Skip to main content

तुफान आलंया

तुफान आलंया

Published on शनीवार, 27/04/2019 प्रकाशित मुखपृष्ठ
नुकताच हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात झाली होती . मकरसंक्रांतीनंतर तिळातिळाने दिवस वाढत चालला होता . सकाळी प्रसन्न वाटणारे वातावरण ८ नंतर उष्ण जाणवत होते . हळूहळू उन्हाने डोकं वर काढायला सुरुवात केली होती . माणसे घराबाहेर पडताना छत्री टोप्या स्वतःजवळ बाळगत होते जो तो उन्हापासून बचावासून सगळे उपाय करत होता . दुपारी तर घराबाहेर पडणे अवघड झाले होते महत्वाचे काम असेल तरच ती व्यक्ती घराबाहेर पडत असे . बाहेर लिंबू सरबत , पन्हे , कोकम सरबत , उसाचा रस यांचे स्टॉल जागोजागी लागले होते . शहरात हि परिस्थिती होती पण गावात ? गावात मात्र याच्या विपरीत परिस्थिती आहे . जसजशी उन्हे वाढत होती तसतशी गावातील नाले , तलाव, विहिरी, कूपनलिका, नद्या सर्व आटत चालले होते . डोक्यावर खूप उन्ह असताना पण त्यांना पाण्यासाठी कोस कोस दूर भटकावं लागत होत . गायी गुरे ढोरे निपचित पडून होती . ना खायला अन्न ना प्यायला पाणी दिवसातला बराचसा वेळ पाणी शोधण्यात चालला होता सर्वांचा . हौसा आणि रामराव असचं एक सधन जोडपं . बरीच शेतीवाडी , दूधदुभतं त्यांच्या घरी आहे पण मागच्या काही वर्षांच्या दुष्काळामुळे ना काही नीट पिकलं ना मालाला हमी भाव मिळाला . घरात सगळं असून पण काहीच नसल्यासारखी अवस्था झाली होती त्यांची . पडलेल्या दुष्काळामुळे आणि वाढत्या कर्जामुळे हि दोघेही काळजीत होती त्यातच त्यांची मुलगी या वर्षी दहावीला होती तर मुलगा आठवीला दोघेही खूप हुशार , समजूतदार. गावाची , आपल्या घराची परिस्थिती ओळखून होते . दिवसातला बराच वेळ पाणी आणण्यात जात होता त्यांचा तरी नीट पाणी मिळत नव्हते . डोक्यावर रखरखीत उन्ह आणि पायपीट करत आणलेलं थोडसं पाणी . या सगळ्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांवर मरणाची वेळ आली होती . चांदण्या रात्री हौसा आणि रामराव अंगणात गप्पा मारत होते . तर मुले शेजारी सरपंचाच्या घरी TV बघण्यासाठी गेली होती . त्या गावात आधीच पाण्याचा प्रॉब्लेम त्यात लाईटचा पण प्रॉब्लेम . शहरात बरं असत ना २४ तास लाईट , मुबलक प्रमाणात पाणी आणि आपण कसेही त्याचा वापर करतो . “ मालक हे काय होऊन बसलंय हो काय कळना बी काय करावं ते ४ वरीस झालं पण पाण्याचा एक थेंब बी न्हाय इतक्या दिस कसं तरी भागलं पण आता न्हाय , कुठं गेला हा पाऊस काय माहित “ “ अगं ये हौसा असं का बोलती तू होईल सगळं ठीक तू न्ह्ग काळजी करू “ “ आव पर कधी माझ्या समोर आपली पोर भुकेने व्याकुळ होतात पर म्या काय बी करु शकत न्हाय अन न्हाय सहन होत आता हे कर्जाचे डोंगर , हतबल झाले हाय म्या या निसर्गासमोर “ “ बस बस हौसा नगं रडूस आधीच आभाळातून काय पाणी येत न्हाय निदान तुझ्या डोळ्यातलं तरी पाणी वाया नगं घालवू काही तरी उपाय नक्की असलं परत एकदा जोमानं उभं राहू आपण “ “ हरले म्या आता “ “ हे बघ काही हि झालं तरी हार मानून न्हाय चालायचं “ “ तुमचं बरोबर हाय आपण परत खूप मेहनत घेऊ अन परत आपलं शेत फुलवुया “ “ हम्म “ त्या दोघांचे बोलणे त्यांची मुले ऐकत होती . “ आय बा तुम्ही नका काळजी करू आताच म्या एक कार्यक्रम बघितला हाय तो बघितल्यावर असं वाटालय कि आपलं गाव बी पाणीदार व्हईल “ “ असा कोणता कार्यक्रम बघितला हाय तुम्ही दोघांनी जरा आम्हाला बी सांगा “ “ अगं आय आम्ही अमीर खान सरांचा तुफान आलयां हा कार्यक्रम बघितला त्यात ना ते आपल्याला आधी शिकिवितात कि काय करायचं कस करायचा कसे खड्डे खोदायची नेमकं काम कस करायचं ते समदं ते आपल्याला शिकिवितात . हा सगळा कार्यक्रम आपल्या श्रमदानातून होणार हाय . अन याला बक्षीस बी हाय . आतापर्यंत बऱ्याच गावांनी यात सहभाग घेऊन बक्षीस बी जिकलं हाय अन त्याबरोबर आपलं गाव पाणीदार बी बनवलं हाय . आपलं सरपंच बी बोललं हाय कि आपण या स्पर्धेत भाग घेऊ म्हणून “ “ हे तर लय बेस झालं कि म्हंजी आता आपलं गाव बी पाणीदार होणार तर “ “ व्हय बा अन उद्या आपल्याला चावडीवर बी बोलावलं हाय त्याबद्दल बोलायला “ सर्व गावकरी चावडीवर गेल्यावर गावाच्या सरपंचानी बोलायला सुरुवात केली . “ तर सर्व गावकरी मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे कि आपला गाव दुष्काळात आहे ते म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे आपला गाव पाणीदार करण्यासाठी आणि मला अशा आहे कि तुम्ही सर्वजण मला यात साथ द्याल याची “ “ अवं सरपंच आपला गाव सुधारावा यासाठी आम्ही काय बी करायला तयार हाय तुम्ही फकस्त बोला काय करायचं हाय ते व्हय कि नाय गावकरी मंडळी “ “ ते मला माहित आहे रामराव . आपल्याला यावर्षी आपल्या विहिरीतलं , तलावातील, नद्यामधला सर्व गाळ काढायचा आहे आणि हे सगळं श्रमदानातून करणार आहे आपण तसेच या वर्षी आपण पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग पण घेणार आहे . “ “ सरपंच हि स्पर्धा कसली हाय “ “ सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ही मुळात गावागावांमध्ये होणारी एक निराळी स्पर्धा आहे. स्पर्धेच्या ठरावीक कालावधीत कोणते गाव पाणलोट व्यवस्थापन आणि जलसंधारणाचे सर्वाधिक काम करू शकते, हे पाहणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे . पानी फाउंडेशन देत असलेल्या प्रशिक्षणाद्वारे मिळालेले ज्ञान वापरून स्वत:चे गाव पाणीदार करण्याची संधी यानिमित्ताने गावकऱ्यांना मिळते . ४५ दिवसात आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे . यात आपाल्याला मशीन चा पुरवठा पण होणार आहे आणि जर जिंकलो तर बक्षीस पण आहे आणि नाही जिंकलो तरी पाणी तर मिळणारच आहे ना तर मग काय मंडळी तयार आहात ना तुम्ही एक तुफान घडवायला “ “ व्हय सरपंच आम्ही सर्व तयार हाय यासाठी तुम्ही फकस्त बोला कधी काम करायचं आहे ते “ या गावाने तर सहभाग घेतला या स्पर्धेत आपला गाव पाणीदार करण्यासाठी चला एक नवीन प्रयन्त करून पाहूया . पाणी वाचवू आणि पाणी जिरवू सुद्धा . आपली निसर्गाबद्दल असणारी जबाबदारी फेडूया . वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवून श्रमदान करूया . आहात ना तुम्ही सर्व सोबत . चला तर मग एक तुफान घडवून आणूया . www.jalmitra.org वर १ मे रोजी होणाऱ्या महाश्रमदानासाठी आजच नाव नोंदणी करूया . ***** समाप्त ***** प्राजक्ता निकुरे
लेखनप्रकार

याद्या 3984
प्रतिक्रिया 8

वाह, मस्त ! लेखनशैली आवडली. गोष्टीतून प्रबोधन ! पाणी हा तर ग्रामीण भागात कळीचा विषय आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि दुष्काळाच्या परिस्थितीत जलमित्र सारख्या संघटना ग्रामस्थाना एकत्र करून फार मोठे काम उभा करत आहेत. बरेच कलाकार त्यांचे ग्लॅमर विसरून या चळवळीला हातभार लावत आहेत, हे खूपच कौतुकास्पद आहे. हौसा, रामराव आणि ग्रामस्थ वॉटर कप स्पर्धा मध्ये भाग घेताहेत हे भारीय ! पुढील भागाच्या प्रतिक्षेत, आता बारीक सारीक तपशील वाचायला मजा येईल.

तुम्ही दिलेल्या प्रदिसादाबद्दल आभारी आहे आणि हो मी जाणार आहे लेख येण्यास जरा उशीर झाला पण काही हरकत नाही पुढच्या वर्षी जोमात सहभाग घेऊ . या उपक्रमात जसे जमेल तसा सर्वानी भाग घ्यावा हि विनंती .

जलमित्र आणि नाम फाउंडेशन हे आप आपल्या परिने दुष्काळग्रस्त गावे हिरविगार करण्याचे कौतुकास्पद काम करत आहेत आणि ते निष्फळ ठरलेल्या सरकार ची मदत न घेता . जलमित्र , नाम फाउंडेशन आणि तुम्हाला साक्षात दंडवत /\

१ मे रोजी हा उपक्रम पुण्याजवळ बेलसर या गावात राबवण्यात आला. इतर बऱ्याच गावातही त्या दिवशी श्रमदान झाले. मी आणि माझा एक कंपनीतील सहकारी बेलसरला गेलो होतो. सकाळी ६ वाजल्यापासून लोक जमायला लागले होते. बेलसरच्या श्रमदान समितीने चोख व्यवस्था ठेवली होती. आलेल्या प्रत्येक व्यक्तीची नोंदणी करणे बंधनकारक होते. नोंदणीनंतर ८ लोकांचा एक असे गट करण्यात आले. साधारण १५०० लोक जमले होते. प्रत्येक गटाला २ टिकाव, २ फावडी आणि माती उचलायला २ प्लास्टिकच्या मोठ्या टोपल्या देण्यात आल्या. प्रत्येक गटाने श्रमदान करायची जागा आधीच निर्धारित केलली होती. त्यानुसार प्रत्येक गटाने आपल्या जागेवर जाऊन १० मीटर लांब, २ फूट रुंद आणि साधारण दीड फूट खोल असा खड्डा घ्यायचा होता. गावातल्या माळरानावर श्रमदान करायचे होते. बहुतेक लोक सहकुटुंब सहपरिवार आले होते. चार वर्षांच्या मुलांपासून ते ७५ वर्षांचे वृद्ध सहभागी झाले होते. बऱ्याच लोकांनी पूर्वी कोणत्याही प्रकारची शेतातील कामे केलेली नव्हती. बहुतेक कोणालाच कष्टांची सवय नव्हती. सुरवातीला सगळ्यांनी खूप उत्साहात कामे सुरू केली. दिवस जसा वर येऊ लागला तसे गावकऱ्यांनी चहा वाटप सुरू केले. तसा मंडळींचा उत्साह वाढला. साधारण ९ वाजेपर्यंत बहुतेक गटांचे काम संपत आले होते. त्यादरम्यान गावकऱ्यांनी नाष्टा आणि सरबत वाटप सुरू केले. आमचे काम साधारण ९ पर्यंत आटोपले. सरबत घेऊन आम्ही निघालो ते पुढील वर्षी नक्की यायच्या निर्धारानेच.

In reply to by आदेश007

या महत्वाच्या सामाजिक कार्यात सहभागी होऊन समाजसेवेचा वाटा उचलल्या बद्दल आपले व आपल्या सहकार्‍यांचे मनापासून अभिनंदन !