आयडीचे डू-आयडीस पत्र
तू उडालास... बरं झालं. आणि लवकर उडालास ते आणखीन बरं झालं.
नाही तरी जिलब्या टाकत सुटायचास.... काय उपयोग होता तुझा? समज दिल्यानंतर तुझं जिलब्या टाकणं कमी होईल या आशेनं संमंनी तुला डोसही दिला. पण आधी बरा लिहीणारा तू, सुमार जिलब्या प्रतिसादांचा रतीब लावायला लागलास, का तर म्हणे डोक्याला त्रास कमी होतो.
मिपाकर तुझी खेचायचे, वारंवार तुझी संपादकांकडे तक्रार करुन, मालकांना पाचारण करायचे. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले, ' .... च्या, जुन्या-जाणत्या आयडींना छपरी प्रतिसाद टाकून चिथवशील तर ब्लॉक करीन !' तेंव्हापासनं तू फक्त गोग्गोड लिहू लागलास.
कधेमधे स्वत:चं समर्थन करायला, `जिलबी बरी असते, अॅसिडीटी दूर ठेवते' वगैरे सांगायचास. पण त्यावर तुला, ‘मग मी करु का सुरु ?’ विचारल्यावर तुझं बंद झालं.... जिलबी टाकणं नाही, जिलबी टाकण्याचे समर्थन करणं.
कधीकधी तू सोडायचास सुद्धा. पण तुला किकची (कुठे ते सांगायची गरज नसावी) सवय लागल्यानं, ‘हल्ली ऑनलाईन काही मजा येत नाही’ म्हणून पुन्हा सुरु करायचास.
तू गेल्यावर तो आपला दोस्त बंडू, इतक्या वर्षांनी वेळात वेळ काढून भेटला आणि तुझे जुने लेख आठवून गळ्यात पडून रडायला लागला. मी म्हटलं, ‘ लिखाण मी कसंही जमवीन पण या लेखन ठेव्याची मला काळजी वाटते, पुढचं सगळं कसं जमवायचं’....
तसे म्हणाला, तुझंही खरंच आहे. आणि त्यानी त्या पावली जाऊन माय .. मधे आयडी घेतला, म्हणाला, `नेटावरच्या धोरणी संस्थळांनी, काळाची पावलं वेळीच ओळखून, आमच्यासारख्या सदस्यांची कायमची सोय केलीये. हे लेख तिथं इतर सदस्यांचे जीव रमवतील, त्यांची स्व-संपादन पध्दतीपण चांगली आहे'.
कुठे असे दोस्त आणि कुठे तू ? तू जुन्या टुकार लेखांची जवाबदारी माझ्यावर टाकून बिनधास्त गुडूप व्हायचास आणि दोस्तानी गुडगावहून इथे येऊन त्यांची सोय केली.... शिवाय तुला श्रध्दांजलीपर लेखही लिहून टाकला. याला म्हणतात यारी, नाही तर फक्त पार्टीच्याच्या वेळी बसायला येतात दोस्त... स्टॉक भरपूर असल्याचं कन्फर्म करुन फुकटची ढोसायला.
मी बोलून गेलो खरा, पण टुकार लेखन मी तरी कसा करणार होतो ? शेवटी मनाचा हिय्या करुन मिपावर दुसर्या नावाने
सदस्य व्हायला गेलो. तिथे तर रेग्युलर पेक्षाही जास्तच झुंबड होती. माझी नजर स्थिरावल्यावर, तिथे एक रिकामा प्रतिसाद जिलब्यापाडू दिसला. त्याच्याशी थोडी मन की बात केल्यावर त्याच्या चेहेर्यावरचे भाव बदलायला लागले.
तसे मी विचारलं ‘तुम्ही इकडे कसे?’
‘म्हणजे तुम्ही मला ओळखता?’ तो चकित.
‘सम-दु:ख हीच आपली ओळख नाही का?’ या माझ्या हजरजवाबीवर तो खलासच झाला.
‘माझा आयडी मला सोडून गेला’ तो म्हणाला.
कोणत्या वेळी काय प्रश्न विचारावा हे डू-आयडींना नेमकं कळतं. मी उगीच, तुमचे (संपादकांशी) नक्की काय मतभेद होते?
वगैरे भलत्या चवकशा न करता सरळ म्हटलं, ‘ आणि लिखाण तुमच्यावर टाकून?’
त्यावर तो आणखीच खचला, ‘नाही हो, अनेक धागे आहेत पण आयडी जातांना निर्दयपणे सगळं घेऊन गेला....
मला अगम्य अतर्क्य लेखनाचा इतका लळा आहे पण आता आयुष्यात काही नाही... नुसती पोकळी ’.
‘माझ्याकडे काही जिलब्या आणि काही दवणीय लेख आहेत’ मी पटकन सांगितलं..... माझा डू-आयडी अतिरेकी वाचाळ लेखनापायी मला कायमचा सोडून गेला.
तोही बराच प्रॅक्टीकल असावा. किती लिहायचा? आयडी घेण्यापूर्वी लक्षात नाही का आलं? वगैरे वायफळ प्रश्न न विचारता
तो सरळ म्हणाला, ‘आपण एकमेकांचा आधार होऊ शकतो’.
लिखाण करायला नवाकोरा आणि सालस आयडी मिळाला. आता मिपावर आम्ही मजेत राहातो. नवा आयडी घेण्यापूर्वी मी त्याचे लेखन बघायला गेलो होतो. त्यानी मला त्याचे लिखाण दाखवले आणि म्हणाला, ‘तुला चालेलना मी कधेमधे लिहीले तर?’
मी म्हणालो ‘मी अनेक चुका अनेक वेळा करतो पण एकच चूक पुन्हा करत नाही.’
यावर तो सर्दच झाला... ‘म्हणजे ?’
‘म्हणजे मी सुद्धा तुला कंपनी देईन !'
त्यावर त्याच्या ... तच गेल्या, `त्यानं काय होईल?'
`मग मला लिमीटमधे ठेवायला... तुला कायम लिमीटमधे राहवं लागेल!’ मी म्हणाले.
माझ्या या वाक्यावर तर तो इतका फिदा आहे की आता दोस्तांचे फोन आले तरी तो, `आज मला वेळ नाही म्हणून सांगतो'
आणि मग आम्ही दोघंच धडाधड जिलब्या पाडतो.
आज वर तोंड करून मला विचारतोस, बा सायबा तू इतका कसा बदललास?
इथे एकच सांगतो, ‘... नो, हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी करतोय. तुझा इथला पहिला अवतार गेला,
आता हा अवतार मात्र मला प्राणापरि सांभाळायला पाहिजे ;)
प्रेरणास्त्रोतः __/\__
वाचन
14524
प्रतिक्रिया
0