Skip to main content

देव,धर्मादी संकल्पना-- एंटरटेनमेंट विथ लाईफटाईम वॅलिडीटी.

लेखक सिंथेटिक जिनियस यांनी मंगळवार, 12/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
देव आणि धर्म नावाची संकल्पना कशी अस्तित्वात आली आणि का याच्यावर बरेच मंथन झाले आहे.यावर बर्याच थेअरीज आहेत.पैकी उत्क्रांतीवादानुसार देव आणि धर्म यावर बर्याच लोकांचा विश्वास असतो याचं कारण माणुस उत्क्रांत होत असताना त्याला या गोष्टींचा नक्कीच फायदा झाला असणार.आदिमानवाच्या अविकसित बुद्धीला पडणारे प्रश्न त्याच्या क्षमते बाहेरचे असल्याने त्याने सतत असणार्या अनिश्चिततेवर ,त्यातून येणार्या भीतीवर मात करण्यासाठी काही मानसिक,बौद्धिक दरिद्री कल्पना विकसित केल्या त्यात देव आणि धर्म याचा क्रमांक सर्वात वरचा लागतो.पण ही पण एक थेअरी आहे,याला सर्वानुमते आधार नाही. मग मनुष्याने मानसिक स्वास्थ देऊ शकणार्या पण बौद्धिक दिवाळखोरीकडे नेणार्या देवधर्मादी संकल्पना का विकसित केल्या असाव्यात?.एका क्षमतेच्या बदल्यात दुसरी क्षमता सोडून देणे हे होतच असते (trade off).पण देवधर्मादी गोष्टींनी असे काय दिले असावे जे फार गरजेचे होते?मला असे वाटते की देवधर्मादी संकल्पनांनी मनुष्याला भरपुर मनोरंजन दिले असावे.मी या निष्कर्षावर बर्याच वर्षांपुर्वी आलो होतो.२००२ साली स्पायडरमॅन हा सुपरहीरोपट बघायला गेलो असताना माझ्या मनात या देवधर्मादी गोष्टींच्या मनोरंजन मुल्याचा विषय आला.म्हणजे बघा,सुपरहीरो किंवा फिक्शन वर आधारीत नॉवेल वाचताना किंवा चित्रपट बघताना आपण लॉजिक रिजनिंग वगैरे सगळ्याचीच बोळवण करुन ते एंजॉय करतो.याचे कारण यागोष्टींना असलेले मनोरंजन मुल्य! देवधर्मादी गोष्टींचा विचार केल्यास आपल्याला चक्क त्यात सुपरहीरोज सापडतात आणि फिक्शन तर या गोष्टींचा बेसच आहे.आजपर्यंत लिहलेल्या कोणत्याही व्यावसायिक फिक्शनपेक्षा कैकपट अधिक मनोरंजन मुल्य या देवधर्मादी संकल्पनांचं आहे.आणि या संकल्पना लहानपणी मेंदूत पद्धतशीरपणे सोडल्या जातात ,मग सुरु होतो स्वमनोरंजनाचा लाईफटाईम गेम.यातून सुटका नसते. काही दिवसांपुर्वी मदरश्यांवर एक डॉक्युमेंट्री बघत असताना या स्वमनोरंजनाचा चमत्कार पहायला मिळाला.कुराणातले आयते का काय ते म्हणत असताना त्या लहानग्या मुस्लिम मुलांना प्रचंड उन्माद चढलेला दिसत होता.आवाज टिपेला पोचुन जो तो त्या स्वमनोरंजनाचा आनंद घेत होता.नंतर मदरश्यातला शिक्षक काही धार्मिक गोष्टी सांगत असताना मुलांचे उन्मादी चित्कार मला सुपरहीरो मुव्ही बघताना थिएटरात होणार्या चित्कारापेक्षा फार वेगळे वाटले नाहीत.असाच अनुभव लहानपणी गणेशोत्सवात बर्याचदा घेतला आहे.गणपतीसमोर वेगवेगळ्या आरत्या म्हणताना अगदी डॉक्टर इंजिनिअर प्राध्यापक यांना आलेला युफोरीया बघितला आहे.गौरी गणपती,मंगळागौर अथर्वशिर्षपठण ,धर्मग्रंथपठण काय अन काय करताना स्त्री पुरुषादिंना होत असलेला आनंद,उन्माद युफोरीया हे अभ्यासाचेच विषय आहेत. धार्मिक ग्रंथ वाचताना काहिंना ऑर्गॅझमही येत असल्याचे काही ठिकाणी वाचले होते.कुठेतरी जामोप्यांनी युफोरीया इंडेक्स विषयी लिहले आहे तसा युफोरीया इंडेक्स या देवधर्मादी संकल्पनांच्या बाबतीत नक्कीच काढला पाहीजे. तर जगातला सगळ्यात मोठा फिक्शनल सुपरहीरो म्हणजे देव ,मग तो अल्लाह असो वा ब्रह्मा विष्णु महेश.यांच्या एकसे एक स्टोर्या ऐकत आयुष्यभराचे मनोरंजन करुन घेणे म्हणजे धर्म पाळणे ही व्याख्या माझ्या पुरती मला मान्य झाली आहे.आपले काय मत आहे या लाइफटाइम एंटरटेनमेंट विथ लाइफटाईम व्हॅलीडीटी विषयी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9109
प्रतिक्रिया 48

प्रतिक्रिया

K

OMG मधला संवाद आठवला.. धर्म माणसाच्या जीवनात काय काम करतो.. त्याएवजी देव अस टाकल की उत्तर चपलख बसते..

जगातला सगळ्यात मोठा फिक्शनल सुपरहीरो म्हणजे देव ,मग तो अल्लाह असो वा ब्रह्मा विष्णु महेश.यांच्या एकसे एक स्टोर्या ऐकत आयुष्यभराचे मनोरंजन करुन घेणे म्हणजे धर्म पाळणे. हे म्हणजे एखाद्या माकडाने सेतू बांधताना प्रभू रामचंद्रांना बायकोला कसे समाधानी ठेवावे यावर व्याख्यान देण्यासारखे आहे.-- पु ल

In reply to by सुबोध खरे

ह्या ह्या ह्या ,डॉक्टर सिस्टिम्याटीकली लिहा जरा,म्हणजे बघा " मी नौदलात असताना... अशी दांडगी सुरवात करायची म्हणजे पूढे काहीही लिहिता येते.बघा ,डिमनर सोडू नका तुमचा.

In reply to by babu b

तुम्ही कुठल्या पंथाचे?१सुन्नी) हनफ़ी ,देवबंदी ,बरेलवी ,मालिकी ,शाफ़ई ,हंबली ,सल्फ़ी, वहाबी , अहले हदीस, सुन्नी बोहरा, अहमदिया २) शिया)इस्ना अशरी ,ज़ैदिया, इस्माइली शिया ,दाऊदी बोहरा ,खोजा, नुसैरी उद्या नमाजाला गेल्यावर तिथल्या अर्धशिक्षीत इमामाला विचारुन घ्या

In reply to by श्री गावसेना प्रमुख

मला कधीचा पडलेला एक प्रश्न आहे? धर्म बदलल्यावर त्यात असलेल्या कोणत्या जातीत मला जायचे आहे हा ऑप्शन असतो का? म्हणजे मी ज्यु आहे, आणी हिंदु होताना मला उच्चवर्णिय जात हवी असेल तर तस निवडता येते का ? की तिथे "सब घोडे बाराटके" !

मूळात आपण धर्माच्या व्याख्येतच चुकत आहात. आपण जे काही तुमच्या व्याख्येत म्हणालात ते धर्माचे अतिशय अवनत झालेले रुप आहे. माझ्या मते धर्म हे एक विशाल तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान समजुन घेण्यात आपल्या कुवतीप्रमाणे पुढे मागे होतो. उदा - जगत मिथ्या ही संकल्पना. आपण ह्याची पुरेपुर टर उडवली आधुनिक विज्ञान आता भौतिक वस्तु ह्या आभास आहेत हे मान्य करते. आता यात कुणाची बौधिक दिवाळखोरी होती ते बघा. यात आम्ही सगळे आधिक कसे शोधले होते असा टेंभा मिरवायचे नसून आपल्याच कामाची आपण कशी किंमत करतो हे दाखवायचे आहे. आपले चुकले हे की तत्वज्ञान पुढच्या पिढीत द्यायच्या ऐवजी आपण कर्मकांडे शिकवत राहिलो. मुळात तत्वज्ञान समजून घेऊन त्याचे अर्थ लावणे यापेक्षा ठराविक पद्धतीचे कर्मकांडांचे पालन करणे खुप सोपे गेले. पुढे जी परकिय आक्रमणे होत गेली त्यात तत्वज्ञानाचा निभाव लागणे शक्य नव्हते. समोरचा तलवार घेऊन गळा कापणार असताना त्याला "आत्मा अमर असतो" हे ऐकवणे कालसुसंगत नव्हते. आपसुकच मग कर्मकाडांचा प्रसार जोमाने होऊ लागला. आणि धर्मावर नको ती धूळ जमा होत राहिली. तुम्ही त्या धूळीलाच धर्म समजून बसला आहात. वेगवेगळ्या धर्माचे तत्कालिन संदर्भही वेगवेगळे असतात. हिंदु समाज हा ब-यापैकी स्थिर होता. ऐश्वर्यवान होता. धर्म तत्वज्ञानकडे झुकण्यात ही स्थिती कारणीभुत होती. दुसरीकडे इस्लाम उद्यच्यावेळी स्थिर समाज नव्हता. अश्या समाजाला प्रथम स्थिरता मिळताना तत्वज्ञानाचा उपयोग होणार नव्हताच. त्यामूळे तिथे 'आदेशांचे' प्रस्थ वाढले. पण पुढे मात्र कोणीही कालानरुप बदल केले नाही. जे केले गेले ते पुरेसे पडले नाहित. बाकी देवाचे म्हणाल तर आपल्या साध्या एका मशीलाही मेंटेनन्सची गरज असते आणि संपुण जग मात्र आपोआप चालते असे म्हणणे कुठल्या विज्ञानाच्या तत्वात बसते कुठास ठाऊक..

In reply to by शब्दानुज

बाकी देवाचे म्हणाल तर आपल्या साध्या एका मशीलाही मेंटेनन्सची गरज असते आणि संपुण जग मात्र आपोआप चालते असे म्हणणे कुठल्या विज्ञानाच्या तत्वात बसते कुठास ठाऊक..
जग आपोआप चालते की जग देव चालवतो यापेक्षा "हे जग कसे चालते हे आपल्याला अजून कळलेले नाही" हा विचार कसा वाटतो?

सिंजि,
तर जगातला सगळ्यात मोठा फिक्शनल सुपरहीरो म्हणजे देव
माझ्या मते जगातलं सर्वात मोठं फिक्शन म्हणजे आहार, निद्रा, भय आणि मैथुन होत. आ.न., -गा.पै.

बाकी देवाचे म्हणाल तर आपल्या साध्या एका मशीलाही मेंटेनन्सची गरज असते आणि संपुण जग मात्र आपोआप चालते असे म्हणणे कुठल्या विज्ञानाच्या तत्वात बसते कुठास ठाऊक.. >> आपल्याला आपण ज्या विश्वात राहता त्याचे भविष्य माहित आहे काय? जरा बिग क्रंच असे सर्च करुन बघा.मग हे मशिन मेंटेनंस वगैरे मेटाफोर डोक्यातुन निघून जातील.

In reply to by सिंथेटिक जिनियस

सर ज्याला उत्पत्ती आहे त्याचा विनाशही होणारच की मुद्दा असा आहे की आपण जन्मायच्या आधी आपणास संपुर्ण पोषक अश्या सगळ्या गोष्टी आधीच तयार असतात आोझोन आपले रक्षण करत असतो , पाणी उपलब्ध असते भुकेसाठी वनस्पती असतात आणि ही सगळी तयारी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपोआप होते ?

देव आहे की नाही या वादाला अंत नाही . मिपावरचे यनावालांचे लेख आणि त्यावरच्या लोकांच्या प्रतिक्रिया वाचून वाटतं बापरे किती हे पंडित , सखोल विचार करणारे बुद्धिमान लोक आहेत जगात .... ह्यांच्या मानाने आपण काहीच नाही .... पण एवढा प्रचंड काथ्याकूट करून आपलं देव आहे / नाही ह्याबद्दलच मत विरुद्ध मताच्या माणसास पटवून देताना यश आलेला मात्र कुणीच दिसत नाही ... उदा. आस्तिक माणूस देव आहे किंवा देव मानण्याची समाजाला गरज आहे हे किमान एका नास्तिकाला पटवून देण्यात यशस्वी झालेला दिसत नाही की एकही नास्तिक माणूस , इंक्लुडिंग यनावाला , देव नाही व त्याचे अस्तित्व मानण्याची समाजाला गरज नाही हे किमान एकाही आस्तिकाला पटवून देण्यात यशस्वी झालेला दिसत नाही . तरी आपलं मत जोरात मांडण्याचा आणि दुसऱ्यांना ते पटवून देण्याचा लोकांचा उत्साह काही कमी होत नाही हे बघून मिपाकरांच्या दुर्दम्य आशावादाचं मला खरंच कौतुक वाटतं . देव आहे किंवा नाही याबद्दल प्रत्येकाचं एक ठाम मत बनलेलं असतं आणि कुणीही कितीही बौद्धिक-वैज्ञानिक काथ्याकूट केलं किंवा आध्यात्मिक / तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या तरी ह्या ठाम मतात काडीइतका सुद्धा बदल होऊ शकत नाही तेव्हा याबाबतीतलं आपलं मत इतरांना पटवून देण्याचा व्यर्थ अट्टाहास करू नये असं आपलं माझं वैयक्तिक मत आहे ..... चूक की बरोबर मला माहीत नाही .

In reply to by nishapari

निशा ताई माणूस वादविवाद करतो तेंव्हा बऱ्याच वेळेस मी बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी. बहुसंख्य वेळेस बिनतोड युक्तिवाद केल्यावर समोरचा माणूस गप्प बसतो पण आपला दृष्टिकोन बदलत नाही. दृष्टिकोन बदलण्यासाठी त्या माणसाला त्याच्या विचारसरणी प्रमाणे पटवून द्यावे लागते. उगाच तुम्ही मूर्ख आहेत म्हणून सांगितले तर तो माणूस उलट दुसऱ्या टोकाला जाऊन हटवादी भूमिका घेतो. मी स्वतः वापरत असलेले उदाहरण देतो आहे. एखाद्या रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रीला "अंगावरून" जात असल्यामुळे सोनोग्राफी साठी पाठवले जाते. अशावेळेस गर्भाशयातील आतील आवरण बरेच वाढलेले असते. येथे १०-१५ % केसेस मध्ये कर्करोगाची सुरुवात असते. असे सांगूनही बरीच स्त्रिया काहीही करण्यास तयार नसतात. या स्त्रियांना मी शांत शब्दात सांगतो कि आपण तपासणी करून घ्या. काहीच केले नाही तरी ८५-९०% वेळेस आपल्याला काहीच होणार नाही. पण तुम्ही त्या ९० टक्क्यात आहेत का १० टक्क्यात आहात हे नक्की सांगण्यासाठी मी काही ज्योतिषी नाही. तुमच्या पत्रिकेत मृत्यू योग्य आहे कि नाही हे मी सांगू शकत नाही. तेंव्हा तेवढे आपल्या ज्योतिषाकडे खात्री करून घ्या. मागच्या वर्षी मी महिन्यात मला कर्करोग आहे हि खात्री असलेल्या स्त्रीला स्पष्ट सांगूनही ती होमियोपॅथी कडे गेली. तेथे सहा महिने घालवल्यावर डिसेम्बर मध्ये शेवटी गर्भाशय काढण्याची शल्यक्रिया केली तेंव्हा रोग दुसऱ्या टप्पयापर्यंत पोहोचला होता. आता तिला केमोथेरपी आणि रेडिएशन ची गरज पडत आहे. (जे सहा महिन्यापूर्वी केवळ गर्भाशय काढून काम झाले असते) तात्पर्य -- जीवाशी खेळ असला तरीही लोक आपला दृष्टिकोन सहजा सहजी बदलत नाहीत.

चालू द्या!! देव करो अन तुम्ही त्याला विसरण्यात यशस्वी होवो _/|\_

आमचे मत समजुन घेउन तुम्ही काय करणार आहात? विदा गोळा करुन तुम्ही पुढे काय करणार आहात?

ब-याच जणांना ही कथा माहित असेलच , ज्यांना माहिती नाही अशांसाठी - एकदा बुद्धांकडे एक आस्तिक मनुष्य आला. त्याने बुद्धांना विचारले की देव आहे की नाही ? बुद्ध म्हणाले की देव अस्तित्वातच नाही. दुस-या दिवशी एक नास्तिक मनुष्य आला त्याला बुद्ध म्हणाले की देव आहे. यावर बुद्धांचे शिष्य गोंधळून गेले आणि तोच प्रश्न त्यांनी बुद्धांना परत विचारला बुदध म्हणाले "जर नास्तिकला देव नाही असे उत्तर दिले असते तर त्याच्या अहंकारास खतपाणी मिळाले असते. आणि जर आस्तिकला देव आहे असे म्हटले असते तर त्याच्या अंधभक्तीला खतपाणी मिळाले असते. सत्य सापेक्ष असते मला तर वाटते की मुळात समजात दोन्ही विचारधारा असणे गरजेचे असते. एका गटाने दुस-या गटातील लोकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करण्याने फक्त आपला अहंकार सुखावतो. जगन्नाथ कुंटे यांचे एक वाक्य मला फार आवडते , ' ईश्वर असेल तर ठीक , जर तो नसेल तर निर्माण करा. '

आदिमानवाच्या अविकसित बुद्धीला पडणारे प्रश्न त्याच्या क्षमते बाहेरचे असल्याने त्याने सतत असणार्या अनिश्चिततेवर ,त्यातून येणार्या भीतीवर मात करण्यासाठी काही मानसिक,बौद्धिक दरिद्री कल्पना विकसित केल्या त्यात देव आणि धर्म याचा क्रमांक सर्वात वरचा लागतो.
सध्याला तुम्हाला पडणारे सारे प्रश्न हे तुमच्या क्षमतेच्या आत आहेत कि काय?

सतत असणार्या अनिश्चिततेवर ,त्यातून येणार्या भीतीवर
सततची भिती आणि अनिश्चितता ही आधुनिक जीवनपद्धतीची बांडगूळं आहेत. त्याचा प्राचीन जीवनाशी काही संबंध नाही.

In reply to by arunjoshi123

भीती , अनिश्चितता पुरातन काळापासून आहे. अशा परिस्थितीत उच्चवर्गीय प्राण्यांमध्ये अ‍ॅडरिनॅलिन नोरअ‍ॅडरिल्यानिन हार्मोन्स महत्वाचे असतात. त्यांचे आस्तित्व पुरातनकाळापासून आहे.

आदिमानवाच्या अविकसित बुद्धीला पडणारे प्रश्न त्याच्या क्षमते बाहेरचे असल्याने त्याने सतत असणार्या अनिश्चिततेवर ,त्यातून येणार्या भीतीवर मात करण्यासाठी काही मानसिक,बौद्धिक दरिद्री कल्पना विकसित केल्या त्यात देव आणि धर्म याचा क्रमांक सर्वात वरचा लागतो.
दरिद्री कल्पनांमधे १. आपण आणि निर्जीव वस्तू यांचेत गुणात्मक फरक नाही २. आपण सजीव शून्यातून फुकटात पैदा झालो ३. आपले सद्य रुप, स्वरुप हे रँडम आहे, अपघाती आहे (मनमोहन सिंग फेम) ४. पदार्थांच्या सुनिश्चित नियमांमुळे आपण किंवा कोणिही वा काहीही काय विचार करेल, वागेल, कृती करेल, इ इ पूर्वीपासून सुनिश्चित आहे. ५. आपल्याला फ्री विल नाही. पदार्थाचे गुणधर्म आहेत. ६. या जगातलं कोणी आपल्याला काही लागत नाही. इहलोकीची यनाछाप आनंदयात्रा आनंददायी करण्यासाठी काहिही विकृत गोष्ट केली तरी स्वागत आहे. (हिटलरने हत्या केल्या. पण आज आपण त्याला काही म्हणू शकत नाही. कारण तो आज नाही. आपलं बोलणं फक्त वर्णनात्मक असेल. आरोपात्मक वा क्रोधात्मक असणं मूर्खपणा आहे. कारण तो नाही.) ७. जगात योगायोगानं सगळं काही होतं. (तुम्ही संध्याकाळी ऑफिसातून घरी जाता हा कंप्लिटली फ्रेश नास्तिकी वैश्विक योगायोग असतो. तसे तुम्ही ज्या कोण्या स्थळी आहात तिथून जे अनंत व्हेक्टर निघतात, पैकी कोणत्याही एका रँडम व्हेक्टरच्या दिशेनं जायचा प्रयत्न रोज तुम्ही करत असता. आणि रोज नेमके घरी पोचता!!). आफ्रिकेतनं माणूस जेव्हा युरोपात जातो, तेव्हा तिथे म्यूटेशनने त्याच्या २५६ त्वचेचे रंग असलेल्या स्पेसिस बनतात. २५५ मरतात नि एक पांढरा रंग उरतो. अशी स्टोरी असायला हवी. पण नेमकं एकच पांढर्‍या चमडिचं म्यूटेशन होतं आणि ते जगतात. ८. जगणं लै अवघड आहे आणि सर्व सजीवांनी एकमेकांशी हाणामारी नै केली तर सगळे मरतील... अश्या आधुनिक, पुरोगामी, विज्ञानवादी, वाणिज्यवादी कल्पना सर्वात सडक्या आणि किडक्या आहेत.

देव आणि धर्म यावर बर्याच लोकांचा विश्वास असतो याचं कारण माणुस उत्क्रांत होत असताना त्याला या गोष्टींचा नक्कीच फायदा झाला असणार.
आजही माणसाचं उत्क्रांत होणं बंद नाही झालेलं.

In reply to by arunjoshi123

आजही माणसाचं उत्क्रांत होणं बंद नाही झालेलं.
आणि मागच्या शे दोनशे वर्षातील उत्क्रांतीचा वेग अतिप्रचंड आहे.

In reply to by सतिश गावडे

मी तर वाचलय कि मागचे दहा हजार वर्षे उत्क्रांतीचा वेग स्टेबल आहे म्हणुन. मागचे दोन शतकं मानव निसर्गाच्या सान्निध्यापासुन लांब जात राहिला. सध्या तर आपण एकदम कोषात गेल्यासारखे वागतोय. अन्न, भिती/संरक्षणाच्या प्रेरणांना प्रतिसाद, तयार रासायनीक मटेरीअलचं शरीरात जाण्याचं प्रमाण, माति-वारा-ऊन इत्यादी एलिमेण्ट्सचा शरीरस्पर्ष वगैरे बाबतीत आजचा मानव दोन दशकांपुर्वीच्या मानवापेक्षा एलियन वाटावा इतका बदल झाला आहे. पण त्यामुळे उत्क्रांती प्रोसेसचा वेग वाढावा असं काहि झालेलं नाहि.

आदिमानवाच्या अविकसित बुद्धीला पडणारे प्रश्न त्याच्या क्षमते बाहेरचे असल्याने
आदिमानवाचा आणि तुमचा (जास्तीच्या बुद्धीसाठी जबाबदार असलेला) निओकोर्टेक्स सारख्याच क्षमतेचा आहे. ------------------------------------ अनेक आदिमानवांचा निओकोर्टेक्स (म्हणून बुद्धी, म्हणून त्यांनी विकसित केलेल्या ईश्वरादि संकल्पना) तुमच्या १९-२० प्रगत असायची संभावना आह्हेच.

लेखक ,तुमचा देवा धर्माचा अभ्यास काय ? धर्म म्हणजे काय हे कळतो का तुम्हाला ? देवाचा संबंध तुम्ही धर्माशी लावला आहे यातच तुमची बौद्धिक दिवाळखोरी दिसून येते .गणपती अथर्वशीर्ष पठाण हा तुम्हाला केवळ खेळ का वाटतो ? त्याचे परिणाम तुम्हाला माहित आहेत का ? तुम्हाला काहीही माहित नसताना बालिश बुद्धीच तुम्ही प्रदर्शन केलंय

In reply to by तुडतुडी

गणपती अथर्वशीर्ष पठनाणे काय परिणाम होतो? ( उत्सुकतेपोटी प्रश्न विचारला आहे, गैरसमज करून घेऊ नका)

In reply to by विशुमित

युट्युब वर सुरेश वाडकरांनी म्हटलेलं अथर्वशीर्ष आहे. अगदी ५-६ मिनीटाचं. स्त्रोत्र पठणाची फलश्रुती वगळली आहे त्यात. काहि दिवस तसं प्रॅक्टीस करुन बघा. छान वाटेल.

In reply to by अर्धवटराव

काहि दिवस तसं प्रॅक्टीस करुन बघा. छान वाटेल.
याला "देवाचे काही केले, देवळात गेले की छान वाटते" हे आपले लहानपणापासूनचे "कंडीशनिंग" कारणीभूत असेल का? संगीत आणि नाद यांनी मन प्रसन्न होते. मग ती शिव तांडव स्तोत्रातील नादमयता असो वा ताल चित्रपटाच्या शीर्षक गीतातील रेहमानचे बीट्स.

In reply to by सतिश गावडे

याला "देवाचे काही केले, देवळात गेले की छान वाटते" हे आपले लहानपणापासूनचे "कंडीशनिंग" कारणीभूत असेल का?
नाहि. केवळ मानसीक समाधानाच्या दृष्टीने मी हे सांगत नाहिए.
संगीत आणि नाद यांनी मन प्रसन्न होते. मग ती शिव तांडव स्तोत्रातील नादमयता असो वा ताल चित्रपटाच्या शीर्षक गीतातील रेहमानचे बीट्स.
हे ऐकण्याच्या बाबतीत झालं. मी उच्चारांच्या बाबतीत म्हणत होतो. श्वासांची लय, बॉडी पोश्चर, उच्चारांची आवर्तनं इत्यादींच्या परिणामांबाबतीत मी "छान वाटेल" म्हटलय. अर्थात, शरीरशास्त्र दृष्ट्या नेमकं काय होतं हे कोणि एक्स्पर्ट सांगु शकेल. मी केवळ अथर्वशीर्ष पठणाचा अनुभव सांगितला.

In reply to by सतिश गावडे

पण एक नक्की कि आपण ज्याला लाईफ एक्स्पिरिअन्स म्हणतो ते आपल्या सामन्य जाणिवेपेक्षा कितीतरी सखोल आणि विषाल असु शकतं. आणि त्याची अनुभूती घ्यायची असेल तर आपले नॉर्मल पर्सेप्शन सुद्धा तेव्हढेच सखोल आणि विषाल बनवणं आवश्यक असतं. हे केवळ सायकोलॉजी लेव्हलला डेव्हलप करुन भागत नाहि तर एकुणच सिस्टीम अपग्रेड करायला लागते. ति तशी अपग्रेड करण्याच्या अनेक उपायांपैकी एक उपाय म्हणजे उपरोक्त पठण. अर्थात, ते तसं कराय्चं कि नाहि हे ज्याच्या त्याच्या आवडीवर अवलंबुन आहे.

In reply to by तुडतुडी

>> त्याचे परिणाम तुम्हाला माहित आहेत का ? हे परिणाम मला माहिती नसल्यामुळे मला त्याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. संकतानाशन गणपती स्तोत्राची फलश्रुती:
विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं | पुत्रार्थी लभते पुत्रां मोक्षार्थी लभते गतिम्
अशी आहे. या स्तोत्राची फलश्रुतीही अशीच आहे का?

माणूस उत्क्रांत झाला आहे हे खरं कोणी पाहिलं आहे का ? सायन्स सांगतं म्हणून त्यावर विश्वास ठेवायचा . कुणी बघितलंय ? इतक्या वर्षांपूर्वी तुम्ही होतात का ? हि सायंटिफिक अंधश्रद्धाच आहे कि

In reply to by तुडतुडी

समजा उत्क्रांतीवाद वास्तव असले तरी त्या ज्ञानाचा वापर करुन मानवी जीवन सुखकर, सुसह्य करण्यास हातभार लागेल असे "अप्लाईड सायन्स" असल्याचे माझ्या वाचनात नाही. तसे असल्यास त्याबद्दल अधिक वाचायला आवडेल. आजच्या घडीला उत्क्रांतीवादाचा मुख्य वापर होतो तो "हे जग देवाने घडवलेले नाही" हे पारंपारीक मत खोडून काढण्यासाठी.

मोठा इरेला पेटून देव आहे की नाही याविषयी नेहमी चर्चा होत असतात. मी आजही देवपूजा करतो पण देवभक्ती करीत नाही. कारण पूजा आपल्या आप्तेष्टांच्या समाधानासाठी करावी लागते. देवभक्ती करीत नाही कारण देव नावाची कोणी विचार करीत असलेली संस्था आहे यावर माझा विश्वास नाही. लहानपणी होता. शक्तीरूपेण संस्थितः असा देव॑ असेल तर तो माझ्याहून भिन्न नाही असे माझे मत झाले आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी असा असेल तर तो आहे असे माझे मत आहे. तो भक्तीने " पावत असतो " यावर माझे मत नकारार्थी आहे. येथील काही जन म्हणतील विसंगत व गोंधळलेली " इतकी सिरियस" केस आम्ही पाहिली नाही ! असो . त्यांचा हा निष्कर्ष त्यानाच लाभो. आता स्वतः ला एक प्रश्न स्रर्वानीच विचारावा तो असा... १. रूढार्थाने देव आहे यावर तुमचा विश्वास आहे का........ माझे उत्तर. "नाही". २. रूढार्थाने दैव या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे का .... माझे उत्तर " आहे" ३. रूढार्थाने मन या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे का ..... माझे उत्तर " होय" . देव, दैव व मन या तिन्ही गोष्टी अव्यक्त आहेत तरीही मन आहे का व दैव आहे का यावर कोणीच वाद का घालीत नाहीत तो देवाच्या " असलेपणा" विषयीच का घालतात ? याचे उत्तर ज्याला सापड्ले तो भाग्यवान !

मोठा इरेला पेटून देव आहे की नाही याविषयी नेहमी चर्चा होत असतात.
याला दोन्ही बाजूंचा अहंकार कारणीभूत आहे असं माझं मत आहे. देव नाही असे कुणी म्हटले की टोकाचे श्रद्धावन्त, स्वयंघोषित धर्मरक्षक, धर्ममार्तंड शेपटावर पाय पडल्यासारखे चवताळून उठतात. यांच्या जोडीला ढोंगी संधीसाधू आपले हितसंबंध जपण्यासाठी श्रद्धेच्या तव्यावर आपली स्वार्थाची पोळी भाजून घेऊ पाहतात. याच्या उलट गोष्ट टोकाच्या नास्तिकांची. हे स्वतःला राजहंस समजतात आणि श्रद्धावंताना बगळे. कुणी जर श्रद्धेने मूर्तीवर डोकं टेकत असेल तर हे टाळ्या पिटून म्हणणार , "बघा बघा हा मूर्ख कसा दगडावर डोकं टेकवत आहे". आपल्या खंडप्राय अशा विकसनशील देशात श्रद्धेला सरसकट विरोध उपयोगाचा नाही. जिथे मूलभूत आरोग्य सेवा उपलब्ध नाहीत किंवा असल्यास आर्थिक कुवतीबाहेरच्या आहेत तिथे मानसिक आरोग्य मिळणे ही खूप दूरची गोष्ट झाली. अशा वेळी सामान्य माणसाला ताण-तणावाच्या, दुःखाच्या प्रसंगी देवावरील श्रद्धेचाच आधार असतो. मात्र श्रद्धेचा अतिरेक होऊन त्याचा व्यक्तीला, समाजाला उपद्रव होत असेल तर अशा श्रद्धांना कडाडून विरोध केला पाहीजे. स्वतःच्या तसबिरीची, बिलल्याची, आणि पेनांची दुकाने थाटून बसलेल्या बाबा, बुवा आणि महाराज रुपी देवाच्या स्वयंघोषित दलालांच्या आहारी जाण्यापासून लोकांना परावृत्त केले पाहीजे.

मिपाकरांची लाईफटाईम एंटरटेनमेंट करणा-या सिंथेटिक जिनियस यांची अवतारसमाप्ती झाली आहे. ते लवकरच नवीन अवतार धारण करून मिपाकरांची एंटरटेनमेंट करण्याचे आपले अपूर्ण कार्य नव्या जोमाने सुरू करतील अशी श्रद्धा आहे.