✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सच्चिदानंद बाबांची गोष्ट

ध
धन्या यांनी
Sun, 08/11/2013 - 10:58  ·  लेख
लेख
गोष्ट तशी खुप जूनी. जवळपास आठशे वर्षांपूर्वीची. आताच्या आहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नावाचं गाव. गावातील मोहिनीराजाचं मंदीर थेट समुद्रमंथनातील अमृतवाटप आणि विष्णूच्या मोहीनी अवताराच्या कथेशी निगडीत. या गावातील मुख्य रस्त्यातून एका सुंदर सकाळी संन्याशी वाटावीत अशी चार मुलं, तीन मुलगे आणि एक मुलगी मार्गक्रमण करत असतात. चौघांच्याही वयात थोडे थोडे अंतर असल्याचे जाणवत होते. एकमेकांच्या पाठीला पाठ लावून जन्माला आलेली सख्खी भावंडेच जणू. चौघांच्याही चेहर्‍यावर एक अतीव समाधान, शांती विलसताना दिसत होती. वाट चालत असताना या मुलांच्या समोरुन एक प्रेतयात्रा येते. प्रेतयात्रेच्या पुढे चालणारी एक स्त्री यातील एका बाल संन्याशाच्या पायावर भक्तीभावाने डोके ठेवते."अष्टपुत्रा सौभाग्यवती भव", तो बाल संन्याशी स्त्रीच्या चेहर्‍यावर हात ठेवून डोळे मिटून म्हणतो. स्त्री दचकते. दोन पावले मागे सरकते. संन्याशालाही प्रश्न पडतो. "काय झालं माई? दचकलात का?" संन्याशी शांतपणे विचारतो. "महाराज, तुमचा हा आशीर्वाद या जन्मी लाभणे शक्य नाही. ही माझ्या नवर्‍याची प्रेतयात्रा आहे." संन्याशी क्षणभर विचारात पडतो. पुढच्या क्षणी तो खांदा देणार्‍यांना तिरडी खाली उतरायला सांगतो. प्रेत कफनातून मोकळे करण्याची आज्ञा देतो. संन्याशाच्या चेहर्‍यावरील तेज पाहून त्याच्या शब्दाचा अव्हेर करण्याचे धाडस कुणालाच होत नाही. प्रेत कफनातून मोकळे केले जाते. "उठा सच्चिदानंद बाबा", तो बालसंन्याशी प्रेताच्या कपाळावर हात ठेवून म्हणतो. आणि काय आश्चर्य, ते प्रेत जिवंत होते. त्या बाल संन्याशाला नमस्कार करते. या सच्चिदानंद बाबांना पुढे हा बालसंन्याशी आपल्या भगवदगीतेवरील टीकेचा लेखक व्हायला सांगतो. ही त्या बालसंन्याशाची भगवदगीतेवरील टीका या सच्चिदानंद बाबांच्या उल्लेखाने संपते. शके बाराशते बारोत्तरे | तैं टीका केली ज्ञानेश्वरें || सच्चिदानंद बाबा आदरें | लेखकु जाहला || अजून एक गोष्ट. ही गोष्ट अगदी अलीकडची. १९८२ सालातली. मेल्व्हीन मॉर्स हे अमेरिकेच्या सिअ‍ॅटल येथील एका बालरुग्णालयात स्थायी वैद्यकतज्ञ म्हणून काम करत होते. अचानक त्यांना आयडाहोमधील पोकाटेलो येथून तातडीच्या मदतीसाठी बोलावले जाते. क्रिस्टल मेझलॉक नावाची एक आठ वर्षांची मुलगी पोहण्याच्या तलावात बुडाली होती. मॉर्स त्या ठीकाणी पोहचले तेव्हा त्या मुलीच्या हृदयाची धडधड थांबून १९ मिनिटे झाली होती.तिची बुब्बुळे विस्फारीत होउन स्थिरावली होती.मॉर्सनी आपले कौशल्य वापरुन त्या मुलीच्या छातीवर दाब देऊन तसेच इतर उपायांनी तिचे हृदय चालू करण्याचा प्रयत्न केला. आणि ते चालू झालेही. मुलीच्या हृदयाची धडधड चालू होताच पुढचे उपचार स्थानिक वैद्यांवर सोपवून मॉर्स आपल्या रुग्णालयात परतले. त्यानंतर काही आठवडे लोटले. मॉर्स दुसर्‍या एका रुग्णालयात काही कामानिमित्त गेले होते. त्याच रुग्णालयात क्रिस्टलवर उपचार चालू होते. मॉर्सना याची काहीच कल्पना नव्हती. क्रिस्टलला चाकाच्या खुर्चीवरुन एका खोलीतून दुसर्‍या खोलीत नेत असताना समोरुन मॉर्स गेले. त्यावेळी त्यांच्याकडे बोट दाखवून क्रिस्टल ओरडली, "हीच ती व्यक्ती, जिने माझ्या नाकात नळ्या खुपसल्या आणि त्यातून पाणी बाहेर काढलं." हे ऐकून मॉर्सना धक्काच बसला. कारण मॉर्सनी त्या मुलीवर जेव्हा उपचार केले तेव्हा ती मुलगी तांत्रिकदृष्ट्या म्रुतावस्थेत होती. त्यामुळे तिला आपल्यावर कोण उपचार करत आहे याची जाणिव होणे शक्यच नव्हते. मॉर्स यांनी क्रिस्टलच्या अनुभवाचा अभ्यास करायचे ठरवले. थोडयाच काळात या प्रकाराला मृत्यूसमीप अनुभव (नियर डेथ एक्स्पेरियन्स) म्हणतात हे ल़क्षात आले. या प्रकारावर तोपर्यंत जरी विपुल लेखन आणि नोंदी झाल्या असल्या तरी त्या सार्‍या नोंदी प्रौढांच्या होती. आतापर्यंत लहान मुलांच्या बाबतीत अशी कुठलीच नोंद झालेली नव्हती. मॉर्स यांनी या विषयावरचे वाचन तर वाढवलेच परंतू स्वतःही इतर लहान मुलांच्या अशा मृत्यूसमीप अनुभवांची नोंद करायला सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सार्‍या मुलांच्या अनुभवात समानता होती.काळोखी बोगदे, मृत नातेवाईकांशी भेट, देव-देवता पाहणे असंच वर्णन सार्‍या मुलांनी केलं होतं. याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या या आठवणींमध्ये चक्क त्यांच्यावर उपचार होत असतानाच्याही आठवणी होत्या. आणि उपचार चालू असताना ती मुलं तांत्रिकदृष्ट्या मृत झाली होती. विज्ञानाने या अनुभवांचा पाठपुरावा चालूच ठेवला. वैज्ञानिकांनी बरेच सिद्धांत मांडले. त्यातील सामायिक कारणे काहीशी अशी आहेतः रक्तप्रवाह थांबणे, डोळ्यांना ऑक्सीजनचा पुरवठा थांबणे, शरीर मृत्यूशी झुंज देत असताना एपिनेफ्राईन आणि अ‍ॅड्रनलाईन अतिरिक्त प्रमाणात शरीराबाहेर स्त्रवणे. हा प्रश्न अगदी सर्वमान्य पद्धतीने निकाला निघाला नसला तरी वैज्ञानिकांनी माणसांवर संप्रेरकांचे प्रयोग करुन कृत्रिमरीत्या मृत्यूसमीप अनुभव निर्माण करण्यात यश मिळवले आहे. विज्ञान नविन असं काहीच निर्माण करत नसतं. ते फक्त निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल करत असतं. आता या क्षणी ज्या गोष्टी अतिंद्रीय, चमत्कार वाटत आहेत त्या तशा नाहीत. फक्त त्यामागचा कार्यकारणभाव आज तरी विज्ञानाला आपल्याला माहिती नाही. आणि या विश्वात निसर्ग नियमांपलिकडे जाऊन काहीही होत नसतं. त्यामुळे सच्चिदानंद बाबांची गोष्ट आपल्याला त्या बालसंन्याशाच्या योगसामर्थ्याचा चमत्कार वाटत असला तरी त्यामागेही अशीच काहीतरी वैज्ञानिक कारणे असतील. त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्‍या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा. ज्यावेळी माणसाची मती कुंठीत होते, समोर घडलेल्या घटनेचं आकलन होत नाही त्यावेळी त्या घटनेला तो चमत्कार म्हणून मोकळा होतो. ही घटना एका पीढीकडून दुसर्‍या पीढीकडे गोष्ट स्वरुपात हस्तांतरीत होत असताना त्यावर अद्भुततेचा मुलामा अधिक अधिक दाट होत जातो आणि मग आपणही शाळेत विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये जडत्व, गती, न्युटनचे गतीविषयक नियम अभ्यासलेले असतानाही आळंदीला गेल्यावर निरागसपणे विचारतो, "ती भींत कुठे आहे हो?"
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
44547 वाचन

💬 प्रतिसाद (160)

प्रतिक्रिया

प्रकटन आवडले.

प्रास
Sun, 08/11/2013 - 11:05 नवीन
वा! धनाजीराव वा! छान लिहिलेय.
  • Log in or register to post comments

आवडलं.

शिल्पा ब
Sun, 08/11/2013 - 11:06 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments

मस्त. भिंतीचं अप्रूप मलाही

यशोधरा
Sun, 08/11/2013 - 11:17 नवीन
मस्त. भिंतीचं अप्रूप मलाही आहे :)
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Sun, 08/11/2013 - 11:21 नवीन
आपुले मरण पाहिले म्या डोळां..
  • Log in or register to post comments

*****

जेपी
Sun, 08/11/2013 - 11:42 नवीन
*****
  • Log in or register to post comments

आमच्या अण्णांना हा लेख वाचून

किसन शिंदे
Sun, 08/11/2013 - 11:50 नवीन
आमच्या अण्णांना हा लेख वाचून दाखवतो आणि आलेला अनुभव तुला सांगतो. ;)
  • Log in or register to post comments

आवडला लेख...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/11/2013 - 12:28 नवीन
लेख आवडला. धन्स हो धन्याशेठ. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

धनाजीराव, या विषयावर एक

आदूबाळ
Sun, 08/11/2013 - 12:31 नवीन
धनाजीराव, या विषयावर एक कादंबरी वाचली होती. पॅसेज (लेखिका: कॉनी विलीस)
  • Log in or register to post comments

सत्य - असत्य

प्रसाद गोडबोले
Sun, 08/11/2013 - 12:59 नवीन
छान लिहिलय . अशीच एक कथा रामदास स्वामींच्या चरित्रात आहे ( त्यांनी नाशिक येथे एका कुळकर्ण्याला ताटीवरुन उठवले होते .) शेवटच्या पॅरा बाबतीत .... आजच्या विज्ञानवादी लोकांचा एक फार मोठ्ठा घोळ आहे " जी गोष्ट आपल्याल्या लक्षात येत नाही ती चुक आहे " असा एकुणच त्यांचा अ‍ॅटीट्युड असतो. पण मुळातच ज्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नसतात त्या आपल्या ज्ञानकक्षेच्या बाहेर असतात तेव्हा तडकाफडकी त्यांना चमत्कार किंव्वा भोंदुगीरी किंव्वा अंधश्रध्दा असे लेबल लावणे फार फार चुकीचे आहे . "ज्ञानेश्वरांनी भिंत चालवणे , पाठीवर मांडे भाजणे , सच्चिदानंद बाबाला उठवणे किंव्वा चांगदेवांनी वाघावर बसुन येणे किंवा इतर काही ...हे सारे आमच्या आजच्या वैज्ञानिक ज्ञानाच्या कक्षेमध्ये अनाकलनीय आहे . तेव्हा हे खरे असेलही कदाचित पण आमच्या लक्षात येत नाही . तेव्हा नुसते अंधश्रध्दा म्हणुन झिडकारण्यापेक्षा ते समजुन घेण्याच्या प्रयत्न करु किंवा ह्या विषयावर मौन बाळगु " असा एकुणच आपला अ‍ॅटीट्युड असला पाहिजे . हे झाले अध्यात्माच्या बाबतीत . पण इव्हन विज्ञानाच्या बाबतीतही ... नुकतेच एका मिपाकर मित्राने आमच्या ध्यानात आणुन दिले आहे की " सगळीच सत्य असलेली विधाने सिध्द करता येतीलच असे नाही " (अर्थात जे आपल्याला सिध्द करता येत नाहीये ते असत्यच आहे असे आपण ठाम पणे म्हणु शकत नाही . पहा - http://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6del%27s_incompleteness_theorems आणि याही पुढे जावुन , एखादी गोष्ट सत्य किंव्वा असत्य असे आपण कशावरुन ठरवतो तर आपल्याला आलेल्या अनुभवांवरुन . हे अनुभव इंद्रियजन्य असतात आणि म्हणुन ते १००% सत्य असतीलच असे आपण ठरवु शकत नाही . उदाहरणार्थ वाळवंटात माझ्या डोळ्यांना मृगजळ दिसते पण तिथे पाणी नसते . थोडक्यात माझे डोळे माझ्याशीच खोटे बोलत असतात . असेच इतर इंद्रियजन्य अनुभवांविषयीही असते... म्हणुन आपण आपल्या ह्या अनुभवांवरुन एखादी गोष्ट सत्य वा असत्य असे ठाम पणे सांगु शकत नाही ... असो. सत्य असत्य ह्या विषयावर एकदा निवांत काथ्याकुटायला घ्यायचा आहे
  • Log in or register to post comments

अध्यात्म म्हणतं तेच अंतिम

धन्या
Sun, 08/11/2013 - 17:55 नवीन
अध्यात्म म्हणतं तेच अंतिम सत्य नाही. तसेच विज्ञान म्हणते तेच अंतिम सत्य आहे असंही नाही. आज ज्याला आपण सत्य म्हणून उराशी कवटाळत आहोत ते कदाचित उदया ज्ञानाच्या एखाद्या झुळुकेनं खोटं ठरेल. विज्ञानाच्या बाबतीत हे याआधी खुपवेळा झालेलं आहे. त्या त्या वेळी विज्ञानाने नविन सत्याला सामोरं जायची लवचिकता विज्ञानाने दाखवली आहे. दुर्दैवाने हे अध्यात्माच्या बाबतीत होताना दिसत नाही. तुम्ही दिलेल्या ज्ञानदेवांच्या चमत्कारांच्या यादीबद्दल म्हणाल तर या गोष्टी आजच्या विज्ञानवादी बुद्धीला पटत नाहीत. या गोष्टी एकतर रुपके असाव्यात किंवा मग दंतकथा तरी. ज्ञानदेव महान योगी होते, त्यांना या गोष्टी करणे अशक्य नव्हते असं म्हणून आपण या गोष्टींवर विश्वास ठेवतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चारही भावंडांच्या स्वतःच्या साहीत्यात यातील कुठल्याच चमत्काराचा उल्लेख नाही. समजा उदया हे चमत्कार घडले होते असे सिद्ध करणारे संशोधन झाले तर ते स्विकारण्यास काहीच अडचण नसेल. सत्य आणि असत्य यातील फरक सांगताना तुम्ही जे मृगजळाचे उदाहरण दिले आहे ते मला चुकीचे वाटते. मृगजळाचे उदाहरण प्रवचनामध्ये शोभून दिसते. विज्ञानाच्या संदर्भात त्याला अर्थ नाही. विज्ञानासाठी तो दृष्टीभ्रम आहे. विज्ञानाच्या दृष्टीने सार्वत्रिक अनुभव ही सत्याची कसोटी मानली जाते. वैज्ञानिक सत्य हे जगाच्या पाठीवर कुठल्याही कोपर्‍यात त्याच्या पुर्व अटींची पुर्तता झाली की ते तपासुण पाहता येते. अध्यात्मात तसे नाही. तिथे प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. इतकंच नव्हे तर कुणीतरी लिहून ठेवलंय किंवा म्हणून ठेवलंय म्हणून त्याची कसलीही चाचणी न घेता मागाहून री ओढणे सर्रास होते. जाता जाता, अध्यात्म आणि विज्ञान हे दोन वेगळे कॉन्टेक्स्ट आहेत. त्यांची कुठल्याच पॅरामिटर्सवर तुलना होऊ शकत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मान्य पण ...

प्रसाद गोडबोले
Sun, 08/11/2013 - 20:59 नवीन
मान्य पण मुदा असा आहे की अनुभव सत्य की असत्य हे कसे पडताळुन पहाणार ? मृगजळ हा एक दाखला झाला . पाण्यात बुडवलेली काठी वाकडी दिसते . हाईनाचा एक प्रकारचा आवाज लहान बाळ हसत असल्या सारखा येतो. अतिषय दुर्गंधी युक्त ठिकाणी काही रूम फ्रेशनर लावल्याने एकदम फ्रेश असल्याचा फील येतो ,एकुणच बरेचसे अनुभव फसवे असु शकतात ... http://www.youtube.com/watch?v=WnEYHQ9dscY
विज्ञानाच्या दृष्टीने सार्वत्रिक अनुभव ही सत्याची कसोटी मानली जाते.
शिवाय सार्वत्रिकते सोबत सर्वकालीनतही महत्वाची गोष्ट आहे . आणि सार्वकालीनता कशी सिध्द करणार ? ( हे फक्त गणितीय सिध्दांता बाबतीत करणे शक्य आहे कारण तिथे अनुभवांचा संबंध नसतो . ) अवांतरः हा एक भारी व्हिदीयो पहा http://www.youtube.com/watch?v=BHihkRwisbE
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

पंचेंद्रिय सत्यच दाखवितात असे नाही.

चौकटराजा
Wed, 08/14/2013 - 13:19 नवीन
कान नाक त्वचा डोळे व जीभ ही सर्व ज्ञानेंदिये फसविण्यास युक्त अशी आहेत. कलर डोपलर इफेक्ट, साऊन्ड डॉपलर इफेक्ट ,ऑप्टिकल ईल्युजन, ई ने आपण फसतो. नाक तर फसण्याच्या बाबतीत पहिला नंबर आहे. बेडकीचा पाला जिभेला चोळल्यास साखर मातीसारखी लागते. संमोहन अवस्थेत कारले काकडीसारखे आनंदाने खाणारे लोक दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

संमोहन अवस्थेत कारले

प्रभाकर पेठकर
Wed, 08/14/2013 - 14:25 नवीन
संमोहन अवस्थेत कारले काकडीसारखे आनंदाने खाणारे लोक दिसतात.
कारले? अरे व्वा व्वा! ते तर आम्ही कुठल्याही अवस्थेत अगदी आनंदाने खातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

क्या बात है

चौकटराजा
Wed, 08/14/2013 - 19:59 नवीन
अगदी बेशुद्धावस्थेत देखील ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

नाही.

प्रभाकर पेठकर
Wed, 08/14/2013 - 20:02 नवीन
नशीब, मृतावस्थेत देखील का? असे विचारले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

कुळकर्ण्याला नाही हो !

चैदजा
Sun, 08/11/2013 - 18:42 नवीन
कुळकर्ण्याला नाही हो ! कुलकर्ण्याला ऊठवले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ज्यावेळी माणसाची मती कुंठीत

मोदक
Sun, 08/11/2013 - 13:02 नवीन
ज्यावेळी माणसाची मती कुंठीत होते, समोर घडलेल्या घटनेचं आकलन होत नाही त्यावेळी त्या घटनेला तो चमत्कार म्हणून मोकळा होतो. ह्म्म..
  • Log in or register to post comments

काही माहिती द्या..

चौकटराजा
Sun, 08/11/2013 - 13:17 नवीन
धनाजी राव, एका वाक्याबद्द्ल आपल्याला साष्टांग ( म्हणजे टांगे सहित) दंडवत ! ते वाक्य असे.... विश्वात निसर्ग नियमांपलिकडे जाऊन काहीही होत नसतं निसर्गात होणार्‍या घटनाना काहीही अर्थ नसतो.( हे जग मिथ्या आहे !) एखाद्या गोष्टीला चमत्कार म्हणायचे किंवा कसे हे निरिक्षक कोणत्या क्षितिजावर व कोणत्या कोनातून पहात आहे यावर अवलंबून असते. देव जर जे सर्व घडवतो असे मानायचे झाले तर तो ते अबोधपणे घडवतो असेच म्हटले पाहिजे. प्रत्येक गोष्ट मानवी मनाच्या भाषेत हेतूशिवाय होत नसली तरी निसर्ग काही हेतू बाळगून चालतो असे काही मला तरी वाटत नाही.
  • Log in or register to post comments

निसर्गात होणार्‍या घटनाना

धन्या
Sun, 08/11/2013 - 17:30 नवीन
निसर्गात होणार्‍या घटनाना काहीही अर्थ नसतो.( हे जग मिथ्या आहे !) एखाद्या गोष्टीला चमत्कार म्हणायचे किंवा कसे हे निरिक्षक कोणत्या क्षितिजावर व कोणत्या कोनातून पहात आहे यावर अवलंबून असते.
अगदी अगदी. घटना घडून जाते. ती घटना चांगली की वाईट हे त्या घटनेचे परीणाम आपल्याला सोयीचे आहेत की गैरसोयीचे यावर अवलंबून असते. आता पुन्हा सोय गैरसोय हे सुद्धा ज्याच्या त्याच्या अपेक्षांनुसार, अग्रक्रमांनुसार अवलंबून असते. निवडणूकीत दोन तुल्यबळ उमेदवारांपैकी कुणीतरी एक हरतो, कुणीतरी एक जिंकतो. घटना एकच परंतू तिचे दोन उमेदवारांवर होणारे परीणाम पुर्णतः परस्परविरोधी असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

भाग २ --

चौकटराजा
Sun, 08/11/2013 - 13:21 नवीन
वरील प्रतिसादाच्या मथळ्याला जोडून एक विचारायचेच राहिले....भिंत चालविण्याचा प्रसंग पैठण येथे झाला की आळंदी येथे... कारण आपल्या लेखात तिचा उल्ल्लेख आळंदी संदर्भात झालेला दिसतोय. मला तर ती भिंत पैठण येथे पहावयास मिळाली.
  • Log in or register to post comments

भिंत चालविण्याचा प्रसंग पैठण

धन्या
Sun, 08/11/2013 - 17:24 नवीन
भिंत चालविण्याचा प्रसंग पैठण येथे झाला की आळंदी येथे... कारण आपल्या लेखात तिचा उल्ल्लेख आळंदी संदर्भात झालेला दिसतोय. मला तर ती भिंत पैठण येथे पहावयास मिळाली.
माझ्या माहितीप्रमाणे ही भिंत आळंदीतच आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

छ्या:

प्रसाद गोडबोले
Sun, 08/11/2013 - 17:43 नवीन
छ्या: कुंपण घातलय होय :( एकदम देऊळ पिक्चर मधल्या करडी गायीची आठवण झाली ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

काय भानगड? भिंत पळुन जाणार

स्पंदना
Mon, 08/12/2013 - 04:33 नवीन
काय भानगड? भिंत पळुन जाणार आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

बहुधा भिंत पळुन नाही पण

प्रसाद गोडबोले
Fri, 08/16/2013 - 00:36 नवीन
बहुधा भिंत पळुन नाही पण कदाचित उडुन जाण्याची भीती असावी =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

उडून जाण्याची नाही तर तुकड्या

llपुण्याचे पेशवेll
Wed, 08/21/2013 - 15:20 नवीन
उडून जाण्याची नाही तर तुकड्या तुकड्यानी लुप्त होण्याची भिती आहे म्हणून. लोक म्हणे त्या भिंतितल्या विटा प्रसाद म्हणून काढून नेऊ लागले. मग भिंतीचे अस्तित्व नष्ट होऊ नये म्हणून त्याला कुंपण घातले. पंढरपूरच्या गरुडखांब (का कुठला तो चांदीने मढवलेला खांब आहे ) त्याचा चांदीचा पत्रा लोकांनी प्रसाद म्हणून कुरतडून न्यायला सुरुवात केलीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

पैठणला

अनिरुद्ध प
Tue, 08/13/2013 - 18:28 नवीन
माझ्यामते रेडा बोलला होता,बाकि धन्या स्पष्ट करतिलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

कोमा मध्ये असतांना, आत्मा

चैदजा
Sun, 08/11/2013 - 18:32 नवीन
कोमा मध्ये असतांना, आत्मा शरीर सोडुन गेलेल असत. संर्दभ: मेनी लाईव्हज मेनी मास्टर्र्स.
  • Log in or register to post comments

तुम्ही "मेनी लाईव्ज मेनी

धन्या
Sun, 08/11/2013 - 18:51 नवीन
तुम्ही "मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स" चा संदर्भग्रंथ म्हणून उल्लेख करत आहात का? या पुस्तकात प्रचंड अतिशयोक्ती आहे. संमोहीत अवस्थेत त्या रुग्ण मुलीला चक्क इसवी सन पूर्व १८६३ मधला (1863 BC) जन्म आठवतो. मागच्या ८६ जन्मांचा लेखावजा ती ब्रायनला सांगते हे जरा अती वाटते. या विषयावर दुसरं एक पुस्तक आहे. लाईफ बिफोर लाईफ. पुस्तक मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स सारखं पास्ट लाईफ रीग्रेशनवर नसून पुनर्जन्मावर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैदजा

मस्त लिवलया हो धनाजीबाबा...!

अत्रुप्त आत्मा
Sun, 08/11/2013 - 18:56 नवीन
मस्त लिवलया हो धनाजीबाबा...! ;) धनाजीबाबा परत लिवते झाले...हा ही माझ्या साठी "आज" १ चमत्कार'च आहे! =))
  • Log in or register to post comments

पूजा घाला की.....

चौकटराजा
Mon, 08/12/2013 - 07:09 नवीन
धनाजीबाबा परत लिवते झाले. मग सत्येविनारायनाची पूजा घाला की बुवा...... ! धनाजी बुवा अवतारी पुरूष झाले म्हणायचे ...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

धनाजीरावांकडे सत्य आणी नारायण

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/12/2013 - 07:12 नवीन
धनाजीरावांकडे सत्य आणी नारायण असं दोन्ही आहे! मग आंम्ही पूजा घालायची काय गरज? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

अहो ते

अनिरुद्ध प
Tue, 08/13/2013 - 13:18 नवीन
दोन्ही धनाजीरवान्कडे आहेत्,आपल्याला त्याचा औन्शगुणाचा लाभ व्हावा म्हणुनच आपणच पुजा घालावयाची असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@आपल्याला त्याचा औन्शगुणाचा

अत्रुप्त आत्मा
Tue, 08/13/2013 - 17:55 नवीन
@आपल्याला त्याचा औन्शगुणाचा लाभ व्हावा म्हणुनच आपणच पुजा घालावयाची असते.>>> आंम्ही धनाजींची ओळख झाल्या दिवसापासून पूजा बांधून आहोत! त्यामुळे आमच्याकडे गुण औंशानी नाही चांगले किलोनी आलेले आहेत! आपणास चिंता नसावी...Image removed. आपण आमची पूजा घाला! म्हणजे काही ग्रॅम तुंम्हालाही मिळतील! Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

काळजी नसावी

अनिरुद्ध प
Tue, 08/13/2013 - 18:32 नवीन
श्री शन्कराचे दर्शन घेण्या आधी आमचा नन्दिचे दर्शन घेण्याचा प्रघातच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तरी काय झाल?

अत्रुप्त आत्मा
Tue, 08/13/2013 - 21:05 नवीन
तरी काय झाल? ;-) नंदि तर नंदि...आंम्ही झारा,तुंम्ही सुख्खी बुंदि! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

बुन्दि

अनिरुद्ध प
Wed, 08/14/2013 - 11:57 नवीन
हि सुरवातिला सुकिच असते,नन्तर सन्स्कार केले जातात.पण झारा हा मुढ्च असतो म्हणुनच त्याच्यावर काही सन्स्कार करण्याचा प्रयत्न म्हणजे ....... गा.. पु..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

थोडी भर

रमताराम
Sun, 08/11/2013 - 20:35 नवीन
अशाच अनुभवांबाबत बाळ सामंत यांचे 'मरणात खरोखर जग जगते' या सर्वस्वी अप्रस्तुत शीर्षकाचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. शक्य झाल्यास ते मिळवून वाचा. अतर्क्य, अनाकलनीय घटना गोष्टी सापडल्या की लगेच बघा बघा विज्ञानाची मर्यादा म्हणणार्‍यांची मला नेहमीच मौज वाटत आलेली आहे. मुद्दा हा आहे की विज्ञान घटना नाकारत नाही, त्यावरून उतावीळ लोकांनी काढलेले सोयीचे निष्कर्ष (देव असणे, मागला जन्म असणे वगैरे) नाकारते. घटनांबद्दल केवळ 'अजून' कार्यकारणभाव सिद्ध न झालेले' इतकेच नोंदवून पुढे जाते, त्याचा मागोवा घेत राहते. कदाचित पुढे त्या कार्यकारणभावाची उकल करते. जसे विज्ञानाने मागला जन्म 'असिद्ध' केलेला नाही तसेच कुणी तो सिद्धही केलेला नाही, तेव्हा विज्ञानाचे 'तूर्तास असिद्ध' हाच अप्रोच अधिक अनुकरणीय आहे असे आपले आमचे मत आहे. ज्यांना हजार वर्षांपूर्वीच हे सिद्ध झाले होते असे मानायचे किंवा अशी एखादी घटना सापडली की लगेच विज्ञान पराभूत झाल्याचे जाहीर करायचे असेल तो त्यांचा प्रश्न आहे. समस्या आहे ती निष्कर्षापूर्वी आपण सर्व बाजूंनी विचार केला होता का, सर्व शक्यता तपासल्या होत्या हे ध्यानात घेणे (अर्थात सोयीस्करपणे किंवा फारच अधीरपणे) नाकारले जाते. गंमत म्हणून आम्ही पुनर्जन्म या विषयासंबंधी काही प्रश्न विचारले होते. विचारले गंमतीने असतील पण प्रश्न गंभीरच होते. या अमुक घटनेबाबत विज्ञान उत्तर देऊ शकत नाही म्हणून ते अपुरे वा त्याला मर्यादा आहेत असे म्हणणे योग्य आहेच, पण त्याचा पर्याय म्हणून जी उत्तरे दिली जातात ती अतिशय हास्यास्पद नि सर्वस्वी निराधार असतात. एक नेहमी ध्यानात ठेवायला हवे, जगातील सर्व प्रश्नांना उत्तरे असतातच असे नाही, असलीच ती आपल्यापर्यंत पोचतीलच असे नाही, पोचली तरी समजतील असे नाही. तेव्हा 'अजून ठाऊक नाही' हे प्रामाणिकपणे मान्य करणे आम्हाला अधिक रुचते. तुमच्याकडे उत्तर नाही ना, मग माझे उत्तर बरोबर हे तर्कशास्त्र अजब आहे. तुमचेही उत्तर तितक्याच सार्थपणे सिद्ध व्हायला हवे. आणि हो पूर्वापार चालत आलेला समज, वा एखाद्या फार फार जुन्या पुस्तकात लिहिलेले आहे हा पुरेसा पुरावा निदान आम्ही मानत नाही. त्याऐवजी विज्ञानाच्या मर्यादा आहेतच, पण त्या सातत्याने कमी होत जाणार आहेत, जुन्या अनुत्तरित प्रश्नांचा वेध चालूच राहणार आहे, त्यातील काही प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत, आधीची काही बदलणार आहेत हे आमच्या दृष्टीने जगण्याला रोमांचकारी बनवणारे आहे. एका दगडावर बसून इथून सगळे जग दिसते हे ठसवण्यासाठी 'इथून दिसते ते जग' अशी व्याख्या बदलून घेणे आम्हाला तितकेसे रुचत नाही. प्रवासाच कंटाळा असलेल्याने तसे करावे फारतर. आम्हाला रस्त्यावरच्या प्रत्येक वळणापलिकडे काय आहे याची उत्सुकता कायम असते. नि त्या उत्सुकतेची सार्थपणे परिपूर्ती विज्ञानमार्ग ('च' प्रत्यय लावलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी) करू शकतो. त्यामुळे तूर्तास आम्ही आमच्या अनुत्तरित प्रश्नांसह मार्गक्रमणा करतो आहोत. इत्यलम.
  • Log in or register to post comments

+१११.

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/11/2013 - 20:50 नवीन
+१११. थोडक्यात बरेच काही सांगून गेलात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

प्लस वन. अतिशय योग्य भाषेत

राजेश घासकडवी
Sun, 08/11/2013 - 22:16 नवीन
प्लस वन. अतिशय योग्य भाषेत मांडणी केलेली आहे. मला तर वाटतं 'उत्तर मिळणं म्हणजे काय? काय झाल्याने एखादी गोष्ट किती प्रमाणात सिद्ध झाली असं समजावं?' या बाबतीत विज्ञानाने जो विचार केलेला आहे तो इतर साधनापद्धतीत दिसत नाही. त्यामुळे 'मला वाटतं ते माझ्यापुरतं सत्य' इतक्या मर्यादित स्वरूपात ते रहात नाही. हे वैयक्तिक सत्य काहीही असो. मात्र जेव्हा 'सर्वांसाठी सत्य' अशी विधानं शोधून काढायची असतील तर जे निकष लावावे लागतात त्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोनच आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

@ कदाचित पुढे त्या

अत्रुप्त आत्मा
Sun, 08/11/2013 - 22:52 नवीन
@ कदाचित पुढे त्या कार्यकारणभावाची उकल करते. जसे विज्ञानाने मागला जन्म 'असिद्ध' केलेला नाही तसेच कुणी तो सिद्धही केलेला नाही, >>> हा आध्यात्माच्या चर्चेतला एक नेहमीचा लोच्या आहे. @
विज्ञानाने मागला जन्म 'असिद्ध' केलेला नाही
>>> ज्यांना असं वाटतं की विज्ञानाने या गोष्टी सिद्ध करून दाखवल्या पाहिजेत..जसे की- मागचा जन्म..आत्मा..देव..! त्यांना विचारावसं वाटतं की .''या गोष्टी विज्ञानाच्या आधारावर सिद्ध कश्या करणार ते मला सांगा..? जे सिद्ध करून दाखवायचं... ते अश्या लोकांनी पुराव्यासाठी एकदा तरी समोर "हजर" करायला हवं की नको? उदा- भूत नाही हे सिद्ध करा.. कसं करणार(सिद्ध)? कारण सिद्ध करणार्‍यांनी जेव्हढ्या म्हणून भूताच्या केसेस तपासल्या त्या सर्व भूत या कल्पनेच्या बाबतीतलं अज्ञान/गाढवपणा/ढोंगबाजी/लबाडी या परिणामाच्या बाहेर गेल्याच नाहीत! जे तपासायचं..ते कोणत्यातरी स्वरुपात..एखादा टक्का तरी अस्तित्वात असायला हवं की नको? त्यामुळे ही सिद्ध करण्याची जबाबदारी.. हे आहे.. असं म्हणणार्‍या लोकांवर जाऊन पडते..आधी त्यांनी हे आहे चे पुरावे द्यावेत..मग नाही म्हणणारे त्या पाठिमागचं सत्य शोधतील....! उद्या कुणी विचारलं..की गाय अंड देते, हे सिद्ध करा.. तर ते कुणालाही सिद्ध करता येणार नाही..गाय जर का अंडे देतच नाही,तर सिद्ध कसं करून दाखवायचं??? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

__/\__

स्पंदना
Mon, 08/12/2013 - 04:32 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

इंट्रेस्टिंग!!! दिलेल्या

बॅटमॅन
Sun, 08/11/2013 - 20:56 नवीन
इंट्रेस्टिंग!!! दिलेल्या लिंका वाचून पाहिल्या पाहिजेत एकूण :)
  • Log in or register to post comments

शब्दजंजाळ नसलेले प्रांजळ लेखन

प्रचेतस
Sun, 08/11/2013 - 22:11 नवीन
शब्दजंजाळ नसलेले प्रांजळ लेखन आवडले.
  • Log in or register to post comments

... वाचतेय.

कवितानागेश
Mon, 08/12/2013 - 00:59 नवीन
... वाचतेय. :)
  • Log in or register to post comments

द्या कुणी विचारलं..की गाय अंड

विजुभाऊ
Mon, 08/12/2013 - 02:44 नवीन
द्या कुणी विचारलं..की गाय अंड देते, हे सिद्ध करा.. तर ते कुणालाही सिद्ध करता येणार नाही..गाय जर का अंडे देतच नाही,तर सिद्ध कसं करून दाखवायचं??? smiley
गूगल वर गोमातेची अंडी उआ सर्च मारल्यानंतर काही विदारक सत्ये सापडली गाईची अंडी हा उल्लेख असंतोषजनक आहे काउ एग = http://www.thefarmerscow.com/products/farmers_cow_eggs.html त्या नावावरून गायीची अंडी असू शकतील असे पुरावे देता येतील ;) अवांतरः एखादी गोष्ट नाही असे सिद्ध करता आले नाही तर ती गोष्ट आहे हे सिद्ध होउ शकते का?
  • Log in or register to post comments

व्वा.............! काय अंड

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/12/2013 - 07:09 नवीन
व्वा.............! काय अंड मारलय पण..! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अवांतरः एखादी गोष्ट नाही असे

मोदक
Mon, 08/12/2013 - 03:16 नवीन
अवांतरः एखादी गोष्ट नाही असे सिद्ध करता आले नाही तर ती गोष्ट आहे हे सिद्ध होउ शकते का? एखादी गोष्ट नाही असे सिद्ध केले गेले तर ती गोष्ट आहे असे गृहीत धरण्यात येते, मात्र ठरावीक काळानंतरही ती गोष्ट अस्तित्वात आहे या गृहीतकाला आवश्यक पुरावे मिळाले नसल्यास नाही असे गृहीत धरले जाते. वरील विधान विशेषतः बेपत्ता नागरिकांना / सैनीकांना लागू आहे. मात्र तुमच्या विधानाचा रोख अध्यात्म, मन यांवर असेल तर वरील विधान गैरलागू ठरेल.
  • Log in or register to post comments

शेवटचा पॅरा अतिशय भावला.

स्पंदना
Mon, 08/12/2013 - 04:31 नवीन
शेवटचा पॅरा अतिशय भावला. पण एक सांगा मला, आपल असणं , आपल नसणं हे जर तुम्ही उलगडु शकलात तर पुढच्या शोधाला काही अर्थ काही दिशा असु शकते. हे जोवर उलगडत नाही तोवर निरागस असणच फायद्याच नाही का?
  • Log in or register to post comments

मस्त लेख.

अर्धवटराव
Mon, 08/12/2013 - 08:06 नवीन
निअर डेथ एक्सपीरीयन्स आणि ज्ञानेश्वरांनी सच्चीदानंद बाबांना शरीरात परत आणणे या भिन्न बाबी आहेत. सध्या एव्हढच. अवांतर: विज्ञान/आध्यात्माने एकमेकांना हरवणे म्हणजे डोळ्याने दृष्टीला हरवणे झाले. असो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

+१

कवितानागेश
Mon, 08/12/2013 - 08:20 नवीन
सगळ्याच शास्त्रांचा, आभ्यासाचा आणि अनुभवाचा रोख शेवटी 'निसर्गनियम शोधणे, पडताळून पाहणे' असाच असतो आणि 'हे सगळं नक्की काय आणि कसे चाललय ते बघू' याच कुतुहलानी त्याची सुरुवात होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा