Skip to main content

मेघनादरिपुतात

शरद यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
मेघनादरिपुतात मागे काही दिवसांपूर्वी " हराच्या हाराचा.."नावाचा एक शाब्दिक खेळ दिला होता. त्याला बर्‍यापैकी वाचकांनी पसंती दिली व काहींनी आणखी असेच काही लिहा असेही म्हटले. आज तसाच एक, पण जरा सोपा खेळ देत आहे. उद्यानात एक राजकन्या आपल्या सख्यांबरोबर बसली असताना तेथ एक राजपुत्र आला. त्याचे राजकन्येवर प्रेम बसले. पण पुढे काही विचारण्यापूर्वी तिला आपणाबद्दल काय वाटते हे जाणून घ्यावे म्हणून त्याने तिला विचारले "मी तुला कसा काय वाटतो ?" तिने उत्तर दिले मेघनादरिपूतात वधी ज्या नराला ते नाव आहे द्वादशात पाचव्याला ! सरता तयासी दिन अस्तमानी ज्या नर पूजिती (तैसा) दिसतोस नयनी !! काय बरे सांगितले राजकन्येने ? ( मागच्या सारखीच एक विनंती. जरा सर्वांना वेळ मिळावा म्हणून एका दिवसानंतर उत्तर द्या. शरद
एस

डुप्लिकेट प्रतिसाद काढून टाकला आहे. (डुप्रकाटाआ).
11/04/2017 - 18:47 Permalink
पैसा

:) उत्तर सांगू का?
12/04/2017 - 08:46 Permalink
पैसा

मेघनादाचा रिपु लक्ष्मण, त्याचा तात दशरथ. त्याने मारला तो नर श्रावण. तो १२ मधला पाचवा महिना. त्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे पोळ्याच्या दिवशी ज्याची पूजा करतात त्या बैलासारखा तू दिसतोस.
12/04/2017 - 11:03 Permalink
चित्रगुप्त

व्वा. असे आहे होय? कमाल आहे. हे रचणार्‍याच्या प्रतिभेला, हे इथे आणणार्‍या धागाकर्त्याला आणि अर्थ उलगडून सांगणारीस त्रिवार कुर्निसात. या प्रकाराला काय म्हणतात ? असे आणखी कुठे वाचायला मिळतील ? काही म्हणा, जुन्या साहित्यात असे अनेक खजीने दडलेले असतात. ते सर्व पुन्हा उपसून वर काढले पाहिजेत.
12/04/2017 - 11:53 Permalink
शरद

कोडे तसे सोपे आहे. मेघनाद=इंद्रजीत,त्याचा शत्रु= लक्ष्मण, त्याचे वडील= दशरथ, त्यांनी मारलेला न्रर = श्रावण, तोच बारा महिन्यांमधला पाचवा. त्यात पूजेचे तीन सण, नागपंचमी, जन्माष्टमी व बैलपोळा. नागाची पूजा संध्याकाळी नसते. तेच कृष्णाबाबत..तेव्हा उरला बैलपोळा. बैलाची पूजा संध्याकाळीच होते. आणि सणही श्रावण सरतांना, त्याच्या शेवटच्या दिवशी येतो. राजकन्या सुसंस्कृतपणाने त्याला बैल न म्हणता काव्यात उत्तर देत आहे. आपल्याकडेही श्री. प्रचेतस व श्री. रूपाताई यांनी हे उत्तर कालच व्यनीवर कळवले होते. इतरांना वेळ मिळावा याची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. (थोडा खवचटपणा : पुढील कोडे संस्कृतमधील देऊं कां ? ) शरद
12/04/2017 - 12:25 Permalink
चित्रगुप्त

...... पुढील कोडे संस्कृतमधील देऊं कां ? अवश्य द्यावीत आणि मराठीतीलही द्यावीत. विविध वृत्तांमधील खास चमत्कृतीपूर्ण रचनाही द्याव्यात. असे विविध प्रकार असलेला कुणाचा ब्लॉग वा साईट आहे का ?
12/04/2017 - 12:34 Permalink
नंदन

उत्तम रचना! चित्रगुप्त यांच्या प्रश्नावरून साने गुरुजींच्या लेखनातला हा भाग आठवला:
मधली सुट्टी भटकण्यात, खाण्यात आम्ही दवडीत असू. परंतु आमचे काव्यशास्त्र विनोदही त्या वेळेस चालत असे. निरनिराळे श्लोक शंकर जोशी घेऊन यावयाचा व ते श्लोकात्मक कूटप्रश्न आम्ही सोडवीत असू. दिनकरतनयेचे नीर आणीत होत्ये शशिधरवहनाने ताडिले मार्गपंथे नदिपति रिपु ज्याचा तात भंगून गेला रविसुत महिसंगे फार दु:खीत झाला ।। दिनकर-तनया म्हणजे यमुना. मी यमुनेचे पाणी आणीत होते. वाटेत शशिधर म्हणजे शंकर, त्याचे वाहन म्हणजे बैल- त्या बैलाने मारले. त्यामुळे समुद्राचा शत्रू जो अगस्ती त्या अगस्तीचा तात म्हणजे घट - तो घट फुटला आणि रविसुत म्हणजे कर्ण - कान पृथ्वीवर पडल्यामुळे फार दुखावला. असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. कोणे एक वनी सुलक्षण वधू मेघोदके जन्मली बालत्वे नरनाम तीस असता स्त्रीनाम तै पावली पाचानी प्रणिली तयातुन तिहीं अत्यादरे वन्दिली तेथून श्रम पावली म्हणुनिया कर्णान्तरी राहिली पावसाळयात रानात बोरु उगवतात व बोरुची झाली लेखणी. तो बोरु होता. त्याची ती लेखणी झाली. पाची बोटांनी ती लेखणी धरिली; परंतु त्यातल्या त्यात तीन बोटांनी तिचे फारच स्वागत केले. आणि तीन बोटांना राहण्याचा जेव्हा कंटाळा येतो, तेव्हा ही लेखणी कानावर जाऊन बसते.
12/04/2017 - 15:17 Permalink
रुपी

छान आहेत या रचनाही. एकदा शाळेत आम्हाला शिकवलेली एक रचना मला आठवत आहे, त्याप्रमाणे अशी - 'तो शर गरधरवरसा रविसा, पविसा, स्मरारिसायकसा पार्थ भुजांतरी शिरला वल्मिकामाजी नागनायकसा' हे अर्जुनाला लागलेल्या एका बाणाबद्दल आहे. तो बाण कसा सपकन त्याच्या हातात जाऊन घुसला त्यासाठी त्याला सूर्याची, वार्‍याची, वारुळात नाग घुसतो त्याची उपमा दिली आहे. पण 'गरधरवरसा' म्हणजे काय आणि स्मरारिसायकसा (स्मर ज्याचा शत्रू सायक याच्यासारखा) याचा संदर्भ माझ्या लक्ष्यात नाही.
12/04/2017 - 23:10 Permalink
पैसा

In reply to by रुपी

स्मराच्या अरिचा सायक. कामदेवाचा शत्रु शिव. त्याचा बाण. थोडक्यात शिवधनुष्यातून सुटलेला बाण. गरधरवर म्हणजे बहुधा विषधर वर असे असावे.
13/04/2017 - 11:51 Permalink
सूड

अगदी सोपंच सुचलंय, पण राजपुत्र हजरजबाबी असता तर कदाचित हे उत्तर दिलं असतं. रजनीवरभ्रमणीं जे पहिले नक्षत्र त्यानामे रूढ झाला मासही सर्वत्र नवमीसीं त्यातील रूप दितीसुत जे घेत छबी त्याच्या जननीची गे तव रूपात
13/04/2017 - 15:26 Permalink
शरद

In reply to by सूड

बहुत बढिया, श्री.सूड. माझे उत्तर अपमानित राजपुत्राने, राजकन्येने न विचारताही, एक "मुहतोड" जबाब दिला आहे. तो म्हणतो रजनीवरभ्रमणीं जे पहिले नक्षत्र त्यानामे रूढ झाला मासही सर्वत्र नवमीसीं त्यातील रूप दितीसुत जे घेत छबी त्याच्या जननीची गे तव रूपात" हल्ली नक्षत्र गणना अश्विनी पासून करतात ( वेदकाळात ती कृत्तिका पासून होती) तेव्हा पहिले नक्षत्र्र अश्विनी व अश्विन हा त्या नावाचा महिना. त्या महिन्यातली नवमी म्हणजे नवरात्राचा शेवटचा दिवस. दितीसुत म्हणजे असूर. त्याने महिषाचे (रेड्याचे) रूप घेऊन देवीवर हल्ला केला होता. त्याला मारले म्हणून देवी "महिषासूरमर्दिनी" तर त्याची आई म्हणजे "म्हैस". राजपुत्राला "आता"" राजकन्या तशीच काहीशी दिसू लागली आहे ! कालाय तस्मै नम: !! शरद
14/04/2017 - 17:03 Permalink
आषाढ_दर्द_गाणे

In reply to by शरद

वा-वा! वाचायला मजा आली! आता एकमेकाला बैल-म्हशी म्हणणं झालं,फुडे काय प्रकारचे सुसंवाद घडतील बरं?
14/04/2017 - 23:31 Permalink
शरद

In reply to by सूड

बहुत बढिया, श्री.सूड. माझे उत्तर अपमानित राजपुत्राने, राजकन्येने न विचारताही, एक "मुहतोड" जबाब दिला आहे. तो म्हणतो रजनीवरभ्रमणीं जे पहिले नक्षत्र त्यानामे रूढ झाला मासही सर्वत्र नवमीसीं त्यातील रूप दितीसुत जे घेत छबी त्याच्या जननीची गे तव रूपात" हल्ली नक्षत्र गणना अश्विनी पासून करतात ( वेदकाळात ती कृत्तिका पासून होती) तेव्हा पहिले नक्षत्र्र अश्विनी व अश्विन हा त्या नावाचा महिना. त्या महिन्यातली नवमी म्हणजे नवरात्राचा शेवटचा दिवस. दितीसुत म्हणजे असूर. त्याने महिषाचे (रेड्याचे) रूप घेऊन देवीवर हल्ला केला होता. त्याला मारले म्हणून देवी "महिषासूरमर्दिनी" तर त्याची आई म्हणजे "म्हैस". राजपुत्राला "आता"" राजकन्या तशीच काहीशी दिसू लागली आहे ! कालाय तस्मै नम: !! शरद
14/04/2017 - 17:04 Permalink