Skip to main content

मराठी शिलालेखांतील शापवचने

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 23/09/2014 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः खालील शापवचने मराठीतील प्राचीन शिलालेखांतील आणि मुख्यतः शिलाहार यादव आणि विजयनगरच्या राजांच्या काळातील आहेत. जरी ती कुणाला असभ्य वाटली (तशी ती असभ्य आहेतच) तरी ती केवळ तत्कालीन प्रथेचा भाग होती असे समजून वाचावीत. सुरुवातीला हा प्रतिसाद शशिकांत ओकांच्या ह्या धाग्यावर देणार होतो पण लिहिता लिहिता प्रतिसाद बर्‍यापैकी मोठा झाल्याने स्वतंत्र धागा काढूनच आपणांसमोर आणत आहे. गधेगाळीसंबंधी माहिती आधीच वीरगळ आणि गधेगाळ ह्या धाग्यात लिहिलेली आहेच तेव्हा त्याची परत येथे पुनरुक्ती न करता केवळ काही शापवचने थोडक्यात देतो. सर्वसाधारणपणे दिलेल्या दानाला जो कोणी बाधा आणेल अथवा जो कोणी हे दान मोडीला अशा व्यक्तीस अनुलक्षून गधेगाळींतील शापवचने असतात. तेहाची माय गाढव ... हे तर बहुतेकांना माहित आहेच. इतर काही शापवचने पुढीलप्रमाणे १. स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरां | षष्टिं वर्षसहस्राणि विष्टायां जायते कृमि: || हे शापवचन बर्‍याच शिलालेखांत आढळते. जो स्वकीय अथवा परकीय या पृथ्वीचे (दानाचे) हरण करेल तो ६००० वर्षे विष्ठेमधला कृमी होऊन राहील. २. ससन करुनु ग्रामु दिधला हे सासन लोपि तेआसि गोहत्या ब्रम्ह- हत्या बाळहत्या पडे तेयाचीऐ माऐसि गाडौ घोडु | विजयनगरचा संगम हरिहर ह्याचा हा लेख गोव्यातील वेळूस गावातला. (इ.स. १४०२) हे शासन जो मोडील त्यास गोहत्या, ब्रह्महत्या व बालहत्या ही पातके लागून त्याच्या आईस गाढव व घोडा. ३. शिलाहार अपरादित्य (द्वितीय) याचा लोनाड शिलालेख (इ.स. ११८४) इये शासने लिखिता भाषा जो लोपि अथवा लोपावि यो गर्दभनाथु गर्दभु तेहाचिए मांए सूर्यपर्वे गर्दभु झवे इति विचार्य तथा यस्य यस्य यदा भूमिस्तस्य ह्या शासनाचा जो लोप करील तो गाढवांचा नाथ गाढव व त्याचे आईस सूर्यपर्वात गाढव लागेल याचा विचार करून त्याप्रमाणे करावे. ४. पंढरपूरचा विठ्ठलदेवाचा शिलालेख (शके ११११) कवणु अतिसो देई तेआ- सी वीठलाची आण ए काज जो फेडि तो धात्रुद्रोहि शके ११११ रोजी सौम्य संवत्सरी (भिल्लम यादवाच्या) काळात महाजन, देवभक्त परिवार, मुद्रहस्त विठ्ठलदेवनायक या सर्वांनी हे लहान असे देऊळ बांधले. (या देवळास) कोणी अतिसो (पीडा/ उपद्रव) करील त्यास विठ्ठलाची शपथ आहे. हे कार्य जो नष्ट करील तो धातृद्रोही होय. ५. .उदयादित्याचा आंबेजोगाई येथील शिलालेख. (शके १०६६) जो फेडी लोपी तेआ योगिनींचा वज्रदंडू पडे हे शासन जो कोणी नष्ट करेल अथवा लुप्त करेल त्यावर योगिनींचा वज्रदंड पडेल. ६. विजयनगरचा संगम देवराय याचा गोवे- वेळूस शिलालेख (शके १४०८) स्र्हीरवळनाथा श्रीमाहादेवासी १० नैवेद्या चंद्रूसूर्यू तपे सासन लोपी तेआअ गोहते ब्रम्हते बआळते पडे तेआची माए गर्धभे... श्रीरवळनाथ महादेवाच्या १० नैवेद्यांसाठी हे दान दिले आहे. हे शासन जो ल्पील त्यास गोहत्या, ब्रह्महत्या व बालह्त्या ही पातके लागतील व त्याच्या आईस... ७. जैत्र सामंत याचा जालगाव ताम्रपट (शके ११२४) हे ठाकली भाषा चंद्रार्कपर्यत जो मेली तो श्वान गधभ चांडालु ही भाषा (हे दानपत्र) चंद्र व सूर्य आहेत तो पर्यंत सिद्ध आहे. ती जो कोणी फेडील तो श्वान, गर्दभ व चांडाळ होय. ८. सिंघण यादवाचा फुलंब्री शिलालेख (शके ११६४) जो मढाचे अयगत स्वोधाराए घेयवे ए मढु फेडील यचा दोषु ब्रम्हणभोजना फेडील यचा दोषुकरि ह्या मठाचे (देवळाचे) उत्पन्न स्वतःकडे घेणे हे ब्राह्मणभोजनाच विरोध करण्यासारखे असून असे करणारा तसा दोषकरी होईल. ९. .विजयनगरचा संगम देवराय याच्या वेळचा बांदोडे शिलालेख (शके १३३५) पाळावा केला हा धर्मु जो मोडि तेणे वाराण सि श्री विस्वेस्वरा सनिधि सूर्यग्रहणिं आपुला मातापिता गाए वदिल्या पापासि जाए | हा धर्म जो मोडील त्याने काशी येथे श्री विश्वेश्वरासन्निध सूर्यग्रहणाच्या वेळेस आपले आईबाप व गाई वधिल्या असे समजावे. त्यास हे पाप लागेल. १०. यादव रामचंद्रदेवाचा वेळापूर शिलालेख (शके १२२२) पाली तो स्वर्गा जाए न पाली तो नरका जाए हे दान जो पालन करील तो स्वर्गात जाईल, न करील तो नरकात जाईल. ११. पंढरपूर येथील विठ्ठलदेवाचा शिलालेख ( शके १२३३) हा धर्मु जो नाणि लोपि तो मळकु पाली ते- आचा धर्मु | परिवंडे मराठे | सेवकु विठलदेवा खेत्रपति सदैवु धाधर्म जो नष्ट करील तो मळकु (पापी) व जो पाळील याचे मराठी सेवक विठ्ठलदेवाचे सदैव क्षेत्रपती होत. १२. शिलाहार अपरादित्य याचा परळ शिलालेख ( शके ११०८) अथ तु जो कोणु हुवि ए शासन लो- पि तेया श्री वैद्यनाथ देवाची भाल सकुटुंबिआ पडे|| तेहाचीए माय गाढवें.... परंतु हे शासन जो कोणी नष्ट करील त्याच्यावर वैद्यनाथाच्या त्रिशुळाचा फाळ त्याच्या सर्व कुटुंबियांसुद्धा पडेल व त्याच्या आईस गाढव... १३. दाभोळ येथील जामा मशिदीतला मराठी शिलालेख यासि कोणी हिंदु वा मुसलमान इरे वा इस्ति करिल त्यावरिश त्याचे मएअवरि गडदा असे जाणिजे जो हिंदु अथवा मुसलमान ह्या स्थानाचा अवमान करील त्याचे मायेस गाढव.. असे समजा. संदर्भः प्राचीन मराठी कोरीव लेख (शं. गो. तुळपुळे)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 35216
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

अन या परंपरेला हुच्चभ्रू पंडितकवीही अपवाद नव्हते म्हटलं. उदा. मोरोपंतसमकालीन एका अज्ञात कवीची ही आर्या पहा:- यतिने न वागवावा चित्तांत अल्पहि मोड कामाचा | सुरतीं घातक जैसा युवदांपत्यासि मोडका माचा || हाय का तोड?

In reply to by बॅटमॅन

=)) ... =)) ... =))

In reply to by बॅटमॅन

मोडका माचा सुरतमधेच नव्हे तर वापी, विरार, दमण , बडोदे आदि सर्वत्रच घातक .. येक थोडं "लोड कामाचा" बसतंय का बघा की पीयल..