मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अहल्या व शूर्पणखा खरेच अन्यायग्रस्त स्त्रीया ?

शरद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अहल्या व शूर्पणखा अन्याय झाला कां ? "अहल्येची दुसरी गोष्ट" यावरील सर्वश्री स्पंदना, अवतार व पैसा यांच्या प्रतिसादांवरून जास्त माहिती देण्याची गरज वाटते. म्हणून नवीन धागा काढत आहे. दोघींवर अन्याय झाला असे बरेच जणांना वाटते. बर्‍याच वेळी मूळ गोष्टच माहीत नसते. ती वाचल्यानंतरही जर तुमचे मत निराळे असेल तर तसे मांडावयास हरकत नाही. पण एक नक्कीच लक्षात ठेवावयास हवे की वाल्मीकि-व्यास या उत्तुंग प्रतिभेच्या महान लेखकांनी त्यांच्या काळास अनुसरून लिहलेल्या लिखाणावर आपण आपल्या कुवतीप्रमाणे आजच्या काळास अनुसरून मत देत आहोत. माझे महाभारतावरील मत हे "शरद याचे, त्याचे घरातील वातावरण शिक्षण, वाचन, पुण्यातील वास्तव्य" अशा बर्‍याच गोष्टींवर आधारलेले मे २०१५ चे मत असते. उद्या ते तसे असेलच असे अजिबात नाही. म्हणून मी माझे मत देऊं नयेच कां ? तसे अजिबात नाही अह्ल्या व शूर्पणखा यांच्या बाबतीत रामायणात पुरुषी वर्चस्वाची झाक दिसते कां एवढ्यापुरते मर्यादित. अहल्या : (१) ब्रह्मदेवाने विश्वातील स्रर्व सौंदर्य गोळा करून अह्ल्या निर्माण केली व ती गौतमाच्या आश्रमात "ठेव" म्हणून ठेवली. सर्व लोकपाल जिच्या प्राप्तीकरता धडपडत होते तिच्या, त्या अहल्येच्या, मोहांत गौतम पडला नाही म्हणून ब्रह्मदेवाने स्वत: त्यांचे लग्न लावून दिले. गौतम कोणत्याही अप्सरेच्या मोहात पडणारा लंपट नव्हता. (२) अहल्येचा "ज्येष्ठ" पुत्र शतानंद हा जनकाचा पुरोहित होता. म्हणजे अह्ल्या अनेक पुत्र असलेली "लेकुरवाळी" होती. (३) तपोनिष्ट व इंद्रियदमन करणार्‍या नवर्‍याला, काही मुले झाल्यावर, अहल्येने फसवले आहे. त्याबद्दल तिला चूक न वाटता आनंदच वाटतो व इंद्राने गौतमाच्या कोपापासून आपणास वाचवावे असेही ती म्हणते. (४) कोणत्याही काळात, अगदी आजच्या my choice काळातही, हे नीतीमत्तेला धरून नाही व अह्ल्येला शिक्षा झाली तर तक्रार करण्याचे कारण नाही. यात पुरुष संस्कृतीच्या वरचष्म्याचा प्रश्न उद्भवत नाही. (५) गौतमाने "तपाने शुद्ध झाल्यावर, माझ्याबरोबर नांदशील" असे सांगण्याचा मोठेपणा दाखविला आहे. शतानंदानेही "मातेचे दुराचरण आपण रामाला सांगितले ना व रामदर्शन झाल्यावर माझ्या मातेचा माझ्या पित्याशी समागम झाला ना ?" असे विश्वामित्राला विचारले आहे. आजच्या काळातही असा मनाचा मोठेपणा पहावयास मिळतो कां ? (६) आता पुरुषांना अशा प्रसंगी काय शिक्षा झाली ? असा प्रश्न विचारला आहे. प्रथम रावणाचे उदाहरण घ्या. त्रैलोकातील सुंदर स्त्रीयांवर बलात्कार करणे हा उद्योग. एकदा एक अप्सरा कुबेराचा मुलगा नलकुबेर याच्याशी संकेत करून त्याच्याकडे निघाली असतांना रावणाच्या नजरेस पडली. तिने त्याला विनवणी केली की मी तुझ्या पुतण्याकडे पूर्वसंकेताने जात आहे, मला सोड. त्याने ऐकले नाही. नंतर ती रडत रडत नलकुबेराकडे गेली. नलकुबेराने रावणास शाप दिला की "रावण इच्छा नसलेल्या स्त्रीवर बलात्कार करेल तर त्याच्या डोक्याचे तुकडे होतील". तेव्हापासून रावणाने तसले उद्योग थांबविले. सीतेला लंकेत नेल्यावर या भीतीनेच ती वाचली. रावणासारख्या क्रूरकर्म्याचे सोडा. माझ्या वाचनात ऋषींचे असे वर्तन दोनतीन ठिकाणीच आले. एक विश्वामित्र व अप्सरा. या ठिकाणी अप्सरा त्यांना मोह पाडण्यासाठी योजल्या आहेत.. त्याला बळी पडल्याने फार दोष देण्याचे कारण नाही. दुसरे उदाहरण पराशर-सत्यवती. पराशर सत्यवतीवर मोहित झाल्यावर त्याने तिला उत्तम वर देऊन वश केले आहे. अंधार निर्माण करून तिचा संकोच नाहिसा केला, तिच्या अंगाचा माशांचा वास घालवून तिला सुगंधी केले व प्रसुत झाल्यावर परत कन्यावत्वही दिले. इथेही बलात्कार नाही. एखादे उदाहरण रहिले असेल तर श्री. वल्ली सांगतीलच. आता शूर्पणखेचा विचार करूं शूर्पणखा ही रावणाची बहीण. तिचे लग्न मधु नावाच्या एका दानव राजाशी झाले. रावणाने त्रैलोक जिंकण्याच्या नादात मधूवर स्वारी केली व युद्धात त्याला मारून टाकले. मग या विधवा बहीणीची कटकट लंकेत नको म्हणून तिला दंडकारण्य़ात पाठवून दिले व तेथे खर नावाच्या एका राक्षस सेनापतीला, हा त्याचा भाऊ, तिच्या दिमतीस दिले. तेथे शूर्पणखा स्वच्छंदपणे विहरत असे. राम-लक्ष्मण-सीता दंडकारण्यात रहावयास आल्यावर ही सहज त्यांच्या आश्रमापाशी आली. रामाला पाहिल्यावर ती कामातूर होऊन त्याच्या प्रेमात पडली व तिने त्याची चौकशी केली. आदीकवी वाल्मीकि काय म्हणतात ते बघा .."विक्राळ मुख, मोठे पोट, विरूप नेत्र, ताम्रवर्ण केस, कुरूप मुद्रा, भयंकर स्वर, उग्र स्वभाव, वृद्ध वय, कुटिल भाषण, अतिशय दुष्ट वर्तन्यांनी युक्त असलेली ती राक्षसी कामाधिन होऊन उत्कृष्ट मुख, कृश उदर, विशाल नयन, सुंदर केस ,सुरूप मुद्रा, मंजुळ स्वर, सौम्य स्वभाव, तरुण वय, सरल भाषण, न्यायाला धरून असलेले वर्तन असलेल्या रामाला म्हणाली "तूं कोण ?, येथे कशाला आला आहेस ?" सरळ स्वभावाच्या रामाने तिला उत्तर दिले की " दशरथ राजाच्या आज्ञेवरून मी राम, हा माझा भाऊ लक्ष्मण व ही माझी पत्नी सीता..वनात राहण्यासाठी आलो आहोत." तो नंतर तिला "तूं कोण ?" असेही विचारतो. इथपर्यंत सगळे सौजन्याने चालले होते. यावर शूर्पणखा त्याला उत्तर देते " मी इच्छेप्रमाणे रूप धारण करणारी, शूर्पणखा नावाची, रावणाची बहीण आहे. तू माझा चिरकाल भर्ता हो. सीतेचा तुला काय उपयोग ? ही विरूप, दुराचारी, पोट खपाटीला गेलेली मनुष्य जातीची भार्या व तुझा भाऊ यांना मी भक्षण करून टाकीन व नंतर विषयोपभोगाची इच्छा धरून आपण संचार करू." मग राम न रागावता थट्टा करण्याच्या उद्देशाने म्हणाला, " बाई ग , माझा विवाह झाला आहे. सवतीचे जीवन तुजसारखीला बेकारच. तेव्हा तू माझ्या ऐवजी लक्ष्मणाशीच विवाह कर." रामाला सोडून शूर्पणखा लक्ष्मणाला म्हणाली " माझ्या सारखी श्रेष्ठ स्त्री तुझ्या रूपाला योग्य भार्या आहे." मग लक्ष्मण म्हणतो " मी तर दास. माझ्या ऐवजी हा रामच तुला योग्य.. तुझ्या सारख्या सुंदर स्त्रीला सोडून हा कशाला या कुरूप मानवी स्त्री बरोबर संसार करेल?" मूर्ख शूर्पणखेला ते पटले व ती रामाला म्हणाली " या तुझ्या भार्येवरील प्रेमाने तू माझा अव्हेर करत आहेस. तिला मी तुझ्या समक्ष भक्षण करून टाकीन व मग तू सवत नाहिशी झालेल्या माझ्याबरोबर संचार कर." असे म्हणून ती सीतेला खावयास तिच्या अंगावर धावून गेली. मग रामाने लक्ष्मणाला सांगितले कीं ’तू हीला विरूप करून टाक ".मग लक्ष्मणाने कान व नाक कापून टाकले. स्त्री म्हणून ठार केले नाही. वरील वर्णनावरून लक्षात येईल की शूर्पणखेला शिक्षा ती सीतेला खावयास निघाली म्हणून केलेली आहे. तिच्यावर अन्याय झालेला नाही. शरद

वाचने 15052 वाचनखूण प्रतिक्रिया 73

चलत मुसाफिर Sat, 04/18/2015 - 09:24
शूर्पणखेच्या कुरूपतेचे अवास्तव वर्णन हे लक्ष्मणाचे उदात्तीकरण करण्याच्या हेतूने जोडलेले असावे. मुळात ती तशी नसावी. अन्यथा ती मुळातच विरूप असताना लक्ष्मण आणखी काय करणार होता?

चुकलामाकला Sat, 04/18/2015 - 09:37
मुळात रामायण हा आर्य आणि अनार्य याचा संघर्ष आहे असे वाटते. दोन्ही संस्क्रूतीत , योग्य अयोग्य या बाबतीतील नियमात, लोकांच्या रुपात फरक असणारच! हे झाले शूर्पणखेच्या बाबतीत ! अहिल्येबद्दल सावकाशीने लिहिनच. रामायणात सर्व व्यक्तिरेखा काळ्या पांढर्‍या रंगात रंगविल्या आहेत हे पटते! अवांतर - संस्क्रूती मधील स्क्रु टंकणे जमत नाही . हेल्पा !:(

In reply to by चुकलामाकला

hitesh Sat, 04/18/2015 - 10:49
रेखा , नगमा , श्रीदेवी , भानुप्रिया .... सगळ्या अनार्य द्राविडी स्त्रीया कुरुपच का ? रावणाच्या देखणेपणावर अनेक स्त्रीया मोहीत होत्या असे रामायणातलिहिले आहे ना ?

In reply to by चुकलामाकला

पिवळा डांबिस Sat, 04/18/2015 - 11:28
संस्क्रूती मधील स्क्रु टंकणे जमत नाही .
हीच तर आपल्या संस्कृतीची मर्यादा आहे. चांगला लॉजिकल स्क्रू टाकून भाग जोडावे म्हंटले तर जमत नाही.. खिळे मात्र उभे आडवे कितीही ठोकता येतात!!!! :) :)

In reply to by चुकलामाकला

पिवळा डांबिस Sat, 04/18/2015 - 11:59
असंस्कृत लिखाणाबद्दल क्षमस्व!
अहो तुम्ही क्षमा मागायची काहीच गरज नाही. माझा रोख काहीही झालं तरी रामच कसा चांगला होता असं जे दाखवलं जातं त्यावर होता!!!

In reply to by चुकलामाकला

विवेकपटाईत Sat, 04/18/2015 - 20:25
आर्य आणि अनार्य संघर्ष- हे आंग्ल इतिहासकारांनी आपल्या डोक्यात डोक्यात टाकलेली मूर्खतापूर्ण संकल्पना आहे. रामायण वाचा - वास्तवात इथे संघर्ष ब्राह्मण रावण आणि इतर जाती क्षत्रिय + निषाद, शबर, भिल्ल, वानर (अर्थात मंडळ कमिशन). पण आंग्ल इतिहासकारानी याला उत्तर (आर्य) दक्षिण (अनार्य) या संघर्षाचे रूप दिले, त्याना देशावर राज्य करायचे होते. बिना रामायण वाचता. तोच इतिहास शिकून आपले अतिविद्वान इतिहासकार त्यांचे वाक्य ब्रह्मवाक्य मानून सत्य कळत असून ही पाहत नहीं. बाकी विशेष मी शौनक गोत्रीय ब्राह्मण आहे. अर्थात माझे पूर्वज (???) कदाचित रावणाच्या राज्यात मोठ्या पदावर असण्याची शक्यता नकारता येत नाही. शिवाय युद्धात त्यांचा रामाच्या हस्ते वध ही झाला असण्याची शक्यता नकारता येत नाही. हा संघर्ष या युगात ही आहे कांग्रेस (ब्राह्मण) विरुद्ध इतर पक्ष.

In reply to by विवेकपटाईत

आनंदी गोपाळ Sun, 04/19/2015 - 21:11
अर्थात माझे पूर्वज (???) कदाचित रावणाच्या राज्यात मोठ्या पदावर असण्याची शक्यता नकारता येत नाही. शिवाय युद्धात त्यांचा रामाच्या हस्ते वध ही झाला असण्याची शक्यता नकारता येत नाही.
हे काही समजलं नाही. तुमच्या पूर्वजांचा वध झाला, तर तुम्ही इथे कसे?

तिमा Sat, 04/18/2015 - 10:24
वर लिहिलेली गोष्ट खरी असेल तर राम-लक्ष्मणाचेही चुकलेच. त्या राक्षसीची त्यांनी थट्टा करुन तिला चिडवायला नको होते. खरी परिस्थिती सांगितली तोवर ठीक होते. विनाकारण चेष्टा करण्याचे साहस अंगाशी येऊ शकतेच.

मृत्युन्जय Sat, 04/18/2015 - 11:21
मग रामाने लक्ष्मणाला सांगितले कीं ’तू हीला विरूप करून टाक ".मग लक्ष्मणाने कान व नाक कापून टाकले. स्त्री म्हणून ठार केले नाही. वरील वर्णनावरून लक्षात येईल की शूर्पणखेला शिक्षा ती सीतेला खावयास निघाली म्हणून केलेली आहे. तिच्यावर अन्याय झालेला नाही. बरोबर आहे, शिक्षा योग्यच झाली. काही प्रश्न छिद्रान्वेषी वृत्तीने मनात उद्भवतातच, त्याचे कृपया निराकरण करावे: १. राम आणि लक्ष्मण दोघेही तिच्याशी चेष्टेच्या सुरातच बोलत होते म्हणजे त्यांच्या दृष्टीने तिच्याकडुन धोका नव्हता. तिची भाषा प्रथमपासुनच आक्रमक होती. २. राम अणि लक्ष्मणाने शुर्पणखेला म्हणे मारले नाही कारण ती स्त्री होती. मग त्राटिका कोण होती? एखाद्या स्त्रीला कान नाक कापुन विद्रुप करणे ही तिला ठार मारण्यापेक्षा जास्त क्रूर चेष्टा नाही काय? ३. जो राम वालीला "वानर" म्हणुन मारतो तो एका राक्षसीणीला "स्त्री" कसा काय मानतो म्हणे? ४. जर शुर्पणखा सीतेसाठी भविष्यात धोका ठरु शकली असती तर तिला मारुन टाकणे योग्य नव्हते काय? तिला विद्रुप केले असता ती परत सीतेवर हल्ला करुच शकली असती. त्याऐवजी तिचे हात पाय कापणे जास्त योग्य ठरले नसते काय? तिला विद्रुप करणे हे केवळ तिला तुच्छ लेखुन तिची जागा दाखवुन देण्याचा विचार वाटतो.

In reply to by मृत्युन्जय

शरद Sat, 04/18/2015 - 19:21
विश्वामित्र राम-लक्ष्मण यांना यज्ञरक्षणाकरिता घेऊन जात असतांना त्राटिकेने त्यांच्यावर हल्ला केला. विश्वामित्रांनी रामाला त्राटिकेला मारावयास सांगितले. पण रामाने "ही स्त्री, हिचा वध कशाला ?" म्हणून तिचे नाक-कान कापले. मग ती अदृश्य होऊन दगडफेक करू लागल्यावर विश्वामित्रांनी "ही दया दाखविण्याची वेळ नव्हे " असे सांगितल्यावर मग रामाने तिचा वध केला. त्या काळी स्त्रीचा वध करण्याऐवजी नाक-कान कापणे जास्त कडक शिक्षा मानली जात असावी. दोषीला ठार मारण्याऐवजी नाक-कान कापलेले चालते बोलते ध्यान समोर असेल तर इतर लोकांना धाक बसेल. काय ? ( हे राम. मी रामायणामधील गोष्टीच सांगत बसलो तर सुभाषितांचे काय करणार. जाऊं द्या.)

In reply to by मृत्युन्जय

मनीषा Sat, 04/18/2015 - 23:24
मग रामाने लक्ष्मणाला सांगितले कीं ’तू हीला विरूप करून टाक ".मग लक्ष्मणाने कान व नाक कापून टाकले. स्त्री म्हणून ठार केले नाही. वरील वर्णनावरून लक्षात येईल की शूर्पणखेला शिक्षा ती सीतेला खावयास निघाली म्हणून केलेली आहे. तिच्यावर अन्याय झालेला नाही. +१ सहमत .. पण .. मी ज्या वेगवेगळ्या कथा वाचल्या .. त्या पैकी एका कथाकाराच्या मते शूर्पणखा ही रावणाची बहीण असून , त्याच्याच प्रमाणे रूपवान होती. दुसर्‍या कथेत सांगतात की ती राक्षसी असल्याने, मायावी रूप धारण करून आली होती. आणखी एका कथेत म्हणले आहे, की तिच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशात परकीय आल्याचे कळले म्हणून ती राम आणि लक्षमणांना जाब-सवाल करण्याच्या हेतूने तिथे आली, आणि शस्त्रसज्ज असलेल्या दोघांना पाहून , त्यांच्यावर चाल करून आली. आता खरे-खोटे काय ते रामजाणे.

मृत्युन्जय Sat, 04/18/2015 - 11:22
नंतर ती रडत रडत नलकुबेराकडे गेली. नलकुबेराने रावणास शाप दिला की "रावण इच्छा नसलेल्या स्त्रीवर बलात्कार करेल तर त्याच्या डोक्याचे तुकडे होतील". तेव्हापासून रावणाने तसले उद्योग थांबविले. सीतेला लंकेत नेल्यावर या भीतीनेच ती वाचली. कथा वाल्मिकी रामायणात आहे काय?

मृत्युन्जय Sat, 04/18/2015 - 11:25
आजच्या my choice काळातही, हे नीतीमत्तेला धरून नाही व अह्ल्येला शिक्षा झाली तर तक्रार करण्याचे कारण नाही. हे नीतिमत्तेला धरुन नाही हे ठीक आहे. पण आजच्या काळात नवरा बायकोला कसलीही शिक्षा करु शकणार नाही. माय चॉइस यु सी.

'पिंक' पॅंथर्न Sat, 04/18/2015 - 11:31
माझ्या मनात कायम एक शंका आहे या गोष्टी खरोखरेच घडल्या होत्या का ? कारण लिखाण दोन प्रकारचे असते. एक घडलेल्या घटना लिहिणे आणि दुसरे काल्पना विलास लिहिणे. रामायण काळातील घटना घडल्या होत्या असे म्हणणारे अनेक भौगोलिक पुरावे देतात. उदा. रामसेतु, दंडकारण्य, श्रीलंका इ. पण या सर्व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन त्यानुसरुन या कथा नंतर लिहिल्या असतील असे तर नसेल का ?

In reply to by 'पिंक' पॅंथर्न

सतिश गावडे Sat, 04/18/2015 - 12:12
पण या सर्व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन त्यानुसरुन या कथा नंतर लिहिल्या असतील असे तर नसेल का ?
याबद्दल खट्टा मिठा ब्लॉगवर काही वाचले होते. राम कोण देशीचा? : भाग 1 राम कोण देशीचा? - भाग 2 राम कोण देशीचा? - भाग ३

In reply to by 'पिंक' पॅंथर्न

पगला गजोधर Sat, 04/18/2015 - 14:34
अहो असं काय बोल्ता ब्वा ? रामायण हे आज, साहित्य नसून, खरोखरीच या देशाचा इतिहास असल्यागत त्याचा उहापोह, काहीजणाकडून इथे होतो आहे. तर काही शतकानंतर "शोले" सुद्धा कलेचा आविष्कार नसून, खरोखरीचा इतिहास आहे, असा दावा काहीं लोकांकडून त्यावेळी करण्यात येईल कदाचित. ठाकूरच्या सुनेवर कसा अन्याय झाला, वै विषय तयावेळी चर्चिले जातील बहुदा... काव्य साहित्य आहे त्याला तेच ठेवावे, उगाच त्याचा ओढून ताणून इतिहास बनवू नये !

In reply to by पगला गजोधर

स्पंदना Sat, 04/18/2015 - 16:13
तर काही शतकानंतर "शोले" सुद्धा कलेचा आविष्कार नसून, खरोखरीचा इतिहास आहे, असा दावा काहीं लोकांकडून त्यावेळी करण्यात येईल कदाचितदेवा पवार नावाचा राक्षस, नरेंद्र नावाचा देवावतार, अजित नावाचा भाऊ देवा देवा देवा एकाच लेखावर दोन दोन दा कस निर्वतायच ब्वा?

मृत्युन्जय Sat, 04/18/2015 - 13:46
१. अहिल्येचे लग्न एका अश्या माणसाशी झाले होते ज्याला तिच्या सौंदर्याशी काडीमात्र घेणे देणे नव्हते. त्यांच्या नैतिकतेचे आणि निरलसतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच. पण जगतसुंदरीचे एका अश्या माणसाबरोबर लग्न लावुन देउन त्याच्याशी संसार करायला भाग पाडावे का? गौतम ऋषींसाठी अहिल्या काय आणि शूर्पणखा काय एकच होती. तिने त्यांची निर्लेपपणे सेवा केली म्हणजे झाले. २. अहिल्या एका इंद्रियदमन करणार्‍या पुरुषाबरोबर संसार करत होती. यात त्या व्यक्तीचा अध्यात्मिक आलेख, मनोनिग्रह, विषयवासनांवरचा विजय या गोष्टी नि:संशय प्रशंसेस पात्र ठरतात मात्र असे करताना ही व्यक्ती आपल्या संसारधर्माशी प्रतारणा करते आहे काय आणि पत्नीला विषयसुख देण्यास कमी पडते आहे काय याचा विचार आपण करतो आहोत की नाही?

In reply to by मृत्युन्जय

स्पंदना Sat, 04/18/2015 - 16:18
हो. इंद्रियदमन करणार्‍याने स्वतः एकट्या नावेत बसावे, उगा तयारेएला पाणी भरा, स्वैपाक करा, पाय चेपा, पूजेची तयारी आणी झोपडीची स्वच्छता करायला सुंदर्‍या कशाला हव्यात? वर आणी मोठेपणा तो केव्हढा? पुरुष ना तो? आणि ती मस्त्यगंधा पराशर तर एकदमच हुकली आहे. कौमार्य परत कस काय येत ब्वा? त्या पोरीच्या शरीराच्या स्पर्शभावना सुद्धा पुसल्या जातात काय? मग आजकाल जे लहाण मुलींवर बलात्कार होतात त्यांच्यावर सर्जरी केली अन त्याचा खर्चापानी दिला की त्यो मानुस येकदम महान होणार का काय?

In reply to by स्पंदना

अगं hymen reconstruction surgery केली असणार नक्की त्या पराशरानी. बघा, आपल्या महान संस्कृतीत हे पण होत होतं आणि ते पण वैदीक काळात..!!

संदीप डांगे Sat, 04/18/2015 - 15:19
ते शंभर शकले प्रकरण मागाहून चिकटवले आहे. उगाचच रावणाला सहानुभूती मिळू नये म्हणून. पुराणकथा अशाच बनतात. आपल्या मताला सोयिस्कर तसे रचत जातात आणि तेच सत्य म्हणून खपवत जायचे धंदे म्हणजे पुराणकथा आणि किर्तने. किर्तनकाराची प्रत्येक गोष्ट जणू देवाच्याच तोंडातून ऐकतोय असा विश्वास असणार्‍या भोळ्याभाबड्या जनतेचं समजू शकतं पण... अजूनही पारंपारिक कथाकथनामध्ये स्त्रीने नवर्‍याची दासी बनून राहावे असेच प्रवचन सीतेचे दाखले देऊन वाचाळ किर्तनकार करत असतात. 'सुशिक्षीत व सुसंस्कृत' प्राध्यापकांना असे किर्तन करतांना मी स्वत: ऐकले आहे.

स्पंदना Sat, 04/18/2015 - 16:21
झाला एकदाचा जीव परत जागा. तर माझ म्हणन काय होतं माहिताय का? एव्हढच म्हणन होतं की स्त्रीला जर काम भावना झाली तर ती वाईट कशी काय मानली जाते. थांबा जेवुन येते. माझ्या प्रश्नाचे उत्तर तुअम्च्या पराशर उत्तरातच दडले आहे. एका माणसाला एका स्त्रीची कामना होते अन तो महान ठरतो तुमच्या मते, पण एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषाची कामना केली की तिच्या जबाब्दार्‍या, तिचे पुत्र (ते ही पुन्हा पुरुषच. इस्लाम मातेला सुद्धा स्त्री म्हणुन कमी दर्जाची आणीकनरकाचे द्वार मानतो. आईला सुद्धा बडवायला त्यांना मुभा आहे. मग अहिल्येचा पुत्र त्याला अपवाद कसा? ) याची आठवण होते. जाऊ दे. मी फक्त एकाच गोष्टीने वैतागले होते, अन ते म्हणजे अहिल्येबद्द्ल विवेक पटाईत नी लिहीलेली कथा (जी च्या पुष्ठ्यर्थ ते श्लोक सुद्धा देतात) अरे ही अशी ही वेगळी आहे का म्हणुन सोडुन देण्या ऐवजी वर्षानुवर्षे सर्वांना माहित असलेली कथा पुन्हा रंगवुन सांगायची गरज नव्हती. त्याच ठिकाणी आम्ही सुद्धा ही कथा माहित नसल्याचे सांगितले होतेच.

In reply to by स्पंदना

नगरीनिरंजन Sat, 04/18/2015 - 20:41
स्त्रीला जर काम भावना झाली तर ती वाईट कशी काय मानली जाते.
शंभर नंबरी सवाल. आपण "इनॅडिक्वेट" ठरु या भीतिने ग्रस्त असलेले तथाकथित मर्द आपला मर्दपणा जपण्यासाठी स्त्रिच्या कामभावनांना अपवित्र ठरवण्याचे कार्य हिरीरीने करतात. असे पुरुष तेवढ्यासाठी आयुष्यभर एकपत्नी राहण्याचेही स्तोम माजवतात. :-)

In reply to by आनंदी गोपाळ

बॅटमॅन Mon, 04/20/2015 - 03:05
एक लीटर रक्त म्हणजे ----एक थेंब हे न लिहिल्याबद्दल निषेध.

In reply to by बॅटमॅन

तिमा Mon, 04/20/2015 - 11:13
वीर्यापासून परत रक्त बनवण्याचा शोध लागला पाहिजे, म्हणजे रक्तपेढ्या अगदी काँपॅक्ट होतील नै ?

पैसा Sat, 04/18/2015 - 17:30
तुम्ही लिहिले त्यापेक्षा वेगळे मी लिहिले नव्हते. कोणा एका माणसाने दुसर्‍याचा विश्वासघात करणे हे कधीही चूकच आहे. मग तिथे बाई का पुरुष हा प्रश्न येत नाही. तसेच विश्वासघाताचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येत नाही.

In reply to by पैसा

नगरीनिरंजन Sat, 04/18/2015 - 20:47
मुळात अहिल्या म्हणजे काय सामानाची गासडी होती काय की खूप लोकांची नजर आहे म्हणून गौतमाच्या घरात टाकून ठेवायला? कोणाचा विश्वास आणि कोणाचा घात?

In reply to by नगरीनिरंजन

पैसा Sat, 04/18/2015 - 20:54
गौतमांचा त्याग करून निघून जायला अहल्या स्वतंत्र होती. गंगा, ऊर्वशी इ. स्त्रियांनी नवर्‍याला सोडून स्वतंत्र राहिल्याच्या गोष्टीही आहेतच. पण लग्नाचे फायदे पाहिजेत आणि बाहेर मजाही पाहिजे असे करून नवर्‍याचा विश्वासघात करणे चूकच. जसे दुष्यंताने शकुंतलेचा गैरफायदा घेऊन मग पाठ फिरवणेही चूकच.

In reply to by पैसा

नगरीनिरंजन Sat, 04/18/2015 - 21:13
बरोबर आहे. तिने त्याग करायला हवा होता. पण एक प्रश्न असा पडतो की समजा तिचा त्याग करायचा विचार बिचार काही नाही आणि अचानक नवरा नसताना तिला इंद्र दिसला आणि तिला तो आवडला तर तिने आधी जाऊन घटस्फोटाचा अर्ज करावा की या क्षणाचा आनंद घेऊन मग नवर्‍याचा त्याग केला तर चालेल? गौतमाने शाप न देता "ठीके, तू लग्न मोडले आहेस, आपला आता काही संबंध नाही" एवढे म्हणून तिला सोडले असते तर पुरले नसते काय? की आपल्या मालकीच्या व्यक्तीने मला न सांगता निर्णय घेतला याचे दु:ख इतके असते की पार शाप देणे/जीव घेणे इथपर्यंत जावे लागते?

In reply to by नगरीनिरंजन

पैसा Sat, 04/18/2015 - 21:54
त्या काळात लग्नाचा विछेद ही आतासारखी वर्षानुवर्षे चालणारी गोष्ट नव्हती. त्यातही गौतमांनी शाप हा इंद्राला दिलेला दिसतो. अहल्येला एकांतवास आणि पश्चात्ताप स्वतःच स्वीकारावा अशी समज दिली आहे ती इंद्राला दिलेल्या शापासारखी भयंकर नाही. शिवाय केल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप झाल्यानंतर पुन्हा तिच्यासोबत रहायची इच्छाही गौतमांनी तिथेच सांगितली आहे.
"इतर कसल्याही प्रकारचा आहार न करतां केवळ वायुभक्षण करून व भस्मात पडून राहून आपल्या कृतकर्माचा पश्चात्ताप करीत तूं हजारो वर्षे या ठिकाणीच वास्तव्य कर, व कोणत्याही प्राण्याच्या दृष्टीस न पडता (कोणासही तोंड न दाखवता) तू येथेच आश्रमामध्ये पडून रहा. राम जेव्हा या वनांमध्ये येईल, तेव्हाच हे दुराचारिणी लोभमोहरहित बनलेली अशी तूं त्याच्या आदरतिथ्याने शुद्ध होऊन आनंदाने माझ्या समीप प्राप्त झाली असतां पूर्ववत सर्वांच्या दृष्टीस पडण्यायोग्य होशील",
मालकीच्या समजलेल्या व्यक्तीने तसेच प्रेमाच्या व्यक्तीने असा काही निर्णय घेतला तर आजही लोक कोणत्याही थराला जातात. स्त्रियांना मालकीची वस्तू समजायला नेमकी कधी सुरुवात झाली असावी हे शोधणे इंटरेस्टिंग ठरेल.

In reply to by पैसा

नगरीनिरंजन Sat, 04/18/2015 - 22:58
हम्म! अहिल्येला फार कडक शिक्षा नाही केली हे खरेच आहे. ते हजार वर्षे वायुभक्षण वगैरे करणे भस्मात लोळणे व रामाने येऊन पावन करणे ही पोएटिक लिबर्टी दिसतेय. मुळात इंद्र देखणा वगैरे असला तरी नवरा म्हणून गौतम अहिल्येलाही हवेच होते असे दिसतेय. पण एकदा लग्न केल्यावर दुसर्‍या पुरुषाचे क्षणिकही किंवा तात्पुरतेही आकर्षण वाटता कामा नये असा साधा सोपा सरळ नियम तिने नजरअंदाज का केला असावा कोण जाणे? विकनेस ऑफ फ्लेश, दुसरं काय?

In reply to by नगरीनिरंजन

पैसा Sun, 04/19/2015 - 09:34
पण एकदा लग्न केल्यावर दुसर्‍या पुरुषाचे क्षणिकही किंवा तात्पुरतेही आकर्षण वाटता कामा नये असा साधा सोपा सरळ नियम तिने नजरअंदाज का केला असावा कोण जाणे?
असं मी कुठे म्हटलंय? आकर्षण वाटलं तर "माय चॉईस" म्हणून कबूल करा! फसवाफसवी कशाला? बाकी ते हजार वर्षे वायुभक्षण, रामाने पावन करणे वगैरे मूळ कथेत दिसत नाही. रामाला भेटून त्याचा आदरसत्कार कर असे सांगितलेले दिसते आहे. राम हा एकवचनी, एकपत्नी म्हणून नावाजला गेल्याने त्याच्याबरोबर अहल्येचे काही बोलणे व्हावे अशी योजना दिसते आहे. मर्त्य माणसाला वायुभक्षण वगैरे करून जिवंत रहाणे शक्य नाही हे कोणीही सांगेल. मनीषा यांच्या प्रश्नाबद्दलः अहल्येने गौतमाला शिक्षा दिलीच आहे. फक्त ती उघडपणे बोललेली नाही इतकेच. अहल्या गौतमांबरोबर असमाधानी असेल तर तिने तसे स्वतःला आणि गौतमांना फसवत न रहाता सरळ निघून जायचे होते. ती तसे करत नाही. एवढेच माझे म्हणणे. हा धागा आणि चर्चा अहल्येच्या वागण्याबद्दल आहे. गौतम आणि इतर ऋषी म्हटलेल्या लोकांनी स्त्रियांवर कसे अन्याय केले याबद्दल जरूर एखादा धागा काढा. तिथेही त्याबद्दल चर्चा करू! :) बाकी ही कथा वाल्मिकी कधीच्या काळी लिहून गेले. त्यात कित्येकांनी आपल्याला वाटेल तशी भर घातली. त्यात लिहिलेल्या पात्रांनी तेव्हा असे का केले किंवा का केले नाही यावर आता आपंण चर्चा करून कथेत काहीही बदल होणार नसतोच.

In reply to by पैसा

मनीषा Sun, 04/19/2015 - 20:27
मनीषा यांच्या प्रश्नाबद्दलः अहल्येने गौतमाला शिक्षा दिलीच आहे. फक्त ती उघडपणे बोललेली नाही इतकेच. अहल्या गौतमांबरोबर असमाधानी असेल तर तिने तसे स्वतःला आणि गौतमांना फसवत न रहाता सरळ निघून जायचे होते. ती तसे करत नाही. स्वतःला आणि गौतमाला अहिल्या फसवते आहे? कधी ? कुठे? फसवणूक कधी असेल? जेव्हा ती खूप काळ इंद्राबद्दलचे प्रेम म्हणा, आकर्षण म्हणा .. दडवून ठेवून गौतमाचा संसार करत असेल तेव्हा . पण इथे तसे काहीच नाही. या प्रसंगाच्या आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा ती तनामनाने गौतमांचीच पत्नी आहे. इथे सांगितलेल्या कथेप्रमाणे बघीतले तरी .. तिला क्षणिक मोह होऊन ती इंद्राच्या अधीन झाली असा उल्लेख आहे. म्हणजे इंद्राचा मोह मनात बाळगून ती गौतमांच्या संसारात वावरत नव्हती. आणि ही घटना घडून गेल्यावर सुद्धा तिला इंद्राचा मोह असल्याचा कुठे उल्लेख अढळत नाही. किंबहूना इंद्र तिथे असतानाच गौतमांचे तिथे आगमन होते आणि मग तिची शिक्षा सुरू होते. म्हणजे तिचा आणि गौतमांचा संसार तिथेच समाप्त होतो. मग अहिल्या फसवाणूक कधी आणि कशी करणार? मला जी कथा माहीती आहे, त्याप्रमाणे पाहिले तर इंद्र हा गौतमांचाच छद्मं वेष धारण करून आला. म्हणजे ती तिच्या पती समवेत आहे असेच समजत होती. आणि गौतम ऋषी आश्रमात परतल्यावर सत्याचा उलगडा झालेला दिसतो. म्हणजे यात तर फक्तं तिचीच फसवणूक दिसते आहे. समजा असे मानले की गौतमांना अहिल्येची वागणूक पसंत नाही. म्हणजे ते फिर्यादी आहेत (आजकालाच्या परिभाषेनूसार) मग न्याय करायचा अधिकार त्यांनाच कसा प्राप्तं होतो? म्हणजे तक्रार करणारेच गुन्हा सिद्ध करणार आणि तेच न्यायनिवाडा करून शिक्षा पण तेच देणार? हा अजब प्रकार वाटतो. फक्तं 'असमाधानी आहे', या कारणासाठी कुणीच आपला संसार मोडत नाही, -- अगदी या काळात सुद्धा. पुराण काळात तर असे करणे केवळ अशक्यच .त्यामुळे तिने संसार सोडून निघून जायला हवे, अन्यथा ती तिच्या पतीची फसवणूक असेल, हा सल्ला अगदीच अस्थानी वाटतो आहे. अवांतर : श्रीराम जेव्हा अहिल्या आश्रमात येतात तेव्हा त्यांचे एकवचनी आणि एकपत्नी असण्याचे गुण सिद्ध झालेले नसतात. किंबहूना ते अहिल्याउद्धारानंतर सीता स्वयंवरासाठी जाणार असतात. म्हणजे त्यांना श्रीराम हा ईश्वरी अवतात असल्याचे (अंतर्ज्ञानाने) आधीच माहीत झाले असणार.

In reply to by मनीषा

पैसा Sun, 04/19/2015 - 22:16
त्याप्रमाणे पाहिले तर इंद्र हा गौतमांचाच छद्मं वेष धारण करून आला. म्हणजे ती तिच्या पती समवेत आहे असेच समजत होती. आणि गौतम ऋषी आश्रमात परतल्यावर सत्याचा उलगडा झालेला दिसतो. म्हणजे यात तर फक्तं तिचीच फसवणूक दिसते आहे.
कथा इथेच पुन्हा एकदा वाचा. :) क्षणिक मोह असेल तरी तिला स्वतःला आवरता आले नाही. इंद्र हा इंद्र आहे हे माहीत असतानाच अहल्या त्याच्यासोबत रत झाली. यानंतरही आपले चुकले, किंवा आपल्याला मोह झाला असे ती कबूल करत नाही, तर "गौतमांच्या रागापासून आपल्याला वाचव" अशी ती इंद्राची विनवणी करते. ही तिची स्वतःची आणि गौतमांची फसवणूकच आहे. (ताजा कलमः या कथेकडे तुम्ही आजच्या स्त्रीवादी भूमिकेतून पहात आहात तर मी कोणत्याही दोन माणसातील विश्वासघात या दृष्टीने पहात आहे. काळाच्या ओघात स्त्री आणि पुरुषाचे नाते बदलत आले आहे, मात्र प्रेम, द्वेष इ. मानवी भावना आणि वागणुकीची काही मूल्ये सतत टिकून राहिली आहेत. एकाच कथेकडे बघण्याच्या आपल्या मूळ दृषीकोनातच प्रचंड फरक असल्याने कितीही काथ्या कुटला तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही. तस्मात मी इथेच थांबते. धन्यवाद.)

In reply to by चुकलामाकला

स्पा Mon, 04/20/2015 - 00:01
अस वाटतयं वानखेडे वर अहील्येचा आश्रम आहे आणी गावसकर स्डँड मधुन पब्लिक लाईव कॉमेट्री करतय =)) फुल फेका फेकी

In reply to by स्पा

अस वाटतयं वानखेडे वर अहील्येचा आश्रम आहे आणी गावसकर स्डँड मधुन पब्लिक लाईव कॉमेट्री करतय
http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif मेलो...मेलो... जगत नाही आता! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by स्पा

मनीषा Mon, 04/20/2015 - 04:13
म्हणजे , लोकांच्या घरात काय काय चालले आहे ? -- हे जाणून घेण्याची निरागस की काय ती उत्सुकता असतेच ना सर्वान्ना? म्हणून तर ...

In reply to by पैसा

मनीषा Mon, 04/20/2015 - 04:11
कथा इथेच पुन्हा एकदा वाचा. :) वाचली ना ... म्हणुन तर .. पण असो ! तुम्ही थांबता आहात तर मी सुद्धा तसच करते. नाहीतर स्टेडीयमवर पब्लीक बसलेले आहेच. पॉपकॉर्न घेऊन ..:)

In reply to by मनीषा

शरद Mon, 04/20/2015 - 12:34
मनिषाताई,(मागे श्री. लावावयास भीती वाटते, काहींना जीव गेल्यासारखे वाटते म्हणून हो!) आपण ठळक शब्दात कथा वाचली असे लिहले पण तसे दिसत नाही. ब्रह्मदेवाने अहल्येला गौतमाच्या आश्रमात ठेवले तेव्हा दोघेही अविवहित होते. एक अविवाहित त्रिभुवन सुंदरी आश्रमात असतांना अविवाहित गौतमाने संयम पाळला म्हणून तो इंद्रियदमन करणारा व त्या गुणामुळे त्याला अहल्या मिळाली.दोघांचा विवाह झाल्यावर इंद्रियदमनाचा प्रश्नच नव्हता व त्यांना अनेक मुले झाली. त्यातील शतानंद हा ज्येष्ठ. अनेक मुले असलेली म्हणून मी (तितकेसे बरोबर नसलेले) ’लेकुरवाळी" हे विषेशण वापरले. खरे म्हणजे मी "बहुप्रसवा" असेच लिहणार होतो. आता हे सर्व परत वाचूनही आपणास अहल्येला गौतमापासून इंद्रियसुख मिळत नव्हते असा नित्कर्ष काढता येतो कां ? लग्न झाल्यावर परपुरुषाचे आकर्षण वाटणे व त्याप्रमाणे वागणे यांत कांहीच फरक नाही कां ? मला रस्त्यात पडलेले पाकिट पाहून ते उचालावे असे वाटणे व मी ते उचलून खिशात टाकणे या दोनही गोष्टी तुमच्या मते एकाच मापाच्या समजाव्यात कां ? आता गौतमाने अहल्येच्या चुकीची काय शिक्षा द्यावी या बद्दल एखाद्याचे मत निराळे असू शकते. अपराध व त्यावरील शिक्षा स्थळकाळावर अवलंबून असते. हजारो वर्षांपूर्वी भारतील शिक्षा व आजची शिक्षा निराळी असणारच व आजही भारतात मान्य असलेली फाशी अमेरिकेत अमान्य आहेच. आपण गौतमाचे चुकले असे म्हणणे गौतमावर नव्हे तर वाल्मीकींवर अन्याय करणे आहे. त्यांनी कथा लिहली; तुम्हाला निराळे म्हणावयाचे असेल तर "मला असे वाटते कारण .... " असे लिहणे योग्य; उत्तर देण्यास असमर्थ असलेल्या वाल्मीकि यांना चूक म्हणणे मला बरोबर वाटत नाही. तीच गोष्ट शूर्पणखेबाबत. जर एखादी अनोळखी बाई अनाहूतपणे तुमच्या घरी येऊन तुमच्या बायकोला खाऊन टाकते असे म्हणाली तर तुम्ही तिची थोडी थट्टा करावयास काय हरकत आहे ? आणि शूर्पणखेचा थट्टेबद्दल राग नाहीच आहे. आता ती फक्त सीतेला खाण्या ऐवजी तिच्या बरोबर लक्ष्मणाला खाणार आहे व मग सवत न राहिल्यामुळे सुखाने रामाबरोबर विहार करणार आहे ! नाक-कान कापावयाच्या ऐवजी तिला ठार मारणे कसे योग्य ठरणार ? रामायणात तिचा रोल पुढे तिने लंकेत जाऊन रावणाला सीतेला पळवून आणावयास प्रेरित करणे असा आहे. ठार मारणे यांत बसत नाही हो. तिला ठार मारणे म्हणजे पटकथेत हिरोने बदल सुचवणे झाले; काय ? मनिषाताई, प्रतिसाद तुम्हाला दिला असला तरी बर्‍याच वाचकांचे असे गैरसमज झाले असावेत असे वाटते. सर्वांना निरनिराळे लिहणे म्हणजे परत सर्वश्री लिहणे आले; नकोच ते. शरद

In reply to by शरद

मनीषा Mon, 04/20/2015 - 17:10
आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल .. तुमचं म्हणणे अगदीच योग्यं आहे. पण मी पैसा ताईंनी उपस्थित केलेल्या फसवणुकीच्या मुद्द्याला उत्तर दिले होते. तिला झालेल्या क्षणिक मोहाची तिला शि क्षा झाली , ती तिने भोगली. (तुमचे रस्त्यात पडलेल्या पाकीटाचे उदाहरण अंमळ अस्थानी वाटते आहे (सॉरी बर्का आगाऊपणाबद्दल) रस्त्यातले पाकीट बेवारस असते,म्हणजे त्याक्षणी तरी त्याच्या मालकाचा पत्ता नसतो. ते पोलीस कडे जमा करणे हे सज्जन पणाचे लक्षण , पण खिशात टाकले तर चोरी ठरत नाही. तुमच्या कथेत कुणीच अनाथ किंवा बेवारस नाही. ) पैसा ताईंच्या मते ती असमाधानी होती, तिला परपुरूषाचा मोह होता तरीही ती गौतमाची पत्नी म्हणून वावरत होती, ही फसवाफसवी आहे. तर तिने संसार सोडून निघून जायला हवे होते. या अक्षेपाला माझे उत्तर होते. तसही, अहिल्येच्या चुकीला गुन्हा समजून तिला इतकी मोठी शिक्षा देणे हा तिच्यावर झालेला अन्यायच आहे. त्या मुळे तिच्या बाबतीत जे झाले ते सर्वश्री योग्यच होते या तुमच्या मताशी मी सहमत नाहीच.

In reply to by मनीषा

पैसा Mon, 04/20/2015 - 17:38
पैसा ताईंच्या मते ती असमाधानी होती, तिला परपुरूषाचा मोह होता तरीही ती गौतमाची पत्नी म्हणून वावरत होती,
हे माझे मत नव्हे. तुमच्याच एका विधानाबद्दल
अहिल्ये बरोबर विवाह करून , तिच्याकडून सर्वं सांसारीक कर्तव्ये पूर्ण करण्याची अपेक्षा करायची. आणि स्वतः विवाहीत असूनही स्त्री सुखाचा त्याग करून , पुण्य संपादन केले म्हणून महर्षी पदास पोहोचल्याचा अभिमान मिरवायचा
माझे मत आहे.
ती असमाधानी असेल तर
असे मी म्हटले. ते एका अहल्येसाठी नव्हे तर कोणाही व्यक्तीच्या बाबत खरे आहे.
तिला परपुरूषाचा मोह तिला होता तरीही ती गौतमाची पत्नी म्हणून वावरत होती
हेही पुन्हा अर्धवट वाचून लिहिले आहे. क्षणिक मोह झाला तर कोणीही तसे कबूल करावे. अन्यथा ती दुसर्‍याची फसवणूकच होते. प्लीज मी किंवा शरद यांनी काय लिहिले ते संपूर्ण वाचून मगच लिहीत जावा ही विनंती. या धाग्यात काही लिहिणार नव्हते, पण मी न लिहिलेल्या गोष्टी माझ्या नावावर कृपया टाकू नयेत ही विनंती. अजून एक, ते नाव 'अहिल्या' नाही तर 'अहल्या' असे आहे. त्याचा अर्थ 'न नांगरलेली (भूमी)'.

In reply to by पैसा

मनीषा Tue, 04/21/2015 - 08:39
पैसा ताई अर्धवट वाचन माझं की तुमचं ? असा "मी नाही, मी नाही " चा विश्वामित्री पवित्रा का घेता आहातं ? फवणुकीचा मुद्दा तुम्हीच उपस्थित केला ना? मनीषा यांच्या प्रश्नाबद्दलः अहल्येने गौतमाला शिक्षा दिलीच आहे. फक्त ती उघडपणे बोललेली नाही इतकेच. अहल्या गौतमांबरोबर असमाधानी असेल तर तिने तसे स्वतःला आणि गौतमांना फसवत न रहाता सरळ निघून जायचे होते. ती तसे करत नाही. एवढेच माझे म्हणणे. हे तुम्हीच लिहीलं आहे ना? यातुन काय अर्थं काढायचा ते सांगा. आणि हो , अहल्या चा अर्थ माहीत आहे पण परत सांगीतल्या बद्दल धन्यवाद! पण मला अहिल्याच सवयीच असल्याने मी तसाच उल्लेख करणार.

In reply to by मनीषा

पैसा Tue, 04/21/2015 - 08:57
अर्थ स्पष्ट आहे. तुम्ही उगीच वाकड्यात शिरत आहात. आणि आपल्याला पाहिजे तसे अर्थ लावत आहात. क्षणिक मोह, चूक आणि वर्षानुवर्षाम्चे असमाधान, राग यात फरक असतो आणि मी त्याबद्दल माझे मत पुरेसे स्पष्ट लिहिले आहे. केवळ सवय आहे म्हणून चुकीचेच लिहिणार या तुमच्या पवित्र्यावरून काय समजायचे ते समजले. धन्यवाद! झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करण्यासाठी खर्च करायला मला आणखी वेळ नाही.

In reply to by पैसा

मनीषा Sat, 04/18/2015 - 23:02
मग हाच नियम गौतम ॠषींनाही लागू होत नाही का ? म्हणजे अहिल्ये बरोबर विवाह करून , तिच्याकडून सर्वं सांसारीक कर्तव्ये पूर्ण करण्याची अपेक्षा करायची. आणि स्वतः विवाहीत असूनही स्त्री सुखाचा त्याग करून , पुण्य संपादन केले म्हणून महर्षी पदास पोहोचल्याचा अभिमान मिरवायचा . यात तुम्हाला कुठे दुट्टप्पीपणा अढळला नाही? ही अहिल्येची फसवणूक वाटली नाही ? याचा अर्थं मी अहिल्येला योग्यं ठरवत नाहीये . फक्तं इतकच म्हणायचय चूक दोघांची असताना शिक्षा फक्तं अहिल्येला भोगायला लागली. आणि आश्चर्यं हे की ज्याने पहिल्यांदा चूक केली, तोच शिक्षा देतो आहे . भारतीय संस्कृती महान आहे.

In reply to by मनीषा

काळा पहाड Sat, 04/18/2015 - 23:14
भारतीय संस्कृती महान आहे.
भारतीय संस्कृतीचा काय संबंध यात? ही एक कथा किंवा सत्य घटना आहे. अहिल्या किंवा गौतम यांना भारतीय संस्कृती राखायला ठेक्यानं दिली होती का?

In reply to by काळा पहाड

मनीषा Sat, 04/18/2015 - 23:28
भारतीय संस्कृतीचा काय संबंध यात? ही एक कथा किंवा सत्य घटना आहे. अहिल्या किंवा गौतम यांना भारतीय संस्कृती राखायला ठेक्यानं दिली होती का? मी कुठे असं म्हणलं ?

In reply to by मनीषा

काळा पहाड Sat, 04/18/2015 - 23:44
मग "भारतीय संस्कृती" नावाची गोष्ट यात कशी फिट बसते? भारतीय संस्कृतीनं सांगितलं का गौतमानं शिक्षा भोगायची नाही असं? की हा त्या काळचा मानदंड होता? संस्कृती ही गोष्ट कुणीही सोम्या गोम्यानं यावं टपली मारून जावं अशी असते का? एखादी घटनेवरून एखाद्या संस्कृती कशा प्रकारची आहे किंवा होती हे ठरवता येतं का? एलिझाबेथ टेलरनं आठ (की नऊ?) लग्नं केली म्हणून आठ लग्नं करणं हे अमेरिकनांच्या संस्कृतीचं व्यव्च्छेदीक लक्षण झालं का? शिवाजी महाराजांनी आठ लग्नं केली तर ते हिंदू संस्कृतीत तसं सांगितलंय म्हणून का?

In reply to by काळा पहाड

नगरीनिरंजन Sat, 04/18/2015 - 23:48
:-). बरोबर. संस्कृतीत असं सांगितलेलं नसतं. लोक जसे वागतात तशी संस्कृती बनते. और दुनिया जानती है के हम कितने शरीफ है!

स्पा Sun, 04/19/2015 - 00:22
ओह, असं सगळं झालं म्हणता.... आता काय करायचे मग आपण, गहण प्रश्णच पडलाय माझ्यासमोर विचार करुन करुन डोके फुटायची वेळ आलिये. अहील्या, शुर्पणका दोषी होत्या की नाही या विचाराने जेवणच गेले नाही दिवसभर, रात्री आता झोपही येत नाही, आयुष्याला अर्थच उरला नाही काही आता. पण प्रतिसादही जणु ग्यानसागरातील रत्नेच. भारतीय संस्कृती चा काय सुरेख अभ्यास झाला. पण अहिल्येचा फोलपणा जगासमोर यायलाच हवा होता हीच काळाची गरज आहे धन्यवाद शरद सर आणि इतर प्रतिसादक हा ज्वलंत विषय मनात धगधगल्या बद्दल

अवतार Sat, 04/18/2015 - 23:29
या उत्तुंग प्रतिभेच्या महान लेखकांनी त्यांच्या काळास अनुसरून लिहलेल्या लिखाणावर
इसवी सनाच्या तिसऱ्या आणि चौथ्या शतकात रामायण आणि महाभारत या ग्रंथांमध्ये प्रचंड प्रमाणात प्रक्षिप्त श्लोक घुसवण्यात आले हे सत्य आता सामोरे आलेले आहे. त्यातील मूळ कथा कोणती आणि प्रक्षिप्त कथा कोणत्या हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. माझा मूळ प्रश्न अनुत्तरीतच आहे. जर शूर्पणखा राक्षसी नसून अप्सरा असती (आणि तिने सीतेवर हल्ला केला असता) तर तिला विद्रूप करण्यात आले असते काय? आणखी काही प्रश्न अहिल्येला शुद्ध होण्यासाठी रामाचीच वाट का पहावी लागते? सीता का चालत नाही? रामराज्य ह्याऐवजी सीताराज्य हा शब्दप्रयोग कसा वाटतो? ओठांवर जिजाऊ, झाशीची राणी आणि पोटात मात्र "राम"राज्य, हे वागनं बरं न्हवं !!

चलत मुसाफिर Sun, 04/19/2015 - 22:43
रामायणाची feminist आवृत्ती म्हणजे Sita Sings the Blues हा नितांतसुंदर Animationपट. सर्वांनी जरूर पहावा अशी शिफारस करतो. हा आंतरजालावर मोफत उपलब्ध आहे. अमेरिकेतील काही हिंदू संघटनांनी धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत याला विरोध केला होता हे आधीच सांगून ठेवतो. संवेदनशील हिंदूनी पहाणे टाळावे.

प्रचेतस Wed, 04/22/2015 - 22:43
प्रतिसाद वाचून बरेच मनोरंजन झाले. लेख नेहमीप्रमाणेच मूळ संहितेशी प्रामाणिक असलेला. अहल्येची कथा बालकाण्डात असली तरी ती मला प्रक्षिप्तच वाटत आलेली आहे.