Skip to main content

विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा!

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 20/08/2017 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा! मागे एकदा कुठेतरी ज्ञानेश्वरी तले विज्ञान किंवा असेच काहीतरी भन्नाट लिहिलेला लेख वाचला होता. त्यात म्हणे ज्ञानेश्वरांना ऋतुचक्र, मानसशास्त्र, ते अगदी प्रसूतिशास्त्र यांची साद्यंत माहिती कशी होती आणि त्याचे संदर्भ ज्ञानेश्वरीत कसे ठायी ठायी सापडतात याचे रसभरीत वर्णन केलेले होते. तसाच काहीसा लेख समर्थ रामदासांवर सुद्धा वाचण्यात आला. मला वाटतं पावसाळ्यात जशा रोगाच्या साथी येतात हा तसाच काहीसा हा प्रकार असावा...एक पुण्यात राहणारे लेखक(?) जे चांगले mbbs डॉक्टर आहेत त्यांनी तर अशा विषयांवर भरपूर पुस्तकं लिहिली आहेत. माणूस डॉ आहे म्हणून आमच्या वडलांनी ती घेतली आणि भयंकर निराशा झाली. रामायणात जम्बो जेट काय, महाभारतात अण्वस्त्र काय, सूक्ष्मदर्शक आणि टेस्ट ट्यूब बेबी काय.राम राम राम ....हे म्हणे स्वतः योग सामर्थ्याने मंगळावरगेले होते आणि त्यांची निरीक्षणं चक्क नासाने खरी मानली आहेत.(नासाला कामधंदे नाहीत) ...असो माझा एक मित्र आहे-देवधर म्हणून ... त्याची बायको भांडारकर संस्थेत जुन्या संस्कृत ग्रंथांचे भाषांतर करायचे काम करते. माझी तिची नुकतीच चर्चा झाली कि बुवा हे जे वेदकाली विमान ,अंतराळ यान , ब्रह्मास्त्र म्हणजे atom bomb अशा गोष्टी होत्या असं आम्ही ऐकतो, वाचतो त्यात काही तथ्य आहे का? यावर तिने सांगितलेली माहिती उद्बोधक ठरेल. एक तर काय असत कि जुने ग्रंथ, जुने ग्रंथ असे जे महणतात ते फार फार तर ८ व्या किंवा ९ व्या शतकातले असतात ते सुद्धा अत्यंत जीर्ण आणि तुटक. त्या आधी चे ग्रंथ असे मिळत नाहीत, शिलालेख, ताम्रपत्र मिळतात आणि ते अत्यंत महत्वाचे पण ते म्हणजे ग्रंथ नाही त्यातली माहिती त्रोटक आणि मुख्य म्हणजे फक्त मथळे(NOTICE BOARD) स्वरुपाची असते. आता यावरून प्राचीन भारतात उच्च तंत्रज्ञान होते अशी खातरजमा करता नाही आली तरी ह्या गोष्टी निखालस खोट्या आहेत असंही काही खात्रीलायकरित्या म्हणता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे ग्रंथ जरी जुने असले तरी ते अस्सल असतात असे नाही म्हणजे त्यात प्रक्षेप असतात उदा महाभारत या ग्रंथाचे घेतले तर महाभारताची जी चिकित्सक आवृत्ती आहे की जी अनेक थोर इतिहास संशोधकांनी ( सुखटणकर, कोसंबी, मिश्र वगैरे )अनेक वर्षांच्या अनंत परिश्रमांन्द्वारे सिद्ध केली आहे तिच्या मध्ये सुद्धा प्रक्षेप आहेत पण ते साधारणतः २ रया किंवा ३ रया शतकातले. म्हणजे आपण असे म्हणू शकतो कि हि महाभारताची चिकित्सक आवृत्ती आपल्याला साधारण ई स १५० च्या सुमारास प्रचलित असलेल्या महाभारतकथे कडे घेऊन जाते. आता तुम्ही विचार करा इतक्या महान इतिहास संशोधकांना इतक्या प्रचंड मेहनती नंतर जर सर्वांना माहित असलेल्या महाभारत कथेच्या त्यातल्या त्यात अस्सल प्रती पर्यंत पोहोचायला एवढा त्रास होत असेल तर आजकाल उठ सुट कोणीही लुंगासुंगा प्राचीन भारतात विमाने , अंतराळ याने, अण्वस्त्रे आणि काय काय शोधून काढतात त्यांच्या विश्वासार्हते बद्दल आपण काय बोलावे. आता रामायणात येणारा पुष्पक विमानाचा उल्लेख घ्या, एक तर हा एक प्रक्षेप आहे. तो नंतर कुणीतरी घुसडला आहे पण चला घटकाभर पुष्पक विमान होते असे गृहीत धरले तर ते कोणत्या इंधनावर चालायचे ते इंधन कुठून मिळायचे ? ते शुद्ध कुठे आणि कसे करायचे ? जिथे बनवले तिथून विमानापर्यंत कसे आणायचे? रथातून कि गाढवावर लादून?कि आजच्या सारख्या रेल्वे गाड्या , मोटारी डांबरी सडका होत्या तेव्हा? असतील त्याचे उल्लेख कसे कुठे नाहीत? कसे असतील कुणा शहाण्या माणसाने आपल्या गोष्टीवेल्हाळ स्वभावाला अनुअसरुन एक छान गोष्ट रचून दिले घुसडून झाले, अन काय? आणि एकच विमान बनवले विमानांचा ताफा नाही? कमाल आहे तीच गोष्ट अण्वस्त्रांची, अण्वस्त्र म्हणजे काय दिवाळीचे आपट बार आहेत का? ती अण्वस्त्र काय घोडागाडी(रथ) किंवा बैल गाडीतून तीर कामठ्याने हात दोन हात दूरवरच्या शत्रूवर मारायचे, एव्हढा मोठा अणुबॉम्ब असा टाकायचा, तर काही क्षेपणास्त्र वगैरे नाही ? कमाल आहे? अण्वस्त्र बनवायला लागणारे तंत्रज्ञान होते मग क्षेपणास्त्र बनवायचे नव्हते ते सोडा सध्या तोफा सुद्धा नव्हत्या तेव्हा. आता मूळ मुद्दा, त्याचं असं आहे कोणी ऋषी मुनी तप:सामर्थ्याच्या जोरावर एखादे विमान किंवा तत्सम गोष्ट बनवू शकत नाही (तसच ते बनवत असतील असं कुणाच म्हणण असेल तर मग प्रश्नच मिटला)विमान सोडा एक साधा विजेचा दिवा बनवायचा म्हटला तर काय गोष्टी लागतात बघा . १) विजेचा शोध, उत्पादन आणि खात्रीशीर असा पुरवठा / वितरण करणारी यंत्रणा(नुसता दिवा पेटवायला नव्हे तर बनवायला सुद्धा) २) अत्यंत पातळ आणि स्वच्छ पारदर्शक काच बनवण्याची परिष्कृत पद्धती. ३) Tungston सारख्या धातूंचा शोध उत्पादन तसेच त्यांच्या गुणधर्माची छाननी करणारी सुसज्ज प्रयोग शाळा आणि metallurgy सारख्या शास्त्राचा पुरेसा विकास.शिवाय त्याचे अत्यंत पातळ तंतू (फिलामेंट) बनवण्याची पद्धत. ते सोडा, दिवा बनवण्याच्या निरनिराळ्या विभागात द्यायला drawings च्या असंख्य प्रती काढण्यासाठी छपाईचे तंत्र.ते लागेल कि नाही? (वेदामध्ये काचेचा उल्लेख नाही तसाच लोखंडाचा हि नाही, कोळशाचा हि नाही . वेदाइतक्याच जुन्या आणि कदाचित त्यांची जन्मभूमी असलेल्या सिंधू संस्कृतीच्या अवशेषात काच, लोखंड, कोळसे सापडत नाहीत. आपल्या पुराणांमध्ये विमानाचे विविध अस्त्रांचे उल्लेख आहेत पण तुम्ही अनेक आधुनिक विज्ञानकथाकारांच्या गोष्टी वाचल्या तर तुम्हाला त्या सुद्धा तशाच खऱ्या वाटतील पण त्या माणसाच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत, खऱ्याखुऱ्या नाही.) आणि या सगळ्या पेक्षा महत्वाच म्हणजे प्रयोजन आणि बाजारपेठ. जर साधे तेलाचे दिवे पेटत असतील तर विजेच्या दिव्याच्या साह्याने उजेड पाडायचा कशाला? एव्हढे उपद्व्याप करून विजेचे दिवे बनवून जर घ्यायला खात्रीची बाजारपेठ नसेल तर कोण हा धंदा करेल. रामायण महाभारत या चांगल्या, मनोरंजक कथा आहेत असच नाही तर तो आपला इतिहास सुद्धा आहे हे खर पण इतिहास इतिहास म्हणून शिवाजी महाराजांना भवानी माता खरोखर प्रसन्न झाली आणि भवानी तलवार दिली यावर विश्वास ठेवण वेडेपणाच नाही का? ( खरच भवानी प्रसन्न झाली असती तर तिला महाराजांना एखादी AK47 द्यायला काय हरकत होती? भवानी मातेला काय अशक्य आहे?) एक नीट समजून घ्या, तंत्रज्ञानाचा विकास आणि समाजात सर्वदूर त्याचा प्रसार सरंजामशाही कधीच करत नाही. त्यांना सर्वसामान्य लोकांना गुलाम करण्यासाठी त्यांना अज्ञानात आणि मागास ठेवण भाग असतं. भांडवल शाही जरी सरंजामशाहीशी हातमिळवणी करून मजूर गुलाम वर्गाला सुरुवातीला वेठीला धरते, त्यांचे शोषण करते असे दिसले तरी त्यांच्या स्वतःच्या फायद्या साठी तरी त्यांना एका मर्यादे नंतर लोकांचे राहणी मान उंचावण्यासाठी/ त्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी अनिर्बंध शोषणाला आळा घालावा लागतो. लोकांची क्रयशक्ती अचानक घटली तर कसा हाहाकार उडतो ते मी काय वेगळ सांगायला हवं का ? समजा एक शाम्पू विकत घ्यायची लोकांची ऐपत नसेल तर कुणी धंदा करावा कसा? आणि खायची प्यायची भ्रांत असलेला गरीब गुलाम माणूस शाम्पू का विकत घेईल? त्याची, त्याच्या बायकोची चार लोकात उठ बस आणि किमान प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता असेल तर तो हा खर्च करून स्वतःला/ स्वतःच्या बायकोला सुंदर दाखवायचा प्रयत्न करेल.त्याची दोन वेळची खायची प्यायची सोय झाली तर तो पुढे पुढे काही जास्त खरेदी करू लागेल आणि उद्योग धंद्या शिवाय हे शक्य आहे का? सरंजामशाहीत मोठ मोठे शोध लागून त्याची उपयुक्तता पटल्यावर सरंजामशाही सरकार त्यांना स्वीकारते आधी संशोधकांना पदरमोड करून शोध लावावे लागतात. भांडवलशाहीत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कमी खर्चात जास्त उत्पादन करण्यासाठी संशोधकांना उद्योग प्रोत्साहन देतात. आपले वेद , रामायण, महाभारत, हे सरंजामशाही समाजव्यवस्था दाखवतातच पण तेव्हा उद्योग आणि औद्योगीकरण हा प्रकारच नव्हता.तो काळ एकवेळ, सोडा आपल्या पेशवाईच्या शेवटी शेवटी म्हणजे १९व्या शतकाच्या सुरुवातीला सुद्धा आपल्याकडे छापील नकाशे बनवायचे तंत्र , होकायंत्र , दुर्बिणी नव्हत्या आपण त्या इंग्रज, पोर्तुगीजांकडून विकत घ्यायचो. साधे शेतातले नगराचे फाळ लोखंडी करायाल २० वे शतक उजाडावे लागले. अन सुरुवातीला लोकांनी आगगाडी मध्ये बसावे म्हणून ब्रिटीश सरकार पैसे देत असे. आपल्याकडे औद्योगीकरण सुरु झालं तेच मुळी १९ व्या शतकाच्या शेवटी आणि ते सुद्धा जुजबी. तेव्हा आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान असावा पण असं उगाच कुणी सुबुद्ध माणूस टर उडवेल असे काही करू नये त्याने या वारशाचाच अपमान होतो. असं नाही वाटत तुम्हाला . हा प्रश्न नास्तिक, आस्तिक, पुरोगामी, मूलतत्ववादी असा नाही. साधा बुद्धी आणि तर्काचा आहे. आदित्य---
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 50518
प्रतिक्रिया 148

प्रतिक्रिया

In reply to by स्पा

मला तर प्रतिसादांपेक्षाही त्याची चिकाटी जास्त आवडली, शिकण्यासारखं आहे.

सर्वसाधारणपणे चर्चेचा किंवा प्रतिसादातल्या मुद्द्यांचा एक सूर म्हणजे आमचे पूर्वज बावळट होते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? त्याना काहीच येत नव्हते का? अशा प्रकारे चालला आहे.तसे मला तरी मुळीच म्हणायचे नाही. त्यात दिल्लीच्या लोह्स्ताम्भाने अनेकाना(मला सुद्धा) बुचकळ्यात टाकलेले आहे. पण मग फक्त तो लोह स्तंभ च का दमास्कस स्टील( हे मुळचे भारतीय स्टीलच होते)जपान्यांच्या कताना तलवारी अशा अनेक गोष्टी आहेत. प्राचीन भारतीयांनी खगोलशास्त्रात बरीच प्रगती केली होती तशीच धातुशास्त्रात, स्थापत्य शास्त्रात ही केली होती. सिंधू संस्कृती ने वापरलेले स्थापत्य आणि नगर रचना शास्त्रे आणि पाण्याचे नियोजन पाहून तर आजही लोक चकित होतात.सांडपाण्याचा निचरा करायची पद्धत जी ते वापरत ती तर बलाढ्य रोमनसाम्राज्यातले लोकही वापरत नसत.चाकाचा शोध लागलेला नसताना इंका संस्कृतीने आपली प्रचंड मोठी आणि सुनियोजित नगरे उभारली आणि भरभराटीला आणली. प्राचीन काळातली भारतीय संस्कृती थोर/ महान (किंवा इतर अशी कोणतीही संस्कृती समाजव्यवस्था )होती हे सांगायला आजच्या काळातले सर्व शोध आम्ही आधीच लावले होते हे सांगण्याची जी चढ ओढ सध्या सगळीकडेच सुरु आहे ती हास्यास्पद आहे. कुणीतरी प्रश्न विचारला कि आजची जी विमान उडतात ती जे तंत्राद्यान वापरतात त्यापेक्षा वेगळे तंत्रज्ञान वापरून विमान उडू शकतच नसेल का? नक्कीच तसे होऊ शकते, माणसाने उदयाचा प्रयत्न करण्या आधी जवळपास ६ वेळा निसर्गाने उडण्याचे निरनिराळे यशस्वी प्रयोग केले आहेत.आज आपण सर्रास वापरणारे जेट इंजिन आधी पूर्वी वापरत असलेले IC इंगीने ह्यात जमीन अस्मानचा फरक आहे. मग? त्याचे काय. ह्या सगळ्या बरोबर त्याकाळातली समाजव्यवस्था तिच्याकडे आपण बघुयात का? रामाने आणि रावणाने विमान प्रवास केला त्यांच्या काळातले सर्व सामन्य नागरिक असे किती जण विमान प्रवास करीत? काही उल्लेख आहेत का? रामायण महाभारत व्यास आणि वाल्मिकी कशाला त्यामानाने अगदी अर्वाचीन अशा लिओनार्डो द विन्ची चे उदाहरण घ्या. त्याने आजचे हेलीकॉप्तर सदृश उड्डाण यंत्र कसे बनवता येईल ह्याचे अगदी डिटेल रेखाचित्र केले होते. तशा त्याने आधुनिक काळातले रणगाडे/ आर्मर्ड वाहन जसे असतात तसे चिलखती वाहनसुद्धा डिझाईन केले होते पण इंजिन वगैरे सोडा, अलुमिनियाम सारख्या हलक्या धातूचा शोध लागला नसल्याने ते त्याला प्रत्यक्षात नाही आणता आले. एखादा पुराण मताभिमानी अजून १००० वर्षाने हे असले रणगाडे हेलीकॉप्तर आमच्या हुशार पूर्वजांनी आधीच बनवले होते असे म्हणेल त्याला काय करणार? इथे एक लक्षात ठेवण्याचा मुद्दा असा कि कोणत्याही शास्त्रात प्रगती केल्यानंतर एका विशिष्ट उंची पुढे त्या शास्त्राचा विकास साधायचा असेल तर इतर अनेक शास्त्राची मदत आणि त्याकरता सहजिकच त्या शास्त्रांचा विकास होणे गरजेचे असते हा मुद्दा आपण दुर्लक्षित करू शकत नाही. आपल्याप्राचीन भारतीयाना खगोल शास्त्राची कितीही चांगली माहिती असली तरी जोपर्यंत काचेची उत्तम भिंग आणि त्यापासून दुर्बीण बनवणे,त्याकरता साहजिकच प्रकाश शास्त्र तसेच इतर तांत्रिक बाबीत सिद्धता होत नाही तोपर्यंत खगोल शास्त्राच्या पुढच्या प्रगतीला खिळ बसते.एक प्रचंड मोठी दुर्बीण बनवायची असेल तर अभियांत्रिकी क्षेत्रातल्या सर्वच शाखांची मदत लागेल कि नाही तीच गोष्ट वैद्यक शास्त्राची. पहा विचार करा आणि मग मत बनवा ...

१९६७ च्या दरम्यान मी आठवीत असताना " चंद्रावर स्वारी" नावाची गोष्ट लिहिली होती. त्यात १९६७ पर्यम्त ज्या तंत्राने याने वर आकाशात जात होती त्या पद्धतीनेच मी यान सोडले होते. चंद्रावर एक सफेद रंगात " ससा" दिसतो . तो आपल्या दक्षिण धूवासारखा बर्फाळ प्रदेश आहे त्यावर आमचे यान गेले असे लिहिल्याचे आजही आठवत आहे. त्यात माझी एक चूक अशी झाली की हे माझे साहित्य मी ताम्रपटावर लिहून पुरायला हवे होते. तसे झाले नाही . जर मी ही चूक केली नसती तर एखाद्या इतिहास संशोधकाला तो ताम्रपट सापडला असता व त्याने काही निष्कर्ष काढले असते त्यात एक असा असता की .. अगदी १९६७ पर्यंत चंद्रावर बर्फ होते. १९६९ साली मानव ज्यावेळी चंद्रावर उतरला त्यावेळी त्याला बर्फ आढळले नाही. तरी दोन वर्षात अशी काही घटना घडली असावी की सर्व बर्फ नाहीसे झाले.

In reply to by चौकटराजा

चंद्रावर बर्फ (हो, बर्फच, द्रव नाहि.) आहे हे आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी शोधले आहे. त्यासाठी त्यांचे कौतुक पण झाले आहे. बाय द वे, अजून कोणते कोणते ताम्रपट लिहायचं सुचलं आहे तुम्हाला? https://www.theguardian.com/world/2009/sep/24/water-moon-space-explorat…

In reply to by arunjoshi123

त्या लेखात बर्फाचा उल्लेख असल्याचा शोध तुम्हाला कसा लागला ते सांगा बरे ! मी फाईन्ड वापरून आईस व स्नो दोन्ही शब्द देऊन पाहिले !

In reply to by चौकटराजा

किलवर गुल्ल्याला देखिल माहित आहे कि चंद्रावरचं पाणी तिथल्या क्रेटरांत आहे, आणि उधर बस बरफ हि हो सकता है. मी इथे लिहिलेली विधाने अश्शीच आहे असं वाटतं की काय? ============== तुम्ही लहानपणी लिहिलेल्या गोष्टी सांगा ना.