मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ग्रामीणांचा आहार

डॉ. सुधीर राजाराम देवरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे बाजरीची भाकरी आणि कोणतीही भाजी हा गावातल्या लोकांचा रोजचा मुख्य आहार असायचा. भाजीला पूर्वी या परिसरात अहिराणी भाषेत शाक म्हटलं जायचं. ऋतू कोणताही असो दररोज बाजरीची भाकर जेवणात असायची. भाकर गरम पडते वा डांजते असं कधी चुकूनही कोणाकडून ऐकायला मिळायचं नाही. आणि आजारी पडल्यावर असं निदान इथल्या डॉक्टरनेही कधी केलं नाही. या परिसरात त्यावेळी बाजरी मुबलक प्रमाणात पिकत असल्यामुळे इथल्या जेवणात बाजरीच्या भाकरी शिवाय अजून काही पर्याय असू शकतो अशी कल्पनाही कोणाला नव्हती. इथं गहूही पिकायचा. पण घरचा गहू असूनही कोणी रोज चपात्या खात नव्हतं. अशा जेवणा व्यतिरीक्‍त कुठं वेगळं जेवण दिसलं की ती खाण्याची चैन समजली जायची. नातेवाईकांकडे- भावबंदांकडे पाहुणे आले की पाहुण्यांना जेवण सांगण्याची पध्दत होती. पाहुण्याला त्यातल्यात्यात उजवं जेवण म्हणून भजींची आमटी, भाकर, भात, लोणचं, पापड, कांदा असं ताट भरून वाढलं जायचं. ज्या पाहुण्याला जेवायला बोलवलं त्याला कोणी बाहेर विचारलं, ‘काय जेवण होतं’, तर तो पाहुणाही केवळ भजींची आमटी न म्हणता ताट भरून आलेल्या सगळ्या जीनसांची नावं सांगायचा. भात हा अलिकडील जेवणात नैसर्गिक पदार्थ समजला जात असला तरी, खिचडी- भात त्याकाळी इथल्या जेवणाचा भाग नव्हता. लोकांकडे केवळ सणाच्या दिवशी सार सोबत भात खावा लागतो म्हणून दुकानातून तेवढ्यापुरता बिटेभर वा चिटेभर तांदुळ मागवला जायचा. तांदळाचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्या प्रकारानुसार त्याची किंमत ठरलेली असते हे ही त्यावेळी माहीत नसायचं. दुकानदार जो काही बिटेभर तांदूळ देईल आणि जी किंमत सांगेल तो तांदुळ भातासाठी घेतला जायचा. म्हणजे गावात तांदळाच्या व्हरायट्या दुकानदाराकडे नसत. भाकरी सोबत आजच्या काही भाज्या त्या काळात दिसत होत्या तरी तेव्हा रानभाज्यांचे प्रमाण जेवणात जास्त प्रमाणात होतं. ज्याला कदान्न म्हटलं जाईल अशा प्रकारचे पदार्थ त्यावेळी नाइलाज म्हणून खावे लागत असले तरी तो एक पारंपरिक खाद्य पदार्थांचा आणि लोकजीवनाचाच अविभाज्य भाग बनून गेला होता. म्हणून ते कदान्नही आवडीने खाल्लं जायचं. यापैकी काही पदार्थांना सणसणीत चव असायची. सोलासनं बट्ट, सोलासनं तिखं, लसुननं तिखं, कोंडाळं, घाटा, बेसन, सुघरं भुगरं, मटमुंगना वडानं बट्ट, मिरचीना खुडा, कुळीदनी घुगरी, कुळीदना मुटकळा,‍ लोंचाना खार, मिरचीना ठेचा, काळा समार, तेलगुळना काला, चिखल्या, गुळ टाकून शिजवलेले शिळ्या भाकरीचे तुकडे अशा प्रकारचे पौष्टीक नसलेले आणि काही बेचव असलेले पदार्थ कांदा तोंडी लावून भाकरी सोबत खाऊन लोक आपल्या कामाला लागायची. झिंदरं आणि वांगानं भरीत त्यातल्या त्यात चविष्ट पदार्थ असायचे. आता सांगितलेले अनेक खाद्य पदार्थ आज एकतर नामशेष झाले आहेत वा आपल्या ‍जीवनातून हद्दपार होण्याच्या बेतात आहेत. आजचा आहार हा समतोल आहाराऐवजी गरजेपेक्षा जास्त आणि चमचमीत चवीचा आहार दैनंदिन जेवणात घेतला जातो. मात्र हा आहार दुर्गम खेड्यातले गरीब लोक अजूनही घेत आहेत. असं कदान्न खाऊनही ते अर्धपोटीच राहतात. ज्यांची स्थिती आज मध्यमवर्गीय म्हणता येईल अशी प्रगती केलेले लोक हे पदार्थ विसरून गेले आहेत. (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.) – डॉ. सुधीर रा. देवरे इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

वाचने 11684 वाचनखूण प्रतिक्रिया 62

कपिलमुनी 15/02/2018 - 17:40
कोकणात असला काही खात नाहीत , आमच्या पश्चिम महाराष्ट्रात ज्वारीची भाकरी खातात. वरचे वर्णन कुठले आहे ? *उत्तराची अजिबात अपेक्षा नाही

In reply to by कपिलमुनी

प्रसाद_१९८२ 15/02/2018 - 19:00
अहिराणी भाषेचा उल्लेख केलाय म्हणजे वरचे वर्णन, खानदेश वगैरे भागातले असावे असा एक अंदाज आहे.

In reply to by प्रसाद_१९८२

डॉ. सुधीर राजा… 16/02/2018 - 17:36
उत्तराची अपेक्षा नसली तरी सांगतो. उत्तर महाराष्ट्रात हे पदार्थ खाल्ले जात होते- जातात. विशेषत: खानदेश आणि नाशिक परिसर. बागलाण.

In reply to by कपिलमुनी

अमरेंद्र बाहुबली 15/02/2018 - 20:05
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र फक्त हाच महाराष्ट्र नसून इतरही भाग महाराष्ट्रात समाविष्ट होतात. गरजेचं नाही जे कोकणातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोक खातात तेच उर्वरित महाराष्ट्रानेही खावे.

In reply to by कपिलमुनी

डॉ. सुधीर राजा… 16/02/2018 - 17:33
उत्तराची अपेक्षा नसली तरी सांगतो. उत्तर महाराष्ट्रात हे पदार्थ खाल्ले जात होते- जातात. विशेषत: खानदेश आणि नाशिक परिसर. बागलाण.

In reply to by कपिलमुनी

डॉ. सुधीर राजा… 16/02/2018 - 17:34
उत्तराची अपेक्षा नसली तरी सांगतो. उत्तर महाराष्ट्रात हे पदार्थ खाल्ले जात होते- जातात. विशेषत: खानदेश आणि नाशिक परिसर. बागलाण.

In reply to by कपिलमुनी

डॉ. सुधीर राजा… 16/02/2018 - 17:36
उत्तराची अपेक्षा नसली तरी सांगतो. उत्तर महाराष्ट्रात हे पदार्थ खाल्ले जात होते- जातात. विशेषत: खानदेश आणि नाशिक परिसर. बागलाण.

manguu@mail.com 15/02/2018 - 20:30
आमीर खान रोज नाचणीची भाकरी खातो, असे त्याने कुठल्या तरी मुलाखतीत सांगितले होते.

In reply to by manguu@mail.com

डॉ. सुधीर राजा… 16/02/2018 - 17:39
बर

पैसा 15/02/2018 - 23:49
ज्याला तुम्ही कदान्न म्हटले तो सध्या हूच्चभ्रू लोकांचा तब्ब्येत सुधारण्यासाठी आहार आहे. प्रत्येक प्रदेशात जे नैसर्गिक पीक आहे तेच तिथल्या लोकांसाठी योग्य असते. म्हणून "कोकण्ये भात बोकण्ये" म्हण प्रसिद्ध आहे. ५०/६० वर्षापूर्वी कोकणात पोळी/चपाती रोजच्या जेवणात नव्हती. कारण कोकणात गहू पिकत नाही आणि तेव्हा मुबलक मिळतही नसे.

चांदणे संदीप 16/02/2018 - 07:20
लेख आवडला! मलाही पहिल्यांदा विशेष वाटले होते माझ्या मित्राकडून ऐकून की, बाजरीची भाकर फक्त थंडीतच खावी! मनात म्हटलं, च्यामारी, असलं जर्नल नॉलेज आपल्याला कस काय नसतंय? अजून एक, आमच्या गावाकडे हुलगे खूप पिकतात आणि नेहमी जेवणातही असायचे. आता त्याच प्रमाण कमी झालंय आणि शहरात तर हुलगे कित्येक जणांना माहीतही नसतात. Sandy

In reply to by चांदणे संदीप

किसन शिंदे 16/02/2018 - 12:42
कुळीथ हा शब्द जास्त प्रचलित आहे.
अजूनही खेड्यांमधल्या लोकांना कुळीथ हा शब्द ठाऊक नाही. तिथे हुलगे हाच शब्द वापरला जातो, एकुणात कुळीथ हा हुच्च शब्द वाटतो हुलग्यांसांठी. आमच्याकडे या हुलग्यांची 'शेंगोळी' बनवायची पद्धत आहे. बाकी पुण्याजवळच्या बर्‍याच खेडेगावांमध्ये भाजीला कालवण, कोड्यास हा शब्द वापरला जातो.

In reply to by किसन शिंदे

प्राची अश्विनी 16/02/2018 - 15:34
कोड्यास की कोरड्यास? मी इतके दिवस कोरड्यास समजत होते. हुलगे आमच्याही इथे म्हणतात. पण बाजारातल्या पिशवीवर कुळीथ लिहिलेलं असतं.

In reply to by प्राची अश्विनी

प्रसाद_१९८२ 16/02/2018 - 13:15
याच कुळथाच्या पिठात पाणी घालून "डांगार" नावाचा खाद्य पदार्थ बनवला जायचा व तो नाचणीच्या भाकरी बरोबर खाल्ला जायचा.

सुखीमाणूस 16/02/2018 - 07:43
प्रत्येक भागातले खाद्य पदार्थ जतन झाले पाहिजेत. हाच निसर्गाचा ठेवा आहे.

सुबोध खरे 16/02/2018 - 10:30
वैद्यकीय शास्त्राप्रमाणे भारतात जे जे पारंपरिक पदार्थ ज्या ज्या प्रदेशात आणि ऋतू मध्ये खाल्ले जातात ते अतिशय पौष्टिक आहेत. उदा पंजाब मध्ये गव्हाची रोटी आणि छोले/राजमा, दक्षिण भारतात सांबार भात किंवा महाराष्ट्रातील वरण भात इ. पश्चिम महाराष्ट्रात अगदी गरीब धनगर लोक खात असलेला आहार म्हणजे शेळी/ बकरीच्या दुधात कुस्करलेली बाजरीची भाकरी हा अतिशय पौष्टिक आहे. १०० ग्राम बाजरी मध्ये प्रथिने (११ ग्राम ) (लोह ३ mg) मँगनीज खनिजे आणि तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असतात. बाजरीच्या प्रथिनामध्ये १३ अत्यावश्यक अमिनो अम्ले असल्यामुळे त्याच्या प्रथिनांचा दर्जा (प्राणिजन्य प्रथिनांसारखा) उच्च आहे. १६ ते २० रुपये किलोने मिळणारे हे धान्य स्वस्त सुद्धा आहे. बाजरी हे धान्य गहू ज्वारी किंवा तांदुळापेक्षा पौष्टिक आहे आणि पोटाचे आजार असणाऱ्या (ग्लूटेन एंटेरोपॅथी किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम)सारख्या लोकांना ते जास्त सोयीस्कर/ आरोग्यदायक आहे. ते अतिशय कमी पाण्यावर/ कोरडवाहू जमिनीवर येणारे पीक आहे. महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थान येथे येणारे हे पीक स्थानिक लोकांच्या आहारासाठी अतिशय उपयुक्त आणि स्वस्त असा घटक आहे. बाजरीचा चारा हा गुरांना सुद्धा अतिशय पौष्टिक आहे. दुर्दैवाने पाश्चात्य आहार विहाराचे आकर्षण असणारे आपण आता सकस आहार ऐवजी चावायला आणि गिळायला सोपा ( पण आरोग्याच्या दृष्टीने तितका गुणकारी नसलेला) आहार घ्यायला लागलो आहोत. हर हर न हिंदू : न यवन किंवा we are neither forward nor backward we are just awkward अशी परिस्थिती झाली आहे.
आमच्या रायगड जिल्ह्यात तांदुळ पिकतो त्यामुळे पूर्वीपासूनच तांदळाच्या भाकर्‍या घरोघरी असायच्या. आमच्याघरीही पिकायचा तांदुळ. त्यात जया तांदुळाची जात होती ती भाकरीसाठी वापरायचे. भाताच्या तांदळाचे नाव आता आठवत नाही. त्याही आधी लाल तांदुळ ज्याला आम्ही राता म्हणायचो आणि पटणीही म्हणतात तो पिकायचा. हा तांदुळ गोड असायचा चविला. भातही गोड लागायचा आणि भाकरी चविष्ट आणि नाचणीच्या भाकरीसारखी लाल. नंतर हळू हळू घरा घरात चपात्या व्हायला कधी सुरुवात झाली ते कळल नाही. पण मांसाहारी जेवणात आम्ही भाकरीलाच प्राधान्य देतो. पूर्वी गरजा होत्या आता जीभेचे चोचले झाले आहेत दुसरे काय.

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 16/02/2018 - 13:43
योगेंद्र यादवांचा लेख त्यात बरेच तथ्य आहे हि वस्तुस्थिती गृहीत धरली तरी थोडा टोकाचा वाटतो हि हरित क्रांतीमुळे आपल्याकडे भूक बळी आणि कुपोषण मोठ्या प्रमाणावर कमी झाले हि वस्तुस्थिती. तेंव्हा केवळ हरितक्रांतीलाच दोष देणं चूक आहे.वेळो वेळी सरकारची धोरणे र्हस्व दृष्टीची होती किंवा सवंग लोकप्रियतेची असल्यामुळे हे नवे प्रश्न उद्भवले आहेत. ग्लुटेन या प्रथीनाची ऍलर्जी उत्तर भारतात साधारण १ % लोकांमध्ये आहे. https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/21182543 गव्हाची पोळी हि करणे ज्वारी बाजरीच्या भाकरीपेक्षा जास्त सोपे आणि सोयीचे आहे. आकार वेडा वाकडा झाला तरी तव्यावर सहजासहजी तुकडे पडत नाहीत. शिवाय त्याला तूप तेल लावले तर ती जास्त वेळ मऊ राहते ती चावायला जास्त सोपी आहे हि वस्तुस्थिती मान्य करायलाच हवी. याउलट ज्वारी किंवा बाजरीची भाकरी हि थंड झाल्यावर कडक होते.भाकरी थापायाला आणि ती भाजायला वेळ जास्त लागतो आणि ती करण्याला स्त्रियांना कष्ट जास्त लागतात. ( ती जास्त टिकत असली तरी कोरडी पटकन होते आणि मग दूध किंवा कालवणात भिजवून खावी लागते) या सर्व गोष्टी गृहीत धरल्यास आजही ९० % जनतेला गव्हापासून दूर करून ज्वारी बाजरीच्या भाकरीची सवय लावणे कठीणच आहे.

In reply to by सुबोध खरे

मराठी कथालेखक 16/02/2018 - 14:01
ज्वारीची पातळ भाकरी खूप वेळ मऊ रहाते. तसेच मिक्सर, फूडप्रोसेसर ई शिवाय हाताने गव्हाचे पीठ मळणे किचकट व वेळखाऊ तर ज्वारी वा बाजरीचे पीठ मळणे गव्हाच्या पिठापेक्षा खूप सोपे आहे असंच मत मी साधारणपणे घरातील स्त्रियांकडून (आई, पत्नी) ऐकत आलो आहे.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद_१९८२ 16/02/2018 - 14:35
सिंदगी, विजापूर व बिदर वगैरे साईडला मी साखर कारखान्याच्या कामानिमित्ताने जात असतो. तिकडे ज्वारी, बाजरीची भाकरी थापून, तीला उन्हात कडक होइपर्यंत वाळवतात व नंतर खायच्या वेळेस, जसे आपण पापड भाजतो तसे चुलीवर किंव्हा इतर प्रकारे भाजून हि डाळ, भाजी वा चिकन-मटणाच्या रस्स्यात कालवून हि भाकरी खायला घेतात. एकदा वाळवून ठेवलेल्या ह्या भाकर्‍या म्हणे वर्षेभर टिकतात.

In reply to by प्रसाद_१९८२

अमितदादा 16/02/2018 - 23:33
एखादा बेळगाव किंवा धारवाड ला उतरलो असताना अशी भाकरी ठेच्या बर एका मेस कम हॉटेल मध्ये खाल्लेलं आठवतंय, जबरदस्त चव होती.
आम्ही सवय लावतोय स्वतःला. मी रोज चपाती आणि ज्वारी-बाजरी-नाचणी भाकरी दोन्ही रोज बनवते. एक होत की सकाळी केलेली भाकरी संध्याकाळी थोडी कडक होते. पण चालत तेवढ. मुलिंनाही आवडायला लागलेय आता भाकरी. एकत्र कुटुंब असल्याने ज्यांना चपाती लागतेच त्यांच्यासाठी करावीच लागते.

गवि 16/02/2018 - 14:59
बाजरीची भाकरी आणि शक्य असल्यास पांढरा ताज्या लोण्याचा गोळा. सर्वात उत्कृष्ट प्रकार. सोबत भोगीची भाजी, मटण रस्सा, भरीत, खरडा, ठेचा, गूळ खडा असं काहीतरी.

In reply to by गवि

सुबोध खरे 16/02/2018 - 15:50
कालच बाजरीची भाकरी लोणी गुळाचा खडा मिरचीचा ठेचा शेंगदाणे आणि लसणीची चटणी आणि शेवग्याच्या शेंगांचं पिठलं हा मेनू होता.

डॉ सुहास म्हात्रे 16/02/2018 - 15:57
कोकणात गहू, ज्वारी, बाजरी ही धान्ये अगदी रेशनची दुकाने (संदर्भ : पीएल ४८०) सामान्य होईपर्यंत (बहुतेक १९६०च्या दशकामध्ये केव्हातरी) असलीच तर अत्यंत विरळ होती. घराघरात तर ही धान्ये अजिबात वापरली जात नव्हती. फारतर, पाहुणे म्हणून गेल्यावर, मुंबईत देशभरातील सर्व राज्यांतील लोक राहत असल्याने तेथे ही धान्ये कधीमधी दिसायची. मी तर पहिल्यांदा ज्वारी-बाजरी, खानदेशात एका लग्नाला गेलो होतो तेव्हा १९६३-६४ मध्ये केव्हातरी, पाहिली व खाल्ली होती. कोकणात न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यांत सर्वच जेवणांतच नव्हे तर मधल्या वेळेच्या खाण्यात (पोहे, चिवडा, इ) तांदळाचेच पदार्थ असत. भात (कोलम, आंबेमोहोर, इ) व भाकरी (जाडा, राता, इ) साठी तांदुळांचे वेगवेगळे प्रकार वापरले जातात. शेतावर काम करणार्‍यांसाठी खास जाडसर असलेला व पचायला जरा जड असलेल्या तांदुळाचा भात बनवला जाई... कोलमचा भात सहज पचून कामकर्‍यांना दोन तासात परत भूक लागे, त्यामुळे ते लोक कोलमच्या भाताला नकार देत ! तांदळापासून बनणारे शाकाहारी आणि मांसाहारी (मटण/कोंबडी/मासे) भाताचे असंख्य (कमीत कमी १०-१२ तरी) प्रकार लहाणपणी सणसमारंभांनुरूप खाल्लेले आठवतात. शिवाय तांदळाचे (थंड पाण्यातली आणि उकडीची) भाकरी, घावण, आंबोळ्या, मोदक, कानवले, इत्यादी अनेक प्रकार असत. त्याशिवाय, वर्षभरासाठी लागणारी तांदाळाचे/पोह्यांचे पापड, फेण्या, कुरडया, इत्यादी उपान्ने दर मे महिन्यांत घरातल्या आणि आजूबाजूच्या स्त्रिया एकमेकाला सहकारी तत्वावर मदत करून बनवत असत... आम्ही छोटी मंडळी त्यात पीठ कुटणे, वाळत टाकलेल्या मालाची राखण करणे आणि जमेल तशी इतर धमाल करणे, हे करत मदत/अडथळा करत असू ! अवांतर : बाजरीची भाकरी मला आवडते, पण तिला पश्चिम महाराष्ट्र अथवा विशेषतः कोकणाचे मुख्यान्न म्हणणे हे चूक आहे ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जागु 17/02/2018 - 12:09
बरोबर. आम्ही अजूनही कोलम रोजच्या जेवणासाठी वापरत नाही. कारण त्याची सवयच नाहीये. गावाला पिकतो तो थोडा जाडसर तांदूळच असतो. तो संपला की थेट गिरणीतून जाडसर तांदूळ आणतो. कोलम फक्त पुलाव, मसालेभात अशा पदार्थांसाठी किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर तेव्हा.