कसे काम केले, किती चुका झाल्या या बाबी माझ्यामते दुय्यम आहेत.

In reply to by कळस

दुर्गविहारी 18/11/2019 - 11:41
चित्रपट हा नक्कीच माहितीपट नसतो. पण एतिहासिक चित्रपट करताना किमान उप्लब्ध इतिहासाशी फारकत होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येकजण खोलवर जाउन ईतिहासाचा किंवा घडामोडीचा अभ्यास करणार नाही. सहाजिकच मालिका किंवा चित्रपटात दखवले तेच सत्य असा पुढचा पिढीचा गैरसमज होण्याचा धोका आहे. काशीबाइ आणि मस्तानी यांनी एकत्र न्यृत्य केले होते असे लोक म्हणायला लागले तर ते योग्य ठरेल का ? दिग्दर्शकाची अभिव्यक्तीस्वातंत्र्य पुर्ण मान्य करुन सुध्दा त्यातून आपल्या पुर्वजांविषयी भलतेच काही समाजात पसरणार नाही याची काळजी घेणे, हे कर्तव्य नाही का ?

In reply to by दुर्गविहारी

कळस 18/11/2019 - 15:48
चित्रपटात दाखवलेले सगळे खरे असते आणि तोच इतिहास आहे असे नवीन पिढीला वाटेल, असे समजणे हा भ्रम आहे. असे कधी होत नसते. चित्रपटात इतर अनेक खोट्या गोष्टी (उदा. नायकाने गाणी म्हणणे) वर्षानुवर्षे चालत आल्या आहेत, त्या आपण स्वीकारल्या आहेत.त्या खऱ्या नाहीत हे सगळयांना ठाऊक आहे.मृत्युंजय, छावा ई. कादंबऱ्या लिहितांना देखील बऱ्यापैकी कथा स्वातंत्र्य घेतलेले आहे. पण त्यामुळेच तर इतिहास रंजकपणे लोकांच्या समोर आला ही वस्तुस्थिती आहे. माझ्या मते उगीचच काही गोष्टींवरून नाराजीचा सुर आळवण्यापेक्षा एकंदरीत या चित्रपटाचा हेतू लक्षात घेऊन आपल्याला न आवडलेल्या गोष्टी प्रगल्भतेने नजरेआड केल्या पाहिजेत आणि अशा चित्रपटांना प्रोत्साहन दिले पाहिजे.या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अनेक कलाकार हे नवीन पिढीचेच आहेत..शिवाजी महाराजांचा इतिहास नव्याने सर्वदूर पोहोचवण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या परीने प्रयत्न करीत आहेत.त्यांना शाबासकी नाही देता आली तरी कृपया नाउमेद करू नका हीच विनंती..

In reply to by कळस

दुर्गविहारी 18/11/2019 - 18:46
माझ्या मते उगीचच काही गोष्टींवरून नाराजीचा सुर आळवण्यापेक्षा एकंदरीत या चित्रपटाचा हेतू लक्षात घेऊन आपल्याला न आवडलेल्या गोष्टी प्रगल्भतेने नजरेआड केल्या पाहिजेत आणि अशा चित्रपटांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
प्रोत्साहन द्यायला कोणाचीच ना नाही. किंबहुणा असे चित्रपट लोकांनी चित्रपटगृहात बघावेत यासाठी मी आग्रही असतो. पण ईतिहास अस्सल पुराव्यावर चालतो, त्याशी फारकत घेउन काही दाखविल्यास हळूहळू तेच खरं असा समज पसरत जातो. अगदी श्रीमान योगी, छावा या कांदबर्‍यामुळे हेच झाले आहे. कल्याणच्या सुभेदाराची सुन किंवा रामदास स्वामीना राज्य बहाल करणे असे पुर्णपणे काल्पनिक प्रसंग आज लोकांना खरे वाटतात. वर त्याचा आधार म्हणून वरील कांदबर्‍यांचा संदर्भ दिला जातो. वास्तविक श्रीमान योगीच्या प्रस्ताविकमध्ये रणजीत देसाईनी स्पष्टपणे लिहीले आहे , कि मी काल्पनिक गोष्टी कांदबरीत घेतल्या आहेत, तरी नेमके काय काल्पनिक आहे हे स्पष्ट नसल्याने वाचक असे प्रसंग खरे मानून चालतात. याप्रकारात संभाजी महाराजांचे नुकसान सर्वाधीक झाले आहे. व्यसनाधीनतेपासून थोरातांची कमळापर्यंत असंख्य काल्पनिक गोष्टी त्यांच्या नावावर खपवल्या गेल्या, ज्याचे संपुर्ण निराकरण व्हायला फार वेळ लागेल, कदाचित सध्या असलेली मालिका हि उणीव भरुन काढेल. तेव्हा चित्रपट बनवण्यावर आक्षेप नाही, तर ते सत्याला धरुन असावेत याबद्धल आग्रह आहे. बाहुबलीसारखा पुर्ण काल्पनिक चित्रपट बनवा, काही म्हणने नाही, पण नाव शिवकालाचे घ्यायचे आणि वाट्टेल ते दाखवायचे, तर चालणार नाही.
शिवाजी महाराजांचा इतिहास नव्याने सर्वदूर पोहोचवण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या परीने प्रयत्न करीत आहेत.त्यांना शाबासकी नाही देता आली तरी कृपया नाउमेद करू नका हीच विनंती.
हे महान कार्य काही आत्ताच होत नाही आहे. अगदी भालजी पेंढारकरांपासून ते रमेश देवांनी काढलेल्या सर्जापर्यंत एतिहासीक चित्रपट निघाले आहेत, पण मुळ ईतिहासाशी छेडछाड दिसली तर टिका होणार. फक्त स्वताचा गल्ला भरायसाठी तुम्ही काहीही दाखवणार असाल तर आक्षेप आल्यानंतर पळ काढू नका.

In reply to by दुर्गविहारी

बबन ताम्बे 19/11/2019 - 12:35
काल्पनिक संवाद ठिक, पण काल्पनिक प्रसंग डेंजर ! चित्रपटात, मालिकेत सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली काही पण घुसडतात. नुकत्याच आलेल्या आनंदी गोपाळ किंवा प्रकाश बाबा आमटे या बायोपिकमध्ये पण अनावश्यक आणि काल्पनिक प्रसंग घुसडलेत. ऐतिहासिक कादम्बरीत पण तेच. श्रीमान योगीत छत्रपती खूपच भावनाशिल दाखवलेत. किंवा काही ऐतिहासिक कादंबरीतील मुख्य पात्रे लगेच क्रोधीत होऊन कठोर शिक्षा फरमावताना दिसतात. एव्ह्ढे शिघ्रकोपी खरेच असतील काय?
अमोल कोल्हे ? अहो खुद्द राजांनंतर प्रतिशिवाजी होण्याची ताकद कोणाची असेल तर फक्त सुर्यकांत / चंद्रकांत मांढरे बंधुंची आणि प्रति तुकाराम केवळ विष्णुपंत पागनीस. असो. हे ही आमचे वैयक्तिक मत !!

प्रियाभि.. 18/11/2019 - 14:42
चिन्मय मांडलेकर ला लादण्याचा प्रयत्न होतोय हे खरे आहे. शरद केळकर चे पोस्टर पाहिले. एका बाजूने दिसणारी प्रतिमा आवडली. आणि आवाजही भारदस्त आहेच. त्यामुळे भूमिकेला न्याय मिळाला असेल असे वाटते.

ट्रम्प 18/11/2019 - 16:42
बॉलीवुड चा येणारा चित्रपट तानाजी मध्ये शरद केळकर ने शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे आणि चिन्मय पेक्षा लाख पटिने शरद योग्य वाटतो . साउथ आणि बॉलीवुड वाले एक से एक भव्यदिव्य सिनेमे बनवत असताना लांजेकर मात्र टी वी सीरियल च्या दर्जाचे बनवत आहेत . खर्चाचे लिमिट असेल तर नका महान व्यक्तीच्या जीवनावर सिनेमे बनवू , tv मालिका बनवा .

उपेक्षित 18/11/2019 - 17:56
फर्जंद अतिशय टुकार चित्रपट होता, केवळ ६ प्याक दाखवण्यासाठी एका अमराठी ठोकळ्या नटाला कोंडाजी यांच्या भूमिकेसाठी घेणे म्हणजे मूर्खपणाचा कळस होता. तसेच जवळपास सगळीच दृश्ये निव्वळ बालिश आणि डायलोगबाजी भरपूर. बरे झाले हा चित्रपटगृहात पहिला नाही ते असो.

In reply to by उपेक्षित

दुर्गविहारी 18/11/2019 - 18:50
शतशः सहमत. या घटनेवर शिवकालीन कवी जयराम पिंड्ये यांनी संस्कॄतमधे "पर्णालपर्वतग्रहणाख्यान" लिहीले आहे. ईतका अस्सल पुरावा उपलब्ध असताना आणि मुख्य म्हणजे मुळ कथेत पुरेसा थरार असताना, साउथ ईंडीयन स्टाईल हाणामारी काय, विनाकारण केलेली डायलॉगबाजी आणि अजिबात न शोभणारी पात्रे घेउन काय साधले आहे, कोणास ठाउक ?

जॉनविक्क 18/11/2019 - 22:35
जोगवा हे गाणं जे बहुरूपीच्या वेषात बहिर्जी म्हणतो ते खूप छान आहे.
छान तर वाटणारच, कारण चाल हा नंदाचा कान्हा घालितो कसा धिंगाणा ची जशीच्या तशी ढापली आहे. मला चित्रपट आवडला.

बबन ताम्बे 24/11/2019 - 19:44
मला तरी आवडला. चिन्मय मांडलेकरनेही शूर आणि तडफदार महाराज चांगले उभे केलेत. शाहिस्तेखानाच्या स्वारीवर निघण्यापूर्वीचे मावळ्यांसमोर केलेले तडफदार भाषण जबरदस्त! बाकी सर्व कलाकारांनी पण जीव ओतून काम केलंय. शेवटची लाल महालातील लढाई खिळवून ठेवते.

माझीही शॅम्पेन 25/11/2019 - 12:38
आम्ही फत्ते शिकस्त पहिला आणि आवडला सुद्धा , उगाच किस काढण्यात काही अर्थ नाही. फरजद अगदीच टुकार आणि भंगार होता त्यापुढे हा खूपच चांगला आहे. अर्थात काही (किंवा बऱ्याच) उणीवा असून सुद्धा आवडला चित्रपट !!!