Skip to main content

कायद्यात काही 'जादूटोणा' नाही

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 05/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
एडव्होकेट निर्मलकुमार सूर्यवंशी, महोदय, आपला दि ५ सप्टेंबर २०१३ च्या लोकसत्तामधील 'कायद्यात काही "जादूटोणा" नाही' अशा समर्पक शीर्षकाचा लेख वाचला. गैरसमज दूर व्हावेत याबाबत आपले लेखन स्तुत्य आहे. काही विचारणा - १. ज्या व्यक्तींच्या अनंत कष्टांमुळे हा कायदा निदान १२ कलमाच्या रू़पात सध्या सादर केला आहे, त्यांच्या संस्थांला या कलमांच्या आधारे दोषी लोकांना शोधायच्या व शिक्षा करायच्या कामात मदतनीस म्हणून सहभागी करता आलेले आहे की नाही? २. 'आता कायदा केला आहे, पोलिस यंत्रणा काय ते पाहील, पुन्हा पुन्हा आता कटकट करू नका' असे म्हणून सत्ताधारी हात झाडून मोकळे होणार नाहीत का? बारबाला व गुटका प्रकरणातील कायद्याची झालेली दामटी पाहून जर 'येरे माझ्या मागल्या' असेच होणार' असे हे भाकित करायला कुडबुड्या जोशीही पुरे आहेत की नाही?. २. इतक्या वर्षांची दिरंगाई सत्ताधारी पक्षाला हे झेंगट नकोसे होते असे दर्शवते, असे म्हणायला वाव आहे की नाही ? खरे तर या कायद्य़ाचे विरोधक सरकारच आहे. दोन्ही सदनात संख्याबळ पुरेसे असताना दरवेळी मसुदा पास करतो करतो म्हणून वाकुल्या दाखवून, त्यांनी पुरोगामी विचारकांची फजिती कशी होईल याची भरपूर खबरदारी घेतली होती. आता कर्मधर्म संयोगाने अगदी गळ्याशी आले म्हणून तोंड देखले हे विधेयक पारित करून जनमानसाचा रोष थोपवायला एखाद्या लहान पोराला रंगीत खेळणे हातात पकडायला देऊन तात्पुरते रडे थांबवाचा प्रयत्न होत आहे की नाही? ३. हा नवा कायदा इतका समाजहिताची जपणूक करणारा आहे असे आपल्या निदर्शनास आले आहे. मग अशा कायद्यातील अत्यंत महत्वाची १५ कलमे छाटली गेली असे म्हणतात, ती का? वगळलेल्या कलमात असे काय होते म्हणून ते सरकारला ग्राह्य झाले नाही? त्या कलमांची चर्चा विशेषतः प्रसिद्धी माध्यमांतून होताना दिसली नाही. खरे तर या बिलात अजूनही ती का घातली जात नाहीत असा खडा सवाल आपल्या सारख्या विचारकांनी सरकारला विचारायला हवा की नाही? . ३. आजच्या संमत कायद्याच्या कलमांनी गेल्या काही दिवसात किती दोषी लोकांना पकडून या कलमांद्वारे कारवाई झाली? तशी कारवाई नाही झाली तर विरोधकांना या कायद्याच्या आवश्यकतेवर प्रश्न चिन्ह उभे करायला आयतेच कोलीत मिळणार आहे की नाही ? हे विधेयक जर नीटपणे हाताळले गेले नाही तर ते बुमरँग होईल अशी भिती व्यक्त केली जाऊ शकते की नाही? ४. ज्या अनेक भोंदू बंगाली बाबांचा, झटपट सर्व काही ठीक करून देतो म्हणणाऱ्यांचा बंदोबस्त करायला हे विधेयक सरसावले आहे त्यांच्या जाहिराती पेपरमधे, टीव्हीच्या विविध चॅनेल वर आजही सर्रास झळकतात. एका बाजूला सामाजिक बांधिलकीचा आव आणायचा व जाहिराती मात्र मिळवताना ते भान राखायचे की नाही हे संपादकमंडळींनी ठरवायची वेळ आली आहे की नाही? ५. आपण या विचारणावर आपले विचार व्यक्त करावेत ही विनंती. कदाचित अपुऱ्या जागेमुळे पेपरमधे ही विचारणा छापली जाईल अथवा नाही परंतु व्यक्तिशः आपण आपले विचार सादर करावेत. कदाचित संपादकांची त्याला अनुमती मिळेल असे वाटून सविस्तर लिहित आहे. आपला .... वरील पत्र लेखकर्त्याला पाठवले आहे. या विचारणांबाबत मिपाकरांच्या विचारांची देवाणघेवाण होईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3370
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

संमत कायद्याच्या कलमांनी गेल्या काही दिवसात किती दोषी लोकांना पकडून या कलमांद्वारे कारवाई झाली? जाहिराती पोलिसांच्या तत्परतेचे अभिनंदन...

असो.

मध्यंतरी http://www.7witches.com वर लोकांनी खटले भरले होते असं वाचनात आलं होतं. कारण त्यांनी स्पेल कास्ट करायला (ज्याद्वारे संपत्ती मिळेल, हरवलेले मुल सापडेल वगैरे वगैरे वगैरे कारणांसाठी) पैसे क्रेडीटकार्डद्वारे ऑनलाइन भरले होते व त्याचा उपयोग न झाल्यावर पुन्हा अजुन स्ट्राँग स्पेल कास्ट करायला जास्त पैसे दिले पण यश मिळाले नाही. अन हा सर्व व्यवहार अर्थातच कागदोपत्रि सिध्द झाला होता, जादुटोणा कायदा आहे कि नाही माहित नाही पण ग्राहकसंरक्षण कायद्याचा उपयोग केला गेला होता.

आज दोन महिने झाले तरी सरकारने एकही केस या कलमांखाली कोर्टात खेचली गेल्याचे वाचनात नाही. ज्या त्वरेने काही तरी करून दाखवायचे म्हणून हे बिल मांडून तात्पुरते उगी उगी केले जात आहे त्यावरून हे बिल बार बालांच्या बिलाच्या वाटेवर तर नाही ना असा संशय घेता येऊ शकतो. नजर भोंदू बाबांवर

In reply to by शशिकांत ओक

आज दोन महिने झाले तरी सरकारने एकही केस या कलमांखाली कोर्टात खेचली गेल्याचे वाचनात नाही. >>> प्रॉब्लेम काय आहे ? समजा दोन महिने बलात्काराची एकही केस त्या कायद्याखाली कोर्टात खेचली गेली नाही तर तुम्हाला वाईट वाटेल कि आनंद होईल ? का बलात्काराची केस कोर्टात येत नाही म्हणून कायदाच नको म्हणायचंय ? तुमचं लॉजिक ऐकायचं म्हणलं तर हरेक कायद्याच्या उपयुक्ततेसाठी माणसं " कामाला" लावायला लागतील. तुमचा आणि अंनिसचा ३६ चा आकडा आहे भौतेक. त्यांना श्रेय मिळतेय याचा पोटशूळ दिसून आला.

यासाठी अनेक लोक समर्थ आहेत. माझ्यापर्यंत पाळी येईल असे वाटत नाही.

तक्रार? आपल्याला सरकारी कामगिरी समाधानकारक वाटते?

In reply to by विद्युत् बालक

हा हा हा नेमके =)) नाडीधंद्यावर अशी केस खरेच कोणी टाकली तर लै मजा येईल. नाडीवाल्यांचं पितळ आपलं नाडी उघडी पडेल.

In reply to by शशिकांत ओक

@ सरकारी कामगिरी समाधानकारक वाटते?>>> थोडा धीर धरा,आपणास लवकरच समाधान प्राप्त होण्यास सुरवात होणार आहे. :)

कायद्यात त्रूटी असणे , मुद्दाम ठेवणे, कायद्याला धाब्यावर बसविणे या गोष्टी वाईटच पण त्या कायदाच अस्तित्वात नसण्यापेक्षा नक्कीच चांगल्या असतात.

मला अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दल वाईट का वाटावे? ज्या कुप्रथा आहेत त्यांच्यावर नियंत्रण हवेच.