मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उंदरांची शर्यत

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
काल माझ्याकडे एक लहान मुलगी आली होती वय वर्षे ३. मुत्र्मार्गाला जंतुसंसर्ग झाला( URINARY INFECTION) म्हणून बालरोग तज्ञांनी मुत्र मार्गाची तपासणी करण्या साठी सोनोग्राफी साठी पाठविले होते. तिची आई फारच काळजीत होती कारण तिला असे दुसऱ्यांदा झाले होते. आणी असे दोन दिवस शाळा (?) बुडल्याने तिच्या "पर्फोर्मंस"वर परिणाम होतो असे आईचे म्हणणे होते. हि मुलगी नर्सरीत होती. कालच एक माझी जुनी रुग्ण( म्हणजे प्रसुतीच्या वेळेस ३ - ४ वेळेस सोनोग्राफी साठी आलेली) सिझेरियन झाल्यानंतर टाके दुखतात म्हणून आली होती. तिच्या ४ वर्षाच्या मुलाला नाव विचारले तो म्हणाला अर्णव. मग विचारले कि कोणत्या शाळेत जातोस तर तो म्हणाला किंग जॉर्ज आणि सिल्वर क्रेस्ट. त्यावर त्याचे वडील म्हणाले कि अरे शाळा किंग जॉर्ज आणि ट्युशन सिल्वर क्रेस्ट असं सांगायचं. हा मुलगा ज्युनियर के जी त आहे. तसेच कालच आमच्या सौभाग्यावतींकडे एक बाई आल्या होत्या त्यांची मुलगी बाळंतीण झाली होती. मुलीला सासू नाही म्हणून आई आली होती आणि आई सांगत होती कि मुलगी माहेरी येण्यास तयार नाही मला दुसरी मुलगी आणि यजमान आहेत ते बीडला आहेत. मला इथे फार दिवस राहता येणार नाही.मी तिला सांगते आहे कि तू मुलाला घेऊन माहेरी चल मी तुझे बाळंतपण तेथे व्यवस्थित करते.आमच्या सौ नि मुलीला विचारले तू माहेरी का जात नाहीस? तिचे म्हणणे मुलाची शाळा बुडवणे शक्य नाही. मुलगा साडे तीन वर्षांचा आहे आणि नर्सरीत जातो. एकाच दिवशी तीन मुले पाहून माझ्या मनात एकाच विचार आला कि वय वर्षे ३ ते ५ या वयातील मुलांना शाळा इतकी महत्त्वाची आहे का? आणि ४ वर्षाच्या मुलाला ट्युशन ची गरज आहे का ( त्याला शिकवणी म्हणायचे नाही ते डाऊन मार्केट वाटते) आमच्या लहानपणी जी मुले अभ्यासात कमी असत त्यांना शिकवणी लावली जात असे. शिवाय इतक्या कमी वयात यांच्या खांद्यावर एवढे अपेक्षांचे ओझे टाकले तर हि मुले पुढे काय करणार. परत आता हि मुले घोका आणि ओका असा अभ्यास करतील पण एका विशिष्ट पातळीनंतर त्यांना हे झेपेनसे झाले कि त्यांचे गुण कमी होतात आणि यानंतर आई वडील अभ्यास कमी पडतो म्हणून अजून त्यांच्या डोक्यावर बसणार. हे कुठवर चालणार आहे. माझा मुलगा पहिला आलाच पाहिजे या हव्यासात तुम्ही त्याला या उंदरांच्या शर्यतीत(rat race) पळवत आहात पण हि शर्यत जिंकली तरी शेवटी तुम्ही फारतर उंदराचा राजा( ace rat) होता. माणूस कधी होणार?

वाचने 51885 वाचनखूण प्रतिक्रिया 203

In reply to by दादा कोंडके

रामपुरी 26/07/2013 - 22:28
"काँप्युटर्सच्या शी पीयु लागणारे फक्त स्क्रूज भारतात बनत असतील. प्रोसेसर्स आणि मदरबोर्ड्स भारतात कुठेच बनत नाही" अतिशय चुकिची माहीती अतिशय आत्मविश्वासाने दिली आहे म्हणून म्हटलं.

In reply to by दादा कोंडके

मोग्याम्बो 26/07/2013 - 23:36
भारतामध्ये software हीं विकत घेण्याची गोष्ट आहे हे काही अजून लोकाना पटलेले नाही त्यामुळे कळ बडव्याना परदेशी बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागत आहे.. तरी सुधा ह्या भारतात सुधा आत्ता स्वताचे software उत्पादन करून भारतातच वापर करण्यास सुरवात झाली आहे Flipkart हे सर्वात चांगले उदाहरण आहे

आशु जोग 23/07/2013 - 21:32
ओ.बी.सी समाजातिल कुंभार..सुतार..चांभार आदी बलुते दार मुलांच्या जिन्स मधे कला असते त्याना कुशल कामगार आमच्या पिढिने बनवले.. सर हे जरा एक्सप्लेन करा ना आणि सरकारने कारखानदारी संपवली हे नाही पटले

In reply to by आशु जोग

अविनाशकुलकर्णी 23/07/2013 - 21:41
एन.पी.ए चा नियम त्यामुळे कित्येक कारखाने संपले..लाखो कामगार रस्तावर आले.... २..हे वैयत्तिक मत व अनुभव आहे..

अविनाशकुलकर्णी 24/07/2013 - 21:31
दुर्लक्ष हाच उत्तम उपाय !!!!!!!.. नक्किच नाहितरी आता देशात औद्योगिक उत्पादन करणं फायदेशीर नाही....त्या मुळे आपले म्हणने खरे ठरते.. असो..घासा अमेरिकेची भांडी..अन मिळवा रोजगार

In reply to by अविनाशकुलकर्णी

रेवती 24/07/2013 - 22:03
घासा अमेरिकेची भांडी..अन मिळवा रोजगार नाईलाजाने थोडीफार सहमत. तुमचे म्हणणे थोडे पटते कारण आम्हीही आमच्या घरची भांडी गुंडाळूनच हामेरिकेत आलोय. त्यावेळी त्रास झालाच होता. पण देशात आपली भांडी खरकटी होण्याइतपतही सोय नव्हती त्यावेळी.

बापू मामा 24/07/2013 - 21:34
ओ.बी.सी समाजातिल कुंभार..सुतार..चांभार आदी बलुते दार मुलांच्या जिन्स मधे कला असते त्याना कुशल कामगार आमच्या पिढिने बनवले.. प्रत्येक समाजातील मुलांमध्ये आपापल्या वंशपरंपरागत व्यवसायाची कुशलता असते. पूर्वी चातुर्वर्ण्याची वा बलुतेदारीची संकल्पना होती. त्या मध्ये मुले लहानपणापासूनच त्या त्या घरीच चालणार्‍या व्यवसायात पाहून पाहून तरबेज होत असत. मुलांच्या व त्यांच्या पालका॑च्या समोर त्याने भवितव्यात काय व्हायचे हा प्रश्न आ वासून पडत नसे. कारण त्याचे व्यवसायिक भवितव्य ठरलेले असे. आज मुलांचे (व पालकांचेही) भवितव्य अनिश्चित असते. एक तर मूल १२ वी होईपर्यंत त्याने काय करावे हे ठरवता येत नसते. १२ वीत किंवा तत्सम प्रवेश परीक्षेत जर तो कमी पडला तर तो कदाचित आयुष्यातील रॅट रेस मध्ये कायमचा मागे पडतो. शिक्षणातच त्याचे तारुण्य जाते. म्हणून कधी कधी पूर्वीची समाज व्यवस्था त्यातील जन्माधिष्ठित व्यवसायाची सक्तीचा व उच्च नीचतेचा भाग किंवा अस्पृश्यतेचा अतिरेक टाळल्यास खरोखरीच उत्तम होती असे वाटते.

In reply to by बापू मामा

म्हणणे पटले नाही. या न्यायाने माझी दोन्ही मुले उत्तम डॉक्टर झाली असती ( बायको डॉक्टर च्या गुणवत्ता यादीत महाराष्ट्रात १२ वि होती) पण माझी दोन्ही मुले इतर व्यवसायाकडे स्वतःच्या मर्जीने गेली. मुर्तीकाराचा मुलगा उत्तम मूर्तिकार होत नाही किंवा सुताराचा मुलगा उत्तम सुतार होत नाहि.कला अनुवांशिक असते याला कोणताही शास्त्राधार नाही. पूर्वी आठ दहा मुले असत त्यातील एखादा चांगला सुतार किंवा मूर्तिकार इ होत असे बाकी सगळे पाट्या टाकत असत. आता एक किंवा दोन मुलात हे अशक्य आहे . आणि बहुतांश बलुतेदारांची आर्थिक परिस्थिती मुळीच चांगली नव्हती. (काही विशिष्ट व्यवसाय सोडून उदा सोनार) त्यामुळे भवितव्यात काय आहे त्याची चिंता नसे ऐवजी आपले आयुष्य आहे त्या चाकोरीतच राहून जाणार( किंवा फुकट जाणार) आहे हि खंत होती. जुने ते सर्व सोने असते( किंवा चकाकते ते सर्व सोने असते) हे मान्य नाही

In reply to by सुबोध खरे

मी माझ्या घरातलेच उदाहरण देतो,अगोदरच्या पिढीचा आणी पुढच्या पिढीच्या व्यवसायाचा काहीही संबध नाही .पुर्वज वतनदार्,आजोबा गाव कारभारी,वडील पापभिरु शाळामास्तर्,अस्मादिकांची वैद्यकी,आणी कन्यारत्न एक नंबरच मवाली(मोठ्ठ पोलिस अधिकारी होण्याच स्वप्न पाहतय्)मागच्या पिढीच्या व्यवसायाचा पुढच्या पिढीशी काडीमात्र संबध नाही.त्यामुळे एकच गोष्ट जाणवते की तुम्ही काय होणार हे फक्त तुम्हीच ठरवु शकत.फक्त योग्य प्रयत्न आवश्यक....

In reply to by बाबा पाटील

५० फक्त 28/07/2013 - 01:28
आमच्याकडंही असंच, आजोबा गावच्या देवळात पुजारी होते,बाबा शिक्षक, मी अभियंता, आणि सध्याच्या लक्षणावरुन पोरगं गेलाबाजार नगरसेवक होईल अशी चिन्हं आहेत, बँकानी निवडणुका लढवणे हा धंदा आहे असं मान्य करुन कर्ज द्यायला सुरु केलं तर खासदार वैग्रे होईल, अशी आशा आहे.

बापू मामा 25/07/2013 - 22:26
डॉक्टर साहेब, आपली मुले डॉक्टर झाली नाहीत,हा प्रचलित शिक्षणपद्धतीचा दोष आहे.तसेच आपण स्वतः त्यांना आपले उत्तराधिकारी किंवा आपली गादी चालविणारे वारस म्हणून जाणिवपूर्वक किती वैद्यकीय ज्ञान दिले ? पूर्वी घरीच व्यवसाय असल्यामुळे लहानपणापासून मुलास व्ययसायाचे बाळकडू मिळत असे. त्यामुळे आज आइन विशीत मुले व पालकांसमोर पुढे काय करायचे हा प्रश्न पडतो, तो त्या वेळी पडत नसे. तसेच समाजालाही एक काम करणारा हात लवकर मिळाल्याने त्याचाही विकास होत असे. आज समाजाला पंचविशीपर्यंत युवकाला बिन कामाचे(म्हणजे अर्थशास्त्रिय/अर्थार्जन करुन देणारे काम या अर्थाने) पोसावे लागते.म्हणून मी बलुतेदारी चांगली असे म्हणालो.

In reply to by बापू मामा

सुबोध खरे 26/07/2013 - 09:31
साहेब , माझ्या मुलीला विज्ञान आवडत नाही तिचा भाषांकडे कल आहे म्हणून तिने आत्तापर्यंत स्पैनिश च्या सहा परिक्षा दिल्या आहेत आणी कॉमर्स ला जाऊन कंपनी सेक्रेटरीची पहिली परीक्षा पास झाली आहे. तिंच काळ नसताना तिला डॉक्टर करण्याचा काय फायदा? तसेच मुलगा बारावीत आहे आणि त्याला जीवशास्त्र अजिबात आवडत नाही आणि गणित आवडते असे असल्यावर त्याला मारून मुटकून वैद्यबुवा बनवण्यात काय हशील? आयुष्यभर रुग्ण त्याला आणि तो रुग्णांना आणि आईबापाना दुषणे देत राहणार. पंचविशीपर्यंत न कमावता तर जुन्या जमान्यातील वैद्य सुद्धा शिकत असत मग त्यांना लोहार किंवा सुतारापेक्षा जास्त मान का मिळत असे? कारण आपल्या कौशल्याची आणि बुद्धिमत्तेची किंमत असते. नुसते अंगमेहनतीचे काम करणार्याला किती पैसे मिळणार? एक न धड भाराभर चिंध्या अशी आपल्या देशाची लोकसंख्या अगोदरच आहे.त्यात सुशिक्षित आणि सुसंस्कृत नागरिकांची भर घालायची कि अधिक चिंध्या वाढवायच्या? उत्तर प्रदेशात किंवा बिहार मध्ये जाऊन पहा काम करणारे हात भरपूर आहेत पण त्यांना द्यायला काम कुठे आहे? उगाच का ते मुंबईत येतात?

In reply to by बापू मामा

हुप्प्या 26/07/2013 - 11:44
वैद्य, सोनार वा लोहार सुतार पिढीजात कामे करतील हे एक वेळ मान्य पण मेलेल्या ढोरांची विल्हेवाट लावणारे, झाडझूड करणारे, कचरा उचलणारे, ह्यांचे काय? काही कारणाने कुणी एकाने हा व्यवसाय निवडला म्हणून त्यांनी काय पिढ्यान पिढ्या तेच करायचे काय? असल्या व्यवसायाचे बाळकडू कशाला प्यायचे? उत्तराधिकारी वगैरे काय प्रकार आहे? हल्ली कुठल्या विषयाचे ज्ञान हे मूठभर लोकांपुरते मर्यादित नसते, विशेषतः रोजच्या जीवनात लागणारे ज्ञान. तेव्हा माझ्या पश्चात ते संपेल, माझ्या उत्तराधिकार्‍याला ते सोपवणे माझे कर्तव्य आहे वगैरे लागू नाही. इच्छा आणि कुवत असल्यास त्या क्षेत्रात शिक्षक, प्राध्यापक, प्रशिक्षक व्हायची मुभा आहे.

बापू मामा 25/07/2013 - 23:05
बलुतेदारीमुळे गावे स्वयंपूर्ण असत. त्या त्या गावची सर्व तांत्रीक कामे तेथेच केली जात. महात्मा गांधींचाही बलुतेदारी व चातुर्वर्ण्यावर विश्वास होता. त्यांच्या स्वप्नातील स्वयंपुर्ण गाव ह्याच व्यवस्थेद्वारे चालणारे होते.आता तुम्ही म्हणाल की प्रचलीत काळात ( म्हणजे अत्याधुनिक माहिती व तंत्रज्ञानाने परिपूर्ण) हे सर्व कालबाह्य झाले. मान्य आहे.परंतू आपण जर दोन्ही काळातील समाजव्यवस्थांची तुलना केली , तर जुने ते सोने असेच म्हणावे लागेल.त्या काळातील पापभिरुता, भाबडेपणा आज तंत्रज्ञान युक्त काळात लोपली आहे. सर्वत्र भ्रष्टाचार, अनाचार बोकाळलेले आहेत. ह्यास प्रगती म्हणायची काय असा प्रश्न पडतो. पर्यावरणाचा र्‍हास, भ्रष्टाचार ही आजच्या तंत्रज्ञानाची देणगीच आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आज रोज सकाळी दूरदर्शन पाहतो, त्यात सर्व ह्याच बातम्या दिसतात. आपल्या व माझ्या सुदैवाने, आपण पंडितजी, शास्त्रीजी या सारख्यांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवु शकलो. आज कोणते आदर्श आपल्या तरुण पिढीपुढे आहेत हे मी सांगण्याची गरज नसावी.

सुबोध खरे 26/07/2013 - 09:38
हीच बलुतेदारी जेंव्हा दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्ती पडत असे तेंव्हा कोसळत असे आणि गावेच्या गावे जगायला(!!!) म्हणून बाहेर पडत असत. गावे स्वयंपूर्ण होती हे फार् तर अर्धसत्य आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत हा कणा मोडून पडत असे.जिम कॉर्बेट ची पुस्तके किंवा व्यंकटेश माडगुळकरांचे बनगरवाडी वाचून पहा. जुन्या जमान्यातील गावांची कशी वाताहत होत असे ते छान वर्णन करून लिहिले आहे. मलेरिया, कॉलरा किंवा प्लेगच्या रोगाने गावेच काय शहरे उद्ध्वस्त झालेला इतिहास फार जुना नाही. जुने ते सगळेच सोने असते असे नाही
डॉक्टर साहेबांचा लेख आणि त्या वरील सगळे प्रतिसाद हे मुलांवर अवास्तव बौध्दीक ताण देवु नये या विषयावरचे आहेत. पण सध्या मला आणि माझ्य पत्नीला एक प्रश्र्ण सतावतो आहे म्हणुन थोडे विषयांतर. मुलांवर अभ्यासाची जबरदस्ती करु नये हे आम्हा दोघांनाही पटते. पण जर मुलांनी व्यायाम करायला सुध्दा नकार दिला तर काय करायचे? सुरवातीला आम्हाला वाटले की असे टिव्ही मुळे होत असेल म्हणुन आम्ही घरातील केबल कनेक्षन काढुन टाकले. कॉम्प्युटर मोबाइल ला पासवर्ड टाकले, पण त्या मुळे परीस्थीतीत काहिच सुधारणा झाली नाही. सकाळी कंटाळा येतो म्हणुन संध्याकाळी तरी त्यांनी थोडी हलचाल करावी असे प्रयत्न केले. त्यांच्या बरोबरीने व्यायाम करुन पाहिले,धावायला जाउन पाहिले पण परिणाम शुन्य. मुलांनी कोणी मोठे धावपटू वगेरे बनावे अशी आमची इच्छा नाही पण रोज थोडा व्यायाम करायला पाहिजे या मताचे आम्ही दोघेही आहोत. या व्यायाम न करण्याचा परिणाम मुलांच्या शरीरावर दिसायला लागला आहे. वर्गात पहिल्या बाकावर बसायचीही किंवा वाढणार्‍या आकाराची अजिबात लाज वाटत नाही. आमच्या फॅमेली डॉक्टरांच्या तर्फे सुध्दा उपदेश करुन झाला आहे. ग्राउंडला घातले, शिबिरांना घातले तरी तिकडुन पळुन येणे किंवा शिक्षकांनाच वात आणणे असे प्रकार झाले.शेवटचा उपाय म्हणुन झोडपुन सुध्दा काढले आहे. (सहन शक्तीच्या सर्व मर्यादा संपल्यावर) पण असल्या जबरदस्तीने केलेल्या व्यायामाचा काहीही फायदा होत नाही हे आम्हाला माहीत आहे. रात्री उशीरा पर्यंत जागे रहाणे आणि सकाळी उशीरा उठणे हा आवडता दिनक्रम झाला आहे. शाळेत जायचे नाही असे म्हटले की त्यांच्या सारखे खुष तेच असतात. सहलीला जाताना आनंदाने उठणारी मुले सकाळी लवकर व्यायामासाठी उठवले कि प्रचंड मोठ्या आवाजात किंचाळत रडायला लागतात, पण व्यायाम करत नाहीत. आमच्या कडुन सगळे उपाय करुन झाले पण फरक पडत नाही जर कोणाकडे काही दुसरा उपाय असला तर कृपया सुचवा कारण काय करावे या विवंचनेत सध्या आम्ही दोघेही आहोत.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 26/07/2013 - 16:53
ज्वलंत प्रश्न. लोकांची मते वाचण्यास उत्सुक. लहानपणापसुनच (१.५-२ वर्ष) मुलांना मैदानावर, मोकळ्या जागी खेळायला नियमीतपणे नेले पाहीजे. घरातील लोकांनी टीव्ही, कॉम्युटर, मोबाईल सतत वापरले तर मुलांना त्याची सवय लागणारच आणि मग ती सोडवणे कठीण होऊन बसते. आपणच बाळ जेवत नाही मग टीव्हीवर कार्टून लावुन द्या, सीडी लावुन द्या, रडायला लागले की कॉम्युटरवर, प्लेस्टेशन्वर गेम खेळायला द्या असे करतो. याने आपले मुलाला शांत करण्याचे कष्टही वाचतात आणि मुल पण शहाण्यासारखे गपगुमान राहते. परत जेव्हा किरकिर चालु होते तेव्हा आपण आधीपैकीच यशस्वी झालेला उपाय परत अमलात आणतो.. चक्र चालु राहाते आणि मुलांना मशिनची सवय लागते. आपणच आधी लहान मुलांचे रडणे, किरकिर पचवणे शिकले पाहीजे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

उपास 26/07/2013 - 19:32
व्यायामाची आवड लागल्याशिवाय तो मारुन मुटकून होणार नाहीच, तस्मात त्यांना व्यायामाची आवड कशी लागेल ते पहा. लहान वयात ह्याबाबतीत पिअर प्रेशर काम करते हे मी अनुभवाने सांगू शकतो. म्हणजे तुझ्याबरोबरीची मुलं व्यायाम करतायेत तुला थोडी तरी ताकद यायलाच हवी, हे बिंबवायचा प्रयत्न व्हायला हवा. आमचे काका, पैज मारुन जास्तीत जास्त 'पुल अप्स' काढणार्‍या पोराला तिथल्या तेथे दहाची नोट देत असत. गणपतित व्यायाम स्पर्धा असत, व्यायामशाळेची गोडी कधी लागली ते कळलच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाच, अति-व्यायामाची घाई करु नका, फार लवकर बैठका वगैरे मारायला घेतल्याने उंची खुंटते असं म्हणतात (ख.खो दे. जा.) स्नायू पूर्ण वाढले की मग बळकट करायचे, तोपर्यंत थोडाफार व्यायाम झाला तरी पुरे! लहान वयातील मुलांना डबल बार, नुसते लोंबकाळणे वगैरे असेल जवळ पास तर बेस्ट! शुभेच्छा!

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजार साहेब मुले अडनिड्या वयाची( मुली तेरा चौदा आणि मुलगे पंधरा ते सोळा) झाली कि त्यांना शिंगे फुटतात आणि आई बाप सांगतात त्यात काही तथ्य नाही असे वाटू लागते. अशा वेळेस जोर जबरदस्ती करून काहीच फायदा होत नाही. पण त्यांना त्यांच्या कला कलाने सांगत राहिले पाहिजे. सुरुवातीला काय पकाऊ लेक्चर देत आहे असा अविर्भाव चेहऱ्यावर असतो. त्याकडे दुर्लक्ष करीत आपण छोट्या छोट्या सूचन करीत राहावे. सुरुवातीला पालथ्या घड्यावर पाणी असे वाटते पण ते हळू हळू आत झिरपत असते आणि याचा परिणाम एक दोन वर्षांनी दिसू लागतो. माझी मुलगी नववी पर्यंत सायकल चालवत असे. मग एकदम तिने ते बंद केले सुरुवातीला मी ती सायकल दोन वेळा तेलपाणी केले नंतर सायकल आमच्या मोलकरणीला देऊन टाकली. व्यायामाचे फायदे तिला दोन वर्षे पर्यंत हळूहळू सांगत होतो कि व्यायामाने त्वचेचा रक्त पुरवठा वाढतो आणि त्वचा जास्त तजेलदार दिसते, केसांचा पोत सुधारतो आणि त्याला चमक येते. पालथ्या घड्यातून पाणी हळूहळू झिरपत होते. आता ती रिक्षाला पाय लावत नाही सगळीकडे चालत जाते. मध्ये सहा महिने जिम मध्ये सुद्धा जात होती. हाच प्रयोग आता मुलावर( वय १६ वर्षे) चालू आहे. तो रिक्षा शिवाय जात नाही व्यायाम म्हणजे फक्त सठी सहामासी फुटबॉल खेळणे. त्याला हेच सांगणे चालू आहे कि चेहरा सुधारला नाही तर मुली बघणार नाहीत. मधून मधून फुटबॉल पटू काय व्यायाम करतात हे वृत्तपत्रात लिहिलेले दाखवतो. यावर त्याचे उत्तर हेच असते कि मुलींशी घेणे देणे नाही पण कुणाच्या वाढदिवसासाठी जसा तयार होऊन जातो त्यावरून ते खरे नाही हे कळते.काही काळानंतर परिणाम दिसू लागेल अशी अपेक्षा आहे. या वयातील मुलांना थोडक्यात सांगणे आवश्यक असते. हे तीस सेकंदापेक्षा जास्त असेल तर मुले ऐकत नाहीत. पाल्हाळ लावले तर मुले सुरुवातीपासूनच दुर्लक्ष करतात. हे सांगणे आता आमच्या पत्नीला पटू लागले आहे. तिची हीच तक्रार आहे कि मुले माझे ऐकत नाहीत.फक्त तुझेच ऐकतात. तिला समजावून सांगितल्यावर लक्षात येते आहे पण मुळ स्वभाव सहज बदलत नाही. थोडा काळ जायला लागेल. सध्या तरी परिस्थिती अशी आहे.

In reply to by सुबोध खरे

ब़जरबट्टू 29/07/2013 - 09:55
हे अगदी पटण्यासारखे आहे.. या वयातील मुलाना रागवुन समजवता येत नाही.. खरे साहेबानी म्हटले तसे मुलीना त्वचा जास्त तजेलदार दिसते, केसांचा पोत सुधारतो आणि त्याला चमक येते. सान्गीतले, व मुलाना चेहरा सुधारला नाही तर मुली बघणार नाहीत. :) खरच असरदार आहे...

In reply to by ब़जरबट्टू

सुबोध खरे 04/08/2013 - 10:54
डॉक्टर तुम्हा सांगा यात लिहिल्या प्रमाणे माझ्याकडे येणाऱ्या जाड्या मुलीना किंवा मुलांना मी अशाच तर्हेने तुमच्या चेहऱ्यावर तरुण्यापिटिका येउन चेहरा खराब होईल आणि एका विशिष्ट वयानंतर मग तो कोणत्याही उपायाने सुधारणार नाही असे सांगतो. आणि हि गोष्ट त्यांच्या आई/ बापाना सांगतो कि लेक्चर न देता मधून मधून त्यांना हे सांगत जा.म्हणजे ते हळूहळू त्यांच्या डोक्यात झिरपेल. प्रत्यक्ष किती प्रमाणात उपयोग होतो हे देवास ठाऊक