Skip to main content

" शोले " चित्रपटाला ४० वर्ष झाल्याच्या निमित्ताने ..

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 15/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑगस्ट १९७५ - १५ ऑगस्ट २०१५ .. शोले चित्रपटाला ४० वर्षे झाल्याच्या निमित्ताने एक जुना पूर्वप्रकाशित लेख ईथे प्रकाशित करतोय. शोलेच्या मानाने लेख साधासाच आणि छोटासाच आहे, पण त्या निमित्ताने सर्वांच्या शोलेच्या आठवणी ताज्या झाल्या तर उत्तमच :) ................ ................ "तू अजून शोले नाही पाहिलास...???" मी जवळजवळ किंचाळलोच. जेव्हा कोणी शोले न पाहिलेला भेटतो तेव्हा माझी हीच प्रतिक्रिया असते. माझी कशाला, ज्याने ज्याने शोले पाहिला आहे, या चित्रपटावर भरभरून प्रेम केले आहे त्याची उत्स्फुर्त प्रतिक्रिया अशीच काहीशी असावी. समोरच्याला जेवढ्या केविलवाण्या नजरेने बघता येईल तेवढे नजरेत सहानुभुतीमिश्रित तुच्छतेचे भाव आणायचा मी प्रयत्न करतो. जर ते आणण्यासाठी अभिनयक्षमता कमी पडली तर असाच किंचाळतो. पण आता तर समोर खुद्द माझीच बायको होती. माझ्या बायकोने शोले बघितलेला नसणे हे मला माझेच कमीपण वाटू लागले. असे कसे मी कोणत्याही मुलीशी लग्न केले जिने आजवर शोले पाहिला नाही. छ्या.. माझा प्रेमविवाह नसता आणि अरेंज मॅरेज असते तर मी कांदेपोहे खाताखाता हाच प्रश्न विचारला असता कि, कितने आदमी थे.. म्हणजे.. आपलं.. कितनी बार शोले देखा है..?? आणि याचे उत्तर तीन पेक्षा कमी आले असते तर मुलगी तिथेच नापास.. एकवेळ एकदाही शोले न बघितलेल्या मुलीला मी निदान दया तरी दाखवली असती पण जिने एकदा पाहिला आणि परत बघावासा वाटला नाही तिची आणि माझी पत्रिका न बघताही आमचा एकही गुण जुळणार नाही याची मला खात्रीच होती. "नाही बघितला शोले, त्यात काय एवढे?" बायकोच्या या उलटहल्ल्याने मी भानावर आलो. "त्यात काय एवढे? त्यात काय एवढे?? अरे शोले म्हणजे.. तू अजून शोले नाही पाहिला म्हणजे... अगं म्हणजे तू..." छ्या.. आयत्यावेळी शब्दच सुचत नव्हते. तिने शोले पाहिला नाही म्हणजे तिच्या आयुष्यात काहीतरी करायचे राहून गेले आहे असे मला जे वाटत होते त्या भावना तिच्यापर्यंत कश्या पोहोचवाव्यात हेच समजत नव्हते. बायको मला त्याच अवस्थेतच सोडून निघून गेली आणि मी स्वताशीच विचार करू लागलो... जो मला वीस-बावीस वर्षे मागे भूतकाळात घेऊन गेला.. मी तेव्हा तिसरी की चौथीत असावो. आजसारखे सतराशे साठ चॅनेल किंवा किंवा केबल टी.वी.चा जमाना नव्हता. आमच्या घरात तर ब्लॅक अ‍ॅंड व्हाइट टी.वी. वरच समाधान मानावे लागत होते. मामाकडे मात्र कलर टी.वी. आणि व्ही.सी.आर. देखील होता. त्यामुळे सुट्ट्या पडल्या की माझा मुक्काम मामाकडे ठरलेलाच असायचा. दहा रुपये भाड्याने विडीओ कॅसेट आणायच्या आणि दुसर्‍या दिवशी परत करायच्या. एखादा सिनेमा आवडलाच तर तो त्याच दिवशी दोनदाही बघितला जायचा. काय कसा माहीत नाही मला तेव्हा मिथुन चक्रवर्ती फार आवडायचा. आता तुम्ही लगेच माझ्याकडे अश्या विचित्र नजरेने बघू नका. असते एकेकाची आवड. मधल्या काळात मिथुनने केलेले "बी ग्रेड" सिनेमे पाहिलेल्यांना कदाचित माझी ही आवड पटणार नाही पण तेव्हा मिथुन म्हणजे डिस्कोडान्सर हे समीकरण माझ्या डोक्यात फिट् होते. तर माझ्या मामाकडचे सारे जण, ज्यात माझ्या वयाचा कोणीच नव्हता ते अमिताभ बच्चनचे चाहते होते. ताडमाड अंगकाठी असलेला हिरो ज्याला मिथुनसारखे कंबर मटकवत नाचता येत नाही तो कसा काय लोकांना आवडतो हे मला काही समजायचे नाही. त्यामुळे मला चिडवायला म्हणून मिथुन विरुद्ध अमिताभ हा वाद सारखा चालूच असायचा. आणि अश्यातच, एक दिवस शोलेची कॅसेट आणली गेली. दरवेळी रात्रीचे जेवण आटोपून साडेनऊ-दहाला लागणारा चित्रपट मध्यांतराला पोहोचेपर्यंत माझी बत्ती गुल झालेली असायची पण अपवाद तीनसाडेतीन तासांच्या शोलेचा.. सुरुवातीचे घोड्यांवरून ट्रेनच्या पाठलागाचे दॄष्य आणि दरोडेखोरांच्या चित्रपटाला साजेशी बॅकग्राऊंड थीम, बघता बघता मला त्यातील वातावरणाशी एकरूप करून गेली. पुढचा सारा वेळ मी सुद्धा रामगड का रहिवासी बनून त्यांच्याच विश्वात हरवून गेलो. खरे सांगायचे तर मी तेव्हा त्यात काय पाहिले आणि मला काय आवडले हे आता मलाही आठवत नाही पण मध्यरात्री एक-दीड वाजता तो चित्रपट संपल्यावर मी पुन्हा एकदा लावा म्हणून असा काही दंगा घातला होता म्हणे, की घरचे अजूनही आठवण काढतात. कोणत्याही कलाकृतीला मी वन्समोअर म्हणून दिलेली माझ्या आयुष्यातील ती पहिलीच दाद असावी. त्या वयातही मला अस्सल कलेची जाण होती हे बघून आजही मला अभिमानाने गहिवरून येते. पुढच्या चार दिवसात मी घरच्याच टीवी व्हीसीआरचा फायदा उचलत आणखी पाच-सहा वेळा शोले पाहिला. आणि माझ्या बरोबरीने इच्छा असो वा नसो, घरच्या सर्वांनाही तो बघावा लागला. त्यानंतर पुढच्या काही वर्षांत तो कितीवेळा आणि कुठेकुठे पाहिला याची गिणती नसावी. अ‍ॅक्शन-कॉमेडी-रोमान्स-संगीत हिंदी चित्रपटाच्या प्रत्येक पैलूवर खरा उतरलेला चित्रपट, प्रत्येक वयोगटाला त्यात काही ना काही आवडीचे सापडेलच असा पण बायकोला नेमके काय सांगू हे मला अजूनही समजत नव्हते. लहाणपणी मी जेव्हा जेव्हा शोले बघायचो तेव्हा घोड्यावरून डाकू आले की मी उत्स्फुर्तपणे उठून उभा राहायचो, अमिताभ बच्चनचा जय काही तेव्हा माझ्या फारसा आवडीचा नव्हता पण वीरू आणि बसंतीची बोलबच्चनगिरी मात्र करमणून करून जायची. अमजदभाई हे तर माझ्यासाठी हिरो होते त्या चित्रपटाचे. सर्वप्रथम माझे कोणाचे संवाद पाठ झाले असतील तर ते गब्बरसिंगचे. जगदीपचा सुरमा भोपाली, केष्टो मुखर्जीचा हरीराम न्हाई आणि असरानीचा अंग्रेजोके जमानेका जेलर तेव्हाही तेवढेच हसवून जायचे जेवढे आज हसवतात. जसे लहाणपणी आपण घर घर खेळायचो तसे शोले शोले खेळल्याचे आठवतेय. मित्राबरोबर साईड सीट असलेल्या स्कूटरवर बसून स्वताला जय वीरू समजून गाणे गायचे, हातात पट्टा घेऊन गब्बरसिंगचे डायलॉग मारायचे, अगदी हात शर्टाच्या आत लपवून ठाकूर बनण्यातही एक मजा होती. शोलेमधील माझ्यासाठी सर्वात कंटाळवाणे कॅरेक्टर होते ते जया बच्चनचे. ते तसेच असणे का गरजेचे होते हे समजण्यासाठी मला जरा वयात यावे लागले.. आणि तोपर्यंत मला अमिताभही आवडू लागला होता.. त्यानंतर शोले बघण्यात एक वेगळीच मजा येऊ लागली. अमिताभचे खोचक डायलॉग आता खुसखुशीत वाटू लागले होते. "तुम्हारा नाम क्या है बसंती"ला सारे जण का हसायचे हे समजू लागले. यारी दोस्ती सबकुछ वाटायचे ते वय, "मेरी जीत तेरी जीत, तेरी हार मेरी हार.." असे गात ये दोस्ती हम नही तोडेंगे चे वचन देणारी जयवीरूची जोडी आपली वाटू लागली. शेवटी अमिताभ गेल्यानंतरचे दु:ख ही नकळत धर्मेंद्रच्या जागी स्वताला ठेऊन अनुभवले. माझे वय वाढत गेले तसे चित्रपटसृष्टीत सुद्धा बदल घडत होते. शोलेची जादू ओसरली नसली तरी आता तो माझ्या हॉल ऑफ फेम मध्ये जाऊन बसला होता. माझी चित्रपटांची आवड बदलली होती. नव्वदीच्या दशकात मीच नव्हे तर माझ्या वयाच्या सार्‍या तरुण पिढीच्या डोक्यावर रोमॅंटीक चित्रपटांचे भूत चढले होते. याला जबाबदार होते ते बॉलीवूडचे तीन खान. सलमानचा "मैने प्यार किया", आमिरचा "कयामत से कयामत तक" आणि शाहरुखचा "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" या तीन चित्रपटांनी केलेले गारुड पाहता त्याच पठडीतले सिनेमे येऊ लागले. "दिल तो पागल है", "कुछ कुछ होता है" सारख्या सिनेमांनी मला शाहरुखच्या फॅनक्लबमध्ये नेऊन बसवले. चित्रपटसृष्टीचा पसारा वाढला होता. कलाकारांची नवी फळी तयार होत होती. नवे स्टार उदयाला येत होते. वर्षाला शे-दोनशे चित्रपट निघायला लागले. केबल टीवीचा जमाना आला आणि एकाच वेळी चौदा चॅनेलवर चौदा चित्रपट दिसू लागले. चित्रपटांच्या या भाऊगर्दीत "शोले" असो वा "रामगोपाल वर्मा के शोले", सार्‍यांना एकाच तराजूत तोलले जाऊ लागले. चॅनेल सर्फ करता करता अधूनमधून शोलेची एखादी झलक कुठेतरी दिसायची, पण ती तेवढीच बघून मी देखील पुढच्या चॅनेलवर जाऊ लागलो. संगणक, ईंटरनेट, मोबाईलच्या वाढत्या वापराने मनोरंजनाची इतर साधने उपलब्ध झाली आणि मोजकेच चित्रपट बघितले जाऊ लागले. हे मोजके चित्रपट देखील फारसा दर्जा राखून होते अश्यातला भाग नाही. एखादा तगडी स्टारकास्ट असलेला चित्रपट एकाच वेळी देशभरात हजारो चित्रपटगृहांमध्ये झळकून अ‍ॅडव्हान्स बूकींगमध्येच करोडोंचा गल्ला जमवू लागला. शोलेचा कमाईचा विक्रम अमुकतमुक चित्रपटाने तोडला अश्या बातम्या अधूनमधून कानावर यायच्या आणि त्यात किती फोलपणा आहे याची चर्चा करायला म्हणून शोलेच्या आठवणी निघायच्या. पण आज पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देताना माझ्या लक्षात आले की गेले काही वर्ष मीच स्वता शोले पाहिला नाही तर बायकोला काय समजवणार त्या बद्दल. तरीही एवढ्या वर्षानंतरही शोले आज आपल्या आठवणीत का आहे याचे उत्तर शोधताना आठवत होते ते त्यातील अजरामर झालेले एकेक कॅरेक्टर आणि त्या कॅरेक्टरच्या तोंडी असलेले संवाद.. येस्स संवाद.. "ये हाथ मुझे दे दे ठाकूर" आणि "होली कब है, कब है होली?" असे विचारणार्‍या अमजदभाईंचा प्रत्येक संवाद स्वतामध्येच एक डायलॉग होता. पण त्याच जोडीने "मैने आपका नमक खाया है सरदार" असे बोलणारा कालियाही तेवढाच लक्षात राहतो. "भाग धन्नो, आज तेरे बसंती के इज्जत का सवाल है" बोलणार्‍या बसंतीबरोबरच तिच्या घोडी धन्नोलाही आपण विसरू शकत नाही ते याचमुळे. जेमेतेम दोन दृष्यात दिसणारे ए. के. हंगल ही "इतना सन्नाटा क्यू है भाई?" बोलत आपल्या आठवणींचा हिस्सा बनून जातात आणि त्याचमुळे सचिनने साकारलेला अहमद ही या आठवणींमध्ये एक जागा बनवतो. धरमजींनी आजवर किती चित्रपटात "कुत्ते कमीने" हा डायलॉग मारला हे माहीत नाही पण "बसंती ईन कुत्तोंके सामने मत नाचना" याचा नंबर त्यात सर्वात वरचा असावा हे नक्की. पाण्याच्या उंच टाकीवर चढून त्याने "सुसाइड सुसाईड" करत घातलेला गोंधळ तेवढाच अविस्मरणीय झाला आहे आणि "मौसीजी चक्की पिसिंग" मुळे बसंतीची मौसी सुद्धा कायम लक्षात राहते. एवढेच नाही तर "अरे भाई, ये सुसाईड क्या होता है?" विचारणारा गावकरीही अजून माझ्या डोळ्यासमोर येतो. अमिताभने बसंतीच्या मौसीकडे बसंती आणि वीरूच्या लग्नाची बोलणी करताना स्तुती करायच्या आविर्भावात धर्मेंद्रच्या वाईट सवयींचा पाढा वाचणे आणि सरतेशेवटी "अब क्या करू मौसी, मेरा तो दिल ही कुछ ऐसा है" असे बोलणे म्हणजे निव्वळ हास्याचा कडेलोट होता. या साध्या साध्या वाक्यांमध्ये खरेच एवढा प्रभाव पाडायची ताकद होती का? की ही ताकद दिग्दर्शक रमेश सिप्पी, लेखक सलीम-जावेद आणि त्या दिग्गज अभिनेत्यांची होती? काही योग जुळूनच यावे लागतात असे म्हणतात. शोलेच्या बाबतीत प्रत्येक फ्रेममध्ये हे जुळून आले होते हे एक आश्चर्यच म्हणू शकतो. खरेच काही योग जुळायचेच होते म्हणूनच जयची भुमिका जी आधी शत्रुघ्न सिन्हा करणार होता ती अमिताभ बच्चनच्या पदरी आली. गब्बरसिंगच्या भुमिकेसाठी पहिली पसंती असलेला डॅनी डेंझोपा फिरोजखानच्या धर्मात्मामुळे वेळ देऊ न शकल्याने त्या भुमिकेचे सोने करायला अमजद खान अवतरला. धर्मेंद्र तर स्वत: संजीव कुमारने साकारलेली ठाकूर बलदेव सिंगची भुमिका करण्यास उत्सुक होता. पण असे काही घडणे नव्हतेच. याउलट स्वर्गात ज्या जोड्या जमवल्या गेल्या होत्या त्या इथेच जुळल्या. अमिताभ-जया आणि धर्मेंद्र-हेमा मालिनी. ऑनस्क्रीन रोमान्स जेव्हा ऑफस्क्रीनही घडतो तेव्हा तो परद्यावरही तेवढ्याच उत्कटतेने साकारला जातो याची प्रचिती शोले बघताना आल्याशिवाय राहत नाही. खास करून शोलेची अ‍ॅक्शन चित्रपट आणि धर्मेंद्रची अ‍ॅक्शन हिरो अशी ओळख असूनही धर्मेंद्र, हेमा मालिनीवर चित्रीत झालेली दृष्ये पाहताना त्यांच्यात जुळलेली केमिस्ट्री ही जाणवल्यावाचून राहत नाही. सुमधुर संगीताशिवाय हिंदी चित्रपट हिट होणे शक्य नाही अश्या त्या काळात शोलेला हिट होण्यास संगीताची फारशी अशी गरज नव्हतीच. याउलट गाण्यांपेक्षाही ज्याचे संवाद जास्त लक्षात राहिले असा शोले हा त्या काळातील पहिलाच चित्रपट असावा. तरी शोलेची ही बाजूही कमकुवत नव्हती. "ये दोस्ती हम नही तोडेंगे" हे मैत्रीवरच्या सर्वोत्तम गाण्यांपैकी एक असावे. "मेहबूबा मेहबूबा" हे गाणे आजही तेवढीच झिंग आणते. विशेष म्हणजे तुम्ही कितव्यांदाही शोले बघत असला तरी ती गाणी टाळून तुम्हाला पुढे जावेसे वाटत नाही हेच त्या गाण्यांचे यश आहे आणि याचे श्रेय जेवढे संगीतकार आर. डी. बर्मन यांचे आहे तेवढेच त्या गाण्यांच्या चित्रिकरणाचेही आहे. पार्श्वसंगीत आणि ध्वनीमुद्रणातल्या तांत्रिक बाबींबद्दल माझे ज्ञान तसे तोकडेच, पण शांततेचा भंग करत सूटलेल्या बंदूकीतील गोळीचा आणि तो घोड्याच्या टापांचा आवाज आजही कानात तसाच घुमतो. ही सर्व त्या भारावलेल्या वातावरणाची जादूच असावी अन्यथा एवढा समरस मी आजवर कोणत्याही चित्रपटाशी झालो नव्हतो ना पुन्हा होईल असे वाटते. सरतेशेवटी एवढेच सांगता येईल की शोले हा केवळ एक सिनेमा नव्हता तर भारतीय चित्रपटप्रेमींसाठी बायबल-गीता-कुराण होता. ज्याने तो पाहिला तोच हे समजू शकतो. न पाहिलेल्या माझ्या बायकोला ते काय रसायन होते हे निव्वळ शब्दांत समजवणे अशक्यच होते आणि म्हणूनच महिन्याभरापूर्वी मी खास बेत आखून शोलेची डीवीडी मिळवली आणि एकदाचा तिला लॅपटॉपवर दाखवला. पुर्ण चित्रपट बघून झाल्यावर मी तिला कसा वाटला हे विचारले. त्यावर तिचे औपचारीकता म्हणून आलेले "छान आहे" हे उत्तर थोडीशी चुटपुट लाऊन गेले खरे, पण या लेखाच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा मी शोलेचा विषय काढला आणि तिची उत्स्फुर्त प्रतिक्रिया, "बरेच दिवस झाले ना बघून, परत बघूया का?" .. हे बरेच दिवस म्हणजे केवळ एक महिना होता बरे का.. काही लोकांमध्ये विष हळूहळू भिनत असावे. असो, मला मात्र हा लेख लिहायच्या आधी शोले बघायचा नव्हता. कदाचित या लेखाला डोक्यात ठेऊन त्या दृष्टीकोणातूनच सिनेमा बघितला जायची भिती होती. शोले मध्ये नेमके मला काय आवडले हे शोधायचा उगाच एक निष्फळ प्रयत्न झाला असता, जे आजवर भल्या भल्या समीक्षकांना जमले नाही. काही जण तर तो प्रदर्शित झाल्या झाल्याच पाश्चात्य चित्रपटांची फसलेली नक्कल म्हणून त्याला फ्लॉप घोषित करून बसले होते. पण पुढे जे झाले, तो इतिहास आहे. त्यातील बर्‍याच जणांनी आपली चूक कबूल केली तर काही जण अजूनही हे कोडे उलगडवत बसले असतील. पण काही उत्तरे न शोधण्यातच शहाणपणा असतो नाही का.. तरी तुम्ही बघा प्रयत्न करून.. तुम्हाला जमतेय का.. :) - तुमचा अभिषेक
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7697
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

मी देखील माझ्या बायकोवर असाच किन्चाळलो जेव्हा मला कळाले की तिने शोले पहिलेला नाही. मी देखिल प्रथम व्ही.सी.आर. वरच पाहिला होता , पुढे पुन्हा किमान दहा वेळा (नक्कि किति वेळा ते आठवत नाही) मोठ्या पडद्यावर पाहिला. एवढेच नाहि तर जेव्हा परत ३डी रिलीझ झाला , तेव्हा मुलानाही दाखवला.प्रचंड आवडला त्यांना. दुसरा शोले होणे नाही. बिचारा रमेश सिप्पी. त्याच्या पुढच्या प्रत्येक चित्रपटाचि तुलना शोले बरोबर झाली. शोले एकाच वेळेस त्याच्यासाठी शाप आणि त्याच्या कारकिर्दिचा सर्वोच्य बिन्दू ठरला. हेच अमजद खान बद्दल्ही म्हणता येईल.

लेख प्रचंड आवडला ! शोलेच्या खराखु-या पंख्याकडून लिहील्या गेलेला तितकाच खराखुरा लेख. -शोलेचा अजून एक पंखा !

शोले कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही. लहानपणी कुणी किती वेळा शोले पाहिला आहे ह्याची अहमहिका असायची. कुणी पाच वेळा तर कुणी सात वेळा. काही बाबतीत हा सिनेमा मोठा नशीबवान होता. नेमका डॅनी हा ठरलेला व्हिलन बारगळला आणि एका अपरिचित अमजद खानला संधी काय मिळाली. त्याने आणि अन्य अभिनेत्यांनी जीव ओतून काम केले, कॅमेरामनने उत्कृष्ट छायाचित्रण केले, दिग्दर्शन चोख. मुख्य म्हणजे एक वेगवान पण जबरदस्त पकड घेणारी प्रभावी कथा. सलीम जावेद ह्या जोडीचे योगदानही कमी नाही. जोडीला पंचम साहेबांचे संगीत आणि त्याहून जबरदस्त पार्श्वसंगीत. ह्या सगळ्यांचा समसमासंयोग घडून आला. वेळही अचूक होती. जेव्हा डाकू हे फेटेवाले, गंध लावलेले, भरघोस मिशा असणारे असत तेव्हा हा एक वेगळा, मिलिटरी पोषाखातला, दाढीची खुंटे वाढलेला, रासवटपणे तंबाखू मळून खाणारा, देवाधर्माचे नावही न घेणारा, खडबडीत खेडवळ हिंदी बोलणारा पण अत्यंत भीतीदायक आणि क्रूर डाकू लोकांना कमालीचा भावला. ह्यातल्या अनेक गोष्टी पश्चिमी सिनेमातून उचलल्या होत्या पण नुसती उचलेगिरी न करता मेहनतही केली होती. ह्या सिनेमात सगळे सूर अचूक जुळून आले. गंभीर प्रसंग, कौटुंबिक प्रसंग, विनोदी प्रसंग आणि थरारक प्रसंग हे सगळे कसे हव्या तितक्या प्रमाणात. सांभा, कालिया, हरीराम नाई, मौसी, चाचा असले काही मिनिटे दिसणारे लोक, मोजकीच वाक्ये, मोजकीच दृष्ये असूनही लोकांच्या आठवणीत राहिलेत. ह्यानंतर येऊ घातलेल्या सिनेमांबद्दल अशाच आख्यायिका ऐकायला मिळायच्या. शोले तर काहीच नाही असा क्ष किंवा ज्ञ सिनेमा येतोय! अमजद खान अमुक करतो आणि तमुक करतो. तेव्हा मोठी उत्सुकता वाटायची की शोलेपेक्षा मोठा म्हणजे काय सिनेमा असेल! पण आजवर तसा सिनेमा बनलेला नाही.

शोले !!! जगात धर्मग्रंथे भरपुर आहेत . पण जे स्थान गीते चे ....तेच शोले चे !!!

मस्त ओघवतं... मज्या आली.
काय कसा माहीत नाही मला तेव्हा मिथुन चक्रवर्ती फार आवडायचा. आता तुम्ही लगेच माझ्याकडे अश्या विचित्र नजरेने बघू नका. असते एकेकाची आवड.
आँ ? मिथुनमधे नावडण्यासारखे काय आहे ?

In reply to by द-बाहुबली

मिथुनने मधल्या काळात जे भरमसाठ बी सी डी ग्रेड चित्रपट केलेत त्यामुळे आमच्या ईथे त्याची इमेज वेगळीच झाली होती. अर्थात आताही मिथुन मला आवडतोच. फक्त लहानपणी त्याच्या टपोरी स्टाईल आणि डिस्को डान्सिंगसाठी आवडायचा. अग्नीपथमध्येही अमिताभ एवढाच आवडलेला. नंतर बी सी ग्रेड चित्रपटांमुळे आवडायचा बंद झाला. पण समज आली तसे त्याच्या अदाकारीसाठी पुन्हा आवडू लागला. हल्लीची त्याची आवडलेली भुमिका ओह माय गॉड चित्रपटातील..

तिकडे ते 'बाबूमोशाय' थापा मारत आहेत, की शोले मुळेच विधवा विवाहाला प्रेरणा मिळाली. त्यांना माहित नाही की या पुरोगामी महाराष्ट्रात विधवा विवाह सुरु झाले तेंव्हा त्यांचा उत्तर प्रदेश मध्ययुगीन अवस्थेत होता.

मस्तं लिहिलय, अगदी मनापासून. हा सिनेमा म्हणजे माझ्यासाठी कंफर्ट फुड सारखा आहे. कधीही बघा, कंटाळा येणारच नाही. फ्रेम टू फ्रेम, अगदी टायटल च्या बॅकग्राउंड स्कोअर पासून शेवटच्या सीन पर्यंत तूफान जमून आलेला चित्रपट. इतक्यात मात्र खूप वर्षात नाही बघितला पण आता नक्की पाहणार. बाकी आमच्याकडेही लग्नानंतर शोले चा विषय निघाल्यानंतर जेव्हा " शोले म्हणजे...हम्म...हं... हो बहुतेक बघितला असेन" अशा टाइप चं उत्तर आले तेव्हा मी पण थक्क झाल्याचं आठवतंय.

हा चित्रपट कधीही एका बैठकीमधे पुर्ण पाहिलेला नाही. :( पाहिला अनेक वेळा गेलाय पण नेहेमी तुकड्या तुकड्यांमधे.

मस्तं :) वाचतांना "मेरा तो दिल ही कुछ ऐसा है" हे कधी येतंय बघत होतो आणि ते आल्यावर तसंच हसलो जसं शोले बघतांना हसतो :) मी अमिताभ बच्चन आणि किशोरकुमारचा लई मोठा फॅन आहे. त्यामुळे शोले आणि किशोरच्या गाण्यांची रिविजन चालूच असते.

असचं परिक्षण कोणीतरी पडोसन आणि बाँबे टु गोवा वर लिहा राव. त्या पिढिचा नसुनही हे दोन्ही पिक्चर प्रचंड आवडतात.

बर्‍याच वर्षांपूर्वी शोले संदर्भातला एक लेख वाचला होता त्यात या सिनेमासंबंधीचा एक किस्सा होता तो इथे देतो. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आठवडाभर या सिनेमाला दर्शकांकडून अतिशय थंड प्रतिसादा होता. ते पाहून सिनेमाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि बाकीची संपूर्ण चिंतेत पडली. एवढी मेहनत घेऊन आणि खूप सारे पैसे घालवून बनवलेला हा सिनेमा तिकिट खिडकीवर आपटतो की काय असे त्यांना वाटू लागले. सिनेमाच्या शेवटी अमिताभ बच्चन मरताना दाखवलाय कदाचित हे प्रेक्षकांना रूचले नसावे म्हणून सिनेमा आपटला असावा अशी सर्वांची समजूत झाली. त्याला कारणही तसेच होते. शोलेच्या आधी प्रदर्शित झालेल्या जंजीर, दिवारसारख्या चित्रपटांमुळे अमिताभची लोकप्रियता शिगेला पोचली होती. आणि राजेश खन्नानंतर बॉलीवूडला एक नवीन सुपरस्टार मिळाला होता. मग चित्रपटाचा शेवट पुन्हा नव्याने चित्रित करून सिनेमात जोडावा असं सर्वांचं मत पडलं. फक्त त्याला अपवाद होते ते सिनेमाची लेखक जोडगोळी सलीम-जावेद! त्यांना आपल्या कथेवर संपूर्ण विश्वास होता. अजून थोडे दिवस वाट बघून मग शेवटचा भाग चित्रित करावा असं त्यांनी बाकीच्या टिमला पटवून दिले. पण ते तसं व्हायचं नव्हतंच. त्यानंतर हळुहळू माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर सिनेमाने वेग घ्यायला सुरूवात केली. तो वेग नंतर इतका वाढत गेला नंतर या सिनेमाने मागे वळून पाहीलेच नाही.

In reply to by किसन शिंदे

शोलेचा मुळ शेवट ठाकूर गब्बरसिंगला हाल हाल करून ठार मारतो असा होता. (तो शॉट आता यु टुबवर पण उपलब्ध आहे आणि जबरदस्त आहे). पण त्यावेळी आणीबाणी असल्यामुळे सेंसॉरने एक पोलिस ऑफीसर कायदा हातात घेतो यामुळे चूकीचा संदेश जाइल म्हणून शेवट बदलायला लावला. सुरुवातीला पिक्चरला अतिशय थंड प्रतिसाद पाहुन रमेश सिप्पि मुळ शेवट परत आणायच्या विचारात होते. पण थोड्याच दिवसांत शोलेचा असा काय बोल् बाला झाला कि शेवट बदलायलाच लागला नाही.

छान विवेचन पण प्रवाहात जय आणि वीरू इतकेच अजरामर झालेले सुरमा भोपाली आणि अन्ग्रेजोके जमाने के जेलर कडे थोडे दुर्लक्ष झालेले वाटते. "हमारा नाम सुरमा भोपाली ऐसेही नैये", "दो रुपये मै आप क्या पुरा जंगल खरिद्ने निकले थे " "हमारे जासूस चारो तरफ फ़ैले हुए है… आहा ", "जब हम नाही सुधरे तो तुम क्या सुधरोगे" असे एकापेक्षा एक फक्त सिनेमातच नाही दैनंदिन आयुष्यात रूढ झालेले संवाद आणि शोले मध्ये action , drama , tregedy सोबत comedy चा मसाला भरून त्याला परिपूर्ण बनवण्यात त्यांचा वात खासच आहे

आम्हाला आमच्या काळात घेउन गेलास हा लेख लिहून. १० वी च्या सुट्टीत पहिल्यांदा पाहिला. आणि मग बर्‍याच वेळा.पण या चित्रपटाचे सगळे संवाद आजही मला पाठ आहेत.(परवाच कुठल्याश्या वाहिनीवर पाहीला आणि मनातल्या मनात सगळे संवाद म्हटले)

'शोले' हा चित्रपट जितका गाजला तितकेच त्यातील संवादही गाजले होते. एखाद्या सिनेमाच्या पुर्ण संवादांची ध्वनीमुद्रिका निघालेला 'शोले' हा पहीला चित्रपट असावा. 'कभी कभी' ह्या चित्रपटाच्याही ध्वनीमुद्रिका निघाल्या होत्या, परंतू 'शोले' इतक्या त्या गाजल्या नाहीत. जोरदार मागणीमुळे काही काळ बाजारात 'शोले'च्या ध्वनीमुद्रिका मिळत नव्हत्या. सत्यनारायण असो, लग्न असो अथवा सार्वजनिक गणपती असो त्या काळी 'शोले'च्या संवादाची ध्वनीमुद्रिका हमखास ऐकवली जायची. कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नसे. लोकांचे 'शोले'चे संगीतासकट संवाद पाठ होते. असे चौफेर यश फक्त 'शोले'लाच मिळाले.

In reply to by ऋतुराज चित्रे

मी स्वतः शोले च्या ३ ध्वनीमुद्रिका [L.P. Record] मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणी जिवलग मित्राने मुंबई वरून आणुन दीला १ संच. टीपः आंधी चित्रपटाची पण संवादासहीत ध्वनीमुद्रिका आहे [किंवा आधी संवाद मग गाणे असे आहे], आणी मला ती पण शोले इतकीच ताकदवान वाटते.

आणी मला ती पण शोले इतकीच ताकदवान वाटते. सहमत.

शोले चित्रपटाला ४० वर्ष झाल्याच्या निमित्ताने ... काल तुनळीवर मी शोले ला लागले कोल्ले विनोदीका बघितली

तो फुल मुवी औडीओ आता म्प३ फोर्मत मधे कुठे मिळेल. @अभिषेकः तुला आधी मिथुन आवडायचा नंतर शाहरुख आवडू लागला आताच्या पिढीत तुला सिकंदर खेर आवडतो की उदय चोप्रा?? (ह. घेणे)

In reply to by मी-सौरभ

अरे आताच्या पिढीतही शाहरूखच.. त्याचा काळ अजून संपू तर दे. त्याची जागा घ्यायला कोणी सुपर्रस्टार उगवू तर दे :)

या संदर्भात जुन्या जमान्यातले एक सूप्रसिद्ध कथाकार वि आ बुवा यांची वरील र्शीर्षकाची कथा आठवली . कोणास ती वाचल्याचे स्मरते का ? माझ्या मते ती याहीपेक्षा मजेदार होती . मला ती त्रोटक आठवते . जर कोणी त्यात स्वारस्य दाखवले तर पुढील एक दोन दिवसांत जशी आठवते तशी टंकवेन.

आज या ठिकाणी शोले ला चाळीस वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लेख लिहिल्याबद्दल अखिलभारतीयअभियंताआतातरीकाढूनटाकसंघटनेकडून अभिषेक नाईक (तुमचाच आणि नीच नसलेला) यांचा पूस्पगुच देऊन सत्कार करण्यात येत आहे.