Skip to main content

धर्म, विज्ञान आणि समाज

Published on शनीवार, 06/08/2016
खरंतर ह्या धाग्याला प्रतिसाद म्हणून लिहीत गेले परंतू ते लांबलं. म्हणून स्वतंत्रच टाकतेय. तरिही त्या धाग्याशी संबधीत असल्याने सुरुवात बदलत नाही. एक डोंबिवलीकर म्हणून मुविंच्या उद्वेगाशी सहमत. पण एक नागरिक म्हणून या गोंधळाची जबाबदारी आपल्याकडेही येते असं मला तरी वाटतं. त्याबद्द्ल थोडंसं (१) मी बर्‍याच वर्षांपासून कचरा वाटेत टाकणार्‍यांना थोडं सुनावते. त्यासाठीची भाषाही आवर्जून चांगली वापरते. कधी कधी कचरा टाकणारी व्यक्ती शरमेने गप्प बसते कधी "तुम्हाला काय करायचयं" म्हणत अंगावर येते. माझी शारिरिक,राजकिय, सामाजिक शक्ती मर्यादित असल्यानं मी प्रकरण वाढवत नाही. पण इतक्या वर्षात माझ्या बोलण्यात सहभागी होऊन कचरा टाकणार्‍याला सुनावणारी व्यक्ती मला भेटलेली नाही. आणि माझ्या आजूबाजूला सगळॆ सामान्यच लोक असतात. एका-दोघांनी जरी कचरा टाकणार्‍याला "काय चुकीचं सांगताहेत रे त्या? " असं म्हटलं तर पुढच्यावेळी तो माणूस विचार करेल पण हे कधीही झालेलं नाही. उलटं माझ्याचकडे "काय वेडी बिडी आहे का ही? कामधंदे नाही दिसत हिला" असे कटाक्ष टाकले जातात. पण तेच मी रस्त्यावर मुर्ती ठेवली आणि त्याला हार घातले तर चार दिवसांनी त्या मूर्तीला हारांचा खच पडलेला असेल किंवा रस्त्यावर जरी टाळ कुटत बसले तर लोक आदरानं बघतील. (२) रस्त्यात वाटेत गाडी उभी करून गप्पा हाणणारी लोकं पाहिलीत ही सुद्धा सामान्यच असतात. आपल्याला गाडी पार्क करायला जागा नाही म्हणून रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करणारे लोकं सामान्यच असतात. आता धाग्यातील विचाराबद्द्ल. एकूण व्यवस्थेचा जो बोजवारा उडालाय तो आपल्या सामाजिक जाणिवेचा निदर्शक आहे त्यात धार्मिक आणि विज्ञाननिष्ठ असण्याचा काय संबध? धार्मिक आणि विज्ञाननिष्ठ हे शब्द विरुद्धार्थी का वापरले जातात हे कळलेले नाही. बरं धार्मिक दृष्टीकोन किंवा नशीबावर हवाला ठेवणे या दोन्ही गोष्टी तरी कितपत मदतीला येतात तुमच्या? फक्त मनाचं समाधान होण्याइतपतच. विज्ञाननिष्ठ दृटीकोन बाळगल्याने नुकसान होतं नाही. तर जे नुकसान झालय ते धार्मिक दृष्टीकोन सामाजिक जाणिवांवर स्वार झाल्याने झालय. आणि एकदा का धार्मिकता वाढली की ते अपरिहार्यच असतं. धार्मिकता बोकाळल्याने समाजाचे जास्त नुकसान झाले आहे. काही मासले.... (१) रस्त्यावर चालताना मध्येच कबुतरांचा थवा आडवा येतो. त्यांना दाणे घातलेले असतात. डोंबिवलीतल्या फडके रोडला तर एका प्रसिद्ध दाक्षिणात्य स्नॅक्स जवळच हा थवा असतो. आणि गाड्या वा माणसं आली की तो उडतो त्यावेळी किती पिसांचं त्या खाद्यपदार्थांवर प्रोक्षण होत असेल हे मनात येऊनच मळमळायला होतं. पण कोणाच्या तरी धर्मात सांगीतलेलं असतं "पक्षीयों को खिलाओ आर्थिक लाभ मिलता है " त्यामुळे आपला नाईलाज होतो. (२) कुत्र्यांना पोळ्या, बिस्किटे टाकलेली असतात. पुन्हा वरचंच कारण " कुत्तोंको रोटी खिलानेसे दुश्मन का भय नही सताता" (३) तुम्हाला चालायला जागा नसते मात्र रस्त्यावरच्या मंदीराजवळ गाई बांधलेल्या असतात. कारण "गाय को खिलानेसे ग्रडपीडा नष्ट होती है" या भाकडकथांवर विश्वास ठेवणार्‍यांना सामाजिक दृष्टीकोन बाळगणारे धार्मिक का बरं समजावू शकत नाहीत? (३) सत्संग हा प्रकार कुत्र्यांच्या छत्र्यांसारखा बोकाळलेला आहे. तो होऊन गेल्यावर ती जागा बघावी. उष्ट्या पत्रावळी, द्रोण, हार वैगेरेंचा खच असतो. (४) गणपतींच्या मिरवणूका आहेतच मग आपण तरी मागे का रहावं असा विचार करून सगळ्याच प्रकारचे धार्मिक लोक मिरवणूका काढत असतात. जैन, अय्यपावाले,नमाजवाले सगळ्यानाच रस्ता अडवण्याचा आणि धर्माचं प्रदर्शन करण्याचा समान हक्क असतो. (५) गणपती, नवरात्र, दहीहंडी, आताश्या माघी गणपती या सारखे विज्ञाननिष्ठ लोक न्यूटनबाबा, आईनस्टाईन वैगेरेंसाठी रस्त्यात खड्डे खणून रहदारीला आडवं लावत नाहीत. (थेट तुलना करायचा मोह आवरला नाही). या मंडपाचे कर्तेधर्ते जरी राजकिय वजनी मंडळी असली तरी देवभोळी जनता मंडपात गर्दी करते, वर्गणी देते म्हणून नियम मोडायची त्यांची हिम्मत होते. हे मंडप ओस पडू द्यात कोणी या फंदात पडणार नाही. धार्मिक कृत्यासाठी एखाद्याने वर्गणी द्यायला नकार दिला की ही साधीभोळी सामान्य माणसंच त्याला समजावतात "दे रे. एवढं काय? दुरुपयोग होतो हे खरय. पण आपण आपलं देवाच्या नावानं द्यायचं. ते जे करतात त्यांचं पाप त्यांच्या शिरावर". हे पाप त्यांच्या शिरावर टाकण्याचं काम धर्म करतो अशी सोईस्कर समजूत करून घेतल्याने माणूस सारासार विवेकाची किंवा त्या विवेकाचा आवाज मजबूत करण्याची शक्तीच स्वत:हून गमावून बसतो. (६) धार्मिक सणांना आणि सत्संगांना जेवढं ध्वनीप्रदूषण होतं तेवढं कोणत्याही कार्यक्रमांना होत नाही. बोलायची सोय नाही कारण तक्रार करावी तर आपल्या आजूबाजूचे चार सामान्यही आपल्याबरोबर नसतात. (७) नियमानं चालणार्‍यांसाठी या देशात स्थान नाही कारण इथली माणसं इथे असतानाची चिंता करतच नाहीत त्यांना मेल्यावरच्या जगाचं पडलेलं असतं त्यामुळे ते पुण्य गोळा करत असतात. बरं एवढं देवांचं करूनही देव काय गॅरन्टी देत नाही सगळं चांगलंच करण्याची. मग आहेच कर्माचा सिद्धांत मदतीला. मदतीला म्हणजे घटना घडून गेल्यावर कार्यकारण भावाची उठाठेव करायला. माणसं स्वत:कडे धार्मिक दृष्टीकोनातून बघण्याऐवजी जबाबदार समाजाचा घटक म्हणून स्वत:कडे बघतील तर हे सगळे उद्वेगजनक प्रकार कमी होण्यास हातभार लागेल. माणूस स्वत:ची स्थिती सुधारण्यास दैवी तोडगे करण्यासाठी वेळ देऊ शकतो पण आपल्याला ज्या गोष्टींचा थेट त्रास होतोय त्याला विरोध करण्यासाठी थोडाही वेळ देत नाही. माणसं धार्मिक कार्याला एकत्र येतात पण साध्या आपल्याच हक्क कर्तव्यांना पूरक काम करण्यापासून फटकून रहातात. उदा. लोकांना देवळात जाण्यासाठी, घरी पूजा करण्यासाठी वेळ काढता येतो पण घरच्या कचर्‍याचं खत करण्यासाठी वेळ नसतो आणि मग रस्ते कसे कचर्‍याने भरलेत यावर चर्चा रंगतात. 'तुमच्या आजकालच्या ड्रेसपेक्षा आमची नऊवारी भारी', असं माझी आजी म्हणाली आणि मला ते पटलं तरीही मी नऊवारी नेसून ऑफिसला नाही जाऊ शकत. वाट्यावर वाटलेली चटणी किती स्वादिष्ट लागते ते पटलं तरी आपण मिक्सरवरच चटणी करणार. चालणार्‍याचं भाग्य चालतं यावर विश्वास असला तरी आपण वाहनच वापरतो. मोबाईल आल्यावर दोन दशकांपूर्वीच अपूर्वाईची गोष्ट असलेला पेजर आपण विसरूनही गेलो. अगदी आपण पाटी वापरली असली तरी मुलाच्या हातात आपण (किमान) कागद-पेन्सिल देतो. त्याला लॅपटॉप, मोबाईल हाताळू देतो, वापरायला देतो. कारण काळाप्रमाणे बदल हवा हे आपल्याला माहिती आहे. देवावर कितीही भरवसा ठेवला तरी आपण विमा काढतोच. त्याचप्रमाणे धर्म ही मानवी इतिहासातली सुंदर गोष्ट आहे. पण ती ऐतिहासिक आहे. विज्ञान प्राथमिक अवस्थेत असताना आजूबाजूच्या घटनांची संगती लावायला उपयोगी पडलेली ती एक कल्पना आहे. ती इतिहासापुरतीच राहूदे. विज्ञानाकडे आजही सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाहीत हे खरय; पण ती आहेत असा भ्रम विज्ञान उत्पन्न करत नाही. खरंतर रोजच्या जगण्यात त्या उत्तरांची अशी काय गरज असते? पण प्रत्येक प्रश्नांची सोपी उत्तर धर्माकडे आहेत असा समज झाल्याने माणूस धर्माकडे वळतो आणि मग धर्माचे ठेकेदार, बाजारशरण अर्थव्यवस्था सगळेच धर्म सार्वजनिक करण्याला प्रोत्साहन देतात. सुबुद्ध समाजाचा घटक म्हणून प्रत्येकाने आपला धर्म वैयक्तिक ठेवला तर धर्म सार्वजनिक होण्याला आपोआप आळा बसेल आणि किमान रोजच्या जगण्यात ज्या गोष्टी आड येतात त्यांना थेट सामोरं जाता येईल. आणि तसं झालं तर आपलं जगणं बरंच सुसह्य होईल. आताच्या सगळ्या सुविधा विज्ञानावर अवलंबून राहिल्यानेच मिळताहेत मग त्या उपभोगताना धर्मावर का अवलंबून रहायचं? ते रहावं लागतं कारण समाज म्हणून आपण प्रगल्भ नाही, कारण प्रत्येकजण आपल्या प्रश्नांची उत्तरे धर्म आणि नशीब यात शोधू बघतोय. समाज म्हणून प्रगल्भ होण्यासाठी त्यासाठी आपल्यातली धार्मिक बाजू थोडी आवरती घ्यावी. धर्म ही अंतर्वस्त्राएवढी खाजगी गोष्ट असावी. नशीबावर हवाला सोडण्यापेक्षा प्रत्येकानेच जबाबदार नागरीक बनावे, दुसर्‍याने तसे बनण्यासाठी आग्रह धरावा. तसा आग्रह धरणार्‍यांचे आणि त्याला पाठिंबा देणार्‍यांचे प्राबल्य समाजात असावे. धार्मिक असलं तरी जे समाजाचा घटक म्हणून त्रासदायक होत असेल त्याला विरोध करावा. असा सामूहिक दबाव आला तरच आपण चांगला समाज म्हणून जगू शकू. आपण ज्या हिरीरीने धार्मिक गोष्टींना गर्दी करतो त्या हिरीरीने एक नागरीक म्हणून आपल्या भल्यासाठी चालणार्‍या गोष्टींकडे लक्ष देऊ त्याला प्रोत्साहन देऊ, त्या गोष्टींच्या पाठीशी उभं राहू तर सिस्टीम सडण्याला आळा बसेल. शेवटी सिस्टिममधला माणूसही देवावर हवाला ठेऊन बसलाय, आणि धर्म त्याला तसं करण्यात काहिही नुकसान नाही असं सांगतो. धर्माने सांगितल्याप्रमाणे पारलौकिक जगाची चिंता करत देवदेव करत बसण्याऐवजी माझं ऐहिक जगणं सुखाचं होण्यासाठी मला ऐहिक नियमच लावून घ्यायला हवेत. देश भ्रष्टाचारात बुडतो कारण आपण करतो ते "समर्पयामि" करायची सोय आपल्याला धर्मानं दिलेली आहे, त्यामुळे बेजबाबदारपणे वागता येतं. दैवावर,नशीबाबर हवाला ठेवायचं म्हणजेच जे सामोरं येईल त्याला स्वीकारायचं. हे तर मग विज्ञानही सांगतं की कोणाच्याही वाट्याला रँडमली काहिही येऊ शकतं. मग ते झेलण्यासाठी माझी मनोभुमिका तयार असायला हवी तर माझ्या आजूबाजूची व्यवस्था समाजासाठीच्या नियमांनी व्यवथित बांधलेली असावी तर माझा ताप कमी होईल. ही विज्ञाननिष्ठ भूमिका असेल तरच समाज म्हणून आपली प्रगती होईल. शेवटी समाज म्हणून सुधारण्यातच आपलं हित आहे. दुसर्‍याचं घर कितीही चांगलं असलं आणि माझं तिथे स्वागत होतं असलं तरी माझं घर मला स्वच्छ ठेवायलाच हवं कारण सगळ्यांनीच शेजार्‍याच्या घरात रहायचं ठरवलं तर अवघडच परिस्थिती होईल. आणि पुढच्या पिढ्यांनी पळपुटेपणाच शिकवल्याबद्द्ल जाब विचारला तर आपण निरूत्तर असू.
लेखनविषय:

याद्या 14449
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

इथे "त्यांना सांगा.." टाईपच्या प्रतिक्रिया येऊ नयेत अशी इच्छा आहे. कारण माझ्या धर्मात काळाबरोबर बदलण्याची अद्भूत शक्ती आहे. मूर्तीपूजक, नास्तिक, मानसपूजक, लोकायत सर्वांना सामावून घेणारा हा धर्म आहे म्हणूनच त्याने काळाप्रमाणे असे बदलावे की इतर धर्माच्या लोकांना आपण या धर्मात का जन्माला नाही आलो, असं वाटावं.

सध्या आपल्या देशाची समाजाची अवस्था ऐहिक रित्या प्रगत असेल पण.... इतर सर्व बाबतीत अधोगति चालू आहे. आपण एकेकाळी सायकलवर डबलसीट बसायला घाबरायचो. आता तीन तीन लोक्स मोटरसायकलवर बसून जातो. मला व्यक्तिशः असे वाटते की मी काळाच्या पट्टीवर योग्य काळी जन्माला आलो व सुदैवाने योग्य काळी मरणार आहे.

छान लिहिलंय. पटलं.

माणसं इथे असतानाची चिंता करतच नाहीत त्यांना मेल्यावरच्या जगाचं पडलेलं असतं त्यामुळे ते पुण्य गोळा करत असतात.
देवावर कितीही भरवसा ठेवला तरी आपण विमा काढतोच.
धर्म ही अंतर्वस्त्राएवढी खाजगी गोष्ट असावी.
या वाक्यांसाठी टाळ्यांचा कडकडाट. धर्मावर टीका न करता धर्माच्या नावाखाली अनागोंदी करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे लेख संतुलित झालेला आहे. धार्मिक, विज्ञाननिष्ठ वगैरे लेबलांच्या पलिकडे जाऊन 'या जगात माझं जगणं चांगलं व्हावं, आणि इतरांना माझ्यामुळे त्रास/अपाय होऊ नये यासाठी डोळसपणे विचार करून पावलं उचलावीत' हा संदेश पटणार नाही असा मनुष्य विरळाच.

सुंदर, समतोल, विचारी लेख ! असा विचार करायला अंगी जबाबदारपणा असायला हवा, पण हल्ली त्याचीच फार कमतरता आहे... दुर्दैवाने :( विज्ञानाकडे आजही सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाहीत हे खरय; पण ती आहेत असा भ्रम विज्ञान उत्पन्न करत नाही. लाखाची गोष्ट !!! इतकं जरी कळलं तरी फार मोठे बदल घडतील !

लेख तर आवडला आहेच. सामाजिक जाणीवेची कमतरता आणि आधुनिक समाजातल्या व्यक्तीच्या कर्तव्याविषयी अनभिज्ञ असणे ही सध्याच्या भारतीय समाजाची ठळक लक्षणे आहेत. कचरा टाकण्याविषयी मला आलेल्या काही अनुभवांवरून वाटते की 'कचरा केला तरी हरकत नाही, तो उचलण्यासाठी इतर लोक नेमलेले आहेत आणि त्यांनीच ते काम करावे' अशी थोडीशी मानसिकतासुद्धा आहे. काहींनी 'सफाईवाले आएंगे ही ना, वे उठाएंगे' अशी उत्तरे दिलेली आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे कदाचित राजा आणि रयत ही सरंजामी मानसिकता पुरती नष्ट झालेली नसेल. म्हणजे पाटील, मुखिया, खोत, ठाकुर यांच्याकडे आपली गार्‍हाणी न्यावीत, आणि त्यांनीच त्यांचे निवारण करावे, गावच्या व्यवस्थेत आपण लक्ष घालू नये, हातपाय हलवू नये, काही लोक थोरमोठे असणारच, या थोरामोठ्यांमध्ये लुडबूड करू नये, दीनवाणेपणे जगत राहावे हे अंगवळणी पडले असेल. कर्तव्य आणि हक्क या दोन्ही बाबतीत व्यक्ती आणि समाज यांचे निकोप निर्भर नाते इथे अजून निर्माण व्हायचे आहे.

In reply to by राही

दोन्ही मुद्दे पटले. पण आपण त्याची उत्तरे धर्माकडे शोधायला लागलो की अजून गुंतागुंत वाढते . हिंदू धर्म समाजऋण मानण्याबद्द्ल कुठेही ठळकपणे सांगत नाही. मग मातृऋण ,पितृऋण, पिता म्हणून असलेले कर्तव्य, सहचर म्हणून असलेले कर्तव्य, मित्रकर्तव्य या सगळ्या जंजाळात समाजाचा घटक म्हणून मी कसे वागावे हे कुठेही नाही. कारण धर्म वैयक्तिक उन्नती कडे बघतो. तेव्हा देव/ धर्म आपल्याला या रूटीन भवसागरातून तरून जायला मदत करणार नाही कारण सध्याची जीव्॑नशैली देवांच्या परिचयाची नाही त्यामुळे या आताच्या जगण्यानं निर्माण केलेल्या प्रश्नांची उत्तरे देवाकडे नाहीत.
कर्तव्य आणि हक्क या दोन्ही बाबतीत व्यक्ती आणि समाज यांचे निकोप निर्भर नाते इथे अजून निर्माण व्हायचे आहे.
अगदी खरय. पण जगण्याचा रेटा म्हणून तरी ते नातं निर्माण व्हावं. लोकमत किंवा सकाळ मध्ये टिकेकरांचे लेख येत. त्यात पूर्वीच्या मानसिकतेत राहून बेशिस्त वागणार्६या लोकांना उपदेशपर सांगणार्^या १९व्या शतकातील एका पुस्तकाबद्दल निहीले होते. "मोठ्याने शिंकरू नये, मचामचा आवाज करत खाऊ नये" अश्यासारखे आता हसू येईल असे चांगले वागण्याचे नियम त्यात होते मह्णे. लेखाच्या शेवटी टिकेकरांनी आताच्या काळानुसार अश्या पुस्ताकाची गरज असल्याचं विधान केलं होतं. (तुम्हाला संदर्भ माहित असेलच तर डिटेल्स द्याल का? )

त्याचप्रमाणे धर्म ही मानवी इतिहासातली सुंदर गोष्ट आहे. पण ती ऐतिहासिक आहे. विज्ञान प्राथमिक अवस्थेत असताना आजूबाजूच्या घटनांची संगती लावायला उपयोगी पडलेली ती एक कल्पना आहे.
>> अगणित वेळा सहमती एकुणातच सम्पूर्ण लेख (हा विना-अभिनिवेशपूर्ण असल्यामुळे कदाचित अधिक) भिडणारा आहे. ह्या लेखाची लिन्क सन्ग्रही ठेवीनच, शेअर केली तर चालेल ना? या लेखाची परिणामकारकता आपल्या प्रतिक्रियेने बदलू नये अशी तिव्र इच्छा आणि जितक्या नितळपणे हा लेख लिहिलाय तितक्याच नितळपणे आपल्यामागुन वाचणार्‍यालाही वाचता यावा याकरता अधिक लिहित नाही.

"पुढच्या पिढ्यांनी पळपुटेपणाच शिकवल्याबद्द्ल जाब विचारला तर आपण निरूत्तर असू." असे अजिबात नाही. एकसंघ समाज म्हणून भारतीय कधीच एकत्र येवू शकलेले नाहीत आणि नसतील. ७-८ धर्म मग त्यांचे उपधर्म मग त्यातील जाती-वाद आणि असंख्य बाबा आणि त्यांचे अगणित अनुनायी.तसेच भरपूर पक्ष आणि त्यांचे सो कॉल्ड कार्यकर्ते. गेली २०-२२ वर्षे फुकटची समाजसेवा करून एकच समजले, आपली अडचण जर दुसरा सोडवत असेल तर, एक तर काड्या घालतील किंवा पळपुटे करतील किंवा नुसतीच बघ्याची भुमिका घेतील. काही उदाहरणे.... १. फुटपाथ वर मोटरसायकल चालवणार्‍या माणसाला हटकले, तरी एक पण "माई का लाल" मागे उभा राहिला नाही. २. मुद्दाम राँग साईडने मोटरसायकल चालवणार्‍या व्यक्तीला हटकले तरी हीच बोंब. ३. झेब्रा क्रॉसिंगवर वाहन दिसले, म्हणून पोलीसाला सांगीतले, (सन १९८१) तर त्याने मला वेगळाच सल्ला दिला.जो माझ्या भल्याचाच होता."जान बची लाखो पाये." आता तर त्या चौकात झेब्रा क्रॉसिंगच नाही."न रहेगा बांस न बजेगी बांसूरी." ४. डोंबिवली (इस्ट) भागात ७-८, बसचे "ओ" रूट्स चालू केले तर हवेतील प्रदूषण बरेच कमी होईल, जनतेचा पैसा वाचेल आणि नगरपालिकेला पण उत्तम आर्थिक पाठबळ मिळेल, ही उपाय-योजना आमच्या एका पक्षाच्या सभेत सांगीतली. अर्थातच, ती मान्य करण्यात आली नाही.कारणाच्या मुळाशी जायला मला वेळ नाही आणि हा फुकटचा मनस्ताप सहन करण्याची माझी मानसीक तयारी पण नाही. साहजिकच दत्तनगर मधल्या मुलांना, पेंढारकर कॉलेजला जायचे असेल किंवा फडके रोडवरील वाचनालयात जायचे असेल तर रिक्षाला पर्याय नाही.मग रिक्षावाला जो सांगेल तो भाव. ५. घरातून निघतांनाच एखादी पिशवी घेवून निघा.त्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे प्रदूषण कमी होईल, असा संदेश घेन बराच फिरलो.पण परत पहिले पाढे पंचावन्न. ======= धार्मिक बाबतीत काही बोलले की, आधी धर्म आणि मग जात विचारली जाते.धर्म-जातीवरून दुसर्‍याचे मत ठरवले जाते, हा अनुभव तर सार्वजनिक.पुर्वी संताप यायचा आज तर कीव पण करावीशी वाटत नाही.कारण, आजकाल मी कुणालाच काही समजावायला जात नाही. ज्या देशांत "गाडगे बाबांच्या" मताला कुणी अद्यापही हिंग लावून विचारत नाही, तो समाज मी बदलू शकेन असे मला अजिबात वाटत नाही.आमची पिढी त्यांची थोडी फार आठवण तरी काढते, पुढच्या पिढीला ह्या व्यक्तीविषयी किंवा ह्यांच्या सामाजीक मतांविषयी काय समजणार? ========= माझ्या घरच्यांनी आणि मुलांनी, मी केलेले हे फालतू उपद्याप बघीतलेले आहेत.त्यामुळे ते तरी मला पळपुटा म्हणणार नाहीत, ह्याची खात्री आहे. ====== एखादी सामाजीक अडचण सोडवायची असली तरी, आपले नेते आणि अधिकारी, काहीतरी थातूर-मातूर उपचार करतात आणि मग असे वाटते, की आधीचाच गोंधळ बरा होता. डोंबोली सारख्या सुशिक्षित लोकांच्या नगरीत ही अवस्था आहे, इतर ठिकाणाची गोष्टच नको. तुमच्यासारखा सविस्तर आणि मुद्देसूद प्रतिसाद लिहू शकत नाही, ही माझी लेखनसीमा.

In reply to by मुक्त विहारि

७-८ धर्म मग त्यांचे उपधर्म मग त्यातील जाती-वाद आणि असंख्य बाबा आणि त्यांचे अगणित अनुनायी.
म्हणूनच धर्म सार्वजनिक जीवनात आणू नये.
तसेच भरपूर पक्ष आणि त्यांचे सो कॉल्ड कार्यकर्ते.
ते आपल्या नागरिक मह्णून फोकस नसण्याचा फायदा घेतात. ते घेऊ द्यायचा नसेल तर आपले तात्पुरते नुकसान झाले तरी जे सार्वजनिक जीवनात योग्य आहे त्याचाच अवलंब करायला हवा, करण्याचा आग्रह धरायला हवा.

In reply to by अंतरा आनंद

मी दिलेल्या ५ही उदाहरणांत कौटुंबिक स्वार्थ न्हवता. माझ्या कुटुंबाचे रक्षण करायला ना देव येणार आहे ना ही इथले नेते.माझ्या कुटुंबाचे रक्षण करायला मी समर्थ आहे. असो, गांडूळ पण वेळप्रसंग पडला तर लगेच उलट फिरते, पण समाज लवकर बदलत नाही. आजच्या समाजाची "गरीब बिचारी मुकी जनावरे, कुणीही हाका." अशी स्थिती झालेली जाणवते. म्हणूनच, आजकाल मी फार जास्त समाजाचा विचार करत नाही. अजून एक उदाहरण देतो. २००६ ते २००९ पर्यंत आखाती देशांत नौकरी करतांना एक समजले की, आखाती देशात कामगारांमध्ये मराठी लोकांचे फार कमी प्रमाण आहे. आता हे प्रमाण कमी असंयाचे एकमेव कारण म्हणजे "अज्ञान." म्हणून डोंबोलीतल्या मराठी लोकांसाठी काम करणार्‍या २ राजकीय पक्षांकडे गेलो.ह्यातही माझा कौटुंबिक स्वार्थ न्हवता. अर्थात २ही पक्षांना त्यात काही रस न्हवता. पण ह्याच्या उलट कोपरखैरणे इथल्या एका कॉलेजने मात्र ह्या कार्यक्रमात रस दाखवला आणि मला तिथल्या मुलांबरोबर बोलायची संधी पण दिली. (त्या कॉलेज मध्ये माझी मुले शिकत नाहीत) ========= अनुभव खूप आले आणि ते नकारात्मकच जास्त आल्याने, "गड्या, आपण बरे आणि आपले कुटुंब बरे." अशा मानसिक भुमिकेत सध्या तरी आहे.

In reply to by मुक्त विहारि

२००६ ते २००९ पर्यंत आखाती देशांत नौकरी करतांना एक समजले की, आखाती देशात कामगारांमध्ये मराठी लोकांचे फार कमी प्रमाण आहे. आता हे प्रमाण कमी असंयाचे एकमेव कारण म्हणजे "अज्ञान." म्हणून डोंबोलीतल्या मराठी लोकांसाठी काम करणार्‍या २ राजकीय पक्षांकडे गेलो.ह्यातही माझा कौटुंबिक स्वार्थ न्हवता.
अहो सर्व राजकीय पक्षांना दुसर्‍या देशातुन माणसे इथे आणुन त्यांचे मतदार वाढवायचे असतात. तुम्ही उलटा सल्ला घेउन गेलात त्यांच्या कडे.

In reply to by गंम्बा

संशयाला जागा आहे. कदाचित, आपले भरवश्याचे कार्यकर्ते कामधंद्याला लागले, तर मग मॉब कसा गोळा करायचा? हा पण त्यांच्या दृष्टीने यक्षप्रश्र्न होवू शकतो. आपल्या भारतात, काहीही होवू शकते.....

In reply to by मुक्त विहारि

उलटा बिलटा बिल्कुल नाही मुविकाका, पोलिटिकलांना असे यादीत नाव असलेले आणी मतदानादिवशी जागेवर नसलेले लोक्सच फार उपयुक्त असतात. त्यांच्याकडे नोकरीनिमित्त बाहेरगांवी वगैरे असणार्‍यांची सेपेरेट लिस्ट तयार असते बोगस व्होटिंगसाठी. राहता रह्यला मॉब आणि कार्यक्र्त्याच्या प्रश्न. इंडीया बहुत बडी चीज है. कोई कमी नही.

लेख! प्रत्येक वाक्या वाक्याला सहमत!

नेहमीचंच आहे त्यामुळे पास. पोलीस भरतीला पैसे भरावे लागणार नाहीत त्या दिवशी गोष्टी सुरळीत होतील. (पोलिसयंत्रणा ही पैशावर चालत नाही/चालू नये हे सगळ्यांनी समजून घेणं ही प्राथमिकता आहे,नेते पैसे मागतात कारण आपल्यातले काही लोक देतात आणि पैसे देणं ही मानसिकता आपण स्पर्धेत कमी आहोत हे मान्य करणं आहे) नंतरच्या 90% गोष्टी कायद्याच्या अंमलबजावणी न करण्याने होतात त्यामुळे हा आपल्यावर च येणारा जबाबदारीचा भाग आहे. असो. (काही आयडीचे प्रतिवाद आणि प्रतिसाद नेहमी मखरात बसून दिलेले जाणवतात.)

In reply to by मितभाषी

हे व्यवहार जाहिरात देऊन लेखी होणं अपेक्षित आहे काय? काही नुकत्याच कालवश नेत्यांचा इतिहास भूगोल बघा.

In reply to by उडन खटोला

माझा प्रश्न थेट आहे. तुमचे जवळचे कोणी पोलिसात आहेत का. तुम्ही जर का विधान करता तर त्याला काही तरी आधार असेल. ;)

In reply to by मितभाषी

मी उत्तरानंतरचा प्रश्न अपेक्षित धरुन उत्तर दिलं आहे. पोलीस भरती मध्ये भ्रष्टाचार होतो. माझ्या आतेभावासाठी प्रयत्न करुन झालेले आहेत. तेव्हा काम झालं नाही. बहिणीचे मिस्टर तत्कालीन गृहमंत्री यांच्या मतदार संघात राहतात. याबाबत भेटून सविस्तर चर्चा करुया. कट्टा जाहीर करा. उगा मिपा ला त्रास नको.

In reply to by मितभाषी

ओके, माघार. पोलीस भरती मध्ये भ्रष्टाचार झालेला नाही, पोलीस भ्रष्ट नाहीत सगळं tide ने धुतल्याप्रमाणे स्वच्छ आहे.

In reply to by उडन खटोला

तुम्ही जर आर आर बद्दल बोलत असाल तर मला वाटत हा गैरसमज आहे. त्या माणसाने पोलीस भरतीतील भ्रष्टाचार पूर्ण पणे निपटून काढला, अपवाद असतील. त्यांचा पक्ष जरी भ्रष्ट असला तरी तो माणूस सच्चा होता . आयुष्याच्या शेवटी हा माणूस जेंव्हा रुग्णालयात शेवटचा श्वास घेत होता तेंव्हा त्याच्या कुटुंबियांना राहायला मुंबई मध्ये घर न्हवत, तरी त्याचा कुटुंबीयांनी कोणाकडे हात पसरला नाही. हि गोष्ट जेंव्हा त्यांचा पक्ष प्रमुखांना समजली तेंव्हा त्यांनी वसंत डावखरेंचा बंगला त्यांना उपलब्द करून दिला. असे किती मंत्री महाराष्ट्रात आहेत कि जे 15 वर्ष सत्तेत असून मुंबई मध्ये त्यांचं घर नाही. माझ्या गावतील एका मित्राने आर आर च्या जमान्यात पोलीस भरती पैसे देऊन होण्याचा प्रयत्न केलेला पण ते शक्य झाले नाही, जेंव्हा त्यांचाच पक्षाचा दुसरा नेता गृहमंत्री (आर आर च्या जिल्यातील) झाला तेंव्हा त्याच काम झालं. जर तुमि दुसऱ्या कोणाबद्दल बोलत असाल तर प्रतिसाद दुर्लक्षित करावा.

In reply to by उडन खटोला

अभ्यास वाढवा. सगळं आयतं मिळत नाही. आपलं नाणं खणखणीत नाही मग अपयशाचं खापर दुसर्या कोणाच्या तरी माथ्यावर फोडायचं. बाकी ते लेखी का ग्राउंड ? ;) मुळात प्रश्न समजला नसेल तर माहिती घ्या.

In reply to by मितभाषी

अहो, मुद्दा तोच आहे ना! आमच्या उमेदवाराची क्षमता कमी आहे हे मान्य च आहे. म्हणूनच तुमच्या 'कार्यक्षम' मंत्र्याच्या कारकिर्दीत भरती पैसे देऊन होते असं समजल्याने प्रयत्न केले गेले. बाकी तुमचे मंत्री एवढे कार्यक्षम होते तर जिंकायला का एवढे अडचणीत यायचे? समोरचा उमेदवार विकत घेऊन आपल्याच पार्टी मध्ये आणला गेला? एक कारखाना, एक हॉटेल, पैसे आणखी काय काय दिलं?

In reply to by उडन खटोला

उडनखटोलाजी, मी हाच मुद्दा मांडतेय. ’आमची बाजू लंगडी आहे, आमचं वैयक्तिक नुकसान होईल’ या आणि अश्या सबबी सांगून आपण भ्रष्टाचार करतो तो आपल्या पातळीवरचा छोटा असला तरी भ्रष्टाचाराचा शिष्टाचार व्हायला हातभार लावतो. अश्या गोष्टींचं निर्लज्जपणे समर्थन करणं तरी होऊ नये पण ते ही होतं तेव्हा आपण नागरिक म्हणून किती घसरलेले आहोत तेच स्पष्ट होतं आणि राजकारण्यांच्या वा उच्चपदस्थांच्या भ्रष्टाचाराबद्दल आपण "असंच चालतं" म्हणून निगरगट्ट होऊ शकतो. जर आपण देवावर विश्वास ठेवणारे असू तर (१) देव माझं भलंच करेल, माझं तात्पुरतं नुकसान असलं तरी देवाने यात माझ्यासाठी याहून चांगलं योजलं असेल; या विश्वासावर अवलंबून राहून आपण चुकीचं वागणं टाळायला हवं. (२) जर कर्मसिद्धांतावर विश्वास असेल तर "असेल माझ्या पूर्वसंचिताचं फळ पण आता चुकीचं वागून मी पुढच्या जन्मीच्या पापात भर घालू नये". हे विचार आपण करत नाही यावरूनच दिसतं की धार्मिकता लंगडी पडते आणि ऐहिक स्वार्थच महत्वाचा ठरतो.तेव्हा किमान सार्वजनिक जीवनातली धार्मिकता कमी केली तर ज्या माणसाच्या रोजच्या जगण्याच्या मुद्द्याशी संबधित नाही त्या गोष्टी कमी होतील आणि आपण जगण्याचा सार्वजनिक भाग सुसह्य करण्याच्या दृष्टीनं पुढे जाऊ. आरार आबांबद्द्ल मी ही चांगलंच ऐकलय. त्यांची मुलगी शिकत होती तेव्हा मुलुंडमध्ये एका जागेत भाड्याने रहात होती आणि ते इतक्या साधेपणाने की त्या सोसायटीतल्या बर्^याच लोकांना ते माहितही नव्हतं . त्या सोसायटीच्या गव्हर्निंग कमिटीत जीचे सासरे होते अश्या माझ्या एका मैत्रिणीनं मला हे सांगितलं होतं. ’आमचे मंत्री तुमचे मंत्री’ हे वाचून मला एका सद्गृहस्थांची आठवण झाली. बंगारू लक्ष्मण यांच्या लाच प्रकरणाबद्द्ल आमच्या आमच्यातच चर्चा सुरू असताना हे महाशयम्हणाले होते, " मग झालं काय कॉग्रेसचे लोकं काय हे उद्योग करत नाहीत का? त्यांनी एकदा केलं तर काय बिघडलं?". हा माणूस राजकिय दृष्ट्या कुठेच नव्हता, सामान्य सरकारी कर्मचारी. बंगारू लक्ष्मण काही बघायला येणार नव्हते ह्याला काय वाटतय ते; पण हे असं समर्थन आपण करू शकतो कारण नागरिक म्हणून आपण अश्याच सबबी सांगत आपल्या चुकीच्या वागण्याचं समर्थन करत असतो. आपल्या अंगवळणी पडलेली ही सवय काढायला हवी तरच आपण चांगलं जीवन जगू शकू नशीबावर हवाला ठेवून नाही..

In reply to by अंतरा आनंद

आर आर पाटील या व्यक्तीपुरती चर्चा सीमित झाल्यानं मुद्दा निसटलेला आहे. पोलीस भरतीमध्ये भ्रष्टाचार होतो हा मुद्दा खाली मितभाषी यांनी देखील मान्य केला आहे. नाडले गेलेले किंवा गरजू लोक येनकेन प्रकारेण काम करुन घेण्याच्या मागे लागतात. सवलत मागून घेणं हे सामान्य लोकांचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे भरतीमध्ये लाच देऊन भरती करुन घेणं हे शक्य असल्यास लोक करणार. मुळात यंत्रणा त्या पद्धतीची का बनली? मिलिटरी भरती मध्ये सहसा असं घडत नाही म्हणून त्यांना आजवर मान मिळतो तसा पोलिसांना मिळताना दिसतो का?

In reply to by उडन खटोला

मीपण तेच म्हणतोय. योग्यता नसताना लाच देऊन बळच घुसायचे आणि नाही जमले , थोबाडावर आपटले तर बोंबा मारायच्या. ;) आंजावर एकीकडे लाच न देण्याची सुरूवात आपल्यापासून करायची हामानभावीपणेा करायचा आणि इथे तुमचे पितळ उघडे पडले आहे. बाकी आमचे कोणोही मंत्री नाहीत. तुम्ही आरारआबा बाबत बोलत असाल तर वरती अमितने लिहीले आहे तेच माझे मत आहे. असो. चांगल्या धाग्याला गालबोट नको म्हणून इथेछ थांबतो.

In reply to by मितभाषी

मी माझ्या बद्दल बोलू शकतो. मी लाच घेत नाही. आत्या च्या कुटुंबानं कुठल्या प्रकारे गोष्टी हाताळाव्यात हे मी सांगू शकतो. अम्मल बजावणी करणं न करणं त्यांच्या हातात असतं. यात मानभावीपणा कुठून कसा आला हे समजलं नाही. बाकी आर आर पाटील यांचं स्वच्छ चारित्र्य राष्ट्रवादी साठी गरजेचं असल्यानं ते जाणीव पूर्वक जपलं गेलं. बाकी चालू द्या.

सुबुद्ध समाजाचा घटक म्हणून प्रत्येकाने आपला धर्म वैयक्तिक ठेवला तर..
आजकाल बुद्धीपुरस्सररित्या धर्म सार्वजनिक करण्याचे दिवस आहेत. तेव्हा ताई, तुम्ही कितीही संतुलित व सुबुद्ध लिखाण केले, तरी, त्यास पाठिंबा देणारे किती लोक निघतात ते पाहून वाईट वाटावे अशीच परिस्थिती राहणार.

काही निष्कर्ष काढावेसे वाटतात. १. डोंबोलीत (एकूण सेंट्रल लाईनला) समस्या जरा जास्तच आहेत. (की आजकाल मिपा डोंबोलीकरांनी हायजॅक केले आहे.;) ) २. अनिवासी भारतीयांनी भारतातल्या समस्यांवर गरळ ओकू नये. ३. ज्यांना विकसित देशात 'सेटल' होण्याचा पर्याय उपलब्ध आहे आणी योग्य वाटतो त्यांनी तो खुशाल स्विकारावा. ज्यांना तो पर्याय उपलब्ध नाही किंवा ज्यांनी बाहेरचे जग पहिले नाही त्यांनी ऐकीव माहितीवर मेरा भारतच फक्त महानचे नारे लगावू नये. ४. ज्यांना भारत महान व्हावा असे वाटते त्यांनी समाजप्रबोधन आणी समस्यानिवारणाचे काम वैयक्तीक आहे समजून त्यात शक्य तितका सहभाग घ्यावा, गरज पडली तर मरेपर्यंत. (फक्त आंतरजालावर पिंका टाकू नये.) ५. ज्या अनिवासी भारतीयांना मायदेशाबद्दल अतिशय प्रेम आहे किंवा ज्यांना त्यांचे पुर्वीचे राहते भारतातील शहर 'बेष्ट' वाटते त्यांनी सरळ आहे त्या नोकरीचा त्याग करून भारतात परत यावे आणी भारत महान बनवण्यास मदत करावी. (नाईलाज वगैरे शब्द वापरू नये, अर्थात काही जेन्युन अपवाद वगळून) ६. धर्मांचा किंवा लोकांना समजलेल्या धर्माचा समाजातील समस्यांशी जवळचा संबंध आहे. (लोकसंख्या आणी गरीबीचा नसावा) धन्यवाद.

In reply to by मराठमोळा

पुण्यासारखंच आहे डोंबिवलीचं. आमचं सगळं अद्वितियच अस्तय, समस्याही. ;) मला भारत महान व्हावा की नाही याबद्द्ल काहीही म्हणायचं नाहीय. माझं आणि इथे रहाणार्‍या प्रत्येकाचं नागरिक म्हणून असलेलं रहाणीमान सुसह्य असावं आणि त्यासाठी त्याचा ( माझाही ) जो वाटा असेल तो प्रामाणिकपणे उचलावा. (मी माझ्या परीने उचलते. शिस्तीत वागताना ) उगाच धर्म, देव, विज्ञान अश्या संबधित नसलेल्या गोष्टी मध्ये आणून गुंतागुंत वाढवू नये.

In reply to by अंतरा आनंद

>>पुण्यासारखंच आहे डोंबिवलीचं आता यात पुणे कुठुन आले ते समजले नाही. तसेच, >>उगाच धर्म, देव, विज्ञान अश्या संबधित नसलेल्या गोष्टी मध्ये आणून गुंतागुंत वाढवू नये धर्माचा (लोकांना समजलेल्या) उल्लेख तुमच्या लेखात आला म्हणून तसे लिहिले. गुंतागुंत किंवा वाद वाढवण्याची ईच्छा अजिबात नाही. पण वर कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे ही चर्चा काही नविन नाही. चघळून चोथा झालेला विषय आहे. ईतका विचार आणी आचरण करायला कदाचित कुणालाच वेळ नाही किंवा महत्व नाही. ईमानदारी आणी सद्विचारांच्या पदरी निराशा आणी उपेक्षाच येते. आणी तुम्हाला थोडे यश मिळालेच तर तुमचा देव किंवा संत बनवून लोक तुमचे देऊळ बांधतील आणी तिथे गर्दी करतील किंवा दुकाने मांडतील, आणी पुन्हा ये रे माझ्या मागल्या. जातीव्यवस्थेचया विरुद्ध कित्येक शतके लढा चालू आहे पण गेली का जात कुणाच्या मनातून? मुवि म्हणतात ते खरं आहे. सामान्य माणूस फार काळ लढत नाही राहू शकत. त्याला आधीच भरपूर जबाब्दार्‍या पार पाडायच्या असतात. ईमानदार किंवा नियमाने वागणार्‍या माणसाला फक्त त्रास होतो आणी त्याने काही केलं, कितीही बोंबाबोंब केली तरी ईतर कुणाला काडीचाही फरक पडत नाही. त्यामुळेच माणूस ईतर पर्याय शोधायला लागतो. माझ्या पुर्वीच्या एका चर्चेवर आलेल्या प्रतिक्रिया पहा. भ्रष्टाचाराचे समर्थन करणारे इथेच किती आहेत ते. त्यात आंतरजालावर किबोर्ड बडवून काही उपयोग नाही. ज्यांना खरंच कळकळ आहे त्यांना आंतरजालावर चर्चा करण्यासाठीदेखील वेळ नसतो हे माझे वैयक्तीक मत.

लेखातल्या प्रत्येक वाक्याशी सहमत पैजारबुवा,

लेख आवडला. डोंबोलीतील आणखी एक डोकेदूखी म्हणजे भुमिपूत्र. तुमच्या दुर्दैवाने तुम्ही ज्याला हटकलात तो जर भुमिपूत्र निघाला तर तुमच्या तंगड्या गळ्यात समजा (इथे तुम्ही स्त्री असल्याचा फायदा मिळतो). कारण त्यांच्या समजुतीनुसार ते स्वतः ब्रिटीश आणि तुम्ही भाडोत्री. रस्ता त्यांच्या बापाचा असतो आणि कधीही, कुठेही भररस्त्यात मध्येच गावगप्पा करण्याचा त्यांचा अधिकार असतो. इतरांनी त्यांच्या गप्पा होईस्तोवर वाट पाहायची. त्यांना अजिबात हटकायचे नाही आणि चुकूनमाकून हा अपराध घडल्यास तुम्हाला लागलीच प्रसादही मिळतो. ते कमी वाटल्यास फोनाफोनी करुन आणखी गावकरी बोलावले जातात. गावकर्यानाही इतर उद्योग नसल्याने हात धुवून घेण्यासाठी लागलीच गोळा होतात.

लेख लिहिण्याचा हेतू प्रामाणिक आहे ह्यात संशय नाही; पण धर्म ही गोष्ट सुंदर आहे असं जोवर म्हटलं जातंय तोवर त्याला काहीही अर्थ नाही. धर्म वाईट नाही; पण धर्माच्या नावाखाली त्रास देणारे वाईट अशी अनाठायी मखलाशी कशाला? धर्म आणि देवाचा जन्मच मुळात त्याच्या नावाखाली फायदा आणि सत्ता मिळवायला झाला आहे. फावड्याला फावडं म्हणायला आढेवेढे कशाला? सामान्य माणसाची धार्मिकता हा तर शुद्ध वेडेपणा आहे. त्याला सुंदर म्हणणे म्हणजे "स्किझोफ्रेनिया हा एक सुंदर अनुभव आहे; पण तुला बरं व्हावं लागेल रे शोन्या" असं म्हटल्यासारखं आहे.

In reply to by नगरीनिरंजन

लेख लिहिण्याचा हेतू प्रामाणिक आहे ह्यात संशय नाही; पण धर्म ही गोष्ट सुंदर आहे असं जोवर म्हटलं जातंय तोवर त्याला काहीही अर्थ नाही. धर्म वाईट नाही; पण धर्माच्या नावाखाली त्रास देणारे वाईट अशी अनाठायी मखलाशी कशाला?
डॉ नरेंद्र दाभोलकरांचा गरज विवेकी धर्मजागराची हा लेख आठवला. असो!

In reply to by नगरीनिरंजन

त्याला सुंदर म्हणणे म्हणजे "स्किझोफ्रेनिया हा एक सुंदर अनुभव आहे; पण तुला बरं व्हावं लागेल रे शोन्या" प्रचंड सहमत.... जोरजोरात भजने म्हणून, जर देव प्रसन्न होत असता तर अजून काय हवे? मंदिरात गेले तर एकच जाणवते, देव इथे राहूच शकत नाही. नरबळी देणारे आस्तेक आणि जाता-येता ध्वनी प्रदूषण करणारी आणि इतरेजनांना बहिरे बनवणारी दांभिक भक्त मंडळी, मी तरी एकाच तराजूत तोलतो.

In reply to by नगरीनिरंजन

धर्म ही मानवी इतिहासातली सुंदर गोष्ट आहे
असं म्हटलय मी. मी धर्माची चर्चा करत नाहीच्चे. 'माझ्या जीवनात खुप अडचणी, अनिश्चितता आहे म्हणून मला धर्म/देव यावर भरवसा ठेवावा लागतो' ह्या म्हणण्यात काहीही अर्थ नाही. असं म्हणायचंय मला. इश्वराने मांडलेल्या पसार्^यात आपण क्षुल्लक आहोत असं एका बाजूला म्हणायचं आणि दुसर्^या बाजूला देवाला फक्त आपलीच काळजी आहे यावर विश्वास ठेवून 'देव देव' करायचे आणि दोष द्यायचा जगण्यातल्या अनिश्चिततेला त्यातून पुन्हा उदाहरणे द्यायची ती सामाजिक, सामुहिक हलगर्जीपणाची,यावर माझा रोख होता. "तुझ्या डोक्यात काहीतरी मोठा बिघाड झालाय म्हणून तू दोन दुनियेत वावरतोयस. येत जा , चांगला वठणीवर आणतो मी तुझा मेंदू" असं डॉक्टरने म्हटलं तर पेशंट पळून जाईल किंवा डॉक्टरच्या कानाखाली जा़ळ काढेल. त्यातून ठार अडाण्यांना एकवेळ ही भाषा चालेल पण सुशिक्षित अडाण्यांना नाही कळत आणि आपल्याकडे त्यांचीच संख्या भरपूर.

In reply to by अंतरा आनंद

'माझ्या जीवनात खुप अडचणी, अनिश्चितता आहे म्हणून मला धर्म/देव यावर भरवसा ठेवावा लागतो' ह्या म्हणण्यात काहीही अर्थ नाही. असा अर्थ माझ्या मूळ धाग्यात कधीही नव्हता. ते विधान आत्यंतिक उपरोधाने लिहिले होते. तुम्ही वर्णन केलेले आपल्या देशात चालणारे प्रकार निंदनीयच आहेत. कुणी मला, लेबले लावायची गरज काय, असा प्रश्न विचारला आहे. पण मला तरी कायम, विज्ञाननिष्ठ हे लेबल लावायला आवडेल. कारण तर्काच्या कसोटीवर पास न होणारी कुठलीही गोष्ट मी करत नाही. मोठा आवाज, अस्वच्छता, गर्दी हे माझे शत्रू आहेत. त्यापासून मी सदैव दूर रहाण्याचा प्रयत्न करतो. यनावालांचे विचार मला पूर्णपणे पटतात. फक्त ते विचार, सश्रद्ध माणसांना ऐकवायला मी सहमत नाही. धर्मपरायण रहायचे की विज्ञाननिष्ठ रहायचे हे ऐच्छिक आहे. दोन्ही प्रकारांनी एकमेकांस उपदेश करु नये,फक्त, आपल्या वागण्याचा त्रास दुसर्‍यांना होऊ नये, एवढी काळजी घ्यायला पाहिजे.

लेख आवडला. मात्र ज्यांच्यामुळे लेखात उल्लेख केलेले त्रास होतात ते असलं काही वाचत नाहीत. काही "सत्संगांचे" अपवाद वगळता सर्वसामान्यांची श्रद्धा इतरांसाठी बरीचशी निरूपद्रवी असते. खरा त्रास असतो लोकांच्या श्रद्धेला मैनिप्यूलेट करुन आपले उखळ पांढरे करणार्यांचा आणि स्वयंघोषित संस्कृती रक्षकांचा. हल्ली संस्कृतीच्या व्याख्येत एक नविन कलम जोडण्यात आलं आहे; जून ते सप्टेम्बर रोज संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपरयंत ढोल बडवणं. एकदा ही संस्कृती आहे म्हटल्यावर इतरांना होणारे त्रासाची पर्वा कोण करतो.

In reply to by सतिश गावडे

गुढी पाडव्यानिमित्ताची शोभायात्रा. आता ह्या शोभायात्राला शोभा यायला ढोल पथक हवेच.(कारण आवाज केल्या शिवाय सण साजरे होत नाहीत.)आणि मग त्याचा सराव पण व्हायला हवाच. सध्या हा सराव "नेहरू" मैदानावर होतो. त्या एका दिवसा साठी, जवळपास महिनाभर तिथल्या काही लोकांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास नक्कीच होत असणार. असो, मी काही नेहरू मैदानापाशी रहात नाही, म्हणून मी ह्या विषयी काही बोलताच कामा नये, असे उत्तर मिळाल्याने, अस्मादिक मूग गिळून गप्प आहेत. शोभायात्रा मी कानांत बोळे घालून बघतो.

In reply to by आनंदी गोपाळ

कुणास ठावूक? गणपती-नवरात्र ह्या दिवसांत मी डोंबिवली पासून दूर पळतो. आपले कान आपल्यापाशी.

In reply to by सतिश गावडे

काही "सत्संगांचे" अपवाद वगळता सर्वसामान्यांची श्रद्धा इतरांसाठी बरीचशी निरूपद्रवी असते. खरा त्रास असतो लोकांच्या श्रद्धेला मैनिप्यूलेट करुन आपले उखळ पांढरे करणार्यांचा आणि स्वयंघोषित संस्कृती रक्षकांचा.
श्रद्धा व्यक्तिगत पातळीवर असते तोपर्यंतच निरूपद्रवी असते. पण ती तशी रहात नाही कारण तिला काहीही बेस नसतो. 'श्रद्धा ठेवून आपलं भलं होतं " यावर विश्वास बसू नये अश्या घटना रोजच्या जीवनात सतत घडत अस्तात म्हणूनच आपली श्रधेची भावना सामूहिक करत आपला आपल्याला दिलासा देण्याचा प्रयत्न सतत चालू असतो. या प्रवासात धार्मिक भावना सर्वसामान्यांची असली तरी कडवी होत जाते आणि आपलं भलं तो कडवेपणा जपण्यत आहे असं प्रत्येकाला वाटायला लागतं. ढोल बडवण्याबद्द्ल सहमतच.

In reply to by सतिश गावडे

सर्वसामान्यांची श्रद्धा निरुपद्रवी असते हे खरे. पण हे सर्वसामान्य लोक 'पॅसिव उपद्रवी' असतात. ते स्वतः काही करत नाहीत पण उपद्रवी मॅन्युपुलेटिंग लोकांच्या हातात/गोटात अलगद पडून त्यांना संख्याबळ देतात. उपद्रवी बहुमताचा दरारा निर्माण होऊ देतात. हे लोक असले काही वाचत नाहीत, हे विचार त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत किंवा तसे ते न पोचण्याची तजवीज केली जाते (स्पॉन्सर्ड भजनसप्ते-तीर्थयात्रा-पारणी-समाराधना-महापूजा-महायज्ञ वगैरे गुंगीकारक पदार्थांद्वारे) हे खरे.

In reply to by राही

ते स्वतः काही करत नाहीत पण उपद्रवी मॅन्युपुलेटिंग लोकांच्या हातात/गोटात अलगद पडून त्यांना संख्याबळ देतात.
कायतरी बेसिकात लोचा आहे. तुम्ही इतरांना सामान्य सामान्य करून स्वतः कुणीतरी वेगळे असल्याचा समज करून घेता आणि वर आश्चर्य व्यक्त करता की "ते" अलगद "दुसर्‍या" गोटात पडतात. सामान्य माणसाला बाकी काही कळत असेल-नसेल, तरी कुणाला आपण आपलंसं वाटतो आणि कुणाला आपण आपलंसं वाटत नाही ते बरोबर कळत असावं असंच म्हणायला पाहिजे मग तर...

In reply to by असंका

हा शब्दप्रयोग मुळात श्री सतीश गावडे यांनी वापरला आहे. आणि कोणीही वापरला तरी सर्वसामान्य ही एक कॅटेगरी आहेच आणि ती इतर 'काहीं'पेक्षा वेगळी असते हे बाय डिफॉल्ट गृहीत असते. श्री गावडे यांच्या प्रतिसादात सर्वसामान्य आणि मॅन्युपुलेटंग असे विभाजन आहे. सर्वसामान्य हा शब्द उच्चारताना आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ, वेगळे असतो ही भावना कधीच नसते. नाही तर दरवेळी सर्वसामान्य म्हणताना 'त्यात आम्हीही आलो बरं का' असा कंस जोडावा लागेल. वरती तुम्हीही 'इतरांना' हा शब्द वापरला आहेच. मते मांडताना समूहाचे असे वर्गीकरण होणे अपरिहार्य आहे.

In reply to by राही

तुम्ही हा खुलासा केला नसता तर मलाही "त्यात मी ही आलो" असा माझ्याच प्रतिसादाला उपप्रतिसाद द्यावा लागणार होता :)

In reply to by सतिश गावडे

माझा भयंकर गोंधळ होतोय... @ सतिश गावडे... १. सर्वसामान्य लोक असलं काही वाचत नाहीत. २. त्यात मीही आलो... मग तुम्ही ते तसलं काही (मंजे हा लेख) वाचलंत की नाही? मग वरच्यातलं एक वाक्य तरी चुकीचं अस्लं पाहिजे, तर ते कुठलं? कृपया मी शब्दांचे खेळ करतोय असं म्हणू नका. मी तुमच्या प्रतिसादाबद्दल काहीच बोललेलो नाही, कारण मला त्यातला सूर टोचला नव्हता...अजूनही टोचत नैये. फक्त तुमचा हा शेवटचा प्रतिसाद चुकीच्या जागी पडला आहे असं मला वाटत असल्याने मला त्यातली तार्कीक चूक दाखवून द्यायची आहे. एखादा शब्द मागे पुढे होणं हा कधीच मुद्दा असू शकत नाही. सामान्य लोक अमुक असतात तमुक असतात, त्यांना कुणीही कुठेही घेउन जाउ शकतं, मग त्यांचा उपद्रव सुरु होतो, हा जरासा खटकणारा सूर त्या खालच्या प्रतिसादात होता. सुधारणा हवी असेल, तर ते आणि आम्ही अशी वर्गवारी करून चालणारच नाही. हा माझा मुद्दा आहे. तुम्ही जरी सर्वसामान्य हा शब्द वापरला अस्लात, तरी अशी वर्गवारी तुम्हाला अभिप्रेत होती असं मला वाटलं नाही.

तुमचं गणित चुकतंय. कदाचित. एक माणसाला बदलायला किती वेळ, विचार आणि श्रम लागले ते इथे बघा- आता ही तर एक लहान (संस्कारक्षम) मुलगी होती. आपण ज्यांच्याकडून अपेक्षा करतोय ते या गटात तर असणार नाहीत!! मग तुमचं बघून ते का बदलतील? तुम्ही कुणाला तरी नियम तोडल्यावर सुनावता तेव्हा आजुबाजुचं कुणीच तुम्हाला पाठिंबा देत नाही- तुम्ही कोण एवढ्या मोठ्या लागून गेल्या आहात ?....मंजे असं ते आजुबाजूचे लोकं म्हणत असतील मनात ..कदाचित! किंवा कदाचित त्यांना त्यापेक्षा महत्त्वाची इतरही कामं असू शकतील? किंवा वर दिलेल्या दुव्यातला "रीवर्स इफेक्ट" सुद्धा होत असेल थोडा. तुम्ही म्हणता ना करा?... मग आता तर आम्ही नाहीच करणार!! लोकांना बदलणं एवढं सोपं असतं तर सग़ळेच लोक गांधी, गाडगेबाबा नसते का झाले? लोकांना बदलण्यासाठी आधी लोकात मिसळावं लागतं. त्यांना तुम्ही आपल्यातले वाटावे लागता. नुसतं सुनावून हे होत नाही. असं मला वाटतं.

In reply to by असंका

तुम्ही चुकीचं उदाहरण देताय. प्रभू सरांच्या बाबतीत ती मुलगी त्यांना मानणारी होती. असं तर मी ही माझ्या घरच्यांना थोडफार बदललय. मी नियम तोडल्याबद्द्ल सुनावत नाही. मला रस्त्यावरच्या कचर्^याचा त्रास होतो तसा सगळ्यांनाच होतो. मी लोकांमध्ये मिसळणारी नाहीच. पण जे आहेत त्याना का वाटू नये की असे अलिखित नियम असावे समाजात? त्यासाठी का नाही कुणी आवाज उठवला तर पाठिंबा मिळू? जेव्हा पंप्रंची स्वच्छता मोहिम सुरू झाली तेव्हा रेल्वेत मी चारपाच वेळा तरी हा अनुभव घेतला होता की तुम्ही बोललात आणि त्यात चार आवाज मिसळले की आपोआप माणूस ऐकतो.

In reply to by असंका

तुम्ही चुकीचं उदाहरण देताय. प्रभू सरांच्या बाबतीत ती मुलगी त्यांना मानणारी होती. असं तर मी ही माझ्या जवळच्यांना थोडफार बदललय. मी नियम तोडल्याबद्द्ल सुनावत नाही. मला रस्त्यावरच्या कचर्^याचा त्रास होतो तसा सगळ्यांनाच होतो. मी लोकांमध्ये मिसळणारी नाहीच. पण जे आहेत त्याना का वाटू नये की असे अलिखित नियम असावे समाजात? त्यासाठी का नाही कुणी आवाज उठवला तर पाठिंबा मिळू? जेव्हा पंप्रंची स्वच्छता मोहिम सुरू झाली तेव्हा रेल्वेत मी चारपाच वेळा तरी हा अनुभव घेतला होता की तुम्ही बोललात आणि त्यात चार आवाज मिसळले की आपोआप माणूस ऐकतो.

In reply to by अंतरा आनंद

प्रभू सरांच्या बाबतीत ती मुलगी त्यांना मानणारी होती
मी चुकीचं उदाहरण देत नैये. तुम्हाला ते चुकीचं वाटत असल्यामुळे तुम्ही त्याच्यात चुका शोधताय. ती मुलगी सुरुवातीला प्रभू सरांबद्दल न्युट्रल असेल. ती पाया पडायला लागल्यावर जेव्हा ते शेक हँड कर म्हणाले तेव्हा ती सरळ सरळ त्यांच्या विरोधात गेली. आता त्यांनी तिची मनोभूमिका समजून घेउन तिला आश्वस्त केलं की डिस-इंफेक्टंट आहे बेसिनवर ते वापर. त्यांनी तिला सुनावलं का? की माझ्या हातात काही रोगजंतू नाहीत तरी तुला बेसिनवर का जायचंय? अर्थात हे सगळं त्या दुव्याच्या आधीच्या भागात होतं...कदाचित आपण तो भाग वाचला नसेल.

लेख पूर्ण भरकटला आहे असे मला तरी वाटते. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, गुंडगिरी, नागरीक कर्तव्य न करणे ह्या सर्व गोष्टीत धर्म किंवा विज्ञान कुठे येते? अत्यंत कर्मठ धार्मिक आणि पूर्ण नास्तिक अश्या दोन्ही टोकाची लोक भ्रष्टाचार, गुन्हेगारी, गुंडगिरी करतात आणि तितक्याच वाईट पद्धतीने करतात. हिंदुत्ववादी कार्यकर्ते गुंडगिरी , भ्रष्टाचार करतात आणि तितकार कम्युनिस्ट आणि समाजवादी नास्तिक करतात. कसला तरी बादरायण संबंध लावला आहे.

In reply to by गंम्बा

धन्यवाद.
एकूण व्यवस्थेचा जो बोजवारा उडालाय तो आपल्या सामाजिक जाणिवेचा निदर्शक आहे त्यात धार्मिक आणि विज्ञाननिष्ठ असण्याचा काय संबध? हे वाक्य आहे लेखात. या लेबलांचा संबध नाही म्हणूनच नागरिक म्हणून आप़ण फक्त त्याच गोष्टींचा आग्रह धरावा ज्या नागरिक म्हणून आपल्या हक्काच्या आहेत आणि अर्थातच कर्तव्यही करावी, इतरांनी करण्यासाठी आग्रह धरावा.

In reply to by गंम्बा

लेख पूर्ण भरकटला आहे असे मला तरी वाटते. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, गुंडगिरी, नागरीक कर्तव्य न करणे ह्या सर्व गोष्टीत धर्म किंवा विज्ञान कुठे येते? अत्यंत कर्मठ धार्मिक आणि पूर्ण नास्तिक अश्या दोन्ही टोकाची लोक भ्रष्टाचार, गुन्हेगारी, गुंडगिरी करतात आणि तितक्याच वाईट पद्धतीने करतात. हिंदुत्ववादी कार्यकर्ते गुंडगिरी , भ्रष्टाचार करतात आणि तितकार कम्युनिस्ट आणि समाजवादी नास्तिक करतात. कसला तरी बादरायण संबंध लावला आहे. +१००००००००००

लेख आवडला. मी नास्तिक नाही. पण आपला धर्म आणि आपल्या श्रद्धा आपल्यापुरत्या ठेवाव्यात याला जोरदार अनुमोदन. वर राहीताईंनी म्हटलेलंही पटलंय की सरंजामशाही जगातून आपण बाहेर पडलो नाही आहोत अजून..

बरं झालं ह्या भगव्यांना चोपलं, आनंद झाला , फारच धरम धर्म करून उच्छाद मांडलाय या हिंदूंनी.
अखिल मिपा अनिस कट्टर नास्तीक संघ.
फक्त हिंदुच का बाकीचे का दिसत नाहीत ? आधी तिकडे बघा ना.
अखिल मिपा ऊठसूट उखाळ्या पाखाळ्या स्वनाशन संघ.
आशय चांगला आहे आणि आपल्या धार्मीकतेचा /कर्मकांडाचे प्रदर्शन/बाजारीकरण अनावश्यक आणि उपद्रवी आहे.
अखिल मिपा अगदी अल्पसंख्याक* बुद्धीनिष्ठ संघ
अल्पसंख्याक हे मिपावर संख्येने अगदी अल्प बोटावर मोजण्याइतकेच असलेले गावडेमास्तरांसम प्रभुतींसाठी आहे.अज्जीबात जातीवाचक नाही कुस्ती/गदारोळाला बरा विषय मिळाला थोडा ईक्डून थोडा ति़अडून खेळून हे पूजापाठ्/कार्य़्अर्म बंद झाले पाहिजेत असे जाहीर करतोच. आणि गल्लीतल्या पूजेची वर्गणी गोळा करायला जातो.
आखिल मिपा डब्बल ढोलकी प्रतिसादी संघटना.
दरवेळी तोच पदार्थ वेग्वेगळ्या नावाने का खपवतायत या मिपा हाटेलात? नाव वेगळे /डिश वेगळी , चव तीच आणि घटक पदार्थ पण तेच.. खरंच मी घरी (शांतपणे) केलेल्या पुजेचा आणि जपाचा यांना त्रास होत असेल का? आणि पुजा + मोठ्याम्ना नमस्कार करणारा माणून नेहमीच मनाने दुबळा/हीन दीन असतोच का? गावडे मास्तरांना विचारले पाहिजे.
अखिल मिपा वाचनमात्र आणि वचनमात्र नियमीत वाचक संघ