Skip to main content

सावधान ! येत्या काही आठवड्यात सूर्य उलथतोय !!

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 17/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
शात्रीय वर्तुळात सध्या चर्चेत असणार विषय म्हणजे येत्या काही आठवड्यात सूर्याच्या उत्तर आणि दक्षिण धृवांची अदलाबदल होणार आहे ! सूर्य म्हणजे अतिगरम उकळणाऱ्या वायूचा (पृष्ठभागवर ५,५०५ अंश आणि मध्यभागी १.५ कोटी अंश सेल्सिअस) गोळा आहे हे आपल्याला माहीत आहेच...  इतक्या गरम वायूंच्या कणांच्या अवस्थेत त्यांचे भारीत कणांमध्ये (plasma) रूपांतर होते आणि सूर्याचे चुंबकीय क्षेत्र तयार होते...  एवढ्या गरम स्थितितल्या वायुची वादळे आणि त्यामुळे होणारी चुंबकीय वादळे ह्या सुर्यावर होणाऱ्या रोजच्याच घटना असतात...  त्यातल्या मोठ्या वादळाचे पडसाद सूर्यमालेच्या पलीकडे पोहोचणाऱ्या भारीत कणांच्या आणि चुंबकीय परिणामांच्या रुपात सतत पडत असतात. पृथ्वीच्या धृवांच्या जवळ दिसणारे ऑरोरा बोरियालिस नावाचे प्रकाशाचे चमत्कार जसे यामुळे दिसतात तसेच त्यांच्यामुळे उपग्रहांवर आणि पृथ्वीच्या वातावरणावर दुष्परिणामही होतात. सुर्याच्या चुंबकीय वादळांचा साठत जाणारा परिणाम म्हणजे सूर्याचे चुंबकीय धृव सरकतात. येत्या काही आठवड्यात त्यांची अशी अवस्था होणार आहे की ते एकमेकाच्या जागेची अदलाबदल (flipping of magnetic poles) करणार आहेत. या उलथापालथीकडे जगभरचे शात्रज्ञ बारीक लक्ष ठेवून आहेत. मात्र यामुळे जगबूडी होणार नाही हे नक्की. म्हणजे आपल्याला घाबरून जायचे कारण नाही. किंबहुना ही सूर्याच्या आयुष्यात दर अकरा वर्षांनी येणारी गोष्ट आहे. आणखी एक गंमत म्हणजे ही अदलाबदल एकदम होईल असेही नसते... म्हणजे सूर्याचे उत्तर आणि दक्षिण धृव सतत एकमेकाच्या एकदम विरुद्धच असतात असे नाही. सुर्याचा उत्तर धृव त्याच्या नवीन जागी गेल्या वर्षीच (२०१२) पोचला आहे आणि आता दक्षिण धृव त्याच्या नवीन जागेवर पोचणार आहे ! थोडक्यात म्हणजे सूर्याच्या उकळणाऱ्या वायूंत सतत प्रचंड सावळा गोंधळ चाललेला असतो आणि शात्रज्ञांना सतत गोंधळात टाकून संशोधनात गुंतवून ठेवत असतो. पण तुम्ही आम्ही घाबरायचे कारण नाही... आपल्याकरिता बोलायचे झाले तर सूर्य लय म्होट्टा हाय... कुंभकर्णापेक्षाबी... आनं दर अकरा वरसांनी येका बाजूवर झोपाचा कट्टाळा आला की कूस बदलतो... यवढंच. बस. हाकानाका ! (सर्व चित्रे जालावरून साभार)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11705
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

आसं बी आस्तंय व्हंय... बादवे, पृथ्वीला पण चुंबकीय धृव असतात ना? ते पण असा खो खो खेळतात का?

होय पृथ्वीचे धृवही खो खो खेळतात ना. पण ते सूर्यापेक्षा खूप आळशी आहेत त्यांची जागा बदलायची सरासरी ४५०,००० वर्षे आहे. पण तेच बरे आहे कारण त्यांच्या अदलाबदलीचा आपल्या रोजच्या वापरातल्या चुंबकीय साधनांवर फार परिणाम होऊन उलथापालथ होऊ शकते. गेल्या ५० लाख वर्षांत पृथ्वीच्या धृवांत झालेली अदलाबदल खालच्या चित्रात दिसेल... त्यांतला काळा भाग धृवांची सद्याची अवस्था दाखवतो तर पांढरा त्याविरुद्धची...  (चित्र जालावरून साभार)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आयला! हे चुंबकीय साधनांचे घोळ होऊ शकतील हे लक्षातच आलं नव्हतं! (जीवनभाऊंना सांगायला पाहिजे - त्यांच्या कथेसाठी मस्त जर्म आहे हा!) या निमित्ताने माझं एक बेशिक कन्फुजन दूर करता का? अ. होकायंत्र किंवा कुठलंही दिशादर्शक साधन चुंबकीय असतं. म्हणजे अपोझिट पोल्स अट्रॅक्ट. ब. होकायंत्राचा उत्तर दिशा दाखवणारा काटा उत्तरेकडे जातो (ऑबवियसली) जर अ आणि ब दोन्ही खरं असेल तर मग उत्तर दिशेला दक्षिण ध्रुव पाहिजे. (दहावीनंतर शास्त्र विषयाशी संपर्क तुटला आहे, आणि आधीही विशेष गती होती अशातला भाग नाही. त्यामुळे प्रश्न अगदीच बावळट असला तर माफी करा!)

In reply to by आदूबाळ

होकायंत्रातले पट्टीच्या टोकाचे नाव दिशादर्शक असते... ज्या दिशेला ते टोक असते तिचे नाव. मात्र पृथ्वीच्या धृवांची अदलाबदल झाली की होकायंत्रातल्या पट्ट्यांवरच्या नावांचीही अदलाबदल करावी लागेल ! खरं तर उत्तर आणि दक्षिण ही नावे पृथ्वीवरील जागांच्या संदर्भात म्हणजे सापेक्ष (relative) आहेत. अवकाशात उत्तर, दक्षिण, पूर्व पश्चिम यांना तसा काय अर्थ आहे?

चुम्बकाचा किंवा होकायंत्राचा काटा उत्तर दक्षिण स्थिर होतो तेव्हा तो दाखविणारी दिशा सापेक्ष असते इतर दिशांच्या स्थानाप्रमाणे. त्याच वेळेला उत्तर दाखविणारा काटा हा खरंतर होकायंत्राचा दक्षिण काटा असतो पण कोणताही गोंधळ नको म्हणून आपण त्याला उत्तर दिशा दाखविणारा काटा म्हणतो. तेच दक्षिण काट्याबद्दल.

दर अकरा वर्षांनी होणा-या या बदलामुळे तापमानात बदल होतात - असं काही निरीक्षण आहे का? बाकी सूर्याला पण कंटाळा येतो - अशा (लोक)कथा आजवर कशा निर्माण झाल्या नाहीत याचं आश्चर्य वाटतंय! :-)

In reply to by आतिवास

हवामानावर किती परिणाम होणार हे त्या काळातली सूर्यावरची वादळे किती जोरदार असणार यावर अवलंबून आहे. पण बहुतेक सगळी स्थित्यंतरे कोणत्याही उलथापालथीविना झालेली आहेत... नाहीतर दर अकरा वर्षांनी आप्पत्ती कोसळल्या असत्या ! हा एका सूर्यवादळाचा परिणाम...  सद्याचे स्थित्यंतर गेल्या १०० वर्षांतले सर्वात "थंड" आहे... म्हणजे शास्त्रज्ञ सोडून इतरांना त्याच्या परिणामांची फारशी कल्पनाही येणार नाही असे दिसते. पृथ्वीभोवती फिरणारे उपग्रह आणि दूरवर अंतराळात सोडलेली शोधयाने (उदा, Voyager) यांच्यावर होणार्‍या भारित कणाच्या मार्‍याने त्यांच्या यंत्रणा बिघडू शकतात, हाच सर्वात मोठा धोका... कारण हे सौर्यवारे सूर्यमाला ओलांडून पुढे जाण्याइतके ताकदवान असतात..

In reply to by प्रचेतस

खरं तर उत्तर-दक्षिण ही नावे आपण पृथ्वीच्या संदर्भात समजायला सोपे जावे म्हणून दिलेली आहेत. शास्त्रिय भाषेत ती धन आणि ऋण भारित चुंबकीय टोके असतात. सुर्य स्वतःभोवती फिरणारा वायुचा प्रचंड गोळा आहे आणि त्याच्यात सतत चाललेल्या आण्विक संयुग-प्रक्रियेमुळे (न्युक्लियर फ्युजन) तयार होणार्‍या महाप्रचंड उर्जेचा आणि भारित कणांचा परिणाम म्हणून त्याच्यावर सतत वायूची आणि चुंबकीय वादळे सुरू असतात आणि त्या सगळ्यांच्या परिणामामुळे चुंबकिय धन आणि ऋण टोके जागा बदलत असतात. साधारण दर अकरा वर्षांनी त्यांची जागा बरोबर (सूर्याच्या) उलट्या बाजूस जाते. सूर्य वायुने (खरंतर प्लाझ्माने) बनलेला असल्याने (घन नसल्याने) त्याची चुंबकिय धन आणि ऋण टोके सतत अगदी विरुद्ध दिशेला असतीलच असे नाही... जी अवस्था आताच्या घडीला आहे. काही आठवड्यांनी ती टोके एकमेकाच्या बरोबर विरुद्ध दिशेला पोचलेली असतील. सूर्यमहाराजांच्या बाबतितले विज्ञान प्रचंड गुंतागुंतीचे आहे. तरिसुद्धा अजूनही विज्ञानाला "आपल्याला त्यातल्या बर्‍याच गोष्टी समजलेल्या नाहीत इतकेच समजले आहे" ;) माझे याबाबतितले ज्ञान कुतुहल म्हणता येईल इतपतच आहे. त्यामुळे हा लेख केवळ आपला मुख्य जिवनाधार असणार्‍या सूर्याच्या चमत्कारीक (आणि नीट माहिती नसली तर धक्कादायक) वाटणार्‍या गोष्टिची दखल घेण्यापुरताच लिहिला आहे. जाणकार अजून भर घालतिलच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सौरडागांची तीव्रता दर 11 वर्षांनी वाढते असे माहीत होते. चुंबकीय वादळांमुळे काही भागांचे तापमा न कमी होऊन तिथे दाग दिसणे. सौरडागांची तीव्रता वाढणे आणि ध्रुवांची अदलाबदल ह्या एकाच सुमारास घडणार्या घटना आहेत काय?

In reply to by प्रचेतस

चुंबकीय वादळाने बाहेर फेकल्या गेलेला सूर्याचा भाग (ज्याच्यापासून सौर्यवारे सुरू होतात) सूर्यापासून दूर गेल्याने सुर्याच्या मानाने थंड होतो... हेच ते सुर्याच्या उष्ण पार्श्वभूमीवर थंड (काळे) दिसणारे सौर्य डाग. त्यामुळे हे डाग सतत दिसत आणि नाहिसे होत असतात. चुंबकीय धृवांची अदलाबदल होण्याच्या सुमाराला सौर्य वादळांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढते अर्थातच जास्त डाग दिसतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वरच्या माझ्या प्रतिपतिसादातल्या चित्रात बाजूने दिसणारा सौरवार्‍याचा झोत जर त्याच्या बरोबर समोरून पाहिला तर मूळ लेखातल्या शेवटच्या चित्रात दिसणार्‍या काळ्या डागांसारखा दिसेल.

In reply to by सस्नेह

आत्ता दिसले फोटो ! मघाशी दिसत नव्हते ! ही काय भानगड ?

मंजे आता थॉर पृथ्वीवर येणार म्हणाकी ;)

In reply to by थॉर माणूस

>>आत्ता तरी मला यायची काही गरज नाही. कुणी बोलवलं पण नाहीये. उगा आपलं घेणं ना देणं फुक्कटचं कंदील लावणं !! ;)

सुहासदवन, aparna akshay आणि अग्निकोल्हा: धन्यवाद ! @ अग्निकोल्हा: नाय बॉ ! नायतर त्याला दर अकरा वर्षांनी यायला लागले असते नायका ? :) अवांतरः दर वर्षी येणारा बलिराजा कोणाला दिसला का?

माहितीपुर्ण . अतिअवांर - सुर्याची बायको त्याला एक आठवड्यानी काय विचारेल ? ' कुठ उलथला व्हता र मुडद्या ' =))

१. चूंबकत्व लोखंड इ पदर्थांत असते. त्यांचे प्रमाण सूर्यावर किती आहे? २. ८०० डीग्रीनंतर चूंबकत्व नष्ट होते. मग सूर्यावर (अगदी पृथ्वीवरही) चूंबकत्व कसे? ३. परिवलनाचा अक्ष आणि चूंबकीय क्षेत्राचा अक्ष जवळजवळ का असावेत? ४. पोल बदलतात म्हणजे मास डिसप्लेसमेंट होते का? कि केवळ अणूंची अलाईनमेंट बदलते? ५. सोलर विंड मुळे जर व्हॉयेजरला त्रास होत असेल तर पृथ्वीवर प्रचंड थैमान होऊ शकते. नाही का?

In reply to by arunjoshi123

१. व २. लोखंडात आलेले चुंबकत्व हे त्याच्या कणांची एका दिशेने झालेल्या रचनेने असते, ती रचना उष्ण्तेने विस्कळित झाली की निघून जाते. सूर्यावरचे चुंबकत्व अतीतप्तावस्थेत (काही हजार ते काही कोटी अंश सेल्सियस) असलेल्या विद्युतभारीत (प्लाझ्मा) कणांमुळे असते. ३. सूर्य घन नसून वायूचा गोळा असल्याने हे होऊ शकते. सविस्तर स्पष्टीकरण वर वल्ली यांना दिलेल्या एका उत्तरात आहे. ४. चुंबकीय धृव म्हणजे धन आणि ऋण उर्जेची टोके असतात. सूर्य म्हणजे प्लाझ्माचा गोळा असल्याने घन असे तेथे काहीच नाही. सूर्याच्या तापमानात अख्खा स्थीर (स्टेबल) अणू अशी अवस्था शक्य नाही. ५. सौरवारे ही रोजचीच गोष्ट आहे. पृथ्वीचे वातावरण भेदून पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचेपर्यंत या वार्‍यांची क्षमता निरुपयोगी म्हणावी इतकी कमी झालेली असते. तरिसुद्धा अतीनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणे वगैरेंचे कातडीचा कर्करोग कारक परिणाम सर्वांना परिचीत आहेतच. अवकाशात कोणत्याही वातावरणाचे संरक्षण न लाभलेल्या ग्रह आणि उपग्रहांवर सौरवार्‍यांचा परिणाम खूपच जास्त होतो. उपगहांची जुळवणी हा धोका लक्षात घेऊन केलेली असते... तरीसुद्धा प्रभावी सौरवार्‍याने त्यांची यंत्रणा काही काळाकरिता अथवा कायमची बंद झाल्याची उदाहरणे आहेत.

In reply to by arunjoshi123

२. ८०० डीग्रीनंतर चूंबकत्व नष्ट होते
असे अनेक मिश्र धातू आहेत ज्यांचे क्युरी तापमान हे हजार डिग्री च्या वर आहे जसे कोबाल्ट (शुद्ध मूलद्रव्य ) ह्याचे क्युरी तापमान हे अंदाजे १२०० डिग्री आहे . परिवलनाचा अक्ष आणि चूंबकीय क्षेत्राचा अक्ष जवळजवळ का असावेत? साधा उजव्या हाताचा नियम आहे . अर्थात ह्या प्लास्मा रुपी चुंबकीय वादळात चुंबकीय क्षेत्रा ची दिशा त्या प्लास्मात असणाऱ्या व फिरणाऱ्या प्रभारांच्या दिशेवर असणार आहे . पोल बदलतात म्हणजे मास डिसप्लेसमेंट होते का? सूर्य म्हणजे प्लाझ्माचा गोळा असल्याने घन असे तेथे काहीच नाही. प्लाझ्मा हि पदार्थाची चौथी अवस्था आहे व प्रत्येक पदार्थाला(घन , द्रव वायू , प्लास्मा ) मास असतेच असते सोलर विंड मुळे जर व्हॉयेजरला त्रास होत असेल तर पृथ्वीवर प्रचंड थैमान होऊ शकते. नाही का? नक्कीच पण त्या साठी सूर्या वरील फिरणारे चुंबकीय वादळे हि कायम स्वरूपी अस्थिर व्यायला हवीत . असे जर झाले तर सूर्य हा एक महा प्रचंड फिरणारे अस्थिर चुंबक व विद्युत चुंबकीय तरंग प्रसारित करणारा अन्टेना बनेल व त्यामुळे पृथ्वीवर कोणतेही रेडीओ व सिलिकॉन वर आधारीत उपकरण निट कार्य करू शकणार नाही . अवांतर : स्पायडर मन -२ पहिला असेलच त्यात जसा त्या डॉक्टर चा फ्युजन कंट्रोल करण्याचा प्रयोग फसतो आणि पुढे अनर्थ घडतो तसे होईल :)

सूर्य लय म्होट्टा हाय... कुंभकर्णापेक्षाबी... आनं दर अकरा वरसांनी येका बाजूवर झोपाचा कट्टाळा आला की कूस बदलतो... >>>>. ळय भारी ...:) सध्या फिरत असलेला " आयसॉन धुमकेतु " कुणी पाहिल आहे का? मोबाईल वर अ‍ॅप डाउन लोड केले कि नाकि त्या वेळचे त्याचे स्थान कळते .....

सूर्य लय म्होट्टा हाय... कुंभकर्णापेक्षाबी... आनं दर अकरा वरसांनी येका बाजूवर झोपाचा कट्टाळा आला की कूस बदलतो... >> मला ह्याला लय भारीम्हणायचे होते..वरिल पोस्ट कशी सुधरवायची ??unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: कळत नाहिये ...असो...भा पो..

In reply to by सुहास्य

सूर्याच्या उलथण्याची प्रक्रिया सुरू झाली असेल त्यामुळे असे होत असावे बहुतेक. (कृहघ्या) बाकी मस्त महितीपूर्ण लेख.

तेजस्विनावधितमस्तु फोटो बघूनच टेन्शन आलं. काय की असली थोडीदेखील उलथापालथ आपल्याला (ऑल इन्क्लुझिव्ह) कायमचं पालथं करु शकते नाही का?

In reply to by प्यारे१

काय की असली थोडीदेखील उलथापालथ आपल्याला (ऑल इन्क्लुझिव्ह) कायमचं पालथं करु शकते नाही का? येत्या काही कोटी वर्षांत तरी सूर्यात त्या ताकदीची उलथापालथ होण्याचे काही प्रयोजन दिसत नाही... तेव्हा काळजीचे कारण नाही. :)

चेतनकुलकर्णी_85, सुहास्य आणि त्रिवेनि: धन्यवाद !

In reply to by मारकुटे

सामान्य लोकांच्या जीवनात बहुतेक कशानेच काही फरक पडत नाही-खाणेपिणे अन वीज व पेट्रोल सोडून.

लेख, त्यातले फोटो आणि प्रतिसादातील माहिती झक्कास! त्यातून आपल्याला काही धोका नाही हे कळलं आणि गारेगार वाटलं! ;)

In reply to by पैसा

लेख आणि प्रतिसादातील माहिती, चर्चा एकदम आवडली..!

अर्थात, एक्कारावांच्या लेखाला माहितीपूर्ण म्हणणे म्हणजे दुरुक्तीच. हि प्लाझ्मा स्टेट लॅबमधे तयार करण्याबाबत फारसं काहि वाचनात आलं नाहि. एका वेगळ्याच पदार्थरूपाचे घन-द्रव-वायु रूपाचे प्राबल्य असलेल्या पृथ्वीवर फारसं काहि अप्लिकेशन नसावं... कि आहे ??

In reply to by अर्धवटराव

आहे तर, प्लाझ्मा तुम्ही घरातच रोज वापरताय... ट्युब लाईट आणि ल्युमिनेसंट बल्बज मध्ये ! याशिवाय अनेक कारखान्यांत त्याचा पृष्ठभागांवर खास थर चढवायला (plasma spray coating), मायक्रोइलेक्ट्रॉनिक सर्कीट बनवताना (etching), धातू कापण्यासाठी किवा जोडण्यासाठी, आणि supersonic combustion engines, इ मध्ये उपयोग होतो.