मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऐका सत्य नारायणाssssची कथा!

अत्रुप्त आत्मा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
थोडी पार्श्वभूमी.... मी १९९७ पासून हे पौरोहित्याचं काम करायला लागलो..पहिली ४/५ वर्ष ही इतरांच्या हाताखाली तयार होण्यात गेली.पुढे जसजसा या सर्व कर्मकांड आणि धर्माबाबतचा विरोधी मतांचा अभ्यास वाढत गेला..तसतसा मी स्वतः या निष्कर्षाप्रत आलो,की आपल्या जवळ असलेलं हे साधन जनकल्याणाच्या हेतूनी वगैरे जन्माला आलेलं आहे.हा एक लोकप्रीय गैरसमज आहे. महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब अंबेडकरांसारख्यांनी वैदिक धर्मावर/कर्मकांडांवर केलेले आरोप हे आकसापोटी नाहीत..तसेच त्यात परकीय शक्तिंचा हात इत्यादी काहिही नाही. मग त्यांचं(फुले/अंबेडकर..) लेखन कानांना आणि मनाला ऐकायला कितीही वाइट लागो. सावरकरांनी हिंदूधर्मावर केलेल्या शस्त्र-क्रीया तर अत्यावश्यकच होत्या. त्यांनी आमच्या सत्यनारायणाच्या भाकडकथेवरुन सत्यनारायणाला असत्याची पूजा असा समर्पक शब्द वापरलेला आहे. पुढे अं.नि.स.चं डॉ.नरेंद्र दाभोलकर लिहित सर्व साहित्य..आणि अंनिस..च्या इतर कार्यकर्त्यांनी लिहिलेले लेख पुस्तकं वाचून झाली..शाम मानव यांचीही पुस्तकं भाषणं इत्यादी ऐकून झाली.. नरहर कुरुंदकर* तर माझं जिवनमूल्यच आहे..त्यामुळे त्याविषयी वेगळे सांगायला नको. (*हा माणुस पुस्तकातून माझ्या हाती लागला नसता..तर मी या व्यवसायात ऑन ड्युटी असताना..धर्मनिरपेक्ष वागायचं म्हणजे...नक्की वागायचं काय? हे मला अधिक चांगल्या रितीनी कधिच कळू शकलं नसतं. :) ) या सर्व गोष्टींनंतर मी स्वतः असा निर्णय घेतला की हे भिक्षुकिचे काम करत असताना..मी स्वतः...माझ्यासमोर येणार्‍या कोणत्याही यजमानाच्या कुठल्याच प्रकारच्या श्रद्धेला खतपाणी घालणार नाही..ती श्रद्धा कमी किंवा जास्त-करवायच्या प्रयत्नात पडणार नाही. एखादा धर्मभोळा आयुष्यात न भरून येणारी हानी श्रद्धेच्या नादी लागून करताना दिसला,तर त्याला नीट समजावून सांगुन अथवा त्याच्याच हितासाठी खोट्या गोष्टी सांगुनंही त्याचा श्रद्धामार्ग बदलवायला किंवा मऊ करायला भाग पाडिन.याउप्पर मी कुणाच्याही धर्मश्रद्धेत तो पर्यंत हस्तक्षेप करणार नाही..जोपर्यंत ती इतरांना त्रासदायक ठरणार नाही.

तुंम्ही म्हणाल...

अहो ..हे सर्व तुंम्ही आंम्हाला कशाला सांगत आहात??? तर..त्याचं कारण असं की आता पुढे तुंम्ही सत्यनारायणाच्या कथेचे २ प्रकार ऐकणार आहात.ते नेमके कशामुळे तयार झाले..याची पूर्वपीठिका माहित असावी. हे सर्व बदल (गेल्या दहा वर्षात..) करत असताना माझ्या(मना)समोर एकच उद्दिष्ट आहे. ते म्हणजे माझ्यासमोर येणार्‍या धर्म:श्रद्ध माणसाला धर्माच्या नावाखाली मिळणारी पारंपारिक मूल्य मी शक्यतोवर मला टाळता यावी..आणि त्याच्या जागी आधुनिक्/पुरोगामी असं काहि देता आलं नाही..तरी किमान नितीची उपासना घडायला काहितरी कारणीभूत होइल असं काहि देता यावं..आता यातंही एक अडचण नेहमीचीच असते/असणार आहे. ती म्हणजे एखाद्या यजमानानी ही कथा किंवा असा बदल त्याला नको असला,(जसे की कन्या-दानाच्या जागी ..मी आणलेला वधू/वर स्विकाराचा विधी!..होमाशिवाय'ची वास्तुशांत! इत्यादी..) तर मी काय करतो? त्याला हवं ते (पारंपारिक ) काम देऊन मोकळा होतो. असं का बरं मग? कारण तो मला त्याला हवं ते करवून घेण्याचेच पैसे देत असतो. आणि मी ही कुणी समाजसुधारक नव्हे तर एक भटजी आहे. (फारतर..धर्मसुधारणेची इच्छा असलेला भटजी आहे ..असे म्हणता येइल.) त्यामुळे ही मर्यादा मला केवळ पैश्यालाच नव्हे,तर यजमानाला भारतीय घटनेनी दिलेल्या धर्मोपासनेच्या स्वातंत्र्याचा मान राखून पाळावीच लागणार. अर्थात..मी जे जे बदल करतो..ते ही केवळ मला हवे असतात म्हणून नव्हे..तर त्यालाही चालणारे असतात..म्हणूनच! असो..बरच पुराण लावलं. आता मूळ विषयाकडे वळू. सत्यनारायणाच्या कथेत..मी केलेले बदल म्हणजे,नक्की आहे तरी काय??? अध्याय पहिला :- यात सुरवातीच्या काहि वाक्यांनंतर येणारं कर्मविपाकाचं मुल्य मी सरळ उडवुन लावलेलं आहे. आणि पुढे इहलैकिक दु:खांचा पूर्वजन्मात झालेल्या पापांशी असलेला समंधही ...मी रद्दबातल केला आहे. तसेच नारद आणि विष्णुच्या संवादात..ही पूजा पौर्णिमेला केली असता मिळणारं..अधिक फळ! हे टाळून कोणताही शुभकारक दिवस आणि आपलं मन प्रसन्न असेल अशी वेळ..म्हणजेच चांगला मुहुर्त असा फेरबदल केलेला आहे. बाकि पुजेमुळे होणारे फायदे/तोटे तर संपूर्ण कथेत कुठेच शिल्लक ठेवलेले नाहीत. अध्याय दुसरा:- या अध्यायापसून सत्य-देव किंवा सत्य-नावाचा-नारायण असे सूचक उल्लेख पुढे सर्वत्र मी केले आहेत. आणि शतानंद ब्राम्हणाला देव त्याची गरिबी जाऊन श्रीमंती यावी..म्हणून हा उपाय सांगतो..असं जे प्र-लोभन दाखवलय..ते सोडून मी त्याला "हे पूजन केल्यानी तुझी दु:ख दूर होऊन..तुला सन्मार्गाचं दर्शन घडेल(आणि त्या योगेच तू सुखी होशिल!) असं वाक्य टाकलय. पुढे हा शतानंद (लॉट्री लागल्या सारखा) पूजेवर पूजा(स्वतःच्या घरी!) करुन सुखी होत नाही..तर स्वतःजवळ असलेली विद्या इतरांना प्रसादासारखी वाटतो,आणि त्यायोगे लोकप्रतिष्ठा/राजप्रतिष्ठा मिळवुन सुखी होतो..(आणि याची जाणिव) म्हणून त्याला वाटेल तेंव्हा पूजा करतो ..असं दाखवलय. त्यापुढचा त्याला मोळिविक्या भेटण्याचा प्रसंगही बदलवून त्यात पूजेऐवजी नामस्मरण ही पण (वेळप्रसंगी..) पूजा होऊ शकते असं मांडलय. शिवाय या गरीब मोळिविक्याला प्राचिन कथेत कचकाऊन प्रलोभनं/अमिषं दाखवली आहेत..त्यांनाही मी टाळलेलं आहे. थोडक्यात..परमेश्वरी आशिर्वादाच्या योगे माणसाच्या जीवनात मुळातच असलेला प्रयत्नवाद..सदाचरण हेच फळ-मिळायला कारणीभूत असतं...हे मी या दुसर्‍या अध्यायाचं बीज बनवलं आहे. अध्यात तिसरा:- हा फेमस साधुवाणी एपिसोड आहे.. भरपूर चमत्कार..लबाड्या केल्या तरी फळणारा देव..तसेच निष्कारण त्रासात टाकणारा आणि पूजा केल्यावर-सोडणारा असा-देव..मी उडवून लावलेला आहे. किंबहुना पहिल्यांदाच राजा उल्कामुख हा..हे पूजन पुत्रप्राप्तीसाठी करतो..असं दाखवलय तिथुनच बदल सुरु केलाय.. राजा हे पुजन कशासाठी करतो..? तर राज्य चालविण्यासाठी जी बुद्धी इच्छा शक्ति लागते..ती देणारा(अश्या मनोकामना)पूर्ण करणारा हा देव आहे म्हणून!.. नंतर साधुवाणी हेच पूजन का करतो? तर.. मूळ कथेत अपत्यप्राप्तीसाठी पूजा हा हेतू दर्शविलाय..मी तो बदलून..आयुष्यात जे न्यून आहे..ते(योग्य मार्गानी.) पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना साधुवाण्याकडून करविली आहे.पुढे मग साधुवाण्याची बायको(मुलं झाल्यावर..साधुवाण्याला देवाचे ऋण मानावे म्हणून पूजा करायला लावते..तो ती टाळतो..आणि नंतर पुढे बोलल्याप्रमाणे मुलिच्या विवाहावेळी करत नाही..वचनभंग करतो..त्यामुळे त्याला चोरिचा आळ येऊन तुरुंगात पडावं लागतं.. हा भाग साधारण तसाच ठेवलाय.(कारण आरपार बदलेली कथा कुणालाच अवडत नाही..हा अनुभव आहेच!) तरिही पुन्हा तुरुंगातून सुटायला पुन्हा पूजेचा प्रकार मी ठेवलेला नाहीच.. शिवाय इकडे साधुवाण्याच्या घरच्यांनी पुजा प्रार्थना केली..आणि लगेच तो (त्या योगे) तिकडे सुटला ..हा चमत्कारिक पणा बदलून..मी त्या चंद्रकेतू राजाला..नीट तपास पूर्ण झाल्यावर हे कळलं..की हे दोघं चोर नसून व्यापारीच आहेत..आणि मग त्यांनी यांना सोडलं..असं सांगुन या अध्यायाला शेवटाला आणलय..मूळ कथेत हे सर्व राजाला सत्यनारायणानी स्वप्नात येऊन ..कुठलिहि कारणमिमांसा न देता "हे चोर नाहीत..यांना सोडून दे " असं सांगितलेलं आहे. (पुढे हिच गोष्ट्/कथा चवथ्या आध्यायात पूर्ण होते..) अध्याय चवथा:- या अध्यायात साधुवाण्याने घरीजाताना मार्गात विघ्ने येऊ नयेत म्हणून ब्राम्हणांना दक्षिणा देऊन प्रवास सुरु केला असा मुद्दा आहे.. हा मी सुरवातीपासूनच कधिही सांगितलेला नाही. पुढे सत्यनारायण संन्यासी वेष धारण करुन येतो..नौकेत काय आहे? विचारतो..साधुवाणी खोटं बोलतो..त्याची परिणिती नौकेतल्या द्रव्यनाशात होते..मग पुन्हा संन्याशाचे पाय धरणे..संन्याश्याने त्याला पूजेविषयी सुनावणे..साधुवाण्याने त्याला हो'कार देणे..नौकेतील धनंद्रव्य पुन्हा मिळविणे..यात मी.. प्रसंग तोच ठेऊन मूल्यबदल केलाय..आधिच्या कथेत सांगितल्या प्रमाणे साधुवाण्याला दामदुप्पट धन विनासायास मिळतं..मग फुकट मिळालेल्या धनानी माणूस असत्य बेताल वर्तन करतो..त्याला यामुळेच जवळ असलेलं धन..द्र्व्य सुख देत नाही..(नष्ट होतं..पालापाचोळ्यासमान होतं) हा मानवी जिवनातला धागा पकडून नंतर..हे साधुवाण्याच्या लक्षात येतं..पैश्याची आसक्ती संपते..देवाला केवळ मूर्तीतच नाही तर दिन दु:खितांमधेही पहावं.. सदाचरणी राहुन परमेश्वराचं नाव घेण्याचा मार्ग अवलंबावा .. हे सर्व कळतं... असा बदल मी त्यात केला आहे.. पुढे साधुवाण्याचं घरी जाणे..त्याच्या बायकोने(लीलावतीने) मुलिला(कलावतीला) "सत्यनारायण पूजा करुनच यांना भेटायला नदिवर ये" असं सांगणे..तिने पूजा करुन,परंतू प्रसाद न घेता येणे..मग नौका बुडणे..कलावतीने "पति पुन्हा प्राप्त झाला नाही,तर त्याच्या पादुका घेऊन सती जाइन" असं बोलणे..मग साधुवाण्याने पूजा केल्यावर नौका जावयासह परत वरती येणे.. हा सर्व चमत्कारीक आणि अनैतिक कथा भाग..वगळून..मी त्या जागी- साधुवाणी घरी येतो..संन्याश्याच्या दर्शनानी/उपदेशानी आपलं जीवन कसं सन्मार्गी झालं..हे कुटुंबियांना सांगतो..पुढचं सगळं आयुष्य हा साधुवाणी त्याला वाटेल तेंव्हा* (कृतज्ञता म्हणून..) सत्यदेवाचं नामस्मरण/पूजन करुन सदाचारी जीवन जगण्यात घालवतो..आणि या पद्धतीनी जगल्यावर त्याला शेवटी फळं काय मिळतं बरं??? तर वृद्धापकाळी मृत्यु जवळ आल्यानंतर/येइपर्यंत, त्याची इहलोकावरची आस(स्वार्थपूर्णआशा)..पूर्ण संपलेली असते..सुखी अंतःकरणानी तो भगवंताच्या भेटीला जाऊ शकतो.. असं दाखवून..मी या प्रकारच्या प्राप्त होणार्‍या अवस्थेला..इहलौकिक मोक्ष अश्या नव्या संकल्पनेत सादर केलेलं आहे. ..याच मुद्द्यावर हा अध्याय संपवलेला आहे. (* :- मूळ कथेत साधुवाणी पुढे आयुष्यभर दर पौर्णिमेला ही पूजा करतो..असं सांगुन हा जो..प्रॉडक्ट गिर्‍हाइकाला अ‍ॅटेज करण्याचा प्रयत्न सर्व कथेत झालेला आहे..तो मी उडवला आहे.) अध्याय पाचवा:- ही अंगध्वज राजाची गोष्ट..हा राजा जंगलात जातो..शिकार खेळतो..तिथे गोपालकांनी केलेल्या पूजेला नमस्कार करत नाही..त्यांनी दिलेला प्रसादंही जमिनीवर टाकतो..याची परिणीती म्हणून देवाचा कोप होऊन..त्याचं राज्य जातं..शंभर मुलांचा मृत्यू होतो..सत्यनारायण परत केल्यानी हे सगळं परत मिळतं..असा हा कथाभाग आहे..आणि शेवटी या पाच अध्यायातल्या गोष्टींना आधाराला धरून..लोकांना ही पूजा करण्याचं महत्व..काहि प्रमाणात भीती आणि मोह घालून सांगत हे सर्व संपवलेलं आहे. मी यात राजाला शिकार खेळण्याचं व्यसन आहे असं दाखवून..गोपालकांनी दिलेल्या प्रसादाचा त्याग इथपर्यंत सर्व तसच ठेऊन..त्याची परिणीती त्याचं राज्य शत्रुनी बळकावण्यात दाखवली आहे..पुढे हा राजा दु:ख्खी अंतःकरणानी,राज्य गेलं..म्हणून जंगलात इतस्ततः भटकत असताना याच गोपालकांच्या दृष्टीला पडतो..असं दाखवून्,गोपालकां कडून राजाला एक उपदेश करवलाय..त्यात ते राजाला असं सांगतात..की -
हे राजन.. तू प्रसाद टाकलास तेंव्हाच तुला ..हे असं काहितरी फळ मिळणार हे आंम्ही ओळखलं होतं..अभक्त सुद्धा(जे अधार्मिक असतात असे लोक...) ते ही प्रसाद अन्न समजुन खातात.(फेकून देत नाहीत..) याच वर्तनाला प्रथमधर्म..म्हणजे मनुष्यधर्म म्हणतात.. तुझ्याकडे हा मनुष्यधर्म नव्हता..म्हणूनच राजधर्म(हा त्यानंतरच येणारा..) दुसरा धर्मही नव्हता/राहिला नाही ..म्हणून तुझ्याकडे राज्यपालनाची बुद्धी राहिली नाही(शिकारी खेळत बसलास) आणि राज्य शत्रूनी नेलं..."
या स्पष्टी-करणानंतर..राजा देवासमोर पश्चाताप बुद्धिनी अशी शपथ घेतो..की- "मी तुझ्या आशिर्वादानी आणि माझ्या बळावर राज्य तर परत मिळविनच..परंतू तू मला तिथे राजधर्म पाळता यावा यासाठी मनुष्यधर्म पालन करण्याची बुद्धी दे".. मग..पुढे हा राजा,राज्य परत मिळवतो..बोलल्यासारखं वागून दाखवतो.. सुखी होतो..मोक्षाचा अधिकारी होतो..इथे हे सर्व संपवून.. शेवटी ही (म्हणजे अशी सांगितली गेलेली..) कथा ही बोधकथे सारखी असते..असं सांगून या शेवटच्या अध्यायाचा आणि एकंदर कथेचा समारोप मी केलेला आहे... आता..वरती या पाच अध्यायांचं जे काही विवेचन मी केलेलं आहे ते खाली दिलेल्या या दोन रेकॉर्डिंग वर आपल्याला ऐकायला मिळणार आहे..या पैकी एक प्रकार मराठी कथेचा..तर दुसरा हिंदी कथेचा आहे.. दोन्ही रेकॉर्डिंग..ही मी गेल्या सिझनमधे केलेल्या पूजांमधे केलेली आहेत (live आहेत..) त्यामुळे वर केलेल्या विवेचना प्रमाणे ती अगदी शंभर टक्के असतीलच असे नाही..(८० टक्के नक्की आहेत..) परंतू कथाभागातले बदल जसेच्या तसे (ठेवलेले)आहेत.. सर्व कथा बोली भाषेत आहेत.. मूळ कथेतले चमत्कार नाहीत..तसेच फापटपसाराही त्यात नाही..जे नको ,ते उडवलं किंवा बदललं आहे.आणि हवं किंवा असावं..ते घातलेलं आहे..याखेरीजंही जे बदल तुंम्ही सुचवाल सांगाल..ते यथामती यथायोग्य (यापुढे..) स्विकारले जातीलच.. तेंव्हा ..मि.पा.करांन्नो.. चला आता (या आत्मू भटाची.. ;) )

ऐका सत्य नारायणाssssची कथा!!!

१) मराठी कथा:- ही कथा सांगताना मोबल्या थोडा लांब होता..त्यामुळे शब्दश्रुती साठी जरा लक्षपूर्वक ऐकावी लागेल..क्षमस्व! http://mfi.re/listen/ibszayaiki3vm2d/satya_narayan_katha2.mp3 २) हिंदी कथा:- ही कथा एका बँकेत झालेल्या पूजेच्या वेळेची आहे..बँक नॉनमहाराष्ट्रीयन असल्यानी तिकडून आलेले त्यांचे हिंदी भाषिक साहेब्/उपसाहेब..यांच्या आग्रहानी मी ही हिंदित सांगितली आहे..(या रेकॉर्डिंगमधे..सुरवातीला थोडा प्रार्थनेचा भाग आलाय..नंतर लगेच कथा सुरु झालीये..ही कथा जास्त प्रासादिक आणि ठणठणीत शब्दात बद्ध झालेली आहे..मराठी पेक्षा ऐकाला सुरसही वाटेल..) http://mfi.re/listen/edbym84erbqw3po/hindi_satya_katha.ogg (कथा ऐकल्यानंतर साहेब असा आनंदून गेला..की त्यानी ती रेकॉर्ड केलेली कथा नंतर दिवसभर बँकेत अखंड लावली होती..माझ्या हिशोबी "हे" जरा जास्तच लाइव्ह झालं! :) ..असो.) ==================================================== https://lh3.googleusercontent.com/-4Vf1W471Fmg/VGWv1ppHVAI/AAAAAAAAGmw/e3DrKorvhsQ/w800-h450-no/my%2Bfone%2B223.jpg दोन्ही कथाप्रकार ऐकून/ आस्वादून आपला अभिप्रायंही जरूर द्या . :)

वाचने 41342 वाचनखूण प्रतिक्रिया 127

In reply to by टवाळ कार्टा

मृगनयनी Tue, 11/18/2014 - 19:02
अ.आ.' जी... सत्यनारायणकथेचा हा मॉडर्न अभिनिवेश खरंच खूप कौतुकास्पद आहे. सत्यनारायणाच्या पूजेचे मूळ वर्म हे "मानसिक शान्ती लाभणे" हे आहे. आपण पौरोहित्य करता.. तेव्हा आपणासही माहित असेल, की अश्या पूजा किंवा कर्मकांडांनी उचित पवित्र वातावरण निर्मिती होऊन पूजेचा यजमान व त्याचे कुटुम्बीय.. हे- पूजेच्या निमित्ताने का होईना.. पण कम्पलसरी एका ठिकाणी बसून काही काळासाठी मन ईश्वरचरणी लावू शकतात. जे की रोजच्या धकाधकीच्या जीवनात सहजासहजी शक्य नसते. त्याचप्रमाणे सत्यनारायणाचा केळे, वेलची इ. घालून केलेला साजूक तुपातला प्रसाद ... म्हणजे.. अहाहा..!!! (काही जण हा प्रसाद खाण्यासाठी निमित्त पाहिजे म्हणून सत्यनारायण घालतात.. ;) ) आपण या पूजेतील अनावश्यक पार्ट गाळून पूजा सांगता.. हेही अत्यंत स्तुत्य आहे. कारण जेव्हा ही स्टोरी "बनवली" गेली.. तेव्हाचा काळ, लोकांची मेंटॅलिटी, त्यांची श्रद्धा / अंधश्रद्धा आणि आत्ताचे लोक, आताचा काळ यांत बराच फरक आहे. त्यामुळे आत्ताच्या काळानुसार चालणे किम्बहुना लोकांना जुन्या भ्रामक कल्पनांतून बाहेर काढून त्यांच्या मनात असलेल्या अंधश्रद्धांच्या जागी देवाविषयीची नॉर्मल श्रद्धा जागृत करणे.. हे जनजागृतीचे काम केवळ आपल्यासारख्या तज्ज्ञ पुरोहितांनाच शक्य आहे.. कारण ज्यांचा आपल्यावर विश्वास आहे.. तेच लोक आपणास मान देऊन पौरोहित्यासाठी बोलावतात. :) बाकी आपल्या पुष्प-रांगोळ्यांची तारीफ आम्ही फेसबुकवर आणि इथेही नेहमीच करत आलेलो आहोत... आपण केलेली पुष्परचना ही सत्यनारायणाच्या मांगल्यात अधिकच भर टाकते... :) आपणास आपल्या या जनजागृतीच्या कार्यासाठी अनेक शुभेच्छा!!!!!

स्पा Fri, 11/14/2014 - 15:07
वा रे बुव्या , नुसतच पूजेवर वांझोटी चर्चा ण करता, त्यात काळानुसार योग्य तो बदल करून लोकांपर्यंत पोचवण्याच कार्य तू करत आहेस,त्याबद्दल __/\__ लोकही हा बदल नक्कीच स्वीकारतील रेकोर्डिंग घरी जाऊन ऐकतो

In reply to by बॅटमॅन

नाखु Fri, 11/14/2014 - 16:31
मी काय करू एकटा! याला हे निरूपण "सणसणीत" उत्तर.मला बुवा माझे स्नेही असल्याचा सार्थ अभिमान आहे!

In reply to by नाखु

+१०० बुवा, द ग्रेट ! बोलणारे अनेक असतात, पण "क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे"... हे तुम्ही सिद्ध करून दाखले आहे हे जाहीर करत आहे !

In reply to by मधुरा देशपांडे

स्वाती दिनेश Fri, 11/14/2014 - 19:20
मधुरासारखेच म्हणते.. आणि एक .. जेव्हा केव्हा सत्यनारायणाची पूजा घालेन तेव्हा तुम्हालाच बोलवेन हो आत्मुगुरुजी.. स्वाती

राही Fri, 11/14/2014 - 15:26
उपक्रन स्तुत्य आहे याबद्दल वादच नाही. पण हे बदल इतर गुरुजींनी सुद्धा स्वीकारले आहेत का? की ही तुमची एकट्याचीच लढाई आहे? विरोधही झाला असेल. त्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक.

In reply to by राही

@पण हे बदल इतर गुरुजींनी सुद्धा स्वीकारले आहेत का? >>> अजुन तरी नाही..अनेकांना इच्छा आहे/असते..पण त्यांना लोकमानसाचा अंदाज आला,तरी स्वतःच्या श्रद्धा अडव्या येतात. काहि जणांना आपण हे असलं (तथाकथित)धर्मविरोधी आचरण केलं तर समाजापासून लांब जाऊ..असं भय वाटतं @की ही तुमची एकट्याचीच लढाई आहे? >>> अजुन तरी एकट्याचीच आहे.. :) याचा प्रसार व्हावा म्हणून मी माझ्या परिनी धडपडत असतोच..काहि जणं थोडं फार अजुकरण करतात..पण..असो! या निमित्तानी येथील लोकांना १ आवाहन करावसं वाटतं
आपण जेंव्हा ही पूजा आपल्या गुरुजिंकडून कराल,तेंव्हा ही कथा तिथे लाऊन ऐका..तुमच्या गुरुजिंना मूळ कथा न सांगण्याबद्दल आनंदानी विनंती करा
माझ काम थोडं पुढं सरकल्यासारखं होइल. :) @विरोधही झाला असेल. त्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक. >>> विरोध म्हणजे..सुरवातीच्या काळात झाला..पण त्याला माझी अविवेकी बोलण्याची पद्धत कारणीभूत होती.. (ते विरोधी मताचा मनावर पगडा पडलेले सुरवातीचे दिवस होते) पण नंतर आणि अगदी आजंही माझ्या लोकांमधे मी या वर्तवणूकीमुळे थोडा फेमस..पण बराचसा बदनाम आहे..मला अंनिसचा गुर्जी .. ब्रिगेडी हस्तक .. कट्टर सावरकरवादी(म्हणजे वेड लागलेला..) अशी टोपणनावं आहेत. (आमच्यातली..) माझ्यावर राग असलेली काही खास लोकं मला वावदूक आणि चार्वाक असेही म्हणतात. मी या सगळ्याकडे पूर्वी दुर्लक्ष करत होतो..ते आजही करतोच..पण नुकत्याच (गेल्या ५ वर्षातल्या..)व्यवसायात आलेल्या मुलांना हे सर्व नक्की काय आहे..हे पण सांगतो. आमच्यातले अनेकजण माझ्या विचारांचा धसका घेऊन त्यांची मत माझ्यासमोर मांडतच नाहीत.. ही मात्र वाइट गोष्ट आहे.. :( मी हे सर्व जास्तीत जास्त सकारात्मक करण्याच्या प्रयत्नात आजंही आहे..यापुढेही रहाणार.. बघू काय काय होतं ते! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

हाडक्या Fri, 11/14/2014 - 17:18
+१ गुर्जी, आपल्याबद्दल आदर होताच.. तो आता दुणावला असे म्हणावेसे वाटते. आपल्या या कार्यास शुभेच्छा ..!!

म्ह्णून तो नारायणसुध्दा व्यथित झाला असणार... म्ह्णून त्याने तुम्हाला सत्य प्रकाशात आणायची बुध्दी दिली...... जय हो !!

पैसा Fri, 11/14/2014 - 16:49
छान वाटलं बदललेली कथा वाचून. रेकॉर्डिंग सवडीने ऐकेनच. समाज बदलणे हे एकट्यादुकट्याचं काम नाही, मात्र सावरकर, दाभोलकर आणि कुरुंदकरांची पुस्तकं मुलांना संस्कारक्षम वयात हातात ठेवली तर बराच सकारात्मक बदल घडून येऊ शकेल.

अजया Fri, 11/14/2014 - 16:58
गुरुजी,पोटापाण्याच्या व्यवसायात इतकं खरं बोलायला धाडस लागतं.स्वतःच्या मूल्यांशी, तत्वांशी जराही तडजोड न करता व्यवसाय करणे,तो लोकांच्या डोक्यात घुसवण्यासाठी प्रयत्न करणे तरीही सह व्यवसायिकांकडुन अव्यवसायिक,अव्यवहारी अाहेस असे स्वतःवर शिक्के मारुन घेणे हे व्यवसाय भिन्न असले तरी मीही अनुभवले आहे.त्यामुळेच तुमच्या या प्रयत्नाला सलाम __/\__

In reply to by बोका-ए-आझम

@लोकांचा काय प्रतिसाद आहे याच्यावर? >>> आपल्या हिंदू समाजाचा स्वभाव साधारणपणे झटकन आणि आरपार बदलाला अनुकुल रहात आलेला नाही.. (माझ्या बाबतीत तर हे सगळ्यात आधी खरं आहे! ;) ) पण धर्मावर वारंवार उठणारी टीकेची झोड, सहृदयी आणि सत्प्रवृत्त माणसांना हळूहळू का होइ ना...,बदलाला भाग पाडते..(आणि हे खास करुन हिंदु समाजाचं वैशिष्ठ्य आहे..) माझा कन्यादानाच्या जागी आलेला वधु/वर स्विकाराचा विधी हे तर याचेच फलित आहे. पण सस्केस रेट्च्या बाबतीत म्हणाल..तर तो अतीशय मंद आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

मुक्त विहारि Fri, 11/14/2014 - 23:34
मंद असला तरी असू दे... सती बंदी, विधवा विवाहाला मान्यता, कुटुंब नियोजन करणार्‍या साधनांचा वापर, आपल्या समाजाने कगेच नाही स्वीकारला.थोडा वेळ लागलाच ना? हे पण बंद होईल. निदान आमच्या घरात तरी हे काल-बाह्य प्रकार होणार नाहीत, ह्याची मी काळजी घेतो.

In reply to by मुक्त विहारि

@निदान आमच्या घरात तरी हे काल-बाह्य प्रकार होणार नाहीत, ह्याची मी काळजी घेतो. >>> वा..फारच छान!

In reply to by मुक्त विहारि

@अजून काय हवे? >>> या मार्गावर चालताना झेंडाही आपलाच आपल्याला दाखवायला हवा! ;-) . . . . हे हवे! :)

निमिष ध. Fri, 11/14/2014 - 19:51
या सत्यनारायणा वरुन - खास करुन त्या कहाणी वरुन आमचा नेहमी वाद व्हायचा. आता घरच्याना वाचायला देतो आणि कहाणी ऐकतो. देशात येउन सत्यनारायण घालायचे ठरले तर आमचे बुकिंग आत्ताच घेउन ठेवा!!

दिपक.कुवेत Fri, 11/14/2014 - 20:31
फारच रसाळ लिहिलत हो. कथा सावकाश एकतो आता. हे एकुन एक आयडिया सुचली आहे. तुम्हि जशी आता ईथे कथा रेकॉर्ड करुन दिली आहेत तसच एकदा संपुर्ण सत्यनारायण पूजा, त्यासाठि लागणारी सामग्री असं रेकॉर्ड करुन त्याची लींक ईथे द्याल का? किमान गेला बाजार साधं गणेश पुजन किंवा गणपती दिवसात गणपतीची प्रतिस्थापना तरी? म्हणजे जे भारताबाहेर आहेत त्यांना तुमचं एकुन पुजा केल्याचं समाधान भेटेल (जीथे भटजी उपलब्ध नसेल तीथे).

In reply to by दिपक.कुवेत

हाडक्या Fri, 11/14/2014 - 20:46
गुर्जींच्या पोटावर पाय आणताय व्हय हो ? फार तर गुर्जींना ऑन-साईट ऑफर करा की, येतील गुर्जी बिजिनेस ट्रीपवर.. ;)

In reply to by यसवायजी

हाडक्या Sat, 11/15/2014 - 22:31
गुर्जी ऑनलाईन सर्विसेस सुरु करा ब्वा.. लई मागणी दिसतेय. टेक्निकल मदत मिपावरून मिळेलच तशी. हाकानाका.. ;)

In reply to by हाडक्या

@टेक्निकल मदत मिपावरून मिळेलच तशी.>>>> तीच सांगा... मला आय्च्यान त्यातलं कई कळत नै! :-(

बुवेश अभिनंदन हो !!! फार स्तुत्य उपक्रम आहे .. अधिकाधिक भटजींना हा बदल स्वीकारायला पाहिजे..

खटपट्या Fri, 11/14/2014 - 22:59
खूप छान. अशा गुरुजींची आंतरजालावर का होईना माझी ओळ्ख आहे याचा मला अभिमान आहे. तुमचे कोणी व्यावसायिक मित्र मुंबई ठाण्यात असतील तर त्यानाही अशा रीतीने तयार करा..

In reply to by खटपट्या

@ तुमचे कोणी व्यावसायिक मित्र मुंबई ठाण्यात असतील तर त्यानाही अशा रीतीने तयार करा.. >> इच्छा तर भरपूर आहे..पण आमची लोकं अनेक कारणांनी अश्या बदलांना अजुनही भितात.. :( त्यांना सारखा शास्त्राधार लागतो सगळीकडे!

अर्धवटराव Fri, 11/14/2014 - 23:32
आपल्या उणिवा कळायला शहाणपण लागतं, ते स्विकारायला प्रामाणिकपणा लागतो, त्यात सुधारणा करायला धैर्य आणि चिकाटी लागते, व त्याचा प्रचार-प्रसार करायला समाजाप्रती करुणा देखील लागते. तुम्हाला हा प्रसाद आजवर केलेल्या सत्यनारायण पूजनामुळे मिळाला काय ? ;)

मानलं तुम्हाला.मलाही अशाच पद्धतीने पुजाविधी शिकायचे आहेत.घरची जबाबदारी थोडी कमी झाली कि शिकण्याचा विचार आहे.एक शंका आहे.तुम्हाला व्य.नी.केला तर चालेल का?

नरेंद्र गोळे Sun, 11/16/2014 - 09:19
हिंदू धर्म परिवर्तनशील नाही म्हणणार्‍यांनी, प्रत्यक्ष पौरोहित्य करणार्‍याची ही कथा ऐकण्यासारखीच आहे. अतृप्त आत्मा साहेब, आपल्या ह्या पुरोगामित्वाचे मला अपरूप वाटते. सारेच लोक आपल्यासारखा पुरोगामी विचार करू लागतील तो सुदिन. चित्रलेखा सिनेमात विख्यात शायर, साहिर लुधियानवी म्हणतातः संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे इस लोग को भी, अपना ना सके, उस लोग में भी, पछताओगे ये पाप हैं क्या, ये पुण्य हैं क्या, रीतों पर धर्म की मोहोरे हैं हर युग में बदलते धर्मों को, कैसे आदर्श बनाओगे ये भोग भी एक तपस्या है, तुम त्याग के मारें क्या जानो अपमान रचेता का होगा, रचना को अगर ठुकराओगे हम कहते है, ये जग अपना है, तुम कहते हो झूठा सपना है हम जनम बिताकर जाएंगे, तुम जनम गवाँकर जाओगे “हर युग में बदलते धर्मों को” आदर्श बनवण्याची आपली करामत मला आवडली!

In reply to by नरेंद्र गोळे

@ये भोग भी एक तपस्या है, तुम त्याग के मारें क्या जानो अपमान रचेता का होगा, रचना को अगर ठुकराओगे>>> वाह! *HAPPY* ही कविता हताशी ठेवालीच पाहिजे. :)

स्पंदना Sun, 11/16/2014 - 17:11
आत्मुस साष्टांग नमस्कार तुम्हाला. खर तर जो व्यवसाय तुम्ही निवडला आहे, त्याला तुम्ही आणत असलेला हा नवा प्रकार अजिबात धार्जीणा नाही, तरीही स्वतःच्या स्वर्थापल्याड जाऊन तुम्ही जे काही करता आहात त्याला तोड नाही.

In reply to by स्पंदना

किसन शिंदे Wed, 11/19/2014 - 00:52
तरीही स्वतःच्या स्वर्थापल्याड जाऊन तुम्ही जे काही करता आहात त्याला तोड नाही.
हेच्च आणि असंच म्हणायचंय मलाही. फक्त या गोष्टी स्वत: आचरणात आणतानाच तुम्ही बरोबरच्या दहा लोकांनाही जमेल तसं हे शिकवत रहा असं प्रामाणिकपणे सांगू इच्छितो.

बुवा तुम्ही सुधारणावादी आहात हे तुमच्या प्रत्येक लेखातन जाणवतेच आणि त्या बद्दल तुमचे मनापासुन कौतुकही वाटते. हा लेख वाचल्या नंतर त्या कौतुकाची जागा आदरभावाने घेतली आहे. कदाचीत काही गोष्टींसाठी तुम्हाला कमी प्रतिसाद मिळेल, काही प्रसंगी विरोधही होईल त्याला बाजुला सारुन हाती घेतलेले कार्य निर्भिडपणे करत रहा. तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा. पैजारबुवा

अर्धवट Sun, 01/25/2015 - 08:25
बुवा, आमच्याकडे पूजा सांगायला एक गुर्जी आला होता, चांगला पिकलेला होता, कथा सांगता सांगता त्याने आधुनिक महिलांच्या कपड्यावर, स्वयापाकावर आणि इतर अनेक गोष्टींवर फालतू शेरेबाजी केली, माझा तोंडपट्टा मोठ्या मुश्किलीने कंट्रोल केला होता, त्या दिवसानंतर आजपर्यंत कुठल्याही गुरुजीशी गुरुजी म्हणून संबंध ठेवलेला नाही, मित्र म्हणून बरेच आहेत. आता यापुढे कधी पूजा करण्याचा प्रसंग आला तर आधीसारखा कडाडून विरोध न करता, अनुमोदन देईन आणि 'गुरुजी मी शोधेन तोच' असंही सांगेन. फक्त किती दिवस आधी बुकिंग करायला लागतं ते सांगून ठेवा. इतक्या वर्षानंतर कुठल्या गुरुजीसमोर खाली वाकलोच नमस्कार करायला तर त्याला कारण तुम्हीच असाल.

आपल्या या प्रतिसादासाठी वेळ द्यायला फारच उशीर झाला. त्या बद्दल प्रथम क्षमस्व!
आमच्याकडे पूजा सांगायला एक गुर्जी आला होता, चांगला पिकलेला होता, कथा सांगता सांगता त्याने आधुनिक महिलांच्या कपड्यावर, स्वयापाकावर आणि इतर अनेक गोष्टींवर फालतू शेरेबाजी केली, माझा तोंडपट्टा मोठ्या मुश्किलीने कंट्रोल केला होता, त्या दिवसानंतर आजपर्यंत कुठल्याही गुरुजीशी गुरुजी म्हणून संबंध ठेवलेला नाही, मित्र म्हणून बरेच आहेत.
>>> हम्म्म... हे सनातन प्रभातवादी हल्ली भरपूर वाढले आहेत..त्यांना आपला स्वतःचा जन्म समाजाच्या धर्मप्रणीत-निती-उत्थानासाठी झालेला आहे..असा भ्रम झालेला असतो. मला असं वाटतं कि तुंमच्या सारख्यांनी असा आवश्यक विरोध ..(कार्यक्रम करवून घेतल्यानंतर आणि दक्षिणा देण्याआधी..) करायला हवा. तो तुमचा अधिकार देखिल आहे. कारण अश्या लोकांचा जागेवर बौद्धिक पराभव होणं आवश्यक असतं. आणि तो करविण्यात काहिच गैर नाही. @आता यापुढे कधी पूजा करण्याचा प्रसंग आला तर आधीसारखा कडाडून विरोध न करता, अनुमोदन देईन आणि 'गुरुजी मी शोधेन तोच' असंही सांगेन. फक्त किती दिवस आधी बुकिंग करायला लागतं ते सांगून ठेवा. इतक्या वर्षानंतर कुठल्या गुरुजीसमोर खाली वाकलोच नमस्कार करायला तर त्याला कारण तुम्हीच असाल. >> बदलाचा यथोचित परिणाम झाला..हे पाहून.., मि ही आपला अत्यंत आभारी राहू इच्छितो. :) .. खरच भरून पावलो आज! __/\__ आमच्या परंपरेच्या मागासपणाची माझ्या एकट्याकडून तरी का होइ ना? आवश्यक ती नविन भर घालून ..चालायला सुरवात झाली.. याची..अशी दखल-दिसत असेल...तर मग -हेच खरं प्रायःश्चित्त!!! :) ============

त्या "बघा देश बुडतो की नाही" वाल्यांस एकदा ऐकवाच आत्मू गुर्जी! कथा तुमची! सांगा त्यांस धर्म बुडत नसतो!!! योद्धा संन्याश्या चा शिष्योत्तम शोभावा असला योद्धा भटजी आवडला!!! जियो!!! गोपाळराव अन बळवंतरावांस एकत्र आणायची किमया साधलीत! आनंद जाहला!! माझ्या लग्नात मी "मुलगी ही दान करायला वस्तु नाय, मी कन्या"दान" घेणार नाय" शिवाय ते पाय धुवून घेणे वगैरे च्यु गिरी ला फाटा दिला, हे अन इतकेच केले मी :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

@गोपाळराव अन बळवंतरावांस एकत्र आणायची किमया साधलीत! आनंद जाहला!! >> बाप रे...! यु आर सिंपली ग्रेट. उपमेतंही काय विलक्षण साम्य हुडकलत. सलाम तुम्हाला. :) @माझ्या लग्नात मी "मुलगी ही दान करायला वस्तु नाय, मी कन्या"दान" घेणार नाय" शिवाय ते पाय धुवून घेणे वगैरे च्यु गिरी ला फाटा दिला, हे अन इतकेच केले मी >>> हेच आणि असच्च करायला हवं- तुंम्ही यजमानांनी!!! असं केलत..कि विरोधी असणार्‍या/नसणार्‍या ..अश्या सर्वच धर्मपुरोहितांना झकत धर्म बदलायला भाग पडावं लागतं.. .मी तर हल्ली,मंगल कार्यालयातून...काम करताना हे असे नवे मुद्दे उदाहरण देऊन..(माइकवरुन) सगळ्यांपर्यंत पोहोचवत असतो! या धर्मव्यवस्थेत आतुन जसा मी आहे,तसे बाहेरून तुंम्ही हवे आहात.. एकदा ही मोट जमली कि धर्मशास्त्रातली ही दलदल साफ व्हायला वेळ लागायचा नाही. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अहो आम्हाला कसला सलाम करताय गुर्जी! "आगरकरी बाणा टिळकांच्या सनातनी निष्ठे ने पाळणे" हे आमच्या घराण्यात एकोणीसाव्या शतका पासुन असलेले संस्कार!! , उरता उरला आम्ही यजमान मंडळीं नी आतून तुम्ही बाहेरून वैग्रे, आमचा एक मित्र आहे, कट्टर नास्तिक! देवाला समस्त "शिव्या-सहस्त्रनाम" अर्पित असतो! तो एकदा मला म्हणाला "लेका इतका लॉजिकल असुन कसला देव देव करतो रे!!" मी म्हणले की "बाबारे, मुलतः एथिक्स जन्माला कशी आली इथून तयारी लागेल मला!, धर्म एक खोल विहीर आहे! त्याचा उगम एक निर्मळ झरा आहे, वाटेत लागणारे खड़क (भिक्षुक) अन गदळ (आम्ही झापड़बंद यजमानं) पाणी गढूळ करतात, तू लोकांस विहिरीच्या वरंबी वर बसुन "सावधान" कर धोके सांग, मी आधी बुडी मारून झरे सापडतात का पाहतो! न सापडल्यास येतोच अंग पुशीत वर!!!!" कसे!!! :)

कपिलमुनी Fri, 11/27/2015 - 02:07
कौतुक फार्र केले पण आधुनिक पूजा घालवायास कोणी आमंत्रण देईना ! मिपाकर फारच चॅप्टर ! =))

बोका-ए-आझम Fri, 11/27/2015 - 13:10
हे झालं एका सत्यनारायण पूजेच्या बाबतीत. बाकीच्या ज्या प्रमुख पूजा आहेत - वास्तुपूजा, उपनयन, वगैरे - त्यांच्यात काही सुधारणा असाव्यात का नकोत? कारण सत्यनारायण हा तुलनेने अर्वाचीन विधी आहे, पण उपनयन वगैरे ब-यापैकी पूर्वापार चालत आलेले आहेत (जितका जुना विधी तितकी लोकांची बदलण्याची इच्छा कमी हा माझा तर्क). वास्तुपूजेबद्दल कल्पना नाही पण तोही प्राचीन असावा असा अंदाज आहे. त्याबद्दल काहीतरी सांगा.

In reply to by बोका-ए-आझम

@(जितका जुना विधी तितकी लोकांची बदलण्याची इच्छा कमी हा माझा तर्क). >> नाही नाही..अस नाहिये. जे मनानी आधुनिक(होत) आहेत,ते उलट असा बदल मिळण्याची वाट पहात असतात..पण हे प्रमाण खुपच कमी आहे हे मात्र नक्की!

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस Fri, 11/27/2015 - 13:43
जे मनानी आधुनिक(होत) आहेत,ते उलट असा बदल मिळण्याची वाट पहात असतात..
मनाने आधुनिक होणे म्हणजे ही सगळी कर्मकाण्डेच बंद करणे असा अर्थ होऊ शकत नाही का? --अत्मकुंथित प्रचेतस.

In reply to by प्रचेतस

माहितगार Fri, 11/27/2015 - 15:27
मनाने आधुनिक होणे म्हणजे ही सगळी कर्मकाण्डेच बंद करणे असा अर्थ होऊ शकत नाही का?
गुरुजींच मत माहित नाही, ( कर्मकांडेच असावीत की नाही हा वेगळ्या वादाचा मुद्दा आहे त्याला मी येथे हात लावत नाही.) समजा बगाड नावाची परंपरा आहे त्यात व्यक्तीला इजा होणार नाही अशा पद्धतीने एखादी खुर्ची बसवावी असे मला वाटते त्या साठी संपूर्ण बगाड परंपरा बंदच केली पाहीजे असे नाही कर्मकांडात सुयोग्य बदल केले जाणे गरजेचे आहे. श्रीकृष्णाने इंद्र प्रवर्तीत शक्रपूजा बंद करून त्याच्या गुराखी बांधवांना पर्वत पूजन सुचवले (इती म.भा.खीलपर्व). हल्ली स्त्रीया पूजा करतात मुलींच्या मुंजी होतात हे कर्मकांडे बंड न करता मनाने जरासेतरी आधूनिक होण्याची उदाहरणे असावीत. रांगोळी काढणे हे कर्मकांड असू शकते किंवा कर्मकांडा वगळून बदलता येऊ शकणारी संस्कृती म्हणून त्यात बदलही करता येऊ शकतात. सत्यनारायण पूजा कथेतच मला बर्‍याचदा व्यवस्थापन शिक्षण पाँईट ऑफ व्ह्यू काही बदल करून आधूनिक पद्धतीने ही कथा पुर्नलेखीत करण्याची बर्‍याचदा इच्छा होते. संस्कृतीतील काही कर्मकांडे त्याज्य असू शकतात ती काळानुसार बदलावयास हवीत हे निश्चीत पण म्हणून संपूर्ण संस्कृती मोडीत काढण्याची गरज असते असेही नाही. भारतीय (हिंदू) संस्कृतीत कौटूंबीक परंपरा बदलण्याची दोन वेळा अधिकृत म्हणजे घरातील लग्नादी शुभकार्य प्रसंगानंतर अथवा घरातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर परंपरा बदलता येतात असे ऐकुन आहे जाणकारांनी अधिक माहिती द्यावी.

In reply to by माहितगार

प्रचेतस Fri, 11/27/2015 - 15:29
असाच काहीसा प्रतिसाद गुर्जींकडून अपेक्षित होता पण त्यांनी नुसतं 'चान चान' म्हणून पळवाट काढली.

In reply to by प्रचेतस

माहितगार Fri, 11/27/2015 - 15:35
असाच काहीसा प्रतिसाद गुर्जींकडून अपेक्षित होता पण त्यांनी नुसतं 'चान चान' म्हणून पळवाट काढली.
@ गुर्जीं आमचं उत्तर जरा जरा पटलेलं दिसतय :) आम्ही तुमचे काम परभारे हलके केले असे झाले असल्या कै कमिशन डिस्काऊंट इत्यादी संधी आहे का ? :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. Fri, 11/27/2015 - 14:02
पण हे प्रमाण खुपच कमी आहे हे मात्र नक्की!
तुमच्यासारख्या गुणांनी युक्त सहकार्‍यांची कमतरता जाणवतेय का? की या जागृतीत आपण कुठे कमी पडतोय असे वाटते का? . (मामा मिसळीपाशी कॅमेरामन न घेता मिपा तक चॅनेलकडून अभ्या.)

जियो गुरूजी.. दंडवत स्वीकारा ! सत्यनारायण या प्रकारातलं अवास्तव तत्वज्ञान आणि कर्मकांड लक्षात आल्यापासून मी ही पुजा करणेच बंद करून टाकलेय. (तुम्ही माझ्याकडे केलेली पुजा ही शेवटची पुजा होती. ती सुद्धा पुजेच्या कर्मकांडावर नसला तरी देव किंवा ती जी काही आपल्या आकलनाशक्तीच्या पलीकडे असलेली शक्ती आहे तिच्यावर मन:पूर्वक विश्वास आहे म्हणूनच. आणि तुमच्याबद्दल, तुमच्या पुजेबद्दल ऐकून असल्याने घरातली शेवटची पुजा एका योग्य 'माणसा'च्या हातून व्हावी ही इच्छा होती म्हणूनच तुम्हाला बोलावले होते. तुम्हाला आठवत असेलच) आज हां लेख वाचून त्या स्मृती ताज्या झाल्या म्हणून हां प्रतिसाद प्रपंच ! _/\_

In reply to by विशाल कुलकर्णी

(तुम्ही माझ्याकडे केलेली पुजा ही शेवटची पुजा होती. ती सुद्धा पुजेच्या कर्मकांडावर नसला तरी देव किंवा ती जी काही आपल्या आकलनाशक्तीच्या पलीकडे असलेली शक्ती आहे तिच्यावर मन:पूर्वक विश्वास आहे म्हणूनच. आणि तुमच्याबद्दल, तुमच्या पुजेबद्दल ऐकून असल्याने घरातली शेवटची पुजा एका योग्य 'माणसा'च्या हातून व्हावी ही इच्छा होती म्हणूनच तुम्हाला बोलावले होते. तुम्हाला आठवत असेलच)
होय.आठवतं आहे. __/\__

अन्नू Fri, 11/27/2015 - 15:01
शब्दच नैत बोलायला आता. दंडवत स्वीकारा ओ गुर्जी.. Smiley

पॉइंट ब्लँक Fri, 11/27/2015 - 16:08
मस्त. आपला प्रयत्न आवडला. आज ना उद्या त्याला यश येईल. हिंदु धर्मात काळानुरूप बदल होत गेले आहेत, अजूनहि होत आहेत कारण त्याला तशी बंदि कुठेच नाही. बरोबर चुक काय हे ज्याचं त्याला ठरावायची मुभा आहे. इतकी लोकशाही इतर धर्मांमध्ये दिसत नाही. अर्थात लोकशाहीचे सगळे फायदे तोटे इथेही लागू झाले आहेत.

In reply to by हेमंत लाटकर

संदीप डांगे Fri, 11/27/2015 - 18:10
काय हो, आता मुंज करणे मला पटत नसेल तर मी माझ्या घरच्यांना सांगेन कि मी माझ्या मुलाची मुंज करणार नाही कारण मला पटत नाही. त्यावर माझ्या निर्णयाला प्रतिवाद म्हणून घरच्यांनी 'मुस्लिम त्यांच्या मुलांची सुंता करतात ते तुला कसे चालते?' असा प्रश्न विचारला तर काय करावेब्रे?

In reply to by संदीप डांगे

तस नाही डांगे साहेब, त्यांच्या सारखे हिंन्दू ते चिखलात खेळतात,मग आम्हालाही खेळु द्या..कारण चिखलात खेळण्याचा हक्क दोघांचा! अस तत्त्वज्ञान उराशी बाळगुन असतात.