Skip to main content

अनवट वाट

लेखक अनाहूत
शनिवार, 30/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
" बापू " कुणी हाक मारली ? वळून पाहिलं , ' अरे हि इथे कशी आणि कशाला हाक मारतेय आपल्याला , ' चवचाल ' आणि कायकाय शब्द ऐकलेत हिच्याबद्दल . उगाच कुणी पाहिलं आपल्याला इथं तिच्या सोबत तर काय बोलतील ? पण आता समोरून न बोलता जाऊ तरी कस ? शेवटी पर्याय नसल्यामुळे तिला समोर जाण्याशिवाय पर्याय नव्हता . "अरे बापू इकड कूठ ? " .... ती " नाही जरा काम निघालं होत म्हणून आलो होतो , पण तू इकडे इतक्या लांब कशीकाय ? "... मी " काय सांगू आणि काय नाही ? चल तिथं चहा घेऊ मग बोलूया कि . "... ती " नाही नको म्हणजे ... " मी " असू दे परगावातच आहेस इथे तुला कोण ओळखत नाही आणि माझ्याबरोबर पाहिलं तर कोणी काही म्हणणार नाही ." आता पर्याय नसल्यामुळे तिच्या सोबत निघालो , " कसा आहेस ? मी " ठीक " आता आपल्याला विचारलय म्हणून तिला माघारी विचारनं गरजेचं होत म्हणून विचारलं, " तू कशी आहेस ? " " सुखात आहे . " तिनही थोडक्यात नेमकं सांगितलं . तीच सांगून झाल्यावर मला काही बोलायला सुचत नव्हत , मुख्य म्हणजे मला बोलायचंच नव्हतं तिच्याशी . तेव्हढ्यात तिनेच मला विचारलं, " आणि तुझं आई बाबा कस आहेत ? " " आहेत बरे . " " आणि माझं आई बाबा ? " " एव्हढी काळजी होती तर कशाला करायचं होत असं ? " मला उगाचच राग आला . " मग काय करायचं होत ? " " समाजात इज्जत राहील असं वागायचं ना . " " समाज... इज्जत... , काय असतो समाज आणि काय असते इज्ज्जत ? " " तू राहू दे तुला नाही कळायचं . " " मग तू सांग ना तुला कळत ना . " " समाजान आखून दिलेल्या नियमान वागायचं, तसच राहायचं, असं वागलं तरच समाजात इज्जत राहते . नाहीतर कोणीही विचारात नाही समाजात . " " त्यांच्या नियमान वागलं म्हणजे बरोबर आणि तस वागलं नाही कि चूक असच ना " " हो असच आहे . " " आणि आपण आपल्या जागी बरोबर आणि समाज चूक असेल तर ? " " हो तूच फार शहाणी ना, तुझच एकटीच बरोबर आणि एव्हढ्या सगळ्या समाजाचं चूक ना . " " काय माहित आहे तुला आणि तुझ्या त्या समाजाला ? " तिनं माझ्याकडं रोखून पहात मला विचारलं . त्यामुळं मला थोडं अवघडल्यासाखं झालं . धीर थोडासा खचला , पण परत मनाचा हिय्या करून तिला बोललो , " हेच कि तू कुणाचा तरी हात धरून पळून गेलीस . " " बर मग ? " तीन परत तसंच रोखून पाहत मला उडवून लावल . तरीही मी धीर करून बोललो , " आणि तुला वाटत हे बरोबर आहे ? " " मी का गेले काही माहित आहे का तुला आणि तुझ्या समाजाला ? " आता तिचा स्वर थोडा कातर वाटलं . आता तिला चूक कळली आहे . मग मी अजून चेव येऊन बोललो , " ज्या नवऱ्याबरोबर लग्न करून आली होतीस त्याला सोडून गेलीस . विवाहासारख्या पवित्र बंधनाला झुगारून कुणाचातरी हात पकडून गेलीस याला काय आणि कसलं कारण देणार आहेस ? आणि काहीही कारण दिल तरी हे बरोबर ठरत नाही . " " काय पवित्र , ज्यांच्यासोबत कधी मन जुळलं नाही त्याच्या सोबत राहणं हे ? " तिनं थंडपणे उत्तर दिलं . " असं होत तर लग्नचं कशाला करायचस ना ? " " लग्नाआधी कळत हे सगळं ? " ती तशीच थंड आणि शांत . " व्यभिचार करायचा होता म्हणून त्याला काहीही नाव द्यायचं . " मी शेवटचा घाव केला . तशी तिची थोडीशी चलबिचल झाली . कातर स्वरात , पण थोडी चिडल्यासारखी ती बोलू लागली , " ज्याला तुमचं मन कधी कळलं नाही , ते कळून घ्यायचा त्यानं कधी प्रयत्न केला नाही , आणि ज्याला फक्त आणि फक्त तुमचं शरीरचं हवं आहे अश्या सोबत राहायचं ? त्याच्या सोबत संबंध हे माझ्या मनाविरुद्धच होत असतील तर ती जबरदस्तीच नाही का ? आणि अशी जबरदस्ती आयुष्यभर सहन करायची म्हणजे पावित्र्य ? असं सहन केलं तरच मी बरोबर समाजात ? मी नाही मान्य करत अशा समाजाला आणि अशा नियमांना, मी माझ्या मनाने ज्याच्यासोबत पवित्र वाटत त्याच्यासोबत राहतेय आणि यातच माझं पावित्र्य आहे . कुणाला दाखवण्यासाठी मी आयुष्यभर ते जबरदस्तीच नातं नाही निभावणार . " आता काहीतरी उत्तर द्यावं या विचारानं मी म्हटलं , " मग काडीमोड घ्यायचा आणि मग व्यवस्थीत लग्न करून राहायचं ना समाज मान्यतेने . " " हं... काडीमोड.. तुझं कोर्ट देत का लगेच काडीमोड ? " " तेव्हढं थांबायचं ना . " " का आणि कशासाठी मला कशाला हवी आहे त्यांची परवानगी , एकदा एकदा राहीले ना मी समाज नियमांनुसार लग्न करून , काय मिळालं मला ? आणि आता मला त्या लग्नाबिग्नात अजिबात विश्वास नाही . मी त्याला माझ्या मनान वरलंय आणि दोघे प्रेमं आणि विश्वासानं राहतोय यातच सगळं आलं , यात तुमच्या समाजाची आणि समाज मान्यतेची मला काही गरज नाही . काय ? " तिच्या त्या काय ने माझी फारच अवघड अवस्था केली . त्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं ते मला काही समजेना . तेव्हढ्यात ती बोलली, " तू राहू दे बापू . तू चहा पी . " कुणाला कधी कश्याचा आधार होईल सांगता येत नाही . मला त्यावेळी त्या चहाच्या कपाचा आधार झाला . पुढं मला काही बोलायलाही होईना . थोडा वेळ असाच निघून गेला मग तीच बोलली, " तू राहूदे, तुला नाही झेपणार ते, तू तुझ्या समाजात राहा मी माझ्या जगात राहते . " " .... " मी निःशब्दच . तिला समजलं होत मला बोलायला अवघड होतंय ते, ती पुढे बोलली , " बर वाटलं बघ तुझ्याशी भेटून, बोलून . गावाचा माणूस तू माझ्या, तुला भेटून जुन्या आठवणी जाग्या झाल्या . आपण लहानपणी एकत्र खेळलो, शाळेत गेलो म्हणून तुझ्याशी बोलले तरी हे सगळं नाहीतर कुनाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही मला . जा आता तू तुझं काम माझ्यामुळे थांबायला नको . बाकी आईबाबांची काळजी घे आणि जमलं तर माझ्या घरी जाऊन एकदा माझे आई बाबा कशी आहेत ते बघ. आईला माझी खुशाली सांग .परत आलास तर सांग त्यांची ख्याली खुशाली .... हो पण तुला जमलतर . " तीच ते न झेपणार आयुष्य मनाला पटलं, नाही पटलं , तरी ते जगासमोर उघड करण्यासारखं नव्हत . त्यामुळं मी माझी सभ्यपणाची झूल ओढून घेतली आणि तिथून निघालो . तेव्हढ्यात तिने आवाज दिला, " बापू सुरकी कशी आहे ? " क्षणभर माझे पाय थांबले . " फार जीव होता तिचा तुझ्यावर . थोडस धाडस केलं असतस तर ...." आता मात्र मला खरंच थांबणं शक्य नव्हत, तसाच तडक निघालो पण डोक्यात मात्र विचारांच मोहोळ उठल होत .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2224
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आपल्या प्रतिसादाबद्दल आभार