Skip to main content

कोलाज...

कोलाज...

Published on मंगळवार, 05/04/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
तर त्या दिवशी संध्याकाळी, जिथे आहेत उंच डोंगर, हिरवी झाडी, अन एक नदी. तिथे मी शोधत गेलो, एक गाव ओळखीचं, दुध दुभत्या गाईचं, पाणी भरलेल्या माठाचं, अन एक झाड बाभळीचं. फुलाफुलांच्या ताटव्यात, निसरड्या ओलेत्या गवतात, रिमझिमत्या पावसात मी शोधत गेलो एक चेहरा उदास. ज्याच्या कपाळी होते वैभवाचे विशाल तुरुंग, हरवलेल्या पायवाटा अन एक पराभव उत्तुंग. मी शोधत गेलो त्या डोळ्यांतले युगायुगांचे दु:ख. त्यात दडलेला बंडखोर अन एक शून्य. त्या डोळ्यांत मला दिसल्या भिजून गेलेल्या अश्रूंच्या कडा, भिजून गेलेली एक संध्याकाळ अन भिजून गेलेला एक सवाल रोकडा. आभाळभर उसळल्या आनंदाच्या लाटा, त्यांच्या दु:खाच्या छटा मी मोजतच गेलो. मग ठोकत गेलो आरोळ्या अज्ञात भविष्याच्या. तो चेहरा मला भेटला नाही. मात्र एक बंडखोर भटकतोय काटेरी वनात, दु:खाच्या सावलीच्या शोधात... अजूनही...

याद्या 6184
प्रतिक्रिया 26

तुमचं लेखन आज थोडं ग्रेससारखं वाटतंय. वाचताना अर्थाचे सूक्ष्म संस्कार मनात उमटत जातात. पण वाचून झाल्यावर परत ते वाळूसारखं हातातून निसटून जातं. फक्त त्या शब्दांनी निर्माण केलेलं एक अद्भुत, अमूर्त, भयचकित करणारं विश्व मनावर ओरखडे मारत जातं. आणि सगळं वाचून थोडं शांत बसलं तर जाणवतं की मी आत्ताच कुठल्या तरी वंडरलँडमधून आलोय. अद्भुत वाटलं हे नमूद करतो.

जव्हेर टच! Sandy

छोटंसं पण मार्मिक

कोणाला समजलं का काय होतं हे? मग जरा इस्कटा ;)

आपल्याच अनेक कथांतील वाक्यांचे कोलाज बनवलंय तुम्ही.. त्यामुळेच हे आधीही वाचल्याची deja vu ची फीलिंग येत होती..

In reply to by नीलमोहर

नै हो, सगळी वाक्ये नवीन आहेत! एखादा शब्द रिपीट होऊ शकतो.( तो तर होणारच ;) ) बाकी हे ज्या अर्थाने लिहिलय त्यातल्या भावना पोहोचल्या का सगळ्यांना? असं विचारायचं होतं मला!!

In reply to by जव्हेरगंज

मला बरीचशी वाक्यं रिपीट वाटली.. असो, आता तुमच्या मेंदूचा अनलॉक कोड तेवढा पाठवून द्या, आम्ही शोधतो नक्की काय अभिप्रेत आहे यातून ते ;)

In reply to by नीलमोहर

मला बरीचशी वाक्यं रिपीट वाटली..
आमुचे समदे साहित्य मिपावर पडून आहे! सोदाहरण स्पष्ट करा :)
आता तुमच्या मेंदूचा अनलॉक कोड तेवढा पाठवून द्या,
तो शोधतोय आम्ही! भेटल्यास जरुर कळवू ;)

ज्याच्या कपाळी होते वैभवाचे विशाल तुरुंग, हरवलेल्या पायवाटा अन एक पराभव उत्तुंग. आयला, मला तर राहुल गांधीच आठवला..

आयुष्याच्या अखेरीस कुणीतरी घडून गेलेल्या चांगल्या-वाईट घटनांच्या क्षणचित्रांना आणी भविष्यातल्या स्वप्नांना जोडून कोलाज कल्पित आहे असे वाटले! आता तुमच येऊद्या! :) Sandy