मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्लास

वेल्लाभट · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
प्रहार वृत्तपत्रात गेल्या रविवारी प्रकाशित झालेला माझा हा लेख इथे सादर करत आहे. मुंबई रेलवे ही भारतातल्या सर्वाधिक गर्दीच्या परिवहन सेवांपैकी एक आहे. दररोज सुमारे २५०० लोकल सेवा या मार्गांवर धावतात आणि सरासरी ७५ लाख प्रवाशांची ने-आण करतात. या रेल्वेचं मुंबईकरांशी असलेलं नातं, मुंबईकरांनाच नव्हे तर मुंबई बाहेरच्यांनाही जवळचं वाटणारं आहे. 'जवळचं' म्हणताना गर्दी, चेंगराचेंगरी नाही आठवली तरंच नवल. प्रचंड गर्दीच्या या मुंबईतील लोकल प्रवासात, भाग्यवंतांनाच बसायला मिळतं, एरवी घोड्यासारखं उभं रहाण्यावाचून पर्याय नसतो. घोडाही नीट सरळ उभा रहात असेल पण गर्दीच्या वेळी लोकल मधे सरळ उभं रहाणंही दुरापास्त असतं. या लोकल मधे दोन 'क्लास' असतात. एक प्रथम दर्जा म्हणजे फर्स्ट क्लास तर दुसरा द्वितीय दर्जा म्हणजे सेकंड क्लास. त्यापैकी फर्स्ट क्लास मधला माझा एक अनुभव आहे. यातील लोकं फर्स्ट क्लास दिसण्यापुरतीच मर्यादित असतात. म्हणजे असं की एकदा नेहमीप्रमाणे फर्स्ट क्लासमधून प्रवास होत होता. गर्दी बरीच होती, आणि बसायला सोडाच, उभं रहायलाही जागा नव्हती. माणसं 'सो मच ऑफ क्राउड' 'डिसगस्टिंग' वगैरे म्हणंत चुकचुकत होती. दोन सीटच्या मधील जागेत जाऊन मी उभा राहिलो होतो. एक व्यक्ती पुढील स्टेशन वर उतरण्यासाठी उठला. तेंव्हा जागा रिकामी झाली असं बघून मी बसण्यासाठी सरसावलो. चौथी वाटणारी ती जागा खरं तर तिस-या माणसाची होती. खिडकीजवळची व्यक्ती आणि तिच्या बाजूची व्यक्ती पाय इतके पसरवून बसल्या होत्या की तिसरी जागा केवळ अर्धा फूट उरली होती. मी बसणार हे ताडताच दुस-या बसलेल्या व्यक्तीने पाय अजूनच जरा पसरवले. एकंदरितच माजोरडेपणाचा आव बघून मला तिथे बसणं प्रचंड अपमानास्पद वाटायला लागलं आणि मी तितक्याच शांतपणे पुन्हा उभा राहिलो. बाजूला उभे असलेले एक वृद्ध गृहस्थ मात्र नाईलाजाने त्या चार पाच इंचात स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांचे पाय दुखत असावेत बहुदा. या ठिकाणी तोंड उघडायची मला इच्छाही न होता त्या आणि त्याच्यासारख्या माणसांची कीव वाटू लागली. याच उलट एक दिवस सेकंड क्लास मधून प्रवास करत असताना आलेला अनुभव. गर्दी साधारण तितकीच होती. वेळही तीच होती. मी असाच दोन सीट च्या मधे उभा होतो आणि जागा मिळण्याच्या आशेवर होतो. गाडी मुंबई सीएसटी वरून कल्याणला जात होती आणि विक्रोळीच्या आसपास होती. मला ठाण्याला उतरायचं होतं. असं असताना खिडकीजवळची व्यक्ती माझ्याकडे बघून डोळ्याने मला खुणावू लागली. 'काय?' असं विचारलं असता म्हणाली 'बसताय?'. मी म्हटलं, 'नाही ठीक आहे, तुम्ही कुठे उतरणार?' 'मी कल्याणला. पण तुम्ही बसा. मी अत्तापर्यंत बसलोयच की.' हो नाही करताना शेवट तो उठूनच उभा राहिल्यावर मी बसलो. त्याचा माझा काहीही संबंध नव्हता, की मी त्याला सीट मागितली नव्हती. पण तरीही त्याने स्वतःहून देऊ केली. वर नमूद केलेल्या दोनही अनुभवांसारखे अनुभव अनेकदा आलेले आहेत, त्या त्या 'क्लास' मधे. पण विचार हा करावासा वाटतो, की सेकंड क्लास मधे दिसलेलं, हे फर्स्ट क्लास सौजन्य, फर्स्ट क्लास मधे गेल्यावर थर्ड क्लास माजाचं रूप कसं घेतं? हा महिमा क्लास चा असतो, की आणि कशाचा? क्लासचा परिणाम लोकांच्या वृत्तीवर होतो, की लोकांच्या वृत्तीचा परिणाम क्लास मधे दिसतो? लहान मुलं जशी सगळी खेळणी मीच खेळणार असा हट्ट करून सख्या भावंडालाही देत नाहीत, तो स्वभाव मोठेपणीही कायम रहातो असं मानायचं का? काहीही असलं तरी अशा अनेक अनुभवांतून हे कळत गेलं, की फर्स्ट क्लास मधे उभं रहावं लागलं, तर बसायला मिळण्याची आशा करू नये, आणि सेकंड क्लास मधे बसायला मिळालं तर मात्र समजून उमजून दुस-या उभ्या व्यक्तीला जागा दिली पाहिजे. अर्थात सरतेशेवटी फर्स्ट क्लासशी फारकत घेण्यातच शहाणपण आहे असा निर्णय झाला. 'डिसगस्टिंग' अहंकाराच्या सुटसुटीतपणापेक्षा गर्दीची अप्रिय जवळीक बरी. त्यातही अधून मधून मिळणारी सौजन्याची झलक जो आनंद देते, तो फर्स्ट क्लासमधे होणा-या अपमान आणि मनस्तापापेक्षा कैक पटीने बरा वाटतो.

वाचने 7353 वाचनखूण प्रतिक्रिया 37

In reply to by देशपांडे विनायक

वेल्लाभट 14/10/2014 - 13:51
फर्स्ट क्लास मधे 'स्क्यूज मी' आणि सेकंड मधे 'भाईसाब जरा साईड होजाओ' (मराठीचा मुद्दा चटकन सुचला पण आत्ता तो विषय नसल्याने टाळतो. :D ) हे कसं काय मग?

यसवायजी 14/10/2014 - 11:10
@ सेकंड क्लास मधे दिसलेलं, हे फर्स्ट क्लास सौजन्य, फर्स्ट क्लास मधे गेल्यावर थर्ड क्लास माजाचं रूप कसं घेतं? >> हम्म.. इंट्रेस्टींग. यावर एक मोठ्ठा लेख येउद्या.

क्लास फक्त कपड्यांपुरताच मर्यादीत असतो..... साधी रहाणि असलेला कुणी डब्ब्यात चढला कि हे "क्लासी" लोक त्याला नजरेनेच मारतात.... काही स्वयंघोषीत टी सी तर त्या व्यक्तीला त्याचा क्लास विचारायला देखिल मागे पुढे पाहत नाही.... थोडी अतिशयोक्ति वाटेल पण बोलतो... इथे भारत आणी इंडीया एकत्र प्रवास करतो

फर्स्ट क्लासवाल्यांनि जास्त पैसे(दमड्या) भरलेल्या असतात पाससाठी ना? तेव्हा तीन सीट्सवर चार माणसे बसणे हे कसे चालवून घेतील?

In reply to by वेल्लाभट

काळा पहाड 14/10/2014 - 14:30
तीन च्या जागेवर तीन तर बसायलाच हवेत. कुणी ज्यादा केलं तर ठेवून द्यावी. मराठी नसेल तर ठार मारायलाही हरकत नाही.

मित्रहो 14/10/2014 - 14:30
असे फर्स्ट क्लास मधे होत नव्हते आधी(दहा-बारा वर्षापूर्वी). बऱ्याचदा ही सवय पण असते. सेकंड क्लास मधे लोक सतत बघता की सीट दुसऱ्याला दिली जाते मग सारेच तेच करतात.फर्स्ट क्लास मधे असे कधी घडलेच नाही त्यामुळे तशी प्रथा सुरु होत नाही.

शिद 14/10/2014 - 14:38
विरार लोकलचा अलिखित नियम जो सेकंड क्लासमध्ये जवळजवळ ९०% लोकं पाळतातच. १) विरार ते चर्चगेटः अंधेरीला उभं राहून उभ्या असलेल्या माणसाला जागा देणं, तेही उभ्या असलेल्या नंबरांप्रमाणं. २) विरार ते दादर/अंधेरी: वरीलप्रमाणेच बोरीवलीला जागा देणं. ३) चर्चगेट/दादर/अंधेरी ते विरारः वरीलप्रमाणेच बोरीवलीला जागा देणं. डहाणु लोकलचे नियम सध्यातरी माहीत नाही.

In reply to by शिद

NiluMP 15/10/2014 - 18:55
डहाणु लोकलचा अनुभव मस्त कारण ही लोकल विरार वरून सरळ वसई आणि मग भायदरला थांबते त्यामुळे गाडीत गर्दी कमी असते आणि प्रवासाचा वेळही कमी लागतो आणि हाच नियमाप्रमाणे प्रत्येक फास्ट विरार लोकल विरारवरून सुटणारी गाडी नालासोपारा आणि मग पुढे सरळ बोरिवलीला थांबावी आणि चर्चगेटवरून सुटणारी विरार लोकल बोरिवलीवरून सरळ नालासोपारा आणि मग विराराला थांबावी. जेणेकरून वेळेची बचत आणि गर्दीतून सुटका होईल. हाच नियम वसई बोरिवलीवरून सरळ नायगाव आणि मग वसईला थांबावी, भायदर लोकल बोरीवली न थांबता दहीसर, मिरारोड आणि भायदराला थांबवावी. जेणेकरून वेळेची बचत आणि गर्दीतून सुटका होईल

In reply to by NiluMP

स्तुत्य उपाय आहे. ढिगभर बोरिवली लोकल्स असणार्‍यांसाठी विरार लोकल हा अतिरिक्त पर्याय उपलब्ध असू द्यायचा आणि कमी गाड्यांची सोय असणार्‍या दहिसरकरांच्या तोंडावर २-४ भाईंदर लोकल्सची सोय(?) फेकून त्यांची विरार लोकलची सोय काढून घ्यायची. आनंद आहे.

सौंदाळा 14/10/2014 - 14:54
क्लास लिहिलय, मुंबई लोकल प्रवासाचा एकंदरीत अनुभव कमी आणि त्यात फस्क्लासचा अनुभव शुन्य आहे.

रेवती 14/10/2014 - 18:25
ल्लेखन आवडले. लोकलचा फारसा अनुभव नसल्याने त्याबद्दल बोलणे योग्य नाही पण क्लासबाबत सहमत, त्याचबरोबर गर्दी इतकी भयानक असते की मनुष्यपण उरत नाही.

विजुभाऊ 14/10/2014 - 18:31
विरार लोकलचा अलिखित नियम जो सेकंड क्लासमध्ये जवळजवळ ९०% लोकं पाळतातच.
सेकंड क्लास चे अजून काही नियम आहेत उदा : अंधेरी बोरीवली वाला कोणी डब्यात असला की त्याला उतरण्यासाठी जागा दिली जात नाही. त्याला थेट किमान मिरा रोड पर्यन्त तरी उतरु दिले जात नाही. फस्ट क्लास मधे निदान असली दादागिरी तरी होत नाही.

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ, बोरिवली लोकल्सच्या मानाने विरार लोकल्स कमी असतात. (पूर्वी तरी तसे होते). दहिसर नंतर भाईंदर, नालासोपारा, वसई, विरार अशा ठिकाणी उतरणार्‍या प्रवाश्यांना आपल्या घरी जाण्यासाठी पुन्हा एस्टीच्या रांगेत ताटकळावे लागते. ह्या एस्ट्या अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतराने असतात. त्यामुळे एक विरार चुकली तरी पुढ्ची विरार अर्ध्या तासाने आणि पुन्हा एस्टी (नेहमीची न मिळाल्यास) गर्दीमुळे चुकण्याची आणि त्यामुळे घरी पोहोचायला एक तास उशीर होण्याचा संभव असतो. त्यामुळे ज्यांच्यासाठी अनंत बोरिवली गाड्या आहेत त्यांनी विरार मध्ये जागा अडवू नये अशी रास्त अपेक्षा असते. तरीपण फक्त विरार लोकल अंधेरी ते बोरिवली फास्ट असते ( घरी १० मिनिटे लवकर पोहोचता येते) म्हणून बोरिवलीकर विरारमध्ये गर्दी करतात आणि विरारवाल्यांना डावलले जाते. बोरिवली सोडा मी तर मालाड-कांदिवली वाल्यांनाही विरार लोकलने बोरिवलीपर्यंत येऊन तिथून रिकाम्या गाडीने परत मागे जाताना पाहिले आहे. शिवाय बोरिवलीला उतरणारे बोरिवलीहून चढणार्‍या विरारवासियांना हाताच्या कोपराने तोंडावर मारून खाली उतरताना आणि विरारवासियाचा चष्मा खालीपडून किंवा ओठ फाटून रक्तबंबाळ होताना पाहिले आहे. संध्याकाळच्या वेळी थकलाभागला जीव चुकून भजनाच्या डब्यात चढला (हल्ली भजनं चालतात की नाही कल्पना नाही) तर तो मेलाच समजावे. ही भजनी मंडळी बहुतेक मालाडची असतात आणि आपल्या डब्यात नॉन भजनी कोणी येऊ नये म्हणून प्रयत्नशील असतात. म्हणजे त्यांचे रोजचे मेंबर्स तिथे प्रवेश करू शकतात बाकीच्यांना शाहजोगपणे अडविलं जातं. म्हणजे विरार लोकल असून विरारवासियांना एक डबा कमी झाला. हा सर्व राग मनांत खदखदत असल्यामुळे कधी कधी तुम्ही म्हणता तसे किंवा मारामारीचे प्रसंग उद्भवतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

काळा पहाड 14/10/2014 - 20:56
याचं खरं कारण भैया लोकांचं मुंबईवर आक्रमण हेच आहे. भैया लोक इथं येवून गर्दी करत नसते तर हा प्रकारच उद्भवला नसता.

In reply to by टवाळ कार्टा

शिद 14/10/2014 - 22:42
सहमत आणि एवढा माज करतात की विचारता सोय नाही. विरारला चालत्या गाडीत उडी मारुन चढले आणि चुकून जर भजनवाल्यांच्या नेहमीच्या सीट्सकडे गेलेतर भ** दोन सीट्सच्या गॅपमध्ये पण उभे राहून देत नाहीत, म्हणजे उडी पण फुकट गेली व सीटपण. नालासोपाराला बहूतांश भय्ये चढतात व कोणी ह्यांच्या ग्रुपमधील असतील तर गर्दीतून जबरदस्तीने धक्काबुक्की करून भजन मंडळींपर्यंत पोचतात. मग हेच आपले मराठी माणसं दुसर्‍या मराठी माणसाला जागा न देता त्या भय्यांना मांडीवर बसवून शेवटपर्यंत प्रवास करतात. भजन कसलं? बेंबीच्या देठापासून कोकलतात नुसते. सकाळी माणूस एकवेळ असा अत्याचार सहन करू शकतो पण दिवसभर ऑफिसचं काम निस्तरून संध्याकाळी/रात्री घरी परतताना डोक्याला जाम शॉट लागतो.

In reply to by शिद

मदनबाण 16/10/2014 - 11:58
भजन कसलं? बेंबीच्या देठापासून कोकलतात नुसते. ए भोळ्या शंकरा... आवड तुला बेलाची आवड तुला बेलाचे, बेलाच्या पानाची. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा, ७०च्या दशकात लोकल्स मधल्या भजनांची प्रथा मालाडच्या गुजराथी समाजाने सुरु केली. त्यावर विरारवाल्यांनी त्यांची कोंडी करून त्यांना दहिसर पर्यंत आणले होते. (दरवाजे अडवून) त्यावर गुजराथी समाजाने मालाड स्थानकात गाडी अडवून तुंबळ हाणामारी केली होती. मराठी भजनी मंडळ ( हे ही निषेधार्ह) नंतर सुरु झाली. हा १९८१ नंतरचा बदल असावा. १९८१ पासून मी मुंबई लोकलचा प्रवासी नसल्याकारणाने कांही अनुभव नाही.

बबन ताम्बे 14/10/2014 - 20:01
मी मुंबईच्या लोकलमधे ब-याच वेळा प्रवास केलाय, पण माझा प्रॉब्लेम असा आहे की मला ज्या स्टेशनवर उतरायचेय त्या स्टेशनवर लोकल कोणत्या बाजुच्या प्लॅटफॉर्म वर उभी राहील याचे लॉजीक काय अजून कळले नाही. एखाद्या स्टेशनवर उतरायचे तर डावीकडे जाऊन उभे रहावे तर हमखास प्लॅटफॉर्म उजवीकडे येतो. मग वाटते पुढच्या स्टेशनचा प्लॅटफॉर्म उजवीकडे येईल तर पुढच्या स्टेशनवर लोकल डावीकडच्या प्लॅटफॉर्म वर लागते. नवीन माणसाला कसे कळायचे हो प्लॅटफॉर्म कोणत्या बाजूला येणार आहे ते? गर्दीच्या वेळी तर आमच्या सारखी माणसे हमखास शेवटच्याच स्टेशन वर उतरतील अशा गोंधळामुळे. :-)

In reply to by बबन ताम्बे

नविन माणसाने, एकंदर उतरणार्‍या प्रवाशांचा रोख पाहून ठरवावे. नाहीतर २-३ प्रवाशांना विचारावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

बबन ताम्बे 14/10/2014 - 20:50
कारण मुंबैकर अगदी आत्मविश्वासाने डावीकडे किंवा उजवीकडे उभे रहातात आणि बरोब्बर त्याच बाजूला प्लॅटफॉर्म येतो.

In reply to by बबन ताम्बे

मराठे 14/10/2014 - 22:47
लॉजिक बिजीक काय नाय हो! रोजचं झालं की पाठ होतं कोणतं स्टेशन कुठे येणार ते. आणि पाठ झालं की आत्मविश्वास येतो.

बोका-ए-आझम 14/10/2014 - 20:35
वेल्लाभट भाऊ, फर्स्टक्लासमध्ये तुम्हाला आलेला अनुभव हा प्रातिनिधिक नाही. तो त्या दिवशी तुम्हाला आला. मी गेली २५ वर्षे (१९८९-२०१४)मुंबई उपनगरीय सेवेने प्रवास करतोय - पश्चिम, मध्य,हार्बर, ट्रान्सहार्बर आणि आता मेट्रो आणि मोनो सुद्धा. अाणि तोही लांब अंतराचा. फर्स्टक्लासमध्येही जागा देतात आणि सेकंडमध्ये पण नखरे करतात. पण मध्य रेल्वेचे प्रवासी गर्दीच्या वेळी जास्त माणसासारखे वागतात आणि पश्चिमवाले मुंबईच्याच भाषेत सांगायचं तर आखडूगिरी करतात असा माझा अनुभव आहे. बाकी गाड्यांमधले ग्रुप्स, ठराविकांची दादागिरी वगैरे प्रकार आधीही होते आणि पुढेही होईल. जर कमी जागेत जास्त जीव कोंबले तर त्यांची स्पेस संकुचित होते आणि त्याचं पर्यवसान हिंसक किंवा बचावात्मक वर्तणुकीत होतं हे मानसशास्त्रीय प्रयोगांनी सिद्ध केलेलं आहे. तुम्हाला आलेला अनुभव हे त्याचंच एक उदाहरण.

In reply to by बोका-ए-आझम

टवाळ कार्टा 14/10/2014 - 22:25
मध्य रेल्वेचे प्रवासी गर्दीच्या वेळी जास्त माणसासारखे वागतात आणि पश्चिमवाले मुंबईच्याच भाषेत सांगायचं तर आखडूगिरी करतात
+१११११११११११११११११११११११११११११११११

In reply to by धर्मराजमुटके

मराठे 14/10/2014 - 22:50
मुंबईतही मोकळ्या गाड्या असतात की.. जर गाडी स्टेशनवर येताना गाडीच्या एका खिडकीतून दुसर्‍या खिडकीपर्यंत आरपार बघता आलं की 'गाडी खाली है' असं म्हटलं जातं आणि लोकं बाह्या सरसावून गाडीचं 'खालीपण' भरायला लागतात.

गणेशा 07/05/2015 - 15:37
मुंबई लोकल प्रवासाचे २-३ वर्ष आठवले.. सेकंड क्लास आपलासा वाटायचा तो ह्याच कारणाने.... तरीही पुण्यातील लोकलचा प्रवास आवडत नाही.. मुंबईत कीती ही धक्का बुक्की होउद्या.. ओरडाओरडीपण होउद्या पण निदान एका माणसाला दूसर्या माणसाची दया असते.. आणि आपल्यासारखेच काम-घर करणारे आहेत म्हणुन चालवुन घेतले जाते.. पुणे - चिंचवड- प्रत्येकाचे वेगळे नखरे.. भाव तर आणखिन वेगळा.. पुण्यात एकदाही चौथीच काय तिसर्या ही सिट वर मी बसत नाही,, कोणी सांगोतले आहे... तास भर लोकलची वाट पहात बसल्यावर २० मिनिटाच्या अंताराला असे काय पाय दुखतात असे म्हणणे करुन प्रवास करतो मी जेंव्हा प्रवास करीत असतो तेंव्हा.

चिनार 07/05/2015 - 15:56
श्री पाडगावकर सरांची माफी मागून ! मुंबई लोकलला सलाम ! लोकलच्या ड्रायव्हरला सलाम ! ३ सेकंदात तिकीट फाडून देणाऱ्या कौण्टर वरच्या चष्मीश बाईंना सलाम! क्षमतेच्या अडीचशेपट गर्दी वाहून नेणाऱ्या त्या लोकलच्या डब्ब्याना सलाम ! एवढ्या गर्दीत कानात ईयर फोन घालून गाणी ऐकणाऱ्या तरुण तरुणींना सलाम ! वेस्टर्न, हार्बर, सेन्ट्रल लाईनला सलाम ! स्टेशन आल्यावर पंधरा सेकंदात आपले सर्व अवयव गोळा करून खाली उतरणाऱ्या मुंबईकराला सलाम ! मुंबई लोकलला सलाम ! -- स्वत: एकही नियम न पाळून समस्त पुण्याच्या ट्राफिकला आणि वाहतूक व्यवस्थेला शिव्या देणारा एक नागरिक !