मराठी माणसाने काय करावे - फतवा!
लेखनप्रकार
नमस्कार वाचकहो,
संकेतस्थळावर वावरता वावरता आमची अनेक मंडळींशी मैत्री झाली, विचार जुळले. मतांचे आदान प्रदान झाले. यांतून मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी एक समिती स्थापन करण्याचे ठरले. या समितीची काही ठोस उद्दिष्टे असावीत ती इतरांपर्यंत पोहोचावीत असा मनोदय ठेवून हे लिखाण होत आहे.
मराठी माणसाला गप्पा-गोष्टी करण्यात जेवढा रस आहे तेवढा रस पेकाट मोडून कामं करण्यात नसावा. नाही हो, म्हणजे असता तर काम-धाम सोडून मंडळी नानाविध विषयांवर जीव तोडून प्रतिसाद न देती. मराठी माणसाने हे करावं, ते करावं, अस्सं करावं, तस्सं करावं, आधी केलेची पाहिजे हे सांगण्यास मराठी माणूस जितका उत्सुक असतो त्याच्या एक-चतुर्थांशही ते करण्यास उत्सुक नसतो असं आपलं आमचं निरिक्षण. आता हे निरिक्षण खोटं आहे सांगायला कितीक धावून येतील बघाच!
या संगणकाने-महाजालाने एक उपकार लोकांवर केला की भलेमोठे लेख आणि प्रतिसाद लिहिताना त्याने त्या माणसाचा चेहरा लपवून ठेवण्याची काळजी घेतली. माणूस जे काही लिहितो, ज्या बाता मारतो त्याची शहानिशा करण्याची सोयच इतरांना ठेवली नाही. आता मराठी माणसांच्या, मराठी भाषेच्या, मराठी अस्मितेच्या संवर्धनासाठी मराठी माणसाने काय करावे हे गुळमुळीत सांगून उपयोग नाही. या ठिकाणी इतर धर्मीय बघा कसे फतवे काढतात. फतवा काढला की लगेच अंमलबजावणी होते, कोणी त्याविरुद्ध कुरबुरही करत नाही. तेव्हा जसे ते करतात तसेच आपण केले - म्हणजे जशास तसे -तरच आपली धमक दिसून येईल या उद्देशाने आम्ही आज एक फतवा काढत आहोत. त्याची कलमे पुढीलप्रमाणे -
१. मराठी माणसाने पुणे, नाशिक, कोल्हापूर - मुंबई कधीच सोडली हो, तिचा उल्लेख करत नाही - सोडून परदेशांत - अमेरिका-इंग्लंड नको हो, तिथे आधीच गेले भरपूर - चीन, जपान, न्यूझिलंड, झालंच तर माली, घाना, काँगो, आईसलँड, नॉर्वे येथे स्थायिक व्हावे. मराठी साहित्य संम्मेलनाला या देशांत पुढील संम्मेलने करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी आणि मराठी संकेतस्थळावरील सदस्यांना 'पुन्हा पुन्हा संम्मेलनं परदेशांत का?' किंवा '२०५० साली तरी मराठी साहित्य संम्मेलन भारतात होईल का?' या विषयावर चर्चा उडवून देण्याची सोय करावी.
२. पुणे, नाशिक, औरंगाबाद वगैरे शहरे आपल्या हातातून कशी सुटत चालली आहेत, OMS म्हणजेच बाहेरच्या राज्यातील माणसे येऊन या शहरांचा विस्कोट करत आहेत याच्या गरमागरम चर्चा आपल्या उबदार खुर्चीत बसून कराव्यात. जमल्यास, मराठी माणसाने रस्त्यावर उतरून काय करावे याबद्दल लफ्फेदार लेख लिहावेत परंतु लेख लिहिण्यापूर्वी आपल्या घराची खिडक्या-दारे घट्ट बंद आहेत हे बघून घ्यावे. परदेशस्थ मराठी भाषकांनी देशात गोंधळ चालला आहे त्यावर जोरजोरात चर्चा झाडाव्यात. त्या चर्चांत आपल्याला किती मते पडली यावर आपली संकेतस्थळावरील पोझिशन किती बलदंड आहे याची खातरजमा करावी. हिंदू धर्म, सांप्रदायिकता वगैरे चर्चांना कोणी विरोध केल्यास हिंदू दहशतवादाची कडु गोळी गोड आवरणात हळूच चारावी. राजने मोदींकडे ट्रेनिंग घ्यावे की उद्धवने मोदींकडे ट्रेनिंग घ्यावे या विषयावर एकमेकांना धोपटून काढावे. मराठी माणूस केवळ हिंदुत्वाला विसरला म्हणूनच त्याचा अपकर्ष झाला यावर वारंवार लेख लिहावेत. मराठी माणसाच्या अपकर्षाला इटलीतली सूनबाई, राष्ट्रवादी-समाजवादी नेते, जमल्यास श्री. अमिताभ बच्चन आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू कसे जबाबदार आहेत हे पटवून द्यावे.
३. परदेशस्थ बायांनी आपण परदेशांत राहूनही सिग्रेट आणि दारूकडे ढुंकूनही पाहिलेले नाही तेव्हा मराठी देशस्थ बायका - हे जातीय विधान नाही हो! - सिग्रेट आणि दारूच्या आहारी गेल्या तर समस्त मराठी समाजावर किती विपरित परिणाम होतील याचा उहापोह करावा. याशिवाय, देशांतील बायांनी तोकडे कपडे वापरावे का यावर चर्चा कराव्या. जमल्यास पांढरपेशा मध्यमवर्गीय घरातून आलेल्या उर्मीलाने मराठी मुलींचे नाव कसे बदनाम केले यावर विचारविनिमय करावा. अदिती गोवित्रीकर, विदिशा पावटे, मधु सप्रे वगैरेंना मराठी भाषेबद्दल जराही प्रेम नाही याबद्दल चर्चा झाडाव्यात. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी इंग्लंड-अमेरिकेत मराठी ही सर्व शाळांत सक्तीची करावी असा हट्ट परदेशी सरकाराकडे धरावा आणि त्याचे वृत्तांत वारंवार संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत. मराठी भाषेचे खरे तारणहार परदेशस्थ मराठीच आहेत हे सकलजनांना पटवून द्यावे. त्यासाठी मदतीला कौतिकराव ढालेंना घ्यावे.
४. नाकावर घसरणारा चष्मा डोळ्यांवर घट्ट बसवून इतर काहीही न करता बाकीच्यांनी काय करावे यावर आपापले बहुमूल्य प्रतिसाद द्यावेत. त्यानिमित्त चर्चांसाठी काही विषय येथे देत आहे -
अ. क्ष ने कविता कराव्यात की विडंबन?
ब. य ने व्यक्तिचित्र काढावे की काढू नये?
क. र ने मराठी असून मराठी बोलावे की बोलू नये?
ड. ल ने क्रमशः लेख लिहावेत की लिहू नये?
वरील चर्चांपैकी एका चर्चेला "ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न" असे म्हणून दुसर्या चर्चेला "हॅ राव! आम्ही म्हणतो तसेच केले पाहिजे" असे आलटून पालटून प्रतिसाद द्यावेत.
५. सर्वात शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा असा की संकेतस्थळांवर न संपणार्या चर्चा झाडल्याने, व्यक्तिगत टिका केल्याने, इतिहास उगाळल्याने, चर्चेगणिक बदलणारी आपली मतं मांडल्यानेच मराठी अस्मिता बळकट होणार अशी प्रतिज्ञा करावी. एखाद्याचे लेख, प्रतिसाद, मत समजून न घेता आपलेच घोडे दामटत रहावे. शक्य असल्यास कंपू बनवून एखाद्याला लक्ष्य करून हाणत राहावे.
हा आहे आमचा पंचकलमी फतवा! हा न पाळणार्याचे मिसळपाव सदस्यत्व, मिसळपावावर दहशतवादी धुमाकूळ घालून खारीज केले जाईल याची निश्चिंती बाळगावी.
आपला,
मराठी माउस (मराठी माणूस उत्कर्ष समिती)
मिपा.
ताजा कलम - मिसळपाव संकेतस्थळ चालक आणि संपादक आणि मराठी माउस यांचा कोणताही संबंध नाही.
वाचने
3972
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
:)
फतवा मस्त आहे !
नवा फतवा
गमतीदार शैली
In reply to गमतीदार शैली by धनंजय
कलमे न पाळणार्याना
In reply to गमतीदार शैली by धनंजय
हो ना
In reply to गमतीदार शैली by धनंजय
क्रमश:
'मिपा'वर आलेला
फतवा
जबरी
In reply to जबरी by गुंडोपंत
गुंडोपंत !