Skip to main content

उंदरांची शर्यत

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 18/07/2013 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
काल माझ्याकडे एक लहान मुलगी आली होती वय वर्षे ३. मुत्र्मार्गाला जंतुसंसर्ग झाला( URINARY INFECTION) म्हणून बालरोग तज्ञांनी मुत्र मार्गाची तपासणी करण्या साठी सोनोग्राफी साठी पाठविले होते. तिची आई फारच काळजीत होती कारण तिला असे दुसऱ्यांदा झाले होते. आणी असे दोन दिवस शाळा (?) बुडल्याने तिच्या "पर्फोर्मंस"वर परिणाम होतो असे आईचे म्हणणे होते. हि मुलगी नर्सरीत होती. कालच एक माझी जुनी रुग्ण( म्हणजे प्रसुतीच्या वेळेस ३ - ४ वेळेस सोनोग्राफी साठी आलेली) सिझेरियन झाल्यानंतर टाके दुखतात म्हणून आली होती. तिच्या ४ वर्षाच्या मुलाला नाव विचारले तो म्हणाला अर्णव. मग विचारले कि कोणत्या शाळेत जातोस तर तो म्हणाला किंग जॉर्ज आणि सिल्वर क्रेस्ट. त्यावर त्याचे वडील म्हणाले कि अरे शाळा किंग जॉर्ज आणि ट्युशन सिल्वर क्रेस्ट असं सांगायचं. हा मुलगा ज्युनियर के जी त आहे. तसेच कालच आमच्या सौभाग्यावतींकडे एक बाई आल्या होत्या त्यांची मुलगी बाळंतीण झाली होती. मुलीला सासू नाही म्हणून आई आली होती आणि आई सांगत होती कि मुलगी माहेरी येण्यास तयार नाही मला दुसरी मुलगी आणि यजमान आहेत ते बीडला आहेत. मला इथे फार दिवस राहता येणार नाही.मी तिला सांगते आहे कि तू मुलाला घेऊन माहेरी चल मी तुझे बाळंतपण तेथे व्यवस्थित करते.आमच्या सौ नि मुलीला विचारले तू माहेरी का जात नाहीस? तिचे म्हणणे मुलाची शाळा बुडवणे शक्य नाही. मुलगा साडे तीन वर्षांचा आहे आणि नर्सरीत जातो. एकाच दिवशी तीन मुले पाहून माझ्या मनात एकाच विचार आला कि वय वर्षे ३ ते ५ या वयातील मुलांना शाळा इतकी महत्त्वाची आहे का? आणि ४ वर्षाच्या मुलाला ट्युशन ची गरज आहे का ( त्याला शिकवणी म्हणायचे नाही ते डाऊन मार्केट वाटते) आमच्या लहानपणी जी मुले अभ्यासात कमी असत त्यांना शिकवणी लावली जात असे. शिवाय इतक्या कमी वयात यांच्या खांद्यावर एवढे अपेक्षांचे ओझे टाकले तर हि मुले पुढे काय करणार. परत आता हि मुले घोका आणि ओका असा अभ्यास करतील पण एका विशिष्ट पातळीनंतर त्यांना हे झेपेनसे झाले कि त्यांचे गुण कमी होतात आणि यानंतर आई वडील अभ्यास कमी पडतो म्हणून अजून त्यांच्या डोक्यावर बसणार. हे कुठवर चालणार आहे. माझा मुलगा पहिला आलाच पाहिजे या हव्यासात तुम्ही त्याला या उंदरांच्या शर्यतीत(rat race) पळवत आहात पण हि शर्यत जिंकली तरी शेवटी तुम्ही फारतर उंदराचा राजा( ace rat) होता. माणूस कधी होणार?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 51935
प्रतिक्रिया 203

प्रतिक्रिया

पण आता बरेचसे पालक मुलांना सी बी एस ई, आय सी एस सी बोर्डात घालतात. त्या शाळांचा अभ्यास तुफान कठीण असतो. मुलं त्यांच्या वयाला अनुसरुन घरी अभ्यास करत नाहीत, म्हणुन नाईलाजाने त्यांना ट्युशनला पाठवायला लागतं. अतिशय चुकीची गोष्ट आहे, पण ह्या बोर्डाच्या शाळेत मुलांना घालायचे असेल तर ट्युशन शिवाय पर्याय नाही. दुसरा पर्याय म्हणजे पालकांमधील एकाने घरी राहुन अभ्यास घ्यावा (जे शक्य नाही कारण हल्ली नवरा बायको दोघे नोकरी करतात) किंवा सरळ एस.एस.सी बोर्डात घालावे. त्यांचा अभ्यास इतका कठीण नसतो. पण झालाय असं की आता एस.एस.सी बोर्डाच्या शाळांमध्ये रिझर्व्हेशन पॉलिसीमुळे असे शिक्षक आले आहेत की पालकच एसएससी बोर्डात मुलांना घालत नाहीत. त्यामुळे हे विषचक्र चालुच राहणार असे दिसत आहे.

In reply to by अमोल खरे

त्या शाळांचा अभ्यास तुफान कठीण असतो.
हे विधान तितकेसे पटणारे नाहीयेय आणि जनरलाइझ करण्यासारखी परिस्थीतीही नाहीयेय. - ('तुफान सोप्पा' अभ्यास केलेला) सोकाजी

In reply to by अमोल खरे

अमोल माझी दोन्ही मुले सी बी एस इ मधून दहावी झाली तिथला अभ्यास कठीण असतो हे मान्य पण तो आठवी नंतर त्याअगोदर त्यांच्या अभ्यासात आणि महाराष्ट्र बोर्डात एवढा जास्त फरक नाही. आणि पाच वर्षाच्या आतील मुलांना ट्युशनला पाठवायला लागते हे पचवणे जर कठीणच आहे. जयंत नारळीकरांनि एकदा मला सांगितले होते कि त्यांना लोकांनी असे प्रश्न विचारले होते कि का हो तुम्ही एवढे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ मग तुमच्या मुलांना असे वाटत नाही का कि आपणही बोर्डात यावे नाव मिळवावे वगैरे. त्यावर मी त्यांना सांगितले कि शर्यतीत धावून पहिले यावे हि कोणत्याही घोड्याची इच्छा नसते हि त्याच्यावरील स्वाराची इच्छा असते. तेंव्हा तुम्ही तुमच्या इच्छा मुलावर लादून त्याला पळायला लावू नका. मी आणि माझी पत्नी दोघेही डॉक्टर असून आमची मुले वैद्यकीय मार्गाला कशी जात नाहीत हा गहन प्रश्न बर्याच लोकांनी मला बोलून दाखविला. त्यांना मी वरील उदाहरण दिले. दुर्दैवाने काय होत आहे कि जगाला दाखविण्यासाठी आपले मूल एखाद्या उच्चभ्रू शाळेत घालायचे त्याची कुवत( आर्थिक, मन्सिक. बौद्धिक आणि सामाजिक) नसताना त्याला तेथील मुलांबरोबर पळायला लावायचे आणि मग तो दमला कि त्रागा करायचा. कारट्या , एवढे पैसे शाळेला आणि तेवढे पैसे ट्युशनला भरतो तरी तुला इतके कमी मार्क कसे? पैसे दिले कि आपली जबाबदारी संपली मग मुलाला ते झेपेल का? पेक्षा माझ्या प्रतिष्ठेला शोभेल का? हा विचार जास्त अग्रक्रमाने केला जातो. यात कनिष्ठ, कनिष्ठ आणि उच्च मध्यम वर्ग आणि उच्च वर्ग हे सगळेच भरडले जात आहेत. जर थांबून विचार करावा असे कुणालाच वाटत नाही. परीक्षेत पहिला आलास तर आय फोने घेऊन देईन हे मी एक बाप आपल्या सातवीतील मुलाला सांगताना ऐकला आहे. मुळात मुलाला अभ्यासाची गोडी निर्माण करणे गरजेचे आहे. मग आईबापानी त्याचा अभ्यास घेणे किंवा ट्युशन ला पाठवणे (निदान दहावी पर्यंत) याची गरज उरत नाही. कालाय तस्मै नमः

In reply to by सुबोध खरे

शर्यतीत धावून पहिले यावे हि कोणत्याही घोड्याची इच्छा नसते हि त्याच्यावरील स्वाराची इच्छा असते !
छोट्या भाच्याकडे बघून हाच विचार करत होतो पण त्याला योग्य वाक्य सुचत नव्हते.त्याची आई मला त्याला १२ वी नंतर अमेरिकेला पाठवणे चांगले का दहावी नंतर हे विचारात होती. तो आत्ता सातवी मध्ये आहे.

In reply to by सुबोध खरे

शर्यतीत धावून पहिले यावे हि कोणत्याही घोड्याची इच्छा नसते हि त्याच्यावरील स्वाराची इच्छा असते !
वाक्य आवडलं........ ढापतो आहे तुमच्या नावाने.....

In reply to by मनराव

वाक्य आमचं नाही. प्रा. जयंत नारळीकरांचे आहे. फुकटचे श्रेय ढापणे पटत नाही.त्यांचे श्रेय त्यांना मिळावे.

प्रवाहाच्या दिशेनेच पोहण्याची मानसिकता आहे ही. आणि अपयश आले तर लोक काय म्हणतील याची भिती. उदा. समजा एखादा मुलगा मला तबला वादनात करियर करायचे आहे म्हणुन मी उत्तीर्ण होण्यापुरताच अभ्यास करतो असे म्हणाला आणि त्याचे तबला वादनात करियर झाले नाही तर नावं ठेवणारे खुप जण असतील. पण एखादा मुलगा उत्तीर्ण होण्यापुरतेच गुण मिळवुन डॉक्टर, इंजिनियर झाला आणि त्याचेसुद्धा म्हणावे तसे करियर झाले नाही तर नावे ठेवणारे लोक कमी असतात कारण तो प्रवाहा बरोबर पोहत होता. या न्युनगंडातुनच चार लोक जे करतात तेच करावे अशी मानसिकता बनते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पटली आपली पोस्ट.. पटली आपली पोस्ट.. अजून आमची वेळ यायची आहे, पण बरेचदा हा विचार माझ्याही मनात येतो की आपल्या मुलाला कसे घडवायचे.. बाकी आजच्या जमान्यात अंगात इतर काही विशेष कलागुण नसल्यास पुस्तकी शिक्षण घेऊन एखादे डिग्री सर्टिफिकेट मिळवणे हा उपजिवीकेचा सोपा आणि सेफ मार्ग आहे.

In reply to by तुमचा अभिषेक

आजच्या जमान्यात अंगात इतर काही विशेष कलागुण नसल्यास पुस्तकी शिक्षण घेऊन एखादे डिग्री सर्टिफिकेट मिळवणे हा उपजिवीकेचा सोपा आणि सेफ मार्ग आहे. हॅहॅहॅ... भलत्याच भ्रमात आहात तुम्ही ! आपल्या देशात सध्य परिस्थीतीत नसलेल्यांना नोकरी मिळवणे आणि असलेल्यांना नोकरी टिकवणे हीच मोठी परिक्षा झाली आहे. नोकर्‍यांची अवस्था जाणुन घ्यायची असेल तर खालील व्हिडीयो जरुर पहा :---

In reply to by मदनबाण

मदनबाण साहेब ते व्हिडीओ पाहिले. यात फार मोठे उंदीर आहेत ज्यांना लाखांमध्ये पैसे पाहिजेत आणि तेवढी किंमत मिळत नसल्याने ते नाराज आहेत. असो ORG -MARG च्या सर्वेक्षणाप्रमाणे नोकरी करण्याच्या लायकीचे( employable) लोक एम बी ए मध्ये फक्त १० टक्के आहेत आणि इंजिनियरिंग मध्ये २ ६ % आहेत. दुसर्या एका दिग्गजाने लिहिल्याचे स्मरते कि आज इंजिनियरिंग मध्ये जे शिकवले जाते ते उद्योगाच्या उपयोगाचे नसून जे प्राध्यापकांना शिकवता येते ते शिक्षण असते.या कॉलेजांचा अभ्यासक्रम उद्योगाभिमुख करणे अतिशय गरजेचे आहे. अशा गोष्टी आय आय टी किंवा बिट्स थोड्या फार प्रमाणात करतात म्हणून त्यांच्या विद्यार्थ्यांना उद्योगधंद्यात नोकर्या पटकन मिळतात. परंतु झाडबुके किंवा ठाले पाटील इंजिनियरिंग कोलेजात तसे होत नाही या मुळेच वरील प्रकार दिसून येतो. हीच परिस्थिती मैनेजमेंट कॉलेजात आहे असे आमचे वडील सांगतात( त्यांनी एके काळी JBIMS मधून मैनेजमेंट केले आहे)त्यामुळे त्यांचे मत ग्राह्य धरत येईल

In reply to by सुबोध खरे

अशा गोष्टी आय आय टी किंवा बिट्स थोड्या फार प्रमाणात करतात म्हणून त्यांच्या विद्यार्थ्यांना उद्योगधंद्यात नोकर्या पटकन मिळतात. खूप जास्त पॅकेज मिळणे, खूप कठीण इंटर्व्ह्यू क्रॅक करणे आणि खरोखर ते काम करण्यास लायक असणे या भिन्न गोष्टी आहेत. कामाची ओनरशिप घेण्याची व्रूत्ती कुठल्याच पुस्तकात किंवा कॉलेजात शिकवत नाहीत. ORG -MARG च्या सर्वेक्षणाप्रमाणे नोकरी करण्याच्या लायकीचे( employable) लोक एम बी ए मध्ये फक्त १० टक्के आहेत आणि इंजिनियरिंग मध्ये २ ६ % आहेत. ही संस्थावाले स्वतःला कोण समजतात ? जर एम्प्ल्ऑयरला प्रॉब्लेमसेल तर तो काढून टाकेल त्या कर्मचार्‍याला.

In reply to by सुबोध खरे

आता इतक्या संस्थांमध्ये एम बी ए होता येते आणि तिथे असे थोर थोर अध्यापक असतात की हे १०% प्रमाण शक्य आहे. मला असे वाटत नाही की भारतातल्या अग्रगण्य - आय आय एम तर अतिशय उत्तम आहेतच पण ज्याला दुसरा (JB, NM, MDI, XLRI etc) आणि तिसरा स्तर (GOA, SIMBI, IMT, etc) समजले जाते त्या ठिकाणही हे प्रमाण १०% इतके खराब नक्कीच नाही. शिक्षणमहर्षी बनण्याच्या प्रयत्नात आता इंजिनिअरिंग / शास्त्र आणि इतर व्यावसायभिमुख शाखा जसे बीसीएस नंतर एम बी ए कॉलेज काढण्याचीही टूम निघाली आहे. कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे खाजगी एम बी ए कॉलेज निघाली आहेत. मुख्य म्हणजे याला काही सेटअप लागत नाही. त्यामुळे अजूनच सोयीचे. हायवेलगत असलेल्या जागा राजकारणी आशीर्वादाने शिक्षण संकुलात रुपांतरित होत आहेत. तिथल्या कॉलेजेस मधून एम बी ए झाल्यावर नोकरीसाठीची उपयुक्तता किती असेल. चार पुस्तके १२वी पद्धतीने वाचून एम बी ए होत नाही. आणि इतक्या हजारो एमबीए ची व्यावसायिक गरज नाही. अर्थातच त्या मोठ्या फीच्या प्रमाणात अपेक्षित नोकर्‍या आणि पगार मिळत नाही.

In reply to by मैत्र

म्हणुनच गेल्या काही वर्षात एम बी ए ची बरीच दुकाने बंद झाली आहेत. (विद्यार्थांचा प्रतिसाद नसल्यामुळे) बातमी

In reply to by मैत्र

In Maharashtra, over 32,000 MBA seats are left vacant in B-schools across the state. A total of 45,700 MBA seats are available for admissions in the state, only 12,800 seats have been filled after the fourth round of Centralised Admission Process (CAP). Read more at: http://education.oneindia.in/news/2013/07/23/over-32k-mba-seats-left-va…

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सौंदाळा साहेब, हि केवळ प्रवाह पतित अवस्था नाही. आज भारतात किती साधारण तबलजी आपले पोट व्यवस्थित भरू शकतात. पूर्ण वेळ तबलजी होणे म्हणजे महिन्यचे अर्धे दिवस उपाशी राहणे किंवा कोठ्यावर नाहीतर डान्स बार मध्ये तबला वाजवणे.( आमचे एक दूरचे नातवाईक यांचा मुलगा पूर्ण वेळ तबलजी आहे. आणि त्यःचा भाऊ इंजिनियर आहे ( ज्याची बायको माझी भाची आहे). हा इंजिनियर जेवढा पगार महिन्यात मिळवतो तेवढा त्याला वर्षात सुद्धा मिळत नाही आणि त्यामुळे तो आजही अविवाहित आहे. आपण फक्त अल्लारखा, शफ़ाअत अहमद खान किंवा झाकीर हुसेन पाहतो. पण त्या उंचीला न पोहोचलेले ९९९ तबलजी किती मिळवतात हे आपल्याला दिसत नाही. या विरुद्ध १ ० ० ० पैकी ९ ० ० इंजिनियर बर्यापैकी पैसे मिळवताना दिसतात शेवटी रामकृपेपेक्षा दामकृपा महत्त्वाची. गाणे किंवा तबला सुद्धा भरल्या पोटावर ऐकायला छान वाटतो

In reply to by सुबोध खरे

पूर्ण वेळ तबलजी होणे म्हणजे महिन्यचे अर्धे दिवस उपाशी राहणे किंवा कोठ्यावर नाहीतर डान्स बार मध्ये तबला वाजवणे.
तुमचे याबाबतीतले ज्ञान खूपच तोकडे आहे. एवढेच म्हणेन धन्यवाद

In reply to by सुबोध खरे

पूर्ण वेळ तबलजी होणे म्हणजे महिन्यचे अर्धे दिवस उपाशी राहणे किंवा कोठ्यावर नाहीतर डान्स बार मध्ये तबला वाजवणे.
असहमत. माझा मुद्दा इतकाच आहे की जर आपल्या अंगी एखादी दुसरी कला, वेगळ्या विषयात आवड असेल तर चार लोक एखादी गोष्ट करतात म्हणुन आपण तीच गोष्ट करुन रॅट रेसमध्ये सामील का व्हावे. क्लासेस, सीबीएसई, ईंग्रजी माध्यम, डॉक्टर, ईंजिनियर ह्या वाटेने सध्याची झुंड चालली आहे. आमच्या ईंजिनियरींग वेळचे एक उदाहरण सांगतो. एक अशिक्षित वडील त्यांच्या मुलाला आय्.टी. लाच अ‍ॅड्मिशन पाहीजे म्हणुन म्हणत होते. आय्.टी मध्ये दोन लाख, पाच लाख रोजगार उपलब्ध होणार ह्या बातम्या वाचुन. त्या मुलाला तर आय्.टी म्हणजे काय माहीत नव्ह्ते. बाकी पोट भरण्याचा मुद्दा म्हणालात तर वर्षाला महाराष्ट्रातच ~५०००० ईंजिनियर होतात. (डिप्लोमा, एम्.सी.ए वगैरे होणारे वेगळेच) भारताचा ईंजिनियरचा वार्षिक आकडा दोन लाख असावा यातील कितीतरी जण बेकार किंवा नाममात्र पगारावर काम करतात. तेच मेडिकलचे, मोठ्या रुग्णालयात बरेच डॉक्टर अगदी नर्सिंगची कामे करतात. सध्या पास होणारे किती डॉक्टर (स्पेशलायझेशन नसलेले) स्वतःचे क्लिनिक काढुन जम बसवु शकतात?
त्यामुळे तो आजही अविवाहित आहे
. परत तोच प्रकार, मुलीदेखिल लग्न करताना नोकरी असलेलाच (प्रवाहाच्या दिशेने पोहणारा) मुलगा बघतात. आमच्या नात्यात पण बी.कॉम करुन निप्पाणीला ८० एकर शेती असणार्‍या एकुलत्या एक मुलाचे केवळ शेती करतो म्हणुन लग्न झाले नाही. अपयश हे कोणत्याही क्षेत्रात येऊ शकते (त्याचे प्रमाण कमी जास्त असेल) पण म्हणुन आपण आपल्या मुलांची आवड / कल बघायचा का त्यांना लहानपणीच प्रवाहात लोटुन द्यायचे हा विचार करायला पाहीजे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मुलीदेखिल लग्न करताना नोकरी असलेलाच (प्रवाहाच्या दिशेने पोहणारा) मुलगा बघतात. सहमत एखाद्या नोकरी करणाऱ्या मुलीने बेकार सुशिक्षित मुलाशी विवाह का करू नये ? नोकरी वाला मुलगा गृहिणीशी लग्न करू शकतो मग एखादी मुलगी का नाही करू शकत. या मुळे अख्खे कुटुंब सावरले जाऊ शकते.

In reply to by खटपट्या

वा साहेब, आपण आमच्या मनातील बोललात. मी केंव्हापासून बायकोला सांगतो आहे जरा जास्त लक्ष दे व्यवसायात म्हणजे मला निवृत्त होता येईल आणि थंड बसता येईल. लष्करातून निवृत्त होताना मी असा सहा महिने रजा घेऊन थंड घरी बसलो होतो. त्यामुळे हा माणूस काही न करता थंड बसू शकतो हे तिने पाहिले आहे आणि म्हणूनच ती असे करायला तयार नाही. अजूनही मला रात्री आणि दुपारी व्यवस्थित थंड झोप लागते. आमच्या बहिणीची मल्लीनाथी अशी होती कि जर ती कमावते आणि तू घरी बसलास तर तू घरकाम करशील का? यावर मी शांतपणे सांगितले कि जर बायको नवर्याला पोसू शकते तर घरकामाला बाई नाही का ठेवू शकणार?

In reply to by सुबोध खरे

डॉ. अनिल अवचट यांची कहाणी अशीच काहीशी आहे असे वाचले होते पुर्वी..

In reply to by सुबोध खरे

बायको नवर्याला पोसू शकते तर घरकामाला बाई नाही का ठेवू शकणार?
आयला, हे बरे आहे..! म्हणजे बायकोने कामावर जायचे आणि घरी........नवरा आणि ठेवलेली (घरकामासाठी) बाई.

In reply to by प्रभाकर पेठकर

:)

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठेकर काका काय आयडीयाची कल्पना आहे राव.एक नंबर ,एकदा बायकोला विचारुन बघितले पाहिजे....

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

तुम्ही खरे साहेबांचा मुद्दाच परत ठासून सांगत आहात, वेगळ्या प्रकाराने. >> तेच मेडिकलचे, मोठ्या रुग्णालयात बरेच डॉक्टर अगदी नर्सिंगची कामे करतात. सध्या पास होणारे किती डॉक्टर (स्पेशलायझेशन नसलेले) स्वतःचे क्लिनिक काढुन जम बसवु शकतात? हे वाक्य उदाहरणार्थ पहा. एमबीबीएसला अ‍ॅडमिशन मिळाली नाही म्हणून या मुलांना बळजबरी कुठल्यातरी तालुक्याच्या गावी असलेल्या होम्योपदि वा आयुर्वेद किंवा युनानीची 'डिग्री' विकत घ्यायला त्यांच्या पालकांनी भाग पाडलेले असते. डॉक्टरकीचे त्यांचे ज्ञान शून्य असते. हे करून त्या खरेतर मूळच्या हुशार असलेल्या मुलाला विनाकारण कंपाउंडर लेव्हलच्या नोकर्‍या मोठ्या शहरांतील मोठ्या हॉस्पिटलांत "आर.एम.ओ" अशा गोंडस नावाखाली कराव्या लागतात. खरेतर ती तरूण मुले तिथे जमेल तितके वैद्यकीय 'शिक्षण' चोरून मारून म्हणजेच, नुसतेच ठोकताळ्यांनी, अन सिनियर डॉक्टरांनी तापाला कॅल्पॉल लिहिली, तर मी पण तेच पाठ करणार अशा अशास्त्रीय पद्धतीने घेत असतात, अन त्यासाठी २-५ हजार रुपयांवर राबत असतात. हाच मुद्दा चर्चाप्रस्तावात आलेला आहे, की मुलांना 'रॅटरेस'मध्ये ढकलू नका. त्यांना स्वतः फुलू द्या, सक्षम बनू द्या, मग त्यांना हवे तर ती मुले हवे तिथे धावतीलच.

सी बी एस ई, आय सी एस सी बोर्डात घालतात. त्या शाळांचा अभ्यास तुफान कठीण असतो
are u sure ? माझ्या पाहण्यात मुंबई विद्यापीठाचा अभ्यास जास्त कठीण असतो असे आढळून आलेले आहे .

In reply to by स्पा

सीबीएसी, आय्सीएसी यांची तुलना एस्सेसी बोर्डाशी होते हो. विद्यापीठाशी नव्हे. एसेस्सी बोर्ड = महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. शिवाजीनगरच्या चौकात आकाशवाणी च्या अपोझिट ऑफिस आहे बघा ;)

माझ्या मते "शाळा बुडणे" हे मोघम उत्तर असावे. कारण नर्सरीत वा के.जीत जाणार्या शिशुंची एखाद्या आठवड्यामुळे शाळा बुडल्यामुळे शाळेला जाण्याची सवय मोडण्याची शक्यता फार जास्त असते. त्यामुळे सुट्टीवरुन पुन्हा परत आल्यावर पुन्हा शाळेत जाण्याआधी रडारड - कामावर उशीरा जाणे वा अगदीच वेळ आली तर मग रजा टाकणे वगैरे प्रकार घडु शकतात.त्यापेक्षा सुट्टी न घेणेच बरेच पालक पसंत करत असावेत.
आणि ट्युशन सिल्वर क्रेस्ट असं सांगायचं.
ही ट्युशन वा शिकवणी एखाद्या कलेची सुध्दा असु शकते. ज्यु.के.जी तल्या मुलासाठी टिपिकल अभ्यासक्रमासाठी शिकवणी हा प्रकार पचवणे थोडे जड जात आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

तस नाहिये.माझ्य तिन्हि शेजार्याम्चि मुले के जि,पहिलि आणि तिसरित आहेत.तिन्हि आया (मदर्स) मुलांच्या शलेबाबत काटेकोर असतात.केजि मधला मुलगा ७ अनि ४ हे क्रमाम्क नेह्मी उलटा काढायचा.त्यावरुन त्याला त्याच्या आइने उलत्याने भाजलय.तिसरितलि मुलिचि परिक्शा असतना तिचि आइ रात्रि ११ वाजेपर्यंत तिच अभ्यास घेत होति.

In reply to by किचेन

तुम्हाला येथे वावरताना बराच अवधी लोटला आहे, आता तरी निदान 'गमभन' सहाय्यकाची मदत घेऊन टंकलेखन करत चला. कधी तरी विनोद म्हणुन ठिक वाटतं. पण नेहमी नेहमी असं लिखाण वाचवत नाही. (अर्थात हा फुकटचा सल्ला आहे. मानायलाच हवा असा आग्रह नाही. )

हे कधीतरी बदलायला हवं. मुलांना ७-८ वर्षांची असताना शाळेत घातले तर त्यांची ग्रास्पिंग पॉवर खूप जास्त असते असा शास्त्रीय निष्कर्ष मागे कधीतरी वाचला होता. माझी बहीण शाळेत शिक्षिका असताना तिला आलेला अनुभव. केजीतली लहान मराठी मुले तिच्याजवळ येऊन विचारायची," मॅडम, मी 'मे आय गो टु द टॉयलेट' ला जाऊ का ? यावर आणखी काही भाष्य करण्याची जरुर वाटत नाही.

In reply to by तिमा

मुलांना ७-८ वर्षांची असताना शाळेत घातले तर त्यांची ग्रास्पिंग पॉवर खूप जास्त असते असा शास्त्रीय निष्कर्ष मागे कधीतरी वाचला होता.
हे कितीही कानी कपाळी ओरडून सांगितलं तरी लोकांच्या डोक्यात उजेड पडत नाही. स्कूल गोइंग एज = ६ वर्षे. (५ पूर्ण) इथपर्यंत शरीराची वाढ एका बेसिक लेव्हल पर्यंत होत असते. अगदी ऑप्टीक नर्व्ह मायेलिनेशन पर्यंत. तोपर्यंत मुलांच्या मेंदूतली सर्किट्स बनविणार्‍या केबल्स उर्फ अ‍ॅक्झॉन्सवर मायेलिनेशन म्हणजे इन्शुलेशन चढविण्याचे कार्य शरीर करीत असते. त्या आधीच्या वयोगटातले हात हातात पेन्सिल धरून लिहिता येईल इतपत विकसितच झालेले नसतात. पामर ग्रिप नामक एक प्रकार असतो. दुसरा पिन्सर ग्रास्प. गूगलून पाहिले तरी कळेल की ३ वर्षाच्या मुलाला प्लेग्रूप नर्सरीत ढकलताना अन त्याने एबीसीडी लिहावी असे म्हणताना आपण त्याच्या शरीराची वाढ नैसर्गिक रित्या होण्यामध्ये किती ढवळाढवळ करीत असतो. ह्या पहिल्या ५ वर्षांत मुले असंख्य नव्या गोष्टी शिकतच असतात, त्यात चालणे, बोलणे, पहाणे, ऐकणे अशी मोटर व सेन्सरी स्किल्स अंतर्भूत असतात. एकाद्या ब्लँक काँप्युटरला बायोस चिप बसवून तिच्यात बायनरी कोड वापरून माहिती लिहिली जाणे इथपासून ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल होण्या पर्यंतची, त्या असहाय्य लहान गोळ्याला चालता बोलता मानवी जीव बनवण्याचे प्रचण्ड किचकट काम इथे सुरू असते. हे पूर्ण झाल्यानंतरच, पुढचे 'शालेय' शिक्षण सुरू व्हायला हवे, अन तसे झाले तर ते मुलांना सोपे जाते. पण 'प्लेग्रूप' केलेला नसेल तर 'नरसरीत' प्रवेश नाही, अन अमुक नर्सरीचा स्टुडंट असेल तरच तमुक प्रेस्टिजियस स्कूल मधे ज्युनिअर केजीला अ‍ॅडमिशन मिळेल, अस्ल्या धंद्यांमुळे आजकाल ही नाटके सुरू आहेत. नशीब आमचे, की आमच्या लहानपणी ५ वर्षे पूर्ण नसतील तर पहिलीत घेत नसत. अन त्या आधीच्या बालवाड्या नामक कोंडवाड्यांचे खूळ माजलेले नव्हते.

In reply to by वेल्लाभट

वेडझव्यांची दुनिया आहे
म्हणजे नेमके काय? ही दुनिया म्हणजे नेमके कोण? जर ती दुनिया जनरिक असेल आणी मी त्याचा एक भाग असेन तर माझा ह्या विधनाला आक्षेप आहे. - (कुठल्यही गोष्टींचें 'वेड' नसलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

घ्या की आक्षेप. माझा त्याला काहीच आक्षेप नाही. ----------------- वेड आणि वेड यात फरक असतो. पण जाउदे. तो शहाण्यांचा विषय आहे.

त्याचे काय आहे कि,मुलाचा शैक्षणिक विकास हा पालकांसाठी स्टेटस चा प्रश्न असतो... आणि स्टेटस साठी काहीही करण्याची तयारी असते...मुलाच्या खरया विकासाशी त्याचा काडीचाही संबंध नसतो...

उंदरांच्या शर्यतीतून स्वत:ला सोडवून घेतलेल्या माझ्या एका जवळच्या मित्राची गोष्टः हा इसम सी.ए. आहे. स्वतःची प्रॅक्टिस करतो. आपली पोटापाण्याची आणि त्याने ठरवलेल्या एका बेसिक जीवनशैलीची गरज भागेल एवढे पैसे त्यातून सुटतील इतपतच त्यात गुंततो. त्याला तबला वाजवायची आवड आहे. रामदास पळसुल्यांचा शागीर्द आहे. रोज व्यवस्थित ४-५ तास रियाज करतो. क्रिकेटचं प्रचंड वेड. शिक्षणामुळे म्हणा किंवा काय, पण क्रिकेटचे कायदे या विषयात गती आहे! सध्या अंपायरिंगच्या परीक्षा देतोय. (त्याची अशीच प्रगती चालू राहिली तर १० वर्षांत आयसीसी मान्यताप्राप्त अंपायर होईल!) या बाबाचं अख्खं खानदान सीए आहे. आई, वडील, भाऊ, वहिनी, बायको. भयानक पीअर प्रेशर यावं अशी परिस्थिती. पण हा त्या सगळ्याचं लोडच करून घेत नाही! पहिल्यांदा त्रास झाला, पण आता सगळ्यांनी स्वीकारलंय. माझ्या उंदीरदौडीची जाणीव याला बघून फार होते...

In reply to by आदूबाळ

या बाबाचं अख्खं खानदान सीए आहे. आई, वडील, भाऊ, वहिनी, बायको. भयानक पीअर प्रेशर यावं अशी परिस्थिती.
माझ्या निरिक्षणानुसार खानदान असलं सॉलिड पैसेवालं असेल तर एखाद्याने करिअर फाट्यावर मारणे अजिबात अवघड नसतं... हा आपल्या वागणुकिवर आप्तांच्या वैचारिक धुस्फुशी थोड्याफार असतात पण हा विरोध सुरुवातिला असतोच. व तसही त्याने थोडच फार काही बिघडतं ? घरात खायची वनवा असति तर त्याला हे शौक जमले असतं काय ? शर्यतित सहभागी व्हावच लागलं असतं. अन जेव्हां जिंकण्यासारख चॅलेंजच मिळत नाही तेव्हांच त्यातुन स्वेछ्चेने बाजुला व्हावे, ते सुध्दा नियोजनबध्द असच वाटतं.

In reply to by अग्निकोल्हा

घरात खायची वनवा असति तर त्याला हे शौक जमले असतं काय ?
एकदम मान्य. नसतं जमलं. पण मूळ धागा आणि प्रतिसाद वाचून वरची चर्चा "घरात खायची वानवा" असलेल्या लोकांबद्दल आहे असं वाटलं नाही. खालचा जेडीचा प्रतिसाद समर्पक आहे - खायची वानवा असो अथवा नसो.
आपल्या मधले खूप लोकं उंदर दौड मनापासून करत नाही, ती करावी लागते. त्याशिवाय पर्याय नाही.
अवांतरः सीए सॉलिड पैसेवाले असतात हा गैरसमज आहे हो... :)

In reply to by आदूबाळ

घरचे नीट असेल आणि अण्णांची कृपा असेल तर छंदांचे काही प्रमाणात व्यवसायात रुपांतर करणे सोपे आहे. माझे खूप साप पकडणारे मित्र,किंवा प्राणी-पक्ष्यांमधले तज्ञ मित्र कोणाचा आधार नसल्याने किंवा अण्णांची कृपा नसल्याने देशोधडीला लागलेले मला माहित आहेत. असे काही लोकं होते की "डिस्कवरी " वरच्या कुठल्या पण कार्यक्रमात हिरो बनतील. त्यांचे ज्ञान आणि अनुभव अशक्य होते. पण फक्त पोटा पाण्यासाठी लढा द्यायला लागल्या मुळे वाटेल ती कामे स्वीकारून, नंतर दारू मध्ये प्राणी-सर्प प्रेम बुडवून एक-दोघांनी आयुष्याचा पण शेवट करून घेतला. 'भारतात छंदाची किंमत नाही' हे मी स्वानुभवावरून सांगतो आहे,जीवावर खेळ करून पण नाग पकडला एखाद्याच्या घरी तरी लोकांचा "तुम्ही आयुष्यात काय करतात?" हा प्रश्न मला खूप छळायचा. आपल्या मधले खूप लोकं उंदर दौड मनापासून करत नाही, ती करावी लागते. त्याशिवाय पर्याय नाही.

In reply to by बॅटमॅन

वडील म्हणायचं असेल बहुधा. तसे वाटंत नाही.
घरचे नीट असेल आणि अण्णांची कृपा असेल तर छंदांचे काही प्रमाणात व्यवसायात रुपांतर करणे सोपे आहे.
हे वाक्य वैयक्तिक नाही सार्वजनिक आहे. सर्वच जणं आपल्या वडिलांना 'अण्णा' म्हणत नाहीत. कुणी आध्यात्मिक गुरू असावेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

आध्यात्मिक गुरू नसावेत बहुतेक. घरचे नीट असले तरी वडिलांचे आपण करतोय त्याला आनुकूल्य नसेल तर काही उपयोग होत नाही म्हणून तसे म्हटले असावे असे वाटते. अन अण्णा हा शब्द सिंबॉलिकली वापरला असावा. (असं माझं मत आहे.)

In reply to by बॅटमॅन

अण्णा हा शब्द सिंबॉलिकली वापरला असावा.
हम्म्म्म! बघुया ते स्वतः काय खुलासा करतात. (जर केलाच तर).

In reply to by बॅटमॅन

गुरु वगैरे नाही हो, ते माझे क्षेत्र नाही. 'दाम करे काम', 'आधी पोटोबा मग विठोबा' या पिढीतला आहे मी. सिंहगड रस्त्या वरच्या डुक्कर (टमटम) वरचे साहित्य वाचून मी मराठी शिकलो आहे. त्यामुळे असे अनेक शब्द ओठांवर लोळण घेतात ;)

In reply to by बॅटमॅन

रिक्षा, ट्रक, इ. च्या मागचे साहित्य वाचत नाही काय?... "अण्णांची कृपा", "तात्यांचा आशिर्वाद", "आईची पुण्याई" असे अनेक लघुवाहनलेख असतात तेथे, आणि जागा उरेल तेथे तोंडी लावायला असंख्य चिल्यापिल्यांची नामावळ. साहित्याचा इतका समृद्ध प्रकार, तोही सतत गावोगावी, गल्लोगली प्रवाही (फिरता) आणि लोकाभिमुख (म्हणजे वाहनाच्या पाठीमागे पण मागच्या जनतेच्या तोंडापुढे) असलेला प्रकार, दुसरा मिळणे नोहे ! ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एका रिक्षाच्या मागे महान साहित्य वाचले होते. (दूसरीकडे कुठे? पुण्यातच): 'आई जेऊ घालीना, बाप भिक मागु देईना आणि बायको रिक्षा चालवू देईना.'

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बरोबर आहे तुमचे, अण्णा म्हणजे आपले परम पूज्य ! मला वाटले हा अर्थ जगमान्य आहे,पण जास्त कोणी रिक्षा वरचे साहित्य वाचत नाही असे दिसते.

In reply to by जॅक डनियल्स

जास्त कोणी रिक्षा वरचे साहित्य वाचत नाही असे दिसते.
आम्ही रिक्षातले साहीत्य पाहत जातो. ;)

In reply to by अभ्या..

माझ्या अनुभवाने शेयर रिक्षा वरचे साहित्य जास्त सुंदर असते, साध्या रिक्षा वरच्या साहित्यापेक्षा ;)

In reply to by अभ्या..

माझ्या अनुभवाने शेयर रिक्षा वरचे साहित्य जास्त सुंदर असते, साध्या रिक्षा वरच्या साहित्यापेक्षा ;)

तुम्ही दिलेल्या उदाहरणातले पालक त्यांच्या मुलांनी शर्यतीत मागे राहू नये म्हणून काळजी (!) घेताहेत इतकंच म्हणेन. पण एकदा अक्कल आली की या मुला-मुलींना आपण शर्यतीत धावायचं की नाही - हे ठरवता येईल की. धावायचं नसेल तर प्रश्न नाही, धावायचं असेल तर 'आम्हाला पुरेसं पाठबळ दिलं नाही' अशी तक्रार करायला नको त्यांनी भविष्यात. शर्यतीत उतरायचं नाही (कष्ट नकोत) पण विजेत्याला मिळणारे सर्व फायदे मात्र पाहिजेत - अशी मानसिकता असली की मग जगणं 'उंदीरशर्यत' वाटायला लागतं - खरी अडचण ती आहे. कुठल्याही शर्यतीत न उतरता सुखा-समाधानाने जगणारे अनेक लोक पाहिल्यावर शर्यतीत उतरायचं का नाही याचा निर्णय आपण स्वतः घ्यायचा असतो याची जाणीव झाली आहे आणि त्यामुळे त्याबद्दल तक्रार करण्यात अर्थ नाही इतकं मी माझ्यापुरतं मान्य करुन टाकलं आहे. इतरांनी ते मान्य व्हावचं असा आग्रह नाही.

अजुन तरी लेकीला या स्पर्धेत उतरवलं नाही आणि या पुढेही तिला आम्हा उभयतांकडुन यात लोटलं जाणार नाही असाच दोघांचा निश्चय आहे. काही वैयक्तीक कारणांमुळे सिबिएसी मस्ट होतं ते टाळता आलं नाही. सध्याचा महाराष्ट्र बोर्डाचा शालेय अभ्यासक्रम काय असतो? किती कठिण आहे? हे माहित नाही. पण जेव्हा मी लेकीच्या वयाचा होतो तेव्हाचा माझा अभ्यासक्रम आणि तिचा आताचा अभ्यासक्रम यांच्यात किमान ४-५ इयत्तांचा फरक आलेला पहातोय. म्हणजे मी जे सातवी वैगरे शिकलो ते ती तिसरीत असतानाच शिकली. तिच्या वर्गातली मुलं दुपारी शाळेतून आली की दप्तर टाकलं दोन घास कसे बसे घश्यात कोंबले की दुसरं दप्तर उचलून शिकवणीला पळतात. दया येते त्यांची. एकतर सकाळी शाळेत जायचं म्हणुन लवकर उठतात, आणि दुपारी शिकवणीला पळतात त्यामुळे सकाळची राहीलेली झोप दुपारीही मिळत नाही. दुपारच्या शिकवणीतुण सुटका झाली की हौशी आई-वडलांच्या खातर एकादा नाच/कराटे/गायनाचा क्लास त्यांची वाट पहात असतो. शेवटी दमलेलं-भागलेलं कोकरू शाळेत परफॉर्म करत नाही म्हणुन परत दबाव येतो ते वेगळच.

माझा मुलगा सिबिएसी शाळेत नववीत आहे. मी अजुनही त्याला कोणताही क्लास लावलेला नाही. त्यान्च्या अभ्यासाची रचना समजुन घेतली तर सीबीएसी काही कठीण नाही.आपण थोडे मर्गदर्शन जरुर करावे लागते, पण ती पालक म्हणुन आपलीही जबाबदारी आहे असे मला वाटते. अर्थात हे प्रत्येकाच्या इंटरेस्ट्वरही अवलंबुन आहे, काही लोक मुलांचा अभ्यास काय आहे हे न बघताच वर वर बघुन कठीण आहे म्हणुन ट्युशनला पाठवतात. नर्सरी,ज्यु केजी ला असा काय तुफान कठीण अभ्यास असतो जो आपण सुशिक्षीत पालक घेउ शकत नाही.

पण ह्या समस्येला उत्तर काय ? मी आमच्या घरी होम ए़जुकेशन विषयी बोललो...की पोरांना घरीच शिकवुयात ... तर माझीच अक्कल काढण्यात आली :( --प्रचंड शिक्षण घेवुन कॉर्पोरेट वर्ल्डमधे अडकलेला उंदीर

In reply to by प्रसाद गोडबोले

मी देखील प्रवाहाविरुद्ध पोहा वगैरे लिहिले आहे पण स्वतः असा निर्णय घेऊ शकेन का याबाबत साशंक आहे (लाजलेली स्मायली). पण असे वेगळे निर्णय घेऊन यशस्वी होणारेदेखिल पाहीले आहेत. पत्रकारीता, उपहारग्रुह, नाटक, ईंजिनियरींग वर्कशॉप, पौरोहीत्य, शेती यात शुन्यापासुन सुरुवात करुन यशस्वी झालेले मित्र, नातेवाईक बघण्यात आहेत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पत्रकारीता, उपहारग्रुह, नाटक, ईंजिनियरींग वर्कशॉप, पौरोहीत्य, शेती यात शुन्यापासुन सुरुवात करुन यशस्वी झालेले मित्र, नातेवाईक बघण्यात आहेत.
असेच आमचे काही मित्रही !! त्यांच्या कडे पाहुन एका मनाला आनंद वाटतो तर एका मनाला हेवा (एन्व्ही ) . पण असं काही करण्यासाठी गट्स पाहिजेत हे मात्र खरं ....

उंदीर व्हायचं की मांजर की सिंह ते! ट्युशन्स ची फार गरज अशी नसते. फक्त पालक मुलांकडे पुरेसा वेळ आणि लक्ष देऊ शकत नाहीत त्यावेळी निदान मुले तिथे बसून थोडा तरी अभ्यास आणि पेपर्स सोडवणे असे काहीतरी करतात. नाहीतर आई बाप ऑफिसात आणि एकटा मुलगा घरी ऑनलाईन गेम्स खेळतोय असले प्रकार पाहिले आहेत. मुलांना अभ्यासात डांबून ठेवले तरी आणि पूर्ण मोकळे सोडले तरी काही ना काही तोटा आहेच. शक्यतः सुवर्णमध्य कसा काढायचा हे त्या त्या पालकांवर आणि मुलांवर अवलंबून आहे.