Skip to main content

बदला

रविवार, 10/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
दूरवर मोकळे आकाश आणि त्या पलीकडे काहीच न दिसणार्‍या एका ओसाड माळरानावर अगदी मध्यभागी धापा टाकत मी एकटाच उभा होतो. पायातना कळा निघत होत्या, जणू काही नुकतेच एखादी मॅरेथोन मी जीव तोडून संपवली होती. पण अजूनही उराची धडधड काही थांबली नव्हती, जणू अजूनही ती जीवघेणी शर्यत बाकी होती. आणि हो, खरेच. पुन्हा क्षितिजावर धुळाचे लोट उठताना दिसू लागले. काहीच सुस्पष्ट दिसत नव्हते, एक किनार ती काय, पण मी समजून चुकलो की पुन्हा ती जनावरे माझ्याच दिशेने चाल करून येत आहेत. मी वळून त्यांना पाठ करून पळायला सुरूवात केली. पुढे कुठवर पोहोचायचे आहे याची काहीच कल्पना नव्हती. पण तसा कसलाही नकारात्मक विचार करण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो. पाठी वळून बघायची जराही हिंमत होत नव्हती. त्या नादात धावायचा वेग कमी होणे देखील मला परवडणारे नव्हते. मात्र हळूहळू तो आवाज अजून जवळ येतोय हे जाणवत होते. धुळीचे उठलेले लोट आणि त्या जनावरांचा वास आता सभोवतालच्या वातावरणात जाणवू लागला होता. मी आणखी मरणाच्या आकांताने धावू लागलो. पाय तुटून मरणे मला पसंद होते, धावता धावताच छातीतून एक कळ येणे मंजूर होते, पण त्यांच्या तावडीत मला पडायचे नव्हते. फार कमी लोकांना मृत्युला अगदी जवळून बघायची संधी मिळते पण मला ती साधायची नव्हती. पण नाही, आता कुठल्याही क्षणी पाठीमागून आपल्यावर कोणीतरी झडप घालणार असे मला वाटले तेव्हा मी माझ्याच मृत्युचे एक शेवटचे दर्शन घ्यायला मागे वळलो आणि................... ती सारी जनावरे माझ्या ओळखीचीच होती. सर्वात पुढे होता तो एक बोकड. धष्टपुष्ट निगरगट्ट सोकावलेला अन माणसाच्या रक्ताला चटावलेला बोकड, अन पाठोपाठ त्याच्याच जातभाई बोकडांचा भला मोठा कळप. तोंड असे कोणाचे नजरेस पडतच नव्हते कारण प्रत्येकाने आपली मान खाली घातली होती. मला काही दिसत होते तर ती भाल्यासारखी रोखली गेलेली त्यांची धारदार शिंगे जी सुसाट वेगाने माझ्याच दिशेने येत होती, बस्स काही क्षणांतच माझ्या देहाच्या चिंधड्या उडवत आरपार जाणार होती. पण त्याही पेक्षा जास्त भयानक दिसत होती ती रानडुकरांची टोळी. बेफामपणे आपले सुळे मिचकावत चौफेर उधळली होती. त्यांच्या धावण्यात जराही लयबद्धता नव्हती अन याचीच मला जास्त भिती वाटत होती कारण तश्याच बेशिस्त प्रकारे मी त्यांच्या पायदळी तुडवला जाणार होतो. अचानक एक जनावर त्यामध्ये उठून दिसू लागले ज्याचा आकार पाहता माझे पाय लटपटायचेच बाकी होते. पीळदार बांध्याचा, गोलाकार आणि टोकेरी शिंगांचा एक मस्तवाल बैल, ज्या वेगाने आक्रमण करून येत होता, त्याचा एक हलकासा धक्का देखील मला यमसदनाला धाडण्यास पुरेसा होता. त्याच्या पायाशी घुटमळणार्‍या रानसश्यांच्या लालबुंद निखार्‍यांसारख्या डोळ्यात देखील रक्त उतरलेले दिसत होते. जणू आज मला कुरतडून खायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवावे अशीच इच्छा त्या नजरेत दिसत होती. या सर्व जनावरांच्या फौजेबरोबर काही कोंबड्या देखील आपले जळके पंख फडफडवत उडत येत होत्या. जणू गिधाडांप्रमाणे माझ्या मृत देहाचे लचके तोडायचे काम या करणार होत्या. काही क्षणासांठी माझा स्वताचच छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह माझ्या द्रुष्टीपटलावर तरळून गेला आणि मी पुन्हा मान पुढे वळवून, ते द्रुष्य नजरेसमोरून हटवून, पहिल्यापेक्षा जास्त जोमाने पळत सुटलो. तरीही पाठीमागून ऐकू येणारा कोलाहल काही कमी व्हायचे नाव घेत नव्हता. मानवी शरीर म्हणजे काही मशीन नव्हते, कधी ना कधी पाय साथ सोडणारच होते. आणि मला त्या आधी पोहोचायचे होते, एका सुरक्षित स्थळी. इतक्यात अचानक डोळ्यासमोर पाण्यासारखे काहीतरी तरळले. भास निश्चितच नव्हता तो. नजरेच्या टप्प्यात असलेले नक्कीच ते एक जलाशय होते. मला चांगलेच पोहता येत होते, अन कदाचित या प्राण्यांना येत नसेल तर सुटकेची ती एक आशा होती. याच आशेने नवीन बळ दिले. आता माझ्यासमोर एक निश्चित लक्ष्य होते. मला त्या जलाशयापर्यंत पोहोचायच्या आधी कोसळायचे नव्हते. पुढचे काही क्षण, काही मिनिटे, अन युगे मी कसलीही गणिते न मांडता धावत होतो. जलाशय आता अगदी शंभर पावलांवर आले होते. मात्र मागच्या जनावरांचा वेग अजूनही मंदावल्याचे जाणवत नव्हते. याचा अर्थ असा तर नाही की ते सुद्धा माझ्यापाठोपाठ पाण्यात शिरणार होते. पण हा विचार करायला आता वेळ नव्हता, मागे पलटायचा मार्ग तसाही नव्हताच. फार फार तर जलसमाधी झाली असती, एखादे जलाशय माझ्या रक्ताने रंगल्यास निसर्गाला काही फरक पडणार नव्हता. काठ जवळ आला तसे बुळबुळीत शेवाळांत माझा पाय सरकून मी जलाशयाच्या दिशेने वेगाने घसरू लागलो. जेवढी घाई मला त्या जलाशयापर्यंत पोहोचायची झाली होती त्यापेक्षा जास्त आतुरता बहुधा जलाशयाला माझी लागली होती. कुणास ठाऊक, कदाचित तिथेच माझा शेवट लिहिला असावा. स्वतावर ताबा नसलेल्या अवस्थेत मी वेगानेच सरपटत त्या थंडगार पाण्यात प्रवेश करताच एवढा वेळ पाठीमागून चाललेला कल्ला अचानक थांबला आणि एका वेगळ्याच शांत जगात शिरल्यासारखे मला वाटू लागले. पाय सुन्न पडले होते ते एवढी घोडदौड केल्यामुळे कि त्या थंडगार पाण्याचा हा करीष्मा होता माहीत नाही, पण पाण्याच्या पृष्ठभागावर स्वताचे शरीर मी पलंगावर अंथरलेल्या चादरीसारखे भिरकाऊन दिले होते. एका निवांत अवस्थेत लागलेली समाधी होती ती. पण काही काळच, अचानक कुठुनशी सुळसुळत चंदेरी माश्यांची फौज माझ्या अंगावर तुटून पडली आणि माझ्या शरीराला लक्ष्य लक्ष्य सुयांसारखी टोचू लागली. बांगडा, सुरमई, हलवा, पापलेट, माश्यामाश्यांमधील फरक मी कधीच ओळखू शकलो नव्हतो, आणि आताही ते जमत नव्हते. सारेच एकसमान वाटत होते, सारे तेवढेच हिंस्त्र भासत होते. त्यांच्या वेड्यावाकड्या तीक्ष्ण दातांनी माझ्या चामडीची केलेली चाळण, आता मी देखील त्यांच्यासारखाच एक खवल्याखवल्यांचा प्राणी बनत चाललो होतो. वेदनेचा कळस होता तो. मी त्यांना जितके भिरकाऊन द्यायचा प्रयत्न करत होतो तेवढी पाठाहून नवी कुमक त्यांना मिळत होती. आता मला जमिनीचे वेध लागले होते. दूरवर किनारा दिसत होता मात्र तिथवर पोहायची शक्ती कुठून आणनार होतो. इथवर जे झुंजलो ते आता हार मानायची नव्हती. पुन्हा उरलेसुरले बळ एकवटून मी किनार्‍याच्या दिशेने हातपाय मारू लागलो. अंगाशी जलचरांची झोंबाझोंबी चालूच होती. जलाशयाने अखेर माझे रक्त खरोखरच चाखले होते. किनारा जवळ आला तसे एकेक करत अंगावरचे मासे गळू लागले, अन पुन्हा हलके हलके वाटू लागले. पण एव्हाना हातापायातली शक्तीने उत्तर दिले होते. शेवटी एका जोरदार लाटेबरोबरच मी बाहेर फेकलो गेलो. खरखरीत रेती माझ्या खुरदडलेल्या अंगाचे आणखी सालटे काढत होती मात्र तिला मागे सारून मी आता काठावरच्या खडकांतून वाट काढत मार्ग आक्रमू लागलो. इथून पुढे कुठच्या दिशेला जायचे आहे याची काहीच कल्पना नव्हती. कदाचित पुढे मार्ग नव्हताच. माझा शेवट इथेच होता. सुर्य भर डोक्यावर तळपत होता आणि अंगावरून ओघळणारे रक्तमिश्रित पाणी पायाखालच्या सावलीत मिसळत होते. शेवटी अंगातले त्राण संपल्यावर एका खडकाचा आधार शोधत मी तिथेच विसावलो, तसे त्याच खडकाच्या फटीतून सरसर करत काही खेकडे माझ्यावर धाऊन आले. मोजून चारपाचच असावेत मात्र आता एखाद्या छोट्याश्या कोलंबीशीही झुंजण्याची ताकद माझ्यात शिल्लक नव्हती. मी तिथून उठणार तोच त्यांनी माझे पाय पकडून पायाच्या दोन्ही अंगठ्यांचे करकचून चावे घेतले. पायातना निघालेली कळ भणभणत थेट मस्तकात गेली आणि अखेर मानवी सहनशक्तीचा अंत झाला तशी मला जाग आली ! . . . . उगवला वाटते सुर्य, चल ब्रश कर पटकन आणि आंघोळ आटोपून घे, आज जेवणात तुझ्या आवडीची सुरमई फ्राय आणि कोलंबीचे सार आहे, सोबत आत्येने पाठवलेली मटण बिर्याणी पण आहे. गरमागरम खायचे असेल तर आवर लवकर..... आईची हाक कानावर पडली ! खरेच भयंकर होते ते सारे .. ! ब्रश नुसता दातात धरून किती तरी वेळ तसाच बेसिनच्या कठड्याचा आधार घेत उभा होतो. ईतक्यात आईने कूकर उघडला आणि बिर्याणीच्या वासाने भूक चाळवली. तसे लागलीच दांडीवरचा टॉवेल खेचून मी बाथरूमच्या दिशेने कूच केले .. बदला घ्यायची पाळी आता माझी होती !! ................. एक हाडाचा मांसाहारी, तुमचा अभिषेक
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4890
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

हो खरे आहे, इथेच असे नाही तर शेजारच्या १-२ मराठी संकेतस्थळांवर देखील माझे लेख आणि प्रतिसादांचे प्रमाण असेच व्यस्त सापडेल. याबद्दल दिलगीर असलो तरी नाईलाजदेखील आहेच. पोटापाण्यासाठी चाकरी करताना आणि सोबत ईतर छंद आणि आवडी जपताना माणूस सोशलसाईटवर एक ठराविक वेळच देऊ शकतो, तो मी देतो. पण माझा बराचसा मित्रपरीवार ऑर्कुट समूहांवर असल्याने चर्चा आणि शक्य झाल्यास दिवसाच्या दोनचार गप्पा तिथेच मारल्या जातात. त्या वेळातला बराचसा भाग तिथेच दिला जातो. माझे फेसबूक अकाऊंटसुद्धा मी आठवड्यातून कधीतरी एकदाच चेकतो. तरीही, मराठी संकेतस्थळे किंवा मिसळपावचे बोलायचे तर आवडीच्या विषयानुरुप वाचणे होतेच, कथा वा लेख असेल तर आवडले असा प्रतिसाद कुठेकुठे देतोच, चर्चांच्या धाग्यात मात्र न उतरता फक्त वाचायचे काम करतो मग भले कितीही हात शिवशिवत का असेना, कारण मग ती फॉलो करावी लागते अन ते जमेलच असे शक्य नसते. थोडक्यात सांगायचे तर जसा तुमच्यासाठी मिसळपाव हा कट्टा आहे तसा माझा कट्टा दुसरीकडे ऑर्कुटवर आहे, फार पहिल्यापासून आहे, आणि एकाचवेळी सगळीकडे हजर राहू शकत नसल्याने मर्यादा येतात, मात्र ऑर्कुटचे दुकान पुढे मागे बंद पडल्यास आपसूक इथला वावर वाढेलच याची खात्री बाळगा.

त्याच्यां लय आयडी हायत . तिथुन प्रतिसाद देतात . =))

In reply to by जेपी

पण हे फक्त लेखनमात्र मिपाकर असल्याने.... ह्यापुढे ह्यांच्या लेखनाला प्रतिसाद द्यावा की नाही?

In reply to by मुक्त विहारि

उद्या जर मी कोणाच्या लेखाला छान म्हटले याची परतफेड म्हणून माझ्या लेखाला कोणी छान आहे असा प्रतिसाद देत असेल तर ते मलाही नाही आवडणार. अर्थात अगदीच असा अर्थ तुमच्या वाक्याचा नसला तरी साधारण हे असेच झाले, गिव एण्ड टेक.

In reply to by तुमचा अभिषेक

माझी शंका एकच आहे.... तुम्ही इथे लेख लिहीता पण इतर लेखांना प्रतिसाद का देत नाही? इथला प्रत्येक लेख तुम्हाला आवडलाच पाहिजे असा नाही, पण निदान तुमचे मत प्रकाशीत तरी करा... मी तर बर्‍याच वेळा १/२ वाक्यांत प्रतिसाद देतो. १००/२०० वाक्ये लिहिण्या इतका वेळ आहे. पण २ वाक्याचा प्रतिसाद देता येत नाही, हे काही पटत नाही...

In reply to by मुक्त विहारि

तुमच्या शंकेचे उत्तर मी वरच्या पोस्टमध्ये दिले आहे. शक्य आहे ते आपल्याला पटले नसावे पण यामागचे खरे कारण तेच आहे तर वेगळे का सांगू? राहिला प्रश्न या पोस्टमध्ये आपण १००/२०० वाक्यांच्या लेखाची १/२ वाक्यांच्या प्रतिसादाशी करत असलेल्या तुलनेचा तर ती थोडी चुकीची आहे. लिखाणाला मी छंद म्हणून बघतो जसे कोणाला चित्र काढण्याचा असेल तर कोणाला एखादे वाद्य वाजवण्याचा. यासाठी वेळ त्यानुसारच निघतो. जसे काल हे ऑर्कुटवर मित्रांशी गप्पा मारताना सुचले तसे मी सरळ नेट बंद करून रात्री उशीरापर्यंत जागून लिहून काढले आणि मगच झोपलो. जसे एखादी आपली आवडती मैत्रीण चॅटवर बोलायला असेल तर आपण झोपेला तिलांजली देऊन रात्रभर तिच्याशी गप्पा मारत बसतो तसेच लिखाणाबाबतही माझे होते. बाकी आपल्या भावना समजू शकतो, त्यामुळे या वादात जिंकून मलाही फारसा आनंद होणार नसल्याने इथेच थांबतो.

In reply to by जेपी

फक्त २ आयडी हायेत इथं. ;) अर्थात त्यातूनही प्रतिसाद जेमतेमच आहेत, खोटे का बोला, पण दोघांची टोटल मारल्यास नक्कीच आकडा सुधारेल. :)

In reply to by संजय क्षीरसागर

इथेच काय पण कुठल्याही वेब साईटवर आपन आपल्याला हवे तितके आय.डी. घेवू शकतो. मग मिपा वर पण डू आय डी असणारच ना?

In reply to by संजय क्षीरसागर

ते चांगले कि वाईट हे वापर कसे करता त्यावर अवलंबून आहे. ऑर्कुटवर माझे एकेकाळी ८० प्लस होते, किंबहुना आताही आहेतच, फक्त सध्या ऑर्कुटचा पसारा मर्यादीत झाल्याने वापर नाही. येथील म्हणाल तर इथे मी लिखाण आणि वाचनच करत असल्याने ड्यू आय डी ची गरजच नाही. तरीही एक अतिरीक्त आहे तो अपघातानेच किंवा नाईलाजाने झालेला वा करावा लागलेला, पण त्याचा वापर पाहता त्याला ड्यू आयडी किंवा फेक न बोलता टोपणनावाने लिहितो असे म्हणू शकता. :)

छान. पण ते बोकड रक्ताला कसे काय चटावले बॉ? गवताला चटावले असते तर मानलं असतं एकवेळेस.

In reply to by बॅटमॅन

फॅण्टसी हो, ते साधेसुधे बोकड नव्हते तर तमाम मांसाहारप्रेंमींचा बदला घेणारे, आधी घेऊन झालेले आणि आता माझ्या मागे लागलेले होते..

In reply to by विजुभाऊ

धन्यवाद, ते वाचण्याचा योग आला नाही, मात्र आपल्याला मतकरींचे लिखाण आठवावे हेच माझ्यासाठी खूप आहे. :)