Skip to main content

लाल खुरी( भय गुढकथा )

लेखक सत्य धर्म यांनी शुक्रवार, 11/09/2015 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
बजाची पावल आज झपाझप चालली हुती , हातात कुर्हाड, खांद्यावर पोत आन दाव घेऊन त्यो सुसाट चालला हुत्ता.घरी आई आन बायकुची कटकट ऐकुन त्यो रागातच बहिर पडला आणि पांदी वलांडून कवा डोंगराच्या रस्त्याला लागला तेला बिगीर ते कळाल नव्हत. मनातंन त्यो म्हणत हुत , "भूत, खेत कूट असत्यात व्हय ?, च्या मारी या बायकांच्या घरी लाकूड तुकडा नाय आन सकाळ सकाळ लागले बोम्ब्लाया जाऊ नग रानात आज आवस हाय ".आज दावतोच ह्यांना म्हणत राग डोक्यात कालवून त्यो अजून जोरात त्या दगड धोंड्यातन वाट काढत चालू लागला. बजा गरीब घरचा लहानपणी बाप मेलेला आइन कष्टाने संभाळून लहानाचा मोठा केलेला , घरी सदा दुष्काळ काम केल तर खायला मिळणार अशी परिस्थिती अशात त्याच लग्न झालेलं आणि १ पोर पण पदरात होत मग घरी कसा बसल. सदा कष्ट करण त्याच्या नशिबी. गावाजवळच लाल खुरी नावाच्या शिवारात त्याचा बाप खाविसाबर कुस्ती खेळताना मेला हुता अस सारा गाव म्हणत हुता , त्याच्यामुळे त्याची आई आवस ,पुनव असली तर घाबरायची बजाला कुठ बाहीर सोडायची नाय पर आताशा त्यान आईच ऐकण बंद केलत बायका पोराच्या पोटासमुर त्याला भूता, खेताच कायच वाटत नव्हत. तवा तर "सातीअसरा "असल्याला लाल खुरी नावाच्या शिवारात चांगल जळण मिळेल ह्या आशेन आवस असताना पण ह्यो धावत आला हुता . बजाला शिवारात गेल्या गेल्याच कसला तरी उग्र दर्प आल्यासारख वाटल हुत पर त्याकड कानाडोळा करून त्यो वाळकी लाकड कुठ हायती का हे बगत हुता , वातावरणात खिन्न शांतता हुती , कुठ चीठ्पाख्ररु पण दिसत नवत, एक डोक सुन्न करणारा वास जाणवत व्हता पर अशातच बजान चांगली मुळी बांधून डोक्याव घेतली अन मनाशी म्हनाला "परत इथच यायचं कसली आल्यात भूत " ! दिस डोक्यावर आला हुता ,बजाच्या पोटात कावळ वरडायला लागल त्यो बिगी बिगी घराकडं जायला निघाला आन समोरच्या वडावर त्याला चांगली मोठी वाळकी फांदी दिसली त्यो थबकला एवढी फांदी घेऊन घरी जाऊ म्हणून मुळी खाली टाकून वडाकड जायला लागला उग्र वास आता चांगलाच घानायला लागला हुता, कुर्हाड सावरत बाजा झाडावर चढला पर वाळकी फांदी त्याला कुठंच दिसना अन्दाझान त्यो गेला आणि समोर कुर्हाड मारणार त्योच , एक पांढरी फाकट तोंड असल्याली बाय झेपावून बाज्याकडे आली , तिला डोळ नावालाच हुत चेहऱ्यावर नासल्यासारखी कातडी, सुळा ,रक्ताचे दात बघून बजाची बोबडी वळली, तीच नुसता हाडक असल्याल हात लांब लांब वहात त्याच्या गळ्यापर्यंत आल एका मोठ्या किंकाळी बरोबर घोगरा आवाज कानात घुमू लागला ," तुला सोडणार नाय ", डोळ्यापुढे अंधारी आली आन त्याला आईच सकाळच शब्द आठवल, " बजा आज आवस हाय लाल खुरीला जाऊ नगस तिथ सातिआसरा हायत्या . "
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10686
प्रतिक्रिया 46

प्रतिक्रिया

छान

हम्म . छान आहे . पण आसारा पाण्याच्या भोवती असतात कि वो . आणि अश्या नसतात कै . सुंदर असतात दिसायला

साती आसरा दोन प्रकारच्या असतात अस आमच्या गावाकड बोलल जात 1. लेकुरवाळ्या सातिआसरा 2. नाव आठवत नाही पण या चांगल्या नसतात

In reply to by मम्बाजी सर्वज्ञ

७ जलदेवतांचा समूह! काही ठिकाणी या पीडाकारक मानतात तर काही ठिकाणी देवतास्वरूप! अयोग्य वेळी जलाशयाजवळ गेल्यास त्याला झपाटतात असा समज आहे. काही ठिकाणी माणसाला बुडवून मारतात असा समज आहे.

माहिती बद्दल धन्यवाद! सामान्य ज्ञानात वाढ झाली आहे आज!! यांचा त्या 'क्षेत्रपाल' मंदिरांशी काही संबंध असतो का?

In reply to by मम्बाजी सर्वज्ञ

क्षेत्रपाल म्हणजे एखाद्या विशिष्ट भूभागापुरते स्वामित्व असलेला निम्नस्तरीय देव होय. बस इतकीच माहिती आहे. पण ७ आसरांचा त्याच्याशी काही संबंध असेल वाटत नाही. तुम्हाला काही माहिती असेल तर द्या कृपया. आवडेल. माझ्या मते बरेचशा गावातले भैरोबा हे क्षेत्रपाल कॅटॅगरीतच येतात. त्यांचा मूळ कालभैरवाशी संबंध वाटत नाही.

In reply to by मांत्रिक

मला फार माहिती नाही पण कोथरूड मध्ये राहत असताना घरामागे एक क्षेत्रपालाचे मंदिर होते आणि दर शनिवारी कोंबडी किवा तत्सम बळी ठेवला जात असे आजू बाजूच्या लोकांकडून एवढं आठवतंय. गम्मत म्हणजे सोसायटीतल्या निम्म्या लोकांचे मत होते कि क्षेत्रपाल मंदिर घराजवळ असणे हे चांगले लक्षण आणि निम्म्यांचे म्हणणे एकदम उलटे. काही वर्षांनी कुणी तरी बिल्डींग जुन्या स्मशानाच्या जमिनीवर असल्याचा शोध लावला आणि त्या मंदिराचा मुद्दा अजूनच पेटला, इतका कि काही रहिवाशांना चित्र विचित्र भास होऊ लागले (अर्थात वादातीत). बर्याच दिवसांनी तुमची गोष्ट वाचल्यावर ते किस्से आठवले. धन्यवाद! आणि हो...गोष्ट झकास जमली आहे!

In reply to by मम्बाजी सर्वज्ञ

क्षेत्रपाल नक्कीच दुष्ट देवता नाहीत. त्यांना भैरोबाच्या समकक्ष मानले जाते. हां, त्यांना सामिष नैवेद्य दिला जातो हे खरे, पण ते त्या क्षेत्रात राहणार्यांचे रक्षण करतात असेच मानले जाते. क्षेत्रपालांचे एक प्राचीन स्तोत्रदेखील आहे माझ्याजवळ. त्यातून त्यांच्या रूद्ररूपाचा बोध होतो.

कथा आवडली

कथा चांगलीय फ़क्त थोड़ी अजुन फुलवा.... घाबरता घाबरता कथा संपली. अस नका होउ देऊ. पुढिल लिखाणास शुभेच्छा

कथा आवडली. पण अजुन थोड़ वर्णन असत तर अजुन मजा आली असती

In reply to by ज्योति अळवणी

+१

"आसरा" कथा "कासरा"भर मोठी नव्हती. पुलेशु

छान

भय कथा छान लिहिली आहे.

In reply to by भीमराव

विठ्ठल = वैष्णव देवता, विष्णुचा अवतार, परब्रह्माचे रूप, निर्गुण ब्रह्म! क्षेत्रपाल = एका विशिष्ट भूभागाची देवता, केवळ संरक्षण हाच हेतू, उपासना मुक्तीप्रद नाही, संतांच्या मांदियाळीत स्थान नाही! तुम्हाला काही वेगळी माहिती असेल तर द्या कृपया! जाणून घ्यायला आवडेल! माझी माहिती अपुरी असू शकते, अंतिम नाही! हे ध्यानात घ्यावे.

In reply to by मांत्रिक

क्षेत्रपाल ही कथित देवता हिंदु व जैन तत्वज्ञानात तसेच राजस्थानी समाजात एका मर्यादित भूक्षेत्राची देवता मानली जाते. निर्गुण निराकार परब्रह्म विठ्ठलास त्या पातळीवर ओढू नये ही विनंती. आपला काही अन्य हेतू असल्यास माझा तरी पास!!! मला त्यात रस नाही. हा विषय माझ्यासाठी तरी इथेच संपतो.

In reply to by मांत्रिक

चारी वाचा कुंठित जाली सोहम ज्योती उभारिली अनुहत घंटा श्रवणी ऐकुनी विस्मित जाली जनी - संत जनाबाई. प्रत्येक अध्यात्म उपासकाला साधना मार्गात ऐकू येणारे हे अनाहत नाद = अनबीटन साऊंड! कुणाला बासरीनाद, कुणाला ढोल, कुणाला मेघांचा गडगडाट, कुणाला शंखनाद, कुणाला किणकिण-छुमछुम(शाक्त लोक), कुणाला घंटारव असे प्रकार संतांनी सांगितले आहेत. तुम्हाला विश्वास असो वा नसो, त्याबाबत विवेचन आढळून येते. असो.

मला वाटलेलं वेणु म्हणजे बासरी असावी, अन हेतु बितु काय नाही मि मनामधली नुसती शंका विचारत होतो, वाद उत्पन्न करने हा आमचा प्रांत नव्हे.

In reply to by भीमराव

वेणु म्हणजे बासरीच भाऊ! आणि तुम्ही वाद करताय असं मी म्हटलं नाही. मला वाटलं कदाचित तुम्ही विठ्ठलास उगाच लोकदेवतेच्या पातळीवर आणताय. राग नक्कीच नाही. उलट कुणीतरी विचारणा करतंय याचा आनंदच आहे. कदाचित काल कुणीतरी भक्तश्रेष्ठ मीरेला स्किझोफ्रेनिक ठरवलं, म्हणून त्याची डिफेन्सिव्ह पोझिशन दिसली असेल तुम्हाला माझ्या प्रतिसादात. त्याबद्दल क्षमस्व!!!

अहो गाव वाले मांत्रिक बुवा अगदी क्षमस्व ची अपेक्षा ठेऊन बोललो नवतो, माझी बाजु स्पष्ट करत होतो. तुमचा मोठेपना आहे की ती तुम्ही समजुन घेतली.

पण ग्रामीण लिखाण खुपच वेगळ्या प्रकारच होत असो प्रयत्न छान

सातारी भाषा वापरण्याचा प्रयत्न केला आहे .

सत्यधर्मभो्ई भाषा सातार्‍यापेक्षा कोल्लापुरला जवळच्ची वाटतीया. असो. कथाबीज चांगले आहे मात्र थोडेसे लिखाणाबद्दल-
बजाची पावल आज झपाझप चालली हुती , हातात कुर्हाड, खांद्यावर पोत आन दाव घेऊन त्यो सुसाट चालला हुत्ता
या वाक्यातील "पावल" "पोत " आणि "दाव" हे शब्द लिहीताना पावलं , पोतं आणि दावं असे लिहावेत अन्यथा अनर्थ होतो. पावल = हा शब्द पावंल म्हणजे पावेल असाही वाचला जातो पोत हा शब्द कापडाचा पोत या अर्थाने वाचला जाउ शकतो. दाव = दाखव या अर्थाने वाचला जाउ शकतो.

व्याकरण कच्च आहे सुधारायचा प्रयत्न करेन ..