मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सच्चिदानंद बाबांची गोष्ट

धन्या · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गोष्ट तशी खुप जूनी. जवळपास आठशे वर्षांपूर्वीची. आताच्या आहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नावाचं गाव. गावातील मोहिनीराजाचं मंदीर थेट समुद्रमंथनातील अमृतवाटप आणि विष्णूच्या मोहीनी अवताराच्या कथेशी निगडीत. या गावातील मुख्य रस्त्यातून एका सुंदर सकाळी संन्याशी वाटावीत अशी चार मुलं, तीन मुलगे आणि एक मुलगी मार्गक्रमण करत असतात. चौघांच्याही वयात थोडे थोडे अंतर असल्याचे जाणवत होते. एकमेकांच्या पाठीला पाठ लावून जन्माला आलेली सख्खी भावंडेच जणू. चौघांच्याही चेहर्‍यावर एक अतीव समाधान, शांती विलसताना दिसत होती. वाट चालत असताना या मुलांच्या समोरुन एक प्रेतयात्रा येते. प्रेतयात्रेच्या पुढे चालणारी एक स्त्री यातील एका बाल संन्याशाच्या पायावर भक्तीभावाने डोके ठेवते."अष्टपुत्रा सौभाग्यवती भव", तो बाल संन्याशी स्त्रीच्या चेहर्‍यावर हात ठेवून डोळे मिटून म्हणतो. स्त्री दचकते. दोन पावले मागे सरकते. संन्याशालाही प्रश्न पडतो. "काय झालं माई? दचकलात का?" संन्याशी शांतपणे विचारतो. "महाराज, तुमचा हा आशीर्वाद या जन्मी लाभणे शक्य नाही. ही माझ्या नवर्‍याची प्रेतयात्रा आहे." संन्याशी क्षणभर विचारात पडतो. पुढच्या क्षणी तो खांदा देणार्‍यांना तिरडी खाली उतरायला सांगतो. प्रेत कफनातून मोकळे करण्याची आज्ञा देतो. संन्याशाच्या चेहर्‍यावरील तेज पाहून त्याच्या शब्दाचा अव्हेर करण्याचे धाडस कुणालाच होत नाही. प्रेत कफनातून मोकळे केले जाते. "उठा सच्चिदानंद बाबा", तो बालसंन्याशी प्रेताच्या कपाळावर हात ठेवून म्हणतो. आणि काय आश्चर्य, ते प्रेत जिवंत होते. त्या बाल संन्याशाला नमस्कार करते. या सच्चिदानंद बाबांना पुढे हा बालसंन्याशी आपल्या भगवदगीतेवरील टीकेचा लेखक व्हायला सांगतो. ही त्या बालसंन्याशाची भगवदगीतेवरील टीका या सच्चिदानंद बाबांच्या उल्लेखाने संपते. शके बाराशते बारोत्तरे | तैं टीका केली ज्ञानेश्वरें || सच्चिदानंद बाबा आदरें | लेखकु जाहला || अजून एक गोष्ट. ही गोष्ट अगदी अलीकडची. १९८२ सालातली. मेल्व्हीन मॉर्स हे अमेरिकेच्या सिअ‍ॅटल येथील एका बालरुग्णालयात स्थायी वैद्यकतज्ञ म्हणून काम करत होते. अचानक त्यांना आयडाहोमधील पोकाटेलो येथून तातडीच्या मदतीसाठी बोलावले जाते. क्रिस्टल मेझलॉक नावाची एक आठ वर्षांची मुलगी पोहण्याच्या तलावात बुडाली होती. मॉर्स त्या ठीकाणी पोहचले तेव्हा त्या मुलीच्या हृदयाची धडधड थांबून १९ मिनिटे झाली होती.तिची बुब्बुळे विस्फारीत होउन स्थिरावली होती.मॉर्सनी आपले कौशल्य वापरुन त्या मुलीच्या छातीवर दाब देऊन तसेच इतर उपायांनी तिचे हृदय चालू करण्याचा प्रयत्न केला. आणि ते चालू झालेही. मुलीच्या हृदयाची धडधड चालू होताच पुढचे उपचार स्थानिक वैद्यांवर सोपवून मॉर्स आपल्या रुग्णालयात परतले. त्यानंतर काही आठवडे लोटले. मॉर्स दुसर्‍या एका रुग्णालयात काही कामानिमित्त गेले होते. त्याच रुग्णालयात क्रिस्टलवर उपचार चालू होते. मॉर्सना याची काहीच कल्पना नव्हती. क्रिस्टलला चाकाच्या खुर्चीवरुन एका खोलीतून दुसर्‍या खोलीत नेत असताना समोरुन मॉर्स गेले. त्यावेळी त्यांच्याकडे बोट दाखवून क्रिस्टल ओरडली, "हीच ती व्यक्ती, जिने माझ्या नाकात नळ्या खुपसल्या आणि त्यातून पाणी बाहेर काढलं." हे ऐकून मॉर्सना धक्काच बसला. कारण मॉर्सनी त्या मुलीवर जेव्हा उपचार केले तेव्हा ती मुलगी तांत्रिकदृष्ट्या म्रुतावस्थेत होती. त्यामुळे तिला आपल्यावर कोण उपचार करत आहे याची जाणिव होणे शक्यच नव्हते. मॉर्स यांनी क्रिस्टलच्या अनुभवाचा अभ्यास करायचे ठरवले. थोडयाच काळात या प्रकाराला मृत्यूसमीप अनुभव (नियर डेथ एक्स्पेरियन्स) म्हणतात हे ल़क्षात आले. या प्रकारावर तोपर्यंत जरी विपुल लेखन आणि नोंदी झाल्या असल्या तरी त्या सार्‍या नोंदी प्रौढांच्या होती. आतापर्यंत लहान मुलांच्या बाबतीत अशी कुठलीच नोंद झालेली नव्हती. मॉर्स यांनी या विषयावरचे वाचन तर वाढवलेच परंतू स्वतःही इतर लहान मुलांच्या अशा मृत्यूसमीप अनुभवांची नोंद करायला सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सार्‍या मुलांच्या अनुभवात समानता होती.काळोखी बोगदे, मृत नातेवाईकांशी भेट, देव-देवता पाहणे असंच वर्णन सार्‍या मुलांनी केलं होतं. याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या या आठवणींमध्ये चक्क त्यांच्यावर उपचार होत असतानाच्याही आठवणी होत्या. आणि उपचार चालू असताना ती मुलं तांत्रिकदृष्ट्या मृत झाली होती. विज्ञानाने या अनुभवांचा पाठपुरावा चालूच ठेवला. वैज्ञानिकांनी बरेच सिद्धांत मांडले. त्यातील सामायिक कारणे काहीशी अशी आहेतः रक्तप्रवाह थांबणे, डोळ्यांना ऑक्सीजनचा पुरवठा थांबणे, शरीर मृत्यूशी झुंज देत असताना एपिनेफ्राईन आणि अ‍ॅड्रनलाईन अतिरिक्त प्रमाणात शरीराबाहेर स्त्रवणे. हा प्रश्न अगदी सर्वमान्य पद्धतीने निकाला निघाला नसला तरी वैज्ञानिकांनी माणसांवर संप्रेरकांचे प्रयोग करुन कृत्रिमरीत्या मृत्यूसमीप अनुभव निर्माण करण्यात यश मिळवले आहे. विज्ञान नविन असं काहीच निर्माण करत नसतं. ते फक्त निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल करत असतं. आता या क्षणी ज्या गोष्टी अतिंद्रीय, चमत्कार वाटत आहेत त्या तशा नाहीत. फक्त त्यामागचा कार्यकारणभाव आज तरी विज्ञानाला आपल्याला माहिती नाही. आणि या विश्वात निसर्ग नियमांपलिकडे जाऊन काहीही होत नसतं. त्यामुळे सच्चिदानंद बाबांची गोष्ट आपल्याला त्या बालसंन्याशाच्या योगसामर्थ्याचा चमत्कार वाटत असला तरी त्यामागेही अशीच काहीतरी वैज्ञानिक कारणे असतील. त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्‍या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा. ज्यावेळी माणसाची मती कुंठीत होते, समोर घडलेल्या घटनेचं आकलन होत नाही त्यावेळी त्या घटनेला तो चमत्कार म्हणून मोकळा होतो. ही घटना एका पीढीकडून दुसर्‍या पीढीकडे गोष्ट स्वरुपात हस्तांतरीत होत असताना त्यावर अद्भुततेचा मुलामा अधिक अधिक दाट होत जातो आणि मग आपणही शाळेत विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये जडत्व, गती, न्युटनचे गतीविषयक नियम अभ्यासलेले असतानाही आळंदीला गेल्यावर निरागसपणे विचारतो, "ती भींत कुठे आहे हो?"

वाचने 44683 वाचनखूण प्रतिक्रिया 160

छान लिहिलय . अशीच एक कथा रामदास स्वामींच्या चरित्रात आहे ( त्यांनी नाशिक येथे एका कुळकर्ण्याला ताटीवरुन उठवले होते .) शेवटच्या पॅरा बाबतीत .... आजच्या विज्ञानवादी लोकांचा एक फार मोठ्ठा घोळ आहे " जी गोष्ट आपल्याल्या लक्षात येत नाही ती चुक आहे " असा एकुणच त्यांचा अ‍ॅटीट्युड असतो. पण मुळातच ज्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नसतात त्या आपल्या ज्ञानकक्षेच्या बाहेर असतात तेव्हा तडकाफडकी त्यांना चमत्कार किंव्वा भोंदुगीरी किंव्वा अंधश्रध्दा असे लेबल लावणे फार फार चुकीचे आहे . "ज्ञानेश्वरांनी भिंत चालवणे , पाठीवर मांडे भाजणे , सच्चिदानंद बाबाला उठवणे किंव्वा चांगदेवांनी वाघावर बसुन येणे किंवा इतर काही ...हे सारे आमच्या आजच्या वैज्ञानिक ज्ञानाच्या कक्षेमध्ये अनाकलनीय आहे . तेव्हा हे खरे असेलही कदाचित पण आमच्या लक्षात येत नाही . तेव्हा नुसते अंधश्रध्दा म्हणुन झिडकारण्यापेक्षा ते समजुन घेण्याच्या प्रयत्न करु किंवा ह्या विषयावर मौन बाळगु " असा एकुणच आपला अ‍ॅटीट्युड असला पाहिजे . हे झाले अध्यात्माच्या बाबतीत . पण इव्हन विज्ञानाच्या बाबतीतही ... नुकतेच एका मिपाकर मित्राने आमच्या ध्यानात आणुन दिले आहे की " सगळीच सत्य असलेली विधाने सिध्द करता येतीलच असे नाही " (अर्थात जे आपल्याला सिध्द करता येत नाहीये ते असत्यच आहे असे आपण ठाम पणे म्हणु शकत नाही . पहा - http://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6del%27s_incompleteness_theorems आणि याही पुढे जावुन , एखादी गोष्ट सत्य किंव्वा असत्य असे आपण कशावरुन ठरवतो तर आपल्याला आलेल्या अनुभवांवरुन . हे अनुभव इंद्रियजन्य असतात आणि म्हणुन ते १००% सत्य असतीलच असे आपण ठरवु शकत नाही . उदाहरणार्थ वाळवंटात माझ्या डोळ्यांना मृगजळ दिसते पण तिथे पाणी नसते . थोडक्यात माझे डोळे माझ्याशीच खोटे बोलत असतात . असेच इतर इंद्रियजन्य अनुभवांविषयीही असते... म्हणुन आपण आपल्या ह्या अनुभवांवरुन एखादी गोष्ट सत्य वा असत्य असे ठाम पणे सांगु शकत नाही ... असो. सत्य असत्य ह्या विषयावर एकदा निवांत काथ्याकुटायला घ्यायचा आहे

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या Sun, 08/11/2013 - 17:55
अध्यात्म म्हणतं तेच अंतिम सत्य नाही. तसेच विज्ञान म्हणते तेच अंतिम सत्य आहे असंही नाही. आज ज्याला आपण सत्य म्हणून उराशी कवटाळत आहोत ते कदाचित उदया ज्ञानाच्या एखाद्या झुळुकेनं खोटं ठरेल. विज्ञानाच्या बाबतीत हे याआधी खुपवेळा झालेलं आहे. त्या त्या वेळी विज्ञानाने नविन सत्याला सामोरं जायची लवचिकता विज्ञानाने दाखवली आहे. दुर्दैवाने हे अध्यात्माच्या बाबतीत होताना दिसत नाही. तुम्ही दिलेल्या ज्ञानदेवांच्या चमत्कारांच्या यादीबद्दल म्हणाल तर या गोष्टी आजच्या विज्ञानवादी बुद्धीला पटत नाहीत. या गोष्टी एकतर रुपके असाव्यात किंवा मग दंतकथा तरी. ज्ञानदेव महान योगी होते, त्यांना या गोष्टी करणे अशक्य नव्हते असं म्हणून आपण या गोष्टींवर विश्वास ठेवतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चारही भावंडांच्या स्वतःच्या साहीत्यात यातील कुठल्याच चमत्काराचा उल्लेख नाही. समजा उदया हे चमत्कार घडले होते असे सिद्ध करणारे संशोधन झाले तर ते स्विकारण्यास काहीच अडचण नसेल. सत्य आणि असत्य यातील फरक सांगताना तुम्ही जे मृगजळाचे उदाहरण दिले आहे ते मला चुकीचे वाटते. मृगजळाचे उदाहरण प्रवचनामध्ये शोभून दिसते. विज्ञानाच्या संदर्भात त्याला अर्थ नाही. विज्ञानासाठी तो दृष्टीभ्रम आहे. विज्ञानाच्या दृष्टीने सार्वत्रिक अनुभव ही सत्याची कसोटी मानली जाते. वैज्ञानिक सत्य हे जगाच्या पाठीवर कुठल्याही कोपर्‍यात त्याच्या पुर्व अटींची पुर्तता झाली की ते तपासुण पाहता येते. अध्यात्मात तसे नाही. तिथे प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. इतकंच नव्हे तर कुणीतरी लिहून ठेवलंय किंवा म्हणून ठेवलंय म्हणून त्याची कसलीही चाचणी न घेता मागाहून री ओढणे सर्रास होते. जाता जाता, अध्यात्म आणि विज्ञान हे दोन वेगळे कॉन्टेक्स्ट आहेत. त्यांची कुठल्याच पॅरामिटर्सवर तुलना होऊ शकत नाही. :)

In reply to by धन्या

मान्य पण मुदा असा आहे की अनुभव सत्य की असत्य हे कसे पडताळुन पहाणार ? मृगजळ हा एक दाखला झाला . पाण्यात बुडवलेली काठी वाकडी दिसते . हाईनाचा एक प्रकारचा आवाज लहान बाळ हसत असल्या सारखा येतो. अतिषय दुर्गंधी युक्त ठिकाणी काही रूम फ्रेशनर लावल्याने एकदम फ्रेश असल्याचा फील येतो ,एकुणच बरेचसे अनुभव फसवे असु शकतात ... http://www.youtube.com/watch?v=WnEYHQ9dscY
विज्ञानाच्या दृष्टीने सार्वत्रिक अनुभव ही सत्याची कसोटी मानली जाते.
शिवाय सार्वत्रिकते सोबत सर्वकालीनतही महत्वाची गोष्ट आहे . आणि सार्वकालीनता कशी सिध्द करणार ? ( हे फक्त गणितीय सिध्दांता बाबतीत करणे शक्य आहे कारण तिथे अनुभवांचा संबंध नसतो . ) अवांतरः हा एक भारी व्हिदीयो पहा http://www.youtube.com/watch?v=BHihkRwisbE

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकटराजा Wed, 08/14/2013 - 13:19
कान नाक त्वचा डोळे व जीभ ही सर्व ज्ञानेंदिये फसविण्यास युक्त अशी आहेत. कलर डोपलर इफेक्ट, साऊन्ड डॉपलर इफेक्ट ,ऑप्टिकल ईल्युजन, ई ने आपण फसतो. नाक तर फसण्याच्या बाबतीत पहिला नंबर आहे. बेडकीचा पाला जिभेला चोळल्यास साखर मातीसारखी लागते. संमोहन अवस्थेत कारले काकडीसारखे आनंदाने खाणारे लोक दिसतात.

In reply to by चौकटराजा

प्रभाकर पेठकर Wed, 08/14/2013 - 14:25
संमोहन अवस्थेत कारले काकडीसारखे आनंदाने खाणारे लोक दिसतात.
कारले? अरे व्वा व्वा! ते तर आम्ही कुठल्याही अवस्थेत अगदी आनंदाने खातो.

चौकटराजा Sun, 08/11/2013 - 13:17
धनाजी राव, एका वाक्याबद्द्ल आपल्याला साष्टांग ( म्हणजे टांगे सहित) दंडवत ! ते वाक्य असे.... विश्वात निसर्ग नियमांपलिकडे जाऊन काहीही होत नसतं निसर्गात होणार्‍या घटनाना काहीही अर्थ नसतो.( हे जग मिथ्या आहे !) एखाद्या गोष्टीला चमत्कार म्हणायचे किंवा कसे हे निरिक्षक कोणत्या क्षितिजावर व कोणत्या कोनातून पहात आहे यावर अवलंबून असते. देव जर जे सर्व घडवतो असे मानायचे झाले तर तो ते अबोधपणे घडवतो असेच म्हटले पाहिजे. प्रत्येक गोष्ट मानवी मनाच्या भाषेत हेतूशिवाय होत नसली तरी निसर्ग काही हेतू बाळगून चालतो असे काही मला तरी वाटत नाही.

In reply to by चौकटराजा

धन्या Sun, 08/11/2013 - 17:30
निसर्गात होणार्‍या घटनाना काहीही अर्थ नसतो.( हे जग मिथ्या आहे !) एखाद्या गोष्टीला चमत्कार म्हणायचे किंवा कसे हे निरिक्षक कोणत्या क्षितिजावर व कोणत्या कोनातून पहात आहे यावर अवलंबून असते.
अगदी अगदी. घटना घडून जाते. ती घटना चांगली की वाईट हे त्या घटनेचे परीणाम आपल्याला सोयीचे आहेत की गैरसोयीचे यावर अवलंबून असते. आता पुन्हा सोय गैरसोय हे सुद्धा ज्याच्या त्याच्या अपेक्षांनुसार, अग्रक्रमांनुसार अवलंबून असते. निवडणूकीत दोन तुल्यबळ उमेदवारांपैकी कुणीतरी एक हरतो, कुणीतरी एक जिंकतो. घटना एकच परंतू तिचे दोन उमेदवारांवर होणारे परीणाम पुर्णतः परस्परविरोधी असतात.

चौकटराजा Sun, 08/11/2013 - 13:21
वरील प्रतिसादाच्या मथळ्याला जोडून एक विचारायचेच राहिले....भिंत चालविण्याचा प्रसंग पैठण येथे झाला की आळंदी येथे... कारण आपल्या लेखात तिचा उल्ल्लेख आळंदी संदर्भात झालेला दिसतोय. मला तर ती भिंत पैठण येथे पहावयास मिळाली.

In reply to by चौकटराजा

धन्या Sun, 08/11/2013 - 17:24
भिंत चालविण्याचा प्रसंग पैठण येथे झाला की आळंदी येथे... कारण आपल्या लेखात तिचा उल्ल्लेख आळंदी संदर्भात झालेला दिसतोय. मला तर ती भिंत पैठण येथे पहावयास मिळाली.
माझ्या माहितीप्रमाणे ही भिंत आळंदीतच आहे. wall

In reply to by प्रसाद गोडबोले

उडून जाण्याची नाही तर तुकड्या तुकड्यानी लुप्त होण्याची भिती आहे म्हणून. लोक म्हणे त्या भिंतितल्या विटा प्रसाद म्हणून काढून नेऊ लागले. मग भिंतीचे अस्तित्व नष्ट होऊ नये म्हणून त्याला कुंपण घातले. पंढरपूरच्या गरुडखांब (का कुठला तो चांदीने मढवलेला खांब आहे ) त्याचा चांदीचा पत्रा लोकांनी प्रसाद म्हणून कुरतडून न्यायला सुरुवात केलीच आहे.

In reply to by चैदजा

धन्या Sun, 08/11/2013 - 18:51
तुम्ही "मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स" चा संदर्भग्रंथ म्हणून उल्लेख करत आहात का? या पुस्तकात प्रचंड अतिशयोक्ती आहे. संमोहीत अवस्थेत त्या रुग्ण मुलीला चक्क इसवी सन पूर्व १८६३ मधला (1863 BC) जन्म आठवतो. मागच्या ८६ जन्मांचा लेखावजा ती ब्रायनला सांगते हे जरा अती वाटते. या विषयावर दुसरं एक पुस्तक आहे. लाईफ बिफोर लाईफ. पुस्तक मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स सारखं पास्ट लाईफ रीग्रेशनवर नसून पुनर्जन्मावर आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

चौकटराजा Mon, 08/12/2013 - 07:09
धनाजीबाबा परत लिवते झाले. मग सत्येविनारायनाची पूजा घाला की बुवा...... ! धनाजी बुवा अवतारी पुरूष झाले म्हणायचे ...!

In reply to by अत्रुप्त आत्मा

अनिरुद्ध प Tue, 08/13/2013 - 13:18
दोन्ही धनाजीरवान्कडे आहेत्,आपल्याला त्याचा औन्शगुणाचा लाभ व्हावा म्हणुनच आपणच पुजा घालावयाची असते.

In reply to by अनिरुद्ध प

@आपल्याला त्याचा औन्शगुणाचा लाभ व्हावा म्हणुनच आपणच पुजा घालावयाची असते.>>> आंम्ही धनाजींची ओळख झाल्या दिवसापासून पूजा बांधून आहोत! त्यामुळे आमच्याकडे गुण औंशानी नाही चांगले किलोनी आलेले आहेत! आपणास चिंता नसावी...http://mimarathi.net/modules/smileys/packs/smilies/68.gif आपण आमची पूजा घाला! म्हणजे काही ग्रॅम तुंम्हालाही मिळतील! http://mimarathi.net/modules/smileys/packs/Example/10.gif http://mimarathi.net/modules/smileys/packs/Example/10.gif http://mimarathi.net/modules/smileys/packs/Example/10.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

अनिरुद्ध प Wed, 08/14/2013 - 11:57
हि सुरवातिला सुकिच असते,नन्तर सन्स्कार केले जातात.पण झारा हा मुढ्च असतो म्हणुनच त्याच्यावर काही सन्स्कार करण्याचा प्रयत्न म्हणजे ....... गा.. पु..

रमताराम Sun, 08/11/2013 - 20:35
अशाच अनुभवांबाबत बाळ सामंत यांचे 'मरणात खरोखर जग जगते' या सर्वस्वी अप्रस्तुत शीर्षकाचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. शक्य झाल्यास ते मिळवून वाचा. अतर्क्य, अनाकलनीय घटना गोष्टी सापडल्या की लगेच बघा बघा विज्ञानाची मर्यादा म्हणणार्‍यांची मला नेहमीच मौज वाटत आलेली आहे. मुद्दा हा आहे की विज्ञान घटना नाकारत नाही, त्यावरून उतावीळ लोकांनी काढलेले सोयीचे निष्कर्ष (देव असणे, मागला जन्म असणे वगैरे) नाकारते. घटनांबद्दल केवळ 'अजून' कार्यकारणभाव सिद्ध न झालेले' इतकेच नोंदवून पुढे जाते, त्याचा मागोवा घेत राहते. कदाचित पुढे त्या कार्यकारणभावाची उकल करते. जसे विज्ञानाने मागला जन्म 'असिद्ध' केलेला नाही तसेच कुणी तो सिद्धही केलेला नाही, तेव्हा विज्ञानाचे 'तूर्तास असिद्ध' हाच अप्रोच अधिक अनुकरणीय आहे असे आपले आमचे मत आहे. ज्यांना हजार वर्षांपूर्वीच हे सिद्ध झाले होते असे मानायचे किंवा अशी एखादी घटना सापडली की लगेच विज्ञान पराभूत झाल्याचे जाहीर करायचे असेल तो त्यांचा प्रश्न आहे. समस्या आहे ती निष्कर्षापूर्वी आपण सर्व बाजूंनी विचार केला होता का, सर्व शक्यता तपासल्या होत्या हे ध्यानात घेणे (अर्थात सोयीस्करपणे किंवा फारच अधीरपणे) नाकारले जाते. गंमत म्हणून आम्ही पुनर्जन्म या विषयासंबंधी काही प्रश्न विचारले होते. विचारले गंमतीने असतील पण प्रश्न गंभीरच होते. या अमुक घटनेबाबत विज्ञान उत्तर देऊ शकत नाही म्हणून ते अपुरे वा त्याला मर्यादा आहेत असे म्हणणे योग्य आहेच, पण त्याचा पर्याय म्हणून जी उत्तरे दिली जातात ती अतिशय हास्यास्पद नि सर्वस्वी निराधार असतात. एक नेहमी ध्यानात ठेवायला हवे, जगातील सर्व प्रश्नांना उत्तरे असतातच असे नाही, असलीच ती आपल्यापर्यंत पोचतीलच असे नाही, पोचली तरी समजतील असे नाही. तेव्हा 'अजून ठाऊक नाही' हे प्रामाणिकपणे मान्य करणे आम्हाला अधिक रुचते. तुमच्याकडे उत्तर नाही ना, मग माझे उत्तर बरोबर हे तर्कशास्त्र अजब आहे. तुमचेही उत्तर तितक्याच सार्थपणे सिद्ध व्हायला हवे. आणि हो पूर्वापार चालत आलेला समज, वा एखाद्या फार फार जुन्या पुस्तकात लिहिलेले आहे हा पुरेसा पुरावा निदान आम्ही मानत नाही. त्याऐवजी विज्ञानाच्या मर्यादा आहेतच, पण त्या सातत्याने कमी होत जाणार आहेत, जुन्या अनुत्तरित प्रश्नांचा वेध चालूच राहणार आहे, त्यातील काही प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत, आधीची काही बदलणार आहेत हे आमच्या दृष्टीने जगण्याला रोमांचकारी बनवणारे आहे. एका दगडावर बसून इथून सगळे जग दिसते हे ठसवण्यासाठी 'इथून दिसते ते जग' अशी व्याख्या बदलून घेणे आम्हाला तितकेसे रुचत नाही. प्रवासाच कंटाळा असलेल्याने तसे करावे फारतर. आम्हाला रस्त्यावरच्या प्रत्येक वळणापलिकडे काय आहे याची उत्सुकता कायम असते. नि त्या उत्सुकतेची सार्थपणे परिपूर्ती विज्ञानमार्ग ('च' प्रत्यय लावलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी) करू शकतो. त्यामुळे तूर्तास आम्ही आमच्या अनुत्तरित प्रश्नांसह मार्गक्रमणा करतो आहोत. इत्यलम.

In reply to by रमताराम

राजेश घासकडवी Sun, 08/11/2013 - 22:16
प्लस वन. अतिशय योग्य भाषेत मांडणी केलेली आहे. मला तर वाटतं 'उत्तर मिळणं म्हणजे काय? काय झाल्याने एखादी गोष्ट किती प्रमाणात सिद्ध झाली असं समजावं?' या बाबतीत विज्ञानाने जो विचार केलेला आहे तो इतर साधनापद्धतीत दिसत नाही. त्यामुळे 'मला वाटतं ते माझ्यापुरतं सत्य' इतक्या मर्यादित स्वरूपात ते रहात नाही. हे वैयक्तिक सत्य काहीही असो. मात्र जेव्हा 'सर्वांसाठी सत्य' अशी विधानं शोधून काढायची असतील तर जे निकष लावावे लागतात त्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोनच आवश्यक आहे.

In reply to by रमताराम

@ कदाचित पुढे त्या कार्यकारणभावाची उकल करते. जसे विज्ञानाने मागला जन्म 'असिद्ध' केलेला नाही तसेच कुणी तो सिद्धही केलेला नाही, >>> हा आध्यात्माच्या चर्चेतला एक नेहमीचा लोच्या आहे. @
विज्ञानाने मागला जन्म 'असिद्ध' केलेला नाही
>>> ज्यांना असं वाटतं की विज्ञानाने या गोष्टी सिद्ध करून दाखवल्या पाहिजेत..जसे की- मागचा जन्म..आत्मा..देव..! त्यांना विचारावसं वाटतं की .''या गोष्टी विज्ञानाच्या आधारावर सिद्ध कश्या करणार ते मला सांगा..? जे सिद्ध करून दाखवायचं... ते अश्या लोकांनी पुराव्यासाठी एकदा तरी समोर "हजर" करायला हवं की नको? उदा- भूत नाही हे सिद्ध करा.. कसं करणार(सिद्ध)? कारण सिद्ध करणार्‍यांनी जेव्हढ्या म्हणून भूताच्या केसेस तपासल्या त्या सर्व भूत या कल्पनेच्या बाबतीतलं अज्ञान/गाढवपणा/ढोंगबाजी/लबाडी या परिणामाच्या बाहेर गेल्याच नाहीत! जे तपासायचं..ते कोणत्यातरी स्वरुपात..एखादा टक्का तरी अस्तित्वात असायला हवं की नको? त्यामुळे ही सिद्ध करण्याची जबाबदारी.. हे आहे.. असं म्हणणार्‍या लोकांवर जाऊन पडते..आधी त्यांनी हे आहे चे पुरावे द्यावेत..मग नाही म्हणणारे त्या पाठिमागचं सत्य शोधतील....! उद्या कुणी विचारलं..की गाय अंड देते, हे सिद्ध करा.. तर ते कुणालाही सिद्ध करता येणार नाही..गाय जर का अंडे देतच नाही,तर सिद्ध कसं करून दाखवायचं??? :)

विजुभाऊ Mon, 08/12/2013 - 02:44
द्या कुणी विचारलं..की गाय अंड देते, हे सिद्ध करा.. तर ते कुणालाही सिद्ध करता येणार नाही..गाय जर का अंडे देतच नाही,तर सिद्ध कसं करून दाखवायचं??? smiley
गूगल वर गोमातेची अंडी उआ सर्च मारल्यानंतर काही विदारक सत्ये सापडली गाईची अंडी हा उल्लेख असंतोषजनक आहे काउ एग = http://www.thefarmerscow.com/products/farmers_cow_eggs.html त्या नावावरून गायीची अंडी असू शकतील असे पुरावे देता येतील ;) अवांतरः एखादी गोष्ट नाही असे सिद्ध करता आले नाही तर ती गोष्ट आहे हे सिद्ध होउ शकते का?

मोदक Mon, 08/12/2013 - 03:16
अवांतरः एखादी गोष्ट नाही असे सिद्ध करता आले नाही तर ती गोष्ट आहे हे सिद्ध होउ शकते का? एखादी गोष्ट नाही असे सिद्ध केले गेले तर ती गोष्ट आहे असे गृहीत धरण्यात येते, मात्र ठरावीक काळानंतरही ती गोष्ट अस्तित्वात आहे या गृहीतकाला आवश्यक पुरावे मिळाले नसल्यास नाही असे गृहीत धरले जाते. वरील विधान विशेषतः बेपत्ता नागरिकांना / सैनीकांना लागू आहे. मात्र तुमच्या विधानाचा रोख अध्यात्म, मन यांवर असेल तर वरील विधान गैरलागू ठरेल.

स्पंदना Mon, 08/12/2013 - 04:31
शेवटचा पॅरा अतिशय भावला. पण एक सांगा मला, आपल असणं , आपल नसणं हे जर तुम्ही उलगडु शकलात तर पुढच्या शोधाला काही अर्थ काही दिशा असु शकते. हे जोवर उलगडत नाही तोवर निरागस असणच फायद्याच नाही का?

अर्धवटराव Mon, 08/12/2013 - 08:06
निअर डेथ एक्सपीरीयन्स आणि ज्ञानेश्वरांनी सच्चीदानंद बाबांना शरीरात परत आणणे या भिन्न बाबी आहेत. सध्या एव्हढच. अवांतर: विज्ञान/आध्यात्माने एकमेकांना हरवणे म्हणजे डोळ्याने दृष्टीला हरवणे झाले. असो. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

कवितानागेश Mon, 08/12/2013 - 08:20
सगळ्याच शास्त्रांचा, आभ्यासाचा आणि अनुभवाचा रोख शेवटी 'निसर्गनियम शोधणे, पडताळून पाहणे' असाच असतो आणि 'हे सगळं नक्की काय आणि कसे चाललय ते बघू' याच कुतुहलानी त्याची सुरुवात होते.

In reply to by अर्धवटराव

धन्या Mon, 08/12/2013 - 09:07
निअर डेथ एक्सपीरीयन्स आणि ज्ञानेश्वरांनी सच्चीदानंद बाबांना शरीरात परत आणणे या भिन्न बाबी आहेत. सध्या एव्हढच.
ज्ञानदेवांनी सच्चिदानंद बाबांना जिवंत केले ही घटना जवळपास आठशे वर्षांपूर्वी घडून गेलेली घटना आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं असावं हे आज आपण सांगू शकत नाही. जे सश्रद्ध आहेत ते चिकित्सेच्या भानगडीत पडणार नाहीत. त्यांच्यासाठी ही घटना ज्ञानदेवांच्या योगसामर्थ्याचे उदाहरण असेल. जे चिकित्सक आहेत त्यांच्या बुद्धीला मृत व्यक्तीला दुसरी व्यक्ती जिवंत करु शकते ही बाब पटणार नाही. ते उपलब्ध ज्ञानाचा उपयोग करुन या गोष्टीमागे काय कारण असावे हे शोधण्याचा प्रयत्न करतील. मी निरंजन घाटेंचं "संभव असंभव" पुस्तक वाचत असताना मला हे मेल्व्हीन मॉर्सच उदाहरण सापडलं. माझं कुतुहल जागं झालं. नियर डेथ एक्स्पेरियन्सबद्दल खुप काही वाचून काढलं. माझ्या आयुष्यात एक फेज अशीही आली होती की जेव्हा ज्ञानदेवाने मला झपाटून टाकले होते. तेव्हा हे सारे चमत्कार खरेही वाटायचे. पुढे चिकित्सक वृत्ती बळावल्यावर मी त्या चमत्कारांमध्ये सत्य शोधायला लागलो. सच्चिदानंद बाबांचा अनुभव हा नियर डेथ एक्स्पेरियन्सच आहे असा माझा दावा नाही. पण तो नियर डेथ एक्स्पेरियन्स असूही शकतो. त्यावेळी नेमकं काय घडलं हे आपल्याला माहिती नाही.

In reply to by धन्या

स्पंदना Mon, 08/12/2013 - 09:38
मी लिहिलय कोठेतरी, आमच्या गावात १ मे ला सकाळी साताच्या सुमारास मेलेली रखमा आज्जी संध्याकाळी सहाच्या सुमारास जागी झाली. उगा महाराष्ट्र बंद होता म्हणुन पावणे रावणे यायला वेळ झाला नाही तर.....

In reply to by धन्या

अर्धवटराव Mon, 08/12/2013 - 10:08
आठशे वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनेबाबत केवळ अंदाजच बांधता येतील हे खरय. पण माझा मुद्दा त्या विशिष्ट घटनेबाबत नाहि, तर ज्ञानदेवांनी किंवा एखाद्या योग्याने प्रेत उठवणे व नीअर डेथ एक्स्पीरीयन्स या दोन कन्सेप्ट्च्या भिन्नतेबाबत आहे. अगदी साधर्म्यच दाखावायचं झालं तर शरीरशास्त्र दृष्टीने नीअर डेथ एक्स्पीरीयन्स हा थोडाफार निर्वीकल्प समाधी सारखा आहे... अपघाताने घडलेली निर्बीज समाधीशी साधर्म्य दाखवणारी शरीराची स्थिती म्हणा हवं तर. (इथे "शरीरशास्त्र दृटीने" क्लॉज अत्यंत महत्वाचा आहे.) बाकी श्रद्धा, चिकित्सा वगैरे बद्दलचा वाद जुना आहे (आणि त्यात फारसं तथ्य देखील नाहि). आपल्या सभोवती दशदिशांत अनंत ज्ञान पसरलं आहे. ते सर्व काळोखात लुप्त आहे. आपला चिकित्सेचा टॉर्च आपण कुठल्या दिशेवर फोकस करतो व त्या टॉर्चची प्रखरता किती यावर त्या दिशेतलं तेव्हढच ज्ञान आपल्या दृष्टीटप्प्यात येतं. सच्चीदानंद बाबांची घटना योगसामर्थ्याचं उदाहरण आहे हे पटणं चिकीत्सेशिवाय शक्यच नाहि. योगसामर्थ्य म्हणजे पी.सी. सरकारचे जादुचे प्रयोग नव्हे. श्रद्धेशिवाय चिकित्सेला सुरुवातच करता येत नाहि. असो. सध्या गाडी वेगळ्या रूळांवर धावतेय. आपण त्याबद्द्लच बोलुयात. अवांतरः तुम्ही हे सगळं कुतुहल, चिकित्सा दृष्टीने बघता व त्याच दृष्टीकोनातुन तुम्ही हा लेख टाकला याची खात्री आहेच... त्याशिवाय मी प्रतिसाद टंकलाच नसता. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

आबा Tue, 08/13/2013 - 19:33
मृत्यूसमीपच्या अनुभवांचं सांखिकीय विश्लेषण मध्यंतरी वाचनात आलं होतं त्याची लिंक : http://www.koestler-parapsychology.psy.ed.ac.uk/Documents/MobbsWattNDE.pdf आणि त्याचंच मेंदूशास्त्रीय विश्लेषण इथे : http://www.pnas.org/content/early/2013/08/08/1308285110.abstract

सुधीर Mon, 08/12/2013 - 09:43
त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्‍या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा. +१ रमताराम यांचा प्रतिसादही आवडला.

मदनबाण Mon, 08/12/2013 - 10:58
रोचक विषय... बाकी मॄत्यु जवळ आला की मनुष्य आणि इतर प्राणी यांच्या व्यव्हारात बदल होते असे म्हणतात. प्राणी आपल्या मूळ निवास स्थाना पासुन लांब जाउन देहत्याग करतात असे म्हणतात... तर मनुष्य प्राण्यांमधे सुद्धा अशी लक्षणे आठळुन आलेल्याच्या नोंदी आहेत म्हणे... मला माहित असलेली काही लक्षणे इथे देत आहे... ( ती सत्य असल्याचा माझा दावा नाही}) १) ज्याचा मॄत्यु जवळ आला आहे त्याला त्याच्या मॄत नातेवाईकां मधील व्यक्ती दिसु लागतात, किंवा ते बोलवत आहेत असे उल्लेख बर्‍याच वेळा त्यांच्या बोलण्यात करतात. २) भर उन्हात चालताना ज्या व्यक्तीचा मॄत्यु जवळ आला आहे त्या व्यक्तीला त्याची सावली अचानक दिसेनाशी होउ लागते. ३)ज्या व्यक्तीचा मॄत्यु जवळ आला आहे ती व्यक्ती सातत्याने निरवानिरवीची भाषा करु लागते...जवळच्या व्यक्तींना स्वतःच्या आर्थीक व्यव्हारांची माहिती देउ लागते. ४)बर्‍याच वेळा ज्याचा मॄत्यु जवळ अगदी जवळ आला आहे त्याला उलट्या आणि जुलाब होतात.

In reply to by मदनबाण

यशोधरा Mon, 08/12/2013 - 11:36
कानाच्या पाळ्या निस्तेज होतात डोळ्यांतील बाहुल्या मोठ्या होतात चेहर्‍यावर तेज दिसते (बुझनेसे पयले का दिया) किंवा निस्तेज होतो (तेल संपलंवाला दिया) वगैरे..

In reply to by मदनबाण

इनिगोय Tue, 08/13/2013 - 19:42
लेखाची मांडणी आवडली. बाकी चर्चा वाचत आहे. वर दिलेल्या क्रमांक १ च्या बाबतीतली ही आठवण. ओळखीच्या एका लेखकांनी हयातभर टोपणनाव घेतले होते. त्याच नावाने ते लेखन करत, आणि कालांतराने कागदोपत्रीही तेच नाव वापरत. अंतःकाळी, शेवटच्या दोनेक दिवसात त्यांना त्या टोपणनावाने वावरणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारांसाठी घरात गर्दी जमल्याचा भास होई. त्या गर्दीत स्वतःचे (दिवंगत) नातेवाईक दिसतायत असंही ते सांगत. मात्र ते नाव आपलंच आहे, याचा त्यांना पूर्ण विसर पडला होता. त्या काळात ते स्वतःचा उल्लेख मूळ नावाने करत होते. अशावेळी नेमकी कोणती माहिती शिल्लक राहत असावी आणि कोणती पुसली जात असावी? का?

प्रभाकर पेठकर Mon, 08/12/2013 - 11:25
१ आणि ३ ही लक्षणे मृत्यू समिप आल्याची द्योतक वाटत नाहीत. पण 'आपला मृत्यू आता समिप आहे' अशा विचारांनी पछाडलेल्या कुणाही व्यक्तीच्या बाबतीत घडू शकतात. २ मध्ये वर्णीलेली अवस्था सूर्य बरोब्बर डोक्यावर असेल तर घडू शकते. तेंव्हाही सावली पायाशी असतेच पण मृत्यूच्या भयाने (तसा विचार कोणीतरी मनांत भरवला असेल तर..) दिसत नाही. ४ मध्ये वर्णिलेली परिस्थिती अनेकांच्या बाबतीत अनेकदा घडूनही ते मृत्यू पावले नाहीत. (वेळीच उपचार झाले असावे त्यामुळे डिहायड्रेशन {मृत्यूचे एक कारण} टळले असावे.) तसेच अनेक जणं उलट्या-जुलाबांशिवायही इहलोक सोडून गेल्याची अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसतात.
( ती सत्य असल्याचा माझा दावा नाही})
बापरे! अशी माणसे कंस बंद करताना दोनदा करतात का?....ह.घे.

बाळ सप्रे Tue, 08/13/2013 - 11:47
लेखनशैली आवडली!! परंतु मृत घोषित केलेल्याचे हृदय चालू करण्याच्या घटनेचा सच्चिदानंद बाबांना जीवंत करण्याच्या घटनेशी ताळमेळ लावण्याचा प्रयत्न हा .. पुष्पक विमाने वगैरे उदाहरणासारखाच आशावाद वाटतो. मृत घोषित केल्यावर काही वेळाने हृदय चालू करणे असे प्रयत्न डॉ. मांडक्यांसारख्या हृदयरोगतज्ञांनीही केलाय. जिथपर्यंत मेंदु जीवंत आहे तोवर ते कठीण असलं तरी अशक्य नसतं. सच्चिदानंद बाबांसारख्या गोष्टी या एखाद्या व्यक्तिचे उदात्तीकरण करण्याच्या नादात पसरवलेल्या अफवाच जास्त वाटतात. कारण ह्या गोष्टी सांगणार्‍या एकालाही जीवंत कसे केले यबद्दल एकही शब्द लिहावा/ सांगावासा वाटला नाही . कारण सांगणार्‍यांना त्यात जीवंत करण्याच्या प्रक्रियेपेक्षा ज्ञानेश्वर कसे श्रेष्ठ हे दाखवणे जास्त मोलाचे होते.. ज्ञानेश्वर्/ज्ञानेश्वरीचे साहित्यिक अध्यात्मिक मूल्य वादातीत आहे म्हणून ज्ञानेश्वर सर्व जीवनात काहिही करु शकतं अस उदात्तीकरण करण्याची प्रवृत्ती ही अशा कथांना कारणीभूत आहे.

In reply to by बाळ सप्रे

अनिरुद्ध प Tue, 08/13/2013 - 13:40
अगदि अगदि,हे विधान पटले परन्तु,वयाच्या अवघ्या २१ वर्ष असताना सन्जीवनी समाधी घेतल्याने तरि ज्ञानेश्वरान्चे श्रेष्ठ्त्व सिद्ध व्हायला हरकत नसावि,आणि या बाबतित तरी धागाकर्त्याचे मत जाणुन घ्यायला आवडेल कारण त्यान्चा ज्ञानेश्वरान्चा अभ्यास खूपच प्रगल्भ आहे असे त्यानी म्हटले आहे.

In reply to by अनिरुद्ध प

धन्या गुरुवार, 08/15/2013 - 07:43
आणि या बाबतित तरी धागाकर्त्याचे मत जाणुन घ्यायला आवडेल कारण त्यान्चा ज्ञानेश्वरान्चा अभ्यास खूपच प्रगल्भ आहे असे त्यानी म्हटले आहे.
अहो पुर्ण लेखात मी कुठेही माझा ज्ञानेश्वरांचा अभ्यास खुपच प्रगल्भ आहे असं म्हटलेलं नाही. नाही म्हणायला एका प्रतिसादात असं लिहिलंय की कधी काळी ज्ञानदेवाने मला झपाटलं होतं. एखादया व्यक्तीच्या विचारसरणीचं, जीवन चरीत्राचं प्रगल्भ अभ्यास करणं आणि त्या व्यक्तीच्या गुणांनी झपाटून जाणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जेमतेम चार दिवसांपूर्वी मी लिहिलेल्या लेखात मी जे लिहिलंच नाही ते माझ्या नावावर खपवलं जातंय तर दुनिया ईकडची तिकडे होईल यात नवल काय?
वयाच्या अवघ्या २१ वर्ष असताना सन्जीवनी समाधी घेतल्याने तरि ज्ञानेश्वरान्चे श्रेष्ठ्त्व सिद्ध व्हायला हरकत नसावि
ज्ञानदेव आपल्याला कधी कळलेच नाहीत. संजीवन समाधी घेण्यानं का कुणी श्रेष्ठ ठरतो? ज्ञानदेव खर्‍या अर्थाने ज्ञानाचा ईश्वर होते. ज्ञानदेव ज्ञानेश्वरीत शब्दसौंदर्याची उधळण करणारे सौंदर्याचे उपासक होते. ज्या समाजाने आई वडीलांच्या रुढींच्या आहारी जाऊन आई वडीलांचा बळी घेतला, ज्या समाजाने माधूकरीसाठी झोळी घेऊन फीरत असताना दगड मारली, झोळीच्या चिंध्या केल्या त्याच समाजासाठी "जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात" असं म्हणणारे ज्ञानदेव हा करुणेचा सागर होते. भारतीय तत्वज्ञानाचा अर्क असलेल्या भगवदगीतेवर नऊ हजार ओव्यांची टीका लिहूनही त्याचे सारे श्रेय आपल्यापेक्षा जेमतेम तीन चार वर्षांनी मोठ्या परंतू गुरुस्थानी असलेल्या भावाला आणि श्रोत्यांना देणारे ज्ञानदेव हे नम्रतेचं मुर्तीमंत रुप होते. कुठेतरी वाचलेलं आठवतंय, ज्ञानदेव हे आठशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. किती यथार्थ आहे हे वर्णन! संजीवन समाधीबद्दल पुन्हा कधीतरी लिहिन सवडीने, नामदेवांनी लिहिलेल्या "समाधीचे अभंग" चा संदर्भ घेऊन.

In reply to by धन्या

अनिरुद्ध प Fri, 08/16/2013 - 13:09
साहेब्,मी कुठे तरि वाचलेय्,कुठल्याही गोष्टीचे झपाट्लेपण हा त्या विषयाचा प्रगल्भ अभ्यास करण्यास प्रव्रुत्त करतो,असो आपला अभ्यास हा माझ्यामते माझ्या अल्पज्ञाना पेक्षा कितितरि पटिने प्रगल्भ आहे यात शन्काच नाही,जर आप्ल्याला माझ्या लेखनाचा रोख तिरकस वाट्ला असेल तर क्षमस्व,तसेच आपणसुद्धा प्रतिसाद देवुन ज्ञानात मोठी भर घातल्याबद्दल धन्यवाद,तसेच काही बाबतित आपले विचार जाणुन घ्यायचे आहेत्,तर व्य नि केल तर चालेल का?

In reply to by बाळ सप्रे

>सच्चिदानंद बाबांसारख्या गोष्टी या एखाद्या व्यक्तिचे उदात्तीकरण करण्याच्या नादात पसरवलेल्या अफवाच जास्त वाटतात. = करेक्ट >कारण ह्या गोष्टी सांगणार्‍या एकालाही जीवंत कसे केले यबद्दल एकही शब्द लिहावा/ सांगावासा वाटला नाही = आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो! इतकंच नाही तर त्यापुढे जाऊन तसं नक्कीच झालं असावं हे लोकांना पटवायला एनडिए सारख्या गोष्टींचा आधार घेतो. जर गेलेला माणूस जीवंत करता येतो तर अध्यात्माची गरजच काय? अमृताचा शोधच निरर्थक आहे. यू हॅव द फॉर्म्युला, देन वाय वेस्ट टाईम? >सांगणार्‍यांना त्यात जीवंत करण्याच्या प्रक्रियेपेक्षा ज्ञानेश्वर कसे श्रेष्ठ हे दाखवणे जास्त मोलाचे होते. = इतकी साधी गोष्ट लोकांना आज देखील कळू नये याचं नवल वाटतं. >ज्ञानेश्वर्/ज्ञानेश्वरीचे साहित्यिक अध्यात्मिक मूल्य वादातीत आहे म्हणून ज्ञानेश्वर सर्व जीवनात काहिही करु शकतं अस उदात्तीकरण करण्याची प्रवृत्ती ही अशा कथांना कारणीभूत आहे. हा भाग सर्वात मोलाचा आहे! या प्रकारांनी, ज्ञानेश्वरांची प्रतिभा ज्ञानेश्वरीतून निर्विवाद सिद्ध झालेली असतांना, ती निष्कारण वादात येते. त्यांनी ज्ञानेश्वरीत काय सांगितलंय याऐवजी लोक भोळसटासारखे चमत्कारांच्या मागे लागतात. असे चमत्कार जोडून आपण उत्तमोत्तम साहित्याची वाट लावतो, स्वतःची आणि इतरांची दिशाभूल करतो आणि लोक अध्यात्मापासून वंचित होतात ही जनजागृती होईल तो सुदिन.

In reply to by अनिरुद्ध प

ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी कशाला लिहीतील? द फॉर्म्युला विल सुपरसिड स्पिरिश्युअ‍ॅलिटी! मृत्यू निश्चित आहे म्हणून तर अमृताचा (सत्याचा) शोध आहे, ही साधी गोष्ट लक्षात येतेय का पाहा. लोक इतके भंपक आहेत की असे श्लोक नंतर जोडून, उदत्तीकरणाच्या नादात, ते संपूर्ण ग्रंथाच्या प्रयोजनाचीच वाट लावतात.

In reply to by संजय क्षीरसागर

अनिरुद्ध प Wed, 08/14/2013 - 16:04
वर जो प्रसन्ग सान्गितला आहे त्यात 'ज्ञानेश्वरी' ही ज्ञानेश्वरानी लिहिली आहे असे कुठे म्हटले आहे,त्यानी असे म्हटले आहे कि 'ज्ञानेश्वरी' हि ज्ञानेश्वर महाराजान्नी सान्गितली आणि ती सच्चिदनन्द बाबानी लिहिली आहे.

In reply to by बाळ सप्रे

धन्या गुरुवार, 08/15/2013 - 07:18
सच्चिदानंद बाबांसारख्या गोष्टी या एखाद्या व्यक्तिचे उदात्तीकरण करण्याच्या नादात पसरवलेल्या अफवाच जास्त वाटतात. कारण ह्या गोष्टी सांगणार्‍या एकालाही जीवंत कसे केले यबद्दल एकही शब्द लिहावा/ सांगावासा वाटला नाही . कारण सांगणार्‍यांना त्यात जीवंत करण्याच्या प्रक्रियेपेक्षा ज्ञानेश्वर कसे श्रेष्ठ हे दाखवणे जास्त मोलाचे होते.. ज्ञानेश्वर्/ज्ञानेश्वरीचे साहित्यिक अध्यात्मिक मूल्य वादातीत आहे म्हणून ज्ञानेश्वर सर्व जीवनात काहिही करु शकतं अस उदात्तीकरण करण्याची प्रवृत्ती ही अशा कथांना कारणीभूत आहे.
सहमत आहे. मृत व्यक्ती जिवंत होऊ शकत नाही. पण समजा एखादी तशी घटना घडलीच असेल तर त्यामागे काय तथ्य असू शकेल याचा मागोवा घेण्याचा एक छोटासा प्रयत्न या लेखात केला आहे.

सौंदाळा Tue, 08/13/2013 - 14:08
लेख छान वाटला. याच विषयावर नारायण धारपांचे एक पुस्तक वाचले होते. (नाव कोणाला माहीत असेल तर क्रुपया सांगा, परत वाचायचे आहे) एक आश्रम चालवणारे आचार्य एका आत्महत्या करायला निघालेल्या तरुणीला वाचवतात (ती पाण्यात बुडुन काही वेळ झाल्यावर) आणि नंतर तिच्यावर काहीतरी प्रयोग करतात. आचार्यांना कोणतीतरी सिद्धी प्राप्त करुन घ्यायची असते आणि त्यासाठी प्रयोग करायला म्रुत्युच्या अगदी जवळ जाउन परत आलेलीच व्यक्ती पाहीजे असते अशा प्रकारची मस्त (भय)कथा होती. उर्जा अक्षय्यतेचा नियम (लॉ ऑफ कॉन्सर्वेशन ऑफ एनर्जी) यात उर्जा/एनर्जी शब्द काढुन तेथे 'जीव' हा शब्द घातला तर...

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

वामन देशमुख Tue, 08/13/2013 - 20:31
नारायण धारपांचे पुस्तक देवाज्ञा http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=4899010251605104523&PreviewType=books http://www.bookganga.com/eBooks/Book/4899010251605104523.htm?Book=Devadnya

विज्ञान नविन असं काहीच निर्माण करत नसतं. ते फक्त निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल करत असतं. आता या क्षणी ज्या गोष्टी अतिंद्रीय, चमत्कार वाटत आहेत त्या तशा नाहीत. फक्त त्यामागचा कार्यकारणभाव आज तरी विज्ञानाला आपल्याला माहिती नाही. आणि या विश्वात निसर्ग नियमांपलिकडे जाऊन काहीही होत नसतं.
तू तर अंनिसचा कार्यकर्ता च झाला कि! http://news.bbc.co.uk/2/hi/7794783.stm इथे एक आंधळी व्यक्ती खोलीतून वाट काढत कशी जाते हे दाखवले आहे. मेंदूचे अंतरंग कसे चकित करणारे असते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

धन्या गुरुवार, 08/15/2013 - 07:04
तू तर अंनिसचा कार्यकर्ता च झाला कि!
कार्यकर्ता असं नाही काका. पण ही विचारसरणी नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव यांचं लेखन मनावर खोलवर भिडल्यामुळेच तयार झाली आहे.

प्यारे१ Wed, 08/14/2013 - 19:29
ह्याचं कारण म्हणजे आम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये जे काही सांगितलंय ते आचरणात आणणं जमत नाही. पण पटतं. मग करायचं काय? 'ज्ञानेश्वर महाराज की जय' म्हणायचं. ते करण्यासाठी काही अशा गोष्टी ज्या आपल्याला चमत्कार वाटाव्यात, सर्वसामान्यांना न समजणार्‍या अशा चरित्रात आणायच्या. मग 'जमतं'. १६ व्या वर्षी संस्कृत गीतेवर ९०००+ ओव्यांची टीका लिहीणं हा 'चमत्कार' पुरेसा नाही काय????? आमची ३३ व्या वर्षी अजून साधी वाचून होत नाही गीता. असो.

In reply to by प्यारे१

धन्या गुरुवार, 08/15/2013 - 07:14
१६ व्या वर्षी संस्कृत गीतेवर ९०००+ ओव्यांची टीका लिहीणं हा 'चमत्कार' पुरेसा नाही काय?????
चमत्कार हा शब्द काही आपण सोडून दयायला तयार नसतो. वयाच्या सोळाव्या वर्षी संस्कृत गीतेवर नऊ हजार ओव्यांची टीका लिहिली ही बाब अपवादात्मक असली तरी त्यात चमत्कार कसला? ज्ञानेश्वरी हा ज्ञानदेवांच्या तेजस्वी बुद्धीमत्तेचा, प्रगल्भतेचा, प्रतिभाशक्तीचा आणि त्यांच्या आई वडीलांच्या त्यांच्यावरील संस्कारांचा आविष्कार होता.
आमची ३३ व्या वर्षी अजून साधी वाचून होत नाही गीता.
एकदा हरीनाम सप्ताहात पारायणाला बसा, तीन दिवसांत वाचून होईल.

In reply to by धन्या

प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/15/2013 - 13:46
वयाच्या सोळाव्या वर्षी संस्कृत गीतेवर नऊ हजार ओव्यांची टीका लिहिली ही बाब अपवादात्मक असली तरी त्यात चमत्कार कसला?
तेजस्वी बुद्धीमत्ता, प्रगल्भता, प्रतिभाशक्ती >>> ह्या गोष्टी कश्या काय आल्या त्यांच्या कडे ? बरं मग आल्या तर आल्या पण फक्त त्यांच्या कडेच का आल्या ? निव्वृत्ती नाथ हे श्रेष्ठ होते ते स्वतःच का बरे नाही लिहु शकले ? किंवा सोपानांचा एखादा असा ग्रंथ मला तरी माहीत नाही ...एव्हन फॉर दॅट सेक , चांगदेवही बुध्दीमान प्रगल्भ आणि प्रतिभावान होते + योगी होते पण त्यांनी लिहिलेला एकही ग्रंथ का बरे समाजाच्या लक्षात राहु नये ? शिवाय माझ्या माहीती प्रमाणे जेव्हा विठ्ठलपंतानी देहत्याग गेला तेव्हा ज्ञानेश्वर महाराज केवळ १० वर्षाचे होते मग केवळ ८-९ वर्शाच्या संस्कारात एक लहान बाळ इतकं काही ग्रास्प करतो हा चमत्कार नव्हे का ? शिवाय भगवद्गीता , १८ उपनिषदे ब्रह्मसुत्र ह्यांच्या अभ्यासाला सामान्य माणसाला किमान ३ ते ५ वर्ष लागतील . अन त्यावर असे क्लासिक भाष्य करायला अजुन जास्त !! थोडक्यात ज्ञानेश्वर असामान्य होते हे कुठे तरी मान्य करावेच लागेल ...ह्यालाच भोळे भाबडे लोक चमत्कार म्हणतात . थोडक्यात काय तर ज्या गोष्टी , ज्यांचा कार्यकारण भाव आपल्या बुध्दीला समजत नाहीत त्यांना आपण चमत्कार म्हणतो .त्यामुळे प्रत्येकाचा चमत्कार घटनांचा सेट भिन्न भिन्न असेल ..... तेव्हा केवळ आपल्याला कळाले आहे म्हणुन उगाचच दुसर्‍यांच्या श्रध्दांना / किंव्वा अंधश्रध्दांनाही चमत्कार म्हणुन झिडकारणे हे योग्य नव्हे . (अवांतर : ही असली असहिष्णुता अंनिस च्या प्रत्येक कार्यक्रमात दिसुन येते , त्यामुळे अंध्द्श्रध्दा निर्मुलनाची इच्छा असुनही कित्येक पुरोगामी हिंदु अंनिस पासुन २ हात अंतर राखुन आहेत )

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या गुरुवार, 08/15/2013 - 14:57
तुमच्या सार्‍या आक्षेपांचं उत्तर तुम्हीच दिलंय. :)
थोडक्यात ज्ञानेश्वर असामान्य होते हे कुठे तरी मान्य करावेच लागेल ...ह्यालाच भोळे भाबडे लोक चमत्कार म्हणतात .
असामान्य बुद्धीमत्तेची, प्रतिभाशक्तीची मुलं जन्माला येणं, त्या असामान्य अशा मुलांना पोषक असं वातावरण बालपणी मिळाल्यावर ती बुद्धीमत्ता, प्रतिभाशक्ती अजून उजळून निघणं यात चमत्कार कसला. अपवादात्मक परिस्थीतीमध्ये असं घडू शकतं. वयाच्या आठव्या वर्ष मुलं जोडाक्षरं शिकत असतात. परंतू तमिळनाडूमधील लविनश्री नावाच्या मुलीने वयाच्या आठव्या वर्षी मायक्रोसॉफ्ट प्रमाणित संगणक व्यवसायिक झाली. हा ही चमत्कार म्हणायचा का?

In reply to by धन्या

प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/15/2013 - 15:49
अरे मित्रा ,सर्वसामान्य माणसांच्या पोटी असामान्य बुध्दीमत्तेची मुले जन्माला येणे हा चमत्कारच आहे !! आणि बरीच उदाहरणे आहेत अशा चमत्कारांची एक यःकश्चित राजा की ज्याचे राज्य पंचक्रोशीबाहेर माहीतही नसेल त्याच्या पोटी असा पुत्र जन्माला यावी की करोडो लोकांनी त्याच्या उपासनेला लागुन जावे . किंव्वा एक यःकश्चित सुतार आणि त्याच्या बायकोला झालेला मुलगा ( तोही त्याच्याकडुन हे निश्चित नाही ) एतका महान व्हावा की आज अर्ध्या अधिक जगाने त्याचा मार्ग मान्य करावा !! अनुवंशिकतेच्या सिध्दांतानेही ह्यांचे स्पष्टीकरण देता येणार नाही . तेव्हा ह्या अशा आपल्या आकलनाच्या पलीकडेही अशा खुप गोष्टी आहेत ...आहेतच ... त्यांना चमत्कार म्हणायला काहीच हरकत नसावी . आणि हे विधान अध्यात्माच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टीत ...विज्ञानातही लागु होते .

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या गुरुवार, 08/15/2013 - 16:02
ठीक आहे. सर्वसामान्य माणसांच्या पोटी असामान्य बुध्दीमत्तेची मुले जन्माला येणे हा चमत्कारच आहे हे मी मान्य कातो. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकटराजा गुरुवार, 08/15/2013 - 16:42
असेच तिथेच का असे प्रश्न आपल्याला नेहमी पडतात त्याच्याकडे चमत्कार म्हणून पाहिले जाते. त्याला एकच उत्तर पुरेसे आहे ..ते म्हणजे योगायोग.. विनाश पर्यावसायी गोष्टीनाही हेच उत्तर लागू होते. कारण निसर्गात मुळातच शुभ अशुभ असे काही नसते. त्याच्यी व्याप्ती ज्ञानेशांच्या दिव्यते पेक्षाही मोठी त्यांच्या रचनेने स्तिमित झालेल्या तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसांपेक्क्षाही मोठी . आता वैज्ञानिक बिग बँग चे कारण ही " योगायोग" असे मानू लागले आहेत.

In reply to by चौकटराजा

धन्या गुरुवार, 08/15/2013 - 18:48
आता वैज्ञानिक बिग बँग चे कारण ही " योगायोग" असे मानू लागले आहेत.
बिग बँग होण्यास एका सेकंदाचा जरी उशीर झाला असता तरी कदाचित हे विश्व अस्तित्वात आलं नसतं असं काहीसं स्टीफन हॉकिग्जच्या "ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम" मध्ये वाचल्याचं आठवतंय.

In reply to by प्रसाद गोडबोले

विजुभाऊ Sat, 08/17/2013 - 00:16
तेव्हा केवळ आपल्याला कळाले आहे म्हणुन उगाचच दुसर्‍यांच्या श्रध्दांना / किंव्वा अंधश्रध्दांनाही चमत्कार म्हणुन झिडकारणे हे योग्य नव्हे .
त्याचबरोबर मी म्हणतो म्हणून तुम्ही सुद्धा मानाच हा आग्रह कशाला. अंधश्रद्धा नको पण श्रद्धा असायला काय हरकत आहे असा एक फसवा युक्तीवाद केला जातो. श्रद्धा कशाला म्हणायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. पंढरपूरच्या विठोबाला स्मरून शेतकरी काम करायला लागतो. आणि असत्यसाईबाबांच्या / नित्यानन्द बाबा / राधे मा यांच्या भजनी लागून त्याम्च्यावर पैसे आणि वेळ खर्च करत ओया दोन्हीना श्रद्धा म्हणायए की अंधश्रद्धा ? अंधश्रद्धे पायी अशिक्षीत लोकांची होणारी लुबाडणूक कशी होते ते देवदासी प्रथेसारख्या एखाद्या उदाहरणावरुन सुद्धा कळून येईल.
(अवांतर : ही असली असहिष्णुता अंनिस च्या प्रत्येक कार्यक्रमात दिसुन येते , त्यामुळे अंध्द्श्रध्दा निर्मुलनाची इच्छा असुनही कित्येक पुरोगामी हिंदु अंनिस पासुन २ हात अंतर राखुन आहेत )
यात काय आली असहिष्णुता? उलट श्रद्धेच्या कितीतरी बुवानी बापूनी लोकाना येडे बनवले आहे. अंधश्रद्धेला अंधश्रद्धा म्हंटले तर त्यात कसली आली असहीष्णुता? पुरोगामी हिंदू? म्हणजे नक्की काय हो? अवांतरः जानवे घालणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा ? श्रावणीला पम्चगव्य प्राशन करणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा? सत्यनारायणाच्या कथेतील साधुवाण्याची गोष्ट खरी मानायची की खोटी? रामायण हा इतीहास की केवल कवी कल्पना? कवी कल्पना असल्यास काही हरकत नाही. इतिहास मानल्यास गर्भवती बायकोला कोणाच्यातरी सांगण्यावरून काहिही शहानिशा न करता टाकून देणार्‍या रामाला आदर्श का मानायचे? अती अवांतर : रामाने वाली बरोबर काहीही वैर नसताना त्याची हत्या का केली? रामाने शंबुकाला काहीही चुक नसताना कानात शिसे ओतुन ठार मारण्याची आज्ञा का दिली? असो..... असे माझे प्रश्न आहेत.

In reply to by विजुभाऊ

शिल्पा ब Sat, 08/17/2013 - 00:30
विजुभौंचे प्रश्न भारी आवडले. अनिंसवाले हिंदूंच्याच मुळावर का असतात बॉ ? इथे हिंदू खूप आहेत वेग्रे युक्तिवाद चालणार नैत. अन देवदासी वगैरे वाईट प्रथांच्या विरोधात बहुतेक सगळेच जण आहेत. (ज्यांचे काही आर्थिक/सामाजिक वेग्रे हितसंबंध गुंतलेले नाहीत ते) बाकी ती शाम्बुकाची काय ती गोष्ट मला माहित नहि… सांगता का? खवत सांगितली तरी चालेल.

In reply to by विजुभाऊ

असे माझे प्रश्न आहेत.
विजुभाऊ , मागील चर्चेत बोलल्याप्रमाणे ..... आपण वारीच्या सुधारणेसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेणारा लेख मिपावर पब्लिश झाला की (मी माझ्या कुवतीप्रमाणे) उत्तरे देईन ....पण तुम्हाला काही काम करायची इच्छाच नसेल अन नुसतीच ग्यानबाजी करायची असेल तर .. मला असल्या इंटलेक्चुअल मास्टर्ब्युशन मधे इंटरेस्ट नाही . सो , आपण हिंदुधर्म सुधारणेसाठी केलेल्या सकारात्मक कार्यावरच्या लेखाची वाट पहात आहे . बाकी , तुमच्या लेखाच्या प्रतिसादांत बोलु ....

In reply to by प्रसाद गोडबोले

विजुभाऊ Sun, 08/18/2013 - 23:10
ला असल्या इंटलेक्चुअल मास्टर्ब्युशन मधे इंटरेस्ट नाही . हा हा हा हा. या अध्यत्मिक क्रीयेबद्दल भलतेच प्रेम आहे हो तुम्हाला? असो. कोणाला काय आवडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.मला बापुड्याला काहीच ग्यान नाही. ते मिळाएव म्हणून प्रश्न विचारले. उत्तर नसेल येत तर नका देवू. अवाम्तरः या धाग्याच अन वारीचा कसलाही संबन्ध नसावा. मी एका स्वतन्त्र धाग्यावर काही प्रश न्विचारले आहेत. त्याच्याशी इतर धाग्यांचा सम्बन्ध कशाला लावला जातोय. "The problem in mud wrestling with a pig is not that you get dirtier,but the pig enjoyes it."