घर खरेदी-विक्री व्यवहाराविषयी मदत हवी आहे
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकरांनो,
शक्यतो मी "मदत हवी आहे" असे लेख लिहित नाही पण माझ्या एका परिचितासाठी मदत हवी आहे.
त्याचे झाले असे की त्यांनी एके ठिकाणी विकत घ्यायला एक घर बघितले.ते त्यांना आवडले आणि मागच्या शनीवारी त्यांनी त्यासाठीची टोकन रक्कम घरमालकाला दिली.२०% स्वतःचे पैसे आणि ८०% कर्ज असे नेहमीचे गणित होतेच.त्या २०% साठी त्यांच्या पालकांकडून आणि सासुरवाडीकडून काही पैसे उसने घ्यायचा त्यांचा इरादा होता. काही कारणांनी पालकांना आणि सासुरवाडीकडील मंडळींना ते घर पसंत पडले नाही.म्हातारे झाल्यानंतर पालक त्यांच्याकडेच येणार म्हटल्यावर ज्या काही गोष्टी असणे पालकांना अपेक्षित होते त्या त्यात नव्हत्या/करून घेता येणार्यातल्या नव्हत्या.त्यामुळे आयत्या वेळी दोघांनीही--पालकांनी आणि सासुरवाडीकडच्यांनी हात वर केले.त्यामुळे मुळातले २०% उभे करता येणे कठिण होते हे लक्षात येताच त्यांनी घरमालकांना आपली अडचण सांगितली आणि अन्य कोणी घर घेण्यात इंटरेस्टेड असेल तर त्यांना घर जरूर विका असे त्यांना सांगितले. घरमालकांनी घराची किंमत जास्त दाखवून त्याच्या ८०% कर्ज मिळेल असे सांगितले पण त्या केसमध्ये महिन्याचा हप्ता बराच जास्त झाला असता आणि तो परवडण्याच्या पलीकडे गेला असता असे म्हणून तसे करण्यास नकार दिला.
या घरमालकांनी स्वतःसाठी दुसरे घर बुक केले आहे. घरमालक कंपनी क्वार्टर्समध्ये राहतात आणि पुढच्या वर्षी ते निवृत्त होणार आहेत. स्वतःच्या घरासाठी त्यांनी पहिली २०% रक्कम भरली आहे आणि या घराच्या विक्रीतून ते पैसे आपल्या घरासाठी देणार आहेत.गेल्या २-३ महिन्यापासून घरमालक हे घर विकायच्या मागे होते पण ते विकणे शक्य झाले नाही. तसेच घरमालक पुढच्या वर्षी निवृत्त होणार असल्यामुळे कर्ज उचलणे अर्थातच शक्य नाही.गेल्या २-३ महिन्यापासून उरलेले ८०% पैसे न मिळाल्यामुळे या घरमालकाला त्यांच्या काऊंटरपार्टीला दर महिन्याला १.५% व्याज भरावे लागत आहे (गेल्या आठवड्यापासून). त्यामुळे या घरमालकाला घर लवकरात लवकर विकायचे आहे.तसेच अचानक घर विकायला लागले तर कोणी भाडेकरू तिथे राहायला तयार होणार नाही हे लक्षात घेऊन या घरमालकांनी एका कंपनीबरोबर करार केला.त्या कंपनीत काम करणारे कामगार तिथे राहत आहेत--जे कधीही महिन्याभराच्या नोटिसवर सोडून जाऊ शकतील.
माझ्या परिचितांनी मागच्या शनीवारी टोकन रक्कम घरमालकाला दिली (१ मार्च).हो-नाही करत शेवटी कालच्या शुक्रवारी (७ मार्चला) पालकांनी आणि सासुरवाडीकडच्यांनी पैसे उसने द्यायला नकार दिला.आपल्याला घर घेता येणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी लगेच घरमालकाला ते कळविले.मधल्या ५-६ दिवसात या घरमालकांनी घर बघायला येऊ इच्छिणार्या इतर २-३ जणांना घर विकले गेले असे कळवले आणि परवा (६ मार्चला) त्या घरी राहत असणार्या कामगारांना महिन्याभरात घर खाली करायला सांगितले.
आता हा घरमालक दोन्ही बाजूंनी कात्रीत सापडला आहे.तसे बघितले तर माझ्या परिचितांमुळे ५-६ दिवस फुकट गेले हे नक्कीच मान्य आहे.पण आता यावरून हा घरमालक "मेन्टल हॅरॅसमेन्ट" साठी माझ्या परिचितांना लीगल नोटिस धाडणार अशी धमकी देत आहे आणि टोकन मनीच्या दुप्पट पैसे आणखी मागत आहे.
माझ्या मते या केसमध्ये फार तर घरमालक टोकन मनी परत करायला नकार देऊ शकेल.त्याच्या दुसर्या व्यवहारात उशीर होत आहे म्हणून माझ्या परिचितांवर (पहिल्या व्यवहारासाठी) लीगल नोटिस बजावण्यासाठी काहीच locus standi घरमालकाकडे नाही.तसेच जे काही पैसे माझ्या परिचितांनी दिले आहेत ते गुड फेथ मध्ये दिले आहेत--म्हणजे चेक वटला आहे त्याव्यतिरिक्त पैसे दिल्याचा इतर काही पुरावा त्यांच्याकडे नाही.तसेच एकदा व्यवहार सुरू झाल्यानंतर परत फिरल्यास नुकसान भरपाई म्हणून पैसे भरू अशा स्वरूपाच्या कोणत्याही कागदावर त्यांनी सही केलेली नाही.तेव्हा माझ्या मते या लीगल नोटिसला काहीच अर्थ नाही. जर काही कारणाने ८०% कर्ज द्यायला बँकेने नकार दिला असता (उत्पन्न पुरेसे नाही किंवा अन्य कारणाने) तरी या परिचितांना ते घर घेता येणे शक्य नव्हतेच.तेव्हा टोकन मनी दिला म्हणून घर विकत घेतलेच पाहिजे अशा स्वरूपाची सक्ती घरमालक नक्कीच करू शकणार नाही. फार तर दिलेल्या टोकन मनीवर माझ्या परिचितांना पाणी सोडावे लागेल असे मला वाटते.
माझे म्हणणे बरोबर आहे का? की त्याव्यतिरिक्त घरमालक काही करू शकेल का? मिपाकर यावर काही सांगू शकतील का?
वाचने
13023
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
घरमालक टोकन मनी परत करायला नकार देऊ शकेलहोय. सकृतदर्शनी हेच शक्य आहे. परंतु जर विसारपावती (घराचा व्यवहार ठरवल्यावर हे अवश्य करावे. यावर नमुद केलेल्या रकमेलाच व्यवहार करणे बंधनकारक असतेच असे नाही पण व्यवहार कायदेशीर ठरतो. चेक असेल तर टोकन-चेकची झेरॉक्ससुधा घ्यावी) नोंदणीकृत केली असेल तर अर्थातच त्यावर ज्या अटी लिखीत स्वरुपात असतील त्या खेरीदार व विक्री करणार्याने पाळणे आवश्यक आहे. विसार पावती नसेल (जे आता सकृत दर्शनी वाटत आहे) तर तो जास्ती जास्त टोकन परत देणार नाही. यापलिकडे अन्य काहीही शक्य नाही. या परिस्थीतीत कोर्टात गेल्यास त्यालाच त्रास होइल असे वाटते. विक्रीकरणार्याच्या परिस्थीतीबद्दल तिव्र सहानुभुती आहे. त्याला अतिशय मोठा भुरदंड बसतोय, त्याने शक्यतो चर्चेतुन मार्ग काढावा ज्याला त्याने टोकन दिली आहे :( सुचना :- सदरील सल्ला कॉमनसेन्स वापरुन दिला आहे. मी वकील नाही. या बाबतीत दोन चारशे रुपयेच खर्च करुन शक्यतो वकीलाचा सल्ला घ्यावा ही प्रेमाची सक्ती.
In reply to घरमालक टोकन मनी परत करायला by आत्मशून्य
प्रथम बँकेकडुन कर्ज मंजुरी करुन घ्यावी, वीवीध बँकेच्या नियमांनुसार तुमची पत बघुन बँक जास्ती जास्त किती कर्ज मंजुर करायचे (की नाहीच हे) ठरवते व नंतर व्यवहार ठरवावा. त्यामुळे काही गोष्टी बर्याच सोप्या होतिल.
In reply to घरमालक टोकन मनी परत करायला by आत्मशून्य
बर्याच अंशी सहमत. महिना १.५% हा व्याजाचा दर कै च्या कै वाटतोय. त्यातून सूट मिळवायचे त्या घरमालकाने बघावे. टोकन मनी ही पण काही थोडी रक्कम नसावी. काहीही कारणे सांगून ते पैसे हडप करण्याचा डाव तर तो घरमालक खेळत नाही ना? बँका केस टु केस बेसिसवर ८५% पर्यंत कर्ज देतात. तसे वाढीव कर्ज मिळते का ते बघावे. पर्सनल लोन काही काळासाठी घेऊन मार्जिनची रक्कम उभी करता येईल. त्या टोकन मनीच्या रकमेवर पाणी सोडण्यापेक्षा पैसे उभे करण्याचा प्रयत्न करावा आणि बायकोलाही त्याची (वाढीव कर्जाची आणि जास्तीच्या हप्त्याची) जाणीव द्यावी. अर्थात टोकन मनी काही थोड्या हजारांत असेल तर ते पैसे अक्कलखाती गेले असे समजून गप्प बसावे. नाहीतरी या मित्रानेही आपल्या नातेवाईकांवर विसंबून असा व्यवहार करायला नको होता असं वाटतंय. शक्यतः घराचे वगैरे आपले आपणच जमेल तितके पैसे उभे केले पाहिजेत. म्हणजे घर विकत घेताना/विकताना इतर कोणाहीवर अवलंबून रहायची वेळ येणार नाही.
In reply to +१ by पैसा
जर हा संपूर्ण व्यवहार बेन्केच्या कर्जावर अवलंबून होता तर :)
जर MOU केले नसेल, तर टोकन परत मिळवणे कठीण आहे. भांडण्यापेक्षा सामोपचारानी काहितरी मार्ग काढावा.
एखाद्या चांगल्या वकीलाचा सल्ला घ्या. घर विक्रेत्याच्या बॅन्केत जर मोठ्या अमाउन्टची नोंद आली असेल तर त्यांनादेखिल हे पैसे कुठून आले आणि कशासाठी आले हे इन्कम टॅक्सला दाखवावे लागेलच. त्यामुले 'पैसे गेलेच' अस्ं समजायचं कारण नाही. दोनही ( तीनही!) बाजू सारख्याच अडचणीत आहेत.
शिवाय सरसकट प्रत्येक बँक प्रत्येक जागेला ८०% कर्ज देईल असं अजिबात नाही. पण साधारणपणे बॅम्का जागेचं व्हॅल्युएशन करताना ६० ते ७०%च लोन देतात असं बघण्यात आहे. त्यामुले आपली पत ४० लाख कर्जाची आणि बॅन्केनी फक्त २० लाखच मन्जूर केले, असा धक्का अचानक बसू शकतो. त्यामुले जागेचं व्हॅल्युएशन बॅन्केकडून केल्याशिवाय टोकनदेखिल देउ नये. आपल्यालादेखिल घराच्या किमतीशिवाय स्टँप ड्युटी+ रजिस्ट्रेशन्साठी वरची साधारण ६% रक्कम लागतेच. सगळ्या बॅन्का हल्ली तेपण कव्हर करत नाहीत. त्यामुळे स्वतःकडे ४०% रक्कम तयार ठेउन मगच पुढचे व्यवहार करावेत.
तुमच्या मित्राचे फारच चुकले आहे. घरासारख्या व्यवहारात MOU करणे फार गरजेचे होते ते केले नाही. त्यात दोन्ही पार्टीनी
करार काही करणासाठी मोडला तर काय काय करायचे याचा उल्लेख करता आला असता. कारण २०च टक्के रक्कम देणे ही काही सामान्य बाब नाही.आमच्या शेजारी एम ओ यू न करता विकत घेणार्याने फक्त ४० हजार आगाउ रक्क्म म्हणून दिली.
कर्जाच्री खात्री झाल्यावरच आपला पहिला ब्लॉक विकायला काढला.एकूण व्यवहार ३५ लाखाचा असताना फक्त एक टक्का रक्कम विसार म्हणून दिली. असा व्यवहार हवा होता.
सर्वांच्या मदतीबद्दल धन्यवाद. गेल्या २-३ दिवसात अजून परिस्थिती बिघडली आहे. बहुदा मालक टोकन मनी खाणार असे दिसते.
पुण्याचे वटवाघूळ
शिवाय सरसकट प्रत्येक बँक प्रत्येक जागेला ८०% कर्ज देईल असं अजिबात नाही.हल्ली बर्याच दिवसात होम लोनशी संबंध आलेला नाही पण पूर्वी नोकरदार असल्यास टेक अवे पे च्या ४०% वजा करून उरलेल्या ६०% रकमेच्या ५० पट किंवा अग्रीमेंटच्या ८५%, ह्यापैकी जे कमी असेल (whichever is less)ते ग्राह्य धरून लोन देत असे. टोकनची वैधता किती दिवसासाठी आहे? म्हणजे जर तीन महिन्यात तुम्ही व्यवहार पूर्ण न केल्यास टोकन परत किंवा जमा केले जाईल ह्या अर्थाने? जर त्याला वैधता असेल तर तुम्ही दुसरे गिर्हाईक जास्त पैसे देऊन घेण्यास तयार असेल तर लाऊन टाका तिथे आणि नफा कमवा. भांडायची गरजच नाही थोडे गोड बोलून घरमालका कडून पैसे काढणे शक्य नसेल तर ट्रेड करू शकताच की.
आमच्याकड इसार पावती /टोकन मनी ची रक्कम वापस केली जात नाही . भले तुमी कितीपण नडा , बाकी
तुमचा कडे काय नियम असतो ते सांगा .
अॅग्रीमेंट टू अॅग्री इज नॉट एन्फोर्सेबल - असा सामान्य नियम आहे.
हा एक माहितीपूर्ण दुवा
http://www.supremecourtcases.com/index2.php?option=com_content&itemid=65&do_pdf=1&id=22818
जेपी म्हणतात त्याप्रमाणे विसार परत मिळत नाही सहसा.
घरमालक टोकन मनी परत करायला