Skip to main content

एक आकांत : गाणार्‍याचे पोर

लेखक अत्रन्गि पाउस यांनी रविवार, 01/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
एका पेक्षा अनेक लग्न, बहुपत्नीत्व ह्याला उघड मान्यता नसली तरी त्यात फार वावगे नं मानणार्‍या पिढीतील पुढच्या पिढीतील एक तरुण...आपल्या अंगातील असामान्य कलागुणाची नुकतीच ओळख होऊ लागलेली...अत्यंत लहान वयात कमालीचे खडतर दिवस काढून, १२ गावचे पाणी पिऊन आलेली अकाली समज... त्यात स्वतःच्याच मामे बहिणीशी लग्न... ३ अपत्य झाल्यावर आयुष्यात आलेली आणखीन एक तरुणी ...तिच्याशी वेगळा संसार ...दुसरीकडे स्वतःच्या विवाहानंतर झालेला आईचा 'बाळंत रोगात' झालेला मृत्यू..वडिलांनी केलेले दुसरे लग्न...आणि त्या लग्नातून पुढे झालेली ९ भावंडे ... एकाच वेळी झपाट्याने बहरणारी कला कारकीर्द, येणारा धो धो नाहीतरी वाढता पैसा, २ समांतर प्रपंच...जुन्या प्रपंचावर नवीन प्रपंचाचा वरचष्मा...पर्यायाने २ प्रपंचातील राहणीमानातला वाढता फरक... तरीही कुटुंबप्रमुखाची दोन्ही प्रपान्चांना आपल्यापरीने सुखी ठेवण्याचा प्रयत्न...संभवत: त्यातील अपुर्या यशाने सुरु झालेली गुंतागुंती.... त्यातच दोन्ही संसारात नवीन अपत्यांचा प्रवेश... आत्मचरित्रकाराच्या व्यक्तिगत आयुष्यातील वडिलांनी फक्त त्याच्यासाठी गायलेला मालकंस तो हि कॉलेज च्या वयातल्या मुलाला जवळ घेऊन हि एक अत्युच्च अविस्मरणीय घटना... पुढे पुढे वयपरत्वे (वडील व मुलगा दोघांचेहि) परस्पर संबंधात येणारी कटुता कमी कमी होणे आणि लोभस ओढ वाढत जाणे ह्या सगळ्यांची एक ओघवती मांडणी... वाचकाला कोणत्याही न्यायाधीशाच्या भूमिकेत नं लोटता मांडलेला एक धुमसता .. आकांत...कमालीचा अस्वस्थ करणारा... सतत काही प्रश्न मनात सतावणारे.. हे सगळं खरं आहे? जर असेल तर कितपत?? हे वाचून आपण काय करणार? जर नसेल तर .... तर...? आणि आता ह्या वेळी सगळी पात्रे कालवश झाल्यावर ...ह्याचे नक्की प्रयोजन?? केवळ दस्तावेज हा दर्जा देऊन मूळ आक्रोशाला कमी लेखणे बरोबर का चूक ... नक्की काय? पण एक अस्वस्थ करणारा वाचनानुभव...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8966
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

रसग्रहण सुंदर आहे. असे दुहेरी आयुष्य काहींनी जगावे आणि कुटुंबातल्या इतरांनी त्याकडे सहानुभूती आणि क्षमाशीलतेने पाहून जगणे शिकत रहावे हा दैवदुर्विलास. पुस्तकही फार नाही,पण आवडले आहे.

खरंच प्रयोजन काय हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. राघवेंद्र यांनी भीमसेन जोशी यांच्या मृत्युपत्राबाबत शंका उपस्थित करणारा दावा शिवाजीनगर कोर्टात लावला आहे. राघवेंद्र यांना प्रत्यक्ष भेटलेले तीन तरी जण मला माहीत आहेत. तिघांनाही जाणवलेली समान गोष्ट म्हणजे त्यांच्या मनात भीमसेन यांच्याबद्दल असलेली अपार कटुता. कोणासमोर आपण बोलत आहोत, ऐकणार्‍याची लायकी काय आहे याचा काडीमात्र विचार न करता ही कटुता सांडत रहाते. दुसरेपणाचं, सावत्र वागणुकीचं भांडवल करून सहानुभूती लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न. अशा वेळी "लोभस ओढ" वगैरेची टिमकी वाजवण्याला दांभिकपणा नाही तर काय म्हणणार?

In reply to by आदूबाळ

अत्यंत एकांगी - बहुधा भीमसेनजींच्या स्वघोषित एकलव्यांकडून आलेले - मत. आमच्यासारखा अण्णांचा कट्टर फ्यान देखिल राघवेंद्रांबद्दल इतकं वाईट मत देणार नाही. केवळ अण्णांच्या आजवर मीडियात न येऊ दिलेल्या आयुष्याबद्दल त्यांनी लिहिले बोलले याचा अर्थ अण्णांचे चारित्र्यहनन केले असे समजत व्यक्त केलेले केवळ पूर्वग्रहदूषित मत इतकेच. प्रयोजन काय? हा प्रश्न अत्यंत असंवेदनशील. बापानेच दूर लोटलेल्या मुलाला 'प्रयोजन काय?' हा प्रश्न विचारणे हे धक्कादायकच आहे माझ्या दृष्टीने. अवांतरः अण्णांबद्दलच्या आमच्या भावना या इथे.

In reply to by रमताराम

दुसरेपणाचे भांडवल???? राघवेंद्र हे भीमसेनजींचे सर्वात ज्येष्ठ चिरंजीव आहेत, त्यांच्या 'पहिल्या' पत्नीचे ज्येष्ठ पुत्र.

In reply to by रमताराम

"आणि आता ह्या वेळी सगळी पात्रे कालवश झाल्यावर ...ह्याचे नक्की प्रयोजन??" असे मूळ वाक्य आहे... "एक आकांत" असे शीर्षकात असतांना 'असंवेदनशीलतेच आरोप' अमान्य

In reply to by रमताराम

अत्रंगी पाऊस म्हणतात त्याप्रमाणे असंवेदनशीलतेचा आरोप अमान्य. शीर्षकातच आकांत करायचा आणि लोकांनी असा जाहीर का रडतोस बाबा - असं विचारणं असंवेदनशील? "दुसरेपणा" म्हणजे भावनिक, नात्यातला दुसरेपणा. दुय्यम वागणूक. "बापानेच दूर लोटलेल्या मुलाला" जे फीलिंग येत असावं ते. बायोलॉजिकल दुसरेपणाविषयी बोलत नव्हतो. राघवेंद्रांना कटुता असणारच. असे भोग कुणाच्याही वाट्याला न येवोत. पण त्याचं जाहीर प्रदर्शन करण्याला विरोध आहे. ओळखदेख नसलेल्या माणसाला हे ऐकवून सहानुभूती मिळवायच्या प्रयत्नांना विरोध आहे. खालच्या प्रतिसादात सुबोध खरेसाहेब हेच म्हणताहेत बहुदा. समजा, एखाद्या माणसाच्या जवळच्या नातेवाईकाने काही लाजिरवाणी गोष्ट केलेली आहे. त्या माणसाची नैसर्गिक प्रतिक्रिया काय असेल? समाजापासून ती गोष्ट लपवून ठेवणे. जर लपून रहाण्यासारखं नसेल तर किमान आपणच त्याचा डांगोरा पिटायला नको, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. या जनरीतीपेक्षा उलटं काही घडलं तर लोकांनी हे "अटेन्शन सीकिंग" आहे म्हणून प्रयोजनावर प्रश्न उभा केला तर काय चूक आहे त्यात?

In reply to by आदूबाळ

आकांत लिहिले आहे ते इथल्या लेखकाने, पुस्तकाच्या शीर्षकात ते नाही. तेव्हा जे लिहिले नाही त्याचा दोष तुम्ही मूळ लेखकाला देऊ शकत नाही. राहिला त्यांच्या वास्तवातल्या वर्तनाचा भाग, तर माझ्या मते हे निव्वळ गृहितक आहे. माझ्या माहितीनुसार नेमके उलट आहे, पण ते असो. इतरांसमोर प्रदर्शन करण्याबाबतचा आक्षेप - समजा खरा असलाच तर, जरी मला मान्य नसला, गृहितकाच्या पातळीवर असला तरी - त्याचा पुस्तकाशी काय संबंध? पुस्तकात तसे कडवट उल्लेख असल्यास दाखवून द्यावेत. जर पुस्तकात तसे नसतील तर त्याबद्दल पुन्हा पुस्तकावर टीका करणे अस्थानी. पुस्तक मी वाचले आहे नि त्यात मला तरी कडवटपणा कुठे दिसला नाही. हां राहता राहिला लपवून ठेवण्याचा आग्रह, तो तर साफ अनाठायी आहे. ज्याच्या आयुष्याने वेडेवाकडे वळण घेतले, त्याचे नुकसाने भोगले, उलट्या बाजूने 'समजा' काही फायदेही मिळावले त्याने ते सांगू नयेत, लपवून ठेवावेत असे म्हणणे हा चक्क अगोचरपणा आहे, अनधिकारने बोलणे आहे. त्यांनी काय लिहावे काय लिहू नये हे सांगणारे आपण कोण? आपल्या आवडीच्या माणसाबद्दल गैरसोयीचे छापलेच जाऊ नये हा आग्रह हुकूमशाहीचा झाला. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मी बोलणार नाही कारण मी बोलेन त्यात पूर्वग्रह असण्याचीच शक्यता अधिक. तसे असताना एखाद्याबद्दल अशी बेधडक विधाने करणे मला रुचणार नाही. तेव्हा मी फक्त पुस्तकाबद्दल नि त्यातल्या लेखनाबद्दल बोलेन. अर्थात ज्याची त्याची मर्यादा वेगळी असते हे ठीकच आहे.

In reply to by रमताराम

दुसरेपणाबाबत केलेल्या 'मल्लिनाथी'ला बेनेफिट ऑफ डाउट देण्यात येत आहे.

In reply to by रमताराम

"अमुकतमुकला विरोध करणारे आपण कोण? भारतात अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे." इथे गाडी आली की पुढचं बोलणंच खुंटलं. आणि ते खरंच आहे. पुस्तक त्यांचं, लिहिलं त्यांनी, छापलं प्रकाशकाने, विकत घेतलं वाचकाने (आपल्या पैशांनी आणि आपखुशीनी) - यावर आक्षेप घेण्याचा अधिकार मला नाहीच. पण "झालं हे चुकीचं झालं, व्हायला नको होतं" असं मला वाटतं, विशेषतः कोर्टकेसच्या पार्श्वभूमीवर. एवढं अभिव्यक्तिस्वातंत्र्य मला द्या ही विनंती.

In reply to by आदूबाळ

असाच अनुभव मला श्री मंगेश पाडगावकरांच्या घरी आला. ओळख देखील नसताना त्यांच्यासमोर त्यांच्या पत्नीने (सौ यशोदा पाडगावकर) त्यांच्याबद्दल इतके वाईट शब्द ऐकविले आणी त्यांचे सत्य स्वरूप पाहण्यासाठी आपले आत्मचरित्र "कुणास्तव कुणीतरी" वाचायची शिफारस केली. असे का होते हे मला अजून कळत नाही. त्यांच्या वर अन्याय झाला असेल पण अशा त्रयस्थ माणसाकडून सहानुभूती मिळवून काय साध्य होते?

भोग असतात. जो भोगतो त्याला जाळतात, बाकिच्यांना त्यात शहाणपणा वा मुर्खपणा शोधता येतो. जो भोगतो त्याला नाही. असो. एकूण भिमसेन जोशींच्या मुलाचे आत्मचरीत्र आहे का?

In reply to by स्पंदना

अगदी बरोबर... म्हणतात ना 'जावे त्याच्या वंशा'... आणि कधी कधी परक्या माणसाकडे मन मोकळ करण्यामागे गुप्ततेचा (गैर) विश्वास असू शकतो. किवा परका माणूस कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता आपलीही व दोन्ही बाजू समजू शकेल असे कुठेतरी वाटत असते. मोठ्मोठ्या कलाकारांबद्दल बोलायच झाल्यास 'मोठ्या वृक्ष्याच्या छायेत लहान झाडे वाढत नाहीत'. त्यांच्या कुटुंबीयांना अनेक मान-अपमान, इर्ष्या, खोटी सहानुभूती वगैरे प्रकाराना सतत तोंड द्याव लागत ना.

पं. भिमसेन जोशींच्या मुलाचे ते आत्मचरित्र आहे. गेल्या आठवड्यातील लोकसत्तात त्यातील एक पान छापून आले होते.

त्यांची मुलाखत टाईम्समधेही आली होती. असामान्य लोकांचे पाय मातीचेच असतात हे परत एकदा जाणवले.

मोठ्या लोकांची मुलं म्हणून आयुष्य कठीण असावं. पं. रवीशंकर यांचीही किती तरी लग्नं आणि त्यातून झालेली मुलं याबद्दल बरंच काही येत असतं. ज्याचं त्याचं आयुष्य म्हणून सोडून दिलं तरी त्या पहिल्या बायकोवर आणि तिच्या मुलांवर काय परिस्थिती येत असेल याबद्दल विचार करणंही कठीण आहे. तेवढा कडवटपणा ठेवण्याचा तरी त्यांना हक्क असू दे बिचार्‍यांना! मात्र २ लग्ने सर्रास होत असत त्या पिढीतले म्हणून नव्हे तर कर्नाटकात लग्नाचे रजिस्ट्रेशन कम्पल्सरी नाही म्हणून हे प्रकार जास्त होतात. माझ्या ऑफिसात एका कानडी कलीगने एका बायकोची मुलं जन्मतः मरतात या कारणासाठी दुसरं लग्न केलं होतं आणि तो त्या दोन्ही बायका आणि दुसर्‍या बायकोच्या मुलांबरोबर एका फ्लॅटमधे रहात होता हे प्रत्यक्ष पाहिलं आहे. पं भीमसेन जोशी आणि राघवेन्द्र जोशी यांच्याबद्दलची या संदर्भातली ही बातमी मिळाली. http://www.indianexpress.com/news/bhimsen-joshi-s-family-strikes-a-disc…

In reply to by पैसा

व्यंकटेश माडगूळकरांच्या लेखातील एक वाक्य आठवते. साहेब, आपण मिठाई खावी कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये.

In reply to by सुबोध खरे

म्हणून देखील ऋषीचे कुळ विचारू नये! यात भीमसेनजींचा कुठे बचाव करण्याचा हेतू नाही, पण त्या काळात अशी अनेक प्रकरणे होत असत. अजून देखील काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत ज्यांची (किमान) दोन लग्ने (आधीचे न मोडता) झाली आहेत. जर ते अजून एक पिढी आधीचे असते तर काहीच वाटले नसते कारण समाजमान्यता होती. "अंगवस्त्र" देखील म्हणण्यात गैर वाटत नसे... पण केवळ ते बदलत्या काळातले असल्याने त्यावर त्यांच्या हयातीत लपवून आणि त्यांच्या पश्चात छापून चर्चा होत आहे, इतकेच. किंचीत अवांतरः सध्या लिव-इन-रिलेशनशीप अर्थात लग्न न करता देखील एकत्रीत रहाणे यात भारतीय (विशेष करून शहरी) समाजात देखील मान्यता आलेली आहे. त्याची अपरीहार्यता सुप्रिम कोर्टाच्या एका निकालात देखील दिसून आलेली आहे. ते बरोबर का चूक, नैतिक का अनैतिक वगैरे मुद्दा नाही... पण यातून देखील अशीच आकांत असलेली पोरे जन्माला येणार नाहीत ना, असे राहून राहून वाटते. असो.

In reply to by साती

लोकांना एक कुटूंब सांभाळताना गाणं बिणं विसरायला होतं.
एकदम समर्पक. विनोद१८

In reply to by पैसा

त्यांच नाव अन्नपूर्णादेवी आहे. रवीशंकराचे गुरु बाबा अल्लौद्दीन खान याची मुलगी आणि विख्यात सरोदवादक पै. अली अकबर खान यांची बहीण. हरी प्रसाद चौरसियांच्या त्या गुरु. खूप गूढ (आणि थोडं विक्षिप्त) व्यक्तिमत्व. स्वतः पद्मभूषण. त्यांचा आणि रविशंकरांचा एक मुलगा होता. अकाली गेला. अधिक माहिती: http://en.wikipedia.org/wiki/Annapurna_Devi

In reply to by अनुप ढेरे

नेमके नसेल पण या दोघांच्या जीवनावर नि त्या मुलाच्या फरफटीवर मोनिका गजेंद्रगडकरांची एक सुरेख कथा आहे 'देणं' नावाची (बहुधा 'भूप' मधे). कथा सर्वस्वी त्यांचे आयुष्या मांडत नसेल पण कथासूत्र नक्कीच यांच्या आयुष्याशी नातं सांगते.

In reply to by रमताराम

वाचली पुन्हा...आपण म्हणत आहात तो संदर्भ माहीत नव्हता.. प्रामाणिक पाने सांगायचं तर काही लिंक लागली नही..

माझी माहिती अशी आहे की प्रथम पत्नीची हरकत नसेल तर आजही दुसरा विवाह हिडू माणसाला करता येतो. मी ज्या कंपनीत कामाला होतो त्या कंपनीत एका वॉचमनच्या दोन बायका होत्या व आमच्या बरोबर काही वेळेस त्या कंपनी बसमधे असत. त्यांची एकमेकींशी अगदी सख्या बहिणीसारखी मैत्री होती. माझी माहिती बरोबर असेल तर दोन पत्नी असलेल्या कलावंताबद्द्ल कटूपणाने व्यक्त होण्याची काहीच कारण नाही. पुलं देशपांडे यांच्या बद्द्ल मला व्यक्तिगत पातळीवर न आवडणारा अनुभव आला तरी त्यांच्या बद्द्लचा अपार आदर आजही माझ्या मनांत आहे. कलावंत बर्‍याच वेळा खुज्या मनाचे असू शकतात.आपल्याला काय त्याचे आपण कलेचे भोक्ते असावे. ओ पी नय्यर यांच्या बद्द्ल अचाट आदर व अचाट तिरस्कार असलेली माणसे मी पाहिली आहेत. मी मात्र त्यांची मेलडी हिचा भोक्ता आहे म्हणतात ना An artist is mortal not the art !

In reply to by चौकटराजा

"माझी माहिती अशी आहे की प्रथम पत्नीची हरकत नसेल तर आजही दुसरा विवाह हिडू माणसाला करता येतो. " करायला काय, तिसराही करता येतो काका, पण ते बेकायदेशीर आहे. :)

In reply to by शैलेन्द्र

ह्यावर पळवाट म्हणून आदरणिय धर्मेंद्र्(खूप मोठ्ठा माणूस!)ह्यांनी काही कालावधीसाठी एका अल्पसंख्यांक समाजाचा धर्म स्वीकारला होता.त्यावेळी(१९८०च्या सुमारास) काही महिला संघटनांनी थोडा गोंधळही घातला होता.पण पहिल्या पत्नीला काहीच प्रॉब्लेम नसल्याने महिला संघटना तरी काय करणार?

In reply to by चौकटराजा

पुलं देशपांडे यांच्या बद्द्ल मला व्यक्तिगत पातळीवर न आवडणारा अनुभव आला तरी त्यांच्या बद्द्लचा अपार आदर आजही माझ्या मनांत आहे. पुलंच्या दोन पत्नी? माझ्या माहितीप्रमाणे पुलंनी सुनिताबाईंशी त्यांची प्रथम पत्नी (कर्जतच्या दिवाडकरांची मुलगी) लग्नानंतर थोड्याच कालावधीत निधन पावल्यावरच लग्न केले होते.

तिन महत्त्वाचे निसर्गनियम इथे विसरुन चालणार नाही अ. जिथे गरजा पूर्ण होतात तिथे बॉण्ड, निष्ठा, नाती निर्माण होतात ब. पुरुषांची स्पर्धा स्त्री करता असते, तशी स्त्रियांची स्पर्धा पुरुषाकरता असते. क. निसर्गाला समाजाचे नियम कळत नाहीत.

भोग असतात. जो भोगतो त्याला जाळतात, बाकिच्यांना त्यात शहाणपणा वा मुर्खपणा शोधता येतो. जो भोगतो त्याला नाही.
कुठल्याही नात्याकडे पाहण्याचा आपला साचेबद्ध दृष्टीकोन असतो. आई बाबा म्हटले की ते प्रेमळच असणार, मुलांचं उज्ज्वल भवितव्य हे त्यांचं सर्वोच्च ध्येय असणार हे आपण गृहीत धरतो. नव्हे शंभरातल्या नव्व्याण्णव जणांच्या बाबतीत असतेही. परंतू एखादा दुर्दैवी जीव असा असू शकतो की त्याचे आई बाप याला अपवाद ठरतात. एखादी मुलगी इतपत दुर्दैवी असू शकते की तिची आई तिला कळायला लागल्यापासून एखादीची सवत सुद्धा चांगली वागेल. जन्मदात्री आई सावत्र आईसुद्धा करणार नाही ईतका वाईट छळ करु शकते. त्यामुळे भोवतालचे जग आईच्या प्रेमाचे गोडवे गात असताना एखादी व्यक्ती आपल्याच वाटयाला अशी आई का यावी म्हणून खंतावत असतो. बाहेर कुणाला सांगावे तर सांगणार्‍याला जग मुर्खात काढायला तयार असते. अशावेळी भोगणार्‍याच्या हातात "हे दु:ख कुण्या जन्माचे" म्हणत आपलीच आसवं पिण्याच्या पलीकडे दुसरा पर्याय नसतो.

नोबेलपात्र महान मराठी साहीत्यीक ना.सी.फडके परंतु गांधी सारखच नोबेलपात्र असुनही पुरस्कारापासुन वंचित ठेवले गेलेले यांच्या पहील्या पत्नी च्या मुलीने लिहीलेले तिच्या आईची बाजु मांडणारे ही असेच एक पुस्तक आहे. स्वतः थोर साहीत्यीक ना.सी. आपल्या आत्मचरीत्रात अत्यंत तन्मयतेने आपल्या अफेयर चे रोमॅटीक वर्णन करतात, कशा भेटी जमवल्या, कुठल्या हॉटेल मध्ये रुम बुक केल्या, इ.इ. रंगवत रंगवत पॅरेग्राफ चा शेवट साहीत्यीक वाक्याने कोटेशन ने करण्याचा नियम पाळत एक महान वाक्य लिहीतात. मी जिवनात षौक केला पण त्याला ही शब्दरुप दिल. वा... वा....वा.......क्या बात क्या बात क्या बात अरे नतदृष्टांनो मिठाइ खा मिठाइ काय कारखान्या मागे लागताय ? तर वरील कोट वाचुन शेक्सपिअर लाही आपण काय भिकार टु बी ऑर नॉट टु बी सारखी कोट्स लिहिलीय याचा पशचाताप झाला असावा. आता ना. सी. च्या षौक चा दुसरा परीणाम काय होता ते त्यांच्या पहील्या पत्नीच्या मुलीच्या पुस्तकात दिसत. आणि दुसरे एक अजाण साहीत्यीक जी.ए.कुल़़कर्णी सुनिताबाइंना लिहीलेल्या पत्रात ना.सी.फडकेंच्या आत्मचरीत्रा विषयी बोलतांना आश्चर्य व्यक्त करतात की कसा हा माणुस इतक्या तीन चारशे पानांच्या आत्मचरीत्रात स्वतःच्या पहील्या पत्नीविषयी जिच्या वरोबर आयुष्याची इतकी वर्षे व्यतीत केली जिच्यापासुन मुल ही झालीत तिच्याविषयी कीती ओळी लिहीतो सबंध पुस्तकांत चार पाच ओळीच . त्यातही मि तिला इतके पैसे दिले अशी मदत केली वगैरे इतक्च लिहीतो . जि.ए. कुलकर्णी आश्चर्य व्यकत करतात की जरी संबध आता राहीले नसले तरी ,,,, आता जी.ए. ना पण वरील महत्वाचा सल्ला वर गेल्यावर देतो मिठाइ खा जी.ए.साहेब मिठाइ आला असेल ज्याच्या प्राक्तनात मिठाचा खडा तो बघुन घेइल त्याच त्याच. किंचाळेल नाही तर स्वस्थ बसेल आणि जास्त कींचाळुन कान खराब करु लागला तर त्याला आपण शिकवु की बाबा रे अस सहानुभुती मागत फिरण ही चांगल्या माणसाची लक्षण नाही हो.