Skip to main content

मराठी कविता

मराठी कविता

Published on रवीवार, 28/12/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार मंडळी! थोड्याच शब्दात मोठा आशय सांगण्याची किमया फक्त कवितेत असते. मराठी भाषेला काव्याची अतिशय सुंदर परंपरा आहे. अमृतानुभव असू दे, तुकारामाची संतवाणी, अभंग पंत तंत काव्य ते केशवसुत, रे. टिळकांचा जमाना. त्या नंतरचा सावरकर, पुढे कुसुमाग्रज, बोरकर, बापट, विंदा, पाडगावकर, इंदिरा संत, नारायण सुर्वे ते ढसाळ, नायगावकर, म्हात्रे, संदिप खरे अश्या अनेक प्रकारच्या कवींनी मराठी वाङमय समृध्द केलंय. त्यातल्या तुम्हाला आवडणार्‍या कविता कोणत्या ते या भागात सांगायचंय. जमलं तर का आवडली कविता हे पण. आणि हो, नुसतेच कवितेचे नाव न देता थोड्या ओळी लिहु शकलात तर उत्तम! चला तर मग काव्यास्वाद घेऊ या. हा धागा मिपावरची कवितांची मैफल होऊन जाऊ द्या.

याद्या 40869
प्रतिक्रिया 78

माझी एक आवडती कविता:- जीवन त्यांना कळले हो… मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो चराचराचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो सिंधुसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो आपत्काली अन दीनांवर घन होऊनी जे वळले हो दुरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होऊनी जळले हो पुण्य जयांच्या उजवडाने फुलले अन परिमळले हो सायासावीन ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो उरीच ज्या आढळले हो! - बा. भ. बोरकर

मस्त कल्पना ! गदिमांचा उल्लेख राहिला. त्यांची ही एक कविता.. जलचक्र: नदी सागरा मिळते पुन्हा येईना बाहेर जग म्हणते कसे गं, नाही नदीला माहेर. काय सांगावे बापानो तुम्ही आंधळ्यांचे चेले नदी माहेराला जातेे म्हणूनच जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी आठवतो तिला जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी उडोनीया जाते पंख वा~याचे घेऊन होउन पुन्हा हो लेकरू नदी वाजविते वाळा पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा -गदिमा

कुसुमाग्रजांच्या ' विशाखा ' मधली क्रांतीचा जयजयकार ही प्रसिद्ध कविता आहे. मातृभूमीबद्दल क्रांतिकारकांना वाटणारं प्रेम, तिला परदास्यातून सोडवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, त्यात आलेलं अपयश, शिक्षा - कदाचित देहांतशासनही पण हे सर्व केवळ स्वातंत्र्याच्या ध्यासापायी सहन करणारे क्रांतिकारक - असं जबरदस्त रसायन असलेली ही कविता रसिकांच्या आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरली नसतीच तर नवल. मला विचाराल तर यानंतर कुसुमाग्रजांनी दुसरं काही लिहिलं नसतं तरी चाललं असतं. या कवितेतला प्रत्येक शब्द हा इतका चपखल आहे की दुसरा कोणताही शब्द त्या ठिकाणी सुचूच शकत नाही! मला ही कविता दुर्दैवाने सलग पाठ नाही पण आठवणा-या काही अप्रतिम ओळी अशा आहेत नाचविता ध्वज तुझा गुंतले श्रृंखलेत हात तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात चरणांचे तव पूजन केले म्हणून गुन्हेगार देता जीवन अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार! कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते उठतील त्या ज्वालांतून भावी क्रांतीचे नेते लोहदंड तव पायांमधले खळाखळा तुटणारी आता कर ॐकारा तांडव गिळावया घास नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार! आपल्या उदात्त ध्येयापुढे कुठल्याही हालअपेष्टांना तुच्छ मानणारा कोणीही माणूस आजही या कवितेकडे आपलं जीवनगाणं म्हणून पाहू शकतो ही या कवितेची ताकद आहे.

तू असाच वर जा अंधार्‍या सांदरीतून निघालेले तुझे आयुष्य न चिरडल्या जाणार्‍या ईर्ष्येने वर वर जाऊन एका तृप्त क्षणी सुर्यप्रकाशाला भेट दे तुला जर फ़ुले येतील- आणि तुला सोन्याच्या लहान पेल्यांसारखी फ़ुले यावीत आणि त्यांच्या स्पर्शाने पराग सांडून बोटांची टोके पिवळी सुगंधी व्हावीत. तुला जर फ़ुले येतील, तर अशा सहस्त्र फ़ुलांना घेऊन तू तुझ्यावर वाकलेल्या आभाळाला सामोरे जा व त्याच्या निळ्या साक्षीने तू त्यांच्यात सूर्यप्रकाश साठवून घे. तुला जर फ़ळे येतील- आणि तुला दर पानाआड लहानसे लाल फ़ळ यावे व ते इतके रसरशीत असावे की त्या प्रत्येकाच्या लाल रंगात सुर्यप्रकाशाचा एक एक कण सुखाने नांदावा. तुला जर फ़ळे येतील , तर त्यांच्यासह तू क्षितिजाकडे पहा. कारण अशा अंधारातून त्याचाच शोध घेत त्याच्याकडे आला आहेस. मग तुझ्या बीजाची फ़ळे सर्वत्र विखरून त्या तुझ्या विजयाच्या खुणा सर्वत्र रुजू देत. जर कणा एवढ्या प्रकाशाचा काजवा तुला कधी दिसला तर तू त्याचे स्वागत कर. त्या कणाच्या अभिमानाने त्याने रात्रीच्या अमर्याद अंधाराला आव्हान देऊन त्याचा एक कण जिंकून प्रकाशित केला आहे. आभाळात एखादे लहान पाखरू दिसले तर त्याला आतिथ्य दाखव. कारण दोन कोवळ्या पंखांच्या आत्मविश्वासाने ते आभाळाला किंचित मागे रेटत आहे. जर कधी एखाद्या मुलाने तुझे एक रसरशीत पान घेऊन दुमडून ते पुन्हा आडवे उघडले, व पानाचा आरसा केला, किंवा कधी तुझे पिवळे फ़ूल तोडून बोटे पिवळ्या धुळीने माखुन घेतली, अगर तुझे एक लाल फ़ुल खुडुन ते दोन बोटांत चेंगरत रसाचा लाल धागा काढला , तर तू त्याच्यावर क्रुद्ध होऊ नकोस. कारण, कुणास ठाउक, अब्जांमध्येच एक असे आढळणारे ते मूल असेल, ते देखील भोवतालच्या अंधार्‍या अजस्त्र भिंती फ़ोडून सूर्यप्रकाशाकडे येण्याची कधीतरी धडपड करणार असेल. आणि तसे असेल तर ते तुझ्या रक्तानात्याचेच आहे. एक पान गेल्याने तुला दारिद्र्य येणार नाही. एक फ़ूल गेल्याने तुझे सौंदर्य उणॆ भासणार नाही. एक फ़ळ गेल्याने तुझ्या आयुष्यात नैराश्य येणार नाही. इतके तुला वैभव आहे. इतके तुला वैभव मिळो ! या सार्‍यात मला विशेष सुख आहे, कारण तुझे एकेक पान म्हणजे माझाच एकेक श्वास आहे. म्हणुन तु म्हणजे मीच स्वतः आहे. मी संपलो नाही तर मी केवळ बदललो आहे. तू आपले सारे सामर्थ्य घेऊन आभाळाखाली सूर्यप्रकाशात वर आला आहेस एवढे इतरांना समजू दे. मी अंधारात लाल प्रकाशात दडपून चिरडला गेलो नाही, तर मीच हिरव्या कारंजाप्रमाणे वर आलो आहे, हे देखिल इतरांना कळू दे. म्हणून तू असाच वर जा…. - जी.ए.कुलकर्णी (कथासंग्रह: पिंगळावेळ)

In reply to by काळा पहाड

@ का प हा उतारा जी एंच्या स्वामी कथेतील आहे. ती स्वतन्त्र कविता नाहिय्ये

In reply to by विजुभाऊ

हे माझं अत्यंत आवडतं गद्द्य आहे. आणि ते मला ती कवितेसारखं वाचावंसं वाटतं. कवितेची लय त्यात आहे आणि मला तरी ती एखाद्या कवितेसारखीच तालबद्ध वाटते. बाकी 'स्वामी' चं नाव घेतल्यावर मग मला ती गोष्ट आठवली. तो पर्यंत माझ्या डायरीत तरी ती अशीच कविता म्हणूनच लिहिलेली आहे. कदाचित हे टेक्निकली बरोबर नसेल पण तसंही अशा गोष्टींना नियमात बसवायचं कशाला?

थोड्या फार अशाच आम्हाघरी धन या अतिशय माहितीपूर्ण धाग्याची आठवण झाली. तोही धागा चालू रहायला हवा. शेवटच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा थकले पाऊल सहज पडावे, आणि सरावा प्रवास सारा! - आरती प्रभू मला आवडणार्‍या दोन कवयित्री आहेत शांता शेळके आणि बहिणाबाई, आणि अर्थातच शब्दप्रभू गदिमा; वेळ मिळाला की काही ओळी टाकेन.

किर्र रात्री सुन्न रात्री झर्र वारा भुर्र पानी; शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ? दार आपो-आप खोले ! आली आली भुताबाई; तीन माणसे रोज खाई स्मशानामध्ये घालते फेरी पहाटेपूर्वी करते न्हेरी न्हेरीसाठी होतात चट्‍ट दोन पोरे लठ्‍ठ मठ्‍ठ पण प्रत्येक एकादशीस रताळ्याचा खाते कीस. किर्र रात्री सुन्न रानी झर्र वारा भुर्र पानी; शार वाडा गार भिंती दार त्याचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ? दार आपोआप खोले ! आला आला महासमंध; त्याची चाल संथ संथ त्याची उंची दहा फूट अंगावरती काळा सूट, डोक्यावरती हँट बीट, तुम्ही फसाल ! पहा नीट वळवळणारे गळ्यात काय ? नागोबाचा लंबा टाय ! किर्र रात्री सुन्न रानी झर्र वारा भुर्र पानी ; शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ? दार आपोआप खोले ! आले आले थातूमातू ; खाते सातू जर सातू नसले घरात तर बसते नखे खात. रोज रात्री मांजरावरुन हे येते जग फिरुन, हे भूतआहे मुत्रे, तरी त्याला भितात कुत्रे. किर्र रानी सुन्न रानी झर्र वारा भुर्र पानी; शार वाडा गार भिंती, दार त्यांचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ? दार आपो-आप खोले ! आले आले अरेतुरे ; हे भूत काळेबेरे मध्य रात्री रांगत येते; दारावरती थाप देते. जर त्याला घेतले घरात जीभ काढते तेरा हात. पण ’कारे’ म्हटले तर, जाईल सोडून तुमचे घर. किर्र रात्री सुन्न रानी झर्र वारा भुर्र पानी ; शार वाडा गार भिंती दार त्याचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ? दार आपो-आप खोले ! आला आला आग्या वेताळ; त्याच्या डोक्यात असतो जाळ. कोळसे खातो कराकर; राकेल पितो डबाभर. डोक्यावरती कढई धरुन भुते घेतात स्वैपाक करुन केसामधून उठतात ज्वाळा, सगळे न्हावी भितात त्याला. किर्र रात्री सुन्न रानी; झर्र वारा भुर्र पानी; शार वाडा गार भिंती दार त्याचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ? दार आपो-आप खोले ! आला आला पिंपळावरुन एक मुंजा संध्या करुन. त्याची पोथी चालत येते; हळूच त्याच्या हातात जाते. रक्‍तासारखी पाने लाल, खुणेसाठी असते पाल. तीच पोथी ऐकण्यासाठी भुते आली; झाली दाटी पाल लागली चुकचुक करु, पोथीवाचन झाले सुरु; हेंगाड वेंगाड फेंगाड भेंगाड फेंगाड भेंगाड हेंगाड वेंगाड’ किर्र रात्री सुन्न रानी झर्र वारा भुर्र पानी; शार वाडा गार भिंती दार त्याचे हस्तिदंती. सर्व आले सर्व आले दार हसले बंद झाले !

In reply to by मुक्त विहारि

गणपत वाणी विडी पिताना चावायाचा नुसतीच काडी, म्हणायचा अन् मनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी ! मिचकावुनी मग उजवा डोळा आणी उडवुनी डावी भिवयी, भिरकावुनी ती तशीच द्यायचा लकेर बेचव जैसा गवई ! गिर्र्हाइकाची कदर राखणे; जिरे, धणे अन् धान्ये गळित, खोबरेल अन् तेल तिळीचे विकून बसणे हिशेब कोळीत ! स्वप्नांवरती धूर सांडणे क्वचित बिडीचा वा पणतीचा, मिणमिण जळत्या; आणी लेटणे वाचीत गाथा श्रीतुक्याची ! गोणपटावर विटकररंगी सतरंजी अन् उशास पोते, आडोशाला वास तुपाचा; असे झोपणे माहित होते ! काडे गणपत वाण्याने ज्या हाडांची ही ऐसी केली, दुकानातल्या जमीनीस ती सदैव रुतली आणिक रुतली ! काड्या गणपत वाण्याने ज्या चावुनी चावुनी फेकून दिधल्या, दुकानातल्या जमीनीस त्या सदैव रुतल्या आणिक रुतल्या ! गणपत वाणी विडी बापडा पितापितांना मरुन गेला, एक मागता डोळे दोन देव देतसे जन्मांधाला !

In reply to by मुक्त विहारि

स्वप्न रंजन करणारा माणूस , कुठलेही भरीव कार्य करू शकत नाही, हे वास्तव सांगते.

In reply to by मुक्त विहारि

शाळे मधले खत्रूड शिक्षक, ऑफीसमधले फुकट राजकारणी आणि सासरची लोकं ह्या सगळ्यांसाठी पुरेशी सामुग्री ह्या कवितेत आहे. क्रुपया ह्या कवितेचा आणि मिपावरील चिकाटी आय.डीं.चा संबंध लावू नये.

In reply to by अत्रन्गि पाउस

किर्र रात्री ===> विंदा गणपत वाणी ==> मर्ढेकर

In reply to by मुक्त विहारि

पिशी मावशी आणि तिची भुतावळ पिशी मावशीचे घर.... मसणवटीच्या राईमध्ये, पडक्या घुमटीच्या वाटेवर, भेडवताच्या डोहापाशी, पिशी मावशीचे आहे घर पिशी मावशीच्या पायाशी, मनीमांजरी दिसेल काळी, ती न कधीही खाते उंदीर, फक्त खातसे सफेद पाली. दिसेल दारावरी पिंजरा, पिंजर्‍यात ना दिसेल राघू. परंतू त्यातूनी एक कावळा हसे "ख्यॅ ख्यॅ" आणिक "खू खू". पिशी मावशी म्हणते त्याला, "काकंभडजी भोगा आता पुन्हा दक्षिणा मिळण्यासाठी, श्राद्धाचेही पुन्हा जेवता!" आणि मनीला म्हणते कैशी,"या मनुताई,कशास वळवळ, चोरलास ना कंठा मागे?आता भोगा, हे त्याचे फळ." पिशी मावशी एकलकोंडी, तिच्या घरी ना नोकर-चाकर, मुसळे देती कांडून पोहे, जाते दळत पीठ भराभर!

In reply to by मुक्त विहारि

पिशी मावशी म्हणते त्याला, "काकंभजी भोगा आता
आमच्या एका मित्रवर्यांची आठवण झाली.

पूर्ण कविता आठवत नाहीत पण काही ऒळी आरती प्रभू हिरव्या माळापुढे निळा गिरी गिरवीत काळॆए वळणे काही छ्प्पर झाले लाल अधिकच धूर दरीतून चढतच नाही . . . . आणि जमते आहे ढगात पाणी वीज वाकते करीत उताविळ ढळता ढळता सांज सुरंगी उठे दिशांतून वांझ भूतावळ . . . किंवा बोरकरांची नक्षत्रांनी बांधून कुंतल रात कोवळी निळी तलावात मुखबिंब लोकिते पाय टाकूनी जळी . .

ज्याचे त्याने घ्यावे ओंजळीत पाणी कुणासाठी कोणी थांबू नये! …असे उणे नभ ज्यात तुझा धर्म माझे मीही मर्म स्पर्शू नये - चंद्रमाधवीचे प्रदेश, ग्रेस

या धाग्यावर एकच कविता देणे शक्य नाही. बडबडगीतांपासून भावगीतापर्यंत सतत कविता आपल्या बरोबर असते. त्यापैकी काही कवितांच्या काही ओळी या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लगडून जावे या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे पाहता सुगंध कांती सांडलेली पाखरांशी खेळ मी मांडून गावे - ना धों महानोर अगदी अलवार अनुभवांचे,'उमगण्याचे' वर्णन करणारी इंदिरा संतांची ही कविता बघा केव्हा कसा येतो वारा जातो अंगाला वेढून अंग उरते न अंग जाते अत्तर होऊन॥ खाली सुगंधित तळे उडी घेतात चांदण्या हेलावल्या सुवासात कशा डुंबती चिमण्या ॥ ग्रेसच्या एका कवितेच्या या ओळी शून्यात गरगरे झाड तशी ओढाळ दिव्यांची नगरी वक्षात तिथीचा चांद्,तुझ्या की ओठी.... सुरेश भटांच्या कवितेतला चंद्र आता मावळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला काय तो वेडा इथेही बोलला हा शहाणाही चळाया लागला पाडगांवकरांची ही कविता माझी अत्यंत लाडकी-- या माझ्या पंखांनी उडण्याचे वेड दिले पण माझ्या हातांनी घरटे हे निर्मियले जगण्याची ओढ अशी उडण्याचे वेड असे घरट्याच्या लोभांतहि गगनाचे भव्य पिसें... नवीन कवितेत नलेश पाटलांच्या कविता जुन्या कवितेचं बोट धरून चालणार्‍या आणि म्हणूनच ओळखीच्या वाटणार्‍या त्यातली ही एक ऊन माळलं वातीनं दिस भोगला रातीनं क्षितिजाच्या वेशीवर धीर देऊनी सूर्याला तुझं चांदणं करीन चांद बोलला उन्हाला जाता जाता शिलगावलं सागराला किरणानं दिस भोगला रातीनं ही त्यांचीच दुसरी कविता लख्ख सोन्याचा वणवा उभ्या रानास लागला सावलीचा पांडुरंग पायी झाडांच्या रुजला बुक्का भंडारा नांदती जणू भावंडची जुळी गळा डोंगराच्या रुळे ऊन पाण्याची साखळी अय्यो... लेखाएवढा प्रतिसाद होतोय. आवरते. कारण बोरकर्,करंदीकर्,पाडगांवकर अशा जंगलात शिरले तर मी कोणालाच सापडणार नाही... !

गिरबिटलेल्या डोंगररेषा, सुळसुळणारे ऊनही तल्लख, मानवाकव्या माड कलंदर, एक न नारळ, पुरा कफल्लक.. चपळ हवेच्या डोक्यावरती, तलम धुक्याची तिरपी टोपी, एकसुरी आपुलीच खळखळ, ऐकत पाणी जाते झोपी.. पाण्यावरती सूर मारतो, एक शुभ्र गुबगुबीत पक्षी, चोच तयाची पिवळी पिवळी, पंखांवरती काळी नक्षी.. खुसखुशीत या अशा सकाळी, हवीच असली गुंगी थोडी, या मातीचे व्हावे पाणी, अन पायांची लहरी होडी.. -मंगेश पाडगावकर शाळेत होती आम्हाला. तरंगत आलेल्या सकाळी एखाद्या पायवाटेवरून वगैरे चालताना हमखास आठवते.

स्वच्छ निळसर रिकामे अंबर नारद तुंबर अभ्र विरे कधी केले होते गंधर्वांनी खळे स्वतःशीच खेळे चंद्रबिंब पांगले अवघ्या वैष्णवांचे भार ओसरला ज्वर मृदंगाचा मंदावली वीणा विसावले टाळ परतुन गोपाळ घरी गेले स्थिरावला हार वाळली पाकळी गुंतली फासळी निर्माल्यात श्री ज्ञानेश्वरसमाधीवर्णन -अरुण कोलटकर

परवाच्या पेपरात एक बातमी वाचली बातमी: कालच्या पावसात झोपडपट्टीतील एक मूल वाहून गेले , बुडून मेले. बुडाले तर बुडू द्या मूल बुडाले म्हणजे काही पाच तारयांचे ताजमहाल किंवा ब्रेबोर्न स्टेडिअम नाही बुडाले झोपडपट्टीतील एका उघड्या-नागड्या मूलाचे असे मूल्य ते किती? साधे गणित येत असेल तर करता येईल हिशेब उत्तर अर्थात पैशातच आणि हे मत तुमचे किंवा माझेच आहे असे नाही त्याच्या आईचेही तेच असावे कारण मुलाचे कलेवर मांडीवर घेउन ती फोडीत बसली असता एक कर्कश हंबरडा एक वार्ता वस्तीवर येऊन कोसळली. यावेळी मात्र करुणामय मेघासारखी वार्ता: नाक्यावरचा गुदामवाला व्यापारी कुजलेल्या धान्याची पोती ओतीत सुटला आहे उकिरड्यावर बाईने आपला हंबरडा घशातच आवरला अर्ध्यावर मूलाचे कलेवर जमिनीवर टाकून ती उठली आणी घरातल्या सगळ्या पिशव्या गोळा करुन बेफाम धावत सुटली उकिरड्याकडे वाहणारया यात्रेत सामील होण्यासाठी. - कुसूमाग्रज

लमाणांचा तांडा - वि. म. कुलकर्णी - चालला चालला लमाणांचा तांडा एका गावाहून दुजा गावाला संपली येथली उसाची गुऱ्हाळे, संपला येथला अन्नाचा शेर आता दुजें गाव! आता दुजा मळा! चला पाहू चला... नवीन चाकरी, नवीन भाकरी! -चालला चालला लमाणांचा तांडा पाठीवरी सारे घेऊन बिऱ्हाड मरतुकडी ही खंगलेली घोडी खंगलेले बैल... यांच्या पाठीवर देखा हा संसार चार वितीची ती उभावया घरे घेतल्या चटया घेतले खाटले, (त्यांचा हा पलंग), घेतली गाठोडी, घोड्याच्या पाठीशी उलटे खाटले अन त्यांत घातले रांगते मूल! घेतली गाडगी, मडकी, डबडी, ... (चुलीला दगड मिळतील तेथें - नकोत ते घ्याया बांधुनिया संगे!!-) घोड्याशेजारून संसारामागून रस्ता हुंगत ही धापा टाकणारी चालली कुतरी - चालला चालला लमाणांचा तांडा घोड्याशेजारून संसारामागून चालले बापई! चालल्या बायका! असंस्कृत मुद्रा...दीनवाण्या मुद्रा...आगतिक मुद्रा... कटीखांद्यावरी यांच्यावरही लादले 'संसाराचे ओझे' पहा पाठीवरी बांधली बोचकी पहा काठीवरी आणखीही काही उरलासुरला बांधला संसार चालला चालला लमाणांचा तांडा... आणि तांड्यातील, पाहिलीत का ती एक लमाणीण ओझ्याने अगदी वाकली आहे, थकली आहे तिच्या खांद्यावर, तिच्या काठीवर जड जड सारे गुळाचे गाठोडे, देवाचे गाठोडे बांधले आहे. - परी काठीच्या त्या एका टोकाला अन राघूचा पिंजरा बांधला आहे ... जीवाने जपल्या मायेने पोसल्या राघूचा पिंजरा बांधला आहे... अस्थिर संसारी विकर्ण जीवन त्यांत एकली ही कोमलता-खुण! -ओझ्याने वाकल्या लमाणाच्या स्त्रीने डोळ्यापुढे राही अशा रीतीने हा बांधला पिंजरा -तेवढीच तिच्या आत्म्याची ओळख... मनाचे भजन तेवढीच तिच्या लमाणजातीच्या मानव्याची खुण!! -चालला, चालला लमाणांचा तांडा एका गावाहून दुजा गावाला...

धामंणस्करांची ही तृषार्ततेच्या काठावरील पाखराला आपल्या असण्यामुळे पाणी पिण्यास संकोच वाटला तर, आपला म्हटले त्यानेच परका मानल्यावर आपण करतो तेच करायचे; त्याच्या वाटेतून त्याच्या सोयीसाठी दूर व्हायचे….तरीही पक्षी कुठल्या पाइपलाईनमधून थेंब थेंब ठिबकून जमलेल्या निवळशंख पाण्याला शिवत नसेल तर पाण्यात आपण आहोत असे जाणून आणखी दूर जायचे. पक्ष्याला पाण्यात फक्त आकाश दिसेपर्यंत कसलाच भरवसा वाटणार नाही… कुणाला संकोच वाटत असेल तेव्हा कणवपूर्ण हृदयाने स्वतःला दूर करणे ही साधनेची सुरुवात; सांगतेचा क्षण आला की तुम्हीच आकाश झालेले असता. मग जलाशयाच्या अगदी काठावर उभे राहीलात तरी पाण्यात फक्त आकाशच असेल. एखाद्या हुशार पक्ष्यालाही तुम्हांला आकाशापासून वेगळे करता येणार नाही…

"The" Greatest and Most Celebrated Poem in the History of मिपा मोकलाया दाहि दिश्या निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि रत्रिच्य तिमिरत होति धालली जी आसवे दवबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या पुश्पासवे पानाफुलातुन निर्झरतुन श्रुश्तिची ही स्पन्दने उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा

यांची ही कविता- खूप आवडते: रक्‍तामध्ये ओढ मातिची, मनास मातीचे ताजेपण मातीतुन मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन कोसळताना वर्षा अविरत स्‍नान समाधी मध्ये डुबावे दंवात भिजल्या प्राजक्‍तापरी ओल्या शरदामधि निथळावे हेमंताचा ओढुन शेला हळूच ओले अंग टिपावे वसंतातले फुलाफुलांचे छापिल उंची पातळ ल्यावे ग्रीष्माची नाजूक टोपली उदवावा कचभार तिच्यावर जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर आणिक तुझिया लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे उभे राहुनी असे अधांतरि तुजला ध्यावे तुजला ध्यावे

हे माझ्याकडून केशी तुझिया फुले उगवतील तुला कशाला वेणी? चांदण्यास शिंगार कशाला? बसशिल तेथे लेणी पहाटशी तु अमळ निरागस संध्येपरी संभोयी जुन्याच ओळी गुणगुणतांना जमतील सोनपिसोई तुझी पावले भिडता येईल तिर्थकळा पाण्याला तुझ्या स्वरांच्या स्पर्शे येईल अर्थ नवा गाण्याला अश्या तुला कां हवे प्रसाधन तुच तुझे गं लेणे तुला पाहिल्यामुळे आमुचे कृतार्थ इथले येणे बाकीबाब https://www.youtube.com/watch?v=RHdEAHMuTkw

त्याला इलाज नाही-- धिक्कारिली तरीही सटवीस लाज नाही श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले त्यालाच देव करिती त्याला इलाज नाही लढवून बांधवांना संहार साधणारा गीता खुशाल सांगे त्याला इलाज नाही तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेका कथिती विरुद्ध गोष्टी त्याला इलाज नाही ते भूत संशयाचे ग्रासून निश्चितीला छळते भल्याभल्यांना त्याला इलाज नाही विज्ञान ज्ञान देई निर्मी नवीन किमया निर्मी न प्रेम शांती त्याला इलाज नाही बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून प्रगटी अनेक रुपे त्याला इलाज नाही असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी अस्वस्थता टळेना त्याला इलाज नाही ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा निर्दोष ना सुकाणू त्याला इलाज नाही वृद्धापकाल येता जाणार तोल थोडा श्रद्धा बनेल काठी त्याला इलाज नाही -विंदा करंदीकर

पुसणारं कुणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे कुणाचे डोळे भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे - चंद्रशेखर गोखले (मी माझा)

In reply to by काळा पहाड

मरताना मला वाटलं आयुष्य नुसतंच वाहून गेलं. जगायचंय मला जगायचंय म्हणताना माझं जगायचंच राहूनच गेलं

In reply to by काळा पहाड

ह्यावरुन सूर्यकांत खोकल्यांनी केलेलं विडंबन आठवलं. कात्रण चांगलं असेल तर करंजीला अर्थ आहे करंजीच मोडली...तर(?) सारण सुद्धा व्यर्थ आहे

जगाचा गल्बला जगात सोडुन प्रेमाची मृणाल- बंधने तोडून- होता तो भ्रमिष्ट भ्रमत एकला नादात अगम्य टाकीत पावला वर्तले नवल डोंगर-कपारी गवसे प्रतिमा संगमरवरी ! हर्षाचा उन्माद आला त्या वेड्याला घेऊन मूर्ति ती बेहोष चालला, आढळे पुढती पहाड उभार वेड्याच्या मनात काही ये विचार थांबवी आपुला निरर्थ प्रवास दिवसामागून उलटे दिवस- आणिक अखेरी राबून अखण्ड वेड्याने खोदले मंदिर प्रचंड चढवी कळस घडवी आसन, जाहली मंदिरी मूर्त ती स्थापन ! नंतर सुरू हो वेड्याचे पूजन घुमते कड्यात नर्तन गायन रान अन् भोतीचे स्फुंदते सकाळी ठेवी हा वेलींना ना फूल, ना कळी ! विचारी आश्चर्ये तृणाला ओहळ कोण हा हिरावी रोजला ओंजळ ? परन्तु मूर्त ती बोलेना, हलेना, वेड्याचे कौतुक काहीही करीना ! सरले गायन सरले नर्तन चालले अखेरी भीषण क्रंदन पडून तिच्या त्या सुन्दर पायाशी ओरडे रडे तो उपाशी तापाशी ! खुळाच ! कळे न पाषाणापासून अपेक्षा कशाची उपेक्षेवाचून ! वैतागे, संतापे, अखेरी क्रोधाने मूर्तीच्या ठिकर्‍या केल्या त्या भक्ताने ! रित्या त्या मंदिरी आता तो दाराशी बसतो शोधत काहीसे आकाशी. वाटेचे प्रवासी मंदिरी येतात आणिक शिल्पाची थोरवी गातात. पाहून परंतू मोकळा गाभारा पाषाणखंडांचा आतला पसारा- त्वेषाने बोलती जाताना रसिक असेल चांडाळ हा मूर्तिभंजक ! ------------ कुसुमाग्रज

सुंदर कल्पना ! माझे दोन पैसे...

देणार्‍याने देत जावे

- विंदा करंदीकर
देणार्‍याने देत जावे; घेणार्‍याने घेत जावे. हिरव्यापिवळ्या माळावरून हिरवीपिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे; रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी; भरलेल्याश्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणार्‍याने देत जावे; घेणार्‍याने घेत जावे; घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे ! या कवितेच्या शेवटच्या दोन ओळी कळस आहेत. ते एरवी सरळ वाटणार्‍या कवितेला एव्हरेस्टची उंची देऊन जातात !!!

संदीप खरेची मला आवडणारी एक कविता कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर त्याच जागी त्या येऊन जाशी माझ्यासाठी माझ्या नंतर अवचित कधी सामोरे यावे अन्‌ श्वासांनी थांबून जावे परस्‍परांना त्रास तरीही परस्‍परांविण ना गत्‍यंतर मला पाहुनी दडते, लपते आणिक तरीही इतुके जपते वाटेवरच्या फुलास माझ्या लावून जाते हळूच अत्तर भेट जरी ना या जन्‍मातून ओळख झाली इतकी आतून प्रश्‍न मला जो पडला नाही, त्याचेही तुज सुचते उत्तर मला सापडे तुझे तुझेपण तुझ्याबरोबर माझे मीपण तुला तोलुनी धरतो मी अन्‌ तूही मजला सावर सावर मेघ कधी हे भरून येता अबोल आतून घुसमट होता झरते तिकडे पाणी टपटप आणि इकडे शाई झरझर

एक व्यक्तीच्या मनात दाटलेल्या व्यक्त होऊ पाहणाऱ्या विचारांचा आणि भरून आलेल्या आभाळाचा समेळ हे निळारंभ मुक्तसे, काही मला खुणावे बोलेल जरी मजपाशी, मन करीन मोकळे ll १ ll माझ्या उरात दाटे, व्यथा बरे कशाची करतील दूर काय, तिज मेघ सावळे ll २ ll बोलू कसा तयाला?, जीव आर्त गुदमरे संकेत विहंग सांगे, घे भरारी अवखळे ll ३ ll मी बोलता जरासा, तोही भरून आला तळमळ झुगारुनी, तो विजेत विरघळे ll ४ ll हा पाऊस आसवांचा, वाहून हर्ष त्याला मी ही भिजून चिंब, दु:ख सारे निमाले ll ५ ll - http://www.saarthbodh.com/2013/02/blog-post_20.html

ओळखलतं का सर मला, पावसात आला कुणी कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत म्हणाला पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा… - कुसुमाग्रज

In reply to by असा मी असामी

मी या कवितेची वाट पहात होते. धन्यु!!

रंगरंगुल्या, सानसानुल्या, गवतफुला रे गवतफुला; असा कसा रे सांग लागला, सांग तुझा रे तुझा लळा. मित्रासंगे माळावरती, पतंग उडवित फिरताना; तुला पाहिले गवतावरती, झुलता झुलता हसताना. विसरुनी गेलो पतंग नभिचा; विसरून गेलो मित्राला; पाहुन तुजला हरवुन गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा. हिरवी नाजुक रेशिम पाती, दोन बाजुला सळसळती; नीळ निळुली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती. मलाही वाटे लहान होऊन, तुझ्याहुनही लहान रे; तुझ्या संगती सडा रहावे, विसरून शाळा, घर सारे.

In reply to by काळा पहाड

ही कविता आम्हाला बालभारतीमध्ये होती. पण नासलेल्या बालपणी (संदर्भः पु.ल.) शिक्षक आम्हाला याच्यावर प्रश्न सोडवायला सांगायचे. कवितेचं रसग्रहण करा, ही कविता कुणी लिहीली आहे, कवितेच्या शेवटी कवी ला काय करावे असे वाटते, गवतफुलाला पाहिले तेव्हा कवीला काय वाटले, दगड आणि धोंडे. जर मराठी वाचवायची असेल तर शिक्षक नावाचा प्राणी हद्दपार केला पाहिजे असं माझं ठाम मत बनलं आहे. हा प्राणी कुठल्याही कवितेची वाट लावू शकतो.

In reply to by काळा पहाड

सहमत... भाषा साहित्य हे आस्वाद घेण्यासाठी असते. बटाटेवडा खातांना कुणी वरच्या आवरणाची जाडी पण मोजत नाही आणि बटाट्याच्या फोडींचा आकार पण बघत नाही. तसेच ह्या कलाक्रुतींचे असते. जावूदे... भेंडी, शाळेत उगाचच गेलो.माझी मौल्यवान १० वर्षे वाया गेली...

"पण आपण चालावे. दरवेशी नसलो तरी. सोबत घेऊन आपली सावली. शोधावा नवा रस्ता. पायांना जर फुटल्याच आहेत दिशा आणि जर आहेतच गावे प्रत्येक रस्त्यावर, तर सापडेलही एखादे आपल्यासाठी थांबलेले. नाही तर आहेच रस्ता रस्त्यांना मिळणारा आणि ते रस्ते दुसरया रस्त्यांना मिळत जाणारे" प्रभा गणोरकर यांची ही कविता. या कवितेमुळे भटकंतीबाबत एक सखोल जाण माझ्यात निर्माण व्हायला मदत झाली. शोधाची अपरिहार्यता, त्यातली वेदना, त्यात असलेली अनिश्चितता, त्यातील अर्थहीनता ... आणि तरीही एक अथांग आशावाद फार ताकदीने हे शब्द आपल्यापर्यंत पोचवतात. आपणच आपल्याला आधार द्यायचा असतो हेही अटळ सत्य या शब्दांनी मला दिले. रस्ते असतातच .... ते आपण शोधायचे असतात... ते मिळतात.... हे लक्षात येऊन माझा जगण्यावरचा विश्वास बळावतो.. दुसरा रस्ता शोधण्याची ऊर्मी ही कविता माझ्यात जागी करते!

संग्रहणीय धागा ! आतापर्यंत अनेक कविता वाचल्या, काही आवडल्या. मात्र इथे टंकता येण्याइतपत लक्षात राहत नाहित. माझे वाचन गाढवासारखं. उकीरड्यावर सोडलं की चरत जायचं. काही चांगले, बरेच खराब. दाताखाली चांगल लागलं की तेवढ्यापुरतं आवडतं पण चव दीर्घकाळ जीभेवर रेंगाळत नाही. बर्‍याच कवितांच्या एक दोन ओळी संदर्भ / दाखले / देण्याइतपत / टाळ्या, वाहवा मिळविण्याइतपतच लक्षात राहतात. ऐन संभाषणात त्या एक दोन ओळीच भाव वाढवून जातात. असो. धागाकर्त्याला अनेक शुभेच्छा.

कोणाला शंका असेल पण मला निश्चित माहीत आहे, की माझे नाते नऊ नक्षत्रांच्या मध्यावर त्यांना आधार आणि प्रकाश देत असलेल्या त्या वैश्विक जाळाशी, सूर्याशी आहे- पण केव्हा अंधारल्या घडीला मीही विसरतो हे नाते आणि उकिरड्याच्या कडेला बसलेल्या भिका​र्‍याप्रमाणे मी हातात कटोरा घेऊन बसतो लज्जास्पद, येत्याजात्या पांथस्थाच्या अनुदानासाठी. एखाद्या शेवाळलेल्या क्षणाला मीही विसरतो ते नाते आणि भुताटकी वाड्यातील अमावास्या पीत बसलेल्या विहिरीप्रमाणे उबवीत बसतो अंत:करणात द्वेषमत्सराच्या हिरव्या सर्पाची चिकट लगदाळी. एखाद्या विसकटलेल्या दिवशी मीही विसरतो ते नाते आणि माझ्या अंगावर ओघळणा​​र्‍या हलकटपणावर मात करण्यासाठी होतो इतका हलकट इतका की माझ्या मुखावर चढतो मी कधीही न मागितलेला एक भयाण विद्रूप दिर्गंधी मुखवटा. पण हे सारे सूर्यद्रोह मी करीत असताना, केल्यावर, माझ्या काळजाच्या आंतरदेशात धगधगून पेटून उठते एक विराट जंगल, आणि प्रकाश न देणा​​र्‍या भाजून काढते मला नि:संगपणाने. आणि त्याने दिलेले आश्वासनही. - कुसुमाग्रज.

आज इथे दोन कवियत्रींच्या कविता द्यायचा मोह होत आहे. फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे कुंच्या टोपडी शेले शाली त्यातच आहे घडी करुन जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती पडली होती सा-यांच्या पाया हाच पदर धरून हाती पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सुष्म वास ओळखीची.. अनोळखीची.. जाणीव गुढ़ आहे त्यास धूर कापूर उदबत्यांतून जळत गेले किती श्रावण पैठणीने जपले एक तन.. एक मन.. माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली शेवंतीची चमेलीची आरास पदराआडून हसली वर्षामागुन वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले सौभाग्य मरण आले आजीचे माझ्या सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते ऊरी कवळुन मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळुन मधली वर्षे गळुन पडतात कालपटाचा जुळतो धागा पैठणीच्या चौकड्यानो आजीला माझ्या कुशल सांगा - शांता शेळके नको नको रे पावसा असा अवेळी धिंगाणा घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली; नको नाचूं तडातडा असा कौलारावरुन, तांबे सतेलीपातेलीं आणू भांडी मी कोठून? नको करु झोंबाझोंबी माझी नाजूक वेलण, नको टाकू फुलमाळ अशी मातीत लोटून; आडदांडा नको येउं झेपावत दारांतून, माझे नेसूचे जुनेर नको टांकू भिजवून; किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना, वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आण ना; वेशीपुढे आठ कोस जा रे आडवा धावत, विजेबा, कडाडून मागे फिरव पंथस्थ; आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून, घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन; पितळेची लोटीवाटी तुझ्यासाठी मी मांडीन, माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन; नको नको रे पावसा असा अवेळी धिंगाणा घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली…. - इंदिरा संत बाकी समग्र बोरकर आणि गदिमा इथे आले तर पळतीलच :)

बोरकरांचं नाव काढलं आणि ही कविता आठवली.शब्दांमधल्या तालामुळे शाळेपासुन लक्षात राहिलेली. गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले दिन लंघुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले धुंद सजल हसीत दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना मंदाकिनी वरुनी धवल विहगवृंद डोले गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेळ खेळे गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले मीन चमकुनी उसळे, जलवलयी रव मिसळे नवथर रस रंग गहन करिती नयन ओले गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले धूसर हो क्षितिज त्वरित, घोर पथी अचल चकित तृण विसरूनी जवळील ते खिळवी गगनी डोळे गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले टप टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले

In reply to by काळा पहाड

जलद = ढग अनिल = वारा धवल विहगवृंद = पांढर्‍या पक्ष्यांचा (बगळ्यांचा) उडत चाललेला थवा मीन = मासा आता सोपी वाटतेय का?

एकाहून एक सरस कविता! आवडत्या कविता म्हणून कोणाचे नाव घेऊ? कुसुमाग्रज आणि बाकीबाब हे तर आमचे देव. आणखीही खूप आहेत. एकेक कविता त्या त्या वेळी आपल्याशी अगदी जवळून संवाद साधते, इतका की ते सगळे शब्दात सांगता न येण्याजोगे. जशी आता शांताबाई शेळके यांची पैठणी वाचून आत्ता दोन्ही आज्यांची आठवण अस्वस्थ करते आहे!

वाचतोय. -दिलीप बिरुटे

कवितेतलं फारसं कळत नाही, पण ही आवडली खूप. घाई प्रत्येक अनोळखी झाडाला काटेरी ठरवण्याची आपल्याला केवढी घाई आपल्याला वाटतं, फुलं वाटणं ही फक्त आपलीच पुण्याई तसे, आपणही कुणाला खुपलेले असतो काट्यासारखे कोणी आपल्यामुळे झालेले असते फुलांना पारखे थरथरते आपली हिशेबी फुलपाकळी जेव्हा ‘काटेरी’ ठरवलेल्या अनोळखी झाडातून होतो पुष्पवर्षाव आणि.. फुलांचा खच आपल्या पायतळी .... ---मुकुंदराज कुलकर्णी

रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजयश्रीला श्री विष्णूंपरी भगवा झेंडा एकची हा ॥ धृ.॥ शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची दर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठी झेंड्याची तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता पाश पटापट तुटती त्यांचा खेळे पट झेंड्यावरचा लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी अखंड रुधीरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होइ अधर्म लाथेने तुडवी, धर्माला गगनी चढवी, राम रणांगणी मग दावी ॥१॥ कधी न केले निजमुख काळे पाठ दावुनी शत्रुला कृष्ण कारणी क्षणही न कधी धर्माचा हा ध्वज दिसला चोच मारण्या परव्रणावर काकापरी नच फडफडला जणु जटायु रावणमार्गी उलट रणांगणी हा दिसला परलक्ष्मीला पळवायाला पळभर पदर न हा पसरे श्वासांश्वासांसह सत्याचे संचरती जगती वारे गगनमंदिरी धाव करी, मलीन मृत्तिका लव न धरी, नगराजाचा गर्व हरी ॥२॥ मुरारबाजी करी कारंजी पुरंदरावर रुधिरांची झुकली कुठली दौलत झाली धर्माच्या ध्वजराजाची संभाजीच्या हृदयी खवळे राष्ट्रप्रेमाचे पाणी अमर तयांच्या छटा झळकती निधड्या छातीची वाणी खंडोजी कुरवंडी कन्या प्रेमे प्रभुचरणावरुनी स्वामी भक्तीचे तेज अतुल ते चमकत राहे ध्वज गगनी हे सिंहासन निष्ठेचे, हे नंदनवन देवांचे, मूर्तीमंत हा हरी नाचे ॥३॥ स्मशानातल्या दिव्य महाली निजनाथासह पतीव्रता सौभाग्याची सीमा नुरली उजळायाला या जगता रमा-माधवा सवे पोचता गगनांतरी जळत्या ज्योती चिन्मंगल ही चिता झळकते ह्या भगव्या झेंड्यावरती नसूनी असणे, मरूनी जगणे, राख होउनी पालविणे जीवाभावाच्या जादुच्या ह्या ध्वजराजाला हे लेणे संसाराचा अंत इथे, मोहाची क्षणी गाठ तुटे, धुके फिटे नव विश्व उठे ॥४॥ या झेंड्याचे हे आवाहन "महादेव हर हर" बोला उठा हिंदुनो अंधारावर घाव निशणीचा घाला वीज कडाडुनि पडता तरुवर कंपित हृदयांतरी होती टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती झंजावाता पोटी येउनी पान हलेना हाताने कलंक असला धुवूनी काढणे शिवरायाच्या राष्ट्राने घनचक्कर या युद्धात, व्हा राष्ट्राचे राऊत , कर्तृत्वाचा द्या हात.. ॥५॥ __वि. स. खांडेकर बर्‍याच दिवसांनी ही कविता सापडली. लहान असताना ग्राउंडवर सगळे मिळून जोरजोरात म्हणायचो. आताही मनातल्यामनात जोरात म्हणुन पाहीली, तेवढीच मजा आली पैजारबुवा,

टप्‌ टप्‌ पडती अंगावरती प्राजक्‍ताची फुले भिर्‌ भिर्‌ भिर्‌ भिर्‌ त्या तालावर गाणे अमुचे जुळे ! कुरणावरती, झाडांखाली ऊन-सावली विणते जाळी येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले ! दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पाहा नाहती हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले ! गाणे अमुचे झुळ-झुळ वारा गाणे अमुचे लुक-लुक तारा पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले ! फुलांसारखे सर्व फुला रे सुरात मिसळुनि सूर, चला रे गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

In reply to by मुक्त विहारि

कवी मंगेश पाडगावकर! या निमित्ताने त्यांची अजून एक कविता: डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी कामांत गुंतलेले असतील हात दोन्ही तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी कळणार हाय नाही दुनिया तुला मला ही मी पापण्यांत माझ्या ही झाकिली विराणी

कोमेजून निजलेली एक परी राणी, उतरलेले तोंड, डोळां सुकलेले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला.. दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला ! आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी रोज सकाळीस राजा निघताना बोले, गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले जमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेतच घरी स्वप्‍नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खर्‍याखुर्‍या परी साठी गोष्टीतली परी बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला.. दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला ! ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून तास-तास जातो खालमानेने निघून, एक-एक दिवा जातो हळूच विझून अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आठवांसोबत पाणी डोळ्यांतून दाटे वाटते की उठुनिया तुझ्यापास यावे, तुझ्यासाठी मीही पुन्हा लहानगे व्हावे उगाचच रुसावे नी भांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी उधळत, खिदळत, बोलशील काही, बघताना भान मला उरणार नाही हासुनिया उगाचच ओरडेल काही, दुरूनच आपल्याला बघणारी आई तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा, क्षणा क्षणावर ठेवू खोडकर ठसा सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला.. दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला ! दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई, मऊमऊ दूधभात भरवेल आई गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी कुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही, सदोदित जरी का मी तुझ्या पासनाही जेवू-खाऊ न्हाऊ-माखू घालतो ना तुला, आई परी वेणीफणी करतो ना तुला तुझ्यासाठी आईपरी बाबा सुद्धा खुळा, तो ही कधी गुपचूप रडतो रे बाळा सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला.. दमलेल्या बाबाची या कहाणी तुला ! बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा लुटूलुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरचं पहात राहिलो फक्‍त, जवळ पहायचंच राहिलं असा गेलो आहे बाळा पुरा अडकून, हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून असा कसा बाबा देव लेकराला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतो बालपण गेले तुझे गुज निसटून, उरे काय तुझ्यामाझ्या ओंजळी मधून जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग ? मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग ? सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये ?

सदर धाग्यात (पुस्तकमित्र) खंड पडलेला दिसतो.पुन्हा सुरु व्हावा असे मनापासून वाटते.

सदर धाग्यात (पुस्तकमित्र) खंड पडलेला दिसतो.पुन्हा सुरु व्हावा असे मनापासून वाटते.

सदर धाग्यात (पुस्तकमित्र) खंड पडलेला दिसतो.पुन्हा सुरु व्हावा असे मनापासून वाटते.

सदर धाग्यात (पुस्तकमित्र) खंड पडलेला दिसतो.पुन्हा सुरु व्हावा असे मनापासून वाटते.

सदर धाग्यात (पुस्तकमित्र) खंड पडलेला दिसतो.पुन्हा सुरु व्हावा असे मनापासून वाटते.

अशाच एका तप्त दुपारी रोजच उठणाऱ्या अगणित प्रश्नांच्या मोहोळातून एक प्रश्न अल्लाद निसटला आणि तरंगत तरंगत एका निवांत पहुडलेल्या उत्तराशेजारी जाऊन विसावला (अपूर्ण) हा धागा वाचता वाचता सहज सुचलं. कोणाला पूर्ण करायचं असल्यास स्वागत . :-)