मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझं आजोळ आजगांव

श्रीकृष्ण सामंत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
माझं आजोळ आजगांवचं.वेंगुर्ल्यापासून आजगांव साधारण दहा मैलांच्या आंत.आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमी आजोळी जात असू.पहाटे उठून आई वाटेत खाण्यासाठी डब्बा द्यायची.उकडलेल्या बटाट्याची भाजी,पुऱ्या,लसणीची खोबरं घालून चटणी,थोडी वेलची पिवळी केळी.आणि फिर्कीच्या तांब्यात विहीरीचं थंडगार पाणी,असा थाट असायचा. पहाटे पहाटे निघताना हवा थंड असायची.त्यामुळे सुरवातीचा प्रवास झपाट्याने व्हायचा. वेंगुर्ल्याच्या बाजारातून वाट काढत निघताना जरा अड्चण यायची,कारण इतक्या पहाटे आजूबाजूच्या गांवातून बरेचशी मंडळी विक्रीसाठी माल घेऊन येत असल्याने चांगली जागा मिळण्य़ासाठी चूरशीत असायची. बाजारातली चहाची दूकाने अगोदरच उघडलेली असायची. साजूक शिऱ्याची,चवळीच्या खमंगदार उसळीची,कोवळे ओले काजूगर घालून केलेली मसालेदार भाजीची आणि गाईचे दूध घालून dust पावडरीचा उकळण्याऱ्या चहाचा भपकारा अजून नाक वांस विसरत नाही. काळोख संपून सुर्योदय होण्यापुर्वी आमची वाट तेरेखोलच्या घाटीची चढण चालू होण्यापर्यंत मजल गाठायची. तेरेखोलच्या घाटीची महती अशी की गोवामुक्ती संग्रामाच्या वेळी ह्याच घाटीतून गोव्याच्या पणजी गावात स्वातंत्र्य सैनीकांच्या एका तुकडीने मजल मारली होती.ही घाटी तिनएक मैलाची असावी.घाटीच्या माथ्यावर पोहचल्यावर थंड हवेची झोत अंगावरून गेल्यावर घाटी चढण्याचे सर्व श्रम पार निघून जायचे. घाटीच्या माथ्यावर काही धोरणी लोकानी विश्रांतीसाठी बैठकवजा एक चवथरा बांधला होता.त्याच्या वर उभं राहून लांब नजर लावून पाहिल्यास खाली खोल तेरेखोल नदीचं पात्र दिसायचं.काळ्या निळ्याभोर पाण्यात काही होड्या,काही खपाटे,आणि काही मालवाहू गलबतं दिसायची.नाराळाच्या झाडांची खच्चून लागलेली नदी किनाऱ्यावरची बाग वरून पाहून पृथ्वी वर जणूं स्वर्गच पहातो काय असा अत्यंत सुदंर देखावा दिसायचा. घाटी उतरून खाली आल्यावर तेरेखोल नदीच्या अल्याड कडून पल्याड कडे जायला होड्या असायच्या.पलीकडे तेरेखोल ते शिरोडयाला जायला मोटार सर्विस उभी असयची.ते पांच सात मैल चालून जायला जरा कठीण होत असल्याने आणि मोटारने गेल्यामुळे आजोळी दुपारच्या जेवण्याच्या बेतानं जायचं असल्याने तसं करणं जास्त संयुक्तीक वाटायचं.होड्या नदी पार करायला माणशी चार आणे त्यावेळी घ्यायच्या.आठ दहा मंडळी आणि त्यांचे बोजेवजा सामान घेऊन होडी नदी पार करायची.कधी होडीत बसल्यावर मध्यनदीत होडीतून बाहेर हात काढून पाण्यात सोडल्यास छोटे,छोटे मासे हाताला चावा घ्यायचे त्याची खूप गम्मत यायची. शिरोड्या गांवात सर्व्हीस पोहोचायला दुपारचे अकरा वाजायचे.गाडीतून उतरल्यावर आजगावात जायला आणखी दीड एक मैलाची पायी रपेट असायची.शिरोड्याच्या बाजारातून जाताना वालीच्या पेंड्या, न चूकता नेल्याने मामी दुसऱ्या दिवशी पेजे बरोबर भाजी करायला विसरत नसे. तो पर्यंत मामा मासळी बाजारातून आमच्यासाठी सुरमई,सरंगा आणि कर्ली घेऊन यायचा. मामी थोडे मासे दूपारच्या जेवणासाठी आणि थोडे रात्रीच्या जेवणासाठी ठेवायची. शिरोड्या गावाची महती अशी की प्रसिद्ध लेखक आणि ज्ञानपीठ अवॉर्डचे मानकरी वि.स.खांडेकर यांचं हे जन्मस्थळ. आजोळी आजगांवला जाण्याच्या वाटेवर त्यांच घर दिसतं.त्यांची आठवण काढून ह्या घराला भेट देणारे बरेच लोक नेहमीच इकडे दिसतात. क्षणभर उभं राहून त्यांच स्मरण करणारे लोक पाहून खूप बरं वाटतं. आम्हाला बघून मामेभावंड खूप खूश व्हायची.आजी,आजोबा सर्वांची चवकशी करायची.या सर्वांना वाकून नमस्कार केल्याने धन्य वाटायचं.रात्री मिणंमिणत्या दिव्यात बाहेरच्या ओटीवर बसून डोळ्यात झोप पेंगे पर्यंत गप्पा चालायच्या. वरती माडीवर अंथरूणं घातलेली असायची. हारोहार एका मागून एक भावंड एकमेकाला लागून झोपायची. पहिल्या दिवशी थोडा पायी आणि थोडा गाडीतून झालेल्या प्रवासाने शीण आलेला असल्याने झोप पटकन यायची.पहाटे पहाटे आजी किंवा आजोबा येऊन अंगावरचे पांघरूण सरळ करायचे,किती प्रेम किती आस्था त्यांची आता आठवण येऊन त्यांच्या बद्दलचा आदर द्विगुणीत होतो.सकाळी उठून चहा पाणी झाल्यावर आजी दगडू म्हारा बरोबर खालच्या माडाच्या बनात जाऊन आमच्यासाठी कोवळी शहाळी काढून आम्हाला द्यायला सांगायची, "या महार वाड्यात असलं बन. नाही तरी तिकडची स्थाईक वस्ती एकही फळ आमच्या तोंडाला लावू देत नाहीत" असे आजी तक्रार करायची. "त्यामुळे शहाळी काढून तरी त्याचा उपयोग करून घेऊया.नाहीपेक्षा नारळाला बाजारात खूप किंमत येते." असं पूढे म्हणायची.शहाळं म्हणजे नारळाच कोवळं फळ.पुर्ण नारळ होण्यापूर्वी काढण्यात फळाची नुकसानी होते हे मला नंतर कळलं. सकाळी दहाच्या सुमारास पेज आणि फणसाची भाजी,आणि त्याबरोबर मधूनच खोबऱ्याची कातळी.फणसाची भाजी ही अर्ध्या पिकलेल्या आणि अर्ध्या कच्या फळाची करायची असते.नाहीतर त्याच्या पुर्वी केल्यास अगदी कोवळ्या फणसाची भाजी करतात.त्याला फणसाच्या कुवऱ्याची भाजी म्हणतात.ती पण चवदार लागते. फणसाची भाजी,खोबऱ्याची कातळी,आणि पेज हे कॉंबीनेशन अप्रतीम लागतं.नाहीतर दुसरं म्हणजे पेज आणि वालीची भाजी.ह्याच्यात पण खाताना मजा येते. आजोळच्या वाड्याच्या भोंवती फेरफटका मारल्यावर निसर्गाच्या निर्मीतीची अशी मजा चाखता येते कि विचारूं नका.सभोंवती मोठ्या मोठ्या फणसाची झाडं,आजूबाजूला हापूस आंब्याची कलमं,करवंदाच्या झाडांची झुडपं,जांभळांच्या झाडांची उंच उंच रानं,त्यावर टोपोरी गडद जांभळी जांभळं एक दगड मारून टोपलीभर फळं खाली पडायची ती तिथेच उचलून खायाला मजा यायची.पुर्ण पिकलेले जांभूळ खाली पड्ल्यावर नक्कीच थोडी माती चिकटून घ्यायचं पण ती माती हाताने वेगळी करून खाण्याचा हव्यासापुढे पुस्तकी स्वच्छ्तेचे धडे अपुरे पडायचे.जांभळं म्हणे डायबिटीस असणाऱ्या प्रक्रुतीला बरी हे आत्ता आमच्या वाचनांत आलं. फुलांचा विषयच नको. कारण फुलांविषयी किती म्हणून लिहाल? किती तऱ्हेची फुलं कोकणांत असतात म्हणून सांगू?साध्या चाफ्याच्या तरी किती जाती. पांढरा चाफा,सोन चाफा,हिरवा चाफा,पिवळा चाफा,कवटी चाफा,नाग चाफा,नाग चाफयाला तर एव्हडा सुगंधी वास की नको त्या ठिकाणाहून माश्या गोळा होवून फुला भोंवती भूंग्या सारख्या गुंजन करीत रहायच्या.खरं म्हणजे त्यांच्या फुलाभोंवतीच फिरण्याने त्यांच्या पंखाचा आवाज गुंजन कसं वाटायचं. त्यानंतर आणखी फूलं म्हणजे ओवळं,सुरंगी,लाल आबोली,मोगरा वगैरे. ओवळ्याची फूलं वेली वरून जमिनीवर पडतात आणि ती वेचावी लागतात.ओंजळ्भर फूलं हातात घेऊन वास घेतल्यास Elizabeth perfume सुद्धा मागे पडेल. केवड्याच्या फूलाची तर एव्हडी मह्ती आहे की म्हणतात ह्या फूलाच्या झुडपात सापाचं वास्तव्य असतं.ते त्या फुलाच्या वासामुळे की अन्य काही कारण आहे हे मात्र कळलं नाही. रोज संध्याकाळी मग जवळ्च्या डोंगरात फिरायला जायचा कार्यक्र्म असायचा.डोंगर चढून वर गेल्यावर करवंदाच्या झुडपातून करवंदं जमवून खाणं किंवा काजूच्या झुडपातून रंगीबेरंगी बोंडू काढून खाणं आणि काजूची बिया जमवून मग कधीतरी आगीच्या धगीत भाजून आतला काजू काढून खाण्याच्या प्रयत्नात बोटं काळी करून घेणं असे कार्यक्रम असायचे.करवंद खाताना एक एक करवंद उष्टं करून तसं करण्यापुर्वी कोंबडा की कोंबडी असा game खेळायचो.लालबूंद असेल तर कोंबडा नाहीतर कोंबडी असा खेळ असायचा.जो हरेल त्याने, आपल्याकडचं करवंद जिंकणाऱ्याला द्यायचं. करता,करता वेळ आणि दिवस निघून जायचे,आणि आजोळ सोडून परत घरी जायला अगदी जीवावर यायचं.आजी आजोबांच्या डोळ्यात पाणी आलेले पाहून खूप वाईट वाटायचं.जाता जाता ते म्हणायचे " यारे परत पुढ्च्या वर्षी.आम्ही काय आता पिकली पानं" आणि त्याचं पुढ्चं वाक्य ऐकण्या पुर्वी आम्ही कानावर हात ठेवून पळत सुटायचो. श्रीकृष्ण सामंत

वाचने 4237 वाचनखूण प्रतिक्रिया 9

सामंतानु, अगदी आजोळात फिरवून आणल्यात!! आमच्या लहानपनच्या आजोळात घालवलेल्या सुट्टीची आठवण आयली. माझा आजोळ शिरोड्याचा! तेंव्हा तुमचा ह्यां सगळां वर्णन अगदी तो परिसर डोळ्यापुढे उभो करून गेलां! काळोख संपून सुर्योदय होण्यापुर्वी आमची वाट तेरेखोलच्या घाटीची चढण चालू होण्यापर्यंत मजल गाठायची. तेरेखोलच्या घाटीची महती अशी की गोवामुक्ती संग्रामाच्या वेळी ह्याच घाटीतून गोव्याच्या पणजी गावात स्वातंत्र्य सैनीकांच्या एका तुकडीने मजल मारली होती.ही घाटी तिनएक मैलाची असावी. माझ्या मावसआजोबाबरोबर (आजीचो भाव!) ही घाटी अनेकदा पार केलंसंय! तो त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या तुकडीत होतो. तेच्याकडून त्यांनी तेरेखोलचो किल्लो कसो पोर्तुगीजांकडून ताब्यात घेतलो, आणि मग गावाक समजूच्यासाठी ढोल कसे वाजवले याची कथा अनेकवेळा ऐकलसंय! कथेचा शेवटचा वाक्य, "रे मेल्यांनो! आम्ही कधी घाटावर गेलेलो नाय! आमच्यासाठी हीच पावनखिंड!" डोळ्यातली आंसवां टिपून तो सांगी.... सकाळी दहाच्या सुमारास पेज आणि फणसाची भाजी,आणि त्याबरोबर मधूनच खोबऱ्याची कातळी.फणसाची भाजी ही अर्ध्या पिकलेल्या आणि अर्ध्या कच्या फळाची करायची असते.नाहीतर त्याच्या पुर्वी केल्यास अगदी कोवळ्या फणसाची भाजी करतात.त्याला फणसाच्या कुवऱ्याची भाजी म्हणतात.ती पण चवदार लागते. फणसाची भाजी,खोबऱ्याची कातळी,आणि पेज हे कॉंबीनेशन अप्रतीम लागतं.नाहीतर दुसरं म्हणजे पेज आणि वालीची भाजी.ह्याच्यात पण खाताना मजा येते. क्या बात है!! वालीच्या भाज्येचो जवाब नाय! तशी दादर मार्केटांत पण वालीचे पेंडे मिळतत, पण गावाकड्च्या वालीची चव नाय... काजूच्या झुडपातून रंगीबेरंगी बोंडू काढून खाणं आणि काजूची बिया जमवून मग कधीतरी आगीच्या धगीत भाजून आतला काजू काढून खाण्याच्या प्रयत्नात बोटं काळी करून घेणं असे कार्यक्रम असायचे. ऊन चढल्यावर जास्त बोंडु खाल्ल्यावर डोक्या मिरमिरणां आणि काजू बी फोडून काढतांना हाताक चीक लागून फोड येणां याची पण एक वेगळीच मजा होती... आणि जगमां? ती विसरल्यात काय? उर्वरित महाराष्ट्राक जगमां ह्या फळ माहित नसतलां.... (इतरेजनांसाठी माहिती): जगम ह्या करवंदासारख्याच पण लाल फळ असतां. तां जर तसाच खाल्ला तर आंबट-तुरट लागता. पण तेका हाताच्या दोन तळव्यात धरून गोल्-गोल फिरवून मऊ करून घेवंचा मग नंतर खाल्ल्यावर अतिशय मधुर लागतां... शिरोड्या गावाची महती अशी की प्रसिद्ध लेखक आणि ज्ञानपीठ अवॉर्डचे मानकरी वि.स.खांडेकर यांचं हे जन्मस्थळ. सामंतानु, खांडेकर शिरोड्याच्या शाळेत अनेक वर्षां शिक्षक होते. आमचो मामा नेहमी माझ्याकडे फुशारक्या मारी, "रे मेल्या मुंबयकरां, तू माकां मराठी शिकवू नको, मी वि. स. खांडेकरांचो विद्यार्थी आंसय!!" माका वाटतां पण खांडेकरांचो जन्म अन्यत्र आसां, चूभूद्याघ्या... तो पर्यंत मामा मासळी बाजारातून आमच्यासाठी सुरमई,सरंगा आणि कर्ली घेऊन यायचा. मामी थोडे मासे दूपारच्या जेवणासाठी आणि थोडे रात्रीच्या जेवणासाठी ठेवायची. आणि खापी.... आणि बांगडे... आणि तारल्या.... आणि पेडवे (हळदीच्या पानातलां सुक्यां करूक).... हा हन्त हन्त नलिनिं गज उज्जहारः!:( आसो! आमकां आमच्या आजोळाची सफर करून आणल्याबद्दल धन्यवाद!! आपलो, पिवळो डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

डांबीसजी, "जुस्त" हो मालवणी शब्द "उज्जू" वापरल्यात.त्या एका शब्दान मालवणीवर(कोकणीवर) असलेलां तुमचां प्रभुत्व माका थईंच कळला. तुमच्या मावसआजोबाची थरारक गजाल ऐकून तेंचो आदर वाटलो. "पण तेका हाताच्या दोन तळव्यात धरून गोल्-गोल फिरवून मऊ करून घेवंचा मग नंतर खाल्ल्यावर अतिशय मधुर लागतां..." जगमाक मी विसरूक नाय.पण वरचां जां तुम्ही लिहिल्यात तां वाचून माझी आठवण जागी केल्यात. पेड्व्यांचा तिखला तिरफळा घालून खाल्लेलो माझो जीव, पेडवे,खापी,सुंगटा,बुरयाटे,तारल्यो,ह्या माशांचो गातनी मी कसो विसरान.? तुमच्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

यशोधरा 31/08/2008 - 23:33
पिडांकाकांसारख्याच म्हणतय!! थोडे फार तपशील इकडे तिकडे, येवढाच काय तां.. आजोळही देखणा होता आणि पणजोळही.. ३-४ वर्सा तरी जावक गावलेला नाय माका... :(

वा..वा... अतिशय सुंदर आणि मोजक्या शब्दांत मांडलेले वर्णन. कोणालाही हेवा वाटावे असे आजोळ आणि निसर्ग. भाग्यवान आहात. मी अजून गोवा पाहिलेले नाही. पण लवकरच तो योग आणावा लागणार. कथे सोबत माडांचे, पोफळीचे, मासळी बाजाराचे २-३ फोटो टाकले असतेत तर, कथा नववधू सारखी नटली असती. असो.

लिखाळ 01/09/2008 - 21:03
वाचायला मजा आली. छानच वर्णन केले आहे. फोटोंबाबत पेठकरकाकांशी सहमत. --लिखाळ.

नंदन 01/09/2008 - 23:40
तेरेखोल खाडीचा हा धावत्या गाडीतून काढलेला. IndiaTrip2008_Vengurla 019 नीट आला नाही. पण गाडीच्या प्रवासाची दहा-एक मिनिटे मध्ये नदी आणि दोन्ही बाजूला माडाची आणि इतर झाडे, असा सुरेख प्रवास होता. वेंगुर्ल्याजवळच्या एका खेड्याजवळचं चलच्चित्र येथे

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

नंदनजी, साडे दहा हजार मैलावरून हा फोटो पाहून मला सुचलं, "माझिया आजोळी जा ! जा रे ! नंदना माझिया आजोळी जा! देतो तुझ्या सोबतीला मिसळपावातला माझा लेख वाट दाखवायाला तुला माझं त्यातलं वर्णन" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com