Skip to main content

मराठी शिलालेखांतील शापवचने

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 23/09/2014 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः खालील शापवचने मराठीतील प्राचीन शिलालेखांतील आणि मुख्यतः शिलाहार यादव आणि विजयनगरच्या राजांच्या काळातील आहेत. जरी ती कुणाला असभ्य वाटली (तशी ती असभ्य आहेतच) तरी ती केवळ तत्कालीन प्रथेचा भाग होती असे समजून वाचावीत. सुरुवातीला हा प्रतिसाद शशिकांत ओकांच्या ह्या धाग्यावर देणार होतो पण लिहिता लिहिता प्रतिसाद बर्‍यापैकी मोठा झाल्याने स्वतंत्र धागा काढूनच आपणांसमोर आणत आहे. गधेगाळीसंबंधी माहिती आधीच वीरगळ आणि गधेगाळ ह्या धाग्यात लिहिलेली आहेच तेव्हा त्याची परत येथे पुनरुक्ती न करता केवळ काही शापवचने थोडक्यात देतो. सर्वसाधारणपणे दिलेल्या दानाला जो कोणी बाधा आणेल अथवा जो कोणी हे दान मोडीला अशा व्यक्तीस अनुलक्षून गधेगाळींतील शापवचने असतात. तेहाची माय गाढव ... हे तर बहुतेकांना माहित आहेच. इतर काही शापवचने पुढीलप्रमाणे १. स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरां | षष्टिं वर्षसहस्राणि विष्टायां जायते कृमि: || हे शापवचन बर्‍याच शिलालेखांत आढळते. जो स्वकीय अथवा परकीय या पृथ्वीचे (दानाचे) हरण करेल तो ६००० वर्षे विष्ठेमधला कृमी होऊन राहील. २. ससन करुनु ग्रामु दिधला हे सासन लोपि तेआसि गोहत्या ब्रम्ह- हत्या बाळहत्या पडे तेयाचीऐ माऐसि गाडौ घोडु | विजयनगरचा संगम हरिहर ह्याचा हा लेख गोव्यातील वेळूस गावातला. (इ.स. १४०२) हे शासन जो मोडील त्यास गोहत्या, ब्रह्महत्या व बालहत्या ही पातके लागून त्याच्या आईस गाढव व घोडा. ३. शिलाहार अपरादित्य (द्वितीय) याचा लोनाड शिलालेख (इ.स. ११८४) इये शासने लिखिता भाषा जो लोपि अथवा लोपावि यो गर्दभनाथु गर्दभु तेहाचिए मांए सूर्यपर्वे गर्दभु झवे इति विचार्य तथा यस्य यस्य यदा भूमिस्तस्य ह्या शासनाचा जो लोप करील तो गाढवांचा नाथ गाढव व त्याचे आईस सूर्यपर्वात गाढव लागेल याचा विचार करून त्याप्रमाणे करावे. ४. पंढरपूरचा विठ्ठलदेवाचा शिलालेख (शके ११११) कवणु अतिसो देई तेआ- सी वीठलाची आण ए काज जो फेडि तो धात्रुद्रोहि शके ११११ रोजी सौम्य संवत्सरी (भिल्लम यादवाच्या) काळात महाजन, देवभक्त परिवार, मुद्रहस्त विठ्ठलदेवनायक या सर्वांनी हे लहान असे देऊळ बांधले. (या देवळास) कोणी अतिसो (पीडा/ उपद्रव) करील त्यास विठ्ठलाची शपथ आहे. हे कार्य जो नष्ट करील तो धातृद्रोही होय. ५. .उदयादित्याचा आंबेजोगाई येथील शिलालेख. (शके १०६६) जो फेडी लोपी तेआ योगिनींचा वज्रदंडू पडे हे शासन जो कोणी नष्ट करेल अथवा लुप्त करेल त्यावर योगिनींचा वज्रदंड पडेल. ६. विजयनगरचा संगम देवराय याचा गोवे- वेळूस शिलालेख (शके १४०८) स्र्हीरवळनाथा श्रीमाहादेवासी १० नैवेद्या चंद्रूसूर्यू तपे सासन लोपी तेआअ गोहते ब्रम्हते बआळते पडे तेआची माए गर्धभे... श्रीरवळनाथ महादेवाच्या १० नैवेद्यांसाठी हे दान दिले आहे. हे शासन जो ल्पील त्यास गोहत्या, ब्रह्महत्या व बालह्त्या ही पातके लागतील व त्याच्या आईस... ७. जैत्र सामंत याचा जालगाव ताम्रपट (शके ११२४) हे ठाकली भाषा चंद्रार्कपर्यत जो मेली तो श्वान गधभ चांडालु ही भाषा (हे दानपत्र) चंद्र व सूर्य आहेत तो पर्यंत सिद्ध आहे. ती जो कोणी फेडील तो श्वान, गर्दभ व चांडाळ होय. ८. सिंघण यादवाचा फुलंब्री शिलालेख (शके ११६४) जो मढाचे अयगत स्वोधाराए घेयवे ए मढु फेडील यचा दोषु ब्रम्हणभोजना फेडील यचा दोषुकरि ह्या मठाचे (देवळाचे) उत्पन्न स्वतःकडे घेणे हे ब्राह्मणभोजनाच विरोध करण्यासारखे असून असे करणारा तसा दोषकरी होईल. ९. .विजयनगरचा संगम देवराय याच्या वेळचा बांदोडे शिलालेख (शके १३३५) पाळावा केला हा धर्मु जो मोडि तेणे वाराण सि श्री विस्वेस्वरा सनिधि सूर्यग्रहणिं आपुला मातापिता गाए वदिल्या पापासि जाए | हा धर्म जो मोडील त्याने काशी येथे श्री विश्वेश्वरासन्निध सूर्यग्रहणाच्या वेळेस आपले आईबाप व गाई वधिल्या असे समजावे. त्यास हे पाप लागेल. १०. यादव रामचंद्रदेवाचा वेळापूर शिलालेख (शके १२२२) पाली तो स्वर्गा जाए न पाली तो नरका जाए हे दान जो पालन करील तो स्वर्गात जाईल, न करील तो नरकात जाईल. ११. पंढरपूर येथील विठ्ठलदेवाचा शिलालेख ( शके १२३३) हा धर्मु जो नाणि लोपि तो मळकु पाली ते- आचा धर्मु | परिवंडे मराठे | सेवकु विठलदेवा खेत्रपति सदैवु धाधर्म जो नष्ट करील तो मळकु (पापी) व जो पाळील याचे मराठी सेवक विठ्ठलदेवाचे सदैव क्षेत्रपती होत. १२. शिलाहार अपरादित्य याचा परळ शिलालेख ( शके ११०८) अथ तु जो कोणु हुवि ए शासन लो- पि तेया श्री वैद्यनाथ देवाची भाल सकुटुंबिआ पडे|| तेहाचीए माय गाढवें.... परंतु हे शासन जो कोणी नष्ट करील त्याच्यावर वैद्यनाथाच्या त्रिशुळाचा फाळ त्याच्या सर्व कुटुंबियांसुद्धा पडेल व त्याच्या आईस गाढव... १३. दाभोळ येथील जामा मशिदीतला मराठी शिलालेख यासि कोणी हिंदु वा मुसलमान इरे वा इस्ति करिल त्यावरिश त्याचे मएअवरि गडदा असे जाणिजे जो हिंदु अथवा मुसलमान ह्या स्थानाचा अवमान करील त्याचे मायेस गाढव.. असे समजा. संदर्भः प्राचीन मराठी कोरीव लेख (शं. गो. तुळपुळे)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 35216
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

मी पयला!!!!!!!!!! वल्लीशेठच्या लेखाला न्याय मिळेलशी प्रतिक्रिया नंतर यथावकाश देईनच, तूर्त ही पोच फक्त.

एकविसाव्या शतकातही अशी अनेक शापवचने आढळली आहेत. विशेषकरून पुण्यग्रामाच्या आसपास. उदा - इये सोसायटीचिये फाटकासमोरु पार्किंग करी तो गाडौ जाणावा इये भिंतीवरू थुंकी तेहाची माय गर्दभे इ. इ.

गाढव घोड्याची परंपरा एवढी मागे जाते हे माहीतच नव्हतं. आता शिव्या देताना परंपरेचं पालन केल्याचासुद्धा आनंद मिळेल.

या पवित्र परंपरेचा पाईक रहाण्याची पात्रता अंगी टिकावी म्हणून सदैव प्रयत्न करीन!!!! :)

In reply to by कवितानागेश

त्यापाई मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा, आणि वडिलधार्‍या माणसांचा प्राण घेईन!! आणि सर्वांशी औधत्याने वागेन. माझं मिपा आणि इब्लिस मिपाकर यांच्याशी सदैव टवाळक्या करण्याची मी प्रतिज्ञा घेतो. त्यांचे कट्टे आणि त्यांची ऐशीतैशी यांतच माझे सौख्य सामावले आहे!!! :) (आमीबी चार धागे तोडल्यात म्हंटलं, तटातटा!!!!) :)

In reply to by विलासराव

:) वा विलासराव ! वर दिलेल्या १३ जुन्या रेफरंस नंतर २१ व्या शतकातला रेफरंस म्हणून तुमची ही प्रतिक्रिया दिली जाईल :)

बघा, बघा. इतकी बहरलेली प्राचीन परंपरा असलेल्या शिव्यांना शिव्या देणे शोभते काय? =)) वल्लीशेट, तुस्सी ग्रेट हो !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बघा, बघा. इतकी बहरलेली प्राचीन परंपरा असलेल्या शिव्यांना शिव्या देणे शोभते काय? अरेरे!!!!!! मी तर शाप देणार्यांना ऊ:शाप दिलाय असेच समजत होतो.

वल्लीबुवा यातील बहुतांश वचनांबाबत तो मूळचा आदेश/ नियम / कायदा इ इ काय होता की जो मोडल्यास त्या मोडणा-यांच्या मातु:श्रीना पशुप्रेमाची संधी दिली जात होती ते समजेल तर त्या कायद्यांचे कितपत महत्व होते तेही कळेल.

In reply to by गवि

बहुतेकदा देवळास दिलेले दान उदा. माळ्याने काही फुले, तेल्याने काही तेल, सुताराने डागडुजीचे काम, इ.इ. काँट्रि करणे, रोज अभिषेक करणे, इ. नियम. ते मोडणारास, किंवा काही जमीन ब्राह्मणांस दान म्हणून दिलेली असे ती व्यवस्था मोडणारास इ.इ.

In reply to by गवि

पण नियमाने हे अश्वमेध यज्ञातही यजमानाच्या घरच्यान्च्या वाट्याला येत असे ऐकिवात आहे. पण बहुदा तो गैरसमज असावा अथवा मला चुकीची माहिती मिळाली असावी.(संदर्भ अर्थातच चार्वाक : आह सालूंखे) असो.

म्हणजे शिव्यांना फार अतिप्राचीन परंपरा आहे तर!! :-) एकापेक्षा एक डेन्जर शिलालेख आहेत मायला. =))

In reply to by प्यारे१

वल्लीशेठ नेहमी प्रमाणेच लय भारी खोदकाम. झालं नुकतंच मि.पा वर असलेलं निराकार गाढवाची मान ताठ झाली असेल. आता ते उलटुन येतय बघा हा लेख वाचल्यावर. चला कांडी टाकली आता पळा!!!

In reply to by प्रमोद देर्देकर

झालं नुकतंच मि.पा वर असलेलं निराकार गाढवाची मान ताठ झाली असेल. आता ते उलटुन येतय बघा हा लेख वाचल्यावर.
अश्लील, अश्लील ;)

लै भारी. लोक उगाच नाव ठेवत्यात आताची पिढी बिघडली मनुनशान

बाकी, काही आदरार्थी संबोधने बापाला उद्देशूनही असतील. संशोधन करावे, ही इणंती इशेष !

In reply to by सस्नेह

बाकी, काही आदरार्थी संबोधने बापाला उद्देशूनही असतील. अर्थातच असतील. माझ्यामते आर्थीक/शारिरीक आनी मानसीक /भावनीक अशा शाखा ढोबळमानाने असाव्यात. जसे की तुझ्या बापाचं खातोय का? तुझ्या बापाची जागा आहे का? तुझ्या बापानी ठेव ठेवलीये का? तुझ्या बापाचा नोकर आहे का? ई. दुसर्या शाखेवर बरेचसे ज्ञानकण आधीच उधळले/सांडले गेलेले आहेतच. संशोधन करावे, ही इणंती इशेष ! वरील संशोधन केलेले लोक तितक्याच ईमानेईतबारे हे काम करु शकतील की नाही ही शंका आहे. मी करु शकलो असतो कदाचीत पण तेवढा अभ्यास नाहीये माझा. फारतर आम्ही मित्र आपापसात एकमेकांना प्रेमाने एकमेकांच्या बापांच्या नावाने हाक मारायचो बुवा कालेजात.

मस्त लेख.. आमच्या डोंबिवलीचा गधेगाळ आठवला..

व्वा...!! सालं त्या काळातला समाज सध्या समाजापेक्षा जास्त चावट होता असे म्हणावे वाटते. सालं सभ्यपणा नव्हताच. सध्याच्या पिढीने नवीन काहीच भर घातली नाही. ;) वल्लीशेठ, अजून येऊ द्या. शिलालेखाचे फोटोसहीत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इंग्रजांच्या अंमलाखाली महाराष्ट्र सोवळा अन दांभिक बनला असे आमचे स्पष्ट मत आहे. तो हँगओव्हर इतका गच्च बसलाय की अजूनही तीच डिफॉल्ट स्थिती असे म्हटल्या जाते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा घ्या रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिराच्या पुढ्यातील गधेगाळ. दुर्दैवाने ह्यावरचा शिलालेख पूर्ण झिजून गेला आहे. पण शिवपिंडीवरचा अभिषेक पाहून निश्चितपणे मंदिराच्या काहीतरी व्यवस्थेसंबंधी असावा. a

In reply to by प्रचेतस

ही गधेगाळ नसून हत्तीगाळ आहे असा आपल्याशी मध्ये झालेल्या चर्चेत निष्कर्ष काढल्या गेला होता.

मिपाशापवाणी !! ;) अथ तु जो कोणु हुवि ए लेखा नावे ठेवि तेहाचीए खरडवहे मोजींचा लेखु अष्टोत्तरशत दिवसु चोप्यपेस्तु...तदुपरिही नावे ठेवि तेहाचिए खरडवहे अआंचे काव्य

धन्यवाद. आपण ज्या संस्कृतीचं रक्षण करू पाहतोय, त्या संस्कृतीत 'अशाही' गोष्टी होत्या - आणि 'गावंढ्या' (!) लोकांनी नाही तर सुसंस्कृत लोकांनी असे शब्दप्रयोग वापरले होते; हे समजल्यावर संस्कृतीरक्षकांची प्रतिक्रिया 'पाहायला' मजा येते नेहमीच. काय योग्य आणि काय अयोग्य याचे सामाजिक संदर्भ वेळ, काळ, परिस्थिती, व्यक्ती... यांच्यानुसार बदलत असतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

In reply to by आतिवास

सहमत. अर्थात शापवचनांपेक्षा मांगल्यसूचक वचने बरीच जास्त आहेत पण लक्षात कोण घेतो. रा. चिं. ढेरे यांनी 'शिवी आणि समाजेतिहास' ह्या एका प्रकरणात शापवचनांचे विस्तृत विवेचन केले आहे.

सध्या काय रासभ नाम पक्ष वगैरे सुरू आहे की काय? ;)

"आपण लिहीलेल्या दगडावरची रेघ असलेल्या अमर साहित्याचे मिपावर असे मुल्यमापन होत आहे हे पाहून पितृपक्षात भेट देणार्‍या पूर्वजांना काय वाटत असेल बरे?" असा विचार मनात उगाचच डोकावला. (... आणि त्यांत कोणी एखादा गरम डोक्याचा खड्गधारी पूर्वज असल्यास वल्लींचे काय ? अशी काळजीही वाटून गेली ;) )

In reply to by प्रचेतस

त्यांचा एक प्रतिनिधी मिपावरच वल्लीवर शिव्या शाप, बंदुका, बॉम्ब आदिंचा वर्षाव करत असतो!

In reply to by पैसा

"प्रत्येक अत्रुप्त आत्म्यामागे एक पाशवी शक्ती असते" या विधानास सार्थ करणारे चित्र ;)

In reply to by यसवायजी

14०

In reply to by धन्या

+४२०

मस्त ही माझी नवीन स्वाक्षरी - स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत प्रतिसादः| षष्टिं वर्षसहस्राणि विष्टायां जायते कृमि: ||

आवडला... एकूण घोडा आणि गाढव, फार पुर्वीपासूनच "कामा"ला जुंपले जायचे.

शिव्या आणि शापां संबंधी अभ्यासु लेख वाचून संतोष जाहला . संत मंडळी देखिल यात मागे नव्हती हे वाचून त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. इतक्या उच्चं आणि थोर परंपरेला हीन का लेखत असावेत?

In reply to by मनीषा

>>इतक्या उच्चं आणि थोर परंपरेला हीन का लेखत असावेत? हीन नव्हतेच लेखत!! वशाडी येवो त्या ब्रिटिशांवर, त्यांनी सगळी सभ्यता का कायची लेबलं लावलंनीत!!