Skip to main content

मांझी- द माऊण्टन मॅन

मांझी- द माऊण्टन मॅन

Published on 22/08/2015 - 20:28 प्रकाशित मुखपृष्ठ
बर्याच दिवसानंतर चित्रपट गृहात एखादा चित्रपट पाहण्याचा योग आला. आणि खूप दिवसांनी एक दर्जेदार चित्रपट पाहिल्याचे समाधान देखील मिळाले. चित्रपट होता मांझी- द माऊण्टन मॅन Manzi चित्रपट सुरु होतो.. आणि पहिल्या मिनटालाच कळते कि हि एका गरीब माणसाची आणि अजस्त्र अश्या डोंगराची लढाई आहे. १९६० च्या आसपास या बिहार मधील गेहेलोर गावामध्ये दशरथ मांझी नावाचा एक युवक एका डोंगराशी एकटा लढू लागतो. ते हि फक्त हातोडी आणि छनी च्या सहाय्याने. असे काय घडलेले असते कि हा युवक त्या डोंगराला संपवण्यासाठी पेटून उठतो... या प्रश्नाचे उत्तर पुढच्या २ तासात कळते.. १९६० चा काळ. स्वातंत्र्य मिळून १३ वर्षे झाली तरी सर्व समस्या जसे कि अस्पृश्यता, गरिबी, वेठबिगारी, बालविवाह सावकारी इ हे जशे च्या तसे होते. दशरथ मांझी च्या वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतलेले असते पण कर्ज फेडण्यासाठी पैसे नसल्यामुळे तो आपल्या मुलाला म्हणजेच दशरथ ला सावकाराकडे चाकरी करण्यासाठी ठेवण्याचा प्रयत्न करतो.. परंतु दशरथ तिथून पळ काढतो व तो परततो ते थेट २० वर्षानंतर. परत आल्यावर बरेच काही बदलेले असते. मुख्य म्हणजे सरकारने अस्पृश्यता विरोधी कायदा केलेला असतो. आणि "सब बराबर" चा नारा घुमत असतो. परंतु दशरथ ला लवकर च समजते कि समाज अजून देखील तसाच आहे. प्रत्यक्षात काहीच बदललेले नाहीये. आणि याच दरम्यान दशरथ ची पहिली भेट होते फगुनिया शी ... फागुनिया हि तीच असते जिच्याबरोबर लहानपणी दशरथ चा विवाह झालेला असतो. दशरथ गावी आल्यानंतर काही कामधंदा करत नसल्यामुळे फागुनिया च्या घरून त्यांचा लग्नाला विरोध होतो. परंतु दोघेही नंतर पळून जाउन आपला संसार सुरु करतात. चित्रपटात या दोघांचे चोरून भेटणे, एकमेकांना गिफ्ट देणे, जत्रेमध्ये फिरणे हे सारे प्रसंग खूपच छान जमले आहेत. त्यांच्या लव स्टोरी मध्ये कोणताही प्रकारे अवास्तव गोष्टी किंवा फालतू गाणी (ज्यामध्ये हिरो हिरोईन आणि मागे २०-३० जण नाचत आहेत) नाहीयेत. थोडक्यात टिपिकल बॉलीवूड लव स्टोरी दाखवून फुटकळ टाईमपास केलेला नाहीये. जे काही आहे ते एकदम रीअलिस्टिक वाटते. लवकरच दशरथ आणि फागुनिया ला एक मुलगा होतो. दशरथ आता आपल्या गावातून डोंगरापलीकडे असलेल्या गावात काम करण्यासाठी जात असतो. कामावर गेलेल्या पतीला दुपारचे जेवण घेऊन फागुनिया डोंगर चढून जात असताना तिचा पाय घसरतो, आणि ती खाली पडते. तिच्या पोटात त्यावेळी त्यांचे दुसरे अपत्य असते. तिला ताबड्तोक हॉस्पिटल मध्ये हलवणे गरजेचे असते. अश्यावेळी दशरथ आणि त्याचा साथीदार तिला कडेवर घेऊन डोंगर चढून वजीरगंज या गावी हॉस्पिटल मध्ये नेतात. फागुनिया च्या पोटातील मुलगी वाचते. परंतु फागुनिया ला मात्र डॉक्टर वाचवू शकत नाहीत. आपल्या पत्नी डोंगर चढत असताना पडली व याच डोंगरामुळे वेळेवर दवाखान्यात आणता आले नाही म्हणून तिचा जीव गेला. जर त्या डोंगरातून येण्याजाण्यासाठी जर रस्ता असता तर कदाचित आज आपली पत्नी जिवंत असती असा विचार मांझी च्या मनात येतो.. आणि तो तिचेच मनाशी ठाम निश्चय करतो कि या डोंगराला फोडून तो त्यामध्ये येण्या जाण्यासाठी रस्ता बनवेल. डोंगरातून रस्ता बनवायचा आहे या एकाच ध्येयाने झपाटलेल्या दशरथ मांझी चा पूर्ण प्रवास थक्क करणारा आहे. गावातील इतर लोक त्याची खूप चेष्टा करतातपरंतु तो कोणाकडेही लक्ष देत नाही, त्याचे ध्येय ठरलेले असते. आणि तो आपल्याच स्वप्नात जगात असतो. गावामध्ये भयानक दुष्काळ पडल्यावर सगळे गावकरी शहराकडे जातात. पण दशरथ पोटापाण्याची पर्व न करता डोंगर आणि त्याची लढाई सुरु च ठेवतो. चित्रपटात १-२ मिनिटासाठी येणाऱ्या इंदिरा गांधी आणि त्यांचा गरिबी हटाव चा नारा पण खूप छान जमला आहे. त्याच्याच गावातील सरपंच व इतर मंडळी त्याचे नाव पुढे करून मिळालेली सरकारी मदत देखील हडप करतात. त्याने फोडलेली दगडे परस्पर नेउन त्यातून पैसे कमावतात. हे सगळे पाहताना आपल्याला भ्रष्ट प्रशासन व्यवस्थेची चीड आल्याशिवाय राहत नाही..!! शेवटी वनविभाग चे अधिकारी देखील त्याला पत्थर माफिया असा आरोप करून जेल मध्ये घालतात. परंतु या सगळ्याशी लढताना दशरथ ची स्वप्ने आणि त्याच्या कष्टांचा च विजय होतो. आपल्याला मिळालेले सरकारी पैसे दुसरेच कोणी तरी हडप केले याबाबत तक्रार करण्यासाठी दशरथ बिहार ते दिल्ली जाण्यसाठी निघतो. पण इंदिरा गांधी आणि त्याची भेट काही होत नाही. रेल्वे च्या तिकिटासाठी चे पैसे नसल्यामुळे १३०० किमी चे अंतर तो पायी च चालत जातो. यावेळी चित्रित केलेले "ओ राही" हे गाणे देखील छान जमलेय. चित्रपट कोठेही रेंगाळत नाही. कोणतीही अनावश्यक गोष्ट या चित्रपटात नाहीये. जसे कि आयटम सॉंग किंवा प्रसंग नसताना मुद्दामहून घडवून आणलेले विनोद इ. नावाजुद्दिन सिद्दिकी ने दशरथ ची भूमिका उत्तमपणे निभावली आहे. दशरथ चा "शानदार जबरजस्त जिंदाबाद" हा डायलॉग लक्षात राहतो.. राधिका आपटे ने देखील फागुनिया ची भूमिका उत्तमपणे हाताळली आहे. चित्रपटात अधून मधून एन्ट्री घेणारा अलोक झा नावाचा पत्रकार देखील लक्षात राहतो. दशरथ चा तारुण्यापासून ते वार्धक्यापार्याचा प्रवास या चित्रपटात असल्यामुळे मेक अप अर्टिस्ट समोर खूप मोठे आव्हान होते. पण त्याने ते उत्तम रित्या पेलले आहे. असा हा मांझी द माऊण्टन मैन हा चित्रपट नक्कीच आवर्जून पाहण्यासारखा आहे. परंतु हा चित्रपट व्यावसाईक श्रेणी मधला (ज्यामध्ये फुटकळ कथा, २-४ प्रणय दृश्ये, आयटम सॉंग, स्फोटात २०-३० फूट उडणार्या गाड्या, एक्शन च्या नावाखाली बेदम हाणामारी) नसल्यामुळे बॉक्स ऑफिस वर कोटीच्या कोटी उड्डाणे घेईल असे वाटत नाही. परंतु मला तरी हा चित्रपट एकदम शानदार जबरजस्त आणि जिंदाबाद असा वाटला. रेटिंग - ****
लेखनप्रकार

याद्या 10566
प्रतिक्रिया 60

In reply to by धनावडे

लोक येव्हढ्याश्या मोबाईल वर कसे काय सिनेमा पाहतात कोण जाणे. आमच्याही ऑफिसात आठ-दहा जणांनी मोबाईलवर पाह्यलाय. आपल्यालातर बाबा थेट्रात अंधारात शिणेमा बगायला जी मजा येते त्याची मजा कश्यात न्हाय. अन आजकाल तर तंत्रामूळे फोटोग्राफी ध्वनी इ. अप्रतिम असते. चोखंदळपणे निवडक सिनेमे मज्जा येते. हा सिनेमापण थेट्रात बघणार. मागच्याच आठवड्यात डबलसीट पाह्यला. सुरेखच आहे.

In reply to by चौथा कोनाडा

फोन स्मार्ट टिव्हीला पेअर करून चित्रपट त्यावरून पाहत असावेत. आम्ही युट्युबचे व्हिडिओज याच प्रकारे टिव्हीवर पाहतो. फोन / लॅपटॉपवर व्हिडीओ सर्च करणे टिव्हीवरच्या युट्युब अ‍ॅपपेक्षा सोपे जाते.

In reply to by श्रीरंग_जोशी

हम्म ..... आता मोबाईल टीव्हीला पेअर करुन वीस-बावीस अथवा त्यापेक्षाही मोठ्या स्क्रीन वर पहात असतील तर ठीक आहे. पण, मोबाईलच्या चार/साडेचार/पाच इंची स्क्रीन वर पहायचा म्हंजे हद्दच झाली. बरेच "महा"भाग अश्या प्रकारे लेटेस्ट सिनेमे पहात असतात.

In reply to by श्रीरंग_जोशी

मी नाही पाहत कोणता सिनेमा मोबाइल वर जो पर्यत तो सिनेमागृहात असतो किंवा टि.व्ही वर officially release होत नाही तो पर्यत.

In reply to by चौथा कोनाडा

प्रदर्शित होण्याआधी दोन आठवडे हा चित्रपट अंतरजालावर लिक झाला होता. फारच नुकसान झाले असेल बिचार्या निर्मात्याचे. :(

In reply to by असंका

आज काल परीक्षणाच्या नावावर सगळी कथाच सांगतायत लोकं...

In reply to by बहिरुपी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चित्रपट परीक्षण लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता त्यामुळे कदाचित असे झाले असेल. पुढच्या वेळी काळजी घेतली जाइल .

In reply to by माझीही शॅम्पेन

बास कि राव आता...!!!! प्रत्येक जन येउन एकाच सुरातील प्रतिसाद काय देताय.???? सांगितले ना इथे कि पहिले चित्रपट परीक्षण आहे.. त्यामुळे थोडी मिष्टेक हू शकते..!!

In reply to by बाप्पू

तसाही हा चित्रपट सत्यकथेवर आधारीत आहे. गेल्या काही वर्षांत माध्यमांतून प्रत्यक्षातल्या कथेला भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. तसाही हा काही रहस्यपटही नाहीच. प्रत्यक्षातल्या कथानायकाबाबत काहीच ठाऊक नसणार्‍यांचा हे परीक्षण वाचल्यामुळे किंचित रसभंग चित्रपट पाहताना होऊ शकतो.

चित्रपट चांगला असणार यात शंका नाही. नवाजुद्दिन सिद्दीकी व राधिका आपटे हे दोघेही कलाकार अभिनयाबाबत प्रसिद्ध आहेतच. पटकथा हा या चित्रपटाचा स्ट्रॉन्ग पॉईंट असायला हवा. त्याबाबत भाष्य असते तर परीक्षण अजून आवडले असते. पुलेशु.

In reply to by प्यारे१

चित्रपटाची ओळख आवडली ! :) राधिका आपटे च्या अभिनयाबद्दल प्रसिद्ध चित्रपट समजेल काय???? हॅहॅहॅ... मला वाटतं एप्रिल महिन्याच्या आसपास आपटे बाईंची नग्न क्लिप कायअप्पावर व्हायरल झाल्यावर "अभिनयाबद्दल " ? बद्धल बरीच चर्चा झाली... ;) अनुराग कश्यप लै वैतागला व्हता त्या झालेल्या प्रकाराने...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Nancy Ajram - Ah We Noss / نانسى عجرم - آه ونص

In reply to by प्यारे१

शोर इन द सिटी, रक्तचरित्र आणि सध्या तूनळीवर गाजणारा सुजाॅय घोष दिग्दर्शित अहिल्या. हा १५ मिनिटांचा छोटा चित्रपट आहे पण जबरदस्त आहे. झालंच तर तिने लय भारी मध्येही चांगलं काम केलंय.

In reply to by प्यारे१

;) (बादवे एक अति अवांतर : कोणी "ह.घ्या." म्हणाले की मला लहान मुलांच्या हगीज डायपरची आठवण होते.. का कै म्हैत पण बाके समझणे वाले कू इशारा कापी है.. ;) )

In reply to by प्यारे१

मी फक्त 'अभिनयाबद्दल प्रसिद्ध' इतकेच म्हटले आहे. त्याआधी 'चांगल्या वा वाईट' हे म्हटलेले नाही. :-)

परिक्षण आवडले. चित्रपट बघणार नाही. इतके कष्ट आणि राजकारण बघवणार नाही. माझा नवरा मात्र राधिका आपटेसाठी (म्हणजे तिच्या अभिनयासाठी) हा शिनेमा बघेल असे वाटते. ;)

For people like me, who has very good resources to spend, lacks jigar like this Manzi fellow. Actual role model of statement of Mahatma. "Be the change" in world, you would like to see.-Mahatma Gandhi

चित्रपटासारखंच आहे. नो नाॅन्सेन्स. मी चंदीगडला पाहिला हा चित्रपट. तिथे थिएटर पूर्ण भरलं होतं आणि प्रेक्षकांना आवडला असं वाटलं. नवाजुद्दीनला टाळ्या मिळताना पाहून बरं वाटलं.

छान परिक्षण लिहिले आहे ! लेखन आवडले ! परिक्षण वाचुन सिनेमा पहायची उत्सुकता वाढलीय. बघणार हा सिनेमा. भवानी भिवई, रंगरसिया सारखे हटके सिनेमा दिग्दर्शित करणारा एफटीआयआयचा विद्यार्थी असणारा केतन मेहता सारखा कप्तान असल्यावर असा सिनेमा म्हणजे हटकेच असणार !

In reply to by चौथा कोनाडा

एफटीआयआयचा विद्यार्थी असणारा केतन मेहता
अजून विद्यार्थी म्हणून हाय काय तितेच? पास नै झाला काय ? नै म्हन्जे बरंच ऐकलंय म्हणून आपला (निरागस) प्रश्न.. :) बाकी ह.घ्या. हं..!!

In reply to by चौथा कोनाडा

माया मेमसाब, ओ डार्लिंग ये है इंडिया, आर या पार आणि १८५७: द रायझिंग असे एकापेक्षा एक भयाण चित्रपटही दिले आहेत. पण मांझी देऊन ही आधीची पापं अंशतः फेडली आहेत असं म्हणू शकतो.

नवाजुद्दीनला मी सर्वप्रथम ब्लॅक फ्रायडेमधे पाहीलं ... त्यावेळी वाटलं न्हवत त्याच्या नावावर प्रेक्षक येतील इतकी मोठी मजल हा अभिनेता मारेल. मस्त माणूस आहे राव. चित्रपट मात्र बघणार नाही.

छान. बाकी दोन आठवड्यांपूर्वीच हा चित्रपट टोरेन्टवर आला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच आंतरजालावर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध झाला याबद्दल आश्चर्य वाटते.

छान परीक्षण. चित्रपट व नवाजुद्दीनचा अभिनय आवडला. 'मांझी' बघताना 'कुण्या एकाची धरणगाथा'तील श्री. गोपाळ मोरे यांनी धरणासाठी दिलेला एकाकी लढा डोळ्यासमोर आला. दोन्हीही सत्यकथा, तीच जिद्द, तीच प्रतिकुल परिस्थिती, दिर्घकाळ संघर्ष, इंदिरा गांधींची भेट, प्रकल्पाला मान्यता, सगळे स्व्प्नवत, पुढे सरकारी अडथळे, स्वप्न पुरे होते परंतु..... मराठीत एका गरीब घरात जन्मलेल्या चौथीपर्यंत शिकलेल्या श्री. गोपाळ मोरेंनी धरणासाठी एकाकी लढा दिलाच,परंतू धरणासाठी केलेला अभ्यास व आत्मविश्वास एखाद्या अभियंत्याला लाजवेल असा होता.

In reply to by मार्मिक गोडसे

समयोचित संदर्भ दिलात मागो. भुभाग कोणताही असो, काही लढाया सगळीकडे थोड्या फार फरकाने सारख्या असतात. या ही वीराची कहाणी पुढे यायला हवी. वाचायला हवे पुस्तक ! मागे ही कुणाकडुन तरी श्री. गोपाळ मोरे यांच्या बद्दल ऐकल्याचे पुसटसे स्मरतेय.

In reply to by चौथा कोनाडा

धन्यवाद चौको. समकालीन प्रकाशनाचे, अभिमन्यू सुर्यवंशी लिखीत, 'कुण्या एकाची धरणगाथा' बुक गंगावर उपलब्ध आहे.
या ही वीराची कहाणी पुढे यायला हवी.
सहमत.

In reply to by मार्मिक गोडसे

तपशिलासाठी धन्यु, मागो ! [[ जाताजाता: महाराष्ट्रात देखील मांझी सारख्या माणसाबद्दल (भापकर ? ) काही वर्षांपुर्वी वृत्तपत्रातुन वाचल्याचे पुसटसे आठवतेय. याही माणसाने डोंगर खोदुन रस्ता केला होता. कुणी याचे संदर्भ सांगु शकेल इथे ? ]]

In reply to by मार्मिक गोडसे

मागो, मानाचा मुजरा तुम्हाला ! बरेच दिवस ही माहिती शोधत होतो, नेटवर देखिल सर्च मध्ये मिळाली नाही. तुम्ही बरोब्बर शोधुन लिंक दिलीत. धन्यवाद ! तुम्ही दिलेल्या लिंकनुसार भापकर गुरुजींची कहाणी सुद्धा थरारक प्रेरणादायी आहे ! खरे तर महाराष्ट्र शासनाच्या रस्ते महामंडळाने भापकर गुरुजीनाच ब्रॅन्ड यॅम्बासिडर केले पाहिजे ! त्याना

In reply to by चौथा कोनाडा

भापकर गुरूजिंचीच एक यू ट्यूब ची लिंक आणि एक मिसळपाव वरचा एका वर्षा आधीचा लेख : https://www.youtube.com/watch?v=uaK9xoF5VZA http://www.misalpav.com/node/28219

In reply to by नाव आडनाव

धन्यु, नाव आडनाव ! छान लिंक्स दिल्यात ! आयुर्हित यांचा भापकर गुरुजी , जांभळाच्या बिया अन जलसंधारण हा लेख भन्नाट आहे. भापकर गुरुजींसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल वाचल्यावर नत मस्तक व्हायला होते.

In reply to by चौथा कोनाडा

नगर जिल्ह्यातील श्री.भापकर गुरुजींनी अव्याहतपणे गेली ४० वर्षे खपून, पदरमोड करुन व कोणतीही सरकारी मदत न घेता त्यांच्या नगरजवळील गावापासुन पुण्यापर्यंतचा रस्ता बांधला, निव्रूत्त् झाल्यावर मिळालेला आपला प्रॉव्हिडंट फंडसुद्धा त्यांनी ह्याकामी वापरला. ह्याच आठवड्यात त्यांच्यावर एक लघुपट एका मराठी वाहिनीवर मी पाहिला.

In reply to by चौथा कोनाडा

नगर जिल्ह्यातील श्री.भापकर गुरुजींनी अव्याहतपणे गेली ४० वर्षे खपून, पदरमोड करुन व कोणतीही सरकारी मदत न घेता त्यांच्या नगरजवळील गावापासुन पुण्यापर्यंतचा रस्ता बांधला, निव्रूत्त् झाल्यावर मिळालेला आपला प्रॉव्हिडंट फंडसुद्धा त्यांनी ह्याकामी वापरला. ह्याच आठवड्यात त्यांच्यावर एक लघुपट एका मराठी वाहिनीवर मी पाहिला.

चित्रपट पाहिला. खरच खूप सुंदर चित्रपट. कुठलाही प्रसंग ओढूनताणून घातलाय असं वाटत नाही. जी काही गाणी आहेत ती प्रसंगांना अनुरूप आहेत.