मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निवडुंग तरारे इथला....

अनन्त्_यात्री · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
In Flander's Fields ही एक प्रसिद्ध युद्धकविता. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान डॉक्टर, सैनिक व कवी असलेल्या डॉ. जॉन मॅक-क्रे यांनी बेल्जीयम मधल्या Ypres इथल्या युद्धात मरण पावलेल्या आपल्या मित्राच्या स्मरणार्थ लिहिलेली. एका अनाम युद्धक्षेत्रावर लढताना वीरगती मिळालेल्या अनाम सैनिकांचं हे भावविभोर मनोगत. युद्ध निषेधार्ह असतं, घातक असतं, निरर्थक असतं हे सर्व जरी खरं असलं तरी अजूनही ते आधुनिक जगातलं एक अटळ वास्तव आहे. म्हणूनच ही कविता आजही वाचताना मनाला चटका लावून जाते. ही मूळ कविता व तिचा मी केलेला भावानुवाद. In Flanders fields the poppies blow Between the crosses, row on row, That mark our place; and in the sky The larks, still bravely singing, fly Scarce heard amid the guns below. We are the Dead. Short days ago We lived, felt dawn, saw sunset glow, Loved and were loved, and now we lie In Flanders fields. Take up our quarrel with the foe: To you from failing hands we throw The torch; be yours to hold it high. If ye break faith with us who die We shall not sleep, though poppies grow In Flanders fields. भावानुवादः निवडुंग तरारे इथला प्राशून आमुचे रक्त गुदमरे शीळ पक्ष्यांची फैरींच्या आवाजात.....या अनाम धारातीर्थी सळसळते जीवन जगलो मरणाला भिडण्याआधी रक्तात विरक्ती नव्हती समरात सांडण्याआधी....या अनाम धारातीर्थी हातांत अपार्थिव अमुच्या सूडाचे पलिते जळती कुणि वारस हौतात्म्याचे देतील अम्हाला मुक्ती ?....या अनाम धारातीर्थी

वाचने 4338 वाचनखूण प्रतिक्रिया 9

चांदणे संदीप 11/12/2017 - 09:13
प्रयत्न चांगला आहे पण मूळ कवितेतून उभे राहणारे चित्र वेगळे आणि अनुवादातल्या कवितेतले चित्र वेगळे भासते आहे. एक स्वतंत्र कविता म्हणून उत्तम वाटते आहे. Sandy

In reply to by चांदणे संदीप

आनन्दा 11/12/2017 - 09:35
असंच मलादेखील आधी वाटत होतं, पण मी 4 5 वेला दोन्ही वाचलं, तर साधारण भाव तोच आहे, तपशील जुळत नसले तरीदेखील..

अनन्त्_यात्री 11/12/2017 - 09:51
अनुवाद नव्हे. त्यामुळे, आनन्दा यांनी म्हटल्याप्रमाणे..........तपशील जुळत नसले तरीदेखील..भाव तोच आहे -प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

In reply to by अनन्त्_यात्री

चांदणे संदीप 11/12/2017 - 14:44
भाव तोच आहे मूळ कवीची चिमणी बेडर उडते, गाते आहे... तुमचा पक्षी मात्र गुदमरला आहे! परत परत वाचून पाहिली तरी मूळ कवितेचा भाव येईना. माझाच भाव घसरला असावा बहुतेक! ;) Sandy

गबाळ्या 16/12/2017 - 04:12
अनन्त्_यात्री, मला तुमची कविता आवडली. -------------------------------- मूळ कवितेच्या संदर्भाशिवाय फक्त एक कविता म्हणून मला जाणवलेले भाव -------------------------------- रक्त प्राशुन तरारणारा निवडुंग आवडला. सैनिकांचे जीवन अतिशय खडतर असते. दऱ्या, डोंगर, वाळवंट अशा ठिकाणी देशरक्षणासाठी ते झटत असतात. त्यांचे रक्त झेलायला गुलाब पाकळ्या येत नाहीत तर त्यांच्या नशिबी असतो तो निवडुंग. त्याच प्रमाणे सैनिकांची हि उद्वेगता आहे कि आम्ही इथे आमचे रक्त सांडून (जीव देऊन) देशाचे रक्षण करतो परंतु या देशात जन्म घेतात ती निवडुंगासारखी माणसे. जी शुष्क, काटेरी आणि स्वतःत गुरफटलेली असतात. मिळेल ते (पाणी) हडप करून फक्त स्वतःच्या अस्तिस्त्वातची चिंता करतात. ज्या प्रमाणे निवडुंगाचा ना सावली म्हणून उपयोग होतो ना अन्न म्हणून ना सरपण म्हणून. तसेच हे लोक स्वार्थी आहेत, देशबांधवांच्या हितासाठी एकत्र येत नाहीत, मदत करत नाहीत. आमच्या रक्तावर पोसले जाणारे हे निवडुंगच आहेत. स्वछंद्पणे उडणारा पक्षी हे स्वातंत्र्याचे द्योतक आहे. आणि संगीत, गुणगुणणे ने आनंदाचे द्योतक आहे. युद्धामुळे हे स्वातंत्र्य आणि देशवासीयांचा आनंद धोक्यात आला आहे. परंतु प्रसंगी रक्त सांडुनही आम्ही त्यांचे रक्षण करू. ते आमचे देशवासी आहेत, बंधू आहेत. मग ते चांगले लोक असोत वा निवडुंग. सुंदर भावना !!! -------------------------------- मूळ कवितेचा भावानुवाद म्हणून मला जाणवलेले भाव -------------------------------- "poppies", हे अतिशय रंगीत आणि आकर्षक फुल आहे. ते हिरवळीत वाढते. ते सळसळत्या चैतन्यचे द्योतक आहे. त्यामुळे "निवडुंग" हे साधारपणे नकारार्थी, दुष्काळी, कोरडेपणासाठी वापरले जाणारे द्योतक हे मूळ कवितेचे भाव अगदी उलट करतात असे वाटते. "The larks, still bravely singing, fly" मूळ कविता सांगतेय कि आम्ही रक्त सांडून आमच्या देशाचे आमच्या सीमेचे रक्षण करतोय आणि त्यामुळेच आमच्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित आहे. माझे देशवासी स्वछंदी पक्षाप्रमाणे स्वतंत्र आहेत, मुक्त आहेत आणि स्वबळावर उभे आहेत. परंतु "गुदमरे शीळ पक्ष्यांची" हे नेमके त्याच्या विरुद्ध वाटते आहे. "रक्तात विरक्ती नव्हती" - मूळ कवितेत सैनिक आधी विरक्त/त्यागी नव्हता असे कुठेहि दर्शिवले नाही. मरणाआधी त्याने जीवनाचा सुंदर आनंद घेतला एवढेच सूचित केले आहे. "रक्तात विरक्ती नव्हती" मुळे सैनिकाला विनाकारण एक नकारत्मकतेची किनार लागल्यासारखे वाटले. देशप्रेम सैनिकाच्या रक्तातच असते म्हणूनच ते बाकी गोष्टींचा त्याग करून सैन्यात जायला तयार होतात.

अनन्त्_यात्री 19/12/2017 - 14:33
आपल्या सविस्तर मुद्देसूद समीक्षेबद्दल मनःपूर्वक आभार.