Skip to main content

भन्साळीचा बाजीराव मस्तानी

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 21/12/2015 या दिवशी प्रकाशित केले.
भन्साळीच्या बाजीराव मस्तानी ह्या सिनेमाबद्दल बराच गदारोळ, ह्या सिनेमाचे 'पिंगा' हे गाणे रिलीज झाल्यावर, झाला होता. आंतरजालावर आणि सोशल मीडियावर तर वादळच उठले होते.पेशवेकुलीन स्त्रियांचे आणि एकंदरच इतिहासाचे विकृतीकरण केले गेले असल्याच्या वावड्या उडल्या होत्या किंवा उडवल्या गेल्या होत्या. टीव्हीवर तथाकथित 'मान्यवर, अभ्यासक, इतिहास संशोधक' यांना बोलावून चर्चासत्रांचे रतीब घातले गेले होते. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडणार (पुण्या-मुंबईत) हे निश्चित होते. तसे झालेही. बऱ्याच व्हॉॅटसअॅप ग्रुप्सवर सिनेमावर बहिष्कार टाका अशा आवाहनांचेही रतीब चालू होते. ह्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून, काल 'बाजीराव-मस्तानी' पाहिला. प्रचंड आवडला! काय आवडले? तर, पहिला बाजीराव, राऊ म्हणून, मनापासून आणि बेहद्द आवडला. पहिल्या बाजीरावाबद्दल, तो एक जिगरबाज आणि अपराजित लढवय्या जो मोहिमेवर असताना घोड्यावरच कणसे तळहातावर मळून खायचा असे आणि मस्तानी ही यवनी पदरी बाळगून असलेला अशी प्रतिमा माझ्या मनात लहानपणापासून होती. सलग ४० लढाया जिंकणारा बाजीराव हा रांगडा आणि धडाडीने निर्णय घेणाराच असावा असे मनापासून वाटायचे. त्या प्रतिमेला नुसतेच मूर्त रूप भन्साळीने दिले नाहीयेय तर बाजीराव कसा 'पुरोगामी' होता हे ही त्याच्या व्यक्तीरेखाटनातून सार्थ उभे केले आहे. काही काही वेळा राऊ काहीसा बेफिकीर, आततायी आणि भडक वाटण्याची शक्यता आहे पण चित्रपटाच्या कथानकाच्या प्रवाहात एक रांगडा योद्धा काळाच्या पुढे कसा होता याचेच ते प्रतीक वाटते. कथानकाच्या नाट्यउभारणीसाठी लागणारे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, कथानकात 'सिनेमॅटीक लिबर्टी'च्या नावाखाली, सढळ हाताने वापरले आहे वापरले आहे, त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण झाले असे वाटूही शकते. पण हा एक सिनेमा आहे व त्यात ठराविक वेळात एका ऐतिहासिक कालखंडातली बरेच गुंतागुंतीचे पदर असलेली प्रेम-कथा बसवायची आहे हे ध्यानात घेतले की सिनेमॅटीक लिबर्टी तितकीशी जाचक न वाटता कथानकाच्या प्रवाहात बसून जाते. बहुतेक बखरींमधून मस्तानीबद्दलचे उल्लेख जवळजवळ टाळलेले असल्याने तिच्याबद्दलची आणि तिच्या बाजीरावाशी असलेल्या नात्याबद्दल दंतकथा आणि वंदताच जास्त असल्याने ती 'तवायफ' की पत्नी ह्याबद्दल बरेच समज आणि अपसमज आजही असावेत. तिच्याबद्दल असणारे हे समाज अपसमज हे प्रामुख्याने तिचे मुसलमान असणे ह्यामुळे होते. पुण्यातला त्यावेळचा समाज आणि पेशवे घराणे यांचा तिच्याबद्दलचा दुःस्वास आणि तिला 'गाणी बजावणी' करणारी ह्या दर्जाला आणून बसवणारी विचारसरणी ही ती यवनी असल्यामुळे व तिची पर्शियन आई गाणारी असल्यानेही होती. पण ह्यात ती छत्रसाल राजाचे रक्त धमन्यांमध्ये खेळवणारी, शस्त्रपारंगत राजकन्या होती ह्याकडे दुर्लक्ष केले गेले होते. ह्या सिनेमाच्या कथानकात, तिच्यावर 'तवायफ' ढंगाची राहणी लादली गेल्यावर तिने ज्या राजनैतिक मुत्सद्दीपणे ते ते प्रसंग हाताळले ते जर कोणाला इतिहासाचे विकृतीकरण वाटणार असेल तर वाटो बापडे! ते ज्या पद्धतीने सिनेमात मांडले आहे ते मस्तानीला योग्य ती उंची प्रदान करणारे आहे. आणि ते तसे होण्यास भाग पाडणारा राऊ म्हणूनच मग आद्य पुरोगामी वाटतो. सर्व कलाकारांनी आपापली पात्रनिवड सार्थ ठरवत समरसून भूमिका केल्या आहेत. रणवीर अक्षरशः भूमिका जगाला आहे. त्याने बेफिकिर, रांगडा, हळवा, प्रेमात बुडालेला भावनाप्रधान योद्धा सार्थ उभा केला आहे. मराठी शब्द्पेरणी असलेला, भाषेचा एक बेफिकीर लहेजा जो त्याने चित्रपटभर पकडला आहे तो बहुतेक प्रसंगात भाव खाऊन जातो. विशेषतः जेव्हा निजामासमोर बसून बोलणी झाल्यावर त्याच्या पुढ्यात जातो तो प्रसंग रणवीर आणि भन्साळीचे चित्रपटाबद्दलचे बाकीचे गुन्हे क्षम्य करून जातो. दीपिका मस्तानी वाटते आणि तिने ती यथायोग्य वठवली आहे. प्रियांका,मिलिंद सोमण, यतीन कारेकर, तन्वी आझमी इत्यादींनी झोकून काम केले आहे. भव्य-दिव्य न् महागडे सेट्स, चकचकीत व भरजरी पोशाख आणि प्रचंड कॅन्व्हास ही भन्साळीची खासियत आहे (अलीकडे तेवढेच राहिले आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये). ह्या सिनेमात तो पुणेरी, पेशवाई थाटाचा भव्य आणि ग्लॉसी कॅन्व्हास उभा करण्यात यशस्वी ठरला आहे. राहता राहिले 'पिंगा' आणि 'मल्हारी' ह्या वादग्रस्त गाण्यांबद्दल. मल्हारी हे गाणे निजामासोबतच्या अतिशय तणावग्रस्त प्रसंगानंतर येते त्यात बाजीरावाची 'तडफदार आणि धडाकेबाज' भूमिका अधोरेखित झालेली असते, त्यानंतर लगेच ते गाणे येते. कथानकाच्या प्रवाहात ते चपखल येते. कथानकाबाहेर, संदर्भरहित गाणे बघितल्यास ते चुकीचेच वाटेल. पिंगा गाण्याचेही तसेच. कथानकाच्या प्रवाहात ते चपखल येते. मस्तानी तेव्हा शनावारवाडयावरच राहत असते आणि त्या गाण्याच्या आधीच्या दृश्यात काशीबाई तिच्याकडे हळदीकुंकवाला जाऊन तिला शालू देऊन आलेली असते जो ती नेसून पिंगा घालायला येते. दोन्ही गाण्यांचा उगाच बाऊ केला गेला आहे. बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेला एका आदरणीय स्तरावर नेणारा आणि राऊच्या पुरोगामी रांगडेपणाला नेमके टिपणारा भन्साळीच्या बाजीराव मस्तानी सिनेमा आवडून गेला!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 33456
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

मला तरी चित्रपट आवडला. सोत्रींनी अगदी समर्पक परिक्षण लिहीले आहे. कुठेही बाजीरावाला उथळ होऊ दिलेले नाही भन्साळीनी. महालाच्या बांधकामाबद्दल चिमाजींना खोचक शब्दात सांगणे, आपली मोहीम महत्त्वाची आहे हे सांगणे यावरून तो किती जागरूक होता हेच दर्शवलेले आहे. रणवीरही मराठी बोलीतली हिंदी खुप मस्त ऐकवतो. त्यातले सतत मोहीमेवर असणार्‍या योद्ध्याचे रांगडेपण बरोबर दिसते. त्याला दिलेले युद्धाचे प्रसंग ही सुंदर जमले आहेत. त्यात दांडपट्टा वापरण्याचे दृश्य अगदी आवडले. मराठ्यांच्या वापरात असलेल्या हत्याराला चित्रपटात जागा मिळालेली पाहून अगदी बरे वाटले. दिपीका, प्रियंका, मिलिंद सोमण, वैभव तत्त्ववादी आणि तन्वी आझमी सगळ्यांचेच काम सुंदर झाले आहे. तन्वी आझमी राजकारण आणि आपले आईचे प्रेम यातली घालमेल सुंदर दाखवतात. एकूणच त्या चित्रपटगृहात हरहर महादेव च्या जयजयकारात मराठी योद्धे लढताना पाहून अंगावर रोमांच येऊन डोळे हलकेच पाणावले !!

मला तरी चित्रपट आवडला. सोत्रींनी अगदी समर्पक परिक्षण लिहीले आहे. कुठेही बाजीरावाला उथळ होऊ दिलेले नाही भन्साळीनी. महालाच्या बांधकामाबद्दल चिमाजींना खोचक शब्दात सांगणे, आपली मोहीम महत्त्वाची आहे हे सांगणे यावरून तो किती जागरूक होता हेच दर्शवलेले आहे. रणवीरही मराठी बोलीतली हिंदी खुप मस्त ऐकवतो. त्यातले सतत मोहीमेवर असणार्‍या योद्ध्याचे रांगडेपण बरोबर दिसते. त्याला दिलेले युद्धाचे प्रसंग ही सुंदर जमले आहेत. त्यात दांडपट्टा वापरण्याचे दृश्य अगदी आवडले. मराठ्यांच्या वापरात असलेल्या हत्याराला चित्रपटात जागा मिळालेली पाहून अगदी बरे वाटले. दिपीका, प्रियंका, मिलिंद सोमण, वैभव तत्त्ववादी आणि तन्वी आझमी सगळ्यांचेच काम सुंदर झाले आहे. तन्वी आझमी राजकारण आणि आपले आईचे प्रेम यातली घालमेल सुंदर दाखवतात. एकूणच त्या चित्रपटगृहात हरहर महादेव च्या जयजयकारात मराठी योद्धे लढताना पाहून अंगावर रोमांच येऊन डोळे हलकेच पाणावले !!

परिक्षण वाचून हा चित्रपट बघावसा वाटत आहे. आमच्या शहरात लागला देखील आहे. बघु जमते का?

शिनेमा चांगला आहे वगैरे मीही ऐकलेय. थेट्रात जाऊन बघणार नाही. जालावर येईल तेंव्हाच! सिनेमावरील मत हे तुमचे वैयक्तिक असल्याने ठीकच आहे पण मला फारसे पटले नाही. सिनेमॅटिक लिबर्टीची व्याख्या, मर्यादा वगैरे बद्दल बोलून झाल्याने आता पुन्हा टंकत नाही. वेल्लाभटांच्या धाग्यावर चर्चा केलीये. तुमचा धागा बर्याच दिवसांनी आला म्हणून प्रतिसाद दिला.

बादवे. मिलिंद सोमन म्हणजेच अम्बजीपन्त ना? खूप आवडला या चित्रपटात तो!

In reply to by DEADPOOL

जालावर?? साहेब चित्रपट जालावर अजुन रिलीज नाही झाल. video piracy हा चोरी इतकाच गंभीर गुन्हा आहे.

In reply to by sagarpdy

सध्या बिषय चित्रपटाचा चालला आहे म्हणुन video piracy चा उल्लेख केला. बाकीचे विषय निघाले की त्या त्या piracy बद्दल बोलू. सध्या राम राम घ्या.

अश्याप्रकारे सोत्रिंनी भुस्काटाच्या ढिगावर बसुन चिरूट प्यायचा चंग बांधलेला दिसतो :D

पिंगा आणि मल्हारी गाण्या बद्दल मी स्वतःही राग व्यक्त केलाच होता . पण त्या आधीच ठरवलं होतं कि हा चित्रपट पाहायचाच(दीपिका आणि प्रियांका साठी तरी नक्कीच ) . पण ३ तास खुर्चीवर बसवून ठेवण्यात यशस्वी झालाय हा चित्रपट . जबरदस्त एनर्जीने भरलेला बाजीराव , त्याच तोडीची काशीबाई आणि मस्तानी उभी करण्यात सगळेच पुरेपूर उतरलेत . शेवटच्या निजाम विरुद्ध लढाईत तर रणवीर चा आवेश बघण्यासारखा , आणि त्यानंतर आजारपणात जे भास होतात, तेथेही एक हतबल योद्धा अगदी परफेक्ट दाखवलाय . कमीत कमी एकदा तरी बघण्यासारखा चित्रपट

एक संवाद आणि दुसरं अति हातपाय हालवणं कमि केले असते तर जास्त सुसह्य झालं असतं बाजी प्रकरण.

रणवीर ने सुंदर काम केलंय, बाजीरावांच्या तोंडी अत्यंत ताकदवान आणि जबरी संवाद दिलेत 'अपनी धरती अपना राज, छत्रपती शिवाजी महाराज का सपना पूर्ण हिंदू स्वराज ' 'जन्म से ब्राम्हण लेकिन कर्म से क्षत्रिय हू' … निजामासमोरचा संवाद : 'निजामजी बाजीराव के सम्मान में खडा होने के लिये बाजीराव कोई राजा नही छत्रपती शाहू का सेवक है ' निजाम - 'क्या चाहिये तुम्हे ' …बाजीराव - 'पुरा हिंदोस्तान' अगदी पैसा वसूल डायलॉग आहेत

चित्रपट आवडला आहे.

सोत्रीं च्या शब्दा शब्दाशी सहमत. शेवटचा आजार पणात भास होतांनाचा रणबीरचा अभिनय अप्रतीम .

धन्यवाद ! चित्रपट नक्की पहाणार.

आज टीममधल्या लोकांनी उत्साहाने तिकीट काढली आहेत त्यामुळे सिनेमा बघायला जाणार आहे. बघताना झोपलो नाही तर सांगता येईल कसा वाटला ते... :)

हम दिल दे चूके आणि राम-लीला मध्ये गुजराती, देवदास मध्ये बंगाली अशा त्या त्या प्रांताच्या संस्कृतीचे भव्यदिव्य दर्शन भन्साळीनी या अगोदर घडवले होते, तेंव्हापासून महाराष्ट्राच्या संस्कृतीच दर्शन देशाला आणि जगाला कधी घडेल याची वाट पाहत होतो, भन्साळीनी ही अपेक्षा नक्कीच पूर्ण केली आहे. बाकी वादविवाद बाजूला ठेवून हा चित्रपट पाहायला नक्कीच आवडेल

परीक्षण छान आहे. आधी मी रणवीर बाजीराव म्हणून कसा वाटेल या बाबत भयंकर स्केप्टिकल होते. पण आता हळूहळू सगळेच रिव्यूज़ चांगले आहेत म्हटल्यावर आता नक्की बघणार.

सर्व पूर्वग्रह(इतिहास) बाजूला ठेवून पाहिल्यास 'बाजीराव-मस्तानी' एक सुंदर चित्रपट आणि इतिहास म्हणुन चित्रपट पाह्णे मुर्खपणाच!

शिवशाहीर म्हणून बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचवण्याचे काम केले, असे समजून तुम्ही पुरंदरेंना राज्यातील सर्वोच्च असा "महाराष्ट्र भूषण पुरस्कार‘ देता; मग भन्साळी यांनी पेशव्यांचा इतिहास घरोघरी पोहोचवण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांनाही "महाराष्ट्र भूषण‘ का देऊ नये, असा सवाल सरकारला विचारला गेला आहे.

मी सोमवारी संध्याकाळी इथल्या थिएटरमध्ये हा चित्रपट पाहिला. थोरल्या बाजीरावांचे पात्र अप्रतिम उभे केले आहे. जुन्या काळातल्या युद्धांची एवढे दर्जेदार चित्रिकरण आजवर भारतीय चित्रपटात कधीच पाहिली नव्हती. त्याखेरीज शनिवारवाडा पेशवाईच्या उत्तुंगतेच्या काळात आतून कसा असेल याची मला उत्कंठा होती ती हा चित्रपट पाहून प्रथमच शमली. मला व्यक्तिशः कौटुंबिक राजकारणाचे नाट्य पाहायला आवडत नसल्याने मध्यांतरानंतर चित्रपट कंटाळवाणा वाटला पण जे प्रत्यक्षात घडले आहे ते टाळून हा चित्रपट बनवता येणे शक्यच नव्हते.

एक कलाकृती म्हणून पहायला गेलं तर भन्साळीचा चित्रपट अत्यंत सुंदर आहे, सावरिया, रामलीला, देवदास मध्ये राहिलेल्या सगळ्या उरल्या सुरल्या विकृत इच्छा त्याने या चित्रपटात पूर्ण केल्या आहेत. पण इतिहास म्हणायला गेलं तर सगळीच बोंबाबोंब आहे. त्याने आधीच हा इतिहास नाही हे स्पष्ट केल्याने जास्त त्रास होत नाही. पण तरीही काही गोष्टी खटकतातच जसे कि… १. छ. शाहूंच्या दरबारात बाजीराव जेव्हा प्रवेश करतात तेव्हा डोक्यावर पगडी वगरे न घेत कसे प्रवेश करू शकतात किंबहुना कोणत्याही दरबाराची हि रीतच असते. २. मस्तानी यवनी असतानाहि काशीबाई तिला हळदीकुंकू कसे लावू शकतात. मोठ्या सोड्या पण या बारीक- सारीक गोष्टीचे भान भन्साळीनि ठेवले असते तर अजून उत्कृष्ट झाले असते. ३. चित्रपटाचे संगीत ऐकताना उगाच बाकीच्या चित्रपटांचे संगीत चोरलेले वाटते, काही ठिकाणी उष काल होता होता, नटरंग, चुरा लिया ही तुमने जो दिल को या मधलं संगीत आठवण करून देत. ४. रणवीर, दीपिका बद्दल बोलणे इथे उचित ठरणार नाही पण सगळ्यात जास्त आवडला तो 'वैभव तत्ववादी' ने साकारलेला ' चिमाजी आपा' . अगदी साष्टांग दंडवत घालावा असा अभिनय केलाय महाराजा त्याने। बहुत काय लिहिणे

चित्रपट उच्च दर्जाचा आहे, या निमित्ताने लोक निदान बाजीरावांबद्दल,मराठ्यांच्या इतिहासाबद्दल सर्च तरी करतील. . . पण आपलेच लोक आडवा पाय मारतात याची प्रचिती आली आहे. . . चित्रपट पाहून विरोध करण्यार्यांची दया येत आहे,असो

In reply to by याॅर्कर

कलाकृती म्हणून तो चित्रपट सुंदर आहे यात वादच नाही.
या निमित्ताने लोक निदान बाजीरावांबद्दल,मराठ्यांच्या इतिहासाबद्दल सर्च तरी करतील.
काय सर्च करतील पिंगा कसा करतात कि मल्हारी ड्यान्स कसा करतात ते. काल चित्रपट गृहात एक उ. भा जोडप्याकडून " ये बाजीराव ऐसा रंगेल था" अस संवाद ऐकू आला, शरमेने मान खाली घालावी लागली यामुळे, एवढा भंगार संदेश दिला आहे भन्साळीनी. बाजीराव साहेब

In reply to by महासंग्राम

उत्तर भारतीयांकडून काय अपेक्षा करणार आपण , त्या आकार पटेल ने काय दिवे लावलेत माहिती आहे ना ? मराठा सरदारांच्या ५-१० लग्नाच्या बायका असतील तर बाजीरावांच्या २ आहेत यात विशेष ते काय, त्याला जागेवर सुनावायला पाहिजे होता तुम्ही

In reply to by मालोजीराव

तुमचं बोलण रास्त आहे मालोजीराव पण अर्धवट अभ्यास करून कोणाला सुनावणे हे हि चुकीचच नाही का

In reply to by महासंग्राम

>> ये बाजीराव ऐसा रंगेल था ही जरा अतिशयोक्ती वाटते आहे. कारण राऊ तसे वाटण्याजोगे काहीच नाहीयेय सिनेमात. असो, तुम्ही शरमानं मान खाली का घातातलीत? तसं करणं म्हणजे तुम्ही इतिहासाच्या विकृतीकरणाला दिलेली साथच म्हणावे लागेल. त्या जोडप्याचा गैरसमज तुम्ही तिथेच दूर करायला हवा होता. - (राऊ आणि सिनेमा, दोन्हीप्रेमी) सोकाजी

In reply to by सोत्रि

अतिशयोक्ती वाटते पण खरं आहे आणि कोणत्या मुद्द्यावर समजावणार त्यांना धडधडीत २.५ तासांच विकृतीकरण पाहिल्यावर त्यांच्यावर फरक पडेल असं वाटत ??

काय सर्च करतील पिंगा कसा करतात कि मल्हारी ड्यान्स कसा करतात ते. काल चित्रपट गृहात एक उ. भा जोडप्याकडून " ये बाजीराव ऐसा रंगेल था" अस संवाद ऐकू आला,
स्पेसिफिक एक-दोन गाण्यांवरून जर चित्रपटाची समीक्षा करायची म्हणाल तर अवघड आहे. आणि चित्रपटातून, बाजीराव रंगेल होते अशी प्रतिमा मुळीच तयार होत नाही. तशी प्रतिक्रिया देण्यार्या उ.भारतीय जोडप्याला नाईलाजाने मी अल्पबुद्धीधारक असे म्हणेन. . . अमिताभ बच्चनांनी स्वतः चित्रपटाची भरभरून स्तुती केली आहे.ते म्हणतात चित्रपट पाहिला पण चित्रपटाची नशा अजून उतरत नाहीये.

चांगलं लिहिलं आहे. तरीही सिनेमा बघायचा प्रश्न येत नाही. इतिहासावर अवलंबून कथा नाही, कादंबरीवर आहे वगैरे कळले. पण तरीही. काशीबाई आणि बाजीराव नाचताना दाखवण्यापेक्षा त्याने शाहू छत्रपतींच्या दरबारात एखादा पोवाडा दाखवला असता, गावच्या जत्रेत एखादा तमाशा (तेव्हा तमाशातही बायका नाचत नसत असे वाचले आहे. पण तेवढे चालवून घेऊ.) वगैरे दाखवला असता तर वीरश्रीयुक्त पोवाडा आणि लावणी अशी मराठी लोककला दाखवली असे झाले असते. त्यासाठी बाजीराव पेशव्यांना टपोरी इश्टाईल गाणे म्हणत पणाला लावायची गरज नव्हती असे वाटते.

In reply to by पैसा

>> तरीही सिनेमा बघायचा प्रश्न येत नाही. पैसातै, हा स्टँड योग्य आणि पटला. पण कलाकाराचे सर्जन काय असाव हे ठरवण्याचा अट्टाहास का? तसं करणं म्हणजे असहिष्णूता नाही का??? ;) पळा..... - (सहिष्णू) सोकाजी

In reply to by सोत्रि

या बाबतीत मी असहिष्णु आहेच. सिनेमे आणि सीरियल्समधून अगदी राम कृष्णांचेही जे काय भरीत करतात ते बघावेसे मला कधीच वाटत नाही. त्यापेक्षा पातालभैरवी सारखे सिनेमे कधीही ब्येश्ट!

काशीबाई आणि बाजीराव नाचताना दाखवण्यापेक्षा त्याने शाहू छत्रपतींच्या दरबारात एखादा पोवाडा दाखवला असता
ही संकुचित वृत्ती आहे,नाचाचं एवढं वावडं कशासाठी?
त्यासाठी बाजीराव पेशव्यांना टपोरी इश्टाईल गाणे म्हणत पणाला लावायची गरज नव्हती असे वाटते.
पुन्हा तेच,नाचगाण्याचं एवढं वावडं का? जरा आपलं मन मोठं केलं कि सगळं खपून जातं. _ _ एका अमराठी माणसाने एवढा भव्य चित्रपट बनवला हे आपलं नशीब,आम्हाला एवढं बजेट घेवून चित्रपट बनवता येणं तर दूरच. अपेक्षा मात्र लईच दांडग्या!

In reply to by प्रदीप साळुंखे

आधी काय लिहिले आहे ते कृपया नीट वाचा आणि मग टायपत सुटा. लिहिलेले पुन्हा समजावून देत बसायला आत्ता माझ्याकडे वेळ नाहीये. आणि झोपल्याचे सोंग करणार्‍याला जागे करायची इच्छा पण नाही.

In reply to by पैसा

हो खरंच.. आपल्या आक्षेपांना "पण नाचाला विरोध का?" किवा "नृत्य ही एक महान कला आहे" असली बिनडोक अर्ग्युमेंट्स करणार्‍या एकाला काल ब्लॉक केलं शेवटी.. अरे मी बोल्तेय काय.. तू काय बोलतोय... झोपल्याचे सोंग करणार्‍याला जागे करायची इच्छा पण नाही. अगदी अगदी..

In reply to by पैसा

बाजीराव,काशीबाई यांच्या नाचगाण्यावर तुम्ही इतर पर्याय सुचवले आहेत. मलाही जुनाट विचारांचे पांघरून घेतलेल्यांना,आणि या ग्लोबलायझेशनच्या युगात निरर्थक अस्मितेला चिकटून असलेल्यांना काही सांगण्यात अर्थ वाटत नाही. . . आणि साखरझोपेत असणार्यांना उठवायची तर माझी मुळीच इच्छा नाही.

In reply to by प्रदीप साळुंखे

मी एकदा शेवटचा ट्राय करते. जमलं तर ठिक नाहीतर आपण दुसर्‍या धाग्यावर बोलु (सोत्रिंनी किती हौसेने काढलाय धागा!!) विरोध "नाचणे" ह्या कृतीला नसुन "पेशव्यांच्या घरातील स्त्रिया किंवा खुद्द पेशवेच, त्याकाळी ज्या प्रकारच्या नाचाची पद्धत नव्हती त्या पद्धतीने (बॉलिवुड / लावणी स्टाईल), ज्या प्रकारचे कपडे स्त्रिया घालत नव्हत्या ते घालुन (बेंबी पर्यंत खाली नेसलेली नऊवार), ज्या लोकांसोबत नाचण्याची शक्यताच नाही (सवत) त्यांच्या सोबत" नाचत आहेत, जे ऐतिहासिकदृष्ट्या चुक आहे, त्याला आहे. आता त्यात नाचत आहेत ह्या शब्दाच्या आधी ज्या दोन ओळी आहेत, त्या संपुर्ण दुर्लक्षित राहुन "नाचत आहेत म्हणुन विरोध आहे" हेच तुम्हाला दिसत असेल तर काय बोलायचं सांगा? नाच गाणी दाखवायचीच तर जे खरंच घडत होतं ते दाखवा असं म्हणणं आहे. पैसाताईने योग्य पर्यायही दिले आहेत. पण अर्थात ते फार ग्लॅमरस नसल्यानेच ते निवडण्यात आले नाहीत हे तर स्पष्ट आहेच. बाकी लेखासंदर्भात, ह्या चुका टाळुन बाकी पिक्चर उत्तम आहे असं ऐकलय. वेळ मिळाल्यास कदाचित बघायला जाईनही.. पण निव्वळ कथा म्हणुन पहावा लागेल.. इतिहास म्हणुन नाही. बघितला तर कळवेन की कसा आहे.

In reply to by पिलीयन रायडर

वेळ मिळाल्यास कदाचित बघायला जाईनही.. पण निव्वळ कथा म्हणुन पहावा लागेल.. इतिहास म्हणुन नाही. बघितला तर कळवेन की कसा आहे.
फार आनंद जाहला. नक्की पहा मी सांगतो म्हणून. . . . बाकि काही नाही हो, त्या टुकार'दिलवाले' पेक्षा कलेक्षन जास्त व्हायला पाहिजे.नाहितर इथेही बाजीराव दुर्दैवीच ठरतील.

In reply to by प्रदीप साळुंखे

बाकि काही नाही हो, त्या टुकार'दिलवाले' पेक्षा कलेक्षन जास्त व्हायला पाहिजे.नाहितर इथेही बाजीराव दुर्दैवीच ठरतील.
असोच !!

In reply to by प्रदीप साळुंखे

मायला , काय ते दिलवाले पिक्चर, पडदा फाड़ावासा वाटतो. साळुंखे साहेब अगदी सहमत

अरेरे... विरोधासाठी वेगळा धागा आहे ना ? हा धागा समर्थनार्थ राहू देऊ का? ;) - (टक्क जागा असलेला) सोकाजी

"बाजीराव मस्तानी" पाहाच.. मी जन्मानं जरी ब्राह्मण असलो तरी कर्मानं क्षत्रिय आहे, सातारच्या शाहु महाराजांच्या ऋणात राहून मराठेशाहीला अर्ध्या हिंदुस्तानात पोचवणारा, मस्तानीच्या कृष्णाचं नामकरण नाकारणा-या ब्राह्मणांच्या विरोधात बंड पुकारून पेशव्यांच्या वंशजाचं नाव समशेर बहाद्दुर ठेवणारा, जाती धर्माच्या, कर्मकांडाच्या प्रथांना लाथ मारणारा, 40 लढाया लढून अपराजीत राहिलेला बाजीराव शेवटी आप्तस्वकियांकडून मात्र हरला.. मस्तानी... स्त्री कशी असावी तर मस्तानी सारखी... बापावर संकट आलं म्हणून रणांगणात उतरणारी, आई मुस्लिम म्हणून नमाज पढणारी, बाप राजपूत म्हणून कृष्णभक्तीत लीन राहणारी, प्रेम मिळवण्यासाठी बुधवार पेठेतल्या वेश्यावस्तीत राहून बाजीरावाची वाट पाहणारी, रखेल म्हणून समाजानं हिनवलं तरी प्रेमापोटी तो अपमान गिळून प्रेम देणारी, ज्या पेशव्यांनी हाल हाल करून प्राण घेतले, त्यांच्याच रक्षणासाठी आपला मुलगा समशेर बहाद्दुरला लढायला सांगणारी, विरांगणा, नृत्यांगणा, स्वर्गसुंदरी आणि एक आदर्श पत्नी, पतीच्या विरहात प्राण त्यागणारी.. "मस्तानी" इतिहासात उपेक्षीतच राहिली... काशी....... नव-याचं दुस-या स्त्रीवर प्रेम आहे. हे माहित असतानाही कर्तव्यं निभावणारी, सवतीची मंगळागौरीला ओटी भरणारी.. बाजीरावांसाठी मस्तानीची बंदिवासातून सुटका करावी यासाठी प्रयत्न करणारी... एक आदर्श पत्नी काशीबाई... भंसाळीनं मांडलेला इतिहास रंगवलेला असेलही.. पण, घटना सत्य आहे... चित्रपट बघण्याआधीच ओकणा-यांना सणसणीत चपराक आहे, जेव्हा पिंगा गाणं संपल्यावर प्रेक्षकांच्या टाळ्या वाजतात.. सवत असली तरी काशीबाई मस्तानीची खणा नारळानं ओटी भरते, कुंकु लावते.. ही आदर्शवत मराठी संस्कृती भंसाळीनं जगाच्या कानाकोप-यात पोचवली... इतिहास चुकीचा दाखवता म्हणून पेशव्यांच्या वंशजांनी टी.व्ही. चॅनेल डोक्यावर घेतले, अरे तुमच्याच पेशव्यांनी बाजीराव संपवला.. आणि मस्तानीचे हाल हाल केलेत.. तुम्ही कसली रे शालीनतेची भाषा करता, पहिल्या बाजीरावांनी जसं पेशव्यांना वैभव प्राप्त करून दिलं.. तिथंच दुस-या बाजीरावानं शेण खात, गणिका नाचवत, दारूच्या नशेत इंग्रजांच्या पायावर पेशवाई ठेवली.. तो इतिहास तुम्हाला शरमेचा नाही वाटत.. ज्या मस्तानीला हाल हाल करून मारलं तिच्याच मुलानं समशेर बहाद्दुरनं शेवटच्या श्वासापर्यंत मराठा साम्राज्याचं रक्षण केलं.. पेशवे असे करत नसत, त्यांच्या बायका नाचत नसत, हे तोंड वर करून सांगणा-यांनी पेशव्यांच्या बायका कपटीपणाचा कळस गाठत एखाद्याचे प्राणही घेतात.. हे सांगायला तुम्ही सोयिस्कर विसरता, हा तुमचाच इतिहास आहे.. तेव्हा कुठे जाते तुमच्या घराण्याची इभ्रत.. भंसाळींनी दाखवलेला बाजीराव हा आजच्या भाषेत सांगायचं तर सेक्युलर राजा आहे... रणवीरचं विशेष कौतुक... मल्हारी डांस भारीच.. विजयानंतर राजा सैनिकांसोबत नाचला तर तुमच्या बापाचं काय गेलं,. दुस-याच्या बायका नाचवता, आपली एक काल्पनिक नाचताना दाखवली तर एवढा गहजब.. वाह रे संस्कृतीरक्षक... दीपिकाबद्दल काय बोलायचं,. मस्तानी हिच्यापेक्षा सुंदर असूच शकत नाही.. शेवटी काशीबाईला न्याय मिळवून देणा- या प्रियंकाचे विशेष कौतुक.... भव्य सेट, मराठी थाटबाट, उत्तम दिग्दर्शन करून.. सुश्राव्य संगीताची धुरा सांभाळणा-या संजय लिला भंसाली यांचे विशेष अभिनंदन,.. नक्की पाहावा असा... "बाजीराव मस्तानी" ...साभर सोशल मेदिअवरुन

In reply to by नासिककर

पेशव्यांच्या बायका कपटीपणाचा कळस गाठत एखाद्याचा प्राणही घेतात.
शिवाजी महाराज पत्नी सोयराबाईनी राजारामाला छत्रपती करण्यासाठी संभाजी महाराजांना कैद करण्याचा कट केला होता.

चित्रपट बघितला गेला आहे; आवडला गेला आहे. अर्थात ती दोन गाणी इतिहासाशी विसंगत. पण एकूण चित्रपट उत्तम; सर्व कलाकारांचे काम अतिउत्तम; रणवीरचा अभिनय तर सर्वोत्तम! तुम्हाला भन्साळीचा फायदा करून द्यायचा नसेल तर शहरातील सर्वात कमी दराच्या चित्रपटगृहात जाऊन पहा पण पहा.

बिरजूभय्याचा लेख म्हणून प्रतिसाद. बाकी पिक्चरचे पोस्टर आवडले आहेत. स्टील फोटोग्राफी जबर केली आहे. छान पब्लिसिटी. होर्डींग प्रिटिंग अल्टिमेट.

प्रदर्शनाच्या दुसर्याच दिवशी पाह्यला होता चित्रपट आणि आवडलाही खूप. बाकी असे भव्यदिव्य चित्रपट एकतर भन्साळी नाहीतर आशुतोष गोवारीकरच बनवू जाणे.

पूर्ण इतिहास नाहीच तर इनामदारांच्या कादंबरीवर आधारीत आहे. सेट जबरदस्त आहेत, असे वैभव मराठीचे बजेट सांभाळून करता आले नसते. बॉलीवुड आणि भंसाळी म्हटल्यावर प्रेमकथा या मुद्दा अधिक महत्वाचा ठरतो. चित्रपट बघितल्यावर बाजीराव हा एक मोठा योद्धा होता हेच समोर येते. कुणीतरी बाजीरावाच्या विकीपेजवर येनाऱ्या हीटसचा अभ्यास करावा. बाजीरावचा मृत्यु थोडा खटकला. अभिनय ठीकठाक आहे, मला चिमाजीआप्पा फारसा आवडला नाही त्यापेक्षा राधाबाई प्रभावी वाटली. नानासाहेबांचे पात्र पण तितके प्रभावी वाटले नाही. अवांतर इतिहासात याचे पुरावे आहे की नाही हे माहीत नाही. मस्तानीचा शनिवारवाड्यात छळ झाला. तिच्या खुनाचाही प्रयत्न झाला. पुढे जाऊन त्याच वाड्यात नारायणरावचा खून झाला. नानासाहेबांचे तीनही पोर अकाली गेले, शनिवारवाडा उध्वस्त झाला, पेशवे संपले. बाजीरावाच्या मृत्युनंतर फक्त साठ ते सत्तर वर्षात पेशवाई जवळ जवळ संपुष्टात आली. पेशव्यांचा खरा इतिहास जर कुणाला माहीती असेल तर शनिवारवाड्यालाच. सारी खलबत, राजकारण त्यास ठाउक आहे. हा इतिहास पोटात घेउन शनिवारवाडा पण संपलाय फक्त काही भिंती तेवढ्या शिल्लक आहेत.

कै नै एवढे प्रतिसाद कसे वाढले ते बघायला आलो होतो. चालु द्या. पिच्चर पाहा ब्वा...अन इंजॉय करा. गाण्यांच्या ऐवजी पवाडा पाहिजे होता हहपुवा. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भालजी पेंढारकरांचा राजा शिवछत्रपती पाहिला नाही का? की त्यातही छत्रपती शिवाजी महाराज "वाट लावली" म्हणत नाचलेले बघायचे होते?

In reply to by पैसा

पेशव्यांच्या काळात मराठी राज्याचे स्वराज्याचे साम्राज्य झाले होते. पराक्रमाबरोबर वैभवही वाढत गेले म्हणूनच शिवकाळात असलेला साधा सरळ गद्यसाद्रश पोवाडा मागे पडला आणि त्याची जागा पूर्वपेशवाईत लावणीने पटकावली. स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर झाल्यामुळेच दरिद्री मराठ्यांच्या हातात पहिल्यांदाच हातात पैसा खुळखुळत होता. त्यामुळे त्यांची राहणी वृत्ती सुखवस्तूपणाची होती आणि ते सर्वच करमणुकीकडे झुकले होते. शाहुसारखा विलासी राजा आणि रसिक पेशवे यांच्यामुळे साहजिकच नाच तमाशे यांना उत आला होता. चित्रकथा, गोंधळी,भराडी,भांड इत्यादी धंदेवाईक लोककवींबरोबर शिंपी,गवळी,व शिकलगा इत्यादी पेशांतील कवींनीही लोकरंजनाची वाट धरली व त्यामुळेच रावबाजीच्या रंगेल कारकिर्दीत नखरेल लावणीला प्रचंड माज आला होता. उत्तर पेशवाईत तर मराठी लावणीला तर बहर आलेला होता. नाच, गाणे,तमाशे, जलसे, याची बेधुंद उधळण होत होती. इतिहासकार लिहितात, मराठी कविता,मंदिर मठातून बाहेर आली. तिच्या डोईवरचा पदर खांद्यावर घसरला. पायात चाळ दिसू लागले.एवढेच नव्हे तर रामकृष्ण हरीच्या गजराऐवजी 'कुणा ग सुभगाची मदनमंजिरी ' म्हणुन कानाला हात देऊन तिने पायाच्या ठेक्यासरशी इश्काची लकेर छेडली. हे घडण्याचं कारण सामाजिक पार्श्वभूमी त्यामुळे पोवाडे मागे पडुन नाच गाणे, लावणीला मोठं भाग्य याच काळात लाभलं. मराठी फौजा पावसाळा संपत आला की की नर्मदा ओलांडुन उत्तरेस जात येतांना सैन्याला उशीर व्हायचा. सैनिकांना आपल्या बायका प्रेयसीच्या आठवणी यायच्या. विरहाच्या वेदना सुरु झाल्या की त्यांची पावलं नाचगाण्याकडे वळायची. म्हणुन भन्साळीनं नाचगाण्याचं एक प्रातेनिधिक चित्रण अगदी योग्य रेखाटलं आहे. शुरविरांचे कौतुक करणारे पोवाड्यावाले रंगेल बनले होते म्हणुन हहपुवा झाली बाकी कै नै. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हणूनच शिवकाळात असलेला साधा सरळ गद्यसाद्रश पोवाडा मागे पडला आणि त्याची जागा पूर्वपेशवाईत लावणीने पटकावली.
ह्याला काही आधार, विदा? - (साशंक) सोकाजी

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाहुसारखा विलासी राजा आणि रसिक पेशवे यांच्यामुळे साहजिकच नाच तमाशे यांना उत आला होता.
कोणत्या आधाराने म्हणताय, शाहू छत्रपती आणि त्यांचे सुरुवातीचे दोन पेशवे बाळाजी विश्वनाथ आणि बाजीराव थोरले यांच्या काळात तमाशा अस्तित्वात होता का? आजच्या तमाशाचे स्वरूप हे १८०० नंतरचे आहे. दौलतजादा , सवालजवाब, लावणी हे प्रकार १७९० पासून च्या नंतर चे आहेत. शाहीर हैबतराव चा पहिला उल्लेख तमाशाशी संबंधित १७९४ चा आहे. शिवकाळात, शंभूकाळात आणि अगदी शाहूंच्या काळात सुद्धा (शिवकालातीलअज्ञानदास सारखे) वीररस गाणारे शाहीर होते. शाहू १७०८ ला छत्रपती झाले, त्यानंतर १७१९ पर्यंतचा काळ प्रचंड धामधुमीचा होता,मराठे माळवा,गुजरात,कोकण , उत्तर महाराष्ट्र , निजामविरुध्द, सय्यद विरुध्द, कोल्हापूरकर, बंडखोर सरदार,पोर्तुगीज अश्या अनेक आघाड्यांवर लढत होते. स्वतः शाहूंना अनेकदा रणांगणात उतरावे लागले होते. यात विलासी जीवन जगण्यास वेळ कुठून मिळाला असावा हे जाणून घेण्यास नक्कीच आवडेल.

In reply to by मालोजीराव

मी वाचलेले आठवते त्याप्रमाणे पट्ठे बापूरावाची पवळा ही तमाशातील लिखित उल्लेख असलेली पहिली महिला नर्तकी. त्याआधी (१७९० च्या आसपास) शाहिरी तमाशात तरुण मुलगे बाईचा वेष करून नाचत असत. लोकशाहीर रामजोशी या राजकमल च्या सिनेमात रामजोशीसोबत बया दाखवली आहे ती गदिमांच्या कल्पनेची निर्मिती असावी. बाजीरावानंतर माधवराव पेशवे हे अतिशय शिस्तीचे होते. त्यानंतरच्या नारायणराव आणि बारभाईच्या काळातही तमाशाला अनुकूल वातावरण नव्हतेच. तमाशा हा तुलनेने आधुनिक असल्यामुळेच बहुधा इतर प्रांतातल्या शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या भरतनाट्यम, कथक, ओडिसी, मोहिनीअट्टम यासारखा महाराष्ट्रात स्वतःचा असा शास्त्रीय नृत्याचा प्रकार नाही. गोव्यातल्या देवदासींमधूनही गाणार्‍या उत्तमोत्तम कलाकार पुढे आल्या. मात्र कोणी नर्तिका असल्याचे माहीत नाही.

In reply to by मालोजीराव

शाहुंच्या काळात तमाशा होता का याचा लिखित पुरावा असा सापडत नाही पण म्हणुन तमाशा नव्हता हे म्हणायला मी जरा कचरतो आहे. अनंतफंदी(१७४४-१८१९)  नावाचा शाहिरांमधे जेष्ठ असलेला शाहीर याने उत्तान शृंगाराच्या लावण्या लिहुन तमाशाचे फडही चालविल्याचे उल्लेख आहेत. पुढे अहिल्याबाई होळकर यांच्या उपदेशामुळे तमाशाचा धंदा सोडुन देऊन ते किर्तन करु लागले.

दुसरा उल्लेख परशराम (१७५४-१८४४) या शिंपी शाहिराने पहिल्यांदा तमाशातून स्त्रीने पुरुषाचा व पुरुषाने स्त्रीचा वेश घेऊन काम करण्याची प्रथा पाडली.  
                      पोट भराया उभारिला ना तमाशाचा धंदा
                      महालमोकासे, जहरी वळसे करतील आपुला धंदा
                      सुई दोर्‍याला हयात असू द्या तोची इमान मोकासा
                      निजकर्मी नर रत झाल्यावर काय उणा त्य पैसा
असे उत्तर पेशव्यांना ऐकवून पेशव्यांची वतनदारी त्याने नाकारली आहे. वरील दोन्ही उदाहरणातून जरी काळ हा सतराशे पन्नासच्या पुढे जातो, तरी एकदम तमाशा तेव्हाच अवतरला असे म्हणता येत नाही त्याहीपूर्वी रात्रीच्या वेळी 'गोंधळ' आणि तत्सम कार्यक्रमात असे तमाशावजा  कार्यक्रम सादर होत असावेत असे म्हणायला वाव आहे. शाहीरांचे पोवाडे वीररसाऐवजी अधिक शृंगारपूर्ण वर्णन शाहु आणि पेशव्यांच्या काळातच असलेल्या शाहिरांच्या कवनातून दिसतात तशी  असंख्य उदाहरणे आहेत.

होनाजीबाळा (१७५४-१८४४) सगनभाऊशी कलगी तुर्‍याचे सामने करणारा होनाजी हा कवी. बैठकीच्या लावणीत रागदारीचे सूर असावेत ही बाजीरावांची इच्छा होनाजीने पूर्ण केली. होनाजीनेच  पहिल्यांदा वेगवेगळ्या रागदारीच्या चालींवर लावण्या रचुन तमाशाला बैठकी गाण्याची प्रतिष्ठा करुन दिली. होनाजी बाळाने बाजीवार पेशव्यांच्या जीवनावर पोवाडे न लिहिता बर्‍याच लावण्या लिहिल्या. या होनाजीला तर सरकार वाड्यासमोर तमाशा करण्याबद्दल सालाना तीनशे रुपयाचे मानधन मिळत असे .३

शिवकाळ सोडला तर शाहुंच्या काळापासून पुढे जवळ जवळ संत व पंडित कवींच्यावर असलेले अध्यात्माचे जोखड शाहिरांनी झुगारुन दिल्यामुळे शृंगाराचा अतिरेक होईपर्यंत कोणत्याच मर्यादेचं पालन शाहिरांनी केलेलं नाही. बाकी पोवाड्याचे विषयही होतेच होते. युद्ध, सैन्यप्रकार,तहनामे, दुष्काळ, सण, व्रते, शहर, लोकाचार.इ.इ.  जसे. सांगायचा मुद्दा पुन्हा असाच की सतराशे पन्नासच्या पुधे जरी तमाशाबाबत लिखित पुरावे येत असले तरी त्याही पूर्वी पाच पंचवीस वर्ष अगोदर तमाशा होता असे म्हणता येते.

शाहुमहाराज औरंगजेबाच्या मृत्युनंतर दक्षिणेत परतले तेव्हा एक तर मराठे सरदार औरंगजेबाच्या सत्तेशी युद्ध करुन करुन कंटाळुन गेले होते. शाहुंना हे सर्व कंटाळलेले  मराठे सरदार लाभलेत म्हणन्यापेक्षा शाहुंनी विनंतीकरुन पत्र पाठवून आपण एकत्र राहु आणि इतर आमिशे दाखवून त्यांना एकत्र केलं, तसेही बाकी मराठे सरदार राजे संभाजीच्या मृत्युनंतर खवळुन उठलेच होते त्याचाही फायदा शाहु महाराजांना झाला. रियासतकार लिहितात ' शाहुला जरी प्रारंभी लष्करी बळ फारसे मिळाले नसले तरी महाराष्ट्रच्या नैतिक सहानुभूतीचा पूर त्याजवर लगेच लोटला. हा पाठिंबा नुसता हिंदूचा नसून मुसलमानांचाही होता. औरंगजेबाच्या कारभाराने देशाची कशी नासाडी झाली ही सर्वांस चक्क दिसत होती. मराठ्यांचे पराक्रम व कैक वर्षांचे कष्ट लोकांच्या डोळ्यापुढे होते. बादशहाने यांचा नाहक छळ चालविला आहे अशी सामान्य समजूत प्रचलित होती., तिचा फायदा शाहूस मिळाला ; आणि तो परत निघताच पुष्कळ्से जमीनदार व सेनानायक त्यास अनुकूल झाले."

शाहुंचे कतृत्व अजिबात कमी करायचे नाही, पण परिस्थिती शाहुंच्या दृष्टीने अतिशय जमेची होती. स्वतःस छत्रपती म्हणवून घेणे वगैरे इत्यादी या सर्व गोष्टी त्यांना सहज मिळत गेल्या. शुर बाजीरावासारख्या सेनापतीने त्यांना सर्व आघाड्यांवर विजय मिळवून दिला.  शाहु महाराज अनेकदा युद्धावर आणि तहासाठी गेलेही असतील पण त्यांच्या आयुष्यात इतर मराठे  सरदारांमुळे स्वस्थ आणि आरामदायी आयुष्यही होतं, इतर राजांच्या दरबारात गायन, नृत्य हा जसा  भाग होता तसे त्याचे चित्रण मात्र  तपशीलवार येत नाही, हे तितकेच खरे आहे. 


-दिलीप बिरुटे

संदर्भ.
१. रा.श्री.जोग -मराठी वाड्:मयाभिरुचीचे विहंगावलोकन पृ. १०१
२. श.तु. शाळिग्राम - परशराम कवीच्या लावण्या. पृ. ५
३. श.तु. शाळिग्राम  - होनाजीबाळाकृत लावण्या पृ.१०
४. गो.स.सरदेसाई -मराठी रियासत खंड तीन. पृ.क्र. ३७.

          


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाजीरावाचा मृत्यू १७४० मधे आणि शाहू महाराजांचा १७४९ मधे झाला. हे सगळे शाहीर त्यानंतरच्या काळातले आहेत. दुसर्‍या बाजीरावाशी संबंधित असू शकतात. हे सगळे शाहीर कवने लिहून प्रसिद्ध व्हायला मालोजीराव म्हणतात तसा १७९० चा काळ नक्कीच उजाडला असणार. तुम्ही म्हणताय तो नाच गोंधळात असतो का? गोंधळ घालणारे गोंधळी वेगळे असतात आणि जागरण घालणारे वाघ्या मुरळी. खंडोबाच्या नावाने जागर, जागरण करतात त्यात मुरळीचा नाच पूर्वापार आहे. पण त्याचा उद्देश लोकांना उद्दीपीत करणे हा नसतो तर जास्त धार्मिक असतो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, पास म्हणून कसे चालेल? संदर्भ देऊन दिलेल्या मेगाबायटी प्रतिसादात मूळ प्रश्न अनुत्तरीतच राहताहेत. त्यांची उत्तरं देईपर्यंत पास म्हणून कसे चालेल? - (अजुनही साशंक) सोकाजी

In reply to by सोत्रि

या पेक्षा माझ्याकडे अजुन माहिती नाही. माझ्या मर्यादा. म्हणून माझा पास. :) -दिलीप बिरुटे।

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर नृत्याबद्दल आक्षेप नाहीच, तमाशा सदृश गोष्टी त्याकाळात नव्हत्या इतकेच. गणिका, बटकी विकत मिळत असत त्यामुळे हे शक्य असे.तसेच बाबूजी जोशी या कारकुनाने मस्तानीने गोकुळअष्टमीच्या उत्सवात नृत्य केल्याचे लिहिले आहे, पण ती राजदरबारात नाचत नसे (द ग गोडसे शोध निबंध)
परिस्थिती शाहुंच्या दृष्टीने अतिशय जमेची होती. स्वतःस छत्रपती म्हणवून घेणे वगैरे इत्यादी या सर्व गोष्टी त्यांना सहज मिळत गेल्या.
मोगली कैदेतून सुटून येताना फक्त ४ माणसांनिशी लाम्बकानी येथे महाराष्ट्राच्या सीमेवर उभ्या असलेल्या शाहूला खेड येथे येईपर्यंत ३५००० हजार सैन्य येऊन मिळाले. मराठी लोकांनी स्वतःचा छत्रपती गेली १८-२० वर्षे पाहिला नव्हता कदाचित म्हणूनच इतका प्रतिसाद त्यांना मिळाला असावा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणत्याही कलेचा उगम होउन लोकप्रियता मिळून तिचा प्रसार व्ह्यायला आणि तसे नवीन नवीन कलाकार तयार व्हायला बराच कालखंड जावा लागतो. त्या काळचा विचार करता तर जास्तच. शा. रामजोशांचा कालखंड (1762–1812) पाहता ते दुसर्‍या बाजीरावाला समकालीन जरी असले तरी त्यानी शाहीरी सोलापुरात सुरु केलेली. ह्या कलेचा प्रसार पुण्यापासून सोलापूरपर्यंत होण्यासाठी काही पूर्वइतिहास असलाच पाहीजे. दृष्य स्वरुप जरी वेगळे असले तरी ह्या कलेची परंपरा पूर्वापार लोकाश्रय असलेली असणार हे निश्चित.

In reply to by अभ्या..

अभ्या, मी वर प्रतिसादात शाहिरांच्या जन्म आणि त्यांच्या कलाप्रकाराचा काळ तेवढ्याचसाठी उल्लेख केला. की या कला प्रसिद्धीला येण्यापूर्वी तो कलाप्रकार अस्तित्वात असावा असे म्हणायला खुप वाव असतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तमाशा शिवकाळापासून अस्तित्वात असावा असे म्हणायला नक्कीच वाव आहे. समकालीन कवी नागेश ह्याच्या काही रचना त्याची साक्ष पटवतात असे मला वाटते. अधिक माहिती ' महाराष्ट्र सारस्वतात' बघून सांगतो.

In reply to by सोत्रि

लोकदैवतांचे विश्व मधे रा चिं ढेरे काय म्हणतात? तमाशा हा खेळे प्रकारातल्या राधेच्या नाचावरून सुरू झाला. खेळ्यांमधे पुरुष बाईचे सोंग आणून नाचतात. तीच प्रथा तमाशात पेशवाईअखेरपर्यंत सुरू राहिली एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर 'उघड्या मांडीचे कसब जाणणार्‍या' वर्गांचा तमाशाशी संबंध आला आणि नाच्याची जागा नाचीने घेतली. पट्ठे बापूरावासोबतची पवळा ही तमाशातली पहिली ज्ञात नर्तकी. खेळ्यातही तमाशाप्रमाणे गण गवळण असते. फक्त तिथे पुरुष स्त्रीवेष घेऊन नाचतात. ही पुरुषाने स्त्रीवेष घेऊन नाचायची पद्धत "नाच्या" च्या रूपात तमाशातही टिकून राहिली आहे. या मूळ खेळाला डफगाण्याचा फड अशा नावाने "राधा नाचवणे" या स्वरूपात जत्रांतून राधेचे खेळ पुरुष सादर करत असत. त्यात कलगीतुरा वगैरे प्रकार असत. हा प्रकार कर्नाटकातही "राधान आट" म्हणून प्रचलित आहे. हा खेळ करणारे जे "गाण" लोक होते त्याना फारशी भाषेच्या संसर्गाने शाहीर उपाधी मिळाली. तसेच "खेळ्यांचा खेळ" होता त्याला फारशीमधे "खेळतमाशा" आणि मग फक्त "तमाशा" हे नाव मिळाले. या नाच्या लोकाना एकनाथकालीन शेखमहंमदाने "नट्या" नावाने उल्लेखले आहे. "नट्या देखोनी इश्वराते ध्यातु| ऐसा विरळा कोणी पुण्यवंतु||" असे ते एका ठिकाणी म्हणतात. एकोणिसाव्या शतकातील रामसुत असे म्हणातात की राधा म्हणजे स्त्रीचा वेष| देऊनिया पुरुषास| तयाकडून नृत्यास| करवुनी वाद्यास वाजविणे| या रामसुतानी शिमग्यातल्या राधा नाचवण्याच्या खेळाचा समावेश डफगाण्याच्या फडात केला आहे. त्यांच्या एका पदात कृष्णाला राधेचा विरह असह्य झाल्याने त्याने राधेचा वेष घेतला आणि त्या प्रसंगाची आठवण म्हणून पुरुषाने स्त्रीचा वेष घेतलेला पौर्णेमेपासून ५ दिवस शिमग्याच्या काळात पहावा अशी लोकांना आज्ञा केली. तेव्हापासून खेळे प्रकार सुरू झाला, असा उल्लेख आहे. तमाशाचा उगम हा असा शिमग्याच्या खेळात आहे.