मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार, शिक्षक आणि शिक्षणाची भूमिका

माहितगार · · जनातलं, मनातलं
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ चौकशी आणि चर्चेत असतानाच काल कलकत्यातील जादवपूर विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्या मोर्चातून दिल्या गेलेल्या राष्ट्रविरोधी घोषणा बातमीत आल्या आहेत, सुभाषचंद्र बोसांबद्दल भावूक होणारा बंगाली विद्यार्थी असा दुसर्‍या टोकाच्या वर्तणूकीला सोबत कशी काय देतो ? वस्तुतः सहसा प्रत्येक व्यक्तीला स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवून घेणे आवडत असावे तरीही विपरीत वर्तन का घडत असते ? स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवणारा माणूसही सोने खरीदीवरचे प्रेम सोडत नाही- सोने आयातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर कितीही ताण पडला तरीही-, दुकानात कच्चे बील पण मागत नाही, स्वदेशी आणि विदेशी दोन्ही समोर ठेवले तर विदेशी पाहीजे म्हणतो म्हणजे आपली प्रत्येक कृती देशप्रेमाच्या तराजूने मोजतोच असे नाही तरी तो तेवढ्यावरच थांबतो, सर्वसामान्य माणुस अतिरेकी, शत्रुराष्ट्रे अथवा देश विघटनाचे समर्थन करण्याचे अथवा त्यास सहानुभूती दर्शवणारे टोक सहसा गाठणार नाही अशी आपली सर्वांची अपेक्षा असते. महात्मा गांधीबद्दलचे जे काही इतर आक्षेप क्षणभर बाजूला ठेवले तर भारतासाठी राजकीय स्वातंत्र्याचा आग्रह धरताना स्वांतंत्र्यासाठी स्वातंत्र्य अशी भूमिका न घेता रयतेसाठी स्वातंत्र्य आणि म्हणून त्यासाठी समता, लोकशाही इत्यादी मुल्ये अध्यार्‍हुत असावीत ; त्याच प्रमाणे जवाहरलाल नेहरुंबद्द्लच आक्षेप क्षणभर बाजूला ठेवले तर संपूर्ण भारताचे विवीधतेत असलेली सांस्कृतीक एकात्मता; देश छोट्या छोट्या तुकड्यात विभागला असेल तर बलाढ्य शत्रुंचे फावते म्हणून एकसंघ राष्ट्राचा आग्रह धरतानाच स्थानिक संस्कृती आणि आर्थिक आकाक्षांना पुरेसे विसृत अवकाश देणारी राज्ये, आणि हि सर्व राजकीय संस्कृती इतपत मोकळी असावी की आदिवासी बहुल पुर्वोत्तर राज्यांना संस्कृतीसही विकासाचे सहभागाचे समान अवकाश मिळावे. शंभर अपराधी सुटले तरी चालतील एका निरपराधावर अन्याय होऊ नये या तत्वावर उभारलेली तसेच एक न्यायाधीश चुकला तर उच्चन्यायालय तिथे तुम्हाला समाधान झाले नाही तर सर्वोच्च न्यायालय अशी त्रिस्तरीय न्यायालय व्यवस्था. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाने भारताला एका पुरेशा समतोल सक्षम राज्यघटनेचा लाभ झाला आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठ ज्या व्यक्तीच्या नावावर उभारले आहे त्या विद्यापीठातून राष्ट्रीय एकात्मतेची संस्कृती देशभर पोहोचावी ही अपेक्षा असताना विघटनवादी विचार घेऊन कुणी वावरते आहे, त्याही पेक्षा खेदाची बाब अशा विघटनवादी विचारांचे खंडन करण्या एवजी सहानुभीतीचे प्रदर्शन करुन त्यास अकॅडेमिक फ्रिडमचे नाव देऊन दिशाभूल केली जाते आहे ? आणि त्याही पेक्षा खेदकारक हि अशी दिशाभूल होऊ देण्यात तेथिल शिक्षक गणांचा आणि तथाकथित विचारवंतांचा सहभाग असावा ? विद्यार्थ्यांनी अगदी कोणत्याही प्रकारची शंका मोकळेपणाने विचारावी आणि शिक्षकाने त्याच्या शंकांचे निरसन करावे हा अकॅडेमीक फ्रिडमचा भाग असू शकतो, वक्तृत्व स्पर्धा, वावविवाद स्पर्धा, राऊंड टेबल चर्चा या निश्चितपणे अकॅडेमीक फ्रिडमचा भाग असू शकतात. आमच्या विद्यापिठातील विचारवंतांच्या विचारांचा दर्जा खरेच उत्तम असेल तर त्यांच्या समोर अतिरेकी जरी आला तरी विचारवंतांच्या विचाराने भारावून जाऊन त्याने स्वतःची शस्त्रे बाजूला ठेवावीत - विघटनाचा विचार शिक्षकाच्या भेटी सरशी विरुन जावयास हवा अशी अपेक्षा महावीर, बुद्ध आणि गांधींच्या भूमीने करू नये काय ? ठिक आहे विद्यार्थी चुकू शकतात पण शिक्षक आणि विचारवंत त्यांच्या कर्तव्य बजावणीत कुठे अपयशी होत आहेत का ? ते आपल्या कर्तव्यात अपयशी होत असतील तर त्यांनी एकतर स्वतःचे आत्मपरीक्षण करावयास हवे आत्मपरी़क्षणात अपयश येत असेल तर स्वतःच्या कर्तव्यात कुचराई झाल्याचे प्रायशित्त सुद्धा घ्यावयास नको काय ?

वाचन 10485 प्रतिक्रिया 0