मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेडीओ

मालविका · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
रेडीओशी माझ नात तस म्हटल तर लहानपणापासून.अगदी लहान असताना मी जेव्हा आजोळी सुट्टीत रहायला जायचे तेव्हा सकाळी आजीचा रेडीओ चालू असायचा.आमच्याकडे का कोण जाणे पण जवळच रत्नागिरी स्टेशन कधी लागल नाही.नेहमी मुंबईच लागायच.आजीची सकाळी काम चालू असताना बरोबरीने रेडीओ चालू असायचा.मी कधी त्याच्याकडे लक्ष नाही दिल तेव्हा.पण तेव्हा रेडीओ कानावर पडलेला आठवतोय.शिवाय आमच्या घरी तर मोठे काका सकाळी उठत तेव्हापासूनच ते रेडीओ चालू करत.थोड्या वेळाने रेडीओ चा आवाज सहन न होऊन आम्ही पण उठायचो.आम्ही किती तरी वेळा काकाना संगयाचो की निदान सुट्टीच्या दिवसात तरी आम्हाला झोपू दे.पण त्यानी ते कधीच ऐकल नाही.बर तेव्हाच्या घराला आता सारख्या वेगळवेगळ्या स्वतःच्या अशा खोल्या नव्हत्या .घर जरी १२/१४ खोल्यांच असल तरी बेडरूम म्हणावी अशा २ ते ३ च.पण एकदा उठल्यानंतर परत बेडरूम मधे जाउन झोपन काकांच्या आणि एकूणच घरच्या शिस्तीत बसत नसे.त्यामुळे जबरदस्तीने उठावाच लागे.लहानपणी रेडीओशी संबंध आला तो एवढाच. नंतर शाळेच्या वयात देखील वर्गातील एखाद्या मैत्रिणीच गाण रेकॉर्ड झालाय किंवा सराच भाषण झालाय एवढाच . तसा आमच्याकडे टी वी लवकर आला त्यामुळे तेव्हा कधी रेडीओ ची गरजच नाही वाटली. मी जेव्हा मुंबई ला पेयिंग गेस्ट म्हणून रहायला आले,तेव्हा रेडीओशी माझा अगदी जवळचा संबंध आला.मी मुंबईत दाखल झाले तेव्हा एफ एम च प्रस्थ फार वाढल होत.मी आले तेव्हाच ४/५ हिंदी गाण्याचे चॅनेल्स सुरु होते.मी तेव्हा एका बीपीओ मधे कमाला लागले होते .त्यामुळे तिथे शिफ्ट ड्यूटीज होत्या.मी जेव्हा सकाळच्या शिफ्ट ला जायचे तेव्हा ६.१५ ची ठाण्याहून बस असायची.मी ६लाच घर सोडायचे.तेव्हा (आता नाव लक्षात नाही)पण कुठल्यातरी मराठी चॅनेल वर सुंदर मराठी गाणी लागायची. बस ६.५० ला कंपनी च्या दारात उभी रहायची तोपर्यंत मी पुर्ण वेळ ती सगळी मराठी गाणी ऐकायचे.एरवी दिवसभर जाता येता एफ एम वर हिंदी गाण्यांचा रतीब चालूच असायचा.या सकाळच्या गाण्यांप्रमाणे माझा आणखी अगदी आवडता कार्यक्रम म्हणजे रात्री ९ वाजता लागणारा "पुरानी जिन्स ".रेडीओ मिर्ची किंवा रेडीओ सिटी किंवा अशाच कुठेतरी तो कार्यक्रम लागायचा.तो मात्र मला खूप आवडायचा.दुपारची शिफ्ट रात्री १० ला संपायची .तेव्हा परत येताना जो एफ एम चालू व्ह्यायचा तो अगदी घरी येऊन झोपेपर्यंत.मला मनापासून जुनी गाणी खूप आवडतात.त्यात किशोर कुमार माझा जास्त आवडीचा.त्यामुळे हा पुरानी जिन्स कार्यक्रम मला विशेष आवडे.कितीतरी जुनी पण खूप सुंदर गाणी त्यात लागत.अगदी उशिरा बरेच रेडीओ चॅनेल मग अशीच जुनी गाणी लावत.आणि मुख्य म्हणजे यात त्या आर जे ची बडबड नसे.बर्याच वेळा अस व्ह्यायच की तो आर जे बडबड करायला लागला की लगेच दुसरीकडे नवीन गाण सुरु करायच.त्यामुळे दर थोड्या वेळाने मोबाइल वरून बोट चॅनेल बदलत असायची. बर्याच वेळा रात्री फोन चार्जिंग ला लावायचा आणि हेडफोन्स कानात घालून गाणी ऐकत झोपायच हा माझा आवडता प्रकार होता. २वर्ष मुंबईत घालवल्यावर मी पुण्याला शिफ्ट झाले.इथेही तोच प्रकार.पण इथले एफ एम चॅनेल्स हिंदी मिश्रित मराठी बोलायचे.गाणी सगळी हिंदीच.पण सोबत लागणारी बडबड मात्र हिंदी इंग्रजी आणि मराठी अशी एकत्र.पुण्यात आल्यावर हातात गाडी आली आणि मग टिपिकल पुणेकर मुलामुलींप्रमाणे मी कानाला हेडफोन्स लावून गाडी चालवायची सवय लवकरच करून घेतली.इथे सुध्हा मी पीजी म्हणूनच रहात होते.पण मुंबईत अनोळखी मुली सोबत राहून अगदी मस्त मैत्री जमली तर पुण्यात माझ्या चिपळूणकर मैत्रिणीच साथीला मग काय मजाच.इथे आम्ही मोठ्याने एफ एम वर गाणी लावून ठेवायचो.कोणताही काम करताना बरोबर गाणी हवीच.मग बाहेर जायच तर तयारी करताना गाणी.अगदी घराबाहेर पाउल टाकेपर्यंत मोबाइल मोठ्याने वाजत असायचा.आणि दराबाहेर पडल की लगेच हेडफोन कानाला चिकतायचे.पुण्याचा ऑफीस मधे फोन डेस्क वर न्यायला परवानगी होती . त्यामुळे इथे सकाळची शिफ्ट असेल तर सकाळी ७ वाजता शिफ्ट सुरु होई तेव्हापासून ९ वाजता मॅनेजर येईपर्यंत फोन वर गाणी चालू असत.आणि जर दुपारची शिफ्ट असेल तर ६ वाजता मॅनेजर घरी गेला की मग रात्री १०ला शिफ्ट संपेपर्यंत एफ एम वर गाणी चालू असायची .शिवाय मी पुण्याहून चिपळूणला रात्रीच्या एस टी ने जायचे.तेव्हा अगदी सातार्यपर्यंत एफ एम चालायचा.त्यामुळे मला रेडीओ त्या प्रवासात सोबती वाटायचा. आता परदेशी आले आणि रेडीओची साथच सुटली.आजकालचे फोन पण भरपूर मेमरी असलेले.शिवाय इथे हाय स्पीड इंटरनेट असल्याने हवी तेवढी गाणी हवी तेव्हा ऐकता येतात. पण आजही रेडीओ म्हटल की मला माझे मुंबई पुण्याचे दिवस आठवतात.तेव्हाची गाणी आता जुनी झाली.ती काही जुन्या काळातल्या लता,किशोर,रफी,आशा यांच्या गाण्यांसारखी अजरामर गाणी नाहीत.पिक्चर नवीन असताना ती गाणी सारखी ऐकून ऐकून आवडायला लागली होती.पण त्या सगळ्या गाण्यांबरोबर माझ्या काही आठवणी गुन्फल्या गेल्या आहेत इतकाच.

वाचने 20712 वाचनखूण प्रतिक्रिया 68

समीरसूर 24/04/2014 - 16:01
मनापासून लिहिलेला छान लेख! आठवणींची सोबत मनाला फार भावते. तुम्ही कुठल्या देशात आहत? तिथे आणखी काही सुखद आठवणींचा खजिना तयार करा...:-)

माझ्या लहानपणी (६० च्या दशकात), आमच्या एका सुखवस्तू नातेवाईकांकडे मर्फीचा रेडिओ आला. ट्रान्झीस्टर अजून भारतात आला नव्हता. व्हॉल्व्हवाला रेडिओ होता. व्हॉल्व्ह तापून रेडिओचे स्टेशन लागेपर्यंत धीर धरावा लागायचा. तर, सांगायची गोष्ट अशी की घरात रेडिओ असणे हे श्रीमंतीचं लक्षण होतं. आपली श्रीमंती इतरांच्या लक्षात आणून देण्यासाठी लोकं धडपडायचे. आमच्या 'त्या' श्रीमंत नातेवाईकाने आम्हाला रविवारी सकाळी चहापाण्याला बोलावले. आणि नवा रेडिओ आणल्याचे दाखविले. तेंव्हा सकाळी नऊ (की साडेनऊ) वाजता रेडिओवर 'गम्मत-जम्मत' हा लहान मुलांचा कार्यक्रम लागायचा. 'गम्मत जम्मत. या या या गम्मत जम्मत. ऐकाहो गम्मत जम्मत. या या या ढिण्चॅक ढिण्ण, ढिण्चॅक ढिण्चॅक ढिण्ण' असं त्या कार्यक्रमाचं शिर्षक गीत लागायचं. त्यातलं शेवटचे 'गम्मSSSSत जम्मSSSSत' हे शब्द मला खुप आवडायचे. इथून मुलांचा कार्यक्रम सुरु व्हायचा. तेंव्हा रेडिओवर जास्त करून मराठी कार्यक्रमच ऐकले जायचे. मराठी सिने संगीत, शास्त्रीय संगीत, श्रुतिका, चर्चा, किर्तनं, बाजारभाव इत्यादी इत्यादी. पैकी रात्रीची 'टेकाडे भाऊजींची' श्रुतिका, रात्रीची आपली आवड हे अगदी न चुकवायचे कार्यक्रम. हिन्दी कार्यक्रम ऐकायचेच नाही असेही नाही. दुपारी अडीच वाजता विविधभारती, त्यातील 'फौजी भाईयों कि खिदमत में' सादर होणार्‍या कार्यक्रमात येणार्‍या मोठेमोठ्या निर्माते, दिग्दर्शक, हिरो - हिरॉइन्स वगैरे ग्लॅमरस व्यक्तींना प्रत्यक्ष 'ऐकायला' मिळायचं. गाणी तर सुंदर असायचीच. बुधवारी रात्री ९ वाजता रेडिओ सिलोनवर लागणारी 'बिनाका गीतमाला' आणि अमिन सयानीचं सादरीकरण हा एक हवाहवासा वाटणारा कार्यक्रम होता. अमिन सयानीचे भाऊ हमिद सयानी रविवारी दुपारी 'कॅडबरी क्विझ कॉन्टेस्ट' सादर करायचे तोही माहितीपूर्ण कार्यक्रम होता. रात्री सव्वानऊला 'ईगल फ्लास्क' प्रस्तुत इन्स्पेक्टर ईगल ह्यांची विनोदी मालीका लागायची तर 'हवामहल' कार्यक्रमात वेगवेगळ्या पुरातन ऐतिहासिक वास्तू स्वतः इतिहास कथन करायच्या. असा सर्वांगिण मनोरंजन आणि ज्ञानाचा धबधबा असलेल्या रेडिओने सर्वसामान्यांचे जीवन समृद्ध केले होते. त्याकाळी घरेदारे उघडीच असायची त्यामुळे कोणाकडे स्टोव्हवरून दुध उतू गेलंय (त्याचा विशिष्ट वास असतो), कोणाकडे मांसाहार शिजतो आहे, कोणाकडे कुकरची शिट्टी झाली आहे पासून घरची भांडणं, छोट्यांच्या मारामार्‍या, मोठ्या व्यक्तीचं सातमजली हसणं तर एखाद्या मनमोकळया वृद्धांचे आवाजी वायू निस्सारण ह्या सर्व गदारोळात रेडिओ आपले अस्तित्व जाणवून द्यायचाच. एखादे आवडीचे गाणे लागले असेल तर धावतपळत घरी येऊन रेडिओचा कान पिळायचा आणि ते हिन्दी चित्रपटातील उडत्या चालीचं गाणं असेल तर मोठ्यांकडून आपला कान पिळून घ्यायचा हे नित्यनेमाने व्हायचे. अभ्यासात 'ढ' असणार्‍या मुलाला 'रेडिओ दुरुस्ती शिक निदान उपाशी तरी मरणार नाही' असा मोलाचा सल्ला दिला जायचा. ह्या सर्व गोष्टींची चमचमती झालर लाभलेलं आमचं बालपण आठवलं की अजूनही मन हळवं होतं.

In reply to by प्रभाकर पेठकर

शुचि 24/04/2014 - 18:31
बरेचदा यु ट्युबवर "ceylone song"" सर्च देऊन जुनी गाणी ऐकते. सकाळी जाग यायची तेव्हा बाबांनी सिलोन स्टेशन लावलेलं असायचं. दिवसाची सुरुवातच संगीतमय होत असे.

In reply to by प्रभाकर पेठकर

उपाशी बोका 24/04/2014 - 21:23
पेठकरकाकांशी सहमत. रेडिओवरील अजून १ आवडता कार्यक्रम आढवतो, तो म्हणजे रविवारी दुपारी २ वाजता लागणारा "क्रिकेट विथ विजय मर्चंट" रेडिओबद्दलचे माझे एक आवडते गाणे

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमच्याशी सहमत, या रेडिओमुळेच आपले बालपण समृद्ध झाले आहे, त्या काळी माझ्या वडीलांनी आमच्या खेडेगावात पहिला रेडिओ आणला,मग काय सकाळ संध्याकाळ सगळे कुतुहलाने यायचे, मास्तर बातम्या लावा की, फर्माईश व्हायची, रात्रीची 'टेकाडे भाऊजींची' श्रुतिका, रात्रीची आपली आवड हे अगदी न चुकता ऐकायला त्या रेडीओ भोवती कोंडाळे केले जायचे,तसेच रविवारी सकाळी ११ वाजता आपली आवड असायची, बुधवारी रात्री ९ वाजता रेडिओ सिलोनवर लागणारी 'बिनाका गीतमाला' तर सर्वांच्या आवडीचीच. पहाटे पासून हा रेडिओ आपले अस्तित्व जाणवुन द्यायचा. पुढे कॉलेजला गेल्यावर सुद्धा ही रेडिओची आवड तशीच राहिली, त्या वेळी रात्री ११ वाजता विविध भारतीवर जुनी गाणी लागायची ती आर्वजुन ऐकत होते. आज सुध्दा सकाळी लवकर उठल्याबरोबर आधी रेडिओ लावते. पुणे स्टेशन मला फार आवडते, सर्वच माहिती तिथे मिळते.

In reply to by प्रभाकर पेठकर

चौकटराजा 25/04/2014 - 13:54
वा प्रभाकरपंत ! आमचं पण लहानपण व रेडिओ च नातं असंच. आमच्या वडिलांनी रेडिओ आणला ते विम्याच्या पैशातून. ( म्हण्जे त्यावेळी विम्याची म्याचुरिटी किंमत काय असेल पहा !!!!! हा ! हा ! ) .अहो पंत ते क्रिकेट विथ विजय मर्चंट राहिलं की ! आपल्या मुबईचा पदमाकर शिवलकर या बोर्नविटा चा मला वाटत> एक डवल ऑर क्विट असा कार्यक्रम आला होता त्यात सर्वात जास्त पैसे कमविलेला स्पर्धक होता. सुशील जव्हेरी, एम के धर्मराजा, सुजित सेन पामेला सिंग, बोरून हालदार या बरोबरच " दत्ता कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहेत ....." चे एक ग्लॅमर होते. मला शास्त्रीय संगीताची आवड लावण्यात विविध भारतीच्या 'संगीत सरिता' चे फार मोठे ऋण आहे. ( हा कार्यक्रम आजही चालू आहे ) .

In reply to by चौकटराजा

होय. तो 'बोर्नव्हिटाचा'च कार्यक्रम होता. मी चुकून 'कॅडबरी' लिहिलं आहे. कदाचित 'बोर्नव्हिटा' हे 'कॅडबरीचे'च असल्याने चुक झाली असावी.

आदूबाळ 24/04/2014 - 18:28
सर्कारी रेडिओ चॅनल्सना पर्याय नाही. बातम्यांच्या सुरुवातीला निवेदक खर्जात "ये (पॉज) आकाशवाणी है" असं म्हणाला की त्यापुढचं वाक्य "कोई बच्चों के खेलने की चीज नहीं" असं त्याच्या मनात वाजलेलं आहे, हे लक्षात येतं. यांना अचूकतेची भारी हौस. "तीनशेअठ्ठ्यात्तर अंश सात आठ मीटर्स अर्थात सातशेब्याण्णव किलोहर्ट्झ" वर ऐकू येणार्‍या आकशवाणी पुणे केंद्रातून "सकाळचे सात वाजून पंचावन्न मिनिटं आणि अठरा सेकंदं झाली आहेत" वगैरे तपशील मिळतात. बाजारभाव, तापमान हे दुसर्‍या डेसिमलपर्यंत सांगतात. कार्यक्रम आणि त्यांचे प्रायोजक कधी बदलतात काय माहीत! "स्वामिनी मराठी भक्तिगीत" आणि "जीतेंद्र घोडके सराफ बेला के फूल" ऐकतो आहे. आठवणच काढतो आहे तर "बाळाराम मार्केट"ची जाहिरात द्यायचा मोह आवरत नाही:
"ओओ...ओ" "अय्या टारझन!" "आणि तो देखील बाळाराम मार्केटमध्ये!!" "अक्सा सटाकाना सुटाकाना सफारीटागा..." "तो म्हणतोय, सूटिंग शर्टिंग आणि रेडिमेड्सची व्हरायटी अन्य कुठे?" "ओओ...ओ" "अय्या गेला पण!" "बाळाराम मार्केट, लक्ष्मी रोड, पुणे"
अजून खूप खूप खूप आठवणी आहेत. पण परत कधीतरी...

In reply to by आदूबाळ

किसन शिंदे 24/04/2014 - 18:52
हाहाहाहा खत्री जाहीरात! लहानपणापासून रेडिओशी जुळलेली नाळ अजूनही टिकून आहे. आत्ताही रात्री झोप आली नाही की १००.७ स्टेशन लावून ऎकत बसतो. बर्याचश्या जून्या गाण्यांचा आस्वाद घेता येतो तिथे.

In reply to by किसन शिंदे

पण रेडिओवरच्या जाहीराती साधारण खत्रीच असतात. फुल्ल मिमिक्री टाईप. कारण समोरच्याला चित्र दिसत नसते तर शब्दच त्याच्या मनात ठसवायचे असतात. त्यामुळे कधी अतिरेक होणे वा येडे चाले केले जाणे होतेच.

In reply to by आदूबाळ

अनुप ढेरे 24/04/2014 - 19:42
सर्कारी रेडिओ चॅनल्सना पर्याय नाही.
एकदम सहमत. मिर्ची वगैरे च्यनल्स वर खूssssssप जाहिराती असतात. पण विविध भारतीवर चांगले दिवस आणि वाईट दिवस असा ढळढळीत फरक असतो. छान गाणी लागली की एका मागे एक भारी गाणी लागतात. पण एखाद दिवशी सगळी भिकार गाणी ! वटवट-वटवट नावाच्या नाटकात पुलंनी मस्त वातावरण उभं केलं आहे रेडीओ स्टेशनच्या कामकाजाचं.
"जीतेंद्र घोडके सराफ बेला के फूल"
यातल्या जीतेंद्र मधल्या दीर्घ 'जी'चा उच्चार अगदी भाषाशिक्षकाकडून घोटवून घेतल्या सारखा दीर्घ. जीsतेंद्र त्या बाळारामबरोबरच 'घराला घरपण देणारी माणसं' ही डीएस्के ची जाहिरात पण वर्षानुवर्ष चालू आहे.

In reply to by अनुप ढेरे

आणि फिनोलेक्स्ची झायरात हो? ती विसरला का? शेत पिकली सोन्यावाणी. कसला विचार करतोयय रामय्या ही पत्रेवाली जाहीरात. ग्रीटवेल संदेसे आते है. हॅलो मधुमालती. तसेच सांजधारा हे विविधभारतीवर लागणारे कार्यक्रम. ११:३० ला मुंबईवर लागणारी कामगारसभा. मला वाटायचे की आता खरंच कोणतीतरी सभा होणार आहे. करंट मधे गलानी फॅशन्स रतीब घालते आहे. मजा मजा असते.

यसवायजी 24/04/2014 - 19:00
(सांगली/कोल्हापुर) रेडीओवरच्या काही जाहिराती अजुन आठवतात. ---- सुवासिनीनं कुकवाला आणी मर्दानं 'च्या'ला न्हाई म्हणू नये.. पण आमी नेहमी मगदूमचा कडक च्याच पितो आणी आमी काय उन पाणी पितो काय? ---- वारणाची दूधगंगा वाहते अखंड, दूध पावडर तूप आणी लस्सी श्रीखंड. ---- झुळझुळ वाणी.. खेळवा पाणी.. आणायचं कुणी.. सांगतो राणी

In reply to by यसवायजी

बॅटमॅन 25/04/2014 - 12:02
वारणाची दूधगंगा वाहते अखंड, दूध पावडर तूप आणी लस्सी श्रीखंड.
वारणा दुधाचे दर्जेदार उत्पादन! "सरस्वती च्या" ची अ‍ॅडही तशीच आठवतेय. फिनोलेक्सनं आणलं पाणी, तसेच मगदूम च्या, इ.इ. अनेक खास आपल्या पट्ट्यातल्या झैराती मस्त असायच्या राव. ६:५५ ला संस्कृत बातम्याही असायच्या. "इयं आकाशवाणी | संप्रति वार्ता: श्रूयन्ताम् | प्रवाचकः बलदेवानन्द सागरः |" किती वर्षे तोच होता. नंतर पुढे "प्रवाचकः सूर्यनारायणानन्दः" झाल्यावर त्यातली मजा गेली राव.

In reply to by बॅटमॅन

अन्या दातार 25/04/2014 - 12:27
च्यायला, या जाहिराती ऐकल्याशिवाय सकाळ झाल्याचे वाटायचेच नाही राव!! अजून एक. लाडा पंप्सची जाहिरात. "लाडा लाडा.......... पाणी वाहे निर्मळ, हिरवी होई शेती...."

In reply to by अन्या दातार

बॅटमॅन 25/04/2014 - 12:28
लाडा लाडा सब्मर्सिबलं पंपं.. पाणी मीळे मुब्लकं.. हिरवी होई शेऽती, हिरवी होई शेऽती... धनधान्याची बरकतं, होई पंपाने..... लाडा लाडा...

In reply to by बॅटमॅन

यसवायजी 25/04/2014 - 13:11
@ धनधान्याची बरकतं, होई पंपाने..... अरे अजुन कायतर हाय पुढं.. च्यामारी आठवतच नाहीए. शेवटाचं लाडा लाडा तर भारीच!!

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 25/04/2014 - 18:10
नग्गग्ग... अवो सुवासिनिनी कुक्वाला अन मर्दान्न च्याला नगं म्हनू नये... पण आम्ही नेमी मर्दांचा कडक ***चहाच पितो मंग आमी काय उन पानी पितो व्हय ? आम्हीबी आमच्या आबा आज्यापासुं मर्दांचा कडक ***चहाच पितो आसं म्हणता ? मग़ हुञ्जाउदे डबल (का धमाल आठवत नाही)

In reply to by बॅटमॅन

यसवायजी 25/04/2014 - 18:47
:)) मला आधी ते- "धन धान्याची बरकत लाडा पंपाची अपुर्वाई" असं वाटायचं. मग नंतर लाडा पंपाचीया किरपेने.. असं. अजुन समजलेलं न्हाई.. असो.

In reply to by बॅटमॅन

कुसुमावती 25/04/2014 - 12:33
राधिका... राधिका.. हायस्कूल रोड, मिरज...... राधिका अशी कुठ्ल्यातरी मिरजेतल्या कपड्यांच्या दुकानाची जाहीरात होती. माझ्या बहीणीच नाव राधिका आहे तिला या जाहीरातीप्रमाणे हाक मारायचो आम्ही. वालावालकर कापड दुकान (ट्रस्ट्)ची जाहीरात.. लग्नाचा (इथे काय शब्द होते आठवत नहियेत).. कोल्हापुरच्या अंबाबाईचा आणि लग्नाचा बस्ता वालावालकरांचा. लाडा पंपाची पण अशीच काहीतरी जाहीरात होती, ती कायम शनिवारी सकाळच्या शाळेलाच जाताना ऐकल्याने, एरवी ती जाहीरात कधीही लागली तरी सकाळ झाल्यासारखी वाटायची.. बाकी अभय नारायण पोतदारांच्या जाहीरातींनी वीट आणला.

In reply to by कुसुमावती

बॅटमॅन 25/04/2014 - 12:39
राधिका... राधिका.. हायस्कूल रोड, मिरज...... राधिका
एकदम एकदम!!! दिल राधिका राधिका हो गया. :)
बाकी अभय नारायण पोतदारांच्या जाहीरातींनी वीट आणला.
एक लिंबू झेलू बै दोन लिंबू झेलू दोन लिंबू झेलू बै तीन लिंबू झेलू तीन लिंबू झेलू बै चार लिंबू झेलू चार लिंबू झेलू बै पाच लिंबू झेलू पाचा लिंबांचा पानोठा अभय नारायण पोद्दारान्नी पोद्दारान्नी किमया केली दागीन्यान्नी गृहलक्ष्मी सजली

In reply to by यसवायजी

उपाशी बोका 25/04/2014 - 04:58
कसला विचार करतोय रामय्या घराला आनि गोठ्याला कुठले पत्रे लावावे अरे, चारमिनार अ‍ॅस्बेस्टॉस सिमेंटचे पत्रे घे, माझ्या आजोबांनी लावलेले अजूनही मजबूत आहेत. अरे हो, खरंच की. चारमिनारचे पत्रे वापरा..

आत्मशून्य 24/04/2014 - 19:45
बिन सेल बिन लाईट चा रेडिओ तयार केला होता. अर्थातच त्याला स्विचोफ़ ऑन कळ न्हव्ती. ऐकायचे असेल की हेडफोन डोक्याला लावायचा नको असेल तर बाजुला काढायचा. विशेषत: लाईट गेली की हां बिन विजेचा रेडिओ रात्री अंधारात ऐकत बसने ओसम थिंग होती. टॉप ऑफ़ द वर्ल्ड. - मुलांसाठी सोपे वैज्ञानिक प्रयोग पुस्तकात याची रेसिपी होती.... आहे.

सकाळची शाळा असायची... सहा वाजता उठलो कि त्याच वेळी मुंबई ब आकाशवाणी केंद्रावरून 'मंगलप्रभात' हा भक्तिपर गीतांचा कार्यक्रम सुरू व्हायचा... तो ऐकत चहा, आंघोळ वगैरे उरकली जायची... बरोब्बर सात वाजता घोषणा ऐकू यायची... "आकाशवाणी पुणे! सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत!!" ती आमची शाळेला जायला घराबाहेर पडायची वेळ!! मी तिसरी किंवा चौथीत असेन... ती घोषणा मी इतक्या वेळा ऐकली होती की एकदा मी आईवडिलांकडे हट्ट धरला की या मे महिन्याच्य सुट्टीत पुण्यालाच जायचं!! आता आम्ही कोकणी माणसं!! दर सुट्टीला कोकणात किंवा गोव्याला पळणारी... अगदीच हट्ट धरला तेंव्हा शेवटी वैतागून बाबांनी विचारलं, "पुण्याला कशाला? तिथे काय ठेवलं आहे तुझं?" मी म्हंटलं, "मला सुधा नरवणेंना बघायचंय!" "कोण सुधा नरवणे?", बाबांना काही कळेना. "त्या, आकाशवाणी पुणे! सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत!! मधल्या सुधा नरवणे!", मी नरवणेबाईंच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत सांगितलं... कधी नव्हे ते आमचे पिताश्री ठ्ठोऽऽऽ करून गदागदा हसले!!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

बॅटमॅन 25/04/2014 - 12:10
ठ्ठो =)) पिडांकाकांनी खरे तर त्यांच्या बालपणाबद्दल एखादी सेरीजच सुरू केली पाहिजे.

In reply to by पिवळा डांबिस

विकास 26/04/2014 - 18:42
सुधा नरवणेंमुळे माझ्या देखील आठवणी जागा झाल्या सात पाच च्या बातम्या असायच्या त्या. अशी किंचीत ऑड वेळ का असायची माहीत नव्हते. पण मला वाटते ७ ते ७:०५ पुणे केंद्रावर (मुंबईवाल्यांना नाही) संस्कृत मधे बातम्या असायच्या! सुधा नरवणे आणि त्यांचा आवाज आजही आठवतो. अत्यंत स्पष्ट आवाजात आणि १० मिनिटात त्यावेळचे जग समजायचे.. त्यांच्या आवाजाने (खरी) जाग येयची त्यामुळे आम्ही मुले त्यांना गंमतीत डरावणे म्हणायचो! :) खाली बहुगुणींनी आकाशवाणी केंद्राची सिग्नेचर ट्यून दिली आहेच. तशी आपली आवडची पण सिग्नेचर ट्यून आठवते. पण कुठे मिळू शकली नाही. :(

In reply to by विकास

सव्यसाची 27/04/2014 - 00:27
मला वाटते संस्कृत बातम्या ६:५५ ला असत.. ७ वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या प्रक्षेपित होत असत. मी जेव्हा या बातम्या ऐकायचो तेव्हा भालचंद्र कुलकर्णी बातम्या द्यायचे.. मजा होती राव..!

आत्मशून्य 25/04/2014 - 03:12
वरून आठवले, याच नावाचा एक चित्रपट सुधाआहे, हिमेशजी रेशामिया भाऊ त्यात नायक असून त्यातले मन का रेडिओ बजने दे जरा.... फुल्टू एटिट्युड देदे तु जरा गाणे आवडल्याने बराच वेळ थेटर हुडकत फिरत होतो.... मग क्ळाले चित्रपट 3 दिवसात उतरवला होता ते. :( बिचारा हिमेस...

पाषाणभेद 25/04/2014 - 05:18
जुन्या आठवणी जागवल्यात. कामगारसभा म्हणजे खरोखर कामगारांची जेवणाची वेळ पाहून त्याच वेळी प्रसारीत होणारा कार्यक्रम होता. कामगार सभा सकाळी ११ वाजता सुरू होई अन काका बजाज मधून बरोबर ११.०३ ला घरी जेवायला हजर होत. हीच वेळ शाळेसाठी तयारी करण्याची असे अन ११.३० ला घराबाहेर पडण्याची असे. हवामहलमध्ये विनोदी किस्से असायचे. शालेय कार्यक्रम तर बहार होती. बाकी माझ्या रेडिओ कवितेची आठवण आली.

कंजूस 25/04/2014 - 07:05
जुन्या ट्रांझीस्टर रेडीओचे काय करायचे ?आता मोबाईलमध्ये छान एफेम लागते .ते रेडीओ चार रुपये किलो प्लास्टीक भावाने विकण्यापेक्षा स्पिकर म्हणून खोल्यांतून लावून टाकले .

अनिता ठाकूर 25/04/2014 - 11:05
दर सोमवारी संध्याकाळी ७ वाजता गोवा स्टेशनवर १ तास आपली आवड लागायची. त्यात संपूर्ण १ तास फक्त मंगेशकर भावंडांची गाणी लागायची.ते स्टेशन स्पष्टपणे मिळायचे नाही. अगदी कान देउन ऐकावे लागायचे. पण, मन आनंदाने भरून जायचे.रेडिओच्या आठवणी नेहमीच येतात.आमच्या 'घडत्या' वयात आम्हाला रेडिओवरचे दर्जेदार कार्यक्रम ऐकायला मिळाले हे आमचे भाग्यच म्हणायचे.

आमचे फॅमिली डॉक्टर होते. 'त्या' काळात त्यांनी, आपल्या नंबराची वाट पाहात बसलेल्या, रुग्णांच्या करमणूकीसाठी असाच मर्फीचा रेडीओ आणला होता. तो कोणाचाही हात पोहोचणार नाही (अगदी त्यांचाही), अशा उंचीवर फळी ठोकून तिथे ठेवलेला होता. तेंव्हा त्या रेडिओची डिलीव्हरी करायला आलेल्या विक्रेत्याकडून यांनी त्यावर 'मुंबई ब' हे स्टेशन लावून ठेवले होते. (हे पुढे आयुष्यात बदलले नाही. एकच स्टेशन ते ऐकायचे), आवाजाची पातळी ठरवून घेतली होती. आणि त्या रेडिओला विजेचा पुरवठा करणारे बटण हात पोहोचेल तिथे होते. डॉक्टरांनी दवाखाना उघडला की ते बटण ऑन करायचे, दवाखाना बंद झाला की बटण बंद करायचे. मधल्या वेळात (ऑन स्थितीत) 'मुंबई ब' वरचे सर्व कार्यक्रम अगदी ओळीने ऐकायला मिळायचे. आम्ही हसायचो. भावगीतं, बाजारभाव (त्यात 'कांदा - लासलगाव, प्रति क्विंटल....' हे माझं आवडतं वाक्य), चर्चा, हवामानाचा अंदाज, बातम्या सर्व सर्व 'पार्श्वसंगित' चालू असायचं. डॉक्टरांना त्याचं कांही सोयरसुतक नसायचं. दवाखान्याच्या वेळात ते रेडिओ ऐकायचेच नाहीत. त्यांचं रुग्ण तपासण्याचे काम अगदी आत्मियतेने चालायचं. त्या रेडियोवर 'हांव अमूक तमूक कोंकणींतून खोंबरें देतां' ह्या वाक्यावरही हसू आवरणं मला अवघड जायचं. डॉक्टर चष्म्याच्या वरून माझ्याकडे कटाक्ष टाकायचे आणि गालातल्या गालात हसायचे. ते कारवारी होते. ह्या आमच्या डॉक्टरांवर एक वेगळा व्यक्तिचित्राचा धागा होऊ शकेल.

In reply to by मुक्त विहारि

पाषाणभेद 26/04/2014 - 01:24
पेठकर काकांच्या पोतडीत अशा अजून किती आठवणी आहेत? लिहाच एक एक करून.

स्पंदना 25/04/2014 - 11:48
सुरेख मालविका! पण धागा खुलला तो प्रतिसादांनी. प्रपे काकांचे प्रतिसाद तर अतिशय वेधक. अन पिडां काकांची "सुधा नरवणे" :))

नाखु 25/04/2014 - 12:38
गीतमालेसाठी पान पट्टी गाठत असू.. घ्यायचे काहीच नाही पण तरी पानपट्टीवाला काही आक्षेप घेत नसे.जर पोहचायला उशीर झाला तर आम्च्या वरातीमागून घोड्या सारख्यांसाठी गाण्यांची उजळणी असायची. अगदी अलिकडे म्हणजे "हिरो" (जॅकीचा) पर्यंत ही बिनाका गीतमाला ऐकली आहे.. पेठकर काकांनी "मंतरलेल्या" दिवसांची आठवण काढली हेच खरय.

अस्मी 25/04/2014 - 12:49
एकदम मस्त लिहीलयस मालविका...आणि सर्वांचे प्रतिसाद पण मस्त!! पुरानी जिन्स बद्दल एकदम सहमत.
इथे आम्ही मोठ्याने एफ एम वर गाणी लावून ठेवायचो.कोणताही काम करताना बरोबर गाणी हवीच.मग बाहेर जायच तर तयारी करताना गाणी.अगदी घराबाहेर पाउल टाकेपर्यंत मोबाइल मोठ्याने वाजत असायचा.
+ १ पुण्याला पीजीमधे राहायला आल्यावर एफएम रेडिओ तर रूमवर कायम सुरू असायचा आणि कुठलं गाणं आहे हे म्युझिकवरून ओळखायची रूमिजची स्पर्धा :) ऑफिसला जातानाही बसमध्ये पूर्ण वेळ एफएम सुरूच असायचं. तुझ्या लेखातल्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या असल्यामुळे अगदी रीलेट करु शकले. तू चिपळूणची आहेस का गं? :)

In reply to by अस्मी

आणि कुठलं गाणं आहे हे म्युझिकवरून ओळखायची रूमिजची स्पर्धा हे बरेच जण करत असावेत, आमचेही करून झालेय. त्या गाण्यांबरोबर आपणही गाणे, सोबतीला सबमिशनच्या नाईटस या ईंजिनीअरींगमधील बेस्ट आठवणी .. बहुतांश ईंजिनीर्सनी अनुभवल्या असतीलच.

मालविका 25/04/2014 - 13:15
मिपा वरील सर्व मंडळींचे प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद . मला सरावाच प्रतिसाद आवडले , प्रत्येकाने आपल्या वेगळ्या वेगळ्या आठवणी सांगितल्या . खास करून लक्षात राहिलेल्या जाहिराती . खूपच मस्त वाटल वाचून . मजा आली .

मराठे 25/04/2014 - 19:29
रेडियोच्या या आठवणी खरोखरच शाळकरी वयात घेऊन जातात. सकाळी आईने रेडियो लाऊन ठेवलेला असायचा, त्यात लता मंगेशकर, भीमसेन यांच्या अभंगाने जाग यायची. 'जे का रंजले गांजले', 'रंगा येई वो रे' .. प्रत्येक गाणं जवळ जवळ पाच मिनीटाचं त्याप्रमाणे सकाळची कामं आवरायची सवय लागलेली. त्या कार्यक्रमात शेवटी एक समूह-गीत असायचं (संगीतकार बहुधा 'कानू-घोष' असायचे), त्यांच 'राही अगर तुझे है अपने पंखो पर विश्वास' किंवा 'हम होंगे कामयाब' सुरू झालं की चपला घालून शाळेत जायची वेळ व्हायची. संध्याकाळी खेळून घरी आलं की शेजार्‍यांच्या रेडियोवर नाट्य-संगीत लागलेलं असायचं. रात्री थोडे हिंदी कार्यक्रम. झोपायच्या वेळी जुनी हिंदी गाणी याचं समीकरणही पक्कं डोक्यात बसलेलं. आपली आवड किंवा इतर श्रुतिका ऐकत खिडकीत उगाचच कोणाची तरी वाट बघत बसलेली आई आत्ता या क्षणीसुद्धा दिसतेय. असो, http://eprasaran.com/ ह्या संकेत स्थळावर सुभाष केळकरांनी त्या जुन्या रेडियोच्या धर्तीवर कार्यक्रम सुरू केले आहेत. जरूर ऐका.

In reply to by मराठे

शनिवारी सकाळी अकरा वाजता कामगार सभेत 'लोकगीतं' लागायची. त्यात बाजीप्रभूंचा ७ मिनिटांचा पोवाडा, त्यातील 'लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, महाराज कूच करावं' हे बाजीप्रभूंचे विरश्रीयुक्त आर्जव, मोजक्या मावळ्यांनीशी लढविलेल्या पावनखिंडीच्या लढाईचे वर्णन, अंगावर तलवारींचे अनंत घाव सोसूनही खिंडीत पाय रोवून उभे राहिलेले बाजीप्रभू शेवटी अगतिक पणे विचारतात, ' झाले कारे तोफांचे बार? पोहोचले कारे महाराज सुखरुपपणे गडावर? महाराज गडावर पोहोचत नाहीत तो पर्यंत बाजीचे प्राण ह्या देहास सोडून जाणार नाहीत, हर हर महादेव!' शेवटी तोफांचे बार कानी येतात आणि बाजीप्रभू म्हणतात, 'जा! महाराजांना सांगा, तोफांचे बार ऐकू येत नाहीत तोपर्यंत बाजीचे प्राण त्याच्या देहाला सोडून गेले नाही. येतो महाराज, मुजरा स्विकारावा!' हा ७ मिनिटांचा, दोन भागात ऐकवला जाणारा पोवाडा ऐकताना (हज्जारदा ऐकला तरीही) बाजी प्रभूं इतकाच मीही कानात प्राण आणून गडावरच्या तोफांचे आवाज ऐकायला उत्सुक असायचो. बाजी प्रभू प्राण सोडायचे तेंव्हा मलाही गलबलून यायचं, वाटायचं 'बाSSSSजीSSSS' अशी जोरदार हाक द्यावी त्या वीराला आणि सांगावं 'महाराज गडावर पोहोचले आहेत स्वतःला वाचवावं, देह ठेवू नये!' आज, हे लिहीतानाही डोळे पाण्याने भरून आले आहेत.

रेवती 25/04/2014 - 19:46
आमच्याकडे आज्जी रेडिओवरचं मंडळ की काहीतरी लावून बसायची. मराठी गाणी वगैरे नेहमी चालू असायचं पण सुरुवात मात्र संस्कृत बातम्यांनी! दुसरी आज्जी रात्रीची श्रुतिका चुकवायची नाही. त्यातल्या कथेतील पात्रांमध्ये गुंतायची. मग ऐकता ऐकता "हे वागणं शोभलं का तुला?" किंवा " देवानं मदतीचा हात दिला/ देव पावला" टाईप म्हणायची. मालविका, लेखन आवडले. आठवणी जाग्या झाल्या.

In reply to by असंका

खेडूत 27/04/2014 - 01:20
अजूनही 'ते' रेडिओ चांगले चालतात. पुण्यात पण आहेत. त्याहीपेक्षा आश्चर्य वाटतं या बल्ब चं! १९८५ मध्ये मी हे रेडीओ टीव्ही दुरुस्ती क्लासला जाऊन शिकलो होतो. ट्रान्झीस्टरचे टी व्ही शिकवण्या आधी व्होल्वचे पण शिकवले होते. इंजिनियरिंग करतांना पैसे घेऊन दुरुस्त पण करत असे. पुण्यात रेडिओला पंधरा रुपये आणि टीव्हीला पन्नास रुपये दुरुस्तीला द्यायला पण लोक खुश नसत. मग म्हणलं ''मना-सज्जना त्यापेक्षा इंजिनियर व्हा लवकर!'' आणि हा धंदा बंद केला!

पाषाणभेद 26/04/2014 - 01:46
पण आजकाल सरकारी नभोवाणीवर जाहिरांतीचा रतीब असतो. कोण कुठलेतरी प्रायोजक दर १० मिनीटांनी बदलतात अन त्यांच्या ओंगळवाण्या जाहिराती जुन्या आकाशवाणीच्या जरतारी साडीला ठिगळ लावलेल्यासारख्या वाजतात. त्यातले फोन नंबर, मोबाईल क्रमांक ऐकतांना ते पाठ होवू नये म्हणून मी मनातल्या मनात किंवा थोडे मोठ्याने 'आआआआअ' असा अर्थहीन घोकतो. जुनी आकाशवाणी खरोखर चांगली होती. महाराष्ट्राला (किंबहूना भारत आणि पाकिस्थानलासुद्धा) आकाशवाणीने पु.ल. वपू. यांसारखी अनेक साहित्तिक मिळवून दिलेत. (ही यादी वाढवा. ज्ञानात भर पडेल.) दोन पिढ्यांच्या बुद्धीवाढीसाठी आकाशवाणीने साहित्तिक खतपाणी दिले. शेतकर्‍याच्या शेतीविषयक ज्ञानात भर टाकली. पुर्वी वेगवेगळ्या राज्यातील रेडीओ केंद्रांच्या कार्यक्रमाची देवाणघेवाण, अनुवादही व्हायचे. कोणतीही रेकॉर्ड तयार झाली की ती रेडीओ लायब्ररीला पाठवण्याचा देखील परिपाठ होता. शॉर्टवेव्ह बँडवर रशियन केंद्र, मध्य आशियातील काही देश आदींमधून हिंदी कार्यक्रमही लागायचे. आता असे रेडीओ सिग्नल्स इतर सिग्नल्सच्या गजबजाटात मिळणे मुश्किल आहे. एक खरा किस्सा फोटोसकट कुठेतरी वाचलेला आहे. आकाशवाणी (पुर्वीची AIR म्हणजेच All India Radio) ही भारतीय नभोवाणीची वाहीनी १९३० साली सुरू झाली. त्यावेळी पाकिस्तानचे नामोनिशाण नव्हते. १९४७ साली फाळणी झाल्यानंतर AIR चे पाकिस्तानातील रेडीओकेंद्रे सहाजिकच पाकिस्तानात राहीली. त्यानंतर कित्तेक वर्षे त्या रेडीओ केंद्रांच्यावर AIR असलीची पाटी असायची. नंतर कोणतेतरी भारतिय शिष्टमंडळ तेथील रेडीओ केंद्रांवर भेटी देतांना त्या शिष्टमंडळातील कुणीतरी व्यक्तीने ही जाणीव तेथील अधिकार्‍यांना करून दिली व त्यानंतर बदल झाला. जुन्यात काळानुरूप समयोचीत बदल हवाच पण प्रत्येक जुने म्हणजे उणे असे नव्हे हे आकाशवाणीच्या बाबतीत म्हणावे लागते की काय अशी भिती आता वाटतेय.

खटपट्या 26/04/2014 - 02:43
मी आख्खा बोक्या सातबंडे रेडिओ वर ऐकला आहे. लहान मुलांसाठी "गम्मत जम्मत" हा कार्यक्रम यायचा. बरीचशी जुनी गाणी फक्त रेडिओ वर ऐकली आहेत म्हणून अजून स्मरणात आहेत. एकदम जुने दिवस आठवले. मराठी अ आणि ब वाहिनी चालू आहे कि माहिती नाही

मी तसा रेडिओच्या जमान्यातला नसलो तरी ट्रांझिस्टरवर क्रिकेट काँमेंटरी ऐकण्याचे नाते आहे आमचे. अगदी डिप्लोमालाही जेव्हा पेजरचा अस्त होऊन नुकतेच मोबाईल येऊ लागले होते तेव्हाही मी कॉलेजला न लाजता वय वर्षे बारा पासून वापरत असलेलो एक जुना ट्रांझिस्टर घेऊन जायचो. (खरे तर जेव्हा विकत घेतला होता तेव्हा मामाने दुबईवरून आणला असल्याने त्याचे कौतुकच होते.) असो, जुना का असेना तो मॅचचा स्कोअर सांगत असल्याने, आणि सर्वांना तो जाणून घ्यायची उत्सुकता असल्याने माझा भाव वधारायचाच. पुढे डिग्रीसाठी मी जेव्हा वालचंद सांगलीला गेलो तेव्हाही तिथे आपल्या मुंबईसारखी मॅचची कॉमेंट्री नाही बघून रुखरुख लागलेली. त्यानंतर पुढे मग मोबाईलमध्ये एफएम आले, ईंटरनेट आले, आणि हे सारे दर दुसर्‍याच्या हातात आले, मॅचचा स्कोर समजायचे सतराशे साठ पर्याय उपलब्ध झाले आणि ट्रांझिस्टरची मजा गेली.. तरीही आजही मोबाईल मधील १६-३२ जीबी मेमरीकार्डातील शेकडो-हजारो गाण्यातले एखादे निवडून ते ऐकण्यापेक्षा एफएम वर रॅन्डम लागणारी गाणी, एखादे न आवडल्यास स्टेशन चेंज करत दुसरे तिसरे शोधत ऐकण्यात जास्त मजा येते.

कंजूस 26/04/2014 - 19:28
रेडीओचे जुने आवडते कलाकार आणि लेखक :शंना नवरे ,रविंद्र पिंगे ,बाळ कुडतरकर ,जयवंत दळवी ,प्रपंच आणि पुन्हा प्रपंचचे आवाज देणारे ,तबस्सुम ,अमिन सयानी ,क्रिकेटचे धावते समालेचक (मराठी),हिंदी आणि इंग्रजीचे कॉमेंटेटर .शनिवारी रात्री साडेनऊला नाटकांचे ,कादंबरीचे नभोवाणी रुपांतर चांगले असायचे .उदा०कल्याणी ,कोणार्क .कधीकधी कॉफिहॉऊस कट्टा आवडायचा . नवीन एफेमवरचे घंटासिंग आणि अॅँग्रीगणेशन चे जोकस आणि सचिन तेँ०च्या आवाजातली बडबड मस्त असते .रात्रीच्यावेळी टैक्सी चालवणारे वगैरे एफेमवर खुश आहेत .

यस्टरडे वन्स मोर मधून खूप जुने नंबर्स आठवले. हमीद सयानींच्या आठवणीने कळ आली. ते खरंच ध्यानीमनी नसतांना अकाली गेले. अमीन सयानींना त्यांची बोर्नव्हीटा क्वीझ कॉन्टेस्टमधली जागा नक्कीच नीटशी घेता आली नाही. इन्सपेक्तर ईगल पण आनंद देऊन गेला. आकाशवाणीच्या हिंदी रेडिओ जाहिरातसृष्टीतली ये ढेरसे कपडे मैं कैसे धोऊं..... ही पहिली सांगितिक जिंगल अशोक पत्कींची होती. अनेक आठवणींना उजाळा देणार्^या लेखाबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

अनिवासि 27/04/2014 - 00:16
हा धागा वाचायला सुरवात केली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी आमच्या घरी रेडीओ नव्हता. शेजार्यान्कडे जाउन कधी कधी ऐकावयास मिळायचा पण वडलाना ते आवडत नसे. एकदा वडील गावी गेले असताना, तो रेडीओ रात्रीपुरता मागुन आणला - मस्तपैकी गाणी ऐकत झोपलो आणि झोपेत धक्का लागुन तो पडला. वडलाना कळले असते तर माझी धडगत नव्हती! शेवटी आईला शरण गेलो - सदाशिव पेठेत दुरुस्ती करणारे एक जण होते- त्यानी हा भाग मिळत नाही, नन्तर तो भाग मिळत नाही असे करुन चीकार वेळ घेतला- शेजारी समजुन घेणारे होते व वडलानाही चान्गले ओळखत होते म्हणुन त्यानी काही त्रास दीला नाही. शेवटी आईने कसे तरी पैसे भरुन तो परत आणला. आमच्या घरासमोरच एक उडपी रेस्टौरन्ट होते त्याचा रेडीओ क्रिकेट्चा सामना असला की मोठ्याने लागत असे आणी मग तेथे प्रचड गर्दी जमत असे. त्यातुन सामना परदेशात असेल तर रात्री पर्यन्त!! नन्तर मी परदेशात आलो- १९५२- पहिली नोकरी- पगार अगदी तुट्पुन्जा. एक बेड्सीटर खोली- मनोरजनाची साधने अगदी कमी -TV पुर्वीचा काळ-. ५३ साली पहिली मोठी खरेदी- रेडीओ - pilot कम्पनीचा- valve वाला. मग रात्री गाणी ऐकत झोप. रेडिओ सीलोन सारखे radio luxenburgh होते. रेडीओच्या मागच्या जाळीतुन valves चा प्रकाश खोली उजळुन काढायचा. आजही त्याची आठवण आली की भरुन येते. नेहमीप्रमाणे आयुष्यात चढ-उतार आले. शेवटी एकदा तो विकायला काढला पण २६ पौडाला घेतलेल्या त्या रेडीओला ५ पौड पण येईनात म्हणुन विकला नाही. पुढे परत चान्गले दिवस आले. आज तो रेडीओ माझ्या घरात. बसायच्या खोलीत मानाच्या जागेवर विराजत आहे- माझ्या आयुष्याचा साक्षीदार! मला वाटते की त्याची त्यावेळची पावती देखील माळ्यावर कोठेतरि आहे. शेवटी, all India radio चा signature tune - कायम डोक्यात होता. भारतात आलो की तो ऐकावासा वाटे- आज बहुगुणी मुळे ऐकावयास मिळाला. ध्न्यवाद