मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) -- भाग २

सिरुसेरि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) -- भाग २ मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) ---- भाग १ --- http://www.misalpav.com/node/40043 पुढील दीड तास नुसतेच स्टेशनवर बसुन घालवण्यापेक्षा त्या वेळात एक नवीन ऐतीहासीक ठिकाण बघायला मिळणार या विचाराने मयुरा आणी तिच्या मैत्रीणींना खुप आनंद झाला . तिघीही उत्साहाने ऑटोमधे जाउन बसल्या . सुखीने ऑटो चालु केली . रात्रीची वेळ असल्याने फारशी वर्दळ नसल्याने रस्ता मोकळाच होता . गावाकडे जाणारा रस्ता सोडुन ऑटो एका फाट्याला वळली . किंचीत चढ असलेल्या एका वळणा वळणाच्या रस्त्यावरुन जाउ लागली . "काय गं मयुरा , तुझ्या काकांनी आपल्याला मयुरखेडाच्या जवळपास असलेल्या बहुतेक सगळ्या प्रसिद्ध स्थळांची माहिती दिली . मग या रानी शरावतीका महल विषयी त्यांनी काहिच का सांगीतलं नाही ? का ते विसरले ? " राधाने मयुराला शंका विचारली . मयुराला खरं तर हाच प्रश्न पडला होता . पण तिने नुसतेच हसुन वेळ मारुन नेली . त्याचवेळी आपल्या घरामधे प्रकाशजी स्वताशीच विचार करत होते . "आपण मयुराला जाणुन बुजुन रानी शरावतीका महल या ठिकाणाबद्दल काही सांगीतले नाही . कारण ती इथे तीन चार दिवस सुट्टी म्हणुन आनंदाने आली होती . अशा वेळी तिथे घडलेल्या घटनांच्या आठवणींपासुनही तिने दुर राहावे अशीच आपली ईच्छा होती ." थोड्याच वेळात ऑटो एका टेकडीच्या पायथ्याशी पोचली . तिथुन टेकडीवर जायला १५ ते २० पाय-रया होत्या . मयुरा आणी तिच्या मैत्रीणी भराभर या पाय-रया चढुन टेकडीवर पोचल्या . टेकडीवरुन खाली पाहिले असता एका बाजुला मयुरखेडा गाव तर दुसरीकडे रेल्वे स्टेशन दिसत होते . खालुन खडकाळ दिसत असलेल्या या टेकडीवर सुंदर बगिचा होता . अनेक फुले , झाडे, झुडुपे असलेल्या या बागेमधे सगळीकडे हिरवळ पसरललेली होती . बागेच्या मध्यभागी एक भव्य संगमरवरी महाल होता . मयुरा आणी तिच्या मैत्रीणी हा सगळा देखावा पाहुन आपला सगळा थकवा क्षणात विसरल्या . सर्वप्रथम त्यांनी आपला मोर्चा त्या महालाकडे वळवला . बाहेरुन भव्य दिसणारा तो महाल आतुनही तितकाच प्रशस्त होता . रात्रीची वेळ असली तरी चंद्रप्रकाश त्या महालाच्या संगमरवरी भिंतींवरुन परावर्तीत होउन आतमधे सर्वत्र लख्ख पसरला होता . महालाच्या संगमरवरी भिंतींवर , फरशीवर सगळीकडे पिसारा फुलवुन नाचत असलेल्या मोराची राजस्थानी शैलीतली अनेक सुरेख चित्रे रेखाटलेली , रंगवलेली दिसत होती . चित्रांची शैली जुनी असुनही ते रंग अजुनही तजेलदार वाटत होते . "हा महाल , तो बगिचा किती सुंदर आहेत . हि मोरांची चित्रेही खरंच किती आकर्षक आहेत . " नेहा भारावुन म्हणाली . इतर दोघींनी नुसतीच मान डोलावली . "पण हा महाल कुणी बांधला ? कधी बांधला ? या महालाला रानी शरावतीका महल का म्हणतात ? ही रानी शरावती कोण होती ? " मयुरा म्हणाली . "आपण हे प्रश्न नंतर स्टेशन मास्तरांनाच विचारुया . किंवा तुझ्या काकांनाच विचारुया . कोणीतरी नक्की माहिती देईल . पण आत्ताच जर हि माहिती मिळाली असती तर मजा आली असती ." राधाने सुचवले . तिघींनी आता बाहेरील बगिचा पाहायला जाण्याचे ठरवले . एकमेकींशी गप्पा मारत तिघीही तो बगिचा बघत हिरवळीवरुन फिरु लागल्या . हिरवळीमधे एक साप पहुडलेला होता . अंधारामधे तो या तीन मैत्रींणीना दिसला नाही . चालता चालता मयुराचा पाय चुकुन त्या सापावरच पडणार होता . तेवढ्यात विद्युत वेगाने एक तरुण अचानक तिथे आला . चपळाईने त्याने त्या सापाला पकडले आणी दुरवर अलगद भिरकावुन दिले . एक मोठी दुर्घटना टळली होती . त्या सापाला बघुन मयुराचा थरकापच उडाला . काय घडु शकले असते याचा विचार करुनच ती घाबरुन गेली . राधा आणी नेहाने तिला कसेबसे सावरले . थोडे पाणी पिल्यावर मग मयुरा सावध झाली . हाच पोरगेलासा तरुण त्यांना काल शिवमंदिराजवळ दिसला होता. आजही त्याच्या अंगावर पारंपारीक राजस्थानी पोशाख होता. "मैडमजी थोडा संभालके चलिये . इतक्या रात्री या बागेमधुन फिरणे धोकादायक आहे . " तो तरुण त्यांना राजस्थानी लहेजामधे म्हणाला . तिघींनीही त्या तरुणाचे आभार मानले आणी थोडक्यात आपली माहिती सांगितली . त्या तरुणानेही त्यांना स्वताबद्दल थोडीफार माहिती दिली . तो या गावामधे गाईड म्हणुन काम करत होता . टेकडीपासुन जवळच असलेल्या एका वस्तीमधे त्याचे घर होते . आज तो योगायोगाने टेकडीवर फिरायला आला होता . तो गाईड आहे हे कळल्यावर तिघींनाही खुप बरे वाटले . त्यांनी त्या तरुणाला रानी शरावतीका महलबद्दल माहिती सांगण्याची विनंती केली . तो गाईडही तयार झाला . "ठिक है . तो फिर चलिये . उसी महलकी तरफ चलते है . " असे म्हणत तो त्यांना परत एकदा रानी शरावतीका महलमधे घेउन गेला . तिघीही उत्साहाने महालामधे आल्या . महालामधल्या गवाक्षामधुन बाहेरच्या बागेचा सुंदर देखावा दिसत होता . तो देखावा बघुन नेहाला राहावले नाही . ती तिचे अलिकडेच ऐकलेले एक आवडते गाणे गुणगुणु लागली . दोन दिवसांपुर्वीच तीने एका मेळ्यामधे एका राजस्थानी गायकाकडुन हे लोकगीत ऐकले होते . " मोरनी बागामां बोले आधी रातमा ....मोरनी बागामां डोले आधी रातमा " त्यांना महालाची माहिती देण्यासाठी तो गाईड मनात शब्दांची जुळवाजुळव करत होता . तो अचानक थबकला . त्याने रोखुन एकदा नेहाकडे तर एकदा मयुरा आणी राधाकडे पाहिले . त्याने तिघींकडे पाहात प्रश्न विचारला . "मैडमजी , क्या आपको पता है , इस लोकगीतका जनम किधर हुआ ? या लोकगीताचे उगमस्थान कोणते आहे ?" तिघींनीही त्या गाईडचा अनपेक्षितपणे आलेला हा प्रश्न ऐकुन आश्चर्य वाटले . तिघींनीही नाही म्हणुन नुसतीच मान हलविली . तेव्हा त्या गाईडने त्यांना शांतपणे उत्तर दिले . "या लोकगीताचे मुळ उगमस्थान हा बगिचा , हा महल आहे . रानी शरावतीका महल . " ----------- क्रमशः------------------ भाग २ समाप्त ------------ काल्पनीक -------------------- कथेबद्दल -- या कथेत कल्पना केलेल्या राजस्थानी लोकगीताचे शब्द "मोरनी बागामां बोले आधी रातमा ....मोरनी बागामां डोले आधी रातमा " असे आहेत . ते गीत चांदनी चित्रपटातील "मोरनी बागा मा बोले आधी रातमा छननछन चूड़ियां खनक गयी देख साहिबां " या गीताशी संबधीत नाही . या दोन गीतांची तुलना / वाद आणी गैरसमज नको म्हणुन हा खुलासा .

वाचने 2746 वाचनखूण प्रतिक्रिया 5