मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शी!!!! तुम्ही नियम पाळता?

कॅप्टन जॅक स्पॅरो · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
रविवार सकाळची गोष्ट आहे. पहाटे पहाटे १०.३० वाजता माझे एक जवळचे मित्रवर्य घरी आले. उजवा हाताचा पंजा आणि कोपराची मागची बाजु बँडेजमधे गुंडाळलेली, चेहेर्याची उजवी बाजु थोडीशी घसपटलेली आणि जराश्या "तैमुरलंग" अवस्थेमधे त्याला पाहुन मी खरं तर दचकायला हवं होतं. त्याऐवजी मला भयानक हसायला आलं. नाही नाही तुम्हाला वाटतयं तश्या माझ्या संवेदना वगैरे मेलेल्या नाहीत पण त्याची ही अवस्था व्हायला तो स्वतःचं जबाबदार आहे. त्याचं म्हणजे "आधीचं उल्हास, त्यातुन फाल्गुनमास" असा प्रकार आहे. गाडी गर्दीच्या रस्त्यांवरुन कट मारत चालवणं, दारु वगैरे प्यायल्यावरचं आपल्याला गाडी कशी जास्तं चांगली चालवता येते ह्याच्या फुशारक्या मारणं, रस्त्याकडे लक्ष नं देता रस्त्याकडेनी चाललेल्या प्रेक्षणिय स्थळांकडे बघणं आणि हेल्मेट घालणं म्हणजे नामर्दपणाचं लक्षणं वाटणं इत्यादी अनेक सद्गुणांनी महाशय नटलेले असल्यानी हे सौख्यं त्याला कधी सामावुन घेतयं ह्याचीचं मी वाट पहात होतो. आत्ता अगदी सहा महिन्यांमधली गोष्ट आहे, मी शक्यतो हेल्मेटशिवाय गाडी चालवतं नाही ह्यावरुन चार मित्रांमधे माझी अक्कल काढत होता. आणि तेही भो...असो..तेही त्याच्याएवढेचं सद्गुणी असल्याने त्याची अगदी बाजु घेउन घेउन मला खोटा पाडतं होते. काय करणार? सुरक्षित गाडी चालवणं हा म्हणे मिडलाईफ क्रायसिस आहे असं वरुन ऐकुन झालं. बहुमत हेचं अंतिम सत्य असं दुर्दैवानी आपल्या समाजात मानलं जात असल्यानी नियम पाळणं हा दुर्गुण आहे हे त्यांनी अगदी सहज सिद्ध करुन दाखवलं. असेचं नियमपळवादी सदगुणी लोकं जगात वाढत राहिले तर माझ्यासारख्या दुर्गुणी नियमपाळवादी लोकांना रोजचं ह्या एका लाजिरवाण्या प्रश्णाला सामोरं जायला लागणार. एखाद्या त्रैलोक्यसुंदरीनी के.आर.के. कडे तुच्छपणे बघावं किंवा एखाद्या मर्सिडिझ वाल्यानी स्कुटरवाल्याकडे ज्या तुच्छतेने बघावं अश्या नजरेनी पाहता पाहता "श्शी. तु रहदारीचे नियम पाळतोस? तुझ्यात कै दमचं नै बाबा!!!" वगैरे ऐकायची वेळ लवकरचं येणार असं दिसतय. चुक ह्या नियमपळवादी लोकांची नाहिये. सरकारची आहे. त्या आर.टी.ओ. मधे आणि ड्रायव्हिंग स्कुलमधे सपशेल खोटं शिकवतात त्याला सामान्य जनता काय करणार? एखादं दुसरी चुक असती तर मानलं असतं बॉ, पण सगळेचं नियम चुकीचे बनवलेत म्हणजे हैट झाली. म्हणे लाल सिग्नलला गाडी थांबवा, अंबर दिव्याला सावधपणे जा आणि हिरवा सिग्नल लागला की काळजीपुर्वक जा. लाल सिग्नल लागला की हिरव्या झालेल्या बाजुच्या लोकांना शिव्या हासडत जायची मजा त्या सरकारी बाबाजींना काय कळायची? सिग्नल हे रहदारीचे नियंत्रण करायला लावलेत अशी लोकांची गैरसमजुन करुन देण्यातही ह्याचं नीचं सरकारचा वाटा आहे. ते टपरीआड उभे राहिलेले पोलिस, त्यांना दिवसभर काय विरंगुळा? बघSssSSत बसतात रंग बदलणार्‍या सिग्नलकडे. त्यातुन अधुन मधुन विरंगुळा म्हणुन एखाद्या गाडीवाल्याला पकडायचा, त्याच्या कागदपत्रांचं वाचन करायचं आणि करमणुक साधायची असला निरुपद्रवी विरंगुळा दुसर्‍या कुठल्या क्षेत्रात सापडायचा हो? त्यातुन परत काही मामांना आकड्यांची कोडी घालायची भारी हौस. "पावतीपुस्तकामधे २०० रुपये घालता का १०० रुपयात बिनपावतीचं सोडु" वगैरे सुप्रसिद्ध कोड्यांचे जनक हेच्चं हो. त्यांची काय चुक? शिवाय गाडीची किल्ली लपवुन ठेवणं आणि मग समोरच्याला ठेंगा दाखवणं वगैरे मैदानी खेळ तर अगदी आवडीचे त्यांच्या. टार्गेट पुर्ण करायचा टारगटपणाही अधुनमधुन करावा लागत असल्यानी नियम पाळणार्‍यांनाही अर्थदानाचं पुण्य मिळवुन देण्यामधे ह्यांचा महत्त्वाचा "वाटा" असतो. त्यातुन हल्ली मायबाप सरकारच्या हेल्मेटमधे नवी आयडियेची कल्पना आलीये म्हणे. डो़कं वापरायचं म्हणे हेल्मेट सुरक्षित रहावं म्हणुन. आयला, टिळक पाहिजे होते राव. नक्की सरकारचं हेल्मेट ठाण्यावर आहे का असा अग्रलेख पाडला असता त्यांनी. हेल्मेट ही काय वापरायची गोष्ट आहे का? मस्तं डो़कं उघडं ठेवायचं, दोन-चार पेग कड्डक दारु लावायची आणि विमानाच्या सफाईनी दुसर्‍या गाड्यांना आडवे-उभे कट मारत चालवायची गाडी. एखाद्याला ढगात पाठवायचा. एखाद्या वेळेला आपण पडायचं. म्हणजे हॉस्पिटलमधल्या सुंदर नर्सेस पहाता वगैरे येतात. पण नाSssSSही बंदी म्हणजे बंदी. आपलं सरकार थेट अश्या गंमतीवरचं बंदी आणायला बघतं. सामान्य लोकांना सुखानी जगुन देण्यात सरकारला आनंद वाटत नाही हेचं खरं. सरकारनी खरं तर साहसी क्रिडाप्रकारांना चालना दिली पाहिजे. फुटपाथवरुन गाडी चालवणं, विरुद्ध बाजुनी येणार्‍या गाडीच्या उजवीकडुन गाडी काढणं, एका चाकावर गाडी चालवणं वगैरे प्रकारांना राष्ट्रीय खेळ म्हणुन मान्यता मिळाली पाहिजे. पुण्यातले ऑलिंपिक साहेब ह्यात लक्ष घालतील तर बरं होईल. हॉर्न वाजवण्यावर बरेचं लोकं उगीचं आक्षेप घेतं असतात. रस्त्यावर उतरलेल्या सुस्त जनतेमधे जागृती निर्माण करणार्‍या ह्या अस्त्राला सरकार दाबुन टाकायचा प्रयत्न करतयं. काय फालतुपणा आहे हा? म्हणे शाळांजवळ- हॉस्पिटलजवळ हॉर्न वाजवायचा नाही. अरे आतमधल्या पेशंटचा काही विचार? बिचारे कंटाळतात हॉस्पिटलातल्या चार भिंतीमधे राहुन राहुन. हॉर्नमधुन गाणी वाजवायची, वेगवेगळ्या प्राण्यांचे, रडणार्‍या बाळाचे आवाज काढायचे ही ६५ वी विद्या (का कला रे?? आँ). आयसीयु मधल्या पेशंटला धक्का देउन त्याचं बंद पडायला आलेलं हृदय चालु करायचं परत. ते नाही. डॉक्टरांचा धंदा बुडेल ना अश्यानी. रस्त्यावर नुकतीचं गाडी शिकलेल्या नव्या घाबरट भिडुला तयार करायची जबाबदारीही हे समाजसेवक अगदी निरिच्छ वृत्तीनी स्वीकारतात. त्यांच्या गाड्यांना कट मारुन त्यांच्या अंगात धैर्य निर्माण करणं ही जबाबदारी अजुन कोण समर्थपणे पेलु शकेल? हे झालं दुचाकीवाल्या समाजसेवकांचं. तीनचाकीवाले समाजसेवक तर अगदी देवाघरचे सेवक हो. नो एंट्रिमधुन गाड्या घालणं, रस्त्यावर गाड्यांशी खो-खो खेळणं आणि प्रवाशांना भांडणकला शिकवणं हे ह्यांचे आवडते छंद असतात. त्यातल्या त्यात जर का रसिक रि़क्षावाला असेल तर कलकत्ता ५०५ वगैरे खाउन रस्त्यावर आणि लोकांच्या कपड्यांवर रंगकला करणं असाही छंद ह्या धंद्यामधल्या बर्‍याचं जणांमधे असतो असं निरि़क्षण आहे. पण आमच्या नष्टोळ्या लोकांना कलेला दाद देता येणं हा प्रकार माहिती नाही. केलेल्या कामाला मोजपट्टी लावु नये, त्यानी कामाचं महत्त्वं आणि दर्जा कमी होतो अशी एक समजुन आपल्या समाजात आहे. (म्हणजे एवढं काम केलं तेवढं काम केलं असं म्हणण्यापेक्षा जेवढं जास्तं जमेल तेवढं जास्त काम दर्जेदारपणे करावं अश्या अर्थानी). आमचे प्राधिकरण, पिंपरी-चिंचवडवाले रिक्षावाले ह्या नियमाला अगदी झोपेतही पाळतात. जSSsssSSर्रा काय मीटर टाकतील. असो. सद्गुणी रि़क्षावाले हा एका स्वतंत्र ब्लॉगचा विषय होउ शकेल, त्याविषयी परत कधीतरी सवडीने लिहिनचं. बहुतांश चारचाकीवाले नमोंनी रस्ता आपल्या नावावर करुन दिल्यासारखं वागतात. ओव्हरटेक करणार्‍या गाडीला ओव्हरटेक करुन पुढे जाणं हा ह्यांचा आवडता छंद. ह्या जोडीलाचं हॉर्नवर एक हात आणि अ‍ॅक्सलरेटरवर एक पाय दाबलेला असेल तर दुधात साखरचं ह्यांच्यासाठी. समोरच्या दुचाकीवाल्यानी दचकुन हडबडुन गाडी साईड पट्टीवर उतरवलीचं पाहिजे. बाकी ह्या चारचाकीवाल्यांमधे पण बर्‍याचं पोटजाती आहेत. त्यातली सगळ्यात भारी जमात म्हणजे गुंठामंत्री. बापोपार्जित (होय. कारण वडिलोपार्जित म्हणण्याएवढं सौजन्य ह्यांच्याकडे नसतं) जमिनीला चुना लाउन कॉर्पियो, येंडेवर, फार्चुनर वगैरे गाड्या उडवत फिरणं हा ह्यांचा दिवसभराचा खेळं. ह्या खेळात ते बर्‍याचं रस्त्यावरच्या दुसर्‍या गाड्यांनाही "उधार" मनानी सामील करुन घेतात. ह्यांच्या गाड्यांवर जनरली कुठल्यातरी पक्षाचा वरद हस्त असतो त्यामुळे ह्यांच्या नशिबाच्या घड्याळात शक्यतो बारा वाजत नाहित असं ऐकिवात आहे. असो. मुद्दा हा आहे की नियम पाळण्यासारखा भेकडपणा, मुर्खपणा माझ्यासारखे लोकं कसा करु शकतात? ह्या आमच्या सारख्या नियमपाळ जमातीमुळे देशाच्या प्रगतीला खिळं बसतो म्हणे. ह्याबद्दल आम्हाला मनापासुन खेद वाटतो. ह्या देशविघातक कृत्याबद्दल सा़क्षात ब्रम्हदेवही मला माफ करु शकणार नाही ह्याची मला खात्री आहे. माझ्या अनुभवातुन तुम्ही शिका काहितरी. उद्या लाल सिग्नलला हेल्मेट घालुन थांबलात तर तुम्ही माझ्या भेकड जमातीत सामील व्हालं. तुमचं स्वागतं करायला मी तरी तयार आहे. जान है तो जहान है बॉस. Be safe, Drive safe it's hell set free on roads. We don't need casualties. Thank you.

वाचने 27760 वाचनखूण प्रतिक्रिया 109

श्रीरंग_जोशी 17/05/2015 - 23:41
तुमच्या मित्राला लौकर बरे वाटो अन तो तुमच्या सारखा नियमपळवादी बनो ही ईश्वरचरणी प्रार्थना. लेखनशैली लैच म्हणजे लैच भारी. यावरून मी आजवर न उघडलेला एक काथ्याकूट आठवला - हेल्मेटसक्ती. एकदा तरी वाचायला हवा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

श्रीरंग_जोशी 18/05/2015 - 06:19
च्योप्य पस्ते करताना गोंधळ झाला. नियमपाळवादी असेच म्हणायचे होते. स्वसंपादनाची सुविधा सुरू झाली होती त्यामुळे निष्काळजीपणा वाढला.

जयंत कुलकर्णी 18/05/2015 - 07:09
:-)
गाडी चालवत असताना थुंकणे हा तर आरटिऒने रिक्षावाल्यांसाठी नियमच बनवलाय!ते ति कसोशीने पाळतात एवढंच.बाकी नियमपाळवाले अल्पसंख्य असल्याने काही सवलती मिळतात का बघायला हवं!!

In reply to by अजया

तुषार काळभोर 18/05/2015 - 11:37
गाडीत बसून थुंकणे: कॅब-ड्रायवर्स(चालत्या कारचे दार उघडून रस्त्यावर थुंकणे!! आपली तर उभ्या जन्मात हिंमत नाय होणार!!) , पीएमटी-येस्टीचे प्रवाशी, असंख्य दुचाकीस्वार्स, अगणित पादचारी, इत्यादी

नूतन सावंत 18/05/2015 - 08:57
खूप छान लेख.वाहन चालवतानाच जर नियमासहित शिकले तरच ४०/५०/टक्के लोक नियमपाळवादी बनतात.आमच्या उत्तरप्रदेशी शिक्षकाने सिग्नलला थांबायचे असे शिकवलेच,पण पुढे पुस्ती जोडली की,"अगर आगेवाला जायेगा तो आपुन बीजानेका.नाहीतो पाछडवाला ठोकेगा."त्यावर मी आक्षेप घेताच त्यादिवशीची शिकवणी संपल्यावर नवऱ्याला सल्ला दिला की,"मॅडमको गाडी चलाने नही देना."

नाखु 18/05/2015 - 09:27
थेट रस्त्यावर आणून सोडणारा वाचणार्यांना "मार्ग" सापडला तर आणखीच चांगभल. कॅप्टन आमची खारीची भरः
  • पिंपरी चिंचवडभागातील वाहतूक नियंत्रण दिवे हे रहदारी नियमनासाठी नसून "शोभेचे दिवे" आहेत असे बहुसंख्य वाहन चालकांचा ठाम समज आहे (दुचाकी व तीचाकी वाले यात स्वयंभू ज्ञानी आहेत)
  • li>तेव्हा आप्ल्यासारखे नियमपाळवादी जर सिग्नल उभे असाल तर तुमच्याकडे मरतुकडा कुत्रा कटा़क्ष नक्की टा़कला जाईल व त्याची पावती म्हणून रस्त्यावर थूंक्-पिचकारीचा शि़क्काही मिळेल
  • जिवंत असतील ते फूट्पाथ हे वाटसरूंसारख्या क्षुल्लक आणी निरोद्यगी प्राण्यांसाठी वाया घालवू नये म्हणून केवळ नाईलाजाने तेथून दुचाकी हा़कणारे (पाठीमागे घट्ट घोरपडी अस्ल्यास जास्त वेगाने दामटणे)हे वाट्सरूंना सतत जागे+सतर्क राहण्यास भाग पाडतात म्हणून तमाम पादचारी यांनी त्यांचे आभारच मानले पाहिजेत
  • पिंचि भागात ग्रेड सेपरेटर ओलांडण्यासाठी जे आकाश्-पादचारी जिने बांधले आहेत त्याचा प्रेमी युगुलांना फारच मोठा उपयुक्त आणि हक्काची जागा म्हणून फायदा झाला आहे (विशेषतः वल्लभनगर येथील पादचारी पूल). .
  • आणि या प्रेमगुजनात बाधा +थोडाही व्यत्यय येऊ नये म्हणून अबलांपासून तबला* पर्यंतचे लोक अडथळा शर्यतीसारखा रस्ता पार करून एकाच वेळी कबड्डी-खोखो व शिवणा-पाणी या देशी खेळाचा आनंद लुटतात.
  • रिक्षावाले हे समस्त समाजावर उपकार करण्यसाठी या भूतला वर आलेले असल्याने चिरीमीरी साहेबांना ते कधीच दिसत नाहीत अगदी डिस्कव्हरी चॅनेलच्या जादूच्या प्रयोगासारखे
  • * तबला म्हण्जे ज्यांच्या डोक्यावर नाममात्र केस शिल्ल्क उरलेत असे महाभाग
आपल्या नम्र नियमपाळवादी भाजीपाला नाखु

nikhil Patil 18/05/2015 - 09:35
ट्राफिक पोलिसांना तर तेच पाहिजे, कोणी तरी सिगनल तोडावे,आणि यांनी त्याला जाऊन पकडावे.त्याच्या बद्दल आणखी सांगायचे झाल्यास हे नियम त्यांना लागू होत नाही किंवा ते पाळत नाही.
खरच रस्त्यावर सर्व नियम पाळत गाडीचालवणार्‍या सर्वांची मला भयंकर कीव येते. या भेकड लोकांसाठी एक वेगळी लेन बनवली पाहिजे. उगाच सिग्नल लाल झाला म्हणुन अख्खा रस्ता अडवून बसतात. उगाच टाइमपास करतात साले. मी पण मग त्यांना सोडत नाही. त्यांच्या मागे गाडी उभी करुन जोर जोरात हॉर्न वाजवत रहातो. सिग्नल सूटे पर्यंत. नोएन्ट्री मधून जरा गाडी घातली तर यांच्या बापाचे काय जाते कुणास ठाउक. उगाच हातवारे करुन शिव्या द्यायला लागतात. मग मी जोरात त्यांच्या अंगावर गाडी घालतो. निमूट पणे बाजूला होतात. मग ऐटीत त्यांच्या समोरुन निघुन जातो. साला नो एक्न्ट्री आहे म्हणुन लाँगकट मारुन उगाच पेट्रोल जाळायला पेट्रोल काय फुकट येते का? मी तर नेहमी शॉर्टकटनेच जातो आणि वेळ आणि पैसे दोन्ही वाचवतो. तेवढीच आपली राष्ट्रसेवा पण होते. नो पार्कींग चा बोर्ड दिसला की तर माझे डोकेच सटकते. पोलिसांनी पण मुद्दाम माझ्या नेहमीच्या पानाच्या ठेल्या समोर नो पार्कींगचा बोर्ड लावला आहे. रोज मग त्या बोर्डा खालीच मी माझी गाडी उभी करतो. दोन मिनिट गाडी उभी केली तर कोणाला काय प्रॉब्लेम होणार? उगाच गाडी लांब उभी करुन पान घ्यायला उन्हातान्हाचे कोण चालत येणार? त्यापेक्षा जर कोणी गाडी उचलायला लागला तर जागेवर तोडपाणी करायचे. तसापण गाडीचा नंबर आणि माझे पांढरेशुभ्र लिननचे कपडे पाहिले की माझ्या कोणी फारसे नादाला लागत नाही. तुम्हीपण लक्षात ठेवा आपला गाडी नंबर आहे ४१४१. या नियमपाळे लोकांना खरतर शहरातून हकलूनच द्यायला पाहिजे. नितिन गडकरी साहेबांनी स्कीम आणली आहे ना पॉईंटची. ती थोडीशी बदलायची. झीरो पॉईंट वाल्यांना रस्त्यावर गाडी आणूनच द्यायची नाही. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम कायमचा सुटेल. ता.क. :- सलमान सारख्या जंटलमन माणसाला उगाचच त्रास देणारे हे नियमपाळे लोकच आहेत. त्यांचा या प्रसंगी साहेबांच्या आशिर्वादाने कडाडुन निषेध. जय हिंद जय महाराष्ट्र. पैजारबुवा,

In reply to by टवाळ कार्टा

मदनबाण 18/05/2015 - 17:35
P1 माझ्या मोबल्यातुन या "दादा" ला टिपले ! एकला चलो रे :- ही मंडळी त्यांची गाडी- दुचाकी पहिल्या लेन मधुन ४०-५० च्या स्पीड ने चालवणार,बाकीच्या लेन मोकळ्या असल्या तरी त्याची यांना काही पर्वा नसते. डावीकडे-उजवीकडे :- सरळ गाडी चालवणे यांना कधीच जमत नाही, त्यामुळे संपूर्ण रस्ता डाविकडे-उजवीकडे असे करत करत गाडी चालवणे हेच यांचे काम. अचानक वळकर :- कुठल्याही ठिकाणी गाडी अचानक थांबवुन अचानक वळण्याचा निर्णय आयत्या क्षणी घेणारी मंडळी ! शक्यतो उड्डाणपुलाच्या सुरवातीला यांच्या लक्षात येते की या उड्डानपुलावरुन आपल्याला जायचे नाही.रिक्षावाल्यांचा तर अचानक वळणे हा जन्मसिद्ध अधिकार आहे,आणि मागुन येणार्‍याला अश्या अचानक वळण्याने काही फरक पडत नाही अशी यांची दॄढ धारणा असते. हॉर्नमारे :- माझ्या डो़क्यात जाणारी मंडळी ! जगात फक्त आपल्यालाच हॉर्न वाजवता येतो अशी धारणा अशा मंडळींची असते ! नुकताच समोर सिग्नल लागलेला आहे,टायमर काउंटडाउन दाखवत आहे या सर्व गोष्टींशी यांचे काही एक देणे घेणे नसते ! शाळा, हॉस्पिटल इं ठिकाणे आजुबाजुला आहेत हे यांना ठावुक देखील नसते... फक्त हॉर्न वाजवत बसायचे ! ओव्हरटेकर :- तुम्ही यांना ओव्हरटेक केल्यास यांचा कमालिचा अपमान होतो आणि तुम्हाला परत ओव्हरटेक केल्याशिवाय यांना मन:शांती मिळत नाही ! तुम्हाला मागे टाकण्यासाठी ही मंडळी कुठल्याही थराला जाउ शकतात... ठाण्यात अचानक झालेल्या कट्ट्यावर सगळ्यांनी या सर्व बाबतीत मला "थंडा" राहण्याचे सांगितले आहे, थोडक्यात...शांत गदाधारी भीम शांत असे स्वतःच स्वतःला बजावायचे ! ;) {रोजच्या प्रवासाला मौत का कुआ समजणारा २चाकी स्वार} मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Bahon Mein Chali Aao... :- Instant Karma

In reply to by मदनबाण

प्रणित 19/05/2015 - 14:26
ठाणे-विक्रोळी प्रवास २चाकीवर जीव मुठीत घेउनच करावा लागतो. यात सर्वात जास्त त्रास डावीकडे-उजवीकडे, अचानक वळकर आणि ओव्हरटेकर यांचा होतो.

In reply to by टवाळ कार्टा

चिगो 18/05/2015 - 17:39
बाब्बो.. ह्या असल्या पाट्या अजूनही चालतात का? आम्ही निमुटपणे त्या 'हाय सिक्युरीटी' ( IND आणि Hologram वाल्या) वापरतो बुवा आमच्या गाडीवर.. आम्ही तसेही थोडे येडचापच आहोत म्हणा..

In reply to by चिगो

मदनबाण 18/05/2015 - 17:44
ह्या असल्या पाट्या अजूनही चालतात का? यात काय संशय ? मध्यंतरी असाच क "तात्या" सुद्धा पाहिला होता ! ;) गाडीला काळी फिल्म लावण्यास मनाई आहे असा काहीसा कोर्टाचा आदेश आहे वाटत, मध्यंतरी पोलिसांनी या विरोधात मोहिम आखली होती...पण अजुनही अश्या गाड्या सर्रास दिसतात. गाडी अंगावर घालण्याचे प्रकार देखील होतात, मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Bahon Mein Chali Aao... :- Instant Karma

In reply to by काळा पहाड

मदनबाण 19/05/2015 - 09:09
काळू मामा... मला कोणत्याही एका पक्षा बद्धल ममत्व नाही ! माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही ! ज्या ज्या गोष्टींबद्धल मला मत व्यक्त करावेसे वाटते, ते तसेच मी व्यक्त करतो... मग फूड पार्कच्या नावाने गळा काढणारे रागा असोत अथवा आपले सध्याचे पंतप्रधान ! तेव्हा पुन्हा प्रतिसाद देताना हे लक्षात असु ध्या. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कोमात कोण?

In reply to by मदनबाण

काळा पहाड 19/05/2015 - 10:52
मदमस्त हिरवट आजोबा, तुम्ही सांगितलं तरी ते तसंच असेल असं नाही ना? तुम्ही भले तसा डिस्क्लेमर टाकून खोट्या गोष्टी पसरवत रहाल. म्हणून प्रतिसाद देताना आम्ही मूळ पोस्ट आणि पोस्ट टाकणार्‍याचं कॅरॅक्टर सर्टिफिकेट, दोन्ही पाहून रिप्लाय देतो. काळजी नसावी.

In reply to by काळा पहाड

मदनबाण 19/05/2015 - 10:59
मदमस्त हिरवट आजोबा, हिरवट ? हॅहॅहॅ... व्हॉट इज धीस काळू ? असो... डोक्यावर पडलं की वेगवेगळे रंग दिसायला लागत असतील ! तुम्हाला रागाने सल्लागार पदावरुन इतक्यात काढले की काय ? ;) तुम्ही सांगितलं तरी ते तसंच असेल असं नाही ना? तुम्ही भले तसा डिस्क्लेमर टाकून खोट्या गोष्टी पसरवत रहाल. म्हणून प्रतिसाद देताना आम्ही मूळ पोस्ट आणि पोस्ट टाकणार्‍याचं कॅरॅक्टर सर्टिफिकेट, दोन्ही पाहून रिप्लाय देतो. काळजी नसावी. डोक्यावर पडलेल्यांनी आधी स्वत:ची काळजी घ्यावी ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कोमात कोण?

In reply to by मदनबाण

काळा पहाड 19/05/2015 - 11:43
मदमस्त हिरवट आजोबा,
तुम्हाला रागाने सल्लागार पदावरुन इतक्यात काढले की काय ? ;)
जोक जुना झाला. माझाच होता. नवीन शोधा.

माईसाहेब कुरसूंदीकर 18/05/2015 - 10:58
वाचतेय रे कॅप्टना. विकासाच्या नावाखाली झालेले शहरीकरण ह्याला कारणीभूत आहे असे ह्यांचे मत.३० वर्षापूर्वी तुझ्या त्या कोथरूडमध्ये वर्दळ अतिशय कमी असायची.उडुपी हॉटेल्स १ किंवा दोन्,लोकसंख्या कमी व प्रत्येक घरात साधारण्पणे एक लुना किंवा बजाज.ह्यामुळे गाडी(पुण्यात दुचाकीही गाडीच हो!) कोठेही पार्क करता यायची.आता लोकसंख्या वाढली,गाड्यांची संख्या वाढली,इमारतींची संख्या तिप्पट्,चौपट झाली.. भल्या मोठ्ठ्या शॉपिंग मॉलच्या आजूबाजुला 'नो पार्किंग' लिहिलेले असते.म्हणजे शॉपिंग मॉलला राहत्या वस्तीत पर्वानगी दिलीत व्यवहार करायची..,कपडे विकायची,चित्रपट दाखवायची पण येणार्यानी पार्किंग मात्र करायचे नाही...चालत या,रि़क्षाने या किंवा गाडी खूप लांब पार्क करून चालत या किंवा शॉपिंग मॉलला ३०/४० रुपये द्या.
पहिले आम्हीसुद्धा नियमपाळवादी होतो, पण, क्या करे … जमाना बडा जालीम था… मग जमान्यासारखे झालो…. नंतर भारताबाहेर ड्रायविंग करताना, त्या अनियमपाळवादीपणाच्या सवाईचा खूपच मनस्ताप व्हायला लागला होता… दोन कारमधे ४-५ मीटर अंतर काय… अन यील्ड स्टोप साइन पाशी चक्क मौसम तोडून गाडी थांबवायची काय …. सगळेच अतर्क्य…

In reply to by पगला गजोधर

वेल्लाभट 18/05/2015 - 13:31
व्हेन इन पुणे डू व्हाट पुणेकर्स डू
ही निव्वळ पळवाट आहे. नियम पाळण्यातला कमीपणा टाळण्याचा हा एक चलाखीने काढलेला मार्ग आहे. do what punekars do! it does not justify what punekars do, in any way.

In reply to by वेल्लाभट

धाग्यामागाचा तुमच्या चांगल्या हेतूला पाठींबा पण …. नियम पाळण्यातला कमीपणा नाही वाटत … रेफ :
पहिले आम्हीसुद्धा नियमपाळवादी होतो
पण होणार भयंकर मनस्ताप टाळण्यासाठी … रेफ :
जमाना बडा जालीम था… मग जमान्यासारखे झालो नंतर
टू गेट आक्प्सेटेड बाय सरौन्डींग फॉना …

वेल्लाभट 18/05/2015 - 13:28
लेखातील कळकळ पोचली. कॅप्टन असे विषयही हाताळतात ठाऊक नव्हतं. ते; पाळवादीच रहा बरं का. पळवादींची गत जी व्हायची ती होतेच त्यांच्या दुर्दैवाने. आज ना उद्या. We belong to the same club.

टवाळ कार्टा 18/05/2015 - 13:40
यात थोडी आणखी भर हॉर्नसुध्धा न देता डावीकडून ओव्हरटेक करणारे कारवाले डावीकडून ओव्हरटेक करून मग उजवीकडे जाणारे कारवाले हॉर्नसुध्धा न देता उजवीकडून ओव्हरटेक करणारे कारवाले उजवीकडून ओव्हरटेक करून मग डावीकडे जाणारे कारवाले कोणताही रिक्षावाला $*&#$%$#@

वेल्लाभट 18/05/2015 - 14:06
कसं आहे; आयुष्याचं बघा. मिळेल त्या लेन मधे माणसाला अ‍ॅडजस्ट व्हावंच लागतं. संधी मिळेल तिथे कमी अधिक वाव असतानाही पुढे जावंच लागतं. नाहीतर आयुष्यात मोठं होता येत नाही; प्रगती साधता येत नाही. रस्त्यावरही अडमुठेपणा कामी येत नाही. मी राईट लेन मधूनच जाणार; तिथेच जागा दिली पाहिजे असा हेकेखोर पणा आपण करतो आपण मूर्ख. ही लोकं बघा; किती अ‍ॅडजस्ट करणारी आहेत, जुळवून घेणारी आहेत. मिळेल त्या लेन मधे जातात मिळेल तितक्या जागेत सुखेनैव गाडी हाकतात. यांच्याकडून शिकायला हवं ! LOL

मराठी_माणूस 18/05/2015 - 14:34
सगळ्यात चीड आणणारे म्हणजे सिग्नल न देता वळणारे. वाहन बनवणार्‍यांनी सुवीधा दीलेली आहे ना? मग वापराना. पण हे वापराणार नाहीत, आपले वळण आले की लगेच वळवुन मोकळे.बर आपण हॉर्न वाजवुन निषेध व्यक्त केला की आपल्याच कडे रागाने बघणार

In reply to by मराठी_माणूस

मिसळलेला काव्यप्रेमी 18/05/2015 - 15:47
त्याही पेक्षा विनोदी महाभाग असतात. उजवीकडाचा सिग्नल देऊन झोकात डावीकडी वळणारे. आणि मागून हॉर्न वाजलाच तर "येडा आहे कां रे तू?" असे बघतात.

स्पंदना 18/05/2015 - 14:41
काय हे कलियुग!! मित्राच्या जीवाला जीव देण्याऐवजी, उलट त्याच्यावर लेख पाडुन राह्यला तुम्ही? मित्रांनी कुणाच्या तोंडाकडे पहावे अश्यावेळी?
मस्त लिखाण, विनोदी पद्धतीने खराब व्यवस्थेचे अतिशय परखड विश्लेषण.खरच पूर्ण व्यवस्था खराब झाली आहे, आता पहाना महेश झगडे साहेबांना सुद्धा उचलले. कधी कधी वाटते बेशिस्त आणि लबाडी आपल्या रक्तात आहे. खरच कधी कधी खूप कंटाळा येतो, जाऊदे

संदीप डांगे 18/05/2015 - 15:22
सिग्नलवर ३०-४० सेकंद थांबण्याचा धीर नसणारे लिफ्टला लागणारा तेवढाच वेळ सहन होत नसल्यास ज्या मजल्यावर असतात तिथून डायरेक्ट खाली उडी मारतात का? त्यांना असे करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.

पॉइंट ब्लँक 18/05/2015 - 17:09
लै कळकळीनं लिहिलं आहे. मी सर्व नियम पाळतो. सर्व नियम पाळून ही मज्जा करता येते. १. सिग्नलवर थांबून सिग्नल हिरवा झाला रे झाला की गाडी सुसाट सोडून बाकिच्या सर्व गाड्यांना सोडण्यात जी मजा येते त्याला खरच तोड नाही. मनून सिग्नल पाळलाच पाहिजे. २. हेल्मेट ही दुधारी तलवार आहे. आपले रक्षण तर करतेच प्रसंगी दुसर्याच्या डो़क्यात घालून त्याच्या डोक्यावर टेंगू आणण्यास लै उपयुक्त. मनून हेलमेट जरून वापरा. 3. कट मारणे बेकायदेशीर आहे असे वाचनात नाही. त्यामुळे त्यावर वाद टाळण्यात येत आहे.

In reply to by पॉइंट ब्लँक

श्रीरंग_जोशी 18/05/2015 - 19:58
कट मारणे हे तांत्रिकदृष्ट्या बेकायदेशिर नसेल पण ते प्रसंगी बेजबाबदार असू शकते. बरेचदा कौशल्यवान कट मारणारा तर सटकून जातो पण सरळपणे गाडी चालवणारा अपघातग्रस्त होतो. मागे सिंहगड रस्त्यावर रस्त्याच्या कोपर्‍यातून एक आजोबा आपल्या नातवासोबत अ‍ॅक्टिव्हाने शिस्तीत चालले होते. मागून एक पल्सरवाला वेगात आला अगदी कमी जागेत अन कट मारून अचानक पुढे निघून गेला. त्याचा हलकाच धक्का आजोबांच्या गाडीला लागला अन ते डाव्याबाजूला पडले. नातू व आजोबा दोघेही चांगले जखमी (गंभीर नसले तरी) झाले. पल्सरच्या आगमनानंतर दुचाकीस्वारांची याप्रकारची बेशिस्त खूपच वाढली असे माझे निरिक्षण पुन्हा एकदा मिपावर मांडतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

पॉइंट ब्लँक 18/05/2015 - 21:04
असाच एक माझा अनुभव, एका यामाहा चालवणार्या आजोबांनी कट मारून मला पाडले होते आणि नंतर स्वतःच थरथर कापत उभे होते. पडलो मी होतो पण त्यांची अवस्था पाहून मीच त्यांना आजोबा ठिक आहात ना म्हणून धीर द्यायची वेळ आली होती. दुसर्याला धक्का न मारता कट मारणे हे स्किल तसं अवघड आहे. पण बेंगलोरात हे स्किल न वापवरल्यास प्रवास वेळ दिड पटीन वाढू शकतो. एकंदर मोठ्या शहरांंमध्ये दुचाकी चालवणं फार अवघड काम होऊन बसलं आहे. ट्राफीक मध्ये अडकून धुर, धुरळा, ऊन ह्याचा सर्वात जास्त त्रास दुचाकीवाल्यांना होतो. मग संयम सुटणे हे साहजिक आहे. त्यांमुळे बेजबाबदार गाडी चालवण्याचं प्रमाण वाढलं आहे. दुचाकीवाल्यांच्या कुठल्याही बेजबाबदार वर्तनाचं समर्थन मला करायचं नाही, पण त्यांना कायदे तोडण्यासाठी प्रोत्साहन कसे मिळते ह्याचा विचार व्हायला हवे असे माझे मत आहे.

In reply to by पॉइंट ब्लँक

श्रीरंग_जोशी 18/05/2015 - 21:15
शनिवारवाड्याशेजारून शिवाजी रस्त्याने ट्रॅफिक असल्यामुळे मी युनिकॉर्नवरून २० ~ २५ वगैरेच्या स्पीडने चाललो होतो (अर्थात सरळच). एक मध्यमवयीन गृहस्थ हिरो होंडा सिडी १०० वर (मागिल सीटवर मध्यमवयीन महिला) उजव्या बाजुने माझ्या कदाचित दुप्पट वेगात आले. मला कट मारून लगेच शनिवारवाड्याच्या मागच्या गल्लीत उजवीकडे वळाले. आयुष्यात प्रथमच मी दुचाकी गाडी चालवताना पडलो. गुडघा पुढचे तीन चार दिवस दुखला. नशिब ट्रॅफिक बरेच असल्याने मागून येणारे हळू येत होते. त्यांना ब्रेक मारून थांबायला संधी मिळाली. आजवर दुचाकी चालवताना मला झालेला एकमेव अपघात आहे हा. माझ्यामुळे इतरांचा अपघात झाल्याचेही कधी घडले नाही.
हेल्मेट चालवून गाडी चालवतोस त्यामुळे तुझं आजूबाजूला लक्ष ठेवणं कठीण जातं असं इथल्याच एका महान विभूतिंनी मला सांगितलं होतं. पंधरा दिवस त्या हेल्मेटशिवाय गाडी चालव, बघ कसा कॉन्फिडन्स येतो. ही आणिक भर होती त्यात. आता अगदी वार्‍याशी पैज लावणारी नसली तरी पोटापुरती बाईक चालवता येते आणि हेल्मेट वापरल्यामुळे त्यात शष्प काही फरक पडला नाही.

In reply to by सूड

स्वप्नांची राणी 22/05/2015 - 14:09
'तुम्ही परदेशातले डरपोक लोक, खरं म्हणजे तिथल्या दंडाला घाबरुन नियम पाळता... ईकडे बघा आम्ही शुरवीर शष्प घाबरत नाही...' असं मलाही ईथल्याच महान विभूतींनी सांगीतलं होतं..

पैसा 18/05/2015 - 18:50
कणकवलीच्या बाजारात माझ्या नवर्‍याने वॅगन आर अगदी स्लो ठेवली होती. समोरून येणारे आडवे तिडवे ट्रॅफिक आपल्याला धडकू नये म्हणून डाव्या बाजूची लाईन पकडून गाडी हळू पुढे सरकत असताना अचानक डाव्या बाजूच्या मातीतून एकजण मोटारसायकल वरून आमच्या गाडीला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत होता. बहुधा मातीत तो घसरला आणि आमच्या गाडीला हँडलने २/३ ओरखडे काढून गाडीच्यापुढे रस्त्यावर येऊन थांबला आणि अरेरावी सुरू केली. मोठी गाडी घेऊन फिरता म्हणजे स्वतःला कोण समजता? गाडी अशी आणून मारायची ही काय पद्धत झाली? हे वाक्य ऐकून मला खरं तर मरणाचं हसू यायला लागलं. आता काय ट्रक आणून मारू का म्हणून विचारणार होते. तेवढ्यात अजून दोन बघे येऊन उभे राहिले. तेव्हा आपण नारबाच्या वाडीत आहोत हे लक्षात घेऊन नवर्‍याने त्याला नमस्कार घातला. माझं साफ चुकलं. तुम्हाला लागलं नाही ना, आता जाऊ का म्हणून आम्ही पुढे निघालो. मी म्हटले की तू चूक नसताना कशाला कबूल केलेस? आपली गाडी बरोबर असायला पाहिजे तिथे होती. हा दीडशहाणा डाव्या बाजूने ओव्हरटेक करून दमदाटी करतो म्हणजे काय? पोलिसाला बोलाव म्हणून सांगायला हवं होतं. नवरा म्हणाला, एकतर आपण सिंधुदुर्गात आहोत. गोव्यात नव्हे. इथे कायद्याचं राज्य नाही. आणि स्थानिक पब्लिक चूक कोणाची पद्धत वगैरे न बघता गाडीवाल्यांना मारायला सुरुवात करतात. हे ऐकून माझी बोलती बंद.

In reply to by पैसा

कॅप्टन जॅक स्पॅरो 18/05/2015 - 18:56
हेचं हो. हे असले नियम पाळणारे सुटुन जातात. कालचं एच.ए. आणि पिंपरी चौकाच्या दरम्यान एका फॉर्च्युनरचा अ‍ॅक्सीडेंट पाहिला (होताना नव्हे होउन गेल्यावर). फॉर्च्युनर सारख्या रणगाड्याची झालेली दुरावस्था बघुन तो किती वेगात असावा ह्याची फक्त कल्पना करु शकतो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पैसा 18/05/2015 - 19:48
>>> हे असले नियम पाळणारे सुटुन जातात. कुठे हो! गाडी शिस्तीत डाव्या कडेने चालवल्याबद्दल आमच्या गाडीला २/३ ओरखडे पडेल. आम्हाला मार खायची वेळ आली होती आणि डाव्या बाजूने ओव्हरटेक करणारा वर दमदाटी करतो. काय अवस्था आहे!

In reply to by पैसा

कपिलमुनी 19/05/2015 - 15:17
तुझा बरोबर असे म्हणून पुढे चालणे श्रेयस्कर !
आणी तिही बरोबर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात.सर्वात गमतीचा भाग तिनही वेळा मी सिग्नला उभा होतो.मागच्याला गाडी कंट्रोल झाली नाही आणी साहेब गाडीवर येवुन आदळले. १)पुण्यात कलेक्टर ऑफिसमधुन बाहेर आलो.सन अ‍ॅण्ड सनच्या अगोदरच्या चौकात सिग्नला थांबलो,मागुन एका सन्मानिय खासदार साहेबांच्या बंधुंची गाडीने जोरदार धडक दिली, नशिब सिट बेल्ट लावला होता नाहीतर स्टेरिंगवर आपटलो असतो.शांतपणे खाली उतरलो, मागे जावुन म्हटले काका गाडी बाजुला घ्या.काकांनी गाडी बाजुला घेतली व सांगितले आमक्या आमक्याचा बंधु आहे.म्हटल ठिक आहे.आमच्या बारक्याला एक फोन केला म्हटल ये बाबा इथे तुझी गरज आहे.गडी त्याचे १०-१२ कार्यकर्ते घेवुनच आला.तोपर्यंत मीही आपल सभ्य डॉक्टर सारख कार्ड देवुन काकांना आश्वस्थ केल होत.त्यामुळे आता काही भरपाई द्यावी लागत नाही म्हणुन काका जरा आवाज चढवुनच बोलत होते.तेव्हड्यात आमचे धाकट्या बंधुवर्यांच आणी मेव्हण्यांच आगमण झाल आणी काका बिथरले.त्यांनी डायरेक्ट खासदार साहेबांनाच फोन केला आणी सांगितल की त्यांना मारयला मुल आली आहेत.नशिब आमच, खासदार साहेब खरच समजुतदार होते.त्यांनी स्वतःच्या भावाला मला फोन द्यायला सांगितला व काय झाल ते विचारले.त्यांना सर्व परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी एकच वाक्य विचारल, डॉक्टर' तुमच्या पोरांनी माझ्या भावाला धक्का तर लावला नाही ना ? म्हटल, सरजी अजिबात नाही. त्यावर सरजी म्हटले त्यांना जावु द्या मी पाहतो काय करायचे ते. आणी खरच त्यानंतर १५ मिनिटात त्यांचा मॅनेजर माझ्या गाडीच्या शोरुमच्या माणसाला घेवुन आला. गाडीचे २ तासात इन्सपेक्शन झाले,मॅनेजरने सगळी अमांउट भरली,८ दिवस मला बदली गाडी दिली.आणी ८ दिवसाने गाडी तशीच्या तशी मिळाली(वि.सु.खासदार साहेब,शिवसेनेचे होते. काँग्रेस-राष्ट्रवादीचे असते तर....) २)परत पुढच्या वर्षी जानेवारीचा शेवटचा आठवडा,रात्री १० वाजता माझी ओपिडी बंद करुन बायकोला घ्यायला तिच्या ओपिडीकडे निघालो होतो.तिच्या क्लिनकच्या जवळच्याच सिग्नला थांबलो,माझ्यामागे एक मारुती व्हॅन थांबली.आणी अचानक खराडी आयटी पार्क मधली एक २५-३० वर्षाची कन्यका काय विचारात होती माहित नाही,पण जबरदस्त वेगाने येवुन तिच्या झेन एस्टीलो ने माझ्या मागची व्हॅन उडवली ती व्हॅन उडुन माझ्या गाडीवर.झाला सत्यानाश.खाली उतरलो तर बघतोय,तर मधल्या व्हॅनमधला ड्रायव्हर घाबरुन गुरासारखा ओरडत होता,त्याला जरा शांत करुन त्याच्या गाडीत पाहिले तर आतमध्ये त्याची ९ महिने गर्भार बायको,घाबरुन मागच्या मधल्या सिटवर दातखिळी येवुन पडलेली.तिच्या तोंडावर पाणी मारल्,लगेचच बाई जागेवर आली.त्याला शांत केला.मागच्या गाडीकडे वळलो तोपर्यंत रस्त्यावरच्या पब्लिकने ती गाडी घेरली होती व ड्रायव्हरला बाहेर खेचन्याचा प्रयत्न चालु होता. डोकावुन पाहिले तर आतमध्ये थरथर कापणारी आयटीवाली तरुणी. जमाव नियंत्रणाबाहेर हे लक्षात आल आणी पहिला फोन पोलिसांना लावला. आणी दुसरा परत एकदा बारक्याला म्हटल ये बाबा लवकर.पोलिस एतायेत हे एकल्याबरोबर पुढचे जरा शांत झाले,तेव्ह्ड्यात एक झोपडपट्टी दादा टाइप टग्या हातात लोखंडीबार घेवुन त्या पोरीच्या गाडीसमोर आला आणी त्याक्षणी मी नाविलाजास्तव कंबरेला खोचलेले रिव्हाल्वर बाहेर काढले. नशिब त्याच वेळी घटनास्थळी पोहचलेल्या माझ्या छोट्या बंधुनी व मित्रांनी जमावाला पांगवायला सुरुवात केली.हा सगळा प्रकार मोजुन १० ते १५ मिनिटात घडला होता.त्यानंतर ५-१० मिनिटात पिक्चर प्रमाणे २ पोलिसमामा तेथे आले.त्या कन्येला गाडीतुन बाहेर काढले,या सर्व घटनेत कुनालाही साधे खरचटले सुद्धा नव्हते फक्त तिनही गाड्यांचे प्रत्येकी ३०-४० हजारांचे नुकसान झाले होते. त्यानंतर त्या मुलीचा भाउ आला,त्याने सगळ्या गाड्यांची नुकसान भरपाई कबुल केली आणी दिली देखिल.त्याच्या बहिनीला जमावाच्या तावडीतुन वाचवल्या बद्दल व पोलिसकेस न केल्याबद्दल मात्र तो वारंवार आभार मानत राहिला. ३)ही घटना याच वर्षी घडली पण माझ्या चांगुलपणाबद्दल मलाच जास्त त्रास झाला. परत जानेवारीचाच शेवटचा आठवडा.शिवाजीनगरच्या गाडीच्या शोरुम आणी सर्विसिंग सेंटर मधुन चार दिवस सर्विसिंगला सोडलेली गाडी घेवुन बाहेर पडलो, शिमला चौकात नगररोडला वळण्यासाठी तेथेच पोलिसचौकीसमोरच्या सिग्नला थांबलो आणी एक टुरिस्ट क्रमांक असलेल्या महिंद्रा झायलोने गाडी मागुन येवुन उडवली.पोलिसासमोरच गाडीला डॅश बसला त्यामुळे मीही जरा हादरलोच होतो.साइड पॉकेटमध्ये असलेल्या गनला हात घालुन बाहेर उतरणार तर आरश्यात पोलिसमामाने मागच्या ड्रायव्हरच्या कॉलरला धरुन गाडीतुन बाहेर खेचताना दिसला.मग म्हटल चला हा नक्की अपघातच त्यानतंर १०-१५ मिनिटांचा सावळा गोंधळ. मग पोलिसांनी झायलो वाल्यावर केस दाखल करायची तयारी सुरु केली आणी अचानक बाबाने समजुतीने घेण्याचे ठरवले,व तुमचे बिल मी भरतो केस करु नका गंमत पुढेच होती त्या गाडीत एक महिला होती.त्या बाई पोलिस केस होत आहे हे पाहुन एकदम शांत होत्या. जेंव्हा मी केस मागे घेण्यास कबुल झालो व आम्ही परत फिरुन मागे शोरुमला आलो.शोरुमवाल्याने दुरुस्तीचे ४५ हजाराचे बिल लावले.आणी बाईसाहेबांचे कंट्रोल सुटले.तोपर्यंतच्या बोलण्यातुन अस्मादिक डॉक्टर आहे हे त्यांना कळले होते,व काही मिपाकरांच्या म्हणन्याप्रमाणेच सर्व डॉक्टर हरामखोर असतात आणी लोकांना लुबाडणे हाच त्यांचा एकमेव धंदा असतो,आणी आम्ही आता पैसे भरणार नाही.असे सांगुन बाईने सर्विसिंग सेंटर मध्ये भयानक शिविगाळ सुरु केली.अर्धा तास तो प्रकार सहन करत होतो. सर्विसिंग सेंटरचा फ्लोअर मॅनेजर , रिलेशनशिप मॅनेजर इतर सर्व स्टाफ डो़क्याला हात लावुन सगळ पहात होते.बाईमाणुस समोर , साला शिव्यापण देता येइनात,तेव्हड्यात तिचा नवरा कम ड्रायव्हरने एक चुक केलीच बाबा अंगावर धावुन आला.सर्विसिंग सेंटरला सिसि टिव्ही होते. म्हटल बर झाल सगळा प्रकार ऐता रेकॉर्ड होतोय. जसा समोर आला तशी भाउच्या १८० च्या कोनात एकच कानफाटातीत ठेवुन दिली आणी तिथल्या मॅनेजरला सांगितले कॉल द पुलिस.बस मात्रा लागु पडली. पोलिस डिपार्टमेंट मध्येच वरिष्ठ अधिकारी असलेल्या मित्राला अपघाताच्या ठिकाण सांगुन तेथे ड्युटीवर असणार्‍या पोलिसमामाला पाठवुन द्यायला सांगितले,मग मात्र माझ्या प्रोफेशनच्या नैतिकतेची गळ घालुन निम्मे पैसे भरुन त्या दांपत्याने तेथुन पोबरा केला. हा सगळा प्रकार खरच सहनशक्तीच्या पलिकडचा होता.चुक त्याची,ती बाई मलाच शिव्या घालतीये,बर वर नुकसान भरपाईची वेळ आल्यावर माझ्या व्यवसायाला शिव्या घालुन त्याच व्यवसायाच्या नैतिकतेचे धडे देतिय. माणस एव्हडा नालायकपणा कसा करु शकतात.त्यात सगळ्यात चिड आली त्या बाईच्या नवर्‍याची हरामखोर स्वतःत काही हिंमत नव्हती बायकोला पुढे करुन ह्या गोष्टी करत होता.आज पर्यंत एव्हडा मनःस्ताप कधीच झाला नव्हता.

In reply to by बाबा पाटील

कॅप्टन जॅक स्पॅरो 18/05/2015 - 22:11
तुमचं नशिब चांगलं म्हणुन फक्त गाडीच्या नुकसानीवर निभावलं. शारिरिक इजा अतिशय बेक्कार.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाखु 19/05/2015 - 08:48
रस्त्यावरच्या किरकोळ अपघातातही स्वघोषीत गल्ली दादा आणि चिर्कुट (फ्लेक्ष फेम) चिंधीचोरांचा जास्त त्रास होतो हे अनुभवले आहे.

In reply to by बाबा पाटील

श्रीरंग_जोशी 19/05/2015 - 20:01
बाप रे, एकाहून एक डेंजर अनुभव आहेत... या उदाहरणाच्या विरुद्ध उदाहरणाचे कथन चेतन गुगळे यांनी लिहिले आहे. हकीगत एका अपघाताची - , , , .

In reply to by बाबा पाटील

मिहिर 21/05/2015 - 11:21
आमच्या बारक्याला एक फोन केला म्हटल ये बाबा इथे तुझी गरज आहे.गडी त्याचे १०-१२ कार्यकर्ते घेवुनच आला
साइड पॉकेटमध्ये असलेल्या गनला हात घालुन बाहेर उतरणार
डॉक्टर आहे की गुंड?

In reply to by मिहिर

नाखु 21/05/2015 - 11:46
आणि मग ठरवा नक्की गुंडगिरी होती का प्रसंगावधान!
स्वगत :
निवडक पिवळी पत्रकारीता
मिपावर पण आली आहे काय???

In reply to by मिहिर

डॉक्टरने त्याच्या पांढरपेशानुसार स्वतःची चुक नसताना रस्त्यावर मार खायचा की स्वतःचा पानसरे अथवा दाबोळकर करुन घ्यायचा. शिक्षक अथवा डॉक्टर यांनी फक्त अन्यायाविरुद्ध लिहावे अथवा बोलावे प्रत्यक्ष प्रतिकार करु नये असा काही अलिखित कायदा आहे का ?

In reply to by बाबा पाटील

मिहिर 21/05/2015 - 20:23
प्रतिकार करू नये असे नव्हे, पण प्रतिकाराची सुरुवात खिशातल्या गनला हात घालून करणे हे जास्त वाटत नाही का?

In reply to by बाबा पाटील

हाडक्या 21/05/2015 - 21:38
जौ द्या हो डॉक.. :) (मिहिरबाबा दंबूक असलेला प्रत्येकजण गुंड नसतो हो.. सर्वसाधारणपणे आपल्या आपल्या समाजात या संकल्पना बर्‍यापैकी बाळबोध आहेत असे नमूद करतो. आणि गुंडगिरी दंबूकीशिवाय पण करता येतेच की )

कॅप्टन जॅक स्पॅरो 20/05/2015 - 08:12
सकाळी सकाळी एक बाई डोक्यात गेली आज. लहान मुलाला अतिशय बेजबाबदारपणे हँडल आणि स्कुटीच्या सीटच्यामधल्या पाय ठेवायच्या जागेत उभं केलेलं आणि अचानक ब्रेक लावायला लागल्यावर त्या मुलाचं तोंड आपटलं समोर. नाकाला चांगलाचं मार लागला असणार.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

श्रीरंग_जोशी 20/05/2015 - 08:35
भावना समजू शकतो कॅप्टन पण आपल्या देशात मुलभूत जाणिवेचीच कमतरता असल्याने आपण कितीही संवेदनशील असलं तरी उपयोग नाही. (जाने २००५) मी पुण्यात नवा असताना आयुष्यात कुणाला प्रथमच अपघातात मरताना पाहिलं होतं. वाकडेवाडीच्या माझ्या हापिसच्या गच्चीत आम्ही ५ वाजता कॉफी पित उभे होतो. तेव्हा जुन्या हायवेवर डीव्हायडर्स पूर्ण लागले नव्हते. सिओइपी जवळचा सिगनल सुटला असावा. लांबून वेगात गाड्या येत होत्या एवढ्यात एका मेटॅडॉरच्या ड्रायव्हरला फटकन यु टर्न मारायची दुर्बुद्धी झाली. सिग्नलवरून येणार्‍या गाड्यांमध्ये एक पल्सर रेसच्या आवेशात कदाचित ७० किंवा ८० च्या वेगाने येत असताना तिच्या चालकाला बहुधा ब्रेक दाबायचीही संधी मिळाली नाही. पल्सर रस्त्यावर त्या क्षणी आडवा असणार्‍या मेटॅडॉरच्या खाली गेली असावी. तो चालक अक्षरशः सिनेमातील स्पेशल इफेक्ट्समध्ये दिसतं तसा रस्त्यावरून आडवा घासत गेला. पण तेवढ्यातही त्याने कौशल्याने डोके रस्त्यावर आपटू किंवा घासू दिले नव्हते. त्याच्या गाडीवर मागच्या सीटवर बसलेली त्याची बायको एवढी सुदैवी नव्हती. तिच्या अंगावरून मेटॅडॉरचे मागचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. नंतर काही दिवसांनी तिथल्या ऑटोवाल्याकडून कळले की पल्सरचालक व्यवसायाने पायलट होता. नंतर बरेच आठवडे संचेतीमध्ये अ‍ॅडमीट होता.

कॅप्टन जॅक स्पॅरो 07/01/2016 - 19:11
एकाचं गाडीवाल्यानं किती नियम मोडावेत ह्याचं हैट्टं उदाहरण आत्ता हापिसामधुन येताना पाहिलं. प्राधिकरणातल्या म्हाळसाकांत चौकामधे मी आकुर्डी कडुन संभाजी चौकाकडे घरी चाललेलो. आधीचं तो रस्ता अरुंद, त्यामधे भाजीवाल्यांसमोर भाजी घेणारे लोक्स रस्ता आपल्याचं जन्मदात्याने आपल्याला भेट दिलाय अश्या रितीने गाड्या लावतात. जेमतेम एक लेन कशीबशी चालु असते. रस्त्याच्या मधल्या भागामधुन मी चाललेलो. एक स्कुटी/ प्लेजर छाप गाडीवाला दिवा नं लावता उलट्या बाजुनी थेट समोर आला. नशिबानी मी हळु होतो त्यामुळे धडकला नाही. त्याला सुनावायसाठी गाडी साईडला घेतली आणि त्याच्याकडे पाहिलं. त्याच्यावर चिडचिड झालेलीचं होती पण आता ह्या बाबाजीला शिव्या घालाव्यात, त्याच्याकडे बघुन हसावं का तिथल्याचं रस्त्याच्या डिव्हायडरवर डोकं आपटुन जीव द्यावा अशी अवस्था झाली एवढे नियम बाब्यानी मोडले एका फटक्यात. R.T.O. ऑफिसर असतो तर "आनंदी आनंद गडे" वगैरे गाणीसुद्धा म्हणली असती पावत्यांचा हिशोब मनातल्या मनात करुन. १. गाडी चालवणारा बाब्या हा बाब्या नसुन किरकोळ १३-१५ वर्षाचं कार्टं होतं. २. बाब्याचा काडीपैलवान बाप्या बापुडवाणा चेहेरा करुन मधे बसलेला. बाप्याची बायको अर्थात कथानायकाची आईस कथानायकाच्या बाळबंधु किंवा भगिनीस कडेवर घेउन रडं थांबवायसाठी जोरजोरात धोपटतं होती. ३. गाडीच्या पुढच्या भागामधे जिथं साधी सरळ सज्जन माणसं आपल्या तंगड्या ठेवतात तिथे मोठी गाठोडी/ गाठोडं ठेवलेलं ४. गाडीचा दिवा गाडीवाल्या दिवट्यानी बंद का ठेवला असावा? कारण गाडीचा दिवा स्वतःची खोबण सोडुन खाली लोंबत होता. ५. कारटं हेल्मेट नं घालता गाडी रेमटवतं होतं. ६. गाडीला नंबरप्लेट नावाची एक क्षुल्लक गोष्ट आवश्यक असते हे गाडी चालवणार्‍या बालकपालकाच्या गुढग्यामधे आलं नसावं. ७. गाडीनी अजुन थोडा जास्तं धुर सोडला असता तर भोपाळ दुर्घटनेला लाजवेल अशी गॅस दुर्घटना घडायचा चान्स होता. ८. रस्ता आपल्या बा...वडीलांचा असल्यासारखा चुकीच्या बाजुने चालवत होता. बहुतेक आर.टी.ओ. चे सगळे नियम मोडायचा चंग बाळराजेंनी बांधला असावा. बाकी गाडीची कागदपत्रे, पी.यु.सी. नसणारचं ह्याची खात्री आहे. आता गाडी चोरीची नसली म्हणजे मिळवलं. कोपरापासुन नमस्कार हाणला आणि मुकाट घरी आलोय.

नुस्त्या उचापती 08/01/2016 - 01:50
आपल्या देशात सर्वांना पुढे जाण्याची घाई असते , पण वेळेवर मात्र कुणीच जात नाही . असो ...... लोकशाही आहे तेव्हा चालायचेच .

अभिजीत अवलिया 08/01/2016 - 20:00
मी रोज कोथरूड ते मगरपट्टा आणी परत कोथरूड असा प्रवास करतो. अतिशय भयानक अनुभव असतो रोजचा. कट मारत जाणे, सायकल घेऊन फास्ट लेन मधून जाणे, झेब्रा क्रोस्सिंगच्या पुढे जाऊन उभे राहणे, उलट्या दिशेने गाडी चालवणे किती ते नानविध प्रकार. काही महाभाग तर लाल सिग्नल लागला की विरुद्ध दिशेच्या लेन मध्ये येउन थांबतात. नंतर पटकन जायला मिळावे म्हणून. पण ह्याने बाकी सर्वाना किती त्रास होतो ह्याची जराही तमा नाही. लोक एवढे जीवावर उदार होऊन गाडी कशी चालवू शकतात हेच समजत नाही. आता सगळ्या चौकात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आहेत. तरी देखील लोक जुमानत नाहीत हे पाहून खूप चिडचिड होते. कुणीही कितीही वल्गना केल्या तरी आपला देश सुधारेल असे वाटत नाही. .

In reply to by अभिजीत अवलिया

सूड 08/01/2016 - 20:09
कुणीही कितीही वल्गना केल्या तरी आपला देश सुधारेल असे वाटत नाही. .
रविवारी दीर्घवीकांतानंतर घरी चाललो होतो. स्वारगेटला लाल सिग्नल पडला. एका स्कूटीवाल्याने एमेच १२ वाला असूनही शिस्तीत गाडी थांबवली. बाकीच्या गाड्या एकदोन एकदोन करुन जातच होत्या. मी ज्यात बसलो होतो ती रिक्षा नेमकी ह्या थांबलेल्या स्कूटीवाल्याच्या मागे होती. त्याने हॉर्न देऊन देऊन त्याला गाडी बाजूला घ्यायला लावली आणि 'एवढे नियम पाळत बसलं तर कसं व्हायचं' असं स्वत:शीच म्हणत गाडी रेमटली.

संदीप डांगे 10/01/2016 - 23:42
नुकतंच मागच्या दोन आठवड्यात ओळखतल्या लोकांचे तीन अपघात समजले. १. केस वनः एका क्लायंटच्या ऑफिसमधील नवविवाहित अकाउंटंट, नवर्‍यासोबत मागे बसलेली, सिग्नलला सगळे बाइक्स निघाले. कुणाचा तरी धक्का लागला, कसा माहित नाही. त्यांची स्कूटी हिंदकळली. ही जरा वजनदार. तोल जाऊन डिवायडरवर आदळली. समोरचे चार-सहा दात अर्धवट कापले गेले, भुवईला एक खोक पडली. पायाला चांगलंच लागलं. आता अजून एखादा महिना लिक्विड डायटवर असणार. रुट्कॅनालचा खर्च काहीतरी चाळीस-पन्नास हजार सांगितला आहे. मी म्हटले, "हेल्मेट नव्हतं म्हणून बघ तुला महागात पडलं. अपघात होतातच, पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे ना?" तीने होकारार्थी मान डोलावली. परत त्याच संध्याकाळी परत त्याच स्कूटीवर विना-हेल्मेट, (त्याच*) पतीच्या मागे बसून गेली. २. केस दोनः ह्याच देवीचा कोणी नातेवाईक. हेल्मेट नसल्याने बाइकवरून पडून मरण पावला. हा किस्सा तीनेच सांगितला, तरी संध्याकाळी बघितले तेव्हा तिच्या स्वतःच्या नवर्‍याकडेही हेल्मेट नव्हते. ३. केस तीनः ह्याच ऑफीसमधला ऑफिसबॉयच्या काकांची. डोकं दुखतंय म्हणून बायकोला फोन केला की मी मेडिकलमधून गोळ्या घेऊन घरीच येतोय, आराम करायचाय, खूप डोकेदुखी आहे. रस्त्यात बाईक चालवता चालवता चक्कर येऊन बाइकसह पडला, पडला तो थेट दगडावर, जागीच गतप्राण. वय ३२-३४, मागे एक वर्षाचं मूल सोडून गेलाय. ऑफिसबॉयला म्हटलं, काय रे हेल्मेट का नाही वापरलं त्यांनी, तर म्हणे, अहो सर, खेड्यात कुठे हेल्मेट-वैगेरे... मी म्हटलं, तुम्ही लोक हेल्मेट पोलिसांसाठी घालायचं असतं हा विचार केव्हा सोडणार? साहेबांनी मान डोलावली आणि आपल्या बाइकला किक मारून निघून गेला. अर्थात हेल्मेट न घालता. हजार रुपयाचं हेल्मेट न घालून स्वतःचा जीव धोक्यात घालवतोय हे ह्या मूर्खांना केव्हा कळणार? नियम केला की तो मोडलाच पाहिजे हे आपल्या भारतीयांच्या जणू रक्तात भिनलंय, भले तो स्वतःच्या जीवावर, दुसर्‍याच्या जीवावर, देशाच्या सुरक्षेवर बेतला तरी चालेल. त्या तिघांनाही हेल्मेट गिफ्ट करावं का असा विचार करतोय... (त्याच पतीच्या: ज्या पतीला एवढा जीवघेणा प्रसंग आपल्या पत्नीवर ओढवूनही तीच्या-आपल्या सुरक्षेबाबत अक्कल आली नसेल त्या पतीला घटस्फोट का देऊ नये असा उद्विग्न विचार मनात आला, इथे कुठलाही पीजेसदृश्य विनोद अपेक्षित नाही.) अजूनही सीटबेल्ट न वापरणार्‍यांना एक अनुभवाचा सल्ला: गाडी जेव्हा वळणे घेत असते तेव्हा शरिराचा तोल जाऊन आपल्याला बराच त्रास होतो, सारखे कुठेतरी धरून राहावे लागते, ताण येतो. सीटबेल्ट लावल्यास, अचानक वळणांच्या धक्क्यानी, गचक्यांनी सीटबेल्ट अ‍ॅक्टीवेट होऊन शरीर सीटलाच बांधले जाते, हे फार नकळत होते व शरीरावरचा ताण ६०-७०% टक्क्यांनी कमी होतो. किमान ह्यायोगे तरी आपण सीटबेल्ट वापरायला सुरुवात कराल अशी अपेक्षा आहे. पोलिसमामाला चिरिमिरी द्यावी लागनार नाही हा अ‍ॅडेड अ‍ॅड्व्हांटेज आहे. जीव वैगेरे वाचणे ही फारफेच्ड अपॉर्चुनिटी किंवा फ्रिंज बेनेफिट आहे, त्याचा विचार नकोच, नाही का?

In reply to by संदीप डांगे

असंका 11/01/2016 - 16:58
सीटबेल्ट लावल्यास, अचानक वळणांच्या धक्क्यानी, गचक्यांनी सीटबेल्ट अ‍ॅक्टीवेट होऊन शरीर सीटलाच बांधले जाते, हे फार नकळत होते व शरीरावरचा ताण ६०-७०% टक्क्यांनी कमी होतो.
+१ एस टी ला असे सीटबेल्ट्स का नसतात!!! :-(

सामान्यनागरिक 11/01/2016 - 00:58
हेल्मेटसक्ती सर्वप्रथम पोलिसापासून होऊ द्या. त्यानंतर सर्व सरकारी नोकरांना सक्ती करा. त्यानंतर सगळ्यांवर करा. आपोआप नागरिकही हेल्मेट वापरू लागतील. हेल्मेटविना अपघात झाल्यास विम्याची रक्कम मिळणार नाही असा नियम करा.

In reply to by सामान्यनागरिक

श्रीगुरुजी 11/01/2016 - 14:06
हेल्मेटची सक्ती नसावी. ज्याला/जिला वापरायचे त्यांना वापरू देत. ज्यांना वापरायचे नाही त्यांच्यावर सक्ती नको.

In reply to by जिन्क्स

श्रीगुरुजी 11/01/2016 - 20:22
मला हेल्मेटचा त्रास होतो. आधीच मानेच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली आहे. हेल्मेटमुळे मणक्यावर भार येतो. हेल्मेटमुळे विशेषतः उन्हाळ्यात चेहरा व केस घामाघूम होतात व त्याचा भरपूर त्रास होतो. हेल्मेट लावल्यावर कमी ऐकायला येते हा अजून एक त्रास. आता वरील त्रास म्हणजे खोटी कारणे व मूर्खपणा आहे असे ज्यांना वाटत असेल त्यांच्याशी वाद घालायची अजिबात इच्छा नाही. अपघातांच्या मूळ कारणांचा अजिबात बंदोबस्त न करता हेल्मेटची सक्ती करणे म्हणजे घराभोवती साठलेल्या सांडपाण्यामुळे डास होत असतील तर सांडपाणी साठून न देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मच्छरदाणी वापरण्याची सक्ती करण्यासारखे आहे. असो. ही माझी वैयक्तिक मते आहेत. कोणाला पटोत वा न पटोत. मी हेल्मेट वापरणार नाही हे मात्र नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

कॅप्टन जॅक स्पॅरो 12/01/2016 - 08:55
बर्‍याचं जणांना ह्या त्रासांमुळे हेल्मेट चा त्रास होतो हे मान्यं. पण त्यावर उपाय म्हणुन जेमतेम २०० ग्रॅम वजनाची केव्हेलार हेल्मेट्सही उपलब्ध आहेत. थोडी महाग असतात आणि स्टायलिंग नसतं पण सुरक्षितता साध्या हेल्मेटपेक्षा जास्तं असते. बाकी ऐकु नं येणं हे हेल्मेटच्या सवय होईपर्यंतची बाब आहे. नंतर आपोआप अ‍ॅडजस्ट होतो आपण येणार्‍या आवाजाशी. केसांचं काही करु शकत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मोदक 12/01/2016 - 10:11
>>>असो. ही माझी वैयक्तिक मते आहेत. कोणाला पटोत वा न पटोत. मी हेल्मेट वापरणार नाही हे मात्र नक्की नरेन्द्र मोदींची इच्छा आहे असे समजा आणि हेल्मेट वापरायला सुरू करा. पण हेल्मेट वापराच!! :)

In reply to by मोदक

श्रीगुरुजी 12/01/2016 - 12:41
सल्ला वाचून हसायला आलं. अजूनतरी हेल्मेट वापरायची इच्छा नाही. भविष्यात वापरावेसे वाटले तर वापरीन बापडा.

In reply to by श्रीगुरुजी

चतुरंग 12/01/2016 - 19:52
वापरायला सुरुवात करावीत असा आग्रहाचा आणि कळकळीचा सल्ला! मानेला कॉलर लावा, हलके हेल्मेट घ्या काहीही करा पण घ्याच... माझ्या अगदी जवळच्या ऐकण्यात दोन अ‍ॅक्सिडेंट्स असे झालेत की ते लोक केवळ आणि केवळ हेल्मेटमुळेच आज जिवंत आहेत! तुमचं आयुष्य सुरक्षित असावं की नाही हा ऑप्शन असूच शकत नाही! :(

अद्द्या 11/01/2016 - 13:08
हेल्मेट चे दुहेरी फायदे सकाळचाच अनुभव. ऑफिस ला जाणारा रस्ता एका इंजिनियरिंग कोलेज समोरून जातो . आडवे तिडवे गाडी मारणारे हिरो बरेच आहेत . तसाच एक मनुष्य समोरून येत होता . आणि अगदी शेवटच्या क्षणी त्याला आठवला कि नाश्ता करायचा आहे . त्यामुळे त्याने इंडिकेटर होर्न इत्यादी फालतू गोष्टी न वापरता त्याची KTM Duke उजव्या बाजूला वळवली . आणि अक्षरशः १-२ इंचाच्या अंतराने कट मारून माझ्या समोरून आडवी गाडी घालून हॉटेल समोर थांबवली . ४-५ वर्षात फक्त दुसरेंदा पडलो आज तोल जाऊन . हेल्मेट होतं, त्यामुळे डोक्याला काही झालं नाही . आता हा माणूस मला उठवायला आला . आणि आधार देत हसत म्हणाला . "क्या भैय्या . गाडी कंट्रोल नाही कर सकते क्या इतनी भी " हातातलं हेल्मेट असेल नसेल तेवढी सगळी ताकत लाऊन फिरवलं. बहुदा त्याचा डावा कान फुटला होता .

In reply to by अद्द्या

मारहाण करताना कानाखाली वाजवणे टाळा. जर कर्णबधिरता आली / ईतर इजा झाली तर थेट खुनाच्या प्रयत्नाखाली गुन्हा दाखल होऊ शकतो.