मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दाद

सिरुसेरि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दाद . (कथा) . (काल्पनीक) जांभेवाडी.. चारी बाजुंनी डोंगरांनी वेढलेलं , निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक छोटसं गाव . जेमतेमच लोकवस्ती असलेल्या या गावामध्ये वीज , एस टी , वाहने अशा आधुनीक सुधारणा अजुन पोचलेल्या नव्हत्या . हे गाव या सुविधांपासुन तसं दुर्लक्षितच राहिलं होतं . रोजच्या कामांसाठी , गरजांसाठी जांभेवाडीच्या ग्रामस्थांना तालुक्याच्या गावाचाच आधार होता . जांभेवाडीपासुन तालुक्याच्या गावाकडे जाणारी एक पाउलवाट होती . आपल्या कामांसाठी , गरजांसाठी गावकरी हिच पाउलवाट तुडवत तालुक्याच्या गावाला जात येत असत . हि लांबची पायपीट आता त्यांच्या रोजच्या जीवनाचाच भाग झाली होती . जांभेवाडीच्या वेशीपाशी , या पायवाटेच्या शेजारीच एक मोकळे माळरान होते . गावकरी या माळाला "वेतोबाचा माळ" किंवा "वेताळाचा माळ" असे म्हणत असत . या माळावर लांबट आकाराचा एक मोठा दगड उभा होता . हा दगड म्हणजेच आपल्या गावचे ग्रामदैवत वेतोबा अशी ग्रामस्थांची पुर्वापार श्रद्धा होती . या वेतोबाच्या मुर्ती समोर अनेक लहान आकाराचे दगड एका गोलामध्ये उभे होते . हे गोलाकारात उभे असलेले बाकीचे दगड म्हणजे वेताळाच्या दरबारातले भुतगण असे गावकरी मानत असत . हे दगड या रिंगणामधे वर्षानुवर्षे उन पाउस झेलत उभे होते . दर अवसेला रात्री बारा वाजता या माळावर वेतोबाचा दरबार भरतो , या दरबारात वेतोबा जांभेवाडीच्या ग्रामस्थांच्या अडचणी सोडवतो , त्यांनी घातलेली साकडी , बोललेले नवस पुर्ण करतो अशी सगळ्या ग्रामस्थांची कित्येक वर्षे चालत आलेली समजुत होती . मात्र अवसेच्या रात्री जो या माळावर येईल त्याचे डोळे जातील अशी एक भीती त्यांच्या मनात पुर्वापार रुजलेली होती . त्यामुळे गावकरी अवसेच्या रात्री माळावर फिरकतही नसत . आपल्या ज्या काय समस्या , नवस असतील त्या अवसेच्या आधीच वेतोबाच्या मुर्तीपाशी सांगत असत . वेतोबाचा कौल मिळावा म्हणुन भक्तीभावाने पुजा करत असत . गावामध्ये कुणाकडेही पुजा , शुभकार्य असेल तर वेतोबाला न चुकता निवद , धुप आणी शेंदुर हा ठरलेलाच होता . आजपर्यंत असंख्य वेळा शेंदुर लावला गेल्यामुळे मुर्तीचा मुळ रंग कुठला ते ठरवणे अवघड झाले होते . गुणा हा जांभेवाडीमधील एक गावकरी . गावातील इतर अनेकजणांसारखेच रोज सकाळी लवकर पाउलवाट तुडवत तालुक्याला जायचे . तिथे दिवसभर मिळतील ती रोजंदारीची कामे करायची . चार पैसे कमवायचे . दिवस मावळला की घरासाठी काहि जिन्नस खरेदि करुन परत गावी यायचे असा त्याचा रोजचा क्रम होता . दोन वर्षांपुर्वी गुणाच्या बायकोचे आजारपणात निधन झाले होते . त्यांना एक मुलगी होती . बायको गेल्यानंतर गुणानेच लेकीची काळजी घेतली होती . नुकतेच त्याच्या लेकीचे शेजारच्याच गावातील एका स्थळाशी लग्न ठरले होते . लेकीच्या लग्नासाठी म्हणुन गुणा तालुक्यातीलच एका बँकेत पैसे साठवत होता . लग्नाच्या खर्चासाठी आज त्याने ते पैसे काढले . आलेले पैसे मोजताना नकळत त्याच्या डोळ्यासमोर नवरीच्या वेशात सजलेल्या आपल्या लाडक्या लेकीचा हसरा चेहरा आला आणी नकळत त्यालाच समाधानाचे हसु फुटले . मनोमन तो सुखावला . मिळालेले पैसे आपल्या बंडीच्या खिशात ठेवत तो बँकेच्या बाहेर आला . अचानक त्याच्या कानावर शब्द पडले . "काय गुणा , लई पैकं हाईती की रं तुझ्याकडं . मग माझं देणं कशापाई देत नाहिस रं ? माझंबी पैकं चुकवुन टाक कि गड्या ." समोर तालुक्यातला सावकार रंगोजी खवचटपणे हसत उभा होता . बाजुला त्याचे चार भाडोत्री गुंड हातात काठ्या घेउन मारक्या बैलासारखे उभे होते . गुणाने आपल्या बायकोच्या आजारपणात वाढता खर्च भागवण्यासाठी नाईलाजाने या रंगोजीकडुन काहि कर्ज घेतले होते . हे कर्ज तो फेडत आला होता . लेकीचे लग्न आले म्हणुन त्याने मागच्याच महिन्यात सावकाराला भेटुन , आपली अडचण सांगुन शेवटचा हप्ता भरण्यासाठी थोडा जास्त वे़ळ मागितला होता . रंगोजीने तो मान्यही केला होता . पण आज गुणाकडचे पैसे बघुन रंगोजीची मती पालटली . त्याला हाव सुटली . तो मागचे सगळे विसरुन गेला . गुणाला रंगोजीचे बोलणे ऐकुन धक्काच बसला . तरी तो काकुळतीने म्हणाला . "सावकार , माझ्या लेकीचे लगीन हाये . त्यापाई हे पैसे लागणार हायेत . थोडा वेळ द्या . म्या तुमचं समदं पैकं परत करीन ." पण रंगोजीच्या मनात कपट होते . तो काही ऐकायला तयार नव्हता . तो गुर्मीत म्हणाला . "ते काहि नाही . मलाबी नड आहे . मी काहि थांबणार नाही . हवं तर तु लेकिचं लगीन पुढं ढकल . " "सावकार ..." गुणा संतापाने थरथरत ओरडला . त्यामुळे रंगोजी अजुन भडकला . तो चिडीनं म्हणाला . "काय रं . कुणावर दाब दाखवतोस ? या रंगोजीवर ? कातीला आलास काय ? आनं तुम्ही काय बघत बसलां रं ? धरा .. बडवा या गुणाला . काढुन घ्या त्यांचं समदं पैकं " रंगोजीचा हुकुम ऐकुन त्याचे गुंड पुढे सरसावले . सगळ्यांनी मिळुन गुणाला काठ्यांनी बडवले . अखेर गुणा बेशुद्ध होउन खाली कोसळला . तेव्हा त्याचे खिसे चाचपुन रंगोजीने सगळे पैसे काढुन घेतले . तो आपल्या गुंडांबरोबर ऐटीत तिथुन चालता झाला . हा प्रकार घडत होता तेव्हा तिथे गुणाला ओळखणारे , त्याचे गाववाले मित्रही होते . पण मध्ये पडण्याची , रंगोजीच्या गुंडांना अडवण्याची कुणाचीच हिंमत झाली नाही . सगळे नुसते एकमेकांकडे बघत बसले . गुणा शुद्धीवर आला तेव्हा त्याला आपण साठवलेले सगळे पैसे गेल्याची जाणीव झाली . आता लेकीचे लग्न कसे पार पाडायचे हा विचार त्याला छळु लागला . त्याचे अंगही माराने ठणकत होते . आपल्या गावातल्या मित्रांच्या आधाराने कसाबसा तो परत जांभेवाडीला घरी आला . त्याची ही अवस्था पाहुन , मारहाणीचा झाला प्रकार ऐकुन त्याची लेक धास्तावुन गेली . गुणाकडचे पैसे गेल्याची बातमी शेजारच्या गावातील मुलाकडच्यांना कळली . त्यांनी टाकोटाक एका मध्यस्थाला गुणाच्या घरी पाठवुन हे लग्न मोडल्याचे जाहिर केले . गुणा आणी त्याची लेक दु:खात बुडुन गेली . गावातील लोकं लेकीकडे पाहुन हळहळु लागली . त्यांच्या नजरांना वैतागुन अखेर लेकीने त्याच दिवशी गावामागच्या काळडोहात उडी घेतली आणी या बदनामीपासुन आपली कायमची सुटका करुन घेतली . काळडोहाला अनेक वर्षांनी एक बळी मिळाला . एका मागे एक बसलेल्या या धक्क्यांमुळे गुणा निराशेने पार हवालदिल होउन गेला . त्याने ठरवलेले सगळे बेत , सगळी स्वप्ने या दोन दिवसांत धुळीला मिळाली होती . दु:खाने , संतापाने तो आतल्या आत धुमसत होता . त्याला धीर द्यायला त्याचे गावातले मित्र घरी आले होते . त्यांना त्याने आपला बेत बोलुन दाखवला . "त्या रंगोजीनं माझ्या घराला आग लावली . माझ्या घराचा इस्कोट केला . पन म्या गप राहनार नाही . आज अवस हाये . आज रातीला .. अवसंच्या रातीला म्या वेतोबाच्या माळावर जाणार . वेतोबाकडे माझ्या नुकसानीची दाद मागणार . " त्याला गावातल्या लोकांनी खुप समजावले . पण गुणा आता कुणाचे ऐकण्याच्या पलीकडे गेला होता . अंधार पडताच सगळे गावकरी अवसेची रात्र म्हणुन आपापल्या घरांत चिडिचुप बसले . गुणा मात्र संतापाच्या भरात तरातरा वेतोबाच्या माळावर गेला . वेतोबाच्या मुर्तीपाशी जाउन गुणाने वेतोबाचे पाय धरले . तो वेतोबासमोर रंगोजीने आपल्यावर केलेल्या अन्यायाचा पाढा बोलु लागला . आपल्यावरच्या अन्यायाची दाद मागु लागला . "वेतोबा , त्या रंगोजीपायी माझ्या लेकीचं लगीन मोडलं ..माझी लेक मला सोडुन गेली ..मला न्याव पायजे ..न्याव .. मला न्याव मिळाल्याबिगर म्या तुझं पाय सोडनार न्हाई . " गुणाचा आक्रोश किर्र अंधाराला चिरुन जात होता . पण समोरच्या मुर्तींवर त्याचा काहिच परिणाम होत नव्हता . त्या सर्व दगडाच्या मुर्ती निश्चलपणे तशाच शांत उभ्या होत्या . गुणाही न थकता निर्धाराने परत परत वेतोबासमोर न्याय मागत होता. अखेरीस तर त्याने आपले डोके वेतोबाच्या पायावर जोरजोरात आपटण्यास सुरुवात केली . तो परत परत म्हणत होता . " मला न्याव पाहिजे .. न्याव पाहिजे .." गुणाचा हा आक्रोश अंधार कापत जांभेवाडी गावात ऐकु येउ लागला . गावकरी घाबरुन गेले . पण कुणाचाच अशा मध्यरात्री वेतोबाच्या माळावर जाण्याचा धीर झाला नाही . वेतोबाच्या पायावर गुणा थाड थाड आपले डोके आपटतच होता . हळु हळु त्याच्या कपाळातुन रक्ताच्या धारा वाहु लागल्या . वेतोबाच्या मुर्तीला त्या रक्ताचा अभिषेक होत होता . दिवस उजाडला तसे जांभेवाडीचे गावकरी नेहमीप्रमाणे पाउलवाटेवरुन तालुक्याच्या गावाकडे चालु लागले . वेतोबाच्या माळापाशी आल्यावर तिथले दॄष्य बघुन त्यांना धक्काच बसला . वेतोबाच्या मुर्तीच्या पायापाशी रक्ताच्या थारोळ्यात गुणाचा निष्प्राण देह पडला होता . मुर्तीच्या पायावर सतत डोके आपटुन त्याच्या डोक्याचा पार चेंदामेंदा झाला होता . वेतोबाची मुर्ती गुणाच्या रक्ताने माखुन गेली होती . मुर्तीवरील शेंदुर आणी गुणाचे रक्त एकमेकांत मिसळुन एकजीव होउन गेले होते . बघता बघता गुणाची बातमी त्याच दिवशी तालुक्याच्या गावात पसरली . रंगोजीच्याही कानावर हि बातमी आली . तो खदाखदा हसत जो येईल त्याला सांगु लागला . "बघा .. तो गुणा मला मारण्यासाठी वेतोबाच्या पायावर डोकं आपटत होता . पण शेवटी तोच गेला . मला ढेकळं काहि फरक पडला नाही . मला मारणारे मेले .. मी जिता हाये . मर गय मारनेवाले .." रंगोजीचा हा माज बघुन गावातली लोकं हळहळत होती . आपल्या डोळ्यातले पाणी पुसत म्हणत होती . "कलीयुग आलं बाबा . हि काहि ख-याची दुनिया राहिली नाही . बिचारा गुणा मेला . आणी हा राक्षस आराम करतोय . आज गुणा गेला . काय सांगावं उद्या आपल्यावरबी हिच येळ येइल ." गुणाचा एक गाववाला मित्र कसाबसा रडे आवरत म्हणाला . "आपलंबी चुकलं .. ते गुंड गुणाला मारत होते तवाच आपण मधी पडायला हवं होतं . आपण त्यांना पुरुन उरलो असतो . पण आता काय उपेग .." दिवस मावळला तसा एकमेकांना धीर देत ते सगळे परत त्या पायवाटेने गावाकडे चालु लागले . गावच्या वेशीपाशी , वेतोबाच्या माळापाशी आल्यावर त्यांना फिकट चंद्रप्रकाशात मुर्तीसमोर डोके आपटणारा , आक्रोश करणारा गुणा दिसु लागला . कसेबसे , भीती आवरत ते आपापल्या घरी पोचले . दुसरा दिवस उजाडला , सकाळ झाली , तशी तालुक्याच्या गावात एका बातमीने हलकल्लोळ उडवला . काहितरी इपरीत , आक्रीत , अघटीत घडलं होतं . सकाळी सकाळीच रंगोजी सावकार अचानक रक्ताच्या उलट्या होउन मरण पावला होता . तपासणीमध्ये त्या रक्तात शेंदुराचा अंश सापडला . -------------- समाप्त ---- काल्पनीक ------------------------------

वाचने 7946 वाचनखूण प्रतिक्रिया 18

अभ्या.. 12/09/2016 - 21:34
अप्रतिम लिहिलीय कथा सिरुसेरीजी. मस्त. दिवसेंदिवस कथांचा दर्जा उंचावत चाललाय. आवडली मनापासून कथा.

कानडाऊ योगेशु 13/09/2016 - 06:33
अप्रतिम कथा. शेवटपर्यंत नेहेमीसारखीच सरधोपट ठेवली आहे पण पुन्हा शेवटात सिक्सर हाणला आहे.

नेत्रेश 13/09/2016 - 07:31
पण शेवट एका ओळीत केलात राव. जरा अजुन थ्रीलर चालला असता.

साहना 13/09/2016 - 08:35
भाषा - ४/५ फ्लो - ५/५ संवाद - ४/५ कथानक - २/५ सावकार, गरीब शेतकरी, लेकीच्या लग्नाचा पैसा इत्यादी फारच क्लिशे कथानक आहे पण सांगण्याची शैली जबरदस्त आहे म्हणून वाचविशी वाटते.

सिरुसेरि 13/09/2016 - 19:56
आपणा सर्वांच्या प्रतिसादांसाठी व सुचनांसाठी मनापासुन आभारी आहे .

सिरुसेरि 14/09/2016 - 13:17
या कथेचा एक असाही शेवट सुचला होता . "सकाळी सकाळीच रंगोजी सावकार अचानक रक्ताच्या उलट्या होउन मरण पावला होता . तपासणीमध्ये त्या रक्तात शेंदुराचा अंश सापडला . हे कसं घडलं , कुणी घडवलं याचा काहिच थांगपत्ता लागत नव्हता . या आश्चर्यात भर म्हणुन कि काय कुणा अपरिचितानं तिथल्या भिंतीवर एक शब्द खरडला होता - "विषप्राशनम" -- सर्व धर्मं परित्यज्या मामेकं शरणं व्रज ---- " पण आंतरजालावर शोध घेताना , गरुडपुराणात "विषप्राशनम" अशी कुठली शिक्षा सापडली नाही , म्हणुन हा शेवट रद्द केला .

दुर्गविहारी 07/12/2020 - 18:38
हि कथा कशी कोण जाणे वाचायची राहून गेली होती.भारी लिहीली आहे.