मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संवाद-४ [ही मालिका नाही]

चाणक्य · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, हि काही कथा नाही किंवा कुठल्या कथेचा भागही नाही.हा आहे संवाद... दोघांमधला...दोन मित्रांमधला, प्रियकर- प्रेयसी मधला... दोन माणसांमधला....! हे संवाद मी जसे सुचले तसे लिहिले आहेत. यातुन काही सांगायचे वगैरे नाही. त्या त्या क्षणी जे विचार मनात येतात ते कागदावर उतरवतो. ते बरोबर असतीलही किंवा नसतीलही. या संवादातल्या पात्रांना नाव नाहीत, किंबहुना त्याची गरज भासत नाही इतके लहान संवाद आहेत हे. हे संवाद कुठलीही पार्श्वभुमी न देता अचानक सुरु होतात. एखादं गाणं जसं अंतर्‍यापासुन सुरु व्हावं तसं. जसे सुरु होतात तसेच संपतातही.आणि शेवटी हे मनातलं आहे आणि मनातलं सगळं बरोबरंच असेल असंही नाही. संवाद-३ --------------------------------------------------------------------------------------- संवाद-४ "आपण का शिकतो ?" "म्हणजे?" "म्हणजे.... बालवाडी, शाळा, कॉलेज... हे सगळं का असतं?" "काहीतरीच!" "अरे नाही, मी सिरीअसली विचारतोय." "पण तुला असे बेसिक प्रश्न का पडतात?" "हं हं...माहीत नाही पण काल मला असं जाणवलं की मी माझ्या ऑफीस मध्ये जे काम करतो किंवा गेली काही वर्षं वेगवेगळ्या ठिकाणी जी कामं केली त्याचा आणि माझ्या शिक्षणाचा फार काही संबंध नाही" "बरं मग????" "मग पहिला जॉब करण्याआधी मी ईतकी वर्ष मी शिक्षणात का घालवली?" "मग काय करायला हव होतस?" "नाही तसा दुसरा काही ऑप्शन नव्हता, पण तरीही ही शिक्षण घेण्याची प्रोसेस आपल्याकडे जरा लांब आणि कंटाळवाणी आहे असं नाही वाटत तुला? वयाची निदान २०-२१ वर्ष आपण ग्रॅज्युएट व्हायलाच लावतो. कॉलेजची तीन एक वर्ष आपण सोडून देऊ, कारण या वर्षात थोडंसं value addition होत असतं...म्हणजे जॉबच्या द्रुष्टीकोनातनं.., पण त्याआधीची १०-१२ वर्ष काय करतो आपण?" "तेव्हा तर तुझं foundation बनत असतं ना. बेस पक्का झाल्याशिवाय का तु पुढे तुझं ते value addition करणार?" "बेस पक्का करायला १२ वर्षे?" "???" "तुझीच १० वी पर्यंतची वर्ष आठव शाळेतली. भाषेसारखे विषय १०-१० वर्ष शिकून तुला भाषेबद्दल किती ज्ञान मिळालं? किंवा भाषेबद्दल किती आवड निर्माण झाली? नागरीक शास्त्र शिकलास. राजकारणातल्या कुठल्या पदासाठी काय अटी असतात ते घोकत बसलास. सुशिक्षित असण्याची अट नसलेल्या जागांवरती अडाणी लो़क येऊन राज्य करायला लागले तरी तुला पत्ता नाही कारण तू सुशिक्षित होण्याच्या नादात त्या पदांसाठीच्या ३-३, ५-५ अटी पाठ करत बसलेलास. इतिहास, भूगोल हे विषय तर ईतकी वर्ष आपण का शिकतो हेच मला कळत नाही." "का?" "मग काय तर. सनावळ्या पाठ करून इतिहास कळत नाही. मुळात इतिहास का माहिती असावा? एकतर आपली संस्कृती कशी evolve झाली आहे ते कळाव अणि दुसरं म्हणजे इतिहासातल्या यशापयशांची कारणं कळावी. पण ईथे 'कोण कोणाला म्हणालं' असल्या टुकार प्रश्नांची उत्तर लिहीण्यात वर्षानुवर्ष जातायत. जे इतिहासाचं तेच भूगोलाचं. ५वी, ६वी, ७वी, ८वी तेच ते तेच ते तेच ते घोकायचं. च्यायला, मला सांग अमुक नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते हे ज्ञान तुला कुठे उपयोगी पडलं रे आयुष्यात? आणि एक वेळ आपण असं जरी मानलं की तू ज्या देशात किंवा राज्यात राहतोस त्या प्रदेशाची भौगोलिक माहिती तुला असणं आवश्यक आहे तरी त्यावर पुस्तक लिहून परीक्षा वगैरे घेण्याईतकं ते ज्ञान महत्त्वाचं आहे ?" "तू एक सायन्स साईड ला घेलास म्हणून तुला या विषयाचं महत्त्व नसेल वाटत, पण असेही काही लोक आहेत जे या फील्ड मधे काम करत असतात त्यांना या विषयातलं ज्ञान आवश्यक असतं" "अरे पण मग बाकीच्यांनी का हे घोकत बसायचं?" "हे बघ मला तर अस वाटतं की आपण ज्या समाजात राहतो त्याचा भाग म्हणून आपल्याला या गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे." "ज्ञान? ..... की माहिती?" "एकूण एकच." "मग त्यावर परीक्षा का?" "त्याशिवाय मुलं वाचणार नाहीत. निदान परीक्षा आहे म्हणून तरी वाचतात. हा मनुष्य स्वभाव आहे. समोर काहीतरी ऑब्जेक्टीव्ह असल्याशिवाय माणूस काही करत नाही." "म्हणून हे असलं फॉल्स ऑब्जेक्टीव्ह?" "फॉल्स ऑब्जेक्टीव्ह"" "नाहीतर काय? या ऑब्जेक्टीव्ह मुळे मुलांच्या मनात आवड नाही तर भिती निर्माण होते." "ऑब्जेक्टीव्ह आवड निर्माण करण्यासाठी नसतंच मुळी. ऑब्जेक्टीव्ह असतं आपल्या आवडत्या विषयात आपले efforts channalize करण्यासाठी." "exactly, तेच म्हणतोय मी. वर्षानुवर्ष तेच ते वाचल्यामुळे त्या विषयातली सगळी आवड, सगळा interest निघून जातो." " ते विषयच तसे आहेत" "मुळीच नाही, ते विषय तसे हाताळले जातात म्हणून ते तसे होतात. आणि हे सगळ्याच विषयांबद्दल खरं आहे. मला तर असं वाटतं की काही विषय थोडे condense करणं सहज शक्य आहे. ४-५ वर्षांचा syllabus २-३ वर्षात मुलं सहज पूर्ण करू शकतात, त्यांच्या त्या वेळचा I.Q. विचारात घेतला तरीही.." "हंम्म.........! तू म्हणतोयस ते बरोबर असेलही कदाचित. पण मग त्या २-३ वर्षांनंतर additional विषय कोणते द्यायचे?" "विचार केला तर पुष्कळ मिळतील. पण आहे तेच चालू ठेवण्याची आपल्याकडे वृत्ती आहे ना त्याला कोण काय करणार.... चला, आपण असे बोलत बसलो तर सगळा दिवस जाईल. मल मुलाच्या शाळेसाठी admission form घ्यायचाय. निघालं पाहीजे." "......!" "का रे? असं का बघतोयस?" "नाही....आत्तापर्यंत बोलणारा माणूस आणि आत्ताचा हा माणूस वेगळा आहे कि काय असं वाटून गेलं" "म्हणलं तर तोच आहे, म्हणलं तर वेगळा आहे." "-------!" " तोच अशासाठी की पालक म्हणून मुलाचे marks हे त्याच्या development चा criterion मी ठेवत नाही पण त्याच वेळेला त्याच्या मार्कांकडेही लक्ष देतो कारण तोच त्याचा सगळीकडे उपयोगी पडणारा gate-pass आहे. आणि वेगळा अशासाठी की....... तू काय मी काय, आपण प्रवाहातले मासे. पाण्याशिवाय जगू शकत नाही आणि दुसरा प्रवाह निर्माण करू शकत नाही. तेव्हा या पाण्यातच राहून पोहायचं जितकं जमेल तितकं............ चल, निघतो नाहीतर office बंद होईल."

वाचने 3687 वाचनखूण प्रतिक्रिया 12

छोटा डॉन गुरुवार, 10/30/2008 - 16:07
एकुण हा प्रकार आणि आतल्या लेखन ज्या ताकदीने उतरले आहे त्याचे कौतुक आहे. खुप आवडले. असेच अजुन येऊद्यात ... बाकी सविस्तर प्रतिसाद सवडीने ... अवांतर : ह्या प्रकारचे संवाद वाचुन "बाकी शुन्य" पुस्तकाची आठवण झाली. अशाच ताकदीच्या संवादानी व विषयांनी हे पुस्तक रंगते ... ( बाकीचे ह्या विषयावर फाटे फोडु नका कॄपया, मुळ लेखावर बोला. काहींसाठी हा विषय राखीव कुरण असला तरी इथे नको . जर फाटे फुटले तर संपादक मंडळाने कॄपया ते उडवावे जेणेकरुन ह्या लेखाच्या लेखकावर अन्याय होणार नाही ) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 10/30/2008 - 16:10
तोच अशासाठी की पालक म्हणून मुलाचे marks हे त्याच्या development चा criterion मी ठेवत नाही पण त्याच वेळेला त्याच्या मार्कांकडेही लक्ष देतो कारण तोच त्याचा सगळीकडे उपयोगी पडणारा gate-pass आहे. आणि वेगळा अशासाठी की....... तू काय मी काय, आपण प्रवाहातले मासे. पाण्याशिवाय जगू शकत नाही आणि दुसरा प्रवाह निर्माण करू शकत नाही. तेव्हा या पाण्यातच राहून पोहायचं जितकं जमेल तितकं............ चल, निघतो नाहीतर office बंद होईल."
जमेल तितके करत राहयचं . खरंच दुसर काय करणार? तेवढी ताकद आपली नाही. प्रकाश घाटपांडे

विनायक प्रभू गुरुवार, 10/30/2008 - 17:02
जो बदल तुम्ही घडवू शकत नाही त्याबद्दल नाराजगी असणारच. तुमच्या मुलांच्या आवडीला प्रोत्साहन देणे जेणेकरवी पुढील आयुष्यात त्या क्षेत्रात तो सर्वात पुढे राहिल हे तर आपण नक्की करु शकतो.

झकासराव Fri, 10/31/2008 - 10:51
चाणक्य मस्त लिहिलय. :) ................ बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय. http://picasaweb.google.co.in/zakasrao

नागरीक शास्त्र शिकलास. राजकारणातल्या कुठल्या पदासाठी काय अटी असतात ते घोकत बसलास. सुशिक्षित असण्याची अट नसलेल्या जागांवरती अडाणी लो़क येऊन राज्य करायला लागले तरी तुला पत्ता नाही कारण तू सुशिक्षित होण्याच्या नादात त्या पदांसाठीच्या ३-३, ५-५ अटी पाठ करत बसलेलास बाकि लेख आवडला आप्ल्याला मी आता तसा कोतवाल नाही बरं?

लिखाळ Fri, 10/31/2008 - 18:04
संवाद छानच ! शाळेत जाऊन मला नक्की काय मिळाले यावर मी सुद्धा अनेक वर्षे विचार करत आहे. असो ! --लिखाळ.