इंग्लिश मिडियम!! कशाला??

वडापाव जनातलं, मनातलं
गेल्या आठवड्यात एकदा रस्त्यावरून चाल्लो होतो तेव्हा रस्त्याच्या पलिकडच्या बाजुने एक हत्ती जात होता(लोकांकडून त्याच्या माहुतासाठी पैसे आणि स्वत:साठी खायला जे काय मिळेल ते मिळवत...). माझ्या समोरुन मला एक आई तिच्या लहान मुलीला घेऊन येताना दिसत होती. ती आपल्या मुलीचं लक्ष त्या हत्तीकडे वेधत होती. तेवढ्यात त्या गजराजाने भर रस्त्यात भलामोठ्ठा प्रसाद दिला. तशी ती बाई मोठ्ठ्याने आपल्या मुलीला म्हणाली, ‘‘ते बघ शर्वरी, एलिफंटने शीऽऽ केली!!’’ मला त्या हत्तीचा ताजा पो बघून वाटली नसेल एवढी किळस त्या बाईचं वाक्य ऐकून वाटली. ही कसली पद्धत मुलांना इंग्लिश शिकवायची? आणि नाहीतरी त्यांना इंग्लिश मिडियमात घातलंच आहे तर मग शाळेत शिकतील की ती इंग्रजी. निदान एरव्ही बोलताना तरी सरळ मातृभाषेत बोला. आमच्या इथल्या एका काकूबाईंना आपल्या मुलीला, ‘‘हे बघ स्टडी कर नाहीतर गॉड तुला पनिश करेल हा!’’ असा दम भरतानासुद्धा ऐकलंय मी. हे सगळं ऐकल्यावर आधी पोट धरुन हसायला येतं खरं, पण नंतर त्याबद्दल विचार केला की तितकंच वाईटही वाटायला लागतं. माझी आजी नेहमी म्हणते, की माणसाने बोलताना एकाच कोणत्यातरी भाषेत बोलावं. मराठीत बोलताना मराठीत, इंग्रजीत बोलताना इंग्रजीत. एका भाषेत बोलताना उगाच दुसऱ्या भाषेचे शब्द वापरू नयेत. मला ते नेहमीच पटत आलेलं आहे. इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, इंग्रजी फ्लुएंटली बोलता येणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपलं मूल हे इंग्लिश मिडियमात शिकलं तर स्मार्ट होईल, पुढे अभ्यासात मागे पडणार नाही, कॉलेजात इंग्लिश नीट बोलता न आल्याने उगाच त्याला कॉम्प्लेक्स येणार नाही, पुढे आयुष्यात सुद्धा त्याला काही त्रास होणार नाही, तेव्हा आपण त्याला इंग्लिश मिडियममध्येच घालूया... आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण करुया!! असं ठरवून आजचे आई-बाबा मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालतायत. त्यात आपल्या धन्य सरकारच्या शिक्षणविषयक धन्य धोरणांमुळे मराठी माध्यमाच्या शाळांची धुळधाण उडत चाल्लीये, आणि परिणामी मराठी माध्यमात घालायची ईच्छा असूनही केवळ मराठी शाळांमध्ये नीट शिकवलं जात नाही, अशा समजूतीमुळे नाईलाजास्तव(किंवा ते निमित्त पुढे करून) आई-बाबा आपल्या प्रिय पाल्याला इंग्लिश मिडियममध्ये टाकतात. मग मुलाच्या कल्याणाची सुरुवात होते. सुरुवात केजीपासून(आजकाल खरं तर प्ले ग्रूपपासून...) होते. मराठी माध्यमातला, शिशुवर्गातला, जुनाट वाटणाऱ्या साध्या रंगसंगतीच्या गणवेशातला शेंबडा मुलगा फुकटात किंवा नगण्य किंमतीत शिक्षण घेत असतो. आणि इंग्रजी माध्यमातला, पॉश युनिफॉर्ममधला, केजीतला, स्मार्ट दिसणारा(त्याला शेंबूड येत नाही वाटतं) मुलगा शिक्षण घेण्यासाठी वर्षाचे किती रुपये मोजत असतो? जास्त नाही, फक्त 60-70 हजार!! हो, फक्त केजीसाठी साठ-सत्तर हजार मोजणारे पालक आहेत आज, इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपल्या मुलाने शिकावं अशी ईच्छा असते ना त्यांची! त्याने त्यांची किंवा त्यांच्या मुलाची कुली सोन्याची होत असावीत, त्याशिवाय केजीसाठी एवढे पैसे मोजण्यात काय अर्थ आहे, हे मला कळत नाही. इतकंच नाही, या केजीतल्या मुलांना होमवर्क सुद्धा असतो म्हणे!! अहो, तिसरीपर्यंत मला गृहपाठ या शब्दाचा अर्थच माहिती नव्हता, आणि या मुलांना सरळ केजीपासून होमवर्क?? काय? तर अक्षरं गिरवा वगैरे... त्यासाठी या मुलांची ट्युशन्स घेणारी मंडळीसुद्धा आहेत बरं का! केजीत शिकवण्या?? एक काळ असा होता की शिकवणीला जावं लागलं, की मुलं लाजेने ओशाळून जायची. बरं या शिकवण्यासुद्धा शाळेचे शिक्षक फुकटात घेत असतील. आणि आता केजीसाठी ट्युशन्स?? वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षी, मुलांच्या बोटांच्या हाडांची रचना/वाढ तरी पूर्ण झालेली असते का? अशा स्थितीत त्यांना गाढवासारखी गिरवागिरवी करायला लाऊन त्यांच्या बोटांच्या रचनेची वाट नाही का लागणार? मला आठवतंय तेवढं शिशुवर्गात मी असताना आम्हांला नुसती अक्षरओळख करुन दिली होती. चित्रं दाखवून प्राण्यांची ओळख करुन दिली जायची. आणि असाच काहीतरी साधा-सोपा, शिशुवर्गाला साजेलसा अभ्यासक्रम असायचा. अभ्यास कसला, नुसती धम्माल होती सोमवार ते शुक्रवार रोज दोन तास फक्त. केजीत कुणी नापास व्हायचं नाही, आणि कोणी करुही नये. आता प्रायमरीत जाऊया. पहिलीत आल्यानंतर माझ्या हातात आधी पाटी-पेन्सिल आली. त्या पाटीवर अर्धा-एक महिना सराव केल्यानंतर वही-पेन्सिलशी ओळख झाली. तेव्हा आधी आम्हांला, //??!’()+- अशी चिन्हं काढायला शिकवलं. त्यानंतर बाराखडी, मग पुढचं सगळं. प्राथमिक शाळेत अगदी पहिल्यापासून हात व्यवस्थित जोडून (अंगठे सुद्धा बोटांच्या रेषेत सरळ ठेऊन) याकुंदेंदुतुषारहारधवला चालीत म्हणायची सवय लावली गेली. स्तोत्रांना वार दिले गेले होते. मंगळवारी प्रणम्यशिरसादेवं, शनिवारी भीमरूपी महारुद्रा; दहा मनाचे श्लोक आणि सगळी रामरक्षा हे आम्ही रोज म्हणत असू. त्यामुळे उच्चार स्वच्छ, स्पष्ट आणि शुद्ध व्हायला मदत झाली. दुसरीत गेलो तेव्हा पहिलीपासूनच मराठी माध्यमाच्या शाळांमधून इंग्रजी विषय सुद्धा शिकवण्याची योजना अंमलात (काळाची गरज नाही का!) आली. तेव्हा चौथीपर्यंत इंग्रजीची फक्त तोंडी परीक्षा घेतली जाऊ लागली. लेखी माध्यमिकमध्ये गेल्यावर. मी म्हणे आधी जरा बोबडा होतो. पण प्राथमिक शाळेत आल्यानंतर माझी वाणी, माझे उच्चार व्यवस्थित सुधारले. सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं नाही, पण इंग्रजी माध्यमात गेलेल्या आणि तोतल्या राहिलेल्या बऱ्याच मुलांना पाहिलंय मी. त्यांच्या घरी कोणी तोतरं नाही किंवा त्यांची जीभही मुळात जड नाही. तरीही ही बोबडेपणाची अडचण! कशामुळे? कारण ज्या वयात शुद्ध-स्पष्ट बोलायची सवय लावायला हवी, त्या वयात हाय-फाय आणि स्टायलीश शैलीची इंग्रजीच फक्त काय ती शिकवली गेल्याचा हा परिणाम! माध्यमिक शाळेत गेल्यानंतर तर आनंदीआनंद होता. तरी मराठी माध्यमात आल्यामुळे कधीही अभ्यासात पाठी पडायची वेळ आली नाही. इंग्रजी हा तर माझा सर्वात लाडका विषय होता. पण मी माझी ही इंग्रजीविषयीची आवड अभ्यासापुरतीच मर्यादित ठेवली. कोणी म्हणालं, तुझं ठीक आहे रे, तू हुशार आहेस म्हणून निभावून नेलं. म्हणजे?? मूल मूळातच हुशार असलं, तर मराठी काय आणि इंग्लिश मिडियम काय, ते अभ्यासात चमकेलच... त्यावर भाषेच्या माध्यमाचा फारसा परिणाम होत नाही. उलट जर एखाद्या मुलाची बौद्धिक पातळी कमी असली, तर त्याला तो स्मार्ट होईल, या आशेने इंग्लिश मिडियममध्ये घालणं घोडचूक ठरतं. उलट त्यांना मराठी माध्यमातून शिक्षण घेणं सोप्पं जातं. याचा अर्थ मराठी इंग्रजीच्या तुलनेत सोप्पी आणि म्हणून थुकरट आहे असा होत नसून, त्यामागचं कारण ‘कोणत्याही व्यक्तिला कधीही कोणतीही गोष्ट आपल्या घरी बोल्ल्या जाणाऱ्या आपल्या मातृभाषेतून समजावली, की लवकर लक्षात येते; तीच गोष्ट परकीय भाषेतून समजावणं अवघड जातं’, हे आहे. त्यामुळे बौद्धिक पातळी कमी असणारी मुलं जर इंग्लिश माध्यमात गेली, तर मराठीत राहून पडली नसती एवढी मागे पडतात, लहानपणातच ताणतणावाने हैराण होतात, प्रसंगी त्यांचं मानसिक संतुलनही बिघडण्याचा संभव असतो. आणि याची जिवंत उदाहरणंसुद्धा मी पाहिलीयत. पण आपल्या मुलाची बौद्धिक पातळी कमी आहे, हे कोणता पालक म्हणायला तयार होईल? तेही तो मुलगा अवघा चार वर्षांचा असताना? अशावेळी आपल्या बौद्धिक पातळीवरून मुलाच्या बुद्ध्यांकाचा अंदाज बांधून निर्णय घेतला, तर तो मुलाच्याच हिताचा ठरतो नाहीका? याचा अर्थ सगळ्या ढ मुलांनी मराठीत जावं, आणि हुशार मुलांनी इंग्रजीत, असा अजिबात होत नाही. हुशार मुलांनी सुद्धा मराठीतच जायला हवं. कारण तेच, सवयीच्या भाषेतून शिक्षण घेतल्याने त्यांना इंग्रजी माध्यमात मिळाला नसता एवढा वाव मराठीतून शिक्षण घेतल्याने मिळू शकतो. आणि मराठीला कैवारी हवाच नाहीका? वाचनाची आवड सगळ्यानाच नसली, तरी बऱ्याच मुलांना असते. वाचणारी मुलं वाचतातच. वाचनाच्या सवयीत इंग्लिश-मराठी माध्यम हा मुद्दा येत नाही. पण मराठीतून शालेय शिक्षण घेतलेली, आणि मराठीबरोबरच इंग्लिश पुस्तकं वाचणारी मुलं बरीच दिसतात. त्याउलट, इंग्लिशमधून शालेय शिक्षण घेतलेली, आणि वाचनाची आवड असलेली मुलं, ही मराठी पुस्तकं वाचताना कमीच आढळून येतात. अर्थात, ठरावीक घरांच्या इतर संस्कारांमुळे यात अपवाद आढळून येऊ शकतात, पण तरीही ते कमीच... ‘अहो पण पुढे कॉलेजात गेल्यावर इंग्लिश फाडफाड बोलणाऱ्या मुलांमध्ये आमच्या मुलाला कॉम्प्लेक्स येईल त्याचं काय?’ काही होत नाही. कॉम्प्लेक्स येत नाही असं माझं म्हणणं नाही, मलाही आला होता. पण साता-समुद्रापार राहणाऱ्या गोऱ्या चामडीच्या ज्या डुकरांनी माझ्या देशाला सतत दिडशे वर्षं लुबाडलं, त्या लोकांची भाषा फाडायला मला जमत नाही, याविषयी यत्किंचितही लाज बाळगावी असं मला वाटत नाही. याउलट इंग्रजीतून शिक्षण घेणाऱ्या मुलांची अवस्था, निदान सांस्कृतिकदृष्ट्या तरी खूप वाईट असते असं माझं स्पष्ट मत आहे. ङ म्हणजे ड वर डॉट, आणि ञ हे ज सारखं काहीतरी अक्षर आहे असा समज; ळ, ण चे चुकीचे उच्चार; स्त्रीलिंगी-पुल्लिंगी असा काही भेदभाव न करता सगळ्या शब्दांना सरळ नपुंसक करुन टाकणे; सामान्यरूप, विभक्तीप्रत्यय कशाशी खातात हे माहिती नसल्याने गहूची पोळी, विज्ञानची वही असे शब्दप्रयोग हे या मुलांमध्ये हमखास दिसून येतात आणि ही मुलं स्वत:चं यामुळे वेळोवेळी हसं करून घेतात. अर्थात अशा मुलांची संख्या आज हसणाऱ्यांपेक्षा जास्त असल्याने त्यांना काही फरक पडत नसावा. उदाहरण दिल्याशिवाय माझंच समाधान होणार नाही म्हणून एक किस्सा सांगतो. एकदा शाळेच्या मधल्या सुट्टीत आमच्या इंग्रजी माध्यमाच्या मित्रांबरोबर आम्ही मराठी मिडियममधली मुलं गप्पा मारत उभी होतो. एक इंग्रजीचा मुलगा सारखं, ‘माझी चुकी नाही, तुझी चुकी आहे’ असं म्हणत होता. शेवटी मला न राहवून मी म्हटलं, ‘अरे, चुकी नाही रे, चूक! चुकी हे सामान्यरूप झालं!’ तर तो मुलगा ‘तेच रे ते! काय फरक पडतो?’ असं म्हणाला. मी म्हटलं, ‘सॉरी बाबा, तुला समजवायला गेलो ही माझीच मिस्टूक झाली!’ तसे सगळेजण एकसुरात ‘मिस्टेक!!!’ असं ओरडले. मी लगेच ‘तेच रे ते! काय फरक पडतो?’ असं म्हटल्यावर हशा पिकला. नुकत्याच आई झालेल्या माझ्या काही मावश्यांना मी 'काय? मराठी मिडियम ना?' असं विचारलं, की 'शीऽऽऽऽऽ मराठी काय??' असं ब-याचदा ऐकावं लागतं. मराठी शाळांचा दर्जा खालवतोय, तेव्हा मराठीसाठी असलेल्या कळवळ्यापोटी आपल्या मुलांचं आयुष्य का बर्बाद करु, असा विचार करुन जर इंग्रजीत घालत असाल, तर विचार जरा बदला. आज तुम्ही मुलांना मराठीत घालून एक उत्तम उदाहरण लोकांसमोर ठेवलंत, तर आणि तरंच उद्या मराठी शाळांसाठी मागणी वाढेल. तुमच्या मुलांना मराठीचे कैवारी करा, तुमची मुलं चमकतीलच, मराठीही चमकू लागेल.
वर्गीकरण
लेखनप्रकार

114 टिप्पण्या 34,843 दृश्ये

Comments

दादा कोंडके नवीन

याच विषयावर माझा एक प्रतिसाद आठवला. बाकी लेखकाच्या भावनेशी सहमत आहेच.

अनिरुद्ध प नवीन

सहमत्,परन्तु मराठी माध्यम असलेल्या शाळान्मध्ये खरेच चान्गले शिक्षक नाहित असे मी स्वता ज्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो,त्या शाळेतील सन्चालक मन्डळातील व्यक्तिने सान्गीतले मग नाईलाजाने मुलास ईन्ग्रजी माध्यमातिल शाळेत घालावे लागले.

बॅटमॅन नवीन

In reply to by अनिरुद्ध प

हे खरेच आहे. मराठी माध्यमाच्या किती चांगल्या शाळा उरल्या आहेत अलीकडे? तुमच्यासारखाच अनुभव कैक लोकांना आलेला आहे. नाइलाज वैग्रे सोडून द्या एकवेळ, पण चांगल्या मराठी शाळा तरी दाखवा. लै कमी.

अग्निकोल्हा नवीन

In reply to by बॅटमॅन

पण मराठीचा उपयोगच संस्थळावरिल गमज्या सोडल्या तर आणखि कुठे खरच प्रभावी होउ शकतो का ? हा विचार करायची वेळ आज आलि आहे, अनेक लोक्स तर विंग्रजी सुधरत/बहरत र्हावे म्हणून विचारही इग्लिशीतुन करायला लागले आहेत इतके पेनिट्रेशन घडले आहे अमराठिचे, अतिसामान्याच्या द्रुष्टिकोनातुन आजच्या काळाशी सुसंगत, उत्तम व वापरावे लागते असे जे काहि आहे ते बहुतांश अमराठि भाषेतच :( नाहि म्हणायला बर्‍याच (विकसनशिल) वयातुन गेलेल्यांना (३० ते ४५ वयोगट) मराठिची विषेश उपरती होत आहे, महती वाटत आहे पण हा प्रवाह वयात आलेल्यांबाबत वाहता होणे जास्त आवश्यक आहे (उदा. १५ ते २५ वयोगट) तर मराठि ही मातृभाषा म्हणून एक अपेक्षित उंची गाठेल.

बॅटमॅन नवीन

In reply to by अग्निकोल्हा

याला कारण मराठीची सांस्कृतिक केंद्रे आता मरगळली आहेत. नवीन काही सध्या काही होत नाहीये, तर उर्वरित मराठी विश्वात त्याच त्या जुन्या साहित्याचे नव्या जोमाने अभिसरण होत आहे. पण इन्शाल्लाह काहीतरी नक्की होईल, कदाचित अजून ४०-५० वर्षांनंतरचे चित्र बरेच वेगळे असेल. इस्लामी आक्रमणानंतरची सुरुवातीची मराठीही अशीच अरबी-फार्सी शब्दांनी लगडलेली होती. बट देन द एंपायर इंडीड स्ट्रक बॅक :) तशीच रिकव्हरी मराठी नक्कीच करेल. फक्त आजच्यापेक्षा ती मराठी वेगळी असेल, अनेक इंग्रजी शब्द त्यात जास्त असतील. अन काही काळाने तेही मागे पडतील. हा संक्रमणकाळ असल्याने इंग्रजीचे सर्वभक्षीपण जास्त नजरेत भरतेय इतकेच. अन जितकी असुरक्षिततेची जाणीव जास्त तितकाच शुद्धतेबद्दलचा आग्रहही जास्त. खरे तर ब्रिटिश अंमलानंतरची मराठीही इतकी बदलत गेली, की आपल्याला त्याची जाणीवही नसते. सिंटॅक्समध्ये फार जास्त बदल झालेत. पण ते सर्व पचवून मराठी तगली, इतकेच नाही तर अनेक जबरी लेखक-कवीही ती प्रसवू शकली. तसेच आत्ताही होईल. पण हे होईपर्यंतच्या काळात चेतवलेला वन्ही थोडातरी जागृत राहो अशी अपेक्षा.

मालोजीराव नवीन

In reply to by बॅटमॅन

इस्लामी आक्रमणानंतरची सुरुवातीची मराठीही अशीच अरबी-फार्सी शब्दांनी लगडलेली होती. बट देन द एंपायर इंडीड स्ट्रक बॅक
बरुबर बरुबर... शहाजी राजांच्या काळात पत्रामध्ये फक्त २०-३०% मराठी शब्द आढळयाचे छत्रपति शिवाजी राजांच्या काळात ते प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढून ६०-६५% झालं छत्रपति संभाजी राजांच्या काळातही ते प्रमाण स्थिर होतं छत्रपति थोरल्या शाहूराजांच्या काळात हे प्रमाण ९२% इतकं होतं

अग्निकोल्हा नवीन

In reply to by मालोजीराव

प्रशासकिय पत्रां संबंधितांचा मराठी शब्दवापर हा शासनकर्त्याच्या मर्जी/धोरण्/प्रदेश/सवयीवर अवलंबुन असणार यात दुमत नको, तर रोजच्या दैनंदिन जिवनात सर्वसामान्य मराठि जनतेचा मराठीत संभाषणासाठी शब्दवापर (बोली भाषा) यात फरक असणार नाही काय ? कारण राजदरबारसंबंधी तुरळक लोक वगळले इतर सामान्य जनतेत असे किती लोक रोज लिखाणाला समर्थ होते. अन तरिही आज परिस्थिती ही आहे की इंग्रजी शासनकर्ते नसुनही मराठि मात्र बहरत न्हवे ओसरत चालली आहे...

अभ्या.. नवीन

In reply to by अग्निकोल्हा

रोजच्या दैनंदिन जिवनात सर्वसामान्य मराठि जनतेचा मराठीत संभाषणासाठी शब्दवापर (बोली भाषा) यात फरक असणार नाही काय ?
प्रशासकीय मराठी वरुन आठवले. महानगरपालिकेच्या एका प्रकाशनात मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचा फोटो हवा होता. मनपाच्या दुसर्‍या एका कर्मचार्‍याने बोलताना सहज सांगितले इथे कार्यबाहुल्याचा फोटो टाका. मी चकीत. तो शब्द विचारता त्याने खुलासा केला. कार्य करणारा बाहुला हो. (खरे पाहता प्रशासकीय पत्रात कार्यबाहुल्य हा शब्द जास्त काम असणे या अर्थी वापरला जातो) अंत्योदय योजनेचा उल्लेख सर्रास अंतुदे असा केला जातो. सरकारी, कायदेविषयक आणि मुद्रांकावरचे लेखन वाचता तर बखरी वाचत आहोत असा भास होतो.

रेवती नवीन

हा लेख आधी येऊन गेलाय का? बहुतेक मलाच असं वाटतय. खूप वर्षांपूर्वी कालनिर्णयच्या पाठीमगच्या पानावर की साप्ताहिक सकाळमध्ये (आता आठवत नाही) कै. शांताबाई शेळके यांचा लेख वाचला होता ते आठवले. त्यात भाषांच्या सरमिसळीबद्दल लिहिले होते. ते किती नैसर्गिक आहे याबद्दल लेख होता असे पुसटसे आठवते.

उपास नवीन

लेखातले काही मुद्दे पटलेच पण एकंदर विचार सद्य परिस्थितीत रुळणारा नाही. मी मराठी माध्यमात कैक वर्षांपूर्वी शिकलो म्ह्णून सद्य परिस्थितीत मी पुढच्या पिढीस मराठी माध्यमात घालायचा सल्ला मुळीच देणार नाही जागतिकीकरण, चांगल्या मराठी शाळा तसेच शिक्षकांची अनुपलब्धतात [विशेषतः घराजवळ शाळा] ही महत्त्वाची कारणे. अनुभवातून सांगतो, मुले एकापेक्षा अधिक भाषा, त्यांच मिश्रण व्यवस्थित आत्मसात करतात. संस्कार घरी सुद्धा उत्तम करता येतात आणि ते घरीच करावेत (शाळेवर न विसंबता.. ) अजून एक म्हणजे, पालकांनी मुलांवर अगदी शिशुनिकेतनात किती खर्च करावेत आणि किती रुपयांची काय खेळणी आणावीत, स्पर्धेत धावावे की नाही हे त्यांचे वैयक्तिक प्रश्न आहेत असं वाटतं, त्याच 'व्हॅल्यू फॉर मनी' असं सरसकटीकरण अनुचित वाटतं.

मराठी_माणूस नवीन

मस्त लेख ते पाउण चड्डी घालणारे बाबा आणि सार्वजनिक ठिकाणी मुलांशी इंग्रजीत बोलणारी आई अगदी डोक्यात जातात. अशांचा सध्या अगदी सुळसुळाट झाला आहे. परवा, एका दवाखान्यात नंबर यायची वाट बघत होतो. वर उल्लेख केलेले पालक आणि सोबत त्यांचे छोटे सुपुत्र होते. आई बाबा दोघेही आप आपल्या फोन मध्ये मशगुल होते , चिरंजीव कंटाळले आणि आई बाबांच्या फोन मध्ये लक्ष घालू लागले. आई बाबांनी लगेच त्याचा इंग्रजीचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली. आजूबाजूला पेशंट आहेत ह्याचेही त्यांचे भान सुटले होते. इंग्रजी शिकवण्याच्या नादात त्यातील मॅनर्स मात्र ते साफ विसरले होते.

वेल्लाभट नवीन

एक मराठी माणूस जेंव्हा इंग्रजी माध्यमाची बाजू घेऊन भांडायला लागतो तेंव्हा पारा लई सटकतो राव. पण ठीक आहे; आपण मराठी माध्यमाचाच पुरस्कार करत रहाणार. मी मराठी माध्यमातून शिकलो; इंग्रजीवाचून माझं काही अडलं नाही आजवर; किंबहुना ब-याच इंग्रजी वाल्यांना मी अडवू शकलोय. जे इंग्रजी चा पुरस्कार करतात त्यांना काहीच समजावण्यात अर्थ नसतो. ज्याचे त्याला.

रेवती नवीन

In reply to by वेल्लाभट

मराठी माध्यमाचाच पुरस्कार करत रहाणार ते हिंदीत म्हणतात असं वाटतय हो, आपल्याकडे बहुतेक उदो उदो करणे म्हणतात.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

तुमचा राग योग्य आहे. पण जोपर्यंत मराठी भाषा उत्तम रोजगार देऊ शकत नाही तोपर्यंत मराठीच काय कोणत्याही भाषेचा उत्कर्ष होऊ शकत नाही. केवळ मराठीतल्या इंग्रजी शब्दांच्या प्रयोगाबद्दल म्हटले तर तुमच्या या लेखातील; "अशी चिन्हं काढायला शिकवलं... ...त्या वयात हाय-फाय आणि स्टायलीश शैलीची इंग्रजीच फक्त काय ती शिकवली गेल्याचा हा परिणाम!" या एकाच परिच्छेदात सर्वात कमी म्हणजे "हाय-फाय" आणि "स्टायलीश" हे दोन शब्द इंग्रजीचे आहेत. बाकी सगळ्या परिच्छेदातील... विशेषतः लेखाच पहिल्या अर्ध्या भागात... मोजताना दमछाक होईल इतके इंग्रजीचे शब्द आहेत ;) लूक, आपण कसे ऑटोमॅटीकली मराठीला ओव्हरलूक करतो ते :) मराठीकडे होणार्‍या अश्या दुर्लक्षामुळे कोणाही अभिमानी मराठी माणसाला दु:ख हे होतेच. सध्या तरी अशी अवस्था आहे की, बॅटमन यांच्या: याला कारण मराठीची सांस्कृतिक केंद्रे आता मरगळली आहेत... ...पण हे होईपर्यंतच्या काळात चेतवलेला वन्ही थोडातरी जागृत राहो अशी अपेक्षा. या अशावादावर विश्वास ठेवण्यापलिकडे आणि आपल्या परीने मराठी भाषा घरात आणि मिपासारख्या संस्थळांवर तगवणे एवढेच हाती आहे. तशी आजच्या घडीला परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलेली नाही... जगातल्या आज जिवंत असणाऱ्या अंदाजे ७,००० भाषांमध्ये मूळ भाषिक लोकांच्या संख्यांच्या अनुक्रमांकाने मराठीचा जगात १९ वा क्रमांक आहे आणि ७.३ कोटी (१.१० % ) लोक तिचा मातृभाषा म्हणून उल्लेख करतात. मात्र हेही नमूद करण्यासारखे आहे की २० व्या क्रमांकावर असलेल्या आणि ७ कोटींची (१.०६ % ) मातृभाषा असलेल्या तमिळच्या भाषिकांएवढा भाषाभिमान मराठी भाषिकांत नाही.

आदूबाळ नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विशेषतः लेखाच पहिल्या अर्ध्या भागात... मोजताना दमछाक होईल इतके इंग्रजीचे शब्द आहेत
अगदी हेच्च लिहायला आलो होतो.
माझी आजी नेहमी म्हणते, की माणसाने बोलताना एकाच कोणत्यातरी भाषेत बोलावं. मराठीत बोलताना मराठीत, इंग्रजीत बोलताना इंग्रजीत. एका भाषेत बोलताना उगाच दुसऱ्या भाषेचे शब्द वापरू नयेत. मला ते नेहमीच पटत आलेलं आहे. इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, इंग्रजी फ्लुएंटली बोलता येणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपलं मूल हे इंग्लिश मिडियमात शिकलं तर स्मार्ट होईल, पुढे अभ्यासात मागे पडणार नाही, कॉलेजात इंग्लिश नीट बोलता न आल्याने उगाच त्याला कॉम्प्लेक्स येणार नाही
या वाक्यांत काही विरोधाभास आहे असं जाणवलेलं दिसत नाही ;)

प्रभाकर पेठकर नवीन

In reply to by आदूबाळ

इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, इंग्रजी फ्लुएंटली बोलता येणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपलं मूल हे इंग्लिश मिडियमात शिकलं तर स्मार्ट होईल, पुढे अभ्यासात मागे पडणार नाही, कॉलेजात इंग्लिश नीट बोलता न आल्याने उगाच त्याला कॉम्प्लेक्स येणार नाही
हे इंग्रजाळलेल्या पालकांचे विचार असल्याने मुद्दाम धेडगुजरी भाषेत दिले आहेत असे वाटते. अवतरण चिन्हांचा योग्य वापर न केल्याने ते लेखकाचेच विचार वाटत आहेत.

अमित खोजे नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मला वाटते "इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, इंग्रजी फ्लुएंटली बोलता येणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपलं मूल हे इंग्लिश मिडियमात शिकलं तर स्मार्ट होईल, पुढे अभ्यासात मागे पडणार नाही, कॉलेजात इंग्लिश नीट बोलता न आल्याने उगाच त्याला कॉम्प्लेक्स येणार नाही, पुढे आयुष्यात सुद्धा त्याला काही त्रास होणार नाही, तेव्हा आपण त्याला इंग्लिश मिडियममध्येच घालूया... आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण करुया!" या परिच्छेदाला लेखक " " करायचे विसरले असावेत कारण तो परिच्छेद तसाच अपेक्षित असावा हे त्यापुढील वाक्यावरून लक्षात येते. हा परिच्छेद म्हणजे मुलांना इंग्रजी माध्यमात घालणाऱ्या पालकांच्या मनातील 'जसे च्या तसे' विचार आहेत. त्यापुढील परिच्छेदामध्ये भाषा सरळच वाटतेय! लेखकाने खुलासा करावा.

सोत्रि नवीन

‘कोणत्याही व्यक्तिला कधीही कोणतीही गोष्ट आपल्या घरी बोल्ल्या जाणाऱ्या आपल्या मातृभाषेतून समजावली, की लवकर लक्षात येते; तीच गोष्ट परकीय भाषेतून समजावणं अवघड जातं’, हे आहे
मी शिकताना जीवशास्त्रात ही भाषा होती ती घरात अजिबात बोलली जात नव्हती. ती मला कधीही कळली नाही. अजूनही काही काही शब्द समजत नाहीत. असो, मराठी भाषेत किंवा कुठल्याही भारतिय भाषांमध्ये उच्च शिक्षणाचा पर्याय आहे का? जसे की चीन आणि जपानमध्ये जपानी भाषेतूनच डॉक्टरकी शिकता येते किंवा इंजीनीयर होता हेते किंवा हॉटेल मॅनेजमेंट करता येते. उच्च शिक्षण जर इंग्रजीतूनच उपलब्ध आहे तर त्याच भाषेतून प्राथमिक शिक्षण घेणे कसे काय चूकीचे होते? अर्थात हा प्रतिसाद लेखकाच्या लेखामागच्या भावनेचा पूर्ण आदर राखूनच दिलेला आहे. -(इंग्रजी माध्यमात शिकणारी मुले असलेला)सोकाजी

llपुण्याचे पेशवेll नवीन

In reply to by सोत्रि

http://www.misalpav.com/node/678 सदर धाग्यावरील प्रतिशब्दांचे प्रतिसाद वाचा. मराठी ज्ञानभाषा बनण्यासाठी पहीली पायरी म्हणजे सर्व तांत्रिक व्याख्या आणि शब्दाना प्रतिशब्द मिळणे. तसे करायचा आणि ते वापरायचा कोणी प्रयत्न केला तर त्याची कशी टर उडवली जाते हे जालावरच फेरफटका मारला तर कळेल. सावरकरांच्याच अशा प्रयत्नाची किती लोक अजूनही खिल्ली उडवतात. प्रस्तुत धागालेखकाचा हत्ती सारखा सोपा शब्द सोडून एलिफंट या शब्दाला असलेला आक्षेप केवळ एक इंग्रजी शब्द म्हणून नव्हे तर वापरण्यातील असुलभता या दृष्टीनेही योग्य आहे. कोणीही कितीही परकीय भाषेतील शब्दांबद्द्ल आणि त्याच्या नैसर्गिकपणाबद्दल लेख लिहीले तरीही हत्ती हा शब्द अधिक सोपा वाटतो हे नक्की. त्यातही प्रवाहाच्या जरा वेगळ्या वाटेने जायची कोणाची (म्हणजे पालकांची आणि मुलांची) तयारी नाही. उच्च शिक्षण मराठीतून नाही म्हणून प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून घेणे मला चुकीचे वाटते. त्यासाठी उच्च शिक्षण मराठीतून आणणे हा योग्य उपाय ठरेल. जरी लांबचा मार्ग असला तरीही उच्च शिक्षणासाठी मराठीचा पर्याय उपलब्ध होणे आवश्यक आहे. आधीच्या पिढीत मराठी शाळेतून इंग्रजी शिकून पुढे जात नव्हते का लोक? मी देखील स्वतः मराठी शाळेतून शिकून नंतर शास्त्रशाखेतून इंग्रजी शिकलेला मनुष्य आहे. पहीले १ वर्ष फक्त जरा त्रास होतो माध्यम बदलल्यावर. आणि तो त्रास सहन करण्यासाठी पालकांनी बळ आणि आधार दिला तर सदर गोष्ट अगदी सहज सुलभ असते हे ही मी अनुभवले आहे. आणि मूळात पालकही आत्मविश्वासविहीन असतील तर तो आत्मविश्वास ते मुलांना कसा देऊ शकतील हा मुख्य प्रश्न आहे.

ग्रेटथिन्कर नवीन

In reply to by llपुण्याचे पेशवेll

टर ऊडवणारच की लोक! टायर पंक्चर झाले' याला तूमी मराठीत' चक्राच्या छिद्रिकरणाने अंतर्गत हवेचे बहीर्गमन झाले' असा काहितरी पर्याय दिलात ,तर लोक टर नाही तर वाक्यच टरकवतील.

मृत्युन्जय नवीन

In reply to by ग्रेटथिन्कर

चक्राच्या छिद्रिकरणाने अंतर्गत हवेचे बहीर्गमन झाले'
"छिद्रिकरणाने चक्रातील अंतर्गत हवेचे बहीर्गमन झाले" हे जास्त बरोबर असावे. माझ्या मते पुपेंचे मत थोडे वेगळे असावे. असे बघा ज्या गोष्टी मराठीत कधी अस्तित्वातच नव्हत्या त्यासाठी इंग्रजी शब्दाचा वापर एकवेळ ठीक म्हणता येइल (तरीही सावरकरांसारख्या लोकांनी अनेक नविन शब्द मराठी भाषेला बहाल केले आणि ते आज अस्तित्वात आणि वापरात आहेत हे बघता नविन शब्द तयार करणेही अशक्य नाही असे म्हणावे लागेल). पण हत्ती च्या ऐवजी एलिफंट म्हटले जात असेल तर ते नक्कीच हास्यास्पद आहे. बाकी चालु देत.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by ग्रेटथिन्कर

टर ऊडवणारच की लोक! टायर पंक्चर झाले' याला तूमी मराठीत' चक्राच्या छिद्रिकरणाने अंतर्गत हवेचे बहीर्गमन झाले' असा काहितरी पर्याय दिलात ,तर लोक टर नाही तर वाक्यच टरकवतील. विनोद छान आहे आणि तुमचा बळजबरीने ओढूनताणून स्वतःचेच हसे करून घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. अभिनंदन ! :) त्या व्याक्याचे भाषांतर इयत्ता तिसरीतले मूलही सर्वसाधारणपणे "चाकातली हवा गेली" असे करते. केवळ मुद्दा जिंकायचा म्हणून सत्याला फाट्यावर मारण्याचा प्रयत्न नेहमीच "ग्रेट थिंकिंग" तर नाहीच पण "लॅक ऑफ थिंकिंग" नक्कीच दाखवतो ;)

दादा कोंडके नवीन

In reply to by कपिलमुनी

'टायर पंक्चर झाले' साठी 'चाकातली हवा गेली' एव्हडं सोप्पं सुचलं नाही कारण इंग्रजाळलेली भाषा. बाकी बरेच पालक लहान मुलांना पक्षी आणि प्राण्यांची ओळख करून देताना इंग्रजी का वापरतात हे कोडं आहे. :)

बॅटमॅन नवीन

In reply to by दादा कोंडके

इतकं विचित्र वाटतं ते, लै डोक्यात जातं. कुंपिणीतली एक आंटी कलीग तिच्या मुलाशी बोलतानाही विचारते, "अ‍ॅपल खायचंय का?" अन्य कितीतरी आयाही "तो एलिफंट बघ" इ. छाप जिलब्या पाडत असतात. यात आया जास्त आघडीवर आहेत हे खेदाने नमूद केल्या जात आहे. विंग्रजी बलीवर्दाच्या वृथा झुली पांघरायचे काम लै जोरात सुरू आहे.

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by बॅटमॅन

'बाळा चल आपण काऊचे दुध आणायला जाऊ' (शेजारची आजी नातवाला) हे ऐकुन कळालेच नव्हते आधी नंतर ट्युब पेटली.

उद्दाम नवीन

In reply to by दादा कोंडके

इंग्रजी जास्ती परफेक्ट वाटते. मराठी चाक शब्द इंग्रजी व्हील शब्दाचा अर्थ दाखवतो. टायर या शब्दाला वेगळा शब्द हवा.

ग्रेटथिन्कर नवीन

In reply to by उद्दाम

बरोबर आहे, टायरला मराठी शब्द काय ?? आंतरनलिकासंरक्षकबाह्यचक्र' कसा वाटतोय

आशु जोग नवीन

In reply to by ग्रेटथिन्कर

तुम्हाला ग्रेटथिन्कर कोण म्हणतं की आपलं आपणच.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by उद्दाम

टायर या शब्दाला मराठी प्रतिशब्द नसणे स्वाभाविक आहे कारण टायर परदेशात विकसित झालेली वस्तू आहे. तेव्हा तो शब्द तसाच्या तसाच मराठीने अंगिकृत केला तरी मराठीचे नुकसान न होता विकसनच होईल. मी अगोदरच्या प्रतिसादात इंग्रजीच्या इतिहासासंदर्भात दिलेला धागा उघडून वाचलात तर ध्यानात येईल की इंग्रजीने (जी अत्यंत समृद्ध भाषा समजली जाते) अनेक शब्द इतर भाषांतून उचलत आली आहे आणि अजूनही तसेच करत आहे हे ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या दर आवृत्तीत स्पष्टपणे नोंदवले जात आहे. म्हणून भाषाशास्त्री इंग्रजीला गमतीने "बॉरोव्ड लँग्वेज" असे संबोधतात. मात्र हे "बॉरोईंग" करताना हे ही ध्यानात ठेवले जाते की भाषा संपन्न व्हावी, विनोदी अथवा दुर्बोध होऊ नये. दोन्ही टोकांचा हट्ट (इतर भाषेतिल शब्द अजिबात नकोच / इतर भाषेतिल शब्दांची कितिही अनावश्यक आवक करायला हरकत नाही) हा अतिरेकच ! या बाबतित मध्यममार्ग नेहमीच योग्य... तो म्हणजे भाषेला सहज सोपेपणा देऊन तिचे सौंदर्य वाढवणार्‍या परक्या शब्दांचे स्वागतच करायला हवे... जसे आपण बाहेरच्या देशांतून येणार्‍या नविन सुधारणांचे करतो आहोतच. आणि कोणाला हवे किंवा नको याची पर्वा न करता हे सगळे आपोआप होतेच आहे. गेल्या शतकातली आणि आताची मराठी त्यामुळेच वेगळी झालेली आहे. मात्र "चक्राच्या छिद्रिकरणाने अंतर्गत हवेचे बहीर्गमन झाले" या प्रकारचे विनोदी वाद-प्रतिवाद टाळले तरच या विषयावरचा संवाद सुसंवाद राहील. नाहीतर वितंडवादांची काही कमी नाही, त्यांत अजून एकाची भर पडेल. इतकेच.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझा वरचा प्रतिसाद टंकण्याआतच "आंतरनलिकासंरक्षकबाह्यचक्र" हाही एक विनोद आला. शिवाय मराठी भूमीत आणि एकंदरीत भारतात विनोदाची आणि दुफळीची कमतरता अजिबात नाही... थोडे तारतम्य आणि एकी असती तर इथला इतिहास आणि भविष्य दोन्हीही फार वेगळे (चांगल्या अर्थाने) झाले असते. बुद्धिची कमतरता नाही... पण दिशा चुकते आहे ;)

पैसा नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मराठी लोकांच्या वाद घालण्याच्या हौसेबद्दल +१ पण टायरला "रबरी धावा" असा प्रतिशब्द पूर्वी वापरात होता.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by ग्रेटथिन्कर

बुद्धिची कमतरता नाही... पण दिशा चुकते आहे हे बदलून "बुद्धिची कमतरता नाही... पण ती कशी वापरावी हा निर्णय करण्याच्या बुद्धीत कमतरता आहे असे वाचावे ! बाकी चालू द्या... मधूनमधून म@@लिला पाहून पण छान मनोरंजन होते असा आमचा अनुभव आहे ;) खुर्ची, कॉर्नफ्लेक्स (आम्ही याला मराठीत कॉर्नफ्लेक्स म्हणतो) आणि सरबत (ह्याला आम्ही मराठीत कोल्ड ड्रींक म्हणत नाही) घेऊन बसलो आहोत. मात्र जsssरा दर्जेदार विनोद जमले तर बघा... नाहीतर असले-नसलेले प्रेक्षक-वाचक उठून निघून जातील ना :)

बॅटमॅन नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मात्र जsssरा दर्जेदार विनोद जमले तर बघा... नाहीतर असले-नसलेले प्रेक्षक-वाचक उठून निघून जातील ना
अगदी खरंय. र ला ट जोडण्याच्या यत्तेपलीकडे मजल न गेल्यामुळे असं होतंय.

अप्पा जोगळेकर नवीन

In reply to by ग्रेटथिन्कर

रबर हा मराठी शब्द आहे. त्यावरुन खोडरबर हा मराठी जोडशब्द देखील तयार झालेला आहे. टेबल, मोटार, रबर, पाटलोण, बूट ( (इंग्रजी). बायको,लष्कर, फौज, समशेर ((उर्दू / फारसी) इत्यादी शब्द मराठी झालेले आहेत.

ग्रेटथिन्कर नवीन

In reply to by अप्पा जोगळेकर

रबर हा मराठी शब्द आहे
नर्मदेतला गोटा हा इंग्रजी वाक्प्रचार आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे.

आनंदी गोपाळ नवीन

In reply to by इरसाल

अन टायर पंक्चर होणे या दोन वेगळ्या घटना आहेत, असे मला वाटते. तुम्हा सर्वांना सिरियसली चाकातली हवा जाणे व टायर पंक्चर एकच आहेत असे वाटते काय? की फक्त प्रतिट्रॉलिंग सुरू आहे?

सुनील नवीन

In reply to by आनंदी गोपाळ

पंक्चर होणे आणि चाकातील (रबरी धावेतील) हवा जाणे ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. मर्ढेकरांची "पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी" ही कविता आठवली. असो.

अप्पा जोगळेकर नवीन

In reply to by ग्रेटथिन्कर

दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन असे अनेक बिनचूक प्रतिशब्द स्वातंत्र्यवीरांनी मराठी भाषेला बहाल केले. ती यादी अपूर्ण आहे असे वाटत असेल तर तुम्ही पुढाकार घ्यावा आणि या यादीत भर घालावी. उगा चिखलफेक करण्यात काय हंशील ? बाकी, तुमचे प्रतिसाद वाचल्यानंतर 'ढालगज' या शब्दाचा अर्थ नीट कळला.

सोत्रि नवीन

In reply to by llपुण्याचे पेशवेll

त्यासाठी उच्च शिक्षण मराठीतून आणणे हा योग्य उपाय ठरेल. जरी लांबचा मार्ग असला तरीही उच्च शिक्षणासाठी मराठीचा पर्याय उपलब्ध होणे आवश्यक आहे.
ते आता होणे अशक्य आहे, त्याला खुप उशीर झाला आहे!
आधीच्या पिढीत मराठी शाळेतून इंग्रजी शिकून पुढे जात नव्हते का लोक?
मीही मराठी माध्यमातूनच शिकलो आहे. काहीही कुठेही अडले नाही असे नाही. पण तरीही माझ्या मुलांनी मराठीत माध्यमात'च' शिकले पाहिजे असे मला वाटत नाही. का? ह्या प्रश्नाचे उत्तर माहिती नाही. त्यात आत्मविश्वासविहीन असाण्याचा काहीही संबंध नाही - (आत्मविश्वास असलेला) सोकाजी

सोत्रि नवीन

तुमच्या मुलांना मराठीचे कैवारी करा, तुमची मुलं चमकतीलच, मराठीही चमकू लागेल.
मराठी माध्यमाच्या शाळेत गेल्यास होणार नाही असे म्हणायचे आहे का? -(मराठी भाषा चकत होती, आहे आणि राहिलच असा सार्थ विश्वास असणारा) सोकाजी

प्रसाद गोडबोले नवीन

शेवटी भाषा हे फक्त माध्यम असते विचारांची देवाण घेवाण करायचे ... त्यामुळे माध्यम कुठले का असेना काय फरक पडतो ? विशेष करुन विज्ञान आणि गणिताच्या बाबतीत मराठी प्रकर्शाने टाळावेच ... आधीच सामान्य माणसाला रुक्ष वाटणारे विषय मराठीतले शब्द वापरले की फारच किळसवाणे वाटतात ... इतिहास भुगोल समाजशास्त्र अर्थशास्त्र ( तेही नॉन-क्वांट) वगैरे स्थानिक भाषेत असायला हरकत नाही ( इतिहासाच्या ४थी पासुन १० पर्यंतच्या इतिहासात मोडी लिपी का शिकवली जात नाही हा मला अजुनही न सुटलेला प्रश्न आहे . खरीखुरी कागदपत्र न वाचता कसला आलय डोंबलाचा इतिहासाच्या अभ्यास ... ) राहता राहिले भाषा विषय : भाषा विषय हे ज्या त्या भाषेतच शिकवले गेले पाहिजेत असे माझे कट्टर मत आहे... जेव्हा आमचा पुतण्या देवः चा उच्चार देव + : असा करतो तेव्हा फार कीव येते राव ह्या "जनरेशन्"ची ...संस्कृत संस्कृत मधुन शिकवणारा एक शिक्षक नसावा येवढ्या मोठ्ठ्या शाळेत ...अरेरे :( (आधी कोणाच्या तरी लेखात वाचलेले वाक्य आठवते .... नुसती ओझी वाहु गाढवं झालीत ह्या पिढीतली मुले ... ह्यांना ना धड कालिदास समजणार ना कुसुमाग्रज ना फिराक ना शेक्सपीयर )

अमित खोजे नवीन

In reply to by प्रसाद गोडबोले

शेवटी भाषा हे फक्त माध्यम असते विचारांची देवाण घेवाण करायचे ... त्यामुळे माध्यम कुठले का असेना काय फरक पडतो ?
मला नाही पटत - भाषा हे आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. त्यातून आपली संस्कृती ओसंडून वाहत असते. इथे परदेशात राहताना कुणी जर मराठी बोलणारा मिळाला तर किती आनंद होतो म्हणून सांगू. आणि दोन मराठी माणसे "English" मध्ये जेव्हा संभाषण चालू करतात (कार्यालयाबाहेर ) तेव्हा तर काय वाटून घ्यायचे कळतच नाही. जीवशास्त्र, भौतिक शास्त्र , रसायन शास्त्र आता काळा प्रमाणे इंग्रजीमधून शिकवीत. का? तर व्यवहारामध्ये त्यांचे इंग्रजी रूपांतराच अस्तित्वात आहे. मराठीतून आपण ते वापरत नाहीत. दक्षिणेच्या राज्यांमध्ये नक्की काय होते ते माहित नाही. पण पुण्याच्या शेतकी महाविद्यालयात तुम्ही जर गेलात तर तिथे उच्च शिक्षण मराठीमधून सुद्धा मिळते. शेवटी आई आणि मम्मी मध्ये फरक हा राहणारच!!! "आई" या शब्दाची गोडी मला "मम्मी" मध्ये कधीच आढळली नाही.

llपुण्याचे पेशवेll नवीन

In reply to by प्रसाद गोडबोले

विशेष करुन विज्ञान आणि गणिताच्या बाबतीत मराठी प्रकर्शाने टाळावेच ... आधीच सामान्य माणसाला रुक्ष वाटणारे विषय मराठीतले शब्द वापरले की फारच किळसवाणे वाटतात ... चिकटवलेली भडकमकर मास्तरांची प्रतिक्रिया वाचा. http://www.misalpav.com/comment/9401#comment-9401 हे केवळ आणि केवळ संस्कारांवर आवलंबून आहे. एखादया समाजात बुध्दिमान/ उच्च्भ्रू वर्ग (इलिट क्लास) जे करत असतो त्याचे अनुकरण अन्य वर्गाकडून होते आणि त्या आवडी मनात धरून बा़की नावडी ठरवल्या जातात. असो.

अर्धवटराव नवीन

मराठी माणसाला मराठी "यायलाच" हवं आणि इंग्रजी "शिकायलाच" हवं. एव्हढं जरी कटाक्षाने पाळलं तरी मराठी संस्कृती आणि त्या अनुषंगाने येणारी समृद्धी, तसच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीचं ज्ञान आणि त्या अनुषंगाने येणारी समृद्धी; दोन्ही आपल्या कह्यात येतात. एकदा इंग्रजी देखील "यायला" लागली कि मराठीची थोरवी आणखी दृगोच्चर होते व आपल्या संस्कृतीबद्दल आदर दुणावतो. या बाबतीत शाळा दुय्यम महत्वाची आहे. माणसाचं घर हिच उत्तम शाळा.

चिगो नवीन

In reply to by अर्धवटराव

मराठी माणसाला मराठी "यायलाच" हवं आणि इंग्रजी "शिकायलाच" हवं.
लाखमोलाचं बोललात.. (म्हणजे जे बोलतात, त्यात दिड वर्षाची केजीची फी भागेल;अगदीएकदम पटलं, राव..

हुप्प्या नवीन

अनेकदा विद्वान मराठी लोकांना बोलताना इंग्रजी शब्द वापरता येणे हे अभिमानास्पद वाटते. अगदी त्याऐवजी सोपा मराठी शब्द वापरता येत असला तरी. अशी इंग्रजीची भरपूर भेसळ असणारे मराठी बोलता येणे म्हणजे आपण कसे सुसंस्कृत, उच्चभ्रू आहोत अशी छाप पाडणे असे समजले जाते. तथाकथित बुद्धीवंतांचाच हा दृष्टीकोन असेल तर अर्धशिक्षित वा उथळ, अडाणी लोकांनी तोच कित्ता गिरवला तर आश्चर्य ते काय? आचार्य अत्रे जेव्हा इंग्लंडहून शिकून परत आले तेव्हा त्यानंतर लगेच त्यांना भाषण करण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी ते भाषण आधी लिहिले आणि ते अनेकदा तपासले, हे बघायला की ह्यात इंग्रजीची भेसळ तर केली नाही ना आपण. हे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे. अज्ञानापोटी, सोपा प्रतिशब्द सुचत नाही म्हणून (जसे ईमेल, फ्याक्स इ.) इंग्रजी घुसडणे एक वेळ क्षम्य आहे. पण हे न्यूनगंडापोटी बोलले जाणारे भेसळलेले मराठी फार तापदायक आहे. जाता जाता: इंग्रजी बोलताना शब्द आठवला नाही आणि मराठी शब्द वापरावा लागला तर मेल्याहून मेल्यासारखे होते पण मराठी बोलताना इंग्रजी शब्द वापरणे कधी खटकत नाही असे का? केवळ गुलामी वृत्ती की अजून काही? कदाचित त्या भाषेतील शब्द कानाला खरोखर जास्त गोड लागत असतील. काही प्रमाणात उर्दू /फारसी शब्दांबद्दल असे वाटते. असो.

वीणा३ नवीन

मुलांना कायम घराजवळच्या शाळेत घालावं. राहिला प्रश्न मराठी माध्यमाचा अभिमान बाळगण्याचा, माझामते जोपर्यंत स्वतःला मुल होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सामाजिक असतो. स्वतःच्या मुलाला शाळेत घालायची वेळ आली की तो व्यक्तिगत होतो. सामान्यपणे कुठल्याही पालकाची धडपड मुलाला आपल्याला परवडू शकेल आणि जे चांगला आहे ते देण्याची असते. जर एखादी मराठी शाळा उत्तम शिक्षण द्यायची हमी देत असेल तर पालक त्या शाळेत नक्कीच घालतील. राहता राहिला प्रश्न मुलांना इतर भाषांमध्ये शिकायला न जमण्याचा. मला असं वाटतं कि बरेचसे पालक सगळ चांगलं तेच देण्याच्या नादात कधीच आपल्या मुलांचा विचार करत नहित. जे आपल्याला चांगल वाटतंय मराठी किंवा इंग्लिश, ते मुलाला आत्तातरी आवडतंय का? मला वाटत रोज आपल्या मुलाचा चेहरा नीट बघितला तरी बरेच प्रश्न सुटतील, तो बराच काही न बोलताच सांगेल.

अमित खोजे नवीन

" मात्र हेही नमूद करण्यासारखे आहे की २० व्या क्रमांकावर असलेल्या आणि ७ कोटींची (१.०६ % ) मातृभाषा असलेल्या तमिळच्या भाषिकांएवढा भाषाभिमान मराठी भाषिकांत नाही." १०० % पटले. मी सुद्धा तेच म्हणतो. तिकडचे दक्षिणे कडचे लोक जर त्यांची मातृभाषा सोडत नाहीत तर आपणसुद्धा आपल्या भाषेचा अभिमान का बाळगू नये? सिंगापूर मध्ये तमिळ आणि मलय भाषा या अधिकृत मानल्या जातात. जर आपण आपल्या भाषेचा अभिमान बाळगला नाही तर पुढच्या पिढीला काय देणार? बॅटमॅन यांचे उत्तर आवडले. मान्य आहे कि मराठी भाषा नक्कीच बदलत गेली आहे पण याचा अर्थ असा नाही कि आपण अशी इंग्रजाळलेली मराठी सरसकट वापरायची. "स्टडी कर नाहीतर गॉड तुला पनिश करेल हा!" च्यायला हि काय भाषा झाली? लहान मुले नक्कीच एकापेक्षा जास्त भाषा शिकू शकतात पण त्यांना आपण त्या शुद्धच शिकवायला हव्यात. या बाबतीत माझ्या मेहुण्याचा हा प्रयोग मला इथे नमूद करावासा वाटतो. त्याने आपल्या मुलाला तीनही भाषा शिकवल्या. वय वर्षे ३.५ आहे सध्या. फक्त सातत्य ठेवले. बाळाची आई मारवाडी आहे. ती बाळाशी हिंदी मध्ये बोलते. बाळाचे आजी आजोबा मराठीतून बोलतात तर बाळाचे वडील म्हणजे माझा मेहुणा त्याच्याशी इंग्रजीतून बोलतो. आणि या सर्वामध्ये सातत्य आहे. म्हणजे आजी आजोबा कधीच बाळाशी हिंदी मधून बोलणार नाहीत. त्यामुळे बाळ सुद्धा आईशी हिंदी (खरे तर मारवाडी ), बाबांशी इंग्रजी (जेवढे जमेल तेवढे ) आणि आज्जी आजोबांशी मराठीतून बोलते आणि प्रत्येकाला त्या त्या भाषेतूनच उत्तर देते. त्याचा हा प्रयोग मला फार आवडला. नक्कीच इंग्रजी आपल्या मुलांना शिकवायला हवी. त्याला ना नाही. परंतु "गॉड तुला पनिश करेल" वाली नाही. तर चांगली शुद्ध शिकवा ना! मी आदरणीय अमिताभ बच्चन यांच्या बद्दल असे ऐकले आहे कि त्यांची हिंदी अतिशय उत्कृष्ट आहे (बागबान मध्ये आपल्याला ते दिसतेच) आणि त्याच बरोबर त्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व ही. पण हिंदी बोलताना ते एकही शब्द ते इंग्रजी वापरणार नाहीत. भाषेवरील प्रभुत्व असावे ते असे. माझ्या मुलांना मी सुद्धा मराठी शाळेत घालू इच्छितो. सर्वांना भेडसावणारा प्रश्न मलाही पडला आहे - चांगली मराठी शाळा. मी हि त्या चांगल्या मराठी शाळेच्या शोधामध्ये आहे. असे ऐकले आहे कि पुण्यामध्ये काही सुशिक्षित पालकांनी एकत्र येउन स्वतःची एक छोटी शाळा सुरु केली आहे आणि त्यामध्ये ते स्वतः येउन शिकवतात. मला वाटते "Home Schooling" चा प्रकार असावा. त्यांनी वेळा वाटून घेतल्या आहेत. म्हणजे कुणाचे "इंजिनिअर " बाबा येउन मुलांना गणित विषय शिकवणार. ते हि अगदी मराठी भाषेतून! एखाद्या मराठी मधील Ph.D. काकू येउन मुलांना मराठी भाषा शिकवतात. ज्यांना इतिहास शिकवायला आवडतो असे आणि ज्यांचा इतिहासाचा अभ्यास खरच खूप चांगला आहे असे तरुण येउन मुलांना छान गोष्टीच्या स्वरुपात इतिहास शिकवतात. (फक्त सन सनावळी पाठ करायला लावत नाहीत.) मी पा वर मला असे इतिहासाचे बरेच जाणकार दिसत आहेत ज्यांचा व्यासंग खरच छान आहे. कुणाला त्याबद्दल काही माहिती असल्यास नक्कीच इथे सांगावी. सगळ्यांना लाभ होईल. कल्पना करा असे उच्च विद्याविभूषित शिक्षक जर आपल्या पाल्यांना मिळाले तर कोणाला नाही आवडणार? तुम्ही म्हणाल कि नोकरी आणि धंद्याच्या कामाच्या व्यापातून कुठे वेळ मिळतो आपल्या पाल्यांना शिकवायला? पण मला वाटते कि आपण एवढे कष्ट करून जर शिकलो आहोत तर त्याचा उपयोग फक्त पैसे मिळवणे एवढाच न करता आपण आपल्या मुलांना जर शिकवले तर त्याचा त्यांना किती फायदा होईल! इथे नोकरी सांभाळून मुलांना शिकवायची जबाबदारी घेणे म्हणजे स्वयंशिस्त खूप लागणार. पण आपल्या मुलांचे चांगले संगोपन करण्यासाठी मला वाटते ते आवश्यक आहे. माझा भाचा जो आता १० ला गेला आहे त्याला मी एक वर्षापूर्वी laptop भेट दिला. परंतु त्यावर games बरोबरच त्याला फुकट मिळणारे SQL SERVER आणि Visual Studio पण टाकून दिले. आणि छोटे छोटे programs त्याच्या कडून बनवून घेतो आहे. उदाहरणार्थ creation of web forms, connection to DB, Add ,Edit ,Delete operations सुद्धा त्याला जमायला लागली आहेत आता. जे मला येते ते त्याला शिकवायला मला अतिशय आनंद होतो आणि त्यालाही शिकायची आवड आहे त्यामुळे तोही शिकतो.

उद्दाम नवीन

अगदी अगदी पटले. प्रत्येक कागदावर, बोर्डावर , प्याकवर विंग्रजी कशाला हवी? आपल्या देशात २४ की ३० की १५०० कितीतरी भाषा आहेत. प्रत्येकाने आपल्या भाशीचा अभिमान बाळगलाच पाहिजे. त्यामुळे साधा पारले जी चा पुडा असो की लक्स साबण, उगाच एकाच इंग्रजी भाषेत नाव लिवण्यापेक्षा त्या सगळ्या २४ की ३० की १५०० भाषेत नाव छापले तर देशाचा उद्धार नाही का होणार? गाडी मुंबई ते चेन्नई असली की तिच्या तोंडावरही एका इंग्रजीतून नाव लिहिण्याऐवजी ती ज्या ज्या प्रांतातून जाते, त्या सगळ्या भाशांमधून नावे असावीत . ( शेवटी अभिमान महत्वाचा ! सोय आणि सुटसुटीतपणा जाईना का फाफलत, नै का? )

अनिरुद्ध प नवीन

In reply to by उद्दाम

आपण कधी मुम्बैतील रेल्वे गाडीतुन प्रवास केला आहे का? किवा रेल्वेतुन प्रवास केला आहे का? असा प्रष्ण विचारावा लागला कारण रेल्वे (लोह्पथ गामी अग्नीरथ) फलाटावर जी उद्घोषणा होते ती आधी प्रादेशीक नन्तर्,राष्ट्रभाषेत नन्तर अन्तराष्ट्रीय भाषेत केली जाते,तसेच आपण वैद्यक क्षेत्रात काम करणारे आहात असे वाटते,तेव्हा औषधाच्या बाटली वजा खोक्यात असेच बर्याच भारतीय भाषान्त विवरण आढळते (औषधाचे माहितीवजा).

आनंदी गोपाळ नवीन

In reply to by अनिरुद्ध प

ते गाडीवर लावायच्या बोर्डाबद्दल बोलत आहेत. औषधांची उद्घोषणा कोण करते? देशी भाषांत औषधांची नांवे लिहायची पद्धत मुंबईत कुठे पहायला मिळेल?

अनिरुद्ध प नवीन

In reply to by आनंदी गोपाळ

उगाच विरोधाला विरोध असेल तर ठीक आहे,मी विवरण असा शब्द वापरला आहे उद्घोषणा असा नव्हे तसेच,"देशी भाषांत औषधांची नांवे लिहायची पद्धत मुंबईत कुठे पहायला मिळेल?" हे आपणच जास्त जाणत असावात कारण आपण वैद्यकीय क्षेत्रात काम करता चु भु द्या घ्या

आशु जोग नवीन

इसराईलच्या लोकांच्या हिब्रूचं कौतुक करणारे हेच लोक ना. बा द वे जपानी लोकांना जपानी भाषेचा अभिमान असतो याचा मराठी लोकांना अभिमान असतो.

मदनबाण नवीन

In reply to by आशु जोग

जपानी लोकांना जपानी भाषेचा अभिमान असतो याचा मराठी लोकांना अभिमान असतो. हॅहॅहॅ... अगदी अगदी आणि जपानी उत्पादनांच्या दर्जा बद्धल सुद्धा ! मेड इन जपान इतक सोडल तर बाकी सगळीकडे कांजी जिंदाबाद !

उद्दाम नवीन

In reply to by आशु जोग

आण्णा, त्या इस्राइल आणि जपानात त्यांच्या देशात एखादीच भाषा असते. शिवाय देश लहान, त्यामुळं त्याना फरक न्हाई पडत, इंग्लिशात लिवले काय आणि हिब्रुत लिहिले काय! पण तुमच्या देशात तीस राज्यं, शिवाय जगभरात तुम्ही माल इकायची स्वप्ने बघणार, मग एकच भाषा चालत असेल आणि ती वापरली तर बिघाडलं कुठं? बरं, माणसाच्या मेंदुला एकच भाषा येऊ शकते असा नियम नाही. पी व्ही नरशिंहराव, चिदंबरम ५ की ६ की ७ भाषा बोलतात म्हणे. ---- इंग्रजीत एम बी बी एस करुन पेशंटशी हिंदीत बोलणारा आणि पेशंट नसले की मोबाइलवर पु ल देशपांड्यांची मराठी प्रवचनं ऐकणारा.. उद्दाम .

मुक्त विहारि नवीन

In reply to by उद्दाम

???????? बापरे !!!!! मी तर त्याला एकपात्री प्रयोग समजत होतो..... असुदे असुदे... कदाचित काही दिवसांनी पुल हे कीर्तनकार होते असेही वाचनांत येवू शकेल...

चावटमेला नवीन

जोवर चंद्र, सूर्य आहेत तोवर मराठीला, इंग्रजीला आणि ह्या विषयाला मरण नाही :)
इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, इंग्रजी फ्लुएंटली बोलता येणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपलं मूल हे इंग्लिश मिडियमात शिकलं तर स्मार्ट होईल, पुढे अभ्यासात मागे पडणार नाही, कॉलेजात इंग्लिश नीट बोलता न आल्याने उगाच त्याला कॉम्प्लेक्स येणार नाही, पुढे आयुष्यात सुद्धा त्याला काही त्रास होणार नाही, तेव्हा आपण त्याला इंग्लिश मिडियममध्येच घालूया
आमच्या पालकांनी येवढा विचार केला नसेल कदाचित, आणि त्याबद्द्ल मी त्यांचा शतशः आभारी राहीन. वैयक्तिकरित्या बोलायचे झाल्यास अस्मादिकांचे १० वी पर्यंतचे १००% शिक्षण मराठीत होवूनसुध्दा अगदी राणीच्या देशातही शष्प फरक पडला नाही. सध्याच्या मराठी शाळांच्या दर्जाबाबत मात्र कल्पना नाही (आणि इंग्रजी शाळांच्यासुध्दा). पण एकच गोष्ट नमूद करावीशी वाटते की चांगली शाळा ही चांगलीच असते, भले ती मराठी, इंग्रजी,हिंदी, स्वाहिली, कुठलीही असो. बाकी, त्या धेडगुजरी मराठी-इंग्रजी बोलणार्‍या पालकांना पाहिलं की माझा सटकलेला सिंघम होतो. असो, लेखाची मांडणी आवडली. (इंग्रजीवर मराठीइतकेच प्रेम करणारा) चावटमेला

आदिजोशी नवीन

कैक मुद्दे आहेत. वेळे अभावी थोडे मांडतो: १. उत्तम शिक्षण देणार्‍या मराठी माध्यमांच्या शाळा अत्यंत दुर्मीळ झाल्या आहेत. माझ्या मुलीसाठी सद्ध्या शाळेचा शोध चालू आहे. परिस्थिती अत्यंत विदारक आहे. मी ज्या शाळेत शिकलो ती शाळा आणि आमच्यावेळी नावाजलेल्या शाळांना भेट देऊन आल्यावर तिथल्या शिक्षकांचीच शाळा घ्यावीशी वाटली. मराठी तर इतकं भयाण बोलत होते की सांगता सोय नाही. २. मराठीत कितीही उच्च शिक्षण घेतले तरी ते महाराष्ट्राबाहेर १००००००% कुचकामी ठरते. ३. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलो आहे. कॉलेजमधे गेल्यावर सगळा अभ्यास अचानक इंग्रजीत समोर आल्याने पूर्णपणे हवा निघाली होती. सायन्सला असलेल्या मित्रांची अवस्था माझ्याहून वाईट झाली होती. ४. सद्ध्याच्या जगात चालणारे किती टक्के ज्ञान मराठीत उपलब्ध आहे? ५. कुणालाही उगाचच हजारो रुपये उधळायची खाज नसते. मराठी माध्यमाच्या शाळांमधली परिस्थिती बघता पैसे घेऊन का होईन निदान पाल्याला चांगलं शिक्षण मिळेल ह्याची खात्री असल्याने पैसे भरायला पालक तयार होतात. ६. कोणत्याही व्यवसायीक कसोटीवर मराठी भाषा इंग्रजी भाषेसमोर ०.१% ही उभी राहू शकत नाही. मराठी भाषेचा अभिमान, जगासमोर उदाहरण, भाषेचा कैवार, इंग्रजाळलेली धेडगुजरी मराठी हे नेहेमीचे चाऊन चोथा झालेले विषय असल्याने त्यावर बोलायची गरज वाटली नाही. मुलीला इंग्रजी शाळेत टाकूनही तिला अत्यंत उत्तम मराठी शिकवता येईल ह्याची खात्री मला आहे. दुनिया गेली भोकात.

चिगो नवीन

In reply to by आदिजोशी

मुलीला इंग्रजी शाळेत टाकूनही तिला अत्यंत उत्तम मराठी शिकवता येईल ह्याची खात्री मला आहे. दुनिया गेली भोकात.
और ये लगा सिक्सर.. (मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या तिन्ही भाषा आवडणारा, उर्दू शायरीप्रेमी) चिगो..

हुप्प्या नवीन

In reply to by आदिजोशी

>> मराठीत कितीही उच्च शिक्षण घेतले तरी ते महाराष्ट्राबाहेर १००००००% कुचकामी ठरते. हे मला कळत नाही. इतकी अचूक टक्केवारी कशी काढली हाही कुतुहुलाचा विषय ठरेल. पण ते जाऊ द्या. समजा एखादा सुतार आहे. पूर्ण मराठीत सुतारकाम शिकला आहे आणि उत्तम कारागीर बनला आहे. सुतारकामात अत्यंत उच्च शिक्षित आहे. आता तो राज्याबाहेर जाऊन सुतारकाम करु शकेल का नाही? नक्कीच करु शकेल. त्याचे शिक्षण मराठीत झालेले असले तरी विविध प्रकारची लाकडे, त्यांना हवा तो आकार देऊन हव्या त्या वस्तू बनवण्याचे कौशल्य कुठल्याही भाषा बोलणार्‍याला तितकेच उपयोगी पडेल ह्याची खात्री आहे. तीच गोष्ट गवंडी, लोहार, फार काय आयुर्वेदिक वैद्याबाबतही हेच लागू आहे तेव्हा आपला मराठीविषयीचा न्यूनगंड सोडावा. २. कोणत्याही व्यवसायीक कसोटीवर मराठी भाषा इंग्रजी भाषेसमोर ०.१% ही उभी राहू शकत नाही ही टक्केवारी कशी काढली? अशी कितीतरी उदाहरणे देता येतील जिथे एक वेळ इंग्रजी येत नसले तरी चालेल पण उत्तम मराठी येणे आवश्यक आहे. उदा. महाराष्ट्रात राजकीय नेता बनायचे असेल तर उत्तम इंग्रजी पुरेसे आहे का? महाराष्ट्रात भाड्याची घरे देणारा एजंट बनायचे असेल तर उत्तम इंग्रजी येते पण मराठीचा गंधही नाही असे चालेल् का? मराठी शाळेत शिक्षक बनायचे आहे तर उत्तम इंग्रजी येते पण मराठीचा गंधही नाही असे चालेल का? आपण आपला मराठीविषयीचा न्यूनगंड सोडावा ही विनंती. ही इतकी टाकाऊ, निरुपयोगी भाषा नाही. हे म्हणजे असे वाटते की ओबामा त्या भव्य दिव्य श्वेत गृहात अर्थात व्हाईट हाऊसमधे रहातो. मी माझ्या टुमदार झोपडीत सुखाने रहातो. श्वेतगृह अगदी प्रचंड, दिमाखदार आहे पण माझी झोपडी माझी आपली आहे. मला ते आपलेपण त्या धवल वास्तूत मिळणार नाही. तीच गोष्ट इंग्रजी आणि मराठीची आहे. इंग्रजीची समृद्धी मान्य करण्यास प्रत्यवाय नाही पण म्हणून मराठी ही आपली भाषा आहे ही भावना रहाणारच.

आदिजोशी नवीन

In reply to by हुप्प्या

हुप्प्या ह्यांनी जी उदाहरणं दिली आहेत ते व्यवसाय करण्यासाठी शाळाच काय नर्सरी मधेही जायची गरज नाही. अजून काही अशी क्षेत्रं आहेत - माळीकाम, भांडी घासणे, गाड्या धुणे, घोड्यांना खरारा करणे, उंटावरून शेळ्या हाकणे, इत्यादि. इथे आपण ज्या माध्यमाविषयी बोलत आहोत त्या माध्यमातून आपण करिअर करायला लागणारे शिक्षण घेणार आहोत ही शक्यता गॄहीत धरलेली आहे. त्या अनुषंगाने मी माझे मुद्दे मांडले आहेत. शिवाय मला माझ्या मातॄभाषेविषयी न्यूनगंड आहे असंही ठरवून ते मोकळे झाले आहेत. त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हुप्प्या नवीन

In reply to by आदिजोशी

आता ती अवाच्या सवा टक्केवारी १००००००% वगैरे कशी काढली तेही सांगा बरे! असो. सुतार्, गवंडी, लोहार वगैरे व्यवसाय हे तुच्छ आहेत, त्याकरता नर्सरीतही जाणे जरूरी नाही असे आपण ध्वनित करत आहात. हा दृष्टीकोन आपल्याला लखलाभ असो. पण माझ्या मते कुठल्याही प्रगत समाजात हे व्यवसाय आवश्यक आहेत. ह्या व्यवसायात उतरणारे लोक आपल्या दृष्टीने कस्पटासमान असले तरी तो एक सन्माननीय पेशा आहे. हा व्यवसाय उत्तम करु शकणारे लोक धनाढ्य बनू शकतात. त्याकरता अनुभव, प्रशिक्षण आवश्यक असते. कुणीही येरागबाळा उठून सुतारकाम करु शकेल, गवंडी वा लोहार बनू शकेल इतके हे काम सोपे नाही. आपण आपला मातृभाषेबरोबरच ह्या आणि अशा व्यवसायांचा तिरस्कार करणे सोडून द्यावे ही विनंती. शुभेच्छांबद्दल आभार!

आदिजोशी नवीन

In reply to by हुप्प्या

मी हे व्यवसाय तुच्छ आहेत असं कुठेही म्हटलेलं नाहीये. फक्त हे व्यवसाय करण्यासाठी कुठलेली पुस्तकी शिक्षण घेण्याची गरज नाही. जसे की अभियंता (मेकॅनीक नाही) व्हायचे असल्यास अभियांत्रिकी विद्यालयात जाणे आवश्यक असते, वकील व्हायचे असेल तर वकिलीच्या कॉलेजात जाणे आवश्यक असते. पण सुतार व्हायचे असल्यास सुताराच्या हाताखाली काम करणे आवश्यक असते, शाळा कोणत्या माध्यमाची आहे त्याचा इथे काही संबंध नाही.

हुप्प्या नवीन

In reply to by आदिजोशी

एखादे काम करायला कुठलेही प्रशिक्षण आवश्यक नाही ह्यात एक अध्याहृत विधान आहे की कुणीही येरागबाळा ते करु शकतो. आणि हा दृष्टीकोन तुच्छतेचाच आहे.आणि तो बदलणे आवश्यक आहे. सुतार होण्याकरता सुताराच्या हाताखाली काम करावे लागते? आपण कुठल्या जमान्यात वावरत आहात? ह्या सर्व व्यवसायांचे प्रशिक्षण द्यायला खाजगी आणि सरकारी अनेक संस्था अस्तित्वात आहेत. त्या अत्यंत लोकप्रिय आहेत. आय टी आय, कोहिनूर ही काही उदाहरणे. सुतार, गवंडी, लोहार ह्या लोकांना अभियांत्रिकीचे ज्ञान आवश्यक असते. ते केवळ अभियांत्रिकी महाविद्यालयातच दिले जाते हा गैरसमज आहे. उदा. अमुक एक लाकूड न तुटता किती भार सहन करु शकेल, अमुक एका कामाकरता किती लाकूड लागेल आणि त्याचा भाव कसा लावायचा? तपमानाच्या, आर्द्रतेच्या चढ उतारामुळे लाकडाचे आकारमान बदलू शकते, त्याकरता काही वेगळी योजना करायची का? वगैरे वगैरे हे अस्सल अभियांत्रिकी प्रश्न आहेत. उत्तम प्रशिक्षण आणि अनुभव ह्या जोरावर लोक ह्यात पारंगत होतात. मूळ मुद्दा हा की असे शिक्षण मराठीत झाले असले तरी कुठेही काम करता येते. मराठीतले शिक्षण निरुपयोगी ठरत नाही. आता ती मनोरंजक टक्केवारी १००००००००%, ०.००००००००००१ % वगैरे कुठल्या अभियांत्रिकी सूत्रावर आधारित होती ते कळू द्या जरा! असो.

आदिजोशी नवीन

In reply to by हुप्प्या

हुप्प्या ह्यांनी जी उदाहरणं दिली आहेत ते व्यवसाय करण्यासाठी शाळाच काय नर्सरी मधेही जायची गरज नाही. अजून काही अशी क्षेत्रं आहेत - माळीकाम, भांडी घासणे, गाड्या धुणे, घोड्यांना खरारा करणे, उंटावरून शेळ्या हाकणे, इत्यादि. इथे आपण ज्या माध्यमाविषयी बोलत आहोत त्या माध्यमातून आपण करिअर करायला लागणारे शिक्षण घेणार आहोत ही शक्यता गॄहीत धरलेली आहे. त्या अनुषंगाने मी माझे मुद्दे मांडले आहेत. शिवाय मला माझ्या मातॄभाषेविषयी न्यूनगंड आहे असंही ठरवून ते मोकळे झाले आहेत. त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आनंदी गोपाळ नवीन

In reply to by आदिजोशी

'सायंटिफिक' दृष्टीकोन ठेवायचा म्हणजे क पासून सुरू झालेले प्रश्न विचारायचे असं शिकवलं होतं आम्हाला. आता हे तुमचे वाक्य.
दुनिया गेली भोकात.
का? कोणाच्या? कशी? केव्हा? किती? कुणाची? कुठून? किती वेळ? . . . ......इ. (शास्त्रीय आनंदात मश्गुल) गोपाळ

चेतन नवीन

लेख म्हणुन ठीक, ज्ञान मिळणं हे खरं, कुठल्या भाषेत मिळालं त्याने काही फरक पडत नाही. मी मराठी शाळेत शिकलो. पहिल्यांदा काही अडचणी आल्या पण त्या आपोआप थोड्या दिवसांनी सुटतात. सर्कीट मोड ऑन> इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, इंग्रजी फ्लुएंटली बोलता येणं ही काळाची गरज आहे, हे कुठल्या धेड्गुजरी भाषेत आहे? सर्कीट मोड ऑफ>

मदनबाण नवीन

मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी लढणारे दोन पक्ष शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या दोन्ही पक्षप्रमुखांची मुले इंग्रजी माध्यमातच जातात/जात होती. Ironically, Uddhav Thackeray's sons Aditya and Tejas as well as Raj Thackeray's children Amit and Urvashi have all studied at Bombay Scottish School. दुवा :- Bombay Scottish School, Mahim

अवतार नवीन

हा प्रकारच अस्तित्वात नव्हता तेव्हापासून मराठी भाषा टिकून आहे. केवळ शाळा बंद पडल्या म्हणून भाषा मरत नसते. भाषा हा संस्कृतीचा एक भाग आहे. त्यामुळे भाषेत होणारे बदल हे काळानुसार होऊ घातलेल्या सांस्कृतिक बदलांचे प्रतिबिंब असते. संस्कृती टिकवायची आणि वाढवायची असेल तर तिचा प्रवाह संकुचित करण्यापेक्षा ती सर्वसमावेशक कशी करता येईल याकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे. पैसा किंवा संपत्ती हे देखील संस्कृतीचे एक अंग आहे. आज परदेशात दिसणारी संपत्ती ही त्यांनी स्वीकारलेल्या संस्कृतीतूनच निर्माण झालेली आहे. परदेशातून येणारा पैसा हा त्यांची संस्कृती बरोबर घेऊनच येणार. पैसा तर हवा पण संस्कृती मात्र नको हि सोयीस्कर भूमिका फार काळ टिकत नाही. स्वाभिमानाची किंमत मोजावी लागते. ती किंमत मोजण्याची तयारी आज तरी कोणी दाखवायला तयार नाही.

पिलीयन रायडर नवीन

मी आयुष्यभर पुणे, महाराष्ट्र , भारत इथेच राहीन ह्याची काही खात्री नाही. जर संधी मिळाली तर जगभर फिरुन मुलाचे अनुभवविश्व समृद्ध करायला आवडेल. त्यामुळे मराठीतुन शिकवुन फायदा नाही. २. पुढे जाऊन सगळं इंग्रजी मध्येच शिकायचं आहे. कशाला आणखी मराठी ते इंग्लिश हा संघर्ष त्याच्या आयुष्यात वाढवायचा? ३. आई वडील घरात उत्तम मराठी बोलत असतील, वाचनाची आवड असेल तर मुलही त्या वातावरणात मराठीशी नाळ जोडुन राहील. त्यामुळे तसाही माझा मुलगा उत्तम मराठी बोलेल आणि वाचेल ह्याची खात्री आहे. मराठी शाळेत जाउन चांगलं इंग्लिश बोलेलच ह्याची खात्री नाही कारण आम्हालाही बर्‍यापैकी इंग्लिश येतं..उत्तम नाही (त्या भाषेतील म्हणी वापरणे, जोक मारु शकणे, भांडु शकणे हे जमत नाही..) ४. मराठी शाळांपेक्षा इंग्लिश शाळांचा दर्जा चांगला असतो असे माझे मुळीच मत नाही. फक्त इंग्लिश माध्यम पुढे जाऊन मदत करणार म्हणुन त्याला प्राधान्य. बाकी माध्यमाचा आणि दर्जाचा संबंध नाही. उत्तम मराठी आणि भिकार इंग्रजी शाळा आहेतच.

कपिलमुनी नवीन

हा लेख एखाद्या गुज्जू - मारवाड्याने वाचला तर "हाय-फाय " मराठी शाळेला जबरदस्त स्कोप आहे म्हणून एक ५००००-६०००० फी असलेली मराठी शाळा काढेल ..

अनिरुद्ध प नवीन

In reply to by कपिलमुनी

माझ्या माहितितील महाराष्ट्रातील ज्या काही शिक्षणसन्स्था आहेत त्या बहुतेक आपल्या मराठी राजकारण्याच्या आहेत,काही गुजराथी मारवाड्यान्च्या सुद्धा आहेत पण मराठी सन्स्था चालक जास्त आहेत्,आणि दुर्दैव असे की त्या सन्स्थान्मध्ये त्या त्या समाजाच्या विद्द्यार्थ्यान्च्या जागा राखीव असतात म्हणजेच त्या त्या भाषिक विद्यार्थ्याना प्राधान्य दिले जाते पण मराठी सन्स्था चालक मात्र असे सौजन्य दाखवत सुद्धा नाहीत.

मिहिर नवीन

लेख आवडला. वरती काहीजणांनी 'आजच्या जगातील किती ज्ञाननिर्मिती मराठीत होते!' असे असे म्हटले आहे. पूर्ण शिक्षण मराठीतूनच घ्यावे असा लेखकाचा आग्रह दिसत नाही (माझाही नाही). प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे जी भाषा आपल्या आजूबाजूला बोलली जाते अशा भाषेत घेणे कधीही हितकारक असते हे पटत नाही का? इंग्रजी माध्यमात शिकताना, लहान वयात ज्या संकल्पना बाणवायच्या त्या बाणवल्या जाण्यापेक्षा नवीन भाषा शिकण्यावर आणि त्या भाषेतून शिकण्यावर लक्ष केंद्रित होऊन जाते आणि मूलभूत संकल्पनांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. असाच आणखी एक मुद्दा. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या पाल्याशी बोलताना अनेकदा पालकच रंग, प्राणी वगैरेंसाठी इंग्रजी शब्द घुसडत बोलतात. पाल्यही मग कलर, पिंक, ब्लॅक, एलिफंट, बुक असे शब्द वापरतच मराठी बोलू लागतो. कितीही कच्चे इंग्रजी असले तरी इंग्रजीतले असे शब्द माहीत नसलेले किती लोक दिसतात? मात्र हे शब्द अगदी सुरुवातीला शिकवून आणि मराठीतही हेच शब्द वापरल्याने इंग्रजी माध्यमात शिकलेले अनेक जण मराठीत हेच शब्द वापरू लागतात!

राही नवीन

बहुतेक सर्व प्रतिसादांतून मराठीच्या भवितव्याबाबत भीती व्यक्त केली गेली आहे. आज शाळांत शिकवले जाणारे मराठी 'भयाण' असते असाही मतप्रवाह आहे. पण आज नऊ कोटी लोक जी मराठी भाषा बोलतात तीच आजची 'दिव्य' मराठी आणखी चाळीस-पन्नास वर्षांनंतर प्रमाणभाषा होण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे हे जाणून घेतले पाहिजे. मराठी जिवंत आहे आणि पुढेही रहाणार आहे ती याच आणि अशीच मराठी बोलणार्‍या भाषकांमुळे. मराठीचे स्वरूप बदलतेय यात चिंता- भयग्रस्त होण्याचे काहीच कारण नाही. जो बदलेल तोच टिकेल हे निसर्गाचे तत्त्व भाषेलाही लागू आहे. ज्ञानेश्वरी, विवेकसिंधु सोडाच; तुकारामांचा गाथाही आज हाताशी संदर्भ साहित्य आणि तळटीपा असल्याखेरीज समजू शकत नाही. इंग्लिश माध्यमातली मुले आपापसात बोलताना सररास हिंग्लिशमधून बोलतात. तसेच महाराष्ट्रातल्या खेडोपाडी लोक 'मिंग्लिश' (इंग्लिश मिश्रित मराठी) मधून बोलू लागतील. 'देऊळ' चित्रपटात हा बदल सुंदर टिपला आहे. पण एक नक्की, जी टिकेल ती मराठीच असेल. फारतर प्राचीन मराठी, मध्ययुगीन्,अर्वाचीन, अद्यतन असे टप्पे निर्माण होतील इतकेच.