मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुरेश प्रभु – संवेदनशील मनाचा माणूस

विवेकपटाईत · · जनातलं, मनातलं
कालचीच गोष्ट, संध्याकाळी, सीपी वरून उत्तम नगर साठी मेट्रो घेतली. नेहमीप्रमाणे भयंकर भीड होती. बसायला जागा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. गाडीत आमच्या सारखे पांढरे केसवाल्यांसाठी काही जागा आरक्षित असल्यामुळे, सामान्य जागेवर बसलेला माणूस, सहजासहजी पांढरे केसवाल्याना बसायला जागा देत नाही. काही कारणाने सौ.ने फोन केला. तिच्या सोबत मराठीत बोललो. अचानक समोर बसलेल्या एका तरुणाने अंकलजी, आप बैठिये. म्हणत मला बसण्यासाठी जागा दिली. थोड्यावेळाने तो म्हणाला, आप महाराष्ट्रीयन हो क्या? मी हो म्हणालो. तो पुढे म्हणाला आपके सुरेश प्रभुजी बहुत संवेदनशील और अच्छे इन्सान है. रेल का सफर करने वाले आम आदमी का ख्याल रखते हैं. फक्त टयूटर वर संदेश पाठविण्याची गरज. मग लहान मुलाला दूध पाहिजे असेल किंवा कुण्या तरुणीची गुंड मुले छेड़ काढीत असेल. संकटात सापडलेल्या प्रवासाच्या समस्या ते चुटकीसरशी दूर करतात. या आधी दिल्लीत मराठी नेत्यांची प्रशंसा मी क्वचितच ऐकली असेल. काही मुंबईकर नेत्यांमुळे, मराठी माणूस म्हणजे परप्रांतीय लोकांशी द्वेष करणारा, या ना त्या कारणाने सतत राडा करणारा. अशी मराठी माणसाची प्रतिमा. पण आज प्रभु साहेबांची प्रशंसा ऐकून माझी छाती चौडी झालीच. एकमात्र खरे, त्यांच्या चांगल्या कार्यामुळे एका अनोळखी तरुणाने, मला बसायला जागा दिली. मी त्याच तरुणाचे आभार मानले. पण मला यात काहीच आश्चर्य वाटले नाही. श्री सुरेश प्रभू प्रधानमंत्री कार्यालयात इंडियन शेरपा म्हणून कार्यरत असताना, मी त्यांच्या अखत्यारीत पीएस जवळपास दीड एक महिना काम केले आहे. त्याच वेळी मला त्यांच्या मानवीय भावनेने परिपूर्ण अश्या संवेदनशील मनाचा अनुभव आला होता. जुलै, 2014 महिन्यात माझी हृदयाची बाईपास सर्जरी झाली होती. ३ महिन्याची सख्तीची रजा मिळाली. बहुधा वीस-एक सप्टेंबरची तारीख असेल, ऑफिस मधून एका अधिकार्याचा फोन आला. प्रथम शिष्टाचार म्हणून त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. नंतर फोन करण्याचे खरे कारण - अर्थात पटाईतजी आप कब दफ्तर जॉईन कर रहे हो. मी उत्तर दिले, तीन महिन्याची रजा आहे, पूर्ण होताच जॉईन करेल. थोडा जल्दी जॉईन कर सकते हो क्या? मी विचारले, का? माननीय सुरेश प्रभुजी की जी-२० के लिए इंडियन शेरपा के पद पर नियुक्ति हुई है. वह प्रधान मंत्री कार्यालय जॉईन कर रहें हैं. (श्री सुरेश प्रभूंची इंडियन शेरपा या पदावर नियुक्ति झाली आहे, ते शीघ्र कार्यालय ज्वाइन करणार आहेत). अधिकारी पुढे म्हणाले, ते काही रोज कार्यालयात येणार नाही, आले तरी जास्ती वेळ बसणार ही नाहीत. फक्त जी-२०च्या संदर्भात काही मीटिंग्स, चर्चा, मुलाकाती वैगरेह होतील. तुम्हाला सहज जमेल. दोन एक महीने तुमचे आरामात निघून जातील. (दिल्लीच्या सरकारी भाषेत याला चारा फेंकना, असे ही म्हणतात). प्रधानमंत्री कार्यालयात २-३ महीने आरामात निघून जातील, हे काही थोड़े-थोडके नव्हे. मासा गळाला लागला. दुसर्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलो. फिटनेस सर्टिफिकेट घेतले आणि कार्यालयात रुजू झालो. प्रधानमंत्री कार्यालयाचे नाव किती ही मोठे असले तरी इतर सरकारी कार्यालयांप्रमाणे इथे हि जागेची समस्या आहेच . दुसर्या माल्यावर कॅन्टीन आणि किचन(स्वैपाकघर) आहे. किचनच्या उजव्या बाजूचा एक मोठा रूम श्री सुरेश प्रभु साहेबांच्या बसण्यासाठी तैयार केला. शिवाजी महाराजांचे एक मोठे तैलचित्र हि त्यांच्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर लावण्यात आले. त्यांना केबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळाला असला तरी स्टाफमध्ये पीएस म्हणून मी आणि एक सिपाही, असे आम्ही दोघेच होतो. एकट्यानेच सर्व काम करायचे होते. तरीही त्यांच्या सोबत काम करताना मला कधीच दडपण जाणविले नाही. इतके सहज होते ते. एक दिवस दुपारी सव्वादोन वाजता श्री सुरेश प्रभु साहेब कार्यालयात आले. आल्यावर नेहमीप्रमाणे मी त्यांच्या कक्षात गेलो. ते म्हणाले मला भूक लागली आहे, काही मिळेल का? मी म्हणलो साहेब जेवणात काय मागवू. तैयार करायला जास्तीस्जास्त १०-१५ मिनिटे लागतील. साहेब म्हणाले, किचनमध्ये सध्या कुक आणि वेटर जेवतात आहेत, त्यांना त्रास देऊ नका. फक्त चहा आणि ब्रेड सेंडविच मागवा. दुसर्या माल्यावर लिफ्टमधून बाहेर आल्यावर समोरच किचन दिसते. रोज २ वाजता कॅन्टीन बंद होते. दोन ते अडीच या वेळात किचन आणि कॅन्टीनमध्ये काम करणारे कुक आणि वेटर इत्यादी जेवतात. फक्त चहा आणि ब्रेड सेंडविच बनविणारा कॅाउन्टर उघडा असतो. बहुधा साहेबांनी त्यांना जेवताना बघितले असेल. आपण जर जेवणाचा ऑर्डर दिला तर तो पूर्ण करण्यासाठी त्यांना अर्धवट जेवण सोडून उठावे लागेल. साहेबांच्या संवेदनशील मनाला हे पटले नसेल. साहेबांनी केवळ ब्रेड सेंडविचवर आपली भूक भागवली. मला नाही वाटत या आधी वेटर- कुक सारख्या लहान लोकांचा विचार कुणी मंत्री- अधिकारी यांनी केला असेल. त्याच दिवशी त्यांच्या संवेदनशील मनाचा ओलावा मला हि जाणविला.

वाचने 11808 वाचनखूण प्रतिक्रिया 52

प्रतिक्रिया

सुरेश प्रभुं बद्दल अजून वाचायला नक्की आवडेल. अटलजिंनि आणि आता मोदींनी त्यांना मंत्रीमंडळा मध्ये आवर्जून घेतले याचा अर्थ त्यांच्या मध्ये नक्कीच काहीतरी वेगळेपणा असणार. पण प्रभुंबद्दल वाचायला फारसे काही मिळत नाही. तीच गोष्ट पर्रीकरांची सुध्दा . त्यांच्या बद्दलही अशीच उत्सुकता आहे. पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हेच बोल्तो. शिवसेनेच्या शेपटावर पाय ठेऊन भाजपाच्या कोट्यातून मंत्रीपद दिलं. तेही रेल्वेसारखं. म्हणजे माणूस नक्कीच खास असणार.
निरिक्षणात्मक लेखन आवडले. यावरून पूर्वी कधी तरी वाचलेले एक वाक्य आठवले. एखाद्या माणसाचा मोठेपणा तो त्याला काहीच नुकसान पोचवू न शकणार्‍या माणासांशी कसा वागतो यावरून कळतो.
"फक्त टयूटर वर संदेश पाठविण्याची गरज. मग लहान मुलाला दूध पाहिजे असेल किंवा कुण्या तरुणीची गुंड मुले छेड़ काढीत असेल. संकटात सापडलेल्या प्रवासाच्या समस्या ते चुटकीसरशी दूर करतात." मध्यंतरी सुरेश प्रभु यांनी प्रवाशांच्या अशा वैयक्तिक समस्या स्वतः लक्ष घालून सोडवल्याचे ऐकले होते. सुरेश प्रभु यांच्याबद्दल आदर असुनही स्वतः केंद्रीय मंत्री इतक्या छोट्या बाबतीत स्वतः लक्ष घालतील हे जरा जास्तच वाटलं. कदाचित "अच्छे दिन" वाल्या लोकांची कुजबुज आघाडी असेल असा अंदाज होता. पण खरच ह्या घटना खर्या आहेत का?

In reply to by एक सामान्य मानव

मध्यंतरी सुरेश प्रभु यांनी प्रवाशांच्या अशा वैयक्तिक समस्या स्वतः लक्ष घालून सोडवल्याचे ऐकले होते. सुरेश प्रभु यांच्याबद्दल आदर असुनही स्वतः केंद्रीय मंत्री इतक्या छोट्या बाबतीत स्वतः लक्ष घालतील हे जरा जास्तच वाटलं. कदाचित "अच्छे दिन" वाल्या लोकांची कुजबुज आघाडी असेल असा अंदाज होता. पण खरच ह्या घटना खर्या आहेत का? अश्या गोष्टीत मंत्र्याने अथवा वरिष्ठ अधिकार्‍याने स्वतः सतत लक्ष घालणे हे शक्य नसते किंवा तसे करणे उत्तम व्यवस्थापक असण्याचे लक्षणही नाही. आपल्या अधिकारातील लोकांच्या सतत डोक्यावर बसून आपल्या विभागाचे काम उत्तम ठेवणे हे कनिष्ठ प्रतीचे व्यवस्थापकीय कौशल्य (स्किल) झाले. "साहेब खुर्चीत अनेक दिवस नाहीत, पण तरीही योग्य प्रणाली कार्यरत असल्याने विभागाचे काम उत्तमपणे चालू आहे", हे उच्च दर्जाचे कौशल्य असलेला व्यवस्थापकच करू शकतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

खुद्द सुरेश प्रभुना सगळि कामे सोडुन मोबाइल वर ट्वीटर बघत बसण्यचि गरज नाही हो. एखाद्या सहायकाकडे सोपवून अश्या परिस्थीतीत काय करायाचे याच्या सुचना देऊन ठेवले कि झाले. पण हे करणे हे ही नसे थोडके!

In reply to by संजय पाटिल

हेच मी वर जरा टेक्नीकल भाषेत सांगितले आहे. मला वाटते तुमचा प्रतिसाद "एक सामान्य मानव" यांना असावा व इथे चुकून पडला असावा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"स्वतः लक्ष घालून" असं स्पष्ट म्हणलंय त्यांनी. (खरं म्हणजे इथे सगळ्याच लोकांचं एकमत झालेलं दिसतंय, की स्वत: लक्ष घालायची गरज नसून हाताखालच्या कुणीतरी लक्ष घातलं की झालं!) पण व्हॉट्सअ‍ॅप वर आमच्या व्यवसायासंदर्भातील प्रश्नांना सर सातत्याने उत्तरं देत असतात हे तर रोजच बघतोय. म्हनजे ते वॉत्सअ‍ॅप वर टाइप करत असतील असं नाही, पण उत्तर किंवा मत त्यांचं स्वतःचं असतं असं वाटतं.

In reply to by असंका

वॉत्सअ‍ॅप वर टाइप करत असतील असं नाही, पण उत्तर किंवा मत त्यांचं स्वतःचं असतं असं वाटतं. हे व्यवहारात "व्यवस्थापकाने मान्यता दिलेले लिखीत धोरण व प्रक्रिया (अप्रूव्ह्ड पॉलिसी अँड प्रोसिजर)" असण्याने व त्याची उत्तम अंमलबजावणी करण्याने साध्य होते. त्यासाठी वरिष्ठ अधिकारी सतत हजर असणे गरजेचे नसते. लिखित मान्यताप्राप्त धोरणाबाहेर काही झाले/गेले तरच वरिष्ठ अधिकार्‍याला संपर्क करून त्याचे मत घ्यावे लागते. उच्च प्रतिचे व्यवस्थापन असलेल्या सर्व खाजगी संस्था हे तत्व वापरतात... भारतातील सरकारी खात्यांत ते अभावानेच आढळते. याचा अर्थ ही बर्‍याचदा प्रणाली नसते असे नाही, पण स्वतःचे हितसंबंध राखण्यासाठी प्रणाली बासनात गुंडाळून स्वतःची मनमानी केली तरी चालते हे त्यांना अनुभवाने माहीत झालेले असते. असो. तुमचा अनुभव वेगळा असू शकतो.

In reply to by संजय पाटिल

छोट्या हॉलमधील तिघांची टीम ट्विट मिळताच ५ मिनिटांत रेल्वेत पोहोचवते मदत http://divyamarathi.bhaskar.com/news-ht/NAT-DEL-railway-twitter-handling-team-information-in-marathi-5207106-PHO.html

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

खेडूत 27/12/2015 - 22:34
+१ लेखन आवडले. अनेक वर्षे दिल्लीला रहात असाल त्यामुळे मधे येणारे हिंदी शब्द खटकत नाहीत हे विषेश.

रमेश आठवले 27/12/2015 - 23:45
पटाईत साहेब, शेरपा हा शब्द आपल्या ऑफिसच्या भाषेत कोणत्या अर्थाने वापरतात हे जरा समजाऊन सांगाल का ?

In reply to by रमेश आठवले

शेर्पा म्हणजे जी२० मध्ये भारताचा (किंवा कोणत्याही मेंबर देशाचा) अधिकृत प्रतिनिधी. सुरेश प्रभू भारताचे शेर्पा होते. सध्या (माझ्या माहितीप्रमाणे) अरविंद पनगारिया आहेत.

In reply to by कपिलमुनी

फोन सुद्धा नसलेले लोक्स असतीलच की. पण हे लोक आख्ख्या रेल्वेमधून एकटेच प्रवास करत नसावेत. आजूबाजूला जे लोक असतील, फोन असणारे वा ट्विटर असणारे, त्यांनी मदत करणे अपेक्षित आहे. जर का तेथे उपस्थित असलेले कोणीच मदत करत नसेल अश्या वेळी तर रेल्वे मंत्र्यांना जबाबदार कसे धरता येईल?

राही 28/12/2015 - 06:28
सध्याच्या काळात श्री सुरेश प्रभु हे अत्यंत कार्यक्षम मंत्री आहेत याबद्दल वादच नाही. पण महाराष्ट्राने आणखीही काही कार्यक्षम मंत्री देशाला दिले आहेत. यशवंतराव चव्हाण, न.वि. गाडगीळ, शंकरराव चव्हाण, शिवाजीरव पाटील-चाकूरकर आणि शरद पवार हे सर्व मंत्री अत्यंत कार्यक्षम होते. यातले चाकूरकर पाटील अति निस्पृहतेमुळे लोकप्रिय ठरले नाहीत. तसेच त्या काळातला त्यांचा कपड्यांच्या बाबतीतला चोखंदळपणा त्यांना मारक ठरला. शंकररव चव्हाणांनाही अति शिस्त भोवली. हे दोघे टास्क् मास्टर होते पण या (अव)गुणांमुळे त्यांच्याभोवती माणसे जमू शकली नाहीत. शिवाजीरावांना तर कोणी वालीच उरला नाही आणि तश्या फारश्या महत्त्वाच्या नसलेल्या कारणावरून त्यांना पायउतार व्हावे लागले. या कोणाच्याही काळात- शरद पवार सोडून, ट्विटर वगैरे माध्यमे नव्हती, तरीही त्यांनी चोखपणे काम केले. शरद पवारांचा लोकसंग्रहच इतका अफाट आहे की एखादी तक्रार त्यांच्याकडे पोचवायची म्हटली तर पोचू शकते. शरद पवारांनी केलेल्या तत्पर मदतीच्या अनेक गोष्टी (किस्से नव्हे) सांगितल्या जातात. घाशीराम कोतवाल नाटकाचा शिवसेनेच्या धमकीमुळे संकटात सापडलेला परदेश दौरा पार पाडण्यासाठी शरद पवारांनी केलेल्या धावपळीचे वर्णन अलीकडेच लोकसत्तामधील सतीश आळेकरांच्या एका लेखात वाचले ते अचंबित करणारे होते. गुरुदास कामत यांनीही त्यांना मिळालेल्या अल्प काळात चांगले काम केले होते.

In reply to by राही

ते नाव शिवाजीरव पाटील-चाकूरकर असे नसून शिवराज पाटील चाकूरकर असे असले पाहिजे. शिवराज पाटील हे अतिशय सज्जन राजकारणी म्हणुन ओळखले जातात. त्यांची लोकसभेचे सभापती असतानाची कामगिरी उल्लेखनीय आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शिवराजजी पाटील चाकूरकर हे एखादया राजकारण्याला आवश्यक तेवढे धूर्त होते. स्व. विलासरावसारखा तगडा राजकारणी मराठवाड्यात असल्याने व विलासरावांचा स्वपक्षीय, हायकमांड अन विरोधी पक्षीय नेते ह्या सर्वासोबतच सलोख्याचे संबंध असल्याने, मराठ्वाड्यात डॉ. पद्मसिंह पाटील, बसवराज पाटील, अशोक चव्हाण आदी नेत्यासंमोर शिवराजजींचे राजकारण फिके पडले. याचा अर्थ ते सज्जन राजकारणी होते असा नव्हे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

राही 29/12/2015 - 03:11
ते शिवराज पाटील असेच हवे. चूक लक्षात आणून दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद. चाकूरकर पाटील हे लोकांची वशिल्याची कामे न करण्याबद्दल प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांचा जनाधार कमी झाला. शंकरराव चव्हाणांचाही थोडाफार असाच लौकिक होता.

In reply to by राही

शंकरराव चव्हाण, शिवाजीरव पाटील-चाकूरकर आणि शरद पवार हे सर्व मंत्री अत्यंत कार्यक्षम होते.
ही नावे वाचून डोळे पाणावले. नक्की कसल्या कार्यक्षमते बद्दल राहीताईंना बोलायचे आहे ते कळले नाही ( प्लीज नोट, राहीताईंच्या लिस्ट मधली काही नावे गाळली आहेत ) प्रभु कार्यक्षम तर आहेतच पण अत्यंत स्वच्छ आहेत. त्यांच्या धाग्यावर ह्या लोकांचा उल्लेख होणे हे सुद्धा .....

In reply to by अभ्या..

राम नाईक ,कापसे, गुरुनाथ कामत पर्रीकर अशी काही नावे त्यांच्या सच्चे पणा व कर्तुत्व व कार्यासाठी प्रसिद्ध आहेत

In reply to by निनाद मुक्काम …

प्रा० राम कापसे अंदमानचे नायब राज्यपाल असताना तिथे सुनामीने थैमान घातलं होतं. त्यांनी जातीने तिथल्या मदतकार्यात लक्ष घालून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. कठीण परिस्थितीत अतिशय खंबीर नेतृत्व त्यांनी अंदमानला दिलं. प्रा० कापसे यांच्या कुटुंबियांनीही (माझ्या माहितीप्रमाणे त्यांची पत्नी आणि चिरंजीव डॉ० आनंद कापसे) अंदमानमध्ये विनामोबदला मदतकार्य केलं होतं. कापसे कुटुंबियांच्या प्रसिद्धीपराङ्मुख स्वभावामुळे याचा ढोल कुठेही बडवला गेलेला नाही. सुनामी प्रकरणाच्या ताणामुळे प्रा० कापसे यांची प्रकृती ढासळली आणि त्यांना राजिनामा द्यावा लागला. सप्टेंबर २०१५ मध्ये त्यांचं कल्याणमध्ये निधन झालं.

In reply to by राही

महाराष्ट्राने देशाला दिलेल्या कार्यक्षम केंद्रीय मंत्र्यांमध्ये आणखी दोन नावे जोडता येतील.
  • सी. डी. देशमुख - जवळ जवळ सात वर्षे देशाचे अर्थमंत्री होते (१९५० ते १९५७) तसेच त्या अगोदर दोन वर्षे रिझर्व बॅंकेचे गवर्नर देखील होते.
  • पंजाबराव देशमुख - स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री. देश स्वतंत्र झाल्यावर कृषी क्षेत्र आव्हानाच्या काळातून जात असताना कृषी सुधारणांमध्ये त्यांचे योगदान महत्वाचे होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

राही 29/12/2015 - 15:10
अगदी सहमत. त्यातल्या त्यात सी.डी. देशमुखांबद्दल आपल्याला थोडीफार तरी माहिती असते पण पंजाबराव देशमुख त्यांच्या नावाने उभारलेल्या कृषिविद्यापीठापलीकडे फारसे माहीत नसावेत.
कोणत्याही सभ्य माणसाने वागावे तसे मंत्री वागल्यास त्याचा किस्सा होतो हे निराशाजनक असले तरी किस्सा आवडला.

In reply to by नगरीनिरंजन

प्रसाद१९७१ 29/12/2015 - 09:23
कारण ज्याला पैसे खायची ( कींवा वाईट वागायची ) संधीच मिळाली नाही त्याने "मी स्वच्छ/ मी चांगला" असा डांगोरा पिटण्याला काही अर्थ नाही. ज्याला वाईट वागायची ( आणि तरी पण सुटण्याची ) संधी मिळाली पण त्या माणसानी ती स्वताचा चॉइस म्हणुन नाकारली तर तो मोठा माणुस म्हणुन गणला जातो. म्हणुन प्रभुंचे वागणे हा कौतुकास्पद किस्सा होतो आणि तुमच्या आमच्या सारख्या संधी न मिळालेल्या सभ्यांचा किस्सा होत नाही/होणार नाही. तसेच भारतात, प्रभुंनी कँटीन च्या कामगारांना जितक्या माणुसकीने वागवले तितक्या माणुसकीने बायको ला तरी वागवणारे कीती टक्के महाभाग आहेत?

In reply to by प्रसाद१९७१

प्रभुंनी कँटीन च्या कामगारांना जितक्या माणुसकीने वागवले तितक्या माणुसकीने बायको ला तरी वागवणारे कीती टक्के महाभाग आहेत? कसं चपखल बोललात?

In reply to by सुबोध खरे

प्रसाद साहेब बाडीस मी म्हणतो ३३% लोक भ्रष्टाचारी आहेत. ६६ % लोक भ्रष्टाचारी नाहीत कारण त्यांना संधी मिळत नाही फक्त १% लोक संधी मिळूनही भ्रष्टाचारी नाहीत.

In reply to by मी-सौरभ

आदिजोशी 28/12/2015 - 18:58
श्री राम नाईक खासदार असतानाही वैयक्तीक कामांसाठी स्वतःची बजाज स्कूटर वापरत. त्यांना स्कूटर चालवत गोरेगावात फिरताना स्वतः बघितले आहे.
ट्विटर वरुन माननीय रेल्वेमंत्री स्वत: तक्रारीची दखल घेतात म्हणल्यावर काही अतिशहाण्या महाभागांनी खोटा मेसेज पाठवून रेल्वे मेडिकल टीम ला फुकट त्रास दिल्याचे वृत्त नुकतेच वाचले . लाज वाटते अशा हरामखोर माणसांची . एक सज्जन मंत्री लक्ष देतोय म्हणून त्याची थट्टा? यापूर्वीचे मंत्री कसे होते आठवून तरी बघा चार लाथा हाणायला हव्यात अशा दीडशाहाण्यांच्या पार्श्वभागात

In reply to by मंदार कात्रे

चार लाथा हाणायला हव्यात अशा दीडशाहाण्यांच्या पार्श्वभागात असहिष्णुता असहिष्णुता म्हणतात ती हीच..!

प्रदीप 28/12/2015 - 19:56
लेख व चर्चा वाचतो आहे. प्रभूंप्रमाणेच पूर्वीही इतर अनेक खासदारांनी, आमदारांनी, मंत्र्यांनी इत्यादी अनेकांनी चोख कामे केली होती, त्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला आहे, तो उचितच आहे. पण 'त्यावेळी त्यांनी कुणीही त्यांच्या त्या कामांचे ढोल बडवले नव्हते' असा सूर काही प्रतिसादांतून दिसतो आहे. तो अगदी अनाठायी आहे. एकतर प्रभूंनी स्वतः त्यांच्या कार्याचे नगारे पिटलेले नाहीत. ज्यांची कामे होत गेली, त्यांनीच ते पिटले आहेत. अगोदरच्या सर्वच केसेस व प्रभूंच्या केसमधील फरक सोशल मीडिया हा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ह्यावेळी आपापली कामे तत्परतेने झालेल्या व्यक्तिंना त्यांचा आनंद व कौतुक जाहीरपणे व्यक्त करता येणे अगदी विसायास शक्य आहे, पूर्वी ते तसे नव्हते. विवेक पटाईतांनी जे प्रत्यक्ष अनुभवले, ते त्यांना सोशल मीडियाच्या द्वारे लगेच प्रगट करता आले. पूर्वी नियतकालीकांतून लिहीणे ही एकच व अतिशय जिकीरीची पद्धत उपलब्ध होती, ते तसे पत्र अथवा लेख पाठवून दिल्यावरही संबंधित नियतकालीकांतून प्रसिद्ध होईलच ह्याची शाश्वती नसे. तेव्हा ह्या फरकास प्रभू जबाबदार नाहीत.

पैसा 29/12/2015 - 12:38
उत्तम लेख. चांगला अनुभव आला तुम्हाला. हेही सध्या दुर्मिळ आहे.