मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काय होतास तू !... काय झालास तू...!!.. सार्जंट तांदळे....!!!...

शशिकांत ओक · · जनातलं, मनातलं
pic (आठवणी हवाईदलातल्या मधून) सन १९९३. हवाईदलाच्या तांबरम पोस्टींगवर नुकताच पोहोचलो होतो. तेथील स्टेशनच्या गणेश चतुर्थीच्या आरतीला एयरमन लोकांनी एका हॉलमधे मला बोलावले होते. म्हणून मी कुटुंबासह तेथे पाचारण झालो होतो. मी आल्याचे पाहून तेथील एयरमन लोक उठून उभे राहिले. एक आसामी तरीही खुर्चीत बसून राहिलेले मी पाहिले. नंतर मला नेमकी त्याच्या शेजारची खुर्ची बसायला दिली गेली. आरतीची तयारी चालली होती. तोवरच्या वेळेत शेजारी बसलेल्या व्यक्तीने सुरवात केली, ‘माफ करा सर’ मी उठू शकत नाही. कष्ट पडतात उभे राहायला मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. नंतर परतायच्या आधी म्हणाला, ‘सर मला काही मदत करू शकाल का आपण?’ मी तोंड देखले, ‘पाहू काही करता आले तर’ म्हणून गेलो. काही दिवसांनी एक व्यक्ती हातात काठी टेकत टेकत आमच्या क्वार्टरचे फाटक उघडताना मुलीने पाहिले. कोणी चुकून आले की काय असे वाटून ती थबकली. ‘सर आहेत का?’ असे मराठीत विचारल्यावर, ‘हो आहेत’ म्हणून ती मला ‘डॅड कोणी भेटायला आलेत. “सव्वासहा” वाजलेत असे दिसतायत’ म्हणाली. एरव्ही सव्वा आणि पावणे या मराठी शब्दात अडखळणाऱ्या मुलीला तो सव्वासहा म्हणजे कसा? ते पहायला मी उत्सुक झालो. मी बाहेर येईपर्यंत ती व्यक्ती कोचाजवळील खुर्चीत कष्टपुर्वक बसायचा प्रयत्न करीत होती. हातात टेकायच्या काठीवर पुर्ण भाग टाकून टाकून कमरेच्या वरील भाग पुर्णपणे पुढे झुकलेला. जणु काही घड्याळातील काटे सहा वाजून १५ मिनिटांनी जसे दिसतात तसे त्याच्या शरीराचे अवघडलेपण होते... मुलीने केलेले वर्णन एकदम फिट्ट होते. मी सार्जंट तांदळे. आल्या आल्या त्याने आपली ओळख सांगून म्हटले, ‘आपण गणपतीच्या दिवसात मदत करतो म्हणाला होतात म्हणून फार आशेने आलोय.’ ‘सर, गेले अनेक महिने मी असा अपंगावस्थेत दिवस काढतोय. क्षुल्लक कारणावरून माझ्या पाठीत बाक येऊन अशी दीन अवस्था झाली आहे. सर्वांगाला ठणका आहे. नक्की निदान कोणाला होत नाही. जो कोणी काही सुचवतो त्याच्या मागे लागून जमेल ते सर्व उपाय करतोय. पण गुण येईल तर शपथ. रोज नाही नाही ते कडेलोटाचे विचार येतात. पण घरच्या निष्पाप बाळांकडे पाहून आणि पत्नीच्या धीर देण्याने मी सावरतो. ‘हेही दिवस जातील’ असा विचार करून हवाईदलातील दिवस ढकलतोय. दर मेडिकलबोर्डाच्या वेळी मला नोकरीतून काढून टाकायच्या भितीने मन सैरभैर होते. माझ्यासारख्या अधेडवयाच्या अपंग माणसाला बाहेरच्या जगात कोणी दरवाज्यात तरी उभे करील का? असे वाटून मी हवाईदलातील औषधपाण्याच्या खुराकावर दिवस कंठतोय. का कुणास ठाऊक तुम्ही काहीतरी मदत कराल असे वाटले म्हणून मी शारीरिक वेदना सहन करून आपल्या इथे चालत चालत कसाबसा पोहोचलो आहे.’ मला काय बोलावे सुचेना. सहज मदत करीन म्हटलेले तो इतके मनावर घेईल असे वाटले नव्हते. चहाचा कप येईपर्यंत मी इकडचे तिकडचे बोलून वेळ काढला. ‘मी म्हणालो खरा पण मला आपल्याला मदत करता येईल असे नाही वाटत’ असे म्हटल्यावर तरी तो जाईल असे वाटले. उठता उठता मला म्हणाला, ‘सर आपण मला फार निराश केलेत. मी फार आशेने आपल्याला भेटायला आलो होतो. जाऊ दे. इतक्यांनी थट्टा केली त्यात आपली भर पडली.’ मी तरी काय करणार होतो मदत? थोडे आठवले. पण त्याची याला काय मदत होणार असे वाटून मी मनांत विचार टाळला. एक मन म्हणाले, ‘आपण सांगून तर पाहू. निदान त्याला आपण विन्मुख पाठवले नाही असे आपल्याला नंतर वाटणार नाही.’ आपसुक बोललो, ‘इथे नुकताच आल्याने तांबरममधील काही माहिती नाही. पण पुर्वी एकदा माझ्या एका नातेवाईकाच्या मित्राबाबत एकांनी काही मदत केली होती. त्यांचा पत्ता मी तुम्हाला देतो. तेथे पहा काही काम होते का ते. पण त्यासाठी पुण्यात जावे लागेल.’ त्याने चेहरा आणखी टाकला. म्हणाला, ‘आत्ता तरी मला ते शक्य दिसत नाही. रेल्वेप्रवासाची दगदग, शिवाय तिथे नातलगांची मदत होणार नाही. बराय पहातो काही. आणखी शक्य ते करून.’ ... हळू हळू काठी टेकत टेकत ती व्यक्ती डोळ्याआड झाली. काही वर्षांपुर्वी मी पुण्याला पोस्टींगला असताना अविनाश - माझ्या मेव्हण्याने मला एकांकडे नेले होते. त्याला असे भेटायला जायला आवडे. तेंव्हा तो म्हणाला होता, ‘फार पॉवरफुल आहेत ते. मीपण भेटलेलो नाही त्यांना बऱ्याच काळात. फाटक गुरुजी म्हणतात त्यांना. चल तुला भेट घ़डवतो.’ आम्ही गेलो तोवर त्यांचे निधन झाले होते. असे त्यांच्या पत्नीकडून समजले. वाईट वाटले. मात्र त्यांची गादी आता त्यांची एक मुलगी चालवते. काही त्रास किंवा लागीर असेल तर लोक इथे येतात. आम्ही दिलेल्या मंत्राच्या अंगाऱ्याने उतारा पडतो. ती सर्व गुरूकृपा आहे. आम्ही त्यांच्यावरील दृढ श्रद्धेच्या बळावर मार्गदर्शन करतो. लोकांना गुण येतो.’ त्यांचे बोल मला अचानक सार्जंट तांदळेशी बोलताना आठवले. खरे तर तांदळेच्या शारीरिक व्याधीशी अंगाऱ्या-धुपाऱ्याचा संबंध नव्हता. मी आपला एक उपाय म्हणून सुचवले की एक फाटक गुरुजी म्हणून पुण्यात सहकारनगर भागातील स्टेट बँक कॉलनीत राहतात. त्यांच्याकडे अंगारा व मंत्रोच्चाराने लोकांना गुण येतो असे म्हणतात. पहा त्यांच्याकडून काही मदत होते का ते. असा माझा अनाहूत सल्ला त्याने ऐकलान खरा पण तो खरोखर जाईल याची मला शंका होती... या गोष्टीला बराच काळ लोटला... ... ‘हू इज देअर’ मी करड्या आवाजात कडाडलो. ऑफिसच्या धामधुमीच्या वेळात मी माझ्या प्रशस्त केबीनमधे सहकाऱ्यांशी कामाच्या निमित्ताने चर्चा करत होतो. मधेच माझी नजर दरवाज्याच्या पडद्याकडे गेली. तो कोणी तरी हालवून पहात होते असा भास होत होता... पडदा खरेच हालला. आणि ‘मे आय कम इन सर’ म्हणून माझ्या हो म्हणायची वाट न पहाता. युनिफॉर्ममधील सार्जंट तांदळे हातातली काठी लांब टाकत आत आला. ‘सर मला राहवत नाही हो ... डोळ्यावर विश्वास बसणे शक्य नव्हते. सार्जंट तांदळे काठीच्या शिवाय एक पाऊल न टाकता येणारा. ताठपाठीने मला हस्तांदोलन करायला सरसावत पुढे आला. ‘सर काय सांगू. अन् कसं सांगू असे झालयं. सुटीवरून परतलोय ते तुम्हाला केंव्हा भेटतोय असं झालय. सर, पहा काय चमत्कार झालाय. माझी काठी सुटली. पाठ सरळ झाली. माझा जणु काही पुनर्जन्म झालाय. काय झाले, कसे झाले, सांगताना त्याचे डोळे भरून आले. मला राहावले नाही. मी त्याला बसलेल्या लोकांचा पर्वा न करता छातीशी लावले. महौल काही वेगळा आहे याची जाण राखून लोक पांगले. ‘सर तुम्ही सांगितलेलेल्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी ताईंनी मला अंगारा दिला आणि मला काही मंत्रून दिलेले सोपस्कार करायला सांगितले व म्हणाल्या, ‘आपल्याला आत्तापासून बरे वाटायला लागेल.’ आणि खरच मला त्यांच्या जिन्याच्या पायऱ्या उतरत असताना जाणवले की माझ्या वेदना दर पायरीनिशी कमी कमी होतायत. खरोखरच त्या दैवी उपायांनी मला उतारा पडला. आणखीन काही दिवस त्यांच्या सानिध्यात घालवून मी आता खडखडीत बरा झालोय. एकदम सर्वांचा या घटनेवर, दैवी उपायांवर विश्वास बसायचा नाही. नस्ते झंझट उभे राहायचे नको म्हणून आणखी काही काळाने हवाईदलातील औषधाचा गुण येऊन मला पुर्णतः ठीक झाल्याचे मी इथे लोकांना सांगेन.... त्याच्या नव्या शारीरिक अवस्थेचा उन्मेश, नवा उत्साह, आजही माझ्या मनांत घर करून राहिला होता. ... ................................................................................. ... सर, नमस्कार. तांदळे बोलतो. आमचे कँपातील ईस्ट स्ट्रीटवरील ऑफिस पहायला जरूर या. मी आपली वाट पहातो. असा मोबाईलवरून प्रेमळ आग्रह झाला आणि मी आज दि १६ ऑक्टोबर २०११ला पोहोचलो. हातात पुष्परचना घेऊन. फुल शर्ट-पँट, शूज, टायमधले तांदळेसर आता एक्झिक्युटीव्हच्या थाटात माझे स्वागत करायला हजर होते. त्यांनी त्या नव्या व्यवसायाची सुरवात कशी केली आणि आता त्यांच्या मुलींनी तो व्यवसाय कसा आत्मसात केला आदि वर्णन करून ते म्हणाले, ‘सर आता आम्हाला मार्गदर्शन करावे.’ मी थोडा चक्रावून गेलो. आता मी काय सांगणार त्यांना त्यांच्या व्यवसायातील बारकावे. नवे आकृतीबंध, नवी आव्हाने. पण अशी एक उर्मी आली आणि मी सांगत गेलो...जणु हे आधीच माहित होते मला की गरजू लोकांना असे सांगायला यावे म्हणून काही काळापुर्वी मी केलेले एकेक व्यावसाय़िक प्रयोग. मला असे मदत करतील म्हणून.... 3 एके काळचा निराश अपंग सार्जंट.... आजचा यशस्वी उद्योजक तांदळे सर... 21 ओठी ओळी येतात ...काय होतास तू.... काय झालास तू...’ ... आताचे ताठमानेचे आणि ताठ कण्याचे तांदळेसर कसे दिसतात ते कायम लक्षात राहावे म्हणून... त्यांच्या ऑफिसमधे मी त्यांच्या सोबत एक फोटो काढवला...

वाचने 14760 वाचनखूण प्रतिक्रिया 34

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 16/06/2014 - 01:40
तादळे सरांशी संपर्क केला. मिपावर अनेकांना त्यांच्या बद्ल माहिती कळल्याचे समजल्यावर थोडे आश्चर्य वाटले. फाटक ताईंचा संपर्क पत्ता फोन कळवतो म्हणाले.

In reply to by शशिकांत ओक

मृगनयनी 14/06/2014 - 18:38
द ग्रेट्ट ..... एक्सपिरिअन्स... !!!! द अनबिलिव्हेबल मिरॅकल.......!!!!!!! :) .. :) शशिकान्त'जी....मन्त्रोपचारांनी आणि दैवी अंगार्‍यामुळे बरे झालेले 'तांदळे सर', त्यांच्याबद्दलचा हा चमत्कार (अतिशहाण्या) 'अंनिस' वाल्यांसमोर सांगू शकतील का? :) हा चमत्कार पाहायला आज "दाभोळकर" हवे होते!!!!!

In reply to by मृगनयनी

शशिकांत ओक 14/06/2014 - 22:20
मृगनयनी व अन्य मित्रांनो, आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद. आपल्या माहितीसाठी... अंधारछाया - सत्यघटनेवर आधारित कादंबरी नुकतीच ईबुक रुपात प्रकाशित झाली आहे. तिचा विषय ही अशाच धरतीवर आहे. ज्यांना दैवी उपचारांबद्दल आस्था आहे त्यांनी जरूर वाचावी. ज्यांना नाही त्यांनी ही आवर्जून विरंगुळा म्हणून वाचावी... मृगनयनी यांना विनंती की या कादंबरीचे परिचय मिपाकरांना करून दिलात तर आवडेल.पुस्तकाच्या लिंकसाठी व्यनि करावा.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 18/06/2014 - 00:02
अंधार छाया अपछायिताचे सुधारित रूप आहे. त्यातील व्यक्तींचे फोटो, कादंबरीच्र्या निर्मितीचे कारण वगैरे घालून मुखपृष्ठ नव्याने बनवले आहे. ई बुकवर वाचावे.

धन्या 13/06/2014 - 19:32
शीर्षक फोटो लेखन कक्षेबाहेर सरकला आहे तो दुरूस्त करायला विनंती करत आहे... धन्यवाद.
ते शीर्षक थोडंच आहे; ती तुमची एम एस वर्ड मधली कलाकारी आहे. नव्याने एम एस वर्ड शिकलेला माणूस असंच रंगीत फाँट वापरुन काहीबाही करत असतो. ;)

भृशुंडी 14/06/2014 - 02:50
शीर्षकातील उद्गारवाचक चिन्हांची आणि टिंबांची .. वाढती संख्या आवडली !! पुढचा. लेख वाचायची उत्सुकता आहे!!!!

शशिकांत ओक 14/06/2014 - 10:13
काक नजरेने काढलेले भृषु़ंडींचे अनुमान यथायोग्य आहे. व्यक्तिमत्वातील बदल सूचित करायला तो वापरलेला संकेत आहे.

आयुर्हित 14/06/2014 - 23:01
सत्यकथा आवडली व भावली देखिल. सार्जंट तांदळे नशिबवान आहेत. इतकी वर्षे त्रास सहन केल्यानंतर का होइना, त्यांना योग्य तो उपचार मिळाला. अर्थात नशिब घडायला त्यांनी केलेले पुण्यकर्म हेच त्यांच्या मदतीला धावुन आले आणि आपल्या मार्फत योग्य तो निरोप त्यांच्यापर्यंत पोचवला गेला, त्याबद्दल आपलेहि आभार.

गवि 16/06/2014 - 13:26
मी पूर्वीही नाडीविषयक धागे वाचले आहेत. त्यात भविष्य जाणण्याच्या इच्छेचा विषय होता. तिथे मुळात सुरुवातच सध्याच्या माहीत असलेल्या मानवी कक्षेपलीकडली होती. तेव्हा त्याविषयीचा वाद वेगळा. पण इथे किंवा यासम इतर केसेस वाचून असा प्रश्न पडतो की कंबरेच्या दुखण्याने काटकोन झालेली व्यक्ती मदतीसाठी समोर आली असता आणि यापूर्वी बरेच /सर्व उपाय करुन झाले असे रुग्ण म्हणत असला तरी (कारण जुनाट रोगाचे रुग्ण सगळे उपाय केले असं नेहमीच म्हणतात) आपण खालील उपाय सुचवणे समजू शकतो: -त्याला आपल्या माहितीतला अनुभवी ऑर्थोपेडिक डॉक्टर आणि त्यानंतर ऑर्थोपेडिकच्या मतानुसार न्यूरॉलॉजिस्ट अशी रेफरल्स सुचवणे. - इतर वैद्यकीय उपाय झालेत असं वाटलं असलं तरी नव्या मेडिकल ओपिनियनने वेगळ्या टेस्ट्स करुन / औषधे बदलून आल्टर्नेट डायग्नोसिसच्या दिशेने पाहण्याची शक्यता खुली करणे. शारिरीक दुखण्याचा मंत्रतंत्राशी संबंध नव्हता असं तुम्हीही खुद्द लिहीता. मग कंबरदुखीचा मनुष्य दिसताच डायरेक्ट लागीर, मंत्रतंत्र, बाधा या दिशेच्या शक्यताच तुम्हाला का दिसल्या असाव्यात? सल्ला बाबा , बुवा, माताजी यांच्याकडे जाण्याचाच का दिला जावा? कार्यकारणभाव, रोगचिकित्सा, मीमांसा हे काहीही न करणे म्हणजे वेगळा किंवा नवा किंवा मोकळा दृष्टिकोन असं समजायचं का? बाकी लेख रंजक असला तरी त्यामुळे कोणी आपली व्याधी घेऊन अंगारेधुपारेवाल्यांकडे जाऊ नये अशी सदिच्छा..

In reply to by गवि

श्रद्धा - अंधश्रद्धा ह्या बद्दल माझीही कांही टोकाची मते आहेत. पण कधी कधी मती गुंग करणार्‍या घटना घडतातच. ह्या घटना ऐकीव नसल्याने, आपल्या जवळच्या ओळखीतल्या माणसाच्या आयुष्यातल्याच असल्याने, विश्वास तर ठेवावा लागतो. तांदळे साहेब इतर अनेक उपचार करुन थकले होते, मनाने कोलमडले होते अशा वेळी अत्यंत आशेने आलेल्या माणसाला विन्मुख कसे पाठवायचे म्हणून शशिकांत ओक ह्यांनी त्यांना त्यावेळी सुचलेला उपाय सांगितला. असो. माझ्या माहितीत एक भारतिय न्यूरो सर्जन आहेत जे इंग्लंड मध्ये एक यशस्वी सर्जन आहेत. ते भारतात आले असता त्यांच्या १२ वर्षाच्या मुलीला डेंग्यू झाला. भारतात काहीकाळ वैद्यकिय उपाय करून थकल्यावर त्यांनी मुलीला इंग्लंडला नेले आणि तेथिल इस्पितळात भरती केले. आयसीयूत असलेल्या मुलीला २० दिवस उलटून गेले तरी आराम पडेना तसतसे डॉक्टर साहेब मनाने खचत गेले. कोणीतरी 'मंतरलेली' उदी त्यांना दिली आणि ही घेऊन मुलीच्या शय्येभोवती फेर्‍यामारा असे सांगितले. मेंदूला अजिबात पटत नव्हते पण कणाकाणाने मृत्यूच्या जवळ जाणार्‍या आपल्या मुलीकडे पाहणारा बाप हाही उपाय करून पाहू म्हणून ती उदी हातात घेऊन त्याने त्या मुलीच्या शय्ये भोवती ३ चकरा मारल्या. पुढे त्या मंतरलेल्या उदीमुळे की इस्पितळाच्या वैद्यकिय उपचारांमुळे पण मुलीला बरे वाटले. मी ह्या घटनेला योगायोगच मानतो. पण माझ्या डोळ्यासमोरून त्या हुशार आणि यशस्वी डॉक्टरची मुर्ती हलत नाही. त्या मुर्ती आड लपलेली हतबल बापाची करूण मूर्ती स्पष्ट दिसते आणि आजही त्या आठवणीने मन हेलावते. माझे वडील KEM मध्ये आयसीयूत असताना त्यांच्या शेजारच्या खाटेवर एक सिंधी रुग्ण होता. त्याची बायको बरीच देवभोळी होती. डॉक्टर वैद्यकिय उपचार करतीलच पण आपण नुसतं बसून काय करायचं. म्हणून तिला कोणीतरी सांगिलेला उपाय ती करत असायची. एका वहीत देवाचं नांव सहस्त्र वेळा लिहायचं काम चाललं होतं. मला ते पाहून हसू यायचं. तिला हे तुझे चुकते आहे असे सांगावेसे अनेकदा वाटले पण तिच्या चेहर्‍यावरील आत्मविश्वास, तल्लीनता पाहून धाडस झालं नाही. तिचे देवाचे नामस्मरण संपून तिने ती वही स्वतःच्या आणि नवर्‍याच्या कपाळाला लावली. त्याच रात्री तो निधन पावला. तिचं म्हणणं 'माझ्या हातून सहस्त्रनाम वहित लिहीण्याचे पुण्य घडावे आणि त्यालाही त्या वहीला कपाळस्पर्श करण्याचे पुण्य लाभावे म्हणूनच तो इतकेदिवस जिवंत होता.' असो. हतबल अवस्थेत हे समजू शकतं. पण सुरुवातीपासूनच वैद्यकिय उपचार टाळून अंगारे, धुपारे आणि बुवाकडे जाणारे पाहिले की त्यांची किव करावीशी वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

चैदजा 22/06/2014 - 21:20
+ १ काही वेळा काही घटनांमागचे कार्यकारण भाव आपल्याला समजत नाही. मिपावर बरेच वेळा चर्चा झालेले श्री. गोएंकाजी देखील विपश्यनेमुळे जन्मभरचय आजरातुन बरे झाले आहेत.

शशिकांत ओक 16/06/2014 - 14:28
जेव्हा तांदळे मला भेटले तेंव्हा त्यांच्यावर अनेकदा शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्या व अन्य शारीरिक त्रासांनी वैतागून जीवन संपवायच्या मनःस्थिति ते माझ्याकडून मदतीची हाक मारत घरी भेटायला आले. त्यावेळी मी फाटक गुरूजींकडे जा म्हणताना मला फक्त त्यांना विन्मुख पाठवले नाही इतकेच समाधान झाले होते. आता दैवी उपाय करू नयेत असा सल्ला न देता बरे व्हायच्या अन्य प्रकारांना सुचवण्यात गैर नाही. काही लोक होमियोपैथी औषधांवर विश्वास नसल्याने ते हट्टाने उपचार घ्यायला टाळतात. उद्देश्य बरे होणे हा असावा. म्हणजे झाले. दैवी उपाय जर अघोरी नसतील तर करायला काय हरकत आहे अशी त्रस्तांची मनोधारणा होते असावी.

पैसा 17/06/2014 - 15:02
हवाईदलाच्या डॉक्टराम्च्या उपायांनीच तांदळेंना बरे वाटले असेल! निमित्त झाले त्या अंगार्‍याचे. तांदळेंना बरे वाटले हे महत्त्वाचे.

In reply to by पैसा

गवि 17/06/2014 - 16:07
तांदळेंना बरे वाटले हे महत्त्वाचे.
हो, त्यांचा त्रास संपला हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उत्तम झाले. पण बरे वाटले हे महत्वाचे, यामधे "कशाने का असेना" असा एक अध्याहृत भाग ऐकू येतो. तसा नसेल तर उत्तमच पण बहुधा तसा तो असतो. डॉ. खरेसाहेबदेखील म्हणतात की कोणाच्याही कोंबड्याने उगवले की झाले. हे एकूण माणूसप्राण्याच्या आरोग्यविषयक बाबतीत दूरगामी अर्थाने अजिबात चांगले किंवा पटण्यासारखे वाटत नाही. बरे झाले की मग श्रेय कशालाही द्यावे अशी एक मानसिकता सर्वांच्यात मूळ धरते. मग त्यातल्यात्यात अतर्क्य गोष्टीला श्रेय देण्याची टेन्डन्सी दिसते. त्यातून अनेक केसेसमधे मूळ उपायच अतर्क्य करण्याकडे कल वाढतो. अगदी १ टक्का केसेस जरी अशा विचारांनी अमानवी कक्षेतल्या उपचाराकडे वळल्या तरी त्यात नुकसान बरेच आहे. समजा सर्पदंशाच्या अंदाजे ९० केसेसमधे बिनविषारी साप चावत असतील आणि १० केसेसमधे विषारी साप चावत असतील. तर सर्व ९० लोक उतारा,अंगारा, झाडपाला काय वाट्टेल ते उपचार करुनही साप बिनविषारी असल्याने जिवंत राहतील. श्रेय जाईल त्या अंगार्‍याला. पण ही पद्धत रुढ झाली की कोणता साप चावलाय याचे ज्ञान नसलेले लोकही प्रतिविषाचे इंजेक्शन न घेता अंगारा घ्यायला जातात. कारण डॉक्टरकडे जाणे दूर किंवा खर्चिक असते किंवा इंजेक्शन भयप्रद असते किंवा अन्य काही.. या प्रकारात अंगारा काय किंवा अँटि स्नेक व्हेनम काय.. कशानेही मनुष्य जगला हे महत्वाचे असं म्हणता येईल का? अगदी शंभरातले नव्वद लोक अंगार्‍याने बरे होत असले तरी? हे विश्व अगदी अतार्किक असेल. पण रोजच्या जगण्यात आणि आरोग्यशास्त्रात निखळ तार्किक नियम जिथे दिसतात तिथे तरी ते पाळावेत. इतरांनाही तसेच करण्यास प्रोत्साहित करावे.

In reply to by गवि

आमच्या शेजार्‍यांच्या मोठ्या मुलाला 'मण्यार' चावला. ही घटना रात्रीची. मण्यार घरात घुसला होता. तो मारला गेला. आणि मुलाला हाफकिनला नेण्याऐवजी (त्याकाळी हाफकिनलाच न्यावे लागे) घरच्यांनी घरापासून ५-७ कि.मी. दूर एका कुठल्याशा पाड्यावर मांत्रिकाकडे नेला. तो पर्यंत त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला होता. मात्रिकाने हात वर केल्यावर त्याला हाफकीनला नेण्यात आले ह्या मध्ये रात्री ९.३० ते पहाटे ४ पर्यंतचा अत्यंत मौल्यवान वेळ वाया जाऊन हाफकीनला कांही होऊ शकले नाही. मुलगा गेला. ही मुंबईतील घटना आहे. हल्ली निदान शहरात तरी असल्या अंधश्रद्धेचे प्रमाण कमी झालेले दिसून येते. पण त्याकाळी (६०च्या दशकात) ते फार होते. कदचित खेडोपाडी अजूनही लोकं अशा भ्रमात जगत असतील, सांगता येत नाही.

In reply to by गवि

पैसा 17/06/2014 - 17:10
मी हेच म्हटले आहे की डॉक्टरांच्या उपायांनी बरे वाटले असेल, पण निमित्त झाले अंगार्‍याचे. बरे वाटणे महत्त्वाचे. हे १००% वेळा सत्य आहे. अन्यथा तो माणूस आत्महत्या करण्यापर्यंत पोचला होता आणि एका कुटुंबाची वाताहत झाली असती. माणसाचा जीव ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. खेड्यांतून अजूनही डॉक्टर्स नसल्याने लोक वैदूंकडे जातात. मानसिक आजाराचे रोगी "झपाटलेले" समजून अघोरी उपायांना बळी पडतात. हे थांबवणे एकट्या दुकट्याचे काम नाही. अगदी तुकोबा "नवसे कन्यापुत्र होती | तरी का करणे लागे पती" असे म्हणून गेले तरी मुले होण्यासाठी बुवा लोकांच्या मागे धावणारे कमी नाहीत. शिक्षणामुळे असले प्रकार कमी होऊ लागतील असे समजायला हरकत नाही. मात्र डॉक्टर्सची अनुपलब्धता हा गंभीर प्रश्न आहे. आताच पाहिलेल्या आकडेवारीनुसार भारतात दर १७०० लोकांमागे १ डॉक्टर असतो. आणि दर वर्षी पास होणार्‍या सुमारे ७ लाख डॉक्टर्सपैकी फक्त ३-४% अ‍ॅलोपाथ असतात. यातलेही अनेकजण परदेशी जातात. आणि बहुसंख्य जनतेला इतर डोक्टर्सवर अवलंबून रहायची वेळ येते. यावर सरकार कोणते उपाय करत आहे? आयुर्वेदिक आणि होमिओपाथ डॉक्टर्सना एक वर्षाचा Certificate Course in Modern Pharmacology केला की अ‍ॅलोपाथीची प्रॅक्टिस करायची परवानगी मिळते. ही गोष्ट विचित्र वाटते. तसेच अ‍ॅलोपथीचे अनेक डॉक्टर्स आयुर्वेदिक पेटंटेड औषधे देतात तेही बरोबर वाटत नाही. प्रत्येकाने जे शिकले आहे त्याचीच निखळ प्रॅक्टिस करावी. आयुर्वेद आणि अ‍ॅलोपथी यांची बेसिक तत्त्वे निदान सारखी असावीत असे समजायला वाव आहे पण होमिओपाथी हा पूर्ण वेगळा विषय आहे. याबद्दल जास्त माहिती डॉक्टर लोक देऊ शकतील. मात्र डॉक्टर हाही शेवट माणूसच असतो. त्यालाही आपल्यासारख्याच भीती ताण इ. भावना असतात. त्यातून सुटण्यासाठी तोही जमेल तसे उपाय करत असतो. त्यामुळेच माझ्या आईचे ऑपरेशन करणार्‍या डॉक्टरांच्या टेबलावर साईबाबा आणि गणपतीची चित्रे पाहून मला धक्का बसला नाही. आईचे ऑपरेशन व्यवस्थित होऊन ती बरी होणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. आणि त्यासाठी त्या सर्जनच्या अनुभव आणि कौशल्यावर विश्वास होता. माणसाचे शरीर अनेक आजार स्वतःचे स्वतः बरे करते. त्याला काही काळ लागतो. सर्दी बरी व्हायला ८ दिवस लागतात मग तुम्ही औषध घ्या किंवा घेऊ नका. शिवाय माणसाची इच्छाशक्ती हीसुद्धा काही प्रमाणात परिणाम घडवून आणते. ज्या गोष्टीचा कार्यकारणभाव माणूस सांगू शकत नाही त्या कोणत्या तरी दैवी शक्तीमुळे झाल्या असा समज जास्त विचार न करणार्‍यांचा होऊ शकतो.

In reply to by पैसा

>>>>डॉक्टरांच्या टेबलावर साईबाबा आणि गणपतीची चित्रे पाहून मला ह्यात असाही एक विचार असू शकतो की येणार्‍या रुग्णांमध्ये साईभक्त आणि गणेश भक्तांची संख्या सर्वाधिक असते. डॉक्टरांच्या टेबलावर आपल्या दैवतांच्या तसबिरी पाहून रूग्णाचा डॉक्टरवरील विश्वास वाढतो आणि ह्याचा उपयोग रुग्णावर केलेल्या उपचारांना रुग्ण सकारात्मक प्रतिसाद देताना दिसून येतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

शशिकांत ओक 18/06/2014 - 00:19
मी हेच म्हटले आहे की डॉक्टरांच्या उपायांनी बरे वाटले असेल, पण निमित्त झाले अंगार्‍याचे.
जर या केसमधे स्वतः व्यक्ती म्हणतोय की मला त्या दैवी उपचारानी चमत्कारपुर्ण रितीने इतके बरे वाटले. आणि माझ्या सारखा प्रत्यक्ष दोन्ही अवस्थांचा प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार असताना व इतरांना काहीही माहित नसताना काही जण वरील लिहून मताची खोट का काढतात.... काहीं ना ते श्रेय अशा घटनांना न देण्यासाठी अशी विधाने करताना दिसतात.

In reply to by गवि

सुबोध खरे 20/06/2014 - 18:37
ग वि साहेब वरचे वाक्य म्हणण्याचे फार महत्त्वाचे कारण असे कि कित्येक लोकांना घसा फोडून सांगितले कि अशास्त्रीय उपाय करू नका तरीही ते तुमचे ऐकत नाहीत. बर्याच वेळेला प्लासिबो इफेक्ट मुळे रुग्ण बरा होणारच असतो. मग आपण वाईट बोलून आपले तोंड का घाण करा. ओव्हरीतील ८० टक्के सिस्ट ३-४ महिन्यात स्वतःहून बर्या होत असतात. पण काही लोभी डॉक्टर रुग्णाला ताबडतोब शल्यक्रिया करायला सांगतात. आता अशा रुग्णाने विचारले कि आम्ही होमियोपथी/ आयुर्वेदिक उपचार घेऊन बघू का? मी कशाला नको म्हणू. चार महिन्यांनी परत आल्यावर ती सिस्ट बरी झालेली असते पण रुग्णाची शल्यक्रिया वाचलेली असते.मग तुम्ही नर्रेंद्र महाराजांचा जप करा कि फेरम फोस घ्या. काही डांबरट होमियोपाथ त्याना तुम्हाला ओव्हरीचा कर्करोग आहे आणि तो मी ठीक करून दाखवतो असे सांगून थुका लावतात.वर अमुक तमुकचा बीजांड कोशाचा कर्करोग "मी" बरा केला अशी दर्पोक्ती सांगतात. सगळ्या पथी मध्ये गैर प्रकार करणारे लोक आहेत. म्हणुन कुणाच्याहि कोम्बड्याने का होईना पण उजाडल्याशी कारण. किमान शंभर तरी मुतखड्याचे चे रुग्ण मी ३ वर्षे पर्यंत पाहत आलो आहे. होमियोपथीने एकाही रुग्णाचा एकही खडा पडला नाही.पण रुग्ण विचारतात आम्हाला शल्यक्रिया करायची नाही. होमियोपथीचे औषध घेऊ का? मी त्यांना स्वच्छपणे सांगतो माझा त्याच्या वर विश्वास नाही. तुमचा असेल तर घेऊन पहा.पण मी सर्वाना आवर्जून एक सांगतो कि तुमची लघवी दाट होत असल्याने त्यात खडे तयार होतात तेंव्हा तुम्हाला २. ५ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. हा बिनखर्चाचा उपाय सुद्धा बरेच लोक करत नाहीत( नुसते एवढे केले तरी मुतखडा होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी होते. चार सहा महिन्यांनी परत आल्यावर त्यांचे खडे आहेत तसेच असतात. आधी जाते भांडवल मग येते अक्कल या न्यायाने ते आता पाणी पिण्यास तयार होतात यात गम्मत म्हणजे तीन होमियोपथीचे डॉक्टर सुद्धा आहेत. पहिल्या भेटीत ते मोठ्या जोरात सांगत होते कि होमियोपथीमध्ये इतकी परिणामकारक औषधे आहेत कि दोन महिन्यात खडे नाहीसे होतात. पण दोन तीन वर्षे स्वतः उपचार केल्यावर आता तसे बोलत नाहीत.पण आपल्या रुग्णांना मात्र आत्मविश्वासाने औषध देत असतात. तसेच दोन आयुर्वेदाचार्य "स्वतःच्या" क्षयरोगासाठी आधुनिक औषधेच घेताना पाहिले आहे. माझ्या माहितीतील सर्व डॉक्टर स्वतःच्या मुलांना बालरोगतज्ञाकडेच नेतात. एक दोघांना विचारले कि तुम्ही स्वतःची औषधे का देत नाही. तर हे हे हे करीत मुलाच्या बाबतीत कोण धोका पत्करणार/ किंवा बायको ऐकत नाही अशी कारणे देत असत. जसे वय वाढले तसे लोकांना असे अवघड प्रश्न विचारून पेचात पकडण्यात काही हशील नाही हे समजून आले. (माझ्याकडे येण्यचे कारण मी कोणत्याच डॉक्टर कडून पैसे घेत नाही) आणि मी व्यवसाय सुरु केल्यापासून गेल्या साडेचार वर्षातील(२३ नोव्हेंबर २००९पासून ) प्रत्येक रुग्णाचे प्रत्येक प्रकाशचित्र आणि रिपोर्ट माझ्या संगणकात साठवलेला आहे. त्यामुळे त्यांना तुलना करणे सोपे जाते. असो हे विश्व अगदी अतार्किक असेल. पण रोजच्या जगण्यात आणि आरोग्यशास्त्रात निखळ तार्किक नियम जिथे दिसतात तिथे तरी ते पाळावेत. इतरांनाही तसेच करण्यास प्रोत्साहित करावे. हे मात्र १,०००% टक्के सत्य आहे.

प्रसाद१९७१ 17/06/2014 - 17:22
प्रत्येकाने जे शिकले आहे त्याचीच निखळ प्रॅक्टिस करावी. >>>>>>> नुस्ते शिकले ते पुरेसे नाही. बेसिक मधेच टोकाचा फरक आहे. हे म्हणजे एखाद्या नास्तिका ला मंदिराचा पुजारी करण्या सारखे आहे.

शशिकांत ओक 20/06/2014 - 17:53
काहींनी फाटक बाईंकडे जायसाठी चौकशी केली होती. त्यांचा पत्ता मिळाला आहे. गरजूंनी रात्री ९ नंतर संपर्क करावा.. ०९८८१९०१०४९.